Monday, February 29, 2016

कसला हा भिकार अर्थसंकल्प

अर्थातच अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प भिकार असणार यात शंका नाही. कारण ज्यांना विरोधात बसायचे असते आणि विरोधच करायचा असतो, त्यांच्यासाठी त्यातल्या तरतुदींपेक्षा कोण अर्थसंकल्प मांडतो, त्याला महत्व असते. असा कोणी संघाशी संबंधित असेल वा भाजपावाला असेल, तर अर्थसंकल्प भिकार होऊन जातो. उलट तो मांडणारा कोणी त्यांच्या पठडीतला सेक्युलर असेल, तर अर्थसंकल्प कसाही असला, तरी कल्याणकारीच असणार. हे आजकालचे तर्कशास्त्र आहे. म्हणूनच जेटली यांच्या अर्थसंकल्पावर उमटलेल्या बहुतांश राजकीय प्रतिक्रिया चक्क दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत. त्यापेक्षा ज्यांचा राजकारणाशी फ़ारसा संबंध नाही, त्यांची मते अधिक मोलाची असतात. मग ती बाजूची असोत किंवा विरोधातली असोत. हल्ली पत्रकारांपासून कुठल्याही समाजघटकाला राजकारणाची बाधा झाली असल्याने, हा निकष महत्वाचा आहे. उदाहरणार्थ राहुल गांधी घ्या. त्यांनी मागल्या वेळी प्रथमच प्रदिर्घ भाषण करताना याच मोदी सरकारची ‘सुटबुटवाली सरकार’ अशी टवाळी केली होती. कारण त्यातून उद्योगपतींना वा श्रीमंतांना सवलती दिल्याचा आक्षेप होता. भूमी अधिग्रहणाचा विषय पटलावर होता. यावेळी पैसेवाले किंव व्यापारी यांच्याकडे काणाडोळा करून अर्थमंत्री जेटली यांनी गरीब, महिला, ग्रामीण किंवा वंचितांना दिलासा देणारा पवित्रा घेतला आहे. त्यामागे अर्थातच राजकीय हेतू असणार यात शंका घेण्याचे कारण नाही. आगामी वर्षभरात अनेक विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत आणि तिथे भाजपाला आपल्या राजकीय स्वार्थाचे गणित साध्य करायचे आहे. सहाजिकच सामान्य मतदाराला खुश करण्याचे उद्दीष्ट यावेळच्या अर्थसंकल्पात डोकावले तर नवल नाही. सामान्य माणसाला अर्थशास्त्रातली गुंतागुंत कळत नाही. पण आपल्यापर्यंत येणारे लाभार्थ कळत असतात.
जेटली यांनी मोठ्या प्रमाणात खेडूत, गरीब शेतकरी, ग्रामीण महिला, वंचित असा वर्ग खुश होईल, याची आर्थिक मांडणी केली आहे. त्याच्या खर्चाचा बोजा श्रीमंत म्हटला जाईल अशा वर्गावर टाकला आहे. त्याचवेळी व्यापार उद्योगाला चालना म्हणून ज्या भरमसाट सवलती दिल्या जातात, तसे काहीही केलेले नाही. म्हणजेच उद्योगपती नाराज होणार आणि व्यापारी निराश होणार, हे स्वाभाविक आहे. त्यांच्या नाराजीने मतदानावर फ़ारसा कुठला विपरीत परिणाम होत नाही. पण आपल्याला कराचा अतिरीक्त बोजा उचलावा लागणार आणि बदल्यात कुठलेही प्रोत्साहन नसेल, तर त्यांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. दुसरी बाजूही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. युपीए वा कॉग्रेसने दहा वर्षाच्या कारकिर्दीत अब्जावधी रुपये गरीब वंचितांच्या नावाने उधळले, त्याचा कितीसा लाभ खर्‍या सामान्य गरीबापर्यंत पोहोचू शकला? गरीब वंचितांच्या नावावर मोठी रक्कम खर्च झाली. पण गरीबी कायम राहिली आहे. त्याच्याच नाराजीचे परिणाम आधीच्या सत्ताधीशांना मोजावे लागले आहेत. जेटली यांच्या ताज्या अर्थसंकल्पात त्याहून अधिक रक्कम गरीबांच्या कल्याणासाठी बाजुला काढली गेली आहे. म्हणूनच त्या आकड्याने गरीबांनी हुरळून जाण्याचे काही कारण नाही. जोवर ही रक्कम खरेच सामान्य गरीबाच्या हातापर्यंत पोहोचत नाही वा तिचे लाभ त्याला मिळत नाहीत, तोवर अशा आकड्यांना काहीही अर्थ नसतो. मधल्या मध्ये होणारी गळती थोपवल्याशिवाय ते लाभ वंचितांपर्यंत पोहोचणार नाहीत, की त्याची नाराजी संपण्याची शक्यता नाही. जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पी भाषणात त्याचे संकेत दिले आहेत. इतकी मोठी रक्कम नुसती खर्च होणार नाही, तर ती शक्यतो, थेट गरजूंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला जाणार आहे. त्यासाठी आधार कार्ड ही जुनीच कल्पना अधिक निर्दोष व कायदेशीर केली जाणार आहे.
अब्जावधी रुपयांच्या ज्या तरतुदी जेटली यांनी आपल्या संकल्पात समाविष्ट केल्या आहेत, ती रक्कम नुसत्या आकड्यांपुर्ती महत्वाची नाही. तिचा विनोयोग गरीब जनतेसाठीच व्हावा, अशी योजना आहे. म्हणजे असे, की अनुदान रुपाने खिरापत वाटण्याला त्यात प्राधान्य नाही, तर उत्पादक व रोजगार मार्गाने हा पैसा गरजूंच्या हाती जाणार आहे. त्यातून भ्रष्टाचाराचे खाचखळगे बाजूला करण्याचे प्रयत्न होणार आहेत. विविध रस्ते, सुविधा ग्रामीण भागात उभ्या करताना रोजगार निर्मिती व्हावी आणि पर्यायाने त्याचे वेतन वा उलाढाल म्हणून हा योजनेतला पैसा गरीबाच्या हाती पडावा, असे नियोजन केलेले आहे. सहाजिकच इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खेडोपाडी पोहोचू लागला, तर तिथेच तो खर्च होणार आहे. त्याच्या परिणामी तिथल्या छोट्या व्यापार दुकानाला ग्राहक मिळणार आहे. या दुकान बाजारातला सर्व माल स्थानिक नसतो, तर मोठ्या प्रमाणात कंपन्या कारखान्यांनी उत्पादित केलेला असतो. म्हणूनच जे उद्योजक आहेत, कारखानदार आहेत, त्यांच्यासाठी ग्राहक निर्माण केला जाणार आहे. त्यांना उद्योगात सवलती वा अनुदान देण्यापेक्षा बाजार उपलब्ध करून देणार्‍या अनेक तरतुदी यातून केल्या गेल्या आहेत. नुसते अनुदान व सवलती व्यापारी उद्योजकालाही आळशी बनवतात. मालाचा खप वाढला, मग उत्पादन वाढवूनही विस्तार होऊ शकतो. ग्रामीण भागातील लहानसहान उत्पादनेही रस्ते चांगले असतील तर शहरी बाजारात येऊ लागतात आणि शहरातला पैसा दलालामार्फ़त शेतकर्‍याला मिळण्यापेक्षा अधिक किंमत त्याला थेट बाजारात माल पाठवून मिळवणे सोपे जाते. हा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात शहर ग्रामीण अंतर कमी करणारा असल्याने आर्थिक समतोल साधणारा आहे आणि पर्यायाने गरीबाला रोजगार व उद्योगाला चालना देणारा ठरू शकणार आहे. कारण त्यात कुणाला खिरापत नाही.
गेल्या सात दशकात गरीबांना सर्वकाही खिरापतीसारखे वाटण्यावर पैसा उधळला गेला, पण त्यातून किंचितही गरीबी कमी झाली नाही. कारण पैसे खर्च झाले आणि त्यातला मोठा हिस्सा भ्रष्टाचाराने मधल्यामध्ये गिळून टाकला. राजीव गांधीच म्हणाले होते, शंभर रुपये गरिबाला दिले जाताना ८५ रुपये मध्येच पळवले जातात. तीच गळती या अर्थसंकल्पात रोखलेली आहे. आधार कार्डाला ओळख ठरवून अनुदानाची रक्कम मध्यस्थ नव्हेतर थेट लाभार्थीच्या खात्यात टाकण्याचे पाऊल उचलले जाणार आहेच. खेरीज विविध रस्ते वा उभारणीच्या खर्चातून रोजगारामार्फ़त गरीबाला पैसे कमावण्याला प्रवृत्त केले जाणार आहे. थोडक्यात सरकारने काही तरी वाडग्यात घालावे अशी जी भिकारी मानसिकता मागल्या सहा दशकात जोपासली गेली, तिला यंदाच्या अर्थसंकल्पाने छेद देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लाखो लोकांनी गॅस अनुदान नाकारून दिलेल्या प्रतिसादाचा लाभ अधिक गरजू ग्रामीण महिलांना सिलींडर देण्याकडे होणार आहे. म्हणजेच खरा गरजू व गरीब असेल, त्याच्यापर्यंत लाभ पोहोचवणे हे यातले उद्दीष्ट मोलाचे आहे. किंबहूना समाजवादी कल्पनाच उजव्या मानल्या गेलेल्या सरकारने प्रत्यक्षात राबवण्याचा विडा उचलला आहे. मनरेगा किंवा विविध गरीबी हटवायच्या योजनांनी बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याचे पाऊल प्रथमच उचलले गेले आहे. पण म्हणून ते तथ्य मान्य होण्याची अजिबात शक्यता नाही. सवाल काय झाले वा केले हा नसून, कोणी केले असा असतो. काम चांगले असले तरी ते भाजपाने वा मोदींनी केलेले असेल तर त्याला दोष दिलाच पाहिजे,. कारण मोदींना गुन्हेगार ठरवण्यासाठी बुद्धी राबली नाही, तर पुरोगामीत्व धोक्यात येणार ना? गरीब वंचित तडफ़डून मेला तरी चालेल. पण पुरोगामीत्वाचा झेंडा फ़डकत राहिला पाहिजे आणि तो तसाच फ़डकत राखण्याचा सोपा मार्ग मोदींच्या नावाने शिव्याशाप देत बसणे हाच आहे ना?

Sunday, February 28, 2016

गाईच्या शापानेही कावळा मरत नाही



Post-script: Last week, at the Delhi Gymkhana litfest, I suggested that the right to free speech must include the right to offend so long as it doesn’t incite violence. A former army officer angrily got up and shouted, “You are an anti-national who should be lynched right here!” When even the genteel environs of the Gymkhana club echo to such strains, we should all be very worried.

बाहुलीसारखी दिसणारी आणि कुठल्याही दु:खद प्रसंगातही बाहुलीसारखीच हसून बातम्या देणारी एक पत्रकार तुम्हाला आठवते का? सीएनएन आयबीएन या वाहिनीवर ती दिसायची. मग तिथून उचलबांगडी झाल्यावर टाईम्समध्ये तिची वर्णी लागली. निर्बुद्ध चेहरा कसा असू शकतो, त्याचा हा नमूना! नवराच संपादक असल्यावर वाहिनीवर वहिनीचे लाड पुरवले गेल्यास नवल नाही. तर काही काळापुर्वी विदुषी सागरिका घोष हिने एक अक्कल पाजळलेली होती. ‘उजव्यांनी आपल्या विचारांचे बुद्धीमंत निर्माण केले नाहीत’. ही एक मजा असते. याला इंग्रजीमध्ये कॅच-२२ म्हणतात. म्हणजे प्रश्न असा असतो, की कुठूनही वादाला गेलात तरी तुम्हीच फ़सणार. हा विषय सोपा सुटसुटीत करण्यासाठी पुरोगामी भाषेचा आपण वापर करू. पुरोगामी शब्दावली म्हणजे अर्थातच मनुवादी म्हणून शिवी हासडून सुरूवात करणे. त्यात ब्राह्मणांचा उद्धार करणे. तर अशा ब्राह्मणांच्या कृत्यांबद्दल अन्य जातीपातीमध्ये जो राग संताप तयार झाला होता, ती भाषा नेमकी कॅच -२२ अशी होती. सर्वांना या समाजात स्वातंत्र्य होते आणि कुणालाही कसलीही आडकाठी नव्हती. अगदी बुद्धीच्या प्रांतातही कुणाला काही रोकथाम नव्हती. मात्र शिक्षण घायचे किंवा विद्याभ्यास करायचा तर तुम्ही ब्राह्मण असणे आवश्यक होते. अन्यथा तुम्हाला आश्रमशाळांमध्ये प्रवेश मिळत नसे. हा प्रवेश मिळायचा तर तुम्ही ब्राह्मण असायला हवे आणि अन्य जातीत जन्मला म्हणून तुम्हाला प्रवेश नसायचा. पण कुठल्याही ब्राह्मणाला प्रवेश खुला होता. तुम्ही ब्राह्मण नसणे हा व्यवस्थेचा दोष नव्हता. तुमचे दैव त्याला कारणीभूत होते. ही व्यवस्था मनुवादाने उभी केली म्हणून मग पुरोगामी असाल तर अशा भेदभावाला शिव्याशाप देणे, ही अगत्याची गोष्ट आहे. आपोआप तुम्ही पुरोगामी होऊन जाता. मग तुम्हाला पुरोगामी जगात बुद्धीमान म्हणून मान्यता मिळते. कितीही मुर्खासारखे बोललात वा बरळलात, तरी तुम्ही बुद्धीमान होता. थोडक्यात बुद्धी व बुद्धीमंत असण्याचा काडीमात्र संबंध नाही. पुरोगामी नावाच्या जातीत टोळीत जमातीत तुमचा समावेश असला पाहिजे.

आता सागरिका घोषचे विधान तपासून बघा. उजव्यांनी बुद्धीमंत निर्माण केले नाहीत. त्याच निकषावर दलितांनी ब्राह्मण जन्माला घातले नाहीत, असे म्हणता येईल ना? आईबाप दलित असतील, तर मुल ब्राह्मण कुळातले कसे जन्माला येईल? तद्वत, उजव्या भूमिका वा विचारांचा माणूस असेल, तर त्याला बुद्धीमान म्हणून डावे मान्यता देणारच नाहीत. आणि पुढे जाऊन म्हणायचे, उजव्यांनी बुद्धीमंत निर्माण केलेले नाहीत. तद्दन जुन्या काळातील ब्राह्मणी युक्तीवाद किंवा भाषा नाही काय? याला आजकाल पुरोगामीत्व म्हणून ओळखले जाते. ब्राह्मणी कावा म्हणून जे काही आहे, त्याचे अनेक नमूने आजकालच्या पुरोगामीत्वात ठासून भरलेले दिसतील. कुठल्याही कायदा, नियम वा शब्दाचे व्यवहारातील अर्थ काहीही असोत, तेव्हाचा ब्राह्मण पुरोहित आपापल्या सोयीनुसार त्याचा वापर करीत असे. सोयीचे नसेल, तिथे अर्थाचा भलताच अर्थ लावला जाई. मनुविरोधकांनी हीच तर मोठी तक्रार आहे. म्हणून त्या दुटप्पीपणाला शिव्याशाप दिले जातात. आता आजच्या पुरोगामीत्वाचे नमूने बघा. कालपरवा नेहरू विद्यापीठात ज्या घोषणा झाल्या, त्या देशद्रोही की देशप्रेमी हा विषय बाजूला ठेवा. त्यामागची भूमिका तपासून बघा. अफ़जल गुरूला अनेक न्यायालयीन प्रक्रियेनंतर फ़ाशीची शिक्षा झालेली आहे. प्रदिर्घकाळ त्यासाठी युक्तीवाद झालेले आहेत. त्यानंतर विद्यापीठातील घोषणाकर्त्यांचा दावा काय आहे? अफ़जलची न्यायालयीन हत्या झाली. ज्युडीशियल किलींग! म्हणजेच त्यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेवर आरोप केलेला आहे. भारतातील न्यायालये व न्यायव्यवस्थाही खुनी असल्याचा त्यांचा आरोप आहे. असायला हरकत नाही. कारण प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि अविष्कार स्वातंत्र्य आहे. पण जे काही बोलतोय, तो मुर्खपणा नाही आणि शहाणपणा आहे ना? विचार हा शहाणा असतो, इतके तरी मान्य कराल ना? मग आपल्या विचारांच्या बाजूने ठामपणे उभे रहायला हवे ना? तिथेही सोयीनुसार या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायचे उद्योग आहेतच.

विद्यापीठातल्या घोषणांसाठी पोलिसांनी ज्यांना दोषी मानले आहे आणि गुन्हा दाखल केला आहे. ते पोलिस पक्षपाती असल्याचा आरोप आहेच. पण तितकीच न्यायव्यवस्थाही सदोष वा पक्षपाती असल्याचाही आरोप आहे ना? मग ही मंडळी न्यायालयाकडे दाद कशाला मागत आहेत? आपल्याला अटकपुर्व जामिन मिळावा म्हणून याचिका कोणाकडे करीत आहेत? ज्या तिन्ही पातळीवरच्या न्यायालयांनी अफ़जल गुरूला साक्षीपुरावे तपासून दोषी मानले आणि फ़ाशी फ़र्मावली, त्याच न्यायालयात कशाला धावपळ चालू आहे? ज्या न्यायावर आपला विश्वास नाही, त्याचेच संरक्षण कशाला मागितले जाते आहे? न्यायालयीन हत्येच्या विरोधात घोषणा द्यायच्या आणि पुन्हा तिथेच जऊन न्यायाची मागणी करायची? कमाल आहे ना? किती चमत्कारीक युक्तीवाद आहे ना? तुमच्यावर आमचा विश्वास नाही आणि म्हणूनच तुम्हीच आमचा न्यायनिवाडा करा, हा युक्तीवाद म्हणजे पुरोगामी बुद्धीवाद आहे. ज्याने बलात्कार केला म्हणून आक्रोश करायचा, त्याच्याकडेच पुन्हा संरक्षणाची मागणी करण्यासारखी गोष्ट नाही काय? याला पुरोगामी विचार म्हणतात. गंगा गये गंगादास आणि जमना गये तो जमनादास, अशी कोलांट्या उड्या मारण्याची कला म्हणजे डावा बुद्धीवाद होऊन बसला आहे. त्याचे विविध मनोरंजक प्रयोग सध्या दिल्ली व अनेक जागी जोरात सुरू आहेत. अनेक बुद्धीमंतांना आपण काय बोलत आहोत, ते स्वत:लाही उमजलेले नाही. किंबहूना ज्यांना कशातलेच काही कळत नाही, त्याला डावा बुद्धीमंत म्हणून आज ओळखले जाते, म्हटल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. सहाजिकच देशद्रोह म्हणजे देशप्रेम किंवा पाकिस्तानवादी घोषणा म्हणजे अविष्कार स्वातंत्र्य, असले युक्तीवाद होत असतात. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, ह्या उक्तीपेक्षा आता पुरोगामी बुद्धीवादाला अधिक अर्थ राहिलेला नाही. म्हणून मग सागरिका सारखी निर्बुद्ध महिला उजव्या गोटाने कधी बुद्धीमंत निर्माण केले नाहीत, असे दावे करू शकते. किंवा डाव्यांच्या बौद्धिक बाजूची मांडणी करायला शोभा डे हिच्यासारखी नटवी मैदानात आणावी लागते आहे.

एकूण नेहरूवाद किंवा पुरोगामीत्व कुठल्या गाळात जाऊन रुतले आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. पुर्वजांच्या पुण्याई किंवा कर्तृत्वावर वर्तमानात जगावे, तसे आजकाल पुरोगामी व डावे विसाव्या शतकातल्या गंज चढलेल्या तलवारी परजून लढाई करायला सरसावले आहेत. एकविसाव्या शतकातील बदललेले विश्व त्यांच्या खिजगणतीत नाही. आजच्या जमान्यातली जनता, तिचे प्रश्न समस्या किंवा आजच्या पिढीच्या आशाआकांक्षा, यांच्याशी डाव्यांचा संपर्क किती तुटला आहे त्याची ही साक्ष आहे. मग जुन्या काळातले पुरोहित वा पुजारी जसे आपापली देवस्थाने मालकी हक्काने बळकावून जनतेवर आपले वर्चस्व गाजवू बघतात, तशी केविलवाणी अवस्था डाव्यांच्या नशिबी आलेली आहे. चळवळी, आंदोलने व जनतेतले स्थान रसातळाला गेले असल्याने, माध्यमे, वैचारीक संस्थांच्या माध्यमातून टिकून रहाण्याची धडपड चालू आहे. सरकारी तनख्यावर राजेशाही मिरवणारे संस्थानिक असावेत, तशी ती केविलवाणी अवस्था आहे. जनतेची मान्यता नसलेले धर्म, पांडित्य मोठेपणा फ़ारकाळ टिकत नाही. माध्यमांची समाज मनावरची पकड कधीच संपून गेली आहे. यांची खुलेआम सोशल माध्यमातून राजरोस खिल्ली उडवली जात आहे. तरीही आपल्या बुद्धीमत्तेचा टेंभा मिरवण्याची हौस फ़िटलेली नाही. मग कधी न्यायालयाचा किंवा कधी कायदे नियमांचा आडोसा घेऊन अब्रु झाकण्याची कसरत चालू आहे. घरातल्या म्हातार्‍यांनी नातवंडे वा पतवंडे यांच्याशी हुज्जत करावी आणि आपलीच खिल्ली उडवून घ्यावी, तशी स्थिती त्यांच्या वाट्याला येत चालली आहे. जन्माने ब्राह्मण असूनही ब्राह्मणांना शिव्याशाप मोजून आपले समाजावर वर्चस्व टिकवण्यातला दुटप्पीपणा आता कितीही लक्तरे पांघरली म्हणून उपयोगाचा राहिलेला नाही. कारण सामान्य जनता पुरोगामी शेंडीच्या या सेक्युलर भटजींना दारातही उभे करीनाशी झाली आहे. त्यांनी कितीही शाप दिल्याने बिघडत नाही. गाईच्या शापानेही कावळा मरत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.

संघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक?


गेल्या आठवड्यात ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने मोहिम उघडल्याप्रमाणे देशातील पाखंडी सेक्युलर मंडळींची लक्तरे वेशीवर टांगली आणि डाव्यांचा धीर सुटलेला आहे. म्हणूनच सर्व सभ्यता सोडून त्या वाहिनीच्या संपादक अर्णब गोस्वामी याला बहिष्कृत करण्याचे खुले आवाहन काही संपादक वा नामवंत पत्रकारांनीच आरंभले. हा खरे तर विनोद होता. कारण त्याच काळात अर्णब जी आकडेवारी दाखवत होता, त्याला कोणी आक्षेप घेतला नाही. कारण तीच खरे तर अशा लोकांची खरी पोटदुखी होती. अर्णबने इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या ९३ टक्के प्रेक्षकांना खिशात टाकले आणि उरलेल्या ७ टक्क्यातही ज्यांना एक टक्का प्रेक्षक मिळवता आलेला नाही, त्यांनी अर्णबवर बहिष्काराची भाषा केलेली आहे. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? ज्यांच्यावर देशातला ९९ टक्के इंग्रजी प्रेक्षकांनीच बहिष्कार घातला आहे, ते त्यालाच आवाहन करीत आहेत, की ज्याच्याकडे झुंबड करून धावत सुटलाय त्याला बहिष्कृत करा. जुनेजाणते असुन प्रेक्षकाने आपल्याला असे बहिष्कृत कशाला केले आहे, त्याचा साधा विचारही करायची इच्छा ज्यांना होत नाही, ते विचारस्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत, बहिष्काराच्या वल्गना करीत आहेत. तुमचे हे आवाहन तरी कोणाच्या खिजगणतीत आहे काय? पण विचार करू शकत नाही, त्याला आजकाल सेक्युलर जगात विचारवंत समजले जाते. पुरोगामी विचारवंतांची एकच चुक असते, ती म्हणजे ते चुकत नाहीत. अर्थात चुकत नाही याचा आत्मविश्वास असल्याने ते कधी चुका सुधारण्याचा विचारही करीत नाहीत. चुक झाली तर ती मान्य करून सुधारणेला सुरूवात होत असते. पण आपण चुकतच नसल्याचा फ़ाजिल आत्मविश्वास प्रभावी असला, मग चुका होत रहातात आणि त्याचे दुष्परिणामही होतच रहातात. त्यापासून सुटका नसते. पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या बहुतांश पत्रकार, वाहिन्या व वर्तमानपत्रांची तीच एक शोकांतिका होऊन बसली आहे. आपण गळ्यापर्यंत बुडालो आहोत आणि दिवाळखोर झालो आहोत, हे कळण्याइतकेही भान त्यांना उरलेले नाही.
या निमीत्ताने शिव विश्वनाथन यांचे स्मरण झाले. अनेक इंग्रजी वाहिन्यांवर राजकीय सामाजिक विषयाच्या चर्चेत त्यांचा सहभाग आपण बघितलेला आहे. एक सेक्युलर उदारमतवादी विचारवंत अशी त्यांची ख्याती आहे. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान विविध मतचाचण्या किंवा चर्चांच्या वेळी त्यांनी आपला मोदीविरोध स्पष्टपणे व्यक्त केलेला होता. आजही आपला भाजपा वा मोदीविरोध त्यांनी लपवलेला नाही. पण लोकसभेत मोदींनी प्रचंड यश मिळवले, तेव्हा कुठलाही डावा पुरोगामी विचारवंत पत्रकार ज्या सत्याला जाऊन भिडायला राजी नव्हता, तेव्हा विश्वनाथन यांनी एक लेख लिहून आपल्या मुर्खपणाची जाहिर कबुली दिलेली होती. मोदींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी व्हायच्या दिवशी ‘द हिंदु’ या इंग्रजी दैनिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. ती त्यांची कबुली म्हणून महत्वाची होती. पण त्यापेक्षा डाव्यांना व उदारमतवाद्यांना त्या लेखातून त्यांनी आरशा दाखवला होता. पण नुसता आरशा दाखवून काय उपयोग असतो? आंधळ्याला आरशासमोर उभे करून उपयोग नसतो. कारण समोरचे आपले प्रतिबिंब तो बघू शकत नसतो. त्याला डोळेच नसतात. पण पुरोगामी लोकांची गोष्ट वेगळीच! त्यांना डोळे असले तरी आरसा दाखवला मग ते तात्काळ डोळे मिटून घेतात. आपण डोळे मिटले, मग आपले विकृत विद्रुप स्वरूप आपोआप लपून राहिल अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. म्हणुनच विश्वनाथन असोत किंवा अन्य कोणी असो, त्यांनी आरसा दाखवून उपयोग नसतो. कारण आपला विद्रुप झालेला चेहरा पुरोगाम्यांना बघायचाच नसतो. पण म्हणून बाकीच्या जगाला तो भयकारी चेहरा दिसणार नाही, अशीही त्यांची पक्की समजूत असते. म्हणूनच आरश्या समोर डोळे मिटून घेणारे पुरोगामी बाकीच्या जगात मात्र उजळमाथ्याने वावरत असतात. आपल्याकडे लोक चमत्कारीक नजरेने बघू लागले, तर त्यांना नवल वाटते वा राग येतो. सध्या अर्णब गोस्वामीवरला या लोकांचा राग त्यासाठीच आहे.
अर्णबने अशा पुरोगाम्यांचा विकृत चेहरा जगाला दाखवलेला नाही. त्याने बाकीच्या जगातल्या वास्तव घटना जशाच्या तशा लोकांपुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जे फ़सवे चित्र बाकीचे पत्रकार वा माध्यमे जगापुढे आणत होती, त्यांचे पितळ उघडे पडलेले आहे. चाकूने भोसकले जात असताना, मोरपीस फ़िरवले जाते आहे, असे तुम्ही कोणाला सांगितले तर सामान्य माणुस त्यावर विश्वास ठेवणार नाही. आपल्या जाणिवा किंवा अनुभवानुसारच तो होणार्‍या वेदनांचा अर्थ लावणार. मात्र पुरोगामी शहाण्यांना अनुभव किंवा जाणिवांपेक्षा पुस्तकी व्याख्या खर्‍या वाटतात. इतक्या त्यांच्या संवेदना बोथटलेल्या असतात. त्यालाही हरकत नाही. पण म्हणून त्यांचे भ्रम अवघ्या जगाने तसेच स्विकारावेत, हा हट्ट गैरलागू आहे. तिथेच गफ़लत होते. त्यांनी मुर्खाच्या नंदनवनात रममाण व्हायला कोणी हरकत घेतलेली नाही. पण बाकीच्या जगाने तशा मुर्खपणात निमूट सहभागी व्हायच्या आग्रहामुळे गोंधळ झालेला आहे. सामान्य लोकांनी अशा मुर्खांकडे साफ़ पाठ फ़िरवली आहे. अर्णब किंवा त्याच्या वाहिनीला मिळालेला ९३ टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याचीच साक्ष आहे. त्यापासून शिकायचे आणि आपल्या चुका सुधाराव्यात हा शहाणपणा झाला असता. पण चुक सुधारायला चुक कबुल करावी लागते, तिथेच घोडे अडलेले आहे. इथेच शिव विश्वनाथन यांचा लेख महत्वाचा आहे. कारण त्यांनी याच चुकीचे कबुली दिलेली आहे. त्यांच्या वीस महिने जुन्या लेखाचे शिर्षकच त्याचा पुरावा आहे. ‘माझ्यासारख्या उदारमतवाद्याला मोदींनी कसे हरवले’ हेच ते शिर्षक आहे. सेक्युलर पक्ष वा उदारमतवादाचा मोदींनी पराभव केला, असे म्हटलेले नाही, तर व्यक्तीगत आपला मोदींनी पराभव केल्याचे मानले आहे. तिथे न थांबता त्यांनी आपल्या चुकांची त्यात जंत्री दिली असून, त्याची मिमांसाही केली आहे. कुठल्याही पुरोगाम्यासाठी म्हणूनच तो लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. पण पुन्हा अंजनाने काम करायला अंजन डोळ्यात पडायला हवे आणि त्यासाठी डोळे उघडे असायला हवेत ना?
पुरोगाम्यांची तीच तर शोकांतिका आहे. ते चुकत नाहीत आणि म्हणून झालेल्या चुका सुधारतही नाहीत. म्हणून तर जी रणनिती चुकली वा उलटली, तिचाच अवलंब पुन्हा सुरू झाला आहे. मोदींवर आरोप करून संघावर शिंतोडे उडवून प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही. कारण अशा हल्ल्यासाठी भाजपा वा संघ सज्ज असतो. पण पुरोगाम्यांच्या अशा हल्ल्याने व आरोपांनी जो सामान्य हिंदू बहुसंख्यांक दुखावला जातो, व्याकुळ केला जातो, तो आपोआप मोदी व संघ यांचा सहानुभूतीदार होऊन जातो. कारण सहवेदना लोकांना जवळ आणते. दुय्यम दर्जाच्या नेहरूवादी व पुरोगाम्यांनी थिल्लर पोपटपंचीतून सतत हिंदूंना दुखावण्यात धन्यता मानली. पण त्याचवेळी अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांच्या धर्मांधतेचे चोचले पुरवले. पदोपदी हिंदू असण्यासाठी बहुसंख्यांकांना इतके कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत राहिला, की पुरोगामी असण्यापेक्षा प्रतिगामी असण्यात लोकांनी दिलासा शोधायला सुरुवात केली. मोदींना त्याचाच लाभ मिळाला. त्यामुळे कुठल्याही निकषाने कडवे हिंदू नसलेल्या वा धर्माशी कर्तव्य नसलेल्या हिंदूंना सेक्युलरांनी मोदींच्या गोटात आणूस सोडले, असे विश्वनाथन म्हणतात. आता त्याच्या पुढला टप्पा सुरू आहे. राष्ट्रप्रेम हा गुन्हा ठरवून पुरोगामी उरल्या लोकांनाही मोदींच्या कच्छपि लावण्याचे काम जोरात चालवित आहेत. काश्मिरात सामान्य सैनिक शहीद होत असताना तिथेच जिहाद दहशतवाद माजवणार्‍यांचे उदात्तीकरण करायला पुरोगामी कळपाने मैदानात आलेले आहेत. या विषयात जितका दिर्घकाळ उहापोह होत राहिल, तितकेच मोठ्या संख्येने देशाविषयी आस्था असलेले लोक पुरोगाम्यांपासून दुरावत जाणार आहेत. माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय वा तत्सम लोकसंख्या गेल्या आठवड्यात पुरोगाम्यांकडे संशयाने बघू लागली आहे. त्यांना मोदी वा भाजपा हाच एकमेव पर्याय असल्याचे पटवून देण्याचे काम संघाला शक्य नव्हते, इतके पुरोगाम्यांनी सोपे करून ठेवले आहे. किंबहूना सेक्युलर पुरोगामी म्हणजे देशद्रोह ही प्रतिमा त्यांनीच जनमानसात यातून ठसवली आहे.
http://www.thehindu.com/opinion/lead/how-modi-defeated-liberals-like-me/article6034057.ece

Thursday, February 25, 2016

युरेका! युरेका! स्मृती फ़सली रे……

बुधवारी लोकसभेत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपल्यावरचे सर्व आरोप फ़ेटाळून लावत भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण देशभर झाले आणि माध्यमातील त्यांच्या टिकाकार विरोधकांनाही स्मृतीच्या गुणवत्तेला दाद द्यावी लागली. पण ती दाद मनापासून नव्हती, तर देशभर जो माहोल त्या एका भाषणाने बदलला होता, त्याला हे माध्यमातले विरोधक शरण गेले होते. मात्र प्रत्यक्षात स्मृतीच्या भाषणात कुठे खोट काढता येते, त्याची जाडजुड भिंगे घेऊन तपासणी चालू होती. त्यात काही ‘खोट’ म्हणजे त्रुटी सापडत नसेल, तर निदान दिशाभूल करण्यासारखा मुद्दा तरी शोधणे भाग होते. त्यालाच पुरोगामीत्व असे नाव आहे ना? धडधडीत खोटे बोलल्याशिवाय ज्यांना अन्नाचा घासही घशाखाली उतरत नाही, त्यांनी खुल्या दिलाने स्मृतीच्या भाषणाचे गुणगान करण्याची अपेक्षाच करता येणार नाही. म्हणून दूर अवकाशातले तारे शोधण्यासाठी दुर्बिणा वापराव्यात, तशी उपकरणे लावून संशोधन सुरू झाले आणि आर्किमीडिजचे आधुनिक वारसदार आपल्या अंगावरची वस्त्रेही फ़ेडून ‘युरेका युरेका’, ओरडत न्हाणीघरातून नागडेउघडे धावत रस्त्यावर आले. कोणता मोठा शोध लावला होता त्यांनी? तर लोकसभेत स्मृती इराणी खोटे बोलल्या. त्यांनी संसदेची व देशाची दिशाभूल केली. त्यांनी राजिनामा दिलाच पाहिजे. आणि काय खोटे बोलल्या मनुष्यबळ विकासमंत्री? तर रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर दिर्घकाळ त्याच्या मृतदेहापाशी डॉक्टर्संना जाऊ देण्यात आलेले नव्हते. मुळात तिथे पोहोचलेल्या डॉक्टर्सची साक्ष काढून स्मृतीला खोटे पाडण्यात आले आहे. किती सज्जड पुरावा आहे ना? हेडली खोटारडा असतो, इतक्या ह्या डॉक्टर खरे बोलत आहेत. त्या डॉक्टरनीच स्मृतीचा दावा खोटा पाडला आहे. कारण माहिती मिळताच आपण विनाविलंब रोहितपाशी पोहोचून त्याची प्रकृती तपासली असे त्यांचे म्हणणे आहे.
रोहितच्या आत्महत्येची माहिती मिळताच डॉक्टर राजश्री तिथे पाच मिनीटात पोहोचल्या आणि त्यांनीच तपासणी करून त्याला मृत घोषित केले होते. त्याच आरोग्य विभागात तेव्हा ड्युटीवर होत्या. सहाजिकच त्यांच्या या दाव्याला कोणी आव्हान देवू शकत नाही. पण म्हणून स्मृती इराणी लोकसभेत खोटे बोलल्या, असा दावा कसा करता येईल? स्मृतीने केव्हाही डॉक्टर राजश्री यांच्या हवाला देवून असे विधान केलेले नाही. किंबहूना आज डॉक्टर राजश्री पोपटासारख्या बोलत आहेत, तर त्यांनीच तेव्हा ही माहिती आपल्या मंत्री महोदयांकडे कशाला पाठवली नव्हती? इतके दिवस डॉक्टर त्याविषयी गप्प कशाला बसल्या होत्या? स्मृतीनी लोकसभेची फ़सवणूक करण्याची त्यांना प्रतिक्षा होती काय? रोहितच्या आत्महत्येचे भांडवल करण्याचा डाव इथेच उघडा पडतो. या आत्महत्येविषयी मंत्री म्हणून आपण काय धावपळ केली, त्याचा गोषवारा स्मृतींनी आपल्या भाषणातून दिला. त्यामध्ये स्थानिक पातळीवर किती बेफ़िकीरी व हलगर्जीपणा होता, त्याचाच पाढा त्यांनी लोकसभेत वाचला. डॉक्टर राजश्री वा त्यांच्या खुलाश्याला दुजोरा देणार्‍या शिकरुल्लाह निशा, या दोघांनी स्मृतीला खोटे पाडण्यापेक्षा त्यांच्याच आरोपाला दुजोरा दिलेला आहे. स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात स्थानिक प्रशासन व सरकार किती गाफ़ील व बेपर्वा होते, त्यावर बोट ठेवलेले आहे. तेलंगण राज्यात हे विद्यापीठ आहे आणि केंद्रीय विद्यापीठ असले तरी स्थानिक कायदा व्यवस्था राज्याचा अधिकार आहे. म्हणून बातमी कळताच आपण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. पण ते कामात आहेत म्हणून आपल्याला त्यांच्याशी बोलूही देण्यात आलेले नव्हते. त्यांच्या खासदार कन्येशीही आपण संपर्क साधला. पण तिनेही कुठला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून आपल्याला माहिती मिळवावी लागली, असे स्मृतीचे कथन आहे.
‘स्मृती खोटे बोलल्या’ या शिर्षकाची जी बातमी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रकाशित झाली आहे, त्यातही तेच म्हटले आहे. ‘असा दावा इराणी यांनी तेलंगण पोलिसांच्या हवाल्याने केला होता.’ म्हणजेच पोलिसांकडून जी माहिती मिळाली, त्यानुसार स्मृतीला बोलावे लागले. कारण जो इतका भयंकर तातडीचा सेक्युलर विषय आहे, त्याबद्दल इतके आठवडे लोटले, तरी पुरोगामी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना केंद्राला माहिती देण्य़ाची गरज भासलेली नाही. किंबहूना तथाकथित सेक्युलर राजकारणी नेत्यांची रोहितला जीवंत ठेवण्यामध्ये किती अनास्था होती, तेच तर स्मृतीला आपल्या भाषणातून सिद्ध करायचे होते. घटनेच्या दिवशी सोडाच, अजूनपर्यंत राव यांनी आपल्याला ‘उलट प्रतिसाद’ म्हणून फ़ोन केलेला नाही, असेही स्मृतीने ठामपणे लोकसभेत सांगितले. मग डॉक्टर राजश्री यांचा दावा कशासाठी आहे? जी माहिती पोलिसांनी स्मृती इराणींना दिली, त्यापेक्षा अधिक माहिती त्यांना पुरवण्याचे कर्तव्य डॉक्टर राजश्री यांनी कशाला पार पाडले नाही? आपला मुख्यमंत्री काही करत नसेल, तर डॉ. राजश्री केंद्रीय मंत्र्याला माहिती द्यायला गेल्या नाहीत, इतके दिवस गप्प राहिल्या. त्यांना सत्य समोर येण्यापेक्षा स्मृतीला खोटे पाडण्यात रस असावा. रोहित मेला काय नि जगला काय? त्याची कुणा सेक्युलर पुरोगाम्यांना फ़िकीर नाही. त्यांना स्मृती वा भाजपाला खोटे पाडण्यात स्वारस्य आहे. त्यात मग रोहित वा तत्सम मुलांनी आपला बळी द्यायचा असतो. मुख्यमंत्री भेटत नसेल, तर या डॉक्टर राजश्री कोण व त्या कुठे कुठे कधी जातात, किंवा त्यांचा फ़ोन नंबर काय, त्याचा सर्व तपशील स्मृतीपाशी असला पाहिजे. पण चंद्रशेखर राव किंवा अन्य कुणा सेक्युलर नेत्याने मात्र केंद्रीय मंत्र्याला त्यासाठी धावपळ करायला आग्रह धरण्यासाठीही साधा फ़ोन करू नये, याला पुरोगामीत्व म्हणतात. त्यासाठी रोहित सारख्यांनी मरायचे असते आणि पुरोगामी हुतात्मे व्हायचे असते.
स्मृतीला खोटे पाडण्यासाठी जितकी बुद्धी वापरण्यात आली, किंवा तत्परता दाखवण्यात आली, तितकी पुरोगामी तातडी रोहितला वाचवण्यासाठी दाखवण्यात आली होती काय? रोहितने आत्महत्या करू नये, यासाठी कुठल्या पुरोगाम्याने किती हातपाय हलवले, याचा कुठलाही तपशील नाही. त्याच्यासह ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, ती हटवून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, म्हणून एका तरी सेक्युलर नेत्याने संबंधित मंत्री म्हणून स्मृती इराणी यांना पत्र लिहून, फ़ोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून काही केले होते काय? आज ज्यांना रोहितचा उमाळा आला आहे, त्यापैकी एकाने तरी तो निराश-हताश असताना आत्महत्येपर्यंत जाण्यापासून त्याला वाचवण्यासाठी कोणते उपाय योजले, त्याचा कुठलाही तपशील समोर आलेला नाही. तो तपशील आणायचा विचारही कुणा सेक्युलर मेंदुला शिवलेला नाही. शिवणार तरी कसा? काही केलेलेच नाही. कुणाही पुरोगाम्याला रोहितच्या हाल वा अन्यायाविषयी काडीची फ़िकीर नव्हती. त्याच्या जिवंत असण्याने कुठलाही पुरोगामी राजकीय लाभ नव्हता. त्यापेक्षा त्याच्या आत्महत्या वा मृत्यूने पुरोगामी लाभ होता. म्हणून हे डोमकावळे त्याच्या वा तत्सम मुलांच्या मृत्यूकडे आशाळभूत नजर लावून बसले होते. त्याला मरू दिले गेले, आत्महत्या करू दिली गेली आणि मगच सगळ्यांची कावकाव सुरू झाली आहे. स्मृती इराणी यांनी त्याकडेच नेमके बोट दाखवले आहे. स्मृतीनी निदान बातमी कळताच धावपळ केली आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी संपर्क साधला. तेव्हाही त्यांना दाद मिळाली नाही. हीच तर स्मृतीने पुरोगाम्यांची सादर केलेली लक्तरे आहेत. डॉक्टर राजश्री त्याचीच ग्वाही देत आहेत. कारण त्या रोहितची तपासणी करायला गेल्या, हे मुख्यमंत्र्याला ठाऊक नव्हते आणि तेलंगणाच्या पोलिसांनाही ठाऊक नव्हते. स्मृतीने धावपळ करूनही त्यांना दिल्लीत काही कळू शकत नव्हते. कारण प्रत्येक पुरोगाम्याला रोहित मेलेलाच हवा होता. खोटे कोण किती बेधडक बोलतोय ते यातून लक्षात येते.

https://www.myind.net/police-report-confirms-smriti-irani%E2%80%99s-statement

स्मृतीजी, राहुलचे आभार माना!

राजकारणाची खरी शक्ती जनमानसातील प्रतिमांमध्ये सामावलेली असते. सामान्य माणसाच्या मनात ज्या प्रतिमा किंवा समजुती ठसवलेल्या असतात, त्यावर काही लोक आपले हेतू साध्य करून घेतात, त्याला राजकारण म्हणतात. म्हणूनच आपल्या विरोधकाला खलनायक म्हणून पेश करायचे व त्याचाशी झुंजणारा म्हणून आपण नायक असल्याचे लोकांना पटवायचे, म्हणजे राजकारण होय. हे लक्षात घेतले तर बुधवारी संसदेत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी काय बाजी मारली, ती लक्षात येऊ शकेल. किंबहूना त्यांना तशी संधी देण्यातला विरोधकांचा मुर्खपणा लक्षात येऊ शकेल. वीस महिन्यांपुर्वी सत्तांतर होऊन मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यात पहिल्या दिवसापासून विरोधक व टिकाकारांचे लक्ष्य झालेला एकच मंत्री होता, त्याचे नाव स्मृती इराणी! देशातील शिक्षण व बुद्धीमत्तेचा विकास करण्याचे काम ज्याच्या हाती आहे, त्याचे स्वत:चे शिक्षण किती, लायकी काय, असे प्रश्न विचारले गेले. इराणी यांचे शिक्षण त्यातली पात्रता किंवा प्रमाणपत्रे यांचीही छाननी करण्यात आली. एकूणच कोणा बुद्दू व्यक्तीला महत्वाचे खाते दिले गेले आणि देशातील शिक्षणाचा बोर्‍या मोदींनी वाजवला, असा ओरडा सुरू झाला होता. त्यात अनेक मोदी समर्थकही सहभागी होते. सहाजिकच विरोधकांच्या हाती कोलित मिळाले होते आणि स्मृती इराणींना बदनाम करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. अधिक त्यांनी खुलासा करायचा प्रयत्न केल्यास त्याचा विपर्यास करून त्यांची प्रतिमा अधिकच मलिन करण्याचा सपाटा लावला गेला होता. गेल्या महिनाभरात त्यावर कडी झाली. स्मृती इराणी संघाचा अजेंडा राबवत आहेत आणि प्रत्येक शिक्षण संस्थेला भगवे बनवण्याचा घाट घातला गेला आहे. तिथे अल्पसंख्यांक, मागास जातीजमातींवर घोर अन्याय सुरू झाला आहे. त्यासाठी चांगल्या शिक्षक, अधिकार्‍यांना हटवून हिंदूत्वाचे हस्तक आणले जात आहेत, असा घोषा लावला गेला होता. मात्र इराणींना त्याचा खुलासा वा इन्कारही धडपणे करता येत नव्हता, तशी संधीही दिली जात नव्हती.
प्रत्येकवेळी अभिनय सोडून नेता झालेली अभिनेत्री, असा त्यांचा हेटाळणीयुक्त उल्लेख माध्यमातून जाणिवपुर्वक चालला होता. सोनिया गांधी राजकारणात येण्यापुर्वी गृहीणी होत्या आणि पुर्वायुष्यात बारगर्ल म्हणून त्यांनी काम केलेले होते. पण त्यांचा तसा उल्लेख कधी झाला नाही. मात्र स्मृतीच्या बाबतीत अभिनेत्री ही बिरूदावली कायम होती. त्याचे कारण नामोहरम करणे हेच होते. त्यातच नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणा व त्यापुर्वी हैद्राबाद विद्यापीठातील आत्महत्येचा विषय आलेला होता. सहाजिकच त्याचेही खापर स्मृती व मोदी सरकार यांच्यावर फ़ोडण्याची अपुर्व संधी साधली गेली. त्याचा एक व्यापक परिणाम झालेला होता. कारण या आरोपात तथ्य किती व कोणते त्याची कुठलीही तपासणी नाकारली गेली होती. आरोप म्हणजेच पुरावा, असे चित्र होते. म्हणूनच राहुल गांधी नित्यनेमाने संघाचा अजेंडा विद्यापीठात लादला जातोय, अशी शेरेबाजी राजरोस करत होते. पण त्यासाठी कुठला पुरावा दिला गेला नाही, तपशील समोर आणला गेला नाही. स्मृती इराणी व मोदी सरकार खुलासे देऊ शकत होते. पण त्याला प्रसिद्धीच द्यायची नाही, असा सेक्युलर माध्यमांचा संकेत होता. म्हणून हे आरोप खरेही वाटू लागले होते. थोडक्यात स्मृती वा मोदी सरकार यांना बदनाम करण्यात विरोधक यशस्वी झालेले होते. कारण जनमानसात मोदी सरकारची प्रतिमा काहीशी डागाळलेली होती. त्यातला महत्वाचा डावपेच सरकारी बाजू जनतेपासून पुर्णपणे झाकून, लपवून ठेवण्याचा होता. सत्य लोकांसमोर आल्यास हेच आरोप टिकणारे नाहीत, हे विरोधकांना माहिती असायला हवे होते. म्हणूनच व्यापक पातळीवर संसदीय चर्चेतून व थेट प्रक्षेपणातून स्मृती इराणींनी सत्य जगापुढे मांडण्यात विरोधकांचे नुकसान ठरलेले होते. सहाजिकच संसदेबाहेरचा हा तमाशा, संसदेत खेळला जायला नको होता. तो विरोधकांना हानिकारक होता. सरकारची कोंडी करण्यासाठी अन्य बरेच विषय होते. पण त्याचे तारतम्य विरोधकांना राहिले नाही आणि आपल्यावरचे सर्व आरोप धुवून काढण्याची अपुर्व संधी स्मृती इराणी यांना बहाल करण्यात आली.
आपल्या समर्थनासाठी मोदी सरकार वा स्मृती इराणी इतके प्रदिर्घ खुलासेवार उत्तर संसदेत देऊ शकल्या नसत्या. पण त्यांच्याच खात्यासंबंधी विस्तृत चर्चा झाली, मग तिला उत्तर देतांनाच त्यांना सविस्तर बोलण्याची संधी मिळणार होती. ती नाकारणे ही विरोधकांची रणनिती असायला हवी होती. जेणे करून धादांत खोट्या आरोपांनी केलेल्या बदनामीतून सरकार व स्मृती इराणींना सुटका मिळू नये. पण संसदेच्या पहिल्याच बैठकीत विद्यापीठाच्या विषयावर चर्चेचा आग्रह धरला गेला आणि स्मृती इराणींना वीस महिन्यांचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी बहाल करण्यात आली. आपल्यावरचे किंवा सरकारवर झालेले सर्व आरोप नुसते बिनबुडाचे नाहीत, तर ते आधीच्या कॉग्रेस सरकारचीच पापे असल्याचे पितळ उघडे पाडण्याची ही संधी स्मृतीनी पुरेपुर साधली आणि कॉग्रेसला सभागृहातून पळ काढण्याची वेळ आली. सतत मोदींना सवाल करणारे व जबाब मागणारे राहुल गांधी व कॉग्रेसला आपलीच पापे ऐकून घेण्याचे त्राण राहिले नाही आणि स्वत: चर्चा मागितलेली असूनही सभात्यागाची पळवाट शोधायला लागली. तिथेही पळणार्‍या प्रतिस्पर्ध्यावर वार करायला स्मृती थांबल्या नाहीत. ‘पळा, पळा, नाहीतरी तुम्हाला चर्चा हवीच कुठे होती? नुसता गोंधळ घालायचेच तुमचे काम’, अशी शेरेबाजी त्यांनी लोकसभेत केली. त्याचेही उत्तर कॉग्रेसपाशी नव्हते. कारण स्मृती एकामागून एक प्रत्येक आरोपाचे खंडन करताना ते मुळातच कॉग्रेसचेच पाप असल्याचे कागदोपत्री पुरावेच संसद व देशासमोर मांडत होत्या. त्या भडीमाराला सामोरे जाण्याचीही हिंमत विरोधकात राहिली नव्हती. ज्या अन्याय अत्याचारासाठी भाजपावर संघावर आरोप झाले, ते करणारे अधिकारी, कुलगुरू कॉग्रेसच्याच राजवटीत नेमलेले आहेत आणि कित्येक घटना तर युपीए कॉग्रेसची सत्ता असतानाच झालेल्या आहेत, त्याची जंत्री स्मृतीनी पेश केली. आपल्या पापांचा चेहरा बघून कॉग्रेस व युपीए पक्षांना सभागृहात बसणेही अशक्य होऊन गेले. वीस महिन्यात कधी नव्हे इतका सत्ताधारी पक्ष आक्रमक झालेला दिसला. पण मॅन ऑफ़ द मॅच स्मृती इराणी हे मान्यच करावे लागेल.
ह्या चर्चेचा आग्रह विरोधकांनी धरला नसता, तर हे सगळे तपशील व कॉग्रेस युपीएची पापे भाजपाच्या नावावर खपून गेलेली होती. कोणी इतक्या बारकाव्यात गेलेले नव्हते. अशाच आत्महत्या व अन्याय विविध विद्यापीठात सातत्याने होत राहिले आणि त्यासाठी कॉग्रेसी नेत्यानीच कशा कठोर कारवायांच्या मागण्या केल्या होत्या, त्याचे बाड घेऊन स्मृती हजर होत्या. त्याचा इन्कार करणेही कॉग्रेसला शक्य नव्हते, की विरोधकांना उलटलेले आरोप खोडून काढता येत नव्हते. सहाजिकच त्या रणधुमाळीत महिनाभराचे आरोप तोंडघशी पडले आणि त्यामागचे आततायी राजकारणही चव्हाट्यावर आले. कुठल्याही पक्षाने राजकारणात संधी साधण्याला गैर मानता येणार नाही. पण चतुराई वा धुर्तपणाच्या आहारी गेले, मग आपल्यावर येऊ शकणार्‍या संकटाचेही भान रहात नाही. दुसर्‍यासाठी खड्डा खणताना आपण त्यात पडू नये, याचेही भान उरत नाही. संसदेत हा विषय अटीतटीचा बनवण्यात डाव उलटण्याचा धोका होता. त्याचे भान सुटले आणि हाती आलेली बाजी पुर्णपणे उलटली. जी चिखलफ़ेक माध्यमातून व कांगाव्यातून भाजपाच्या अंगाला चिकटलेली होती, तिची लक्तरे करण्याची संधी स्मृती इराणी यांना त्यातून बहाल करण्याचा मुर्खपणा झाला. कारण तपशीलवार माहिती व कागदपत्रे सादर करून कुठल्याही शिक्षणाचे भगवीकरण झालेले नाही आणि अगदी विविध अन्याय करणार्‍या विद्यापीठातले ‘अत्याचारी’ अधिकारीही कॉग्रेसनियुक्त असल्याचे सत्य समोर आले. जे सत्ताधारी भाजपाला लाभदायक व विरोधकांना अपायकारक ठरले आहे. उलट हा विषय संसदेत आणला व ताणला गेला नसता, तर हेच आरोप गुलदस्त्यात राहिले असते आणि त्याच पापात कॉग्रेसचे हात कसे बरबटलेले आहेत, त्यावरचेही पांघरूण कायम राहिले असते. स्मृती इराणी बारावी शिकलेली सामान्य महिला राहिली असती आणि तिच्या संसदपटू गुणांची ओळख देशाला झाली नसती. एक उतावळ्या घाईगर्दीने मोदी विरोधकांनी किती मोठा दारूण पराभव ओढवून घेतला, त्याची ही बुधवारकथा. खरे तर स्मृती इराणी यांनी राहुलसह तमाम विरोधकांचे मनापासून आभार मानायला हवेत.

मोदीभक्तांचा तद्दन मुर्खपणा



शहाण्याला शब्दाचा मार असे म्हणतात. पण शहाणाच समोर नाही आणि अडाण्याला शब्दाचा सोस नसतो. पण शहाणा असून जो मुर्खासारखा बोलू लागतो, तेव्हा त्याला शब्दांनी समजावणे, हाच मुर्खपणा असतो. नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवण्याची जी स्पर्धा चालू आहे, त्यामध्येही यापेक्षा किंचित वेगळी परिस्थिती नाही. मग अशा लोकांना विविध पुरावे देवून वा साक्षी सादर करून उपयोग नसतो. उपयोग असता, तर मुंबईतील कसाब टोळीच्या हल्ल्यानंतर भारताने सादर केलेले पुरावेही पाकिस्तानने स्विकारले असते आणि तिथे बसलेल्या जिहादींच्या मुसक्या आवळल्या असत्या. पण त्यापैकी काही होऊ शकले नाही आणि त्याचीच पुनरावृत्ती आता पठाणकोट हल्ल्यानंतर होत आहे. एकदा नव्हे अनेकदा असा अनुभव आलेला असताना पाकिस्तानला वा त्यांच्या इथल्या बगलबच्च्यांना पुरावे किंवा साक्षी सादर करणे, हाच मुर्खपणा नाही काय? अशा लोकांच्या व्याख्या व अन्वय भिन्न असतात. तुम्ही ज्या अर्थाने शब्द वापरता त्यापेक्षा त्यांचे अर्थच भिन्न असतील, तर कितीही युक्तीवाद करून वा समजावून उपयोग नसतो. त्यांना तुमचे म्हणणे कळलेले असते. पण त्यांच्या गैरसोयीचे असल्याने तुमचे अर्थच नाकारून ते आपली बाजू समर्थनीय ठरवत रहाणार. उदाहरणार्थ अविष्कार स्वातंत्र्यातच विटंबना वा अवहेलना करण्याचा अंतर्भाव आहे, असा दावा राजदीप सरदेसाई याने आपल्या लेखातून केलेला आहे. ‘टु ऑफ़ेन्ड’ असा शब्द त्याने स्वातंत्र्याची व्याप्ती वाढवताना केलेला आहे. ऑफ़ेन्डपासूनच ऑफ़ेन्डर हा शब्द तयार होतो. म्हणजेच कायद्याच्या राज्यामध्ये ऑफ़ेन्डरला तसे वागायचे स्वातंत्र्य आहे. ऑफ़ेन्डर म्हणजे गुन्हेगार दोषी होय आणि दोषी असणे हेच स्वातंत्र्य वा अधिकार असल्याचा युक्तीवाद त्याने केला आहे. अर्थातच तमाम सेक्युलर पुरोगामी त्याच्यामागे समर्थपणे उभे ठाकणार, हे वेगळे सांगायला नको. गोळाबेरीज इतकीच, की देश सेक्युलर पुरोगामी असणे म्हणजे गुन्हेगारांच्या हवाली असणे आणि गुन्हे करण्याचे अधिकार वा स्वातंत्र्य असणे, म्हणजे सेक्युलर राज्य इथवर मजल आली आहे.

पाकिस्तान आणि भारतातले सेक्युलर यांच्या शब्द, युक्तीवाद यातले साम्य ओळखले तर त्यांच्याशी वाद घालण्यात वा त्यांना समजावण्यात अर्थ राहिलेला नाही, हे लक्षात येऊ शकेल. त्यांचे शब्द वा अर्थ किती वेगाने बदलू शकतात, त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. चार वर्षापुर्वी लालूप्रसाद यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला होता. पण त्यांचा पाठींबा हवा म्हणून आणि आपल्याही एका खासदाराचे सदस्यत्व रद्द होणार म्हणून, त्या निर्णयाला रोखणारा अध्यादेश जारी करण्याचा निर्णय मनमोहन सरकारने घेतला होता. त्यावरून देशभर गदारोळ सुरू झाला. भ्रष्टाचार व गुन्ह्याला पाठीशी घालणारा अध्यादेश म्हणून काहूर माजवले गेले. तो अध्यादेश राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवून पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेला रवाना झाले. त्याचेच समर्थन करणारी एक पत्रकार परिषद कॉग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अजय माकन यांनी प्रेसक्लबमध्ये घेतलेली होती. ते जोरदार भाषेत त्या अध्यादेशाचे समर्थन तिथे करत होते. इतक्यात तिथे राहुल गांधी येऊन टपकले आणि त्यांनी चार मिनीटात पत्रकारांना काही गोष्टी सांगितल्या. ‘हा अध्यादेश रद्दड असून तो फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत टाकला पाहिजे’ असे विधान त्यांनी केले. त्यांचेच प्रवक्ते माकन व पत्रकार थक्क होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. चार मिनीटात राहुल तिथून निघून गेले आणि पुढे पत्रकार परिषद चालवणार्‍या माकन यांनी कोलांटी उडी मारून त्या अध्यादेशाची निंदानालस्ती सुरू केली. जी पत्रकार परिषद त्या अध्यादेशाच्या गुणगौरवासाठी योजलेली होती, तिथेच तिचा निषेध सुरू झाला. तात्काळ तमाम कॉग्रेसजन त्याची हेटाळणी करू लागले. याला पुरोगामीत्व म्हणतात. याला सेक्युलर म्हणतात. कुठल्याही क्षणी कशीही कोलांटी उडी मारणे, मर्कटलिला करणे म्हणजे सेक्युलर बुद्धीवाद असतो, त्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. पण त्याबद्दल कोणी बोलायचे नसते. त्या बाबतीत गप्प बसलात मग तुम्हाला पुरोगामीत्वाचे प्रशस्तीपत्र मिळते.

ज्यांची एकूण बुद्धी अशी चालू शकते आणि त्यासाठी आपली विवेकबुद्धी ज्याला गहाण ठेवता येईल, त्यालाच पुरोगामी म्हणून मान्यता मिळू शकते. धडधडीत खोटे बोलणे त्यासाठीची गुणवत्ता आहे. तेही शक्य नसेल तर खुळचट पोपाटपंची करणे तरी शक्य झाले पाहिजे. म्हणूनच मग मकबुल बट्ट वा अफ़जल गुरूला देशप्रेमी ठरवण्याची सेक्युलर स्पर्धा झाली तर नवल नाही. साक्षी महाराज वा कोणी साध्वी असेच काही बरळली, मग देशाला धोका निर्माण होत असतो. म्हणून हेच पुरोगामी आक्रोश सुरू करतात. त्यांची मुस्कटदाबी करीत नाही म्हणून सरकारला जाब विचारत असतात. तेव्हा नुसत्या बोलण्याने हिंसा माजत नाही किंवा माजलेली नाही, म्हणून त्या महाराज साध्वीची बडबड अविष्कार स्वातंत्र्यात सहभागी होऊ शकते, हे त्यांची विवेकबुद्धी त्यांना सांगत नाही. कारण विवेकबुद्धीचा पुरोगामीत्वाशी संबंध नसतो. विवेकाला तिलांजली दिल्याखेरीज कुणाला पुरोगामी म्हणून मान्यताच मिळत नाही. मग साध्वीचे बोल त्यांना भयभीत करतात. वंदेमातरम त्यांना भयानक वाटू लागते आणि ‘भारतके टुकडे’ त्यांना देशप्रेम वाटू लागते. त्यातली तर्कबुद्धी सुसंगत आहे. त्यांना देशाशी, समाजाशी काही कर्तव्य नसते. आपापल्या रागलोभासाठी देश समाजाचेही नुकसान करायला ते मागेपुढे बघत नाहीत. मग मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना हटवा म्हणून आवाहन करू शकतात आणि नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणाही दिल्या जाऊ शकतात. तिथे बाबा रामदेव भाषण द्यायला आल्यास देशाला धोका असतो. पण फ़ुटीरवादी पाकिस्तानवादी गर्जना करण्यापर्यंत सोकावले, तरी धोका नसतो. ही तर्कसंगत सेक्युलर प्रगती आहे. मोदींना संपवण्यासाठी देश बुडाला तरी बेहत्तर ,इतक्या टोकाला जाण्याचे ते लक्षण आहे. पण त्यात देशच संपला तर उद्या आपले काय होईल, याचीही त्यांना फ़िकीर उरलेली नाही. हिंदी सिनेमात चौधरी ठाकुर जसे पिढीजात वैरासाठी विध्वंस घडवून आणतात, तशी आता सेक्युलर मानसिकता झालेली आहे.

आम्हाला दया येते, ती अशा पुरोगाम्यांना आपली बाजू समजावण्यासाठी बौद्धिक युक्तीवाद करत बसलेल्या देशप्रेमी, हिंदूत्ववादी किंवा भाजपा शिवसेनावाल्यांची! ते दगडावर कपाळ आपटण्यात कशाला आपली शक्ती खर्ची घालत आहेत? ज्यांना तुमची भाषा, त्यातले शब्द वा त्यांचे अर्थही ठाऊक नाहीत वा समजूनही घ्यायचे नाहीत, त्यांना काय समजावत बसलात? इतकी अक्कल असती, तर मुळात त्यांनी मोदींना मागल्या लोकसभेत जिंकूच दिले नसते. इतक्या थराला सेक्युलर बालीशपणा जाऊच दिला नसता. हिंदूत्ववाद्यांना वाटते, की मतदाराने हिंदूत्वाला कौल दिलेला आहे. मोदींचा विजय हा हिंदूत्वाचा विजय आहे. तसे काहीही झालेले नाही. लोक सेक्युलर मुर्खपणा व अतिरेकाला कंटाळून मोदीकडे वळले. कारण त्यांना देशद्रोह, बुडवेगिरी व दिवाळखोरी याचा कंटाळा आलेला होता. ते सत्य झाकण्यासाठी व आपली भामटेगिरी लपवण्यासाठी पुरोगाम्यांनी मोदींच्या विजयाला हिंदूत्वाचे लेबल लावले आणि त्यात मोदीभक्त वा समर्थक फ़सले आहेत. लोक हिंदूत्ववादी झालेले नाहीत, की हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी लोकांनी कौल दिलेला नाही. सेक्युलर पाखंड व पुरोगामी भामटेगिरीचा तमाशा संपावा, इतक्याच उदात्त हेतूने लोकांनी मोदींच्या हाती सत्ता दिलेली आहे. ते पुरोगामीही पक्के ओळखून आहेत. पण ते सत्य मान्य केल्यास मुर्खपणा मान्य करावा लागेल. म्हणून आता त्यांनी खुळेपणाची पुढली पायरी चढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचा मोदींना अधिकच लाभ होऊ शकतो. म्हणून पुरोगाम्यांच्या असल्या मुर्खपणाला अधिक प्रोत्साहन देणे, भाजपाला लाभदायक ठरू शकेल. त्यातून पुरोगामी सेक्युलर डावे म्हणजे देशद्रोही वा पाकवादी, अशी प्रतिमा तेच जनमानसात उभी करत आहेत. पर्यायाने लोक त्यांच्यापासून अधिक दुरावतील आणि त्याचा राजकीय लाभ भाजपाला मिळणार आहे. मग त्याला नमोभक्तांनी वेसण कशाला घालावी? आत्महत्या करणार्‍या शत्रूच्या कामात हस्तक्षेप करू नये असे नेपोलियन उगाच म्हणालेला नाही.

Tuesday, February 23, 2016

पुरोगामी मुखवटे आणि सनातनी चेहरे



नेहरू विद्यपीठ, हैद्राबाद विद्यापीठ, पुण्याची फ़िल्म इन्स्टीट्युट अशा सर्व केंद्रीय शिक्षणसंस्था सरकारी अनुदानावर चालतात. कित्येक कोटी रुपये सरकार त्यावर खर्च करीत असते आणि तिथे त्याच सरकारी पैशावर मौजमजा करणारे तथाकथित बुद्धीमान, प्रतिभावान, प्राध्यापक किंवा विद्यार्थी अभिजन मानले जातात. त्यांची मागणी काय आहे? आमचा खर्च किंवा बोजा (मोदी) सरकारने उचलला पाहिजे. त्याच्या बदल्यात आम्ही अभिजन कुठल्या मार्गाने परतफ़ेड करू? तर आम्ही त्याच सरकारची निंदानालस्ती करू. त्याच सरकारला शिव्याशाप देवू. त्याच्या कामात अडथळे आणू आणि त्याबद्दल पुन्हा त्याच सरकारने आमची पाठ थोपटली पाहिजे. हे पहिल्यांदाच झालेले नाही. शतकापुर्वीही अशाच घटना याच देशात घडत होत्या आणि तेव्हाच्या क्रांतीकारी सुधारक पुरोगामी महापुरूषांच्या नावाने आज नेमकी उलटी गंगा वहाते आहे. फ़ुले शाहू आंबेडकरांचा सतत नामजप करणारे कसे वागत आहेत? त्याच सुधारक वारश्याला काळीमा फ़ासणारे वर्तन त्याच महापुरूषांच्या तथाकथित अनुयायांकडून आज चाललेले आहे. संपुर्ण समाजाला ओलिस ठेवण्याच्या ज्या मक्तेदारीपासून शाहू महाराजांनी मुक्ती मागितली होती, त्याच मक्तेदारीच्या हक्कासाठी लढणार्‍यांना आज पुरोगामी म्हटले जाते. खरे वाटत नाही? अविष्कार स्वातंत्र्याचा कोणता अर्थ आग्रहाने मांडला जातो आहे? थोडी इतिहासाची पाने उलगडा.....

    ‘मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही जर ते माझे द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तर मी माझ्या घरच्या देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर ब्राह्मण पुजार्‍यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजार्‍यांकडून करवून घेईन. ते मला मनुष्य समजत असतील तरच त्यांच्याकडे पुजारीपणा ठेवीन आणि जर का ते मला जनावराप्रमाणे समजतील तर मी ठेवणार नाही.’

      ‘राजकारण’कर्त्यासारख्या (दामलेशास्त्री) मजवर टिका करणार्‍यास माझी विनंती आहे, की त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅरेग्राफ़समोर त्यावर आपली टिका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने; माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. ‘राजकारण’कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भिती वाटते. कारण मग त्यास विरुद्ध टिका करण्यास स्थळे कमीच सापडतील’

   तब्बल ब्याण्णव वर्षापुर्वीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या एका भाषणातला हा उतारा आहे. नेमके सांगायचे; तर १५ एप्रिल १९२० रोजीचे हे भाषण आहे. नाशिक येथे श्री. उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभातले प्रमुख पाहुणे म्हणून महाराजांनी जे सर्वस्पर्शी विस्तारपुर्वक भाषण केले होते, त्यातला हा उल्लेख आजच्या संबंधातही तेवढाच मोलाचा ठरावा. शाहू महाराजांनी जी ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात मोहिम त्या काळात छेडली होती आणि दुसरीकडे समाजसुधारणा व तात्कालिन राजकीय सुधारणांचे काम चालविले होते; त्याचा उहापोह त्यांनी या भाषणातून केलेला होता. महाराजांवर त्यावेळी व आजही धर्मविरोधी व ब्राह्मणांचा द्वेष करणारे असा आरोप होतो. त्याचाही समाचार त्याच भाषणातून घेतलेला आहे. जातीपातीच्या वर्चस्ववादाने समाजात जो उचनीच भाव पसरला होता, तो मोडीत काढून, तमाम समाजाला एकत्र आणायचे जे प्रयास चालू होते, त्यात आपली बुद्धी विघ्नसंतोषी वृत्तीने वापरणार्‍यांना महाराजांनी दिलेला तो इशारा होता. यातले शब्द व त्यांची योजना काळजीपुर्वक वाचली; तर असे दिसेल की महाराज आपल्या नुसत्या अपमान व अवहेलनेने व्यथित झालेले नाहीत. ज्याप्रकारे कारस्थानी वृत्तीने व टोळीबाज मानसिकतेने, त्यांना बदनाम व अपमानित करण्याचे प्रयास चालू होते, त्याने चिडून उठलेले दिसतील.

   आपण ब्राह्मणांवर प्रेम करीत असूनही ते (ब्राह्मण) आपला द्वेष व तिरस्कार करतात व आपल्याला जनावरासारखी वागणूक देतात; ही त्यांची तक्रार आहे तेवढीच वेदना सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला कुणाही ब्राह्मणाचा द्वेष वा तिरस्कार करायचा नाही. पण ते तसे वागत असतील, तर त्यांना तसाच प्रतिसाद द्यावा लागेल, असा त्यात इशारा आहे. इतके महाराज का चिडलेले असावेत? तर साक्षात राजा असून व त्याच्याच अनुदानावर उदरनिर्वाह करणार्‍यांनी, त्या राजाला अपमानित करायचे उद्योग चालू होते. सामान्य माणसाचे किंवा अस्पृष्य जातीच्या लोकांचे सोडाच; खुद्द राजालाही तुच्छ ठरवणार्‍या अभिजन वर्गाच्या प्रवृत्तीने महाराज संतापले होते. आणि तो अभिजनवर्ग म्हणजे बुद्धीचा मक्ता आपल्याकडेच आहे; अशी समजूत असल्याने मुजोर झालेला ब्राह्मणवर्ग होता. त्या समजाला कोणी आव्हान दिलेले नव्हते. पण स्वत:ला तुम्ही शहाणे समजत असला; म्हणून इतरेजनांना तुच्छ लेखून सातत्याने त्यांची अवहेलना कराण्याचा अधिकार गाजवला जात होता, त्याच्या विरोधात महाराजांनी शड्डू ठोकला होता. आपल्याच अनुदानावर पोसला जाणारा हा मुजोर वर्ग आपल्यालाच असे वागवत असेल, तर सत्ताहीन, शक्तीहीन व संपत्तीहीन सामान्य लोकांची काय कथा? हे लक्षात आल्यानेच शाहू महाराजांनी या बौद्धिक मुजोरीचे कंबरडे मोडायचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी तळागाळातल्या विविध समाजघटकांच्या शिक्षणांला प्रोत्साहान दिले, सवलती दिल्या. पण नुसत्या सवलती देऊन ते थांबले नाहीत. तर या मुजोरीशी दोन हात करायलाही शाहू महाराज पुढे आलेले होते. आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या त्या भाषणात पडलेले होते.

   महाराजांना धर्मकार्य वा कर्मकांडात ब्राह्मणांचा त्रास झाला व अडवणूक झाली असेल हा त्यांचा व्यक्तीगत विषय होता. म्हणूनच त्यांनी त्याला फ़ारसे महत्व दिलेले दिसत नाही. पण त्यांच्या कार्यात बाधा आणणार्‍यांचे प्रयत्न मुळातच बौद्धिक मुजोरी व मक्तेदारीचे होते, आणि त्यामुळेच तात्कालीन ब्रह्मवृंद विचलित होऊन महाराजांच्या विरोधात एकवटला होता. संघटित हल्ले केल्याप्रमाणे खोटेनाटे आरोप करीत होता, लिहित होता. अशाच त्यावेळच्या एका नियतकालिकात जो अवास्तव टिकेचा प्रकार घडला होता, त्यावर महाराज तुटून पडले आहेत. पण आपल्यावरचे नुसते आरोप त्यांनी खोडून काढलेले नाहीत. तर त्या आरोपबाजी व टिकेच्या आडची बदमाशी त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे. टिका व बदनामी, यात खुप मोठा फ़रक असतो, महाराजांनी टिकेचे त्याही भाषणात स्वागत केले आहे आणि जरूर टिका करा, म्हणजे मला सुधारण्यास मदत होईल; असेही उदगार काढलेले आहेत. पण टिकेच्या आडून बदनामीचे कारस्थान चालवले जाते, त्या बौद्धिक बदमाशीवर महाराजांनी नेमके बोट ठेवले आहे. ते काय म्हणतात? ‘अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो.’

   आपल्या भाषणाचा बरचसा मजकूर गाळला जातो आणि बारीकसे अवतरण देऊन अर्थाचा अनर्थ केला जातो. ते कोण करत होते? तेव्हाचा बुद्धीवादी अभिजन वर्ग. अर्थात त्यावेळी शिक्षणाचा आजच्यासारखा प्रसार झालेला नसल्याने जो पिढीजात सुशिक्षित उच्चभ्रू ब्राह्मण समाज होता, त्यातूनच अभिजन घडवले जात. आणि तेच असे बौद्धिक मुजोरी दाखवून सत्याचा विपर्यास करीत होते. मुठभर लोक वृत्तपत्रे वाचन होते आणि हाताच्या बोटावर मोजावी इतकीच वृत्तपत्रे होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. लिहिता वाचता येणारे व बुद्धीमान समजले जाणारे ब्राह्मण सुधारणेच्या चळवळीला व्यत्यय आणण्यासाठी सत्याचा अपलाप करीत होते. आणि तो विपर्यास कोणत्या मार्गाने केला जात होता? मूळ भाषण छापायचेच नाही. त्यातला सोयीचा शब्द, वाक्ये वा अवतरणे घेऊन त्यावरच झोड उठवायची. म्हणजे असे, की मांडलेल्या मूळ मुद्द्याचा अनर्थ होऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत. त्याला काही लोक बामणीकावा म्हणतील. मी त्यात पडणार नाही. पण हा इतिहास आज अगत्याने इथे शाहू महाराजांच्या नेमक्या शब्दात सांगायचे कारण असे; की एक शतकाचा काळ उलटून जायची वेळ आली, म्हणुन त्याच माध्यमे व नियतकालिकातील मानसिकता कितीशी बदलली आहे? अर्थाचा अनर्थ व मूळ भाषणाचा विपर्यास करायचे थांबले आहे काय? हे असे चालू शकते कारण भामटे चलाख असतात. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात,

    ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’

कॉम्रेड येच्युरींची कांगावखोरी



उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी उक्ती मराठीत प्रसिद्ध आहे. पण कोल्हापूरात येऊन अज्ञानाचे प्रदर्शन मांडणार्‍या मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी यांना दुर्दैवाने मराठी भाषा अवगत नाही. पण समोर बसलेल्या श्रोत्यांना ती म्हण नक्कीच ठाऊक असेल. येच्युरी यांच्या प्रबोधनपर भाषणाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही मराठी उमजत असावी, अशी अपेक्षा आहे. पण इतिहासाचे संदर्भ ठाऊक नसतील, काय करणार? कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमीत्त योजलेल्या समारंभात कॉम्रेड येच्युरी आपले पांडित्य सांगायला आलेले होते. तर निदान पानसरे यांना ते ओळखत असावेत, असे गृहीत धरावे लागते. पानसरे यांचा पक्ष कोणता आणि त्याचा इतिहास काय आहे, त्याचेही भान येच्युरींना असावे, ही अपेक्षा गैरलागू म्हणता येईल काय? कारण तसे असते तर या महाशयांनी कोल्हापुरात येऊन पानसरे यांचा इतका अपमान केला नसता. पानसरेंच्या राजकीय वारश्याची विटंबना नक्कीच केली नसती. ज्या राजकीय घडामोडीचे व त्यातील घटनाक्रमाचे पानसरे यांनी अगत्याने समर्थन केले होते, त्याची हेटाळणी या निमीत्ताने येच्युरी यांच्याकडून झाली नसती. एका ज्येष्ठ कॉम्रेडला श्रद्धांजली अर्पण करताना येच्युरी काय म्हणाले? ‘आणिबाणीपेक्षाही देशात भयंकर परिस्थिती आलेली आहे’. त्याचा अर्थ इंदिरा गांधी यांनी लागू केलेली १९७५ सालची आणिबाणी अन्यायकारक होती, असे येच्युरी यांना म्हणायचे होते काय? तसे असेल, तर तो कॉम्रेड पानसरे यांचा घोर अवमान आहे. कारण आपल्या हयातीत त्या आणिबाणीचे पानसरे व त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बाहू पसरून स्वागत केले होते. त्या आणिबाणीतील कृत्यांना पाठींबा दिलेला होता. म्हणजेच आणिबाणी पानसरे व त्यांच्या पक्षाला आवडलेली व मान्य असलेली राजकीय परिस्थिती होती. त्यावर तोफ़ा डागण्यास पानसरे यांच्या स्मृतीदिनाचे व्यासपीठ वापरणे ही निव्वळ विटंबनाच नाही काय? आणि मजेची गोष्ट अशी की समोर बसलेले पानसरे यांचे निकटवर्ति निमूट हे सारे ऐकत होते. पुरोगामीत्व किती हास्यास्पद होऊन गेले आहे, त्याचा हा पुरावा!

१९७५ सालात इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लावली आणि तमाम विरोधकांना उचलून कुठल्याही खटल्याशिवाय तुरूंगात डांबलेले होते. कशाला व कायद्याच्या कुठल्या निकषावर इतक्या हजारो लोकांना तुरूंगात डांबले गेले होते? तर त्यांच्यामुळे देशाला धोका असल्याचा निष्कर्ष इंदिरा गांधी यांनी काढला होता. त्याची न्यायालयिन छाननीही करायची सोय नव्हती. सरकारच्या लुठल्याही कृती वा निर्णयाच्या विरोधात मतप्रदर्शन करणे, हा गुन्हा मानला गेला होता. घोषणा वा सभासंमेलने घेऊन सरकार विरोधातले मत मांडण्यालाही बंदी होती. किंबहूना सरकारच्या विरोधकांना कुठलाही जाहिर समारंभ योजण्यालाच बंदी घालण्यात आली होती. कारण सरकार विरोधात बोलणे म्हणजेच देशद्रोह व पर्यायाने देशाला धोका, असा निष्कर्ष लागू होता. त्याला आणिबाणी म्हणतात. त्यामध्ये तमाम बिगरकॉग्रेस पक्षीय नेते कार्यकर्ते व संघटना व्यक्ती भरडल्या गेल्या होत्या. अपवाद होता कॉग्रेसजन व कॉ. पानसरे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष! कारण या दोन पक्षांनी आणिबाणी म्हणजेच लोकशाही असे मानलेले होते. त्यापासून पानसरे अलिप्त नव्हते. पक्षशिस्त म्हणून असेल, पण त्यांनीही त्या कालखंडात आणिबाणीचे समर्थन केले होते. तेव्हा कोणी कुठे येच्युरी यांचे नावही ऐकले नव्हते. बहुधा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पाळण्यात येच्युरी आपल्याच पायाचे अंगठे तोंडात घालून चोखताना मार्क्सवादाचे बाळकडू घेत असावेत. म्हणून त्यांना आणिबाणी म्हणजे काय ते ठाऊक नसावे, किंवा पानसरे यांचे आणिबाणी विषयक मत वा भूमिका ठाऊक नसावी. खरे तर येच्युरी वा त्यांच्यासारखे दिवाळखोर पुरोगामी डावे यांनी मार्क्सवाद साम्यवाद कितीसा अभ्यासला आहे याचीच शंका येते. कारण त्यांच्या तोंडी डाव्या विचारवंतांपेक्षा गोळवलकर गुरूजींची अवतरणे अधिक असतात. त्यामुळे त्यांनी संघाचे विचार अभ्यासलेत की डाव्या विचारांचा व्यासंगी अभ्यास केलाय, याचीच शंका येते.

१९७५ सालात आणिबाणी लागू झाली आणि त्याच्याही दोन वर्षे आधी दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांचे निधन झाले. तितके जुने गुरूजी वा त्यांची विविध पुस्तके त्यातले उतारे येचुरी सारख्यांना आठवतात. मग कॉम्रेड पानसरे आणिबाणीत काय करत होते, हे कशाला आठवत नाही? १९७३ पुर्वी गुरूजींनी व्यक्त केलेले विचार आजही जर संघाचेच म्हणून ठामपणे आरोप करायचे असतील, तर आणिबाणीच्या काळातले पानसरे वा त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे विचार आजही त्यांचेच विचार म्हणून बोलावे लागेल. आणि तसेच असेल तर देशात आणिबाणीसारखी स्थिती असेल तर पानसरे सुखावलेच असते. पण पुरोगामी असले मग सोयीनुसार अर्थ वा शब्द बदलण्याचे खास अधिकार मिळाल्याच्या भ्रमात लोक वागत असतात. म्हणून येच्युरी यांच्यासारखे कुमार सप्तर्षी इत्यादि सतत बरळत असतात. आणिबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती म्हणजे काय? भयंकर सोडून द्या, आणिबाणी असती तर येच्युरी वा तत्सम लोकांना जाहिरपणे सरकार वा मोदी विरोधातला शब्दही उच्चारता आला नसता. सभासमारंभ वा घोषणाबाजी दुरची गोष्ट झाली. पण येच्युरी दिल्लीहून कोल्हापुरला येऊन वाटेल तसे बरळू शकले किंवा मुक्ताफ़ळे उधळू शकत आहेत, याचा अर्थच आणिबाणीपेक्षाही प्रचंड अविष्कार स्वातंत्र्य आज उपलब्ध आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचाच थांगपत्ता नसेल, तर असले पढतमुर्ख असेच बरळत रहाणार ना? किंवा मग त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या भिन्न असली पाहिजे. आपण म्हणू तोच शहाणपणा आणि आपल्या विरोधात कोणी भूमिका मांडली, तरी तो विचारस्वातंत्र्याचा संकोच गळचेपी अशी समजूत असेल, तर गोष्ट वेगळी. मागल्या काही वर्षात डावे पुरोगामी विचार म्हणजेच विचार आणि अन्य काही असेल तर तो अविचार; असा एक भ्रम या लोकांनी पोसला आहे. त्यामुळेच वेगळा विचार कानावर येऊ लागल्याने हे लोक कमालीचे विचलीत होऊन गेलेत. डावा विचार लोक फ़ेटाळू लागल्याने त्यांना भयगंडाने पछाडले आहे.

आपल्या भूमिका विचारांपेक्षा अन्य विचार मांडण्याची मुभा म्हणजेच आपली गळचेपी, अशी ही भूमिका आहे. अर्थात जगात जिथे जिथे साम्यवादी कम्युनिस्ट सत्ताधीश झाले, तिथे त्यांनी हाच मार्ग अवलंबिला आहे. तिथे दुसर्‍या पक्ष वा राजकीय विचारसरणीला बंदी असते. अन्य विचारांची कायद्याने व सत्तेचा दंडूका उगारून गळपेची केली जाते. प्रसंगी अशा भिन्न वि़चारांच्या लोकांची कत्तल केली जाते, जसे आज येच्युरींचे साथी कॉम्रेड केरळात संघाच्या कार्यकर्त्यांचे खुन पाडत आहेत. त्याला डाव्यांच्या भाषेत ‘शुद्धीकरण’ म्हणतात. आणि तसेच काही इतरेजनांनी केल्यास त्याला हत्याकांड नाव दिले जाते. ज्या कॉम्रेड स्टालिनचा फ़ोटो मार्क्सवाद्यांच्या कार्यालयात झळकत असतो, त्याने हजारोंच्या संख्येने भिन्न विचारांच्या लोकांची कत्तल केलेली होती. केरळात येच्युरींचे सहकारी तेच करत आहेत. तर नक्षलवादी म्हणून त्यांचेच आप्तस्वकीय डझनाच्या भावात कत्तली करीत असतात. त्याला वैचारिक सहनशीलता म्हणतात. एकूणच कांगावा असतो. जगात कुठल्याही अन्य विचारांपेक्षा डाव्या कम्युनिस्ट विचारांनी मोठी मानवी हत्याकांडे केलेली आहेत. अशी हत्याकांडे कम्युनिस्ट राजवटीत वैध असतात. भारतीय लोकशाहीत ती अवैध असतात. म्हणून भारतात मोदी सत्तेत असूनही येच्युरी जीभ लांब करून मुक्ताफ़ळे उधळू शकत आहेत. मुर्खालाही भांडवली लोकशाहीत वाटेल ते बरळण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच राजदीपपासून येच्युरीपर्यंत कुणालाही बकवास करता येते आहे. त्यांच्याच डाव्या विचारांचे राज्य आले तर त्यातले दोष बोलण्यासाठी हेच दिवटे जीभ उचलू शकणार नाहीत. ते त्यांनाही पक्के ठाऊक आहे. कारण बाजूला चीनमध्ये त्यांचे सतत येणेजाणे असतेच. पण इथे लोक सहन करतात व संयमी आहेत, म्हणून बरळत रहायचे, हा डाव्यांचा स्वभाव झाला आहे. मात्र आता त्यांच्या बरळण्याला लोक भिक घालेनासे झालेत, म्हणून टाहो फ़ोडून रडावे लागते आहे.

अर्धवट अतिशहाण्यांचे पोस्टमार्टेम

(पढतमुर्खांचे मनोविकार -२)
अमू्क इतके शिकलेले पदवीभर उ़च्चशिक्षीत म्हणून जी माणसे आपल्यापुढे पेश केली जातात, त्यांच्याकडे बघताना वा त्यांचे ऐकताना आपण गाफ़ील होऊन जात असतो. ते सुशिक्षीत म्हणून शहाणे व त्यांना जगातले सर्वकाही कळते, अशा भ्रमात आपण फ़सत असतो. प्राध्यापक, लेखक, साहित्यिक, विचारवंत वा विश्लेषक लेखक अशा बिरूदावल्या लावून आपल्यासमोर अशी माणसे पेश केली जातात. मग तो बोलतो काय, लिहीतो काय ते तपासून घेण्याविषयी आपण पुरते गाफ़ील होऊन जातो. एकप्रकारे आपण त्यांच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवून मोकळे होतो. असे का घडते? ब्रॅन्ड यालाच म्हणतात. रस्त्यात कुठल्या भाजीवाल्याकडून काही घेताना आपण निवडून तपासून घेतो. पण पॅकबंद माल डोळे झाकून छापलेली किंमत देवून खरेदी करतो. तेव्हा तो नावाजलेला ब्रॅन्ड आपली बुद्धी निद्रीस्त करीत असतो. अमूक नाव-छाप म्हणजे उत्तमच, अशी जाहिरातीतून आपली तर्कबुद्धी चिकित्सकवृत्ती निकामी केलेली असल्याचाच तो परिणाम असतो. कुठल्याही व्याख्यान वा कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीला पेश केले जाते, तेव्हा त्याचे गुणगान आपल्यापुढे असे केलेले असते, की त्याने काहीही बरळावे आपण त्याला महान विचार समजून बसतो. त्यातले शब्द, त्यांची संगती, त्यांचा अन्वय लावूनही बघायला विसरून जातो. माध्यमे तीच जादू करत असतात. अलिकडेच दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात देशद्रोही घोषणा दिल्याचा गदारोळ झाला. त्यावर दैनिक लोकसत्ताच्या संपादकांनी अग्रलेख लिहीला. त्यातले पहिले वाक्यच बघा, ‘विचारांच्या युद्धात सर्वात निरुपयोगी अस्त्र म्हणजे शस्त्र.’ चटकन गाफ़िलपणे वाचले तर किती महान सुविचार आहे असेच वाटणार. पण या शब्द योजनेचा नेमका अर्थ आपण कधीतरी लावून बघतो काय? संपादकाने लिहीले आणि तो बुद्धीमान आहे, म्हणजे महत्वाचेच लिहीले असणार, हे आपले गृहित असते. पण पुन्हा पुन्हा वाचून या इवल्या वाक्याची चिकित्सा करून बघा. आपल्या तर्कबुद्धीला ताण देवून बघा. हा सुविचार आहे की चक्क अडाणीपणा आहे, त्याचा शोध घेऊन बघा.
पृथ्वीतलावर कोट्यवधी सजीवप्राणी आहेत, त्यात विचार करू शकणारा एकमेव माणूस प्राणी आहे. तो वगळता अन्य कुठल्याही सजीवाला तितका विचार वा चिकित्सा करण्याची बुद्धी नाही. अवघ्या जगाची व विश्वाच्या रहस्यांची कोडी सोडवण्याचा मक्ता माणसाने घेतला आहे. अन्य कुठल्या सजीवाला ते कधीच शक्य झाले नाही. अन्य प्राण्यांनी तसा प्रयत्नही केलेला नाही. कारण त्यांच्यापाशी विचार करण्याची व तर्काने तपासून बघण्याची नैसर्गिक क्षमताच नाही. पण माणसाकडे ती पात्रता आहे. मात्र तशीच आणखी एक बाब आहे. अन्य सजीवांच्या तुलनेत माणूसच इतकी मजल मारून निसर्गावर मात करीत पुढारला आहे. अन्य प्राण्यांप्रमाणे जसा होता तसाच नैसर्गिक अवस्थेत राहिला नाही. कारण जी विचारशक्ती व बुद्धी माणसाला अपुर्व ठेवा म्हणून उपजतच मिळालेली आहे, तिचा उपयोग करून माणसाने आपल्या नैसर्गिक अपुरेपणावर मात करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आपल्याहून शक्तीमान, अक्राळविक्राळ प्राणिमात्रापासून आपला बचाव करण्याची नैसर्गिक कुवत माणसापाशी नाही. तर त्याने बुद्धीच्या बळावर ती कुवत साध्य केलेली आहे. त्यासाठी विविध साधने, उपकरणे निर्माण केली. अन्य सजीवांना आपले गुलाम केले आणि ती करताना त्याच माणसाने शस्त्रे व अस्त्रे निर्माण केली. ही बचावात्मक वा विध्वंसक अस्त्रे व शस्त्रास्त्रे आयती मिळालेली नाहीत, तर बुद्धी व विचारांची किमया आहे. भोवताली घडते त्याचा उलगडा करत गेलेल्या माणसाने विचार करून व मिमांसा करण्यातून अशी संहारक अस्त्रे शोधून काढली. पण तो माणूस प्राणी सोडता अन्य कुठल्या सजीवाला त्या दिशेने एकही पाऊल आजवर टाकता आलेले नाही. कारण अन्य प्राण्यांपाशी विचारांची अगाध शक्ती नाही. माणसापाशी विचारांची शक्ती आहे आणि त्यातूनच अनेक सुखकारक सुविधा जन्माला आल्या आणि विध्वंसक अशी शस्त्रेही विचारातूनच आलेली आहेत. आपण सुरक्षित जागी दडी मारून हजारो मैल दूर असलेल्या कोणालाही ठार मारणाती शस्त्रे विचारांनीच निर्माण केली ना? मग शस्त्रच विचारांनी निर्माण झाले असेल, तर विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नाही, असे म्हणणे शहाणपणाचे आहे काय?
किंबहूना पुर्वीच्या काळात सत्ता व संपत्ती भूमीसाठी माणसे शस्त्रे घेऊन एकमेकांच्या जीवावर उठायची. जितका माणूस प्रगत व विचारांच्या आहारी गेला, तसा तो विचारांच्या विजयासाठी शस्त्रांना बेधडक बेगुमानपणे वापरू लागला. नक्षलवादी वा जिहादी कशासाठी शस्त्रांचा वापर इतका सढळपणे करीत असतात? त्यांचे बळी होणार्‍यांचे अशा संघटनांशी कुठलेही वैर भांडण नसते. तरी ती सामान्य माणसे अशा हल्ले व स्फ़ोटाचे बळी होतात. ते कशाचे बळी आहेत? जिहाद वा नक्षलवाद ही विचारप्रणाली आहे. अमूक एका विचारांच्या अधीन राहून लोकसंख्येने जगावे, या आग्रह अट्टाहासातून जी हिंसा होत असते, त्याला विचारांची नव्हेतर कसली लढाई म्हणतात? जे कोणी सत्ताधारी वा सरकार अशा कारवायांच्या विरोधात सैनिकी पोलिसी कारवाई करतात, त्यांचीही एक विचारसरणी असते. तिचीच हुकूमत रहावी म्हणून शस्त्रांची सज्जता राखली जाते व वापरही होत असतो. पाकिस्तान, भारत वा चीन या देशातल्या सामान्य जनतेचे एकमेकाशी कुठले भांडण नाही, तरीही त्या त्या देशातील सत्ताधीशांच्या वैचारिक तात्विक भांडणात शस्त्रांचा वापर होतो आणि बळी सामान्य माणसालाच पडावे लागते. ही माणसे शस्त्राची बळी नसतात, तर विचारांच्या लढाईतले हकनाक बळी असतात. थोडक्यात विचारांच्या लढाईतच शस्त्राचे अस्त्र होऊन सामान्य माणसाचा बळी जात असतो. शस्त्राची निर्मिती विचारातून होते आणि त्याचा बरावाईट वापरही विचारांतूनच उदभवतो. कारण विचार आणि विवेकात मोठा फ़रक आहे. विचारांना विवेकाचा लगाम लावलेला असेल, तर सुविधा व साधने प्रभावी असतात. पण विवेकाचा बांध फ़ुटला, मग विचारच शस्त्रापेक्षा घातक विध्वंसक होऊन जातात. ही इतकी मिमांसा आपण करत नाही. त्यामुळे असे एखादे जड जड अनाकलनीय शब्दांचे वाक्य आपल्याला मोठा सुविचार वाटून जातो. पण प्रत्यक्षात असे लिखाण वा विश्लेषण दिशाभूल करणारे असते आणि त्यातून आपल्यातल्या उपजत चिकित्सक बुद्धीला निद्रीस्त केले जात असते. एकदा त्यात समोरचा यशस्वी झाला, मग सहजगत्या भरदिवसा तुम्हाला चांदणे दाखवू शकतो किंवा काळोखाला उजेडही ठरवू शकतो. कारण आपण वास्तव बघायचेच विसरून गेलेले असतो. असे असले म्हणून आपणच अज्ञानी वा मुर्ख नसतो. बुद्धीमान म्हणून मिरवणारे लोक आपल्या इतकेच निद्रीस्त बुद्धीने वावरत असतात. समोरचे वास्तव सामान्य माणूस एकवेळ सहज ओळखू शकतो. पण बुद्धीमान माणसाला ते बघणे अशक्य असते. किंबहूना त्यासाठीच विविध कला. योजना, उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. तुम्ही विचार करूच नये आणि समोर आणले जाईल त्यावर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवावा, अशी स्थिती निर्माण केली जाते. माध्यमे मोठ्या प्रमाणात तेच काम करीत असतात. त्यांचे मुखवटे जागरूकपणे फ़ाडण्य़ाची म्हणूनच गरज असते. (संपुर्ण)

पढतमुर्खांचे मनोविकार

मायकेल मायर नावाचा एक अमेरिकन पत्रकार आहे. पंचवीस वर्षापुर्वी उमेदवारी करत असतानाचे धक्कादायक अनुभव त्याने एका पुस्तकात ग्रथित केलेले आहेत. ‘१९८९: ईयर दॅट चेंज्ड थ वर्ल्ड’ असे त्या पुस्तकाचे नाव आहे. माध्यमातून सामान्य माणसापर्यंत येणार्‍या बातम्या आणि प्रत्यक्षातले वास्तव, यात किती टोकाचा फ़रक असतो, त्याची गाथाच ह्या गृहस्थाने कथन केली आहे. १९८८ मध्ये तो युरोपमध्ये ‘न्युजविक’ या मान्यवर अमेरिकन साप्ताहिकाचा बातमीदार म्हणून काम करत होता. अकस्मात त्याला बर्लिन येथे ब्युरोचिफ़ म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला आणि त्याला नवल वाटले. कारण आधी त्या जागी एका ज्येष्ठ सहकार्‍याची नियुक्ती झाल्याचे त्याने ऐकले होते. पण तेव्हा बर्लिन हे युरोपला विभागणारे शहर होते आणि पुर्व युरोप सोवियत साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. तिथे कम्युनिस्ट राजवट होती आणि अविष्कार स्वातंत्र्य वगैरे बोलणार्‍याला गजाआड जाऊन पडावे लागत असे. अशा जागी कुठलीही सरकारला दुखावणारी बातमीदारी करणे शक्य नव्हते, की खरीखुरी माहिती काढण्याचा गुन्हा करण्याची हिंमत कुठल्या पत्रकारामध्ये नसायची. म्हणजेच सरकारी वा सत्ताधारी नेत्यांकडून जी माहिती मिळेल, त्याची अळणी बेचव बातमी लेख खरडण्यापलिकडे तिथे आकर्षक काहीही नव्हते. म्हणूनच तिथे काही खळबळजनक घडत नव्हते. म्हणूनच त्या नीरस कामातून ज्येष्ठ सहकार्‍याने अंग काढून घेतले होते. परिणामी मायरला तिथे पाठवण्याचा निर्णय झाला होता. पण मायर खरा नशिबवान ठरला. कारण पुढल्या वर्षभरात त्याला जगातल्या सर्वात महत्वाच्या व इतिहास घडवणार्‍या घटनाक्रमाला व्यक्तीगत सामोरे जाण्याची अपुर्व संधी मिळाली. ही संधी इतकी अपुर्व होती, की त्याने बघितलेल्या घटना व पाठवलेल्या बातम्यांवर त्याचेच संपादकही विश्वास ठेवायला धजावत नव्हते. सहाजिकच मायर जे काही वृत्तांकन करत होता ते बाजूला ठेवून घटनाक्रमापासून मैलोगणती दूर असलेले त्याचे ज्येष्ठ व संपादक खोट्यानाट्या कपोलकल्पित गोष्टी पुर्व युरोपातील घटना म्हणून वाचकांच्या माथी मारत होते. अर्थात ही कहाणी एकट्या ‘न्युजविक’ साप्ताहिकापुरती मर्यादित नव्हती, तर बहुतेक माध्यमांसाठी लागू होती. त्याच्या पुस्तकातील शेकडो घटनांचा उल्लेख तेव्हाच्या वर्तमानपत्रातून आजही तपासून बघता येईल आणि माध्यमे सामान्य वाचकाच्या डोळ्यात किती व कशी धुळफ़ेक करतात, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. त्यातला एकच किस्सा इथे नमूद करायला हवा.
ब्रेझनेव्ह हा पोलादी टाचेखाली सोवियत साम्राज्य दाबून ठेवणारा नेता मरण पावला आणि सोवियत रशियातील म्हातार्‍या नेत्यांची पिढी संपत आलेली होती. त्यानंतरचे चेर्नेन्को आणि आंद्रापाव्ह असे दोन सर्वोच्च नेते सत्तेत आले आणि काही महिन्यातच मरण पावले. त्यामुळे एकदम नव्या पिढीतल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांची त्या सर्वोच्च पदासाठी निवड झाली. अर्धशतकापेक्षा अधिक झाकलेल्या सोवियत साम्राज्याचा पोलादी पडदा थोडा किलकिला करण्याचा धाडसी निर्णय या नव्या नेत्याने घेतला आणि अनेक जुलमी निर्बंधही ढिले करण्यास आरंभ केला. त्यामुळे रशियासह बहुतेक कम्युनिस्ट युरोपिय देशात स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली होती. त्यासाठी उतावळ्या झालेल्या जनतेने रस्त्यावर येऊन स्वातंत्र्याची मागणी सुरू केली होती. एकूण कम्युनिस्ट नंदनवनात अराजक पसरू लागले होते, तोच हा कालखंड! त्यातील प्रतिकात्मक घटना म्हणजे युरोप व जर्मनीला दुभागणारी बर्लिनची भिंत होय. या गडबडीत ती भिंत जमावाने आक्रमण करून उध्वस्त केली आणि क्रमाक्रमाने सोवियत साम्राज्य धुळीस मिळाले. त्या भिंतीच्या कोसळण्याच्या अनेक दंतकथा आहेत. गोर्बाचेव्ह यांचा उदय आणि रेगन यांची कारकिर्द संपण्याचा काळ समान होता. गोर्बाचेव्ह लोकशाही आणायला निघाले होते आणि त्याला रेगन यांनी प्रोत्साहनही दिलेले होते. अशाच एका संयुक्त समारंभात दोन्ही नेते एका व्यासपीठावर आलेले होते आणि त्यात रेगन यांनी ‘बर्लिनची भिंत पाडा’ मगच लोकशाही येऊ शकेल, असे आवाहन केलेले होते. योगायोग असा की त्यानंतर अल्पावधीतच ती भिंत पाडली गेली आणि रेगन यांचे तेच शब्द ऐतिहासिक ठरले होते. पण ते शब्द रेगन यांनी उत्स्फ़ुर्तपणे बोललेले नव्हते, की पुर्वतयारीने उच्चारलेले नव्हते. त्यांची भाषणे लिहीणार्‍या पथकाने त्या भाषणातले हे वाक्य असावे की नसावे, यावर काही तास उहापोह केला होता आणि अखेरीसच त्याचा भाषणात समावेश झाला होता. मात्र ते भविष्याची चाहुल वा सुचक इशारा देणारे वाक्य नव्हते. त्याचप्रमाणे त्या वाक्यामुळे वा अमेरिकेच्या कुठल्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात बर्लिनची भिंत पाडली गेली नाही. घटनाक्रम केवळ योगायोग होता.
बर्लिन विभागणार्‍या त्या भिंतीच्या अलिकडे पलिकडे जाण्याविषयी अनेक बंधने व व्यवस्था होत्या. एका शुक्रवारी त्या संबंधी काही निर्णय झाला आणि त्याची माहिती पुर्व जर्मन सरकारच्या प्रवक्त्याला देण्यात आली. त्यानेही संध्याकाळी नेहमीच्या खाक्याने त्याची पत्रकारांपुढे घोषणा करून टाकली. एका पत्रकाराने सहज प्रश्न केला, की भितीच्या आरपार जाण्यायेण्याची बंधने उठवली जाणार व सीमा खुली होणार, हे ठिक आहे. पण ते कधीपासून होणार? प्रवक्त्याकडे त्याचे उत्तर नव्हते. त्याने वरीष्ठांकडे त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी कोणी जागेवर नव्हता. म्हणून प्रवक्त्याने उत्तर दिले, विनाविलंब हा निर्णय लागू होणार आहे. पुर्व जर्मनीतील रेडीओवर ही बातमी अंधार पडताना प्रक्षेपित झाली आणि तासाभरातच बर्लिनच्या भिंतीकडे शेकड्यांनी लोकांचे जथ्थे येऊ लागले. शेकड्यांची संख्या हजारात होऊ लागली आणि त्या भिंतीपाशी सुरक्षेला तैनात असलेल्या सैनिकी तुकड्यांना काय करावे ते उमजेना. कारण शुक्रवारची रात्र होऊ लागली होती आणि सरकारसह बहुतेक वरीष्ठ अधिकारी साप्ताहिक सुट्टीवर रवाना झालेले होते. उशिरा हा जमाव आणि त्यातून होणारा गदारोळ इतका वाढला, की भिंतीच्या पलिकडे पश्चिम बर्लिन व जर्मनीतले लोकही भिंतीपाशी कुतूहलाने जमा होऊ लागले. मध्यरात्र होईपर्यंत लाखोचा जमाव भिंतीच्या दोन्ही बाजूंनी जमा झाला आणि धडका देऊ लागला. त्याला आवरणे तुटपुंज्या सैनिकी पथकांना शक्य नव्हते आणि वरीष्ठांशी संपर्कही होत नव्हता. तेव्हा वैतागून तिथे तैनात असलेल्या पुर्व जर्मन सेनाधिकार्‍याने भिंतीतले दरवाजे उघडण्याचे आदेश दिले. मोठा लोंढा त्यातून आरपार घुसला आणि त्याचे चित्रण व बातम्या पाश्चात्य देशातल्या वाहिन्या व रेडीओवर झळकू लागल्या. त्यात हस्तक्षेप करण्यापुर्वीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. दोन्हीकडले जर्मन नागरिक लाखोच्या संख्येने भिंतीला येऊन भिडले होते, त्यावर चढले होते, झेंडे फ़डकावून आनंदोत्सव चालू झाला होता. त्याचे पर्यवसान लौकरच भिंतीला धडका देण्यामध्ये झाला. भलीथोरली जाडजुड कॉन्क्रीटची भिंत सामान्य नागरिक हाताने आघात करून तोडायच्या कामाला लागले होते.
रेगन यांच्या त्या ऐतिहासिक वाक्याने कम्युनिस्ट युरोपात क्रांती झाली नव्हती की बर्लिनची भिंत पाडण्यास प्रेरणा मिळालेली नव्हती. घडला तो निव्वळ एक योगायोग होता, शुक्रवारी कोणी वरीष्ठ अधिकारी भिंतीच्या रक्षकांना आदेश द्यायला जागेवर नव्हता आणि अर्धवट बातमी झळकल्याने लाखोच्या संख्येने तिथे जमलेल्या नागरिकांना रोखणे कुठल्या सैनिकी पथकाला शक्य नव्हते. त्याचे पर्यवसान ती ऐतिहासिक भिंत जमिनदोस्त होण्यात झाले. पण जगातल्या तात्कालीन सर्व बातम्या तपासून बघा. त्यामागे रेगन यांचे ऐतिहासिक वाक्य चिकटलेले दिसेल. मायकेल मायर त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. पण त्याच्या संपादक वरीष्ठांचा त्याच्या कथनावर विश्वास बसला नाही. ही पुढारलेल्या व विचारवंत पत्रकारीतेची शोकांतिका असते. मायकेलने आपल्या पुस्तकात कथन केलेला हाच एक किस्सा नाही, असे डझनावारी घटनाक्रम आढळतील, की त्याने प्रत्यक्ष अनुभवले आणि लिहीले, तरी त्याला त्याच्याच साप्ताहिकाचे अमेरिकेत बसलेले संपादक प्रसिद्धी देत नव्हते. कारण त्या घटना वा त्याची कारणे त्यांना पटत नव्हती. त्यांच्या समजुती वा भ्रमातील ( आयडिया ऑफ़ सोवियत स्टेट) सोवियत युनियनमध्ये असे काही घडू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अर्धशतकाहून अधिक काळ सोवियत कम्युनिस्ट जगताची जी प्रतिमा व कल्पना त्यांच्या डोक्यात भरवली गेली होती, त्याच्याशी मायकेलचे वार्तांकन जुळत नव्हते. म्हणून त्याकडे पाठ फ़िरवली जात होती. आपल्या समजूती कल्पना व भ्रम यातून बाहेर पडून वास्तवाला सामोर जाण्याची हिंमत अशा बुद्धीमान लोकांमध्ये नसते. राजकीय, आर्थिक वा सामाजिक, सांस्कृतिक विश्लेषण करताना त्यामागे काही ठरलेला कार्यकारणभाव असतो, असे जे ग्रंथप्रामाण्य डोक्यात जाऊन बसलेले असते, ते वास्तव अनुभवाला झुगारत असते. हे जगभर तमाम वैचारिक व बौद्धिक क्षेत्रामध्ये घडत असते. कुठल्याही सामान्य पापभिरू श्रद्धाळू माणसापेक्षा बुद्धीमान माणसे भिन्न नसतात. प्रत्येकजण आपल्या समजूतीच्या कवचबंद पिंजर्‍यातली सुरक्षा भेदली जाण्याच्या भयाने घाबरलेला असतो. तेच तेव्हा मायकेलच्या संपादक वरीष्ठांकडून चाललेले होते आणि आज जगभर, भारतात माध्यमातले विचारवंत तसेच समजूतीला चिकटलेले आपण बघत असतो. सामान्य माणसाला जे दिसते व उमजते, तेच अशा शहाण्यांना कशाला लक्षात येत नाही, याचे आपल्याला नवल त्यामुळेच वाटत असते. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. (अपुर्ण)

Sunday, February 21, 2016

कायद्याची शक्ती श्रद्धेत असते

कायद्याचे राज्य तेव्हाच चालू शकते, जेव्हा त्या कायद्याला बहुसंख्य लोक मान्यता देत असतात. कायद्याची ताकद छापलेल्या पुस्तकातल्या शब्दात किंवा अंमलदाराच्या बंदूक दंडूक्यात नसते. सामान्य जनतेला तोच कायदा व त्याचा अंमल आपल्याला न्याय देऊ शकतो असे वाटत असते, तोवरच कायद्याची महत्ता असते. थोडक्यात सामान्य जनतेची कायद्यावर असलेली निष्ठा व श्रद्धाच, त्याची खरी ताकद असते. जेव्हा ते शब्द वा त्याची अंमलबजावणी थोतांड होऊन जाते, तेव्हा लोक कायदा झुगारू लागतात. तेव्हा कायदेपंडीतांना व अंमलदारांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागत असतो. म्हणजे नेमके काय ते बघायचे असेल, तर सिरीयातील विद्यमान परिस्थिती अभ्यासावी. कागदोपत्री तिथे बशर अल असद या नेत्याचे राज्य आहे. पण बंदुका व तोफ़ांच्या बळावर राजधानीत असद जीव मुठीत धरून जगतो आहे. त्याच्यापेक्षाही जुलमी सत्ताधीश लिबीयाचा गडाफ़ी होता. त्यालाही कुत्र्याच्या मौतीने मरावे लागले. दिर्घकाळ त्याच्या बंदुकांना घाबरलेली लोकसंख्या बंड करून उठली, तेव्हा बंदुका निकामी ठरल्या. शेजारी इजिप्तमध्येही होस्ने मुबारक नावाचा हुकूमशहा, तहरीर चौकात रणगाडे आणून कायदा आपल्या हाती ठेवू बघत होता. पण ते रणगाडेही लोकसंख्येपुढे नतमस्तक झाले आणि मुबारकाच्याच निष्ठावान सैनिकांनी त्याला अटक केली होती. पण त्यामुळेच जनतेला पुन्हा सैनिकांवर विश्वास ठेवणे शक्य झाले आणि त्यांची शस्त्रे बलवान झाली. नंतरचे बंडखोर नेते मुबारकचेच अनुकरण करू लागले आणि त्यांना बाजूला करण्यासाठी जनतेने लष्कराला पाठींबा दिला होता. आज तिथे सेनेचे राज्य आहे आणि तरीही लोकशाही मागणार्‍या जनतेने कायदा हाती घेतलेला नाही. कारण कायद्याच्या नावाने धुमाकुळ घालणार्‍यांच्या पाखंडाला लोक कंटाळले आहेत. राजधानी दिल्लीत नेहरू विद्यापीठातील काही वादांमुळे काहीशी तशीच स्थिती भारतात निर्माण होते आहे काय? न्यायालयातील वकीलही कायदा हाती घेऊ लागले आहेत आणि त्यांनी देशद्रोही घोषणा देणार्‍यांना चोपण्यापर्यंत मजल मारली आहे.
दिल्लीत कायदे विशारदांचा हा पवित्रा येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा आहे. सामान्य माणूस कायद्याविषयी अनभिज्ञ असतो. पण कायद्याचा विद्यार्थी मानला जाणारा वकील, कायद्याचे पावित्र्य जपायला कटीबद्ध असतो. असेच काही वकील हाणामारीच्या भूमिकेत आलेले असतील, तर ती बाब गंभीर आहे. कारण आजवर सामान्य माणसे कायदा हाती घेऊन दंगा करीत होती. कारण कायदा न्याय देत नाही असे त्यांना वाटले असेल. पण जेव्हा त्यांच्या बुद्धीला पटत नाही असे न्यायदान व कायद्याचे अर्थ लावले जातात, तेव्हा लोकांना कायदा निकामी वाटू लागतो. तिथे स्वसंरक्षणार्थ हालचाल करणे ही स्वाभाविक मानवी वृत्ती असते. दंगल ही त्यातून उदभवते. कोर्टात कोणी वकील वंदे मातरम घोषणा देतो, तेव्हा त्याला नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांनी कमालीचे विचलीत केले आहे, याची साक्ष मिळत असते. ज्याप्रकारे याकुब मेमनला वाचवण्यासाठी काही वकील बुद्धीमंतांनी शब्दांची कसरत केलेली आहे, त्यामुळे सामान्य माणूस किती विचलीत व भयभीत झाला आहे, त्याचे प्रतिबिंब आता वकीली व्यवसायातही डोकावू लागले आहे. मागल्या आठवडाभर देशद्रोही घोषणा देण्यावरून प्रचंड चर्चा उहापोह झाला. पण अजूनही कोणाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागलेले नाही. पोलिस व कायदा काहीही करू शकलेले नाहीत. मग लोकशाही किंवा अविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही चालू आहे, ते चालू द्यायचे काय? कायदा व शासन तोकडे पडत असेल, तर लोकांनी हालचाल करणे अपरिहार्य होऊन जाते. वकीलांनी अशा कुणाला केलेली मारहाण म्हणजे कायदा हाती घेतला ठरवणे, म्हणूनच मुर्खपणा आहे. कायद्याने स्थिती काबुत आणली, तर सामान्य माणसाला काही करायची गरज नसते. आठवडा उलटल्यावर काहीही होऊ शकलेले नाही, म्हणूनच लोकांचा धीर सुटला आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या आवारात वकीलांनी जो हिंसक पवित्रा घेतला, त्याचेच पदसाद उद्या अन्यत्र कुठेही उमटले तर नवल वाटण्याचे कारण नाही. कारण कायद्याने आपले बळ वापरून देशद्रोहाला लगाम लावून दाखवलेला नाही.
या देशात रहायचे. जनतेच्या पैशावर मजा मारायची. सोयीसुविधा वापरायच्या आणि त्याच देशाच्या विनाशाच्या गर्जना करायच्या, याला कायद्याच्या व्याख्येत भले देशद्रोह म्हटला गेलेला नसेल. पण सामान्य माणसाच्या बुद्धीनुसार तोच देशद्रोह असतो. जर त्या जनमानसाचे प्रतिबिंब कायद्यात व त्याच्या अंमलामध्ये पडणार नसेल, तर लोक अशा कायद्याला जुमानत नसतात. लोकांना तो कायदा निकामी व निरूपयोगी वाटू लागतो आणि आपल्या परीने लोक न्याय प्रस्थापित करू बघतात. कारण निवडणूका वा अन्य मार्गाने मिळालेली सत्ता, ही बंदूकीच्या बळावर राबवली जात नसते. तर लोकांच्या सदिच्छांवर सत्ता चालत असते, टिकत असते. सत्ता आपल्या इच्छाआकांक्षांचे प्रतिनिधीत्व करीत नाही असे दिसू लागले, मग लोक सत्ता बदलण्याचे उपाय शोधू लागतात. सर्वप्रथम मतदान हा मार्ग होता आणि त्यानुसार सत्तापालट झालेला आहे. पण लोकांनी ज्याच्या हाती सत्ता दिली त्याला राज्य करू दिले जाणार नसेल, तर झक मारली लोकशाही, अशा निष्कर्षाप्रत लोक येऊ लागतात. मागल्या वर्षभरात जी निदर्शने, संप वा संसद रोखण्याचे उद्योग चालू आहेत, त्यातून सामान्य लोकांच्या भावना व कौल पायदळी तुडवला गेला आहे. त्यावर कडी म्हणजे देशद्रोही घोषणा होतात आणि त्यालाही कायदा मान्यता देतो असा दावा होत असेल, तर कायद्याची महत्ता शिल्लक उरत नाही. देश, समाज व त्याचे भवितव्य यांच्या सुरक्षेसाठी कायदा असतो. त्याला सुरूंग लावण्याला रोखण्यासाठीच कायदा असतो. पण इथे कायदा त्याच सुरक्षेला सुरुंग लावण्याला संरक्षण देताना दिसत आहे. तसाच बुद्धीवाद व युक्तीवाद चालू आहे. त्यापुढे पोलिस व सरकार हतबल झालेले दिसत आहे. मग काश्मिरचा जिहाद व हिंसाचार आपल्या घरापर्यंत येण्याची प्रतिक्षा लोकांनी करावी, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? असायला हरकत नाही. पण सामान्य माणसाचा संयम त्यातून सुटत चालला आहे. म्हणून कायदा हाती घेण्याचे प्रकार वाढत आहेत. देशद्रोही वाटेल ते करतात, त्याला कायदा पायबंद घालणार नसेल, तर कायदा हवा कोणाला?
देशद्रोहाची व्याख्या कायदेपंडित वा बुद्धीमंतांनी करावी आणि सामान्य माणसाने आपल्या विवेकबुद्धीला गुंडाळून मान्य करावी, अशा भ्रमात ज्यांना जगायचे असेल त्यांनी खुशाल जगावे. पण सामान्य माणूस तितका बुद्दू नाही. म्हणूनच मागला आठवडाभर जे काही पुरोगामी सेक्युलर पांडित्य ऐकवले जात आहे, तो वास्तवात अतिरेक आहे. त्यातून लोकांचा संयम संपत चालला आहे. तसे नसते तर वकीलांनी कोर्टाच्या आवारातच कायदा हाती घेतला नसता. ज्यांच्या हाती कायदा सोपवला आहे व राज्य करायला कारभारी नेमले आहे, त्यांनी काम चोख बजावले पाहिजे. त्याच्या पलिकडे जाऊन कोणी अर्थाचे अनर्थ करून बुद्धीवाद नावाचे नाटक करीत असेल, तर त्याची बुद्धी ठिकाणी लावण्याची जबाबदारी सामान्य जनतेला म्हणजे जमावाला उचलावी लागते. ती वस्तुस्थिती विचारवंतांना कितीही अमान्य असली, तरी तोच जगाचा मानवी इतिहास आहे. मग कुठे भांडवलशाही असो की कम्युनिस्ट समाजवादी सत्ता असोत. शब्दांचे खेळ करून दिशाभूल करणार्‍या सर्वांना सामान्य माणसांच्या जमावाने नेस्तनाबूत केले आहे. एका मर्यादेपर्यंत सामान्य माणूस पाखंड सहन करतो वा तिकडे दुर्लक्ष करतो. पण त्याचा असह्य अतिरेक झाल्यावर कायदा हाती घेतो आणि आपणच न्यायनिवाडा करू लागतो. लोकशाही पुरोगामीत्व किंवा डाव्या विचारसरणीच्या नावाने जो काही अतिरेक चालू आहे, त्याचा निवाडा मतदानाने होऊ शकणार नसेल, तर लोकच रस्त्यावर येऊन निवाडा करतील. तेव्हा मोदीही कुणाला वाचवू शकणार नाहीत. शंभर अपराध पुर्ण होईपर्यंत भगवंत प्रतिक्षा करतो, तो देव नव्हेतर सामान्य अडाणी जनता असते. हे बुद्धीमान लोकांनी लक्षात घेतलेले बरे. अन्यथा सोशिक भारतीयांनाही रौद्ररूप धारण करावे लागेल. किंबहूना तिकडेच वाटचाल होते आहे. कायद्याच्या शब्दातून व त्याच्या पोरकट अन्वयातून शहाणे जितक्या लौकर बाहेर पडतील, तितके त्यांच्यासाठी बरे असेल. कारण लोकांच्या संयमाच्या मर्यादा कधीच ओलांडल्या गेल्या आहेत. वकील पेशातील मंडळी हाणामारी करीत असतील, तर सामान्य जमाव काय करील?

Friday, February 19, 2016

आयडिया ऑफ़ इंडीयाचे थोतांड

गुरूवारी विविध राष्ट्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एकमुखी निर्णय घेतला की प्रत्येक संस्थेच्या आवारात उंचावर भव्य तिरंगा कायम फ़डकता ठेवायचा व उभारायचा. त्याची सुरूवात नेहरू विद्यापीठातून करावी. तात्काळ त्यावर सेक्युलर आक्षेप सुरू झाले. विद्यापीठात मोक्याच्या जागी ठळकपणे तिरंगा लावण्याने समाजात दुफ़ळी व धृवीकरण होईल, अशी भिती पुरोगाम्यांना वाटल्याचे मतप्रदर्शन सुरू झाले. त्याचा अनेकांना धक्का बसला. कारण अजून आपण नेमके पुरोगामी असणे म्हणजे काय तेच समजून घेतलेले नाही. राष्ट्रध्वजामुळे देशाची एकात्मता धोक्यात येण्याची ही ‘आयडिया’ कुठून जन्माला आलीय?
याची सुरूवात दोन अडीच वर्षापुर्वीच झालेली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याच्याही आधीपासून त्याचे वेध लागलेले होते. म्हणूनच भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वालाही खबर नव्हती, तेव्हापासून विरोधकांनीच मोदींच्या पंतप्रधान पदाला विरोध सुरू केलेला होता. भाजपातही कोणी मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे बोलतही नव्हता, तेव्हा कडव्या कट्टर मोदी विरोधकांनी त्याची नांदी केली होती. कारण स्पष्ट आहे, विविध मतचाचण्या घेतल्या जात असतात आणि त्याचा तपशील सर्वात आधी माध्यमाच्या मुखंडांना मिळत असतो. २०११ पासून युपीए सरकारची लोकप्रियता ढासळू लागली, तेव्हापासून मोदी या माणसाकडे लोकमत झुकत असल्याचा पहिला सुगावा माध्यमांना अशा चाचण्यांमधून लागला होता. मग त्याच माध्यमाच्या म्होरक्यांनी भाजपाला डिवचून मोदी हा विषय बनवला होता. भाजपातले नेते मोदींच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेने विचलीत होते, त्याना अधिक अस्वस्थ करण्यासाठी नेमका तोच प्रश्न विचारून हैराण केले जात होते. उलट सेक्युलर पक्ष, त्यांचे नेते व प्रवक्ते भाजपाला मोदींना पुढे आणाच, म्हणून आव्हानही देवू लागले होते. मोदी उमेदवार झाले तर भाजपाचा बोजवारा उडालाच म्हणून समजा, अशा वल्गना माध्यमातून व विरोधकांकडून चालू होत्या. भाजपातही त्याच्या विरुद्ध युक्तीवाद करण्याची हिंमत कोणी दाखवत नव्हता. मात्र बहुतांश वरीष्ठ सेक्युलर पुरोगामी नेते व विचारवंतांना मोदी बाजी मारतील, याची पक्की खात्री होती. म्हणून ती वेळच येऊ द्यायची नसेल तर उमेदवारीच्या शर्यतीतच मोदींना बाद करण्याच्या डावपेचातून हा प्रकार २०११ साली सुरू झाला होता. जेव्हा त्याचा उपयोग झाला नाही, तेव्हा दुसरी सेक्युलर फ़ळी मैदानात आणली गेली. ज्यात अमर्त्य सेन, अनंतमुर्ति वा तत्सम राजकारणबाह्य चेहरे पुढे करण्यात आले होते. मोदी आल्यास विनाश होईल, देश सोडून पळून जावे लागेल, अशी भाषा तथाकथित नामवंत छुप्या सेक्युलरांनी सुरू केली तो एकूण रणनितीचाच भाग होता. इतके होऊनही डावपेच उलटत गेले आणि अखेरीस मोदींच्या हाती देशाची सुत्रे गेली.
म्हणूनच आज नेहरू विद्यापीठात वा अन्यत्र ज्या देशद्रोही वा अन्य घातपाती कारवाया उफ़ाळून आल्या आहेत, त्याची दिर्घकालीन पार्श्वभूमी तपसून बघणे भाग आहे. मोदी राजकारणात नव्हते आणि भाजपा राष्ट्रीय राजकारणात मोठा पक्षही नव्हता, तेव्हापासूनच्या प्रदिर्घ कारस्थानाचा आज दिसतो आहे, तो एक टप्पा आहे. त्यात तात्कालीन कारणे दिसत असली, तरी तो निव्वळ आभास आहे. भारत नावाचे राष्ट्र आपल्या मजबूत पायावर उभे राहिले, तर जगातल्या सर्व महाशक्तींना आव्हान ठरू शकेल, हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताला आपल्या पायावर उभे राहू द्यायचे नाही, यासाठी प्रयास सुरू झाले होते. शत्रू हा कधी उघड तर कधी छुप्या मार्गाने तुमचा घात करीत असतो. त्यातला छुपा मार्ग अतिशय सुरक्षित पण दिर्घकालीन असतो. ज्यामार्गे स्वकीयातच दुष्मन घरभेदी निर्माण करण्याची योजना असते. भारतासारख्या खंडप्राय देशाला दुबळा राखण्याची ही योजना तेव्हाच्या दोन महाशकतींनी आपापले हितसंबंध बघून योजलेली होती. त्यातला एक गट अमेरिकावादी तर दुसरा गट सोवियत कम्युनिस्टवादी होता. दोघांचे डावपेच भारताला परावलंबी राखण्याचे होते आणि त्यासाठी त्यांनी भारताला आतून पोखरण्याच्या विविध योजना कार्यक्रम आखलेले होते. दिसायला ते भारताच्या प्रगतीला चालना देणारी मदत असेच होते. पण वास्तवात बघितले, तर त्यातून अमेरिका वा सोवियत रशिया यांच्याशी निष्ठेने वागणारे हस्तक निर्माण करण्याचा घाट होता. सहाजिकच त्या स्पर्धेत देशी राजकारण व समाजकारण बाजूला राहिले आणि रशिया विरुद्ध अमेरिका अशा परकीय हस्तकांकडे देशातील सामाजिक नेतृत्वाची सुत्रे जात राहिली. त्यांच्यातच बौध्दिक व वैचारिक संघर्ष होत राहिले व त्यालाच बुद्धीवाद अशी मान्यता देण्याच्या मर्यादा घालण्यात आल्या. त्यामध्ये कुठेही अस्सल स्वदेशी तत्वज्ञान विचारांना स्थान रहाणार नाही, याची झकास काळजी घेतलेली होती. त्यामुळे भारतीयत्वाची लाज वाटणे हा एकूण बुद्धीजिवींच्या बुद्धीचा पाया बनवला गेला. भारतीय असण्यातला कमीपणा हा प्रतिष्ठेचा विषय बनवण्याच्या विषवल्लीचे परिणाम आज अनुभवायला मिळत आहेत.
दोन गटात विभागल्या गेलेल्या या परकीय हस्तक बनवण्याच्या योजना कार्यक्रमांना बौद्धिक वा सांस्कृतिक देवाणघेवाण असे भासवले जात होते. पण प्रत्यक्षात भारतीय बुद्धीमान तरूणांच्या मनात व मेंदूत आपल्याच वारसा किंवा संस्कृतीविषयी घृणा व न्युनगंड जोपासण्याचे काम त्यातून चालू झालेले होते. कुठलाही देश वा समाज आपली जीवनमूल्ये, नितीमूल्ये यांचा अभिमानावर उभा रहात असतो, किंवा त्यांच्याअभावी रसातळाला जात असतो. भारताचा स्वातंत्र्यलढा गांधीजींनी स्वदेशी अभिमानाच्या पायावर उभा केलेला होता. तीच जीवनमूल्ये खच्ची करण्याचे सांस्कृतिक कार्यक्रम पुढे नेहरूंनी आधुनिक भारत उभारण्याच्या नावाने राबवलेले दिसतील. त्यातून मग वास्तव भारत ही संकल्पना गायब झाली आणि ‘आयडिया ऑफ़ इंडीया’ हा परवलीचा शब्द झाला. आपण आज तमाम चर्चा परिसंवादात हाच शब्द सातत्याने ऐकत असतो. वास्तविक भारत, त्याच्या समस्या किंवा प्रश्न यावर चर्चा होत नाही. तर ‘आयडिया ऑफ़ इंडीया’चे काय होणार, याविषयी आवेशपुर्ण चर्चा होत असतात. जे वास्तवात आहे त्याचे नाव भारत नावाचा देश आहे. त्याची आयडिया म्हणजे काय? तर कल्पना! असलेला भारत निकालात काढायचा आणि त्यापेक्षा भलताच भारत उभा करायचा म्हणजे, आयडीया ऑफ़ इंडीया! तो उभा करायचा असेल, तर मुळात भारत म्हणून जी काही ओळख आहे, ती साफ़ उध्वस्त टाकली पाहिजे. कुठल्याही समाजाची ओळख म्हणजे त्या लोकसमुहाच्या अभिमानास्पद अशा सामुहिक आठवणी व स्मृती असतात. त्याच लज्जास्पद असल्याचे सतत बोलत व मनावर बिंबवत राहिले, मग त्याचा तिटकारा येऊ लागतो आणि त्यापेक्षा वेगळ्या अभिमानाची काल्पनिक प्रतिके असा स्मृतीभ्रंश झालेला माणुस शोधू लागतो, स्विकारू लागतो. आज विविध विद्यापीठात बुद्धीमान हुशार मुलांना वंदेमातरम वा भारतमाताची जय अशा घोषणा घातक वाटतात. कारण त्यातला अभिमानच त्यांना लज्जास्पद वाटतो आहे. तसे त्यांना वाटण्याचे संस्कार मागल्या सहा दशकात पद्धतशीररित्या केलेले आहेत. वास्तव भारतापेक्षा त्यांना ‘आय़डिया’ आपली वाटू लागल्याचा तो परिणाम आहे.
सोवियत कम्युनिस्टांचे इथले बगलबच्चे व अमेरिकन हेरखात्याच्या पैशावर संस्थांवर पोसलेल्या विविध भारतीय बुद्धीमंतांनी हा चमत्कार घडवून आणलेला आहे. आज पुरोगामी, उदारमतवादी, सेक्युलर किंवा डावे म्हणून आपण ज्यांना एकवटलेले बघतो. ते मुळात एकाच विचारसरणीचे एकजीव घटक नाहीत. ते मूलत: दोन विभीन्न विचारसरणीचे, पण पक्के भारतद्वेष्ट्या गटातले आहेत. अमेरिका व सोवियत युनियन यांच्यातल्या वैरापायी हे त्यांचे हस्तक दिर्घकाळ भारतामध्ये एकमेकांच्या उरावर बसल्यासारखे खेळत होते. पण १९९० च्या सुमारास सोवियत साम्राज्य कोसळून पडले आणि त्यांच्या इथल्या पित्त्यांना कोणी वाली राहिला नाही, तरी त्यांच्या अंगी भिनलेला भारतद्वेष संपला नव्हता. म्हणूनच अशा जुन्या सोवियतनिष्ठ कम्युनिस्टांनी अमेरिकन भारतद्वेषी गोटात आश्रय शोधला. त्यामुळे आज हे सगळे एकत्र दिसतात. कारण परस्पर विरोधी असले तरी त्यांचे उद्दीष्ट एकच व समान आहे. फ़ोर्ड फ़ौंडेशन, रॉकफ़ेलर फ़ौंडेशन अशा नावाखाली अमेरिकन हेरखात्याने अशा भारतद्वेषाची पेरणी इथे केली, तर त्यांना शह देण्यासाठी सोवियत सत्ताधारी इथल्या डाव्या विचारांच्या लोकांना वापरत राहिले. तेव्हा त्यांच्यात कडाक्याची भांडणे होती आणि सोवियत हस्तकांच्या विरोधात इथले समाजवादी ‘राष्ट्रवादी’ (आजची संघाची, भाजपाची) भाषा बोलत होते. आता दोघे एकत्र येऊन समान भारतद्वेषी भूमिका मांडत आहेत. त्यामागे हिंदूत्वाचा वा धर्माचा विरोध अजिबात नाही. कारण हिंदूराष्ट्र कधीच होऊ शकणार नाही आणि हिंदू समाजच त्याचे राजकारण करणार नाही, हे अशा पुरोगाम्यांना पक्के ठाऊक आहे. मात्र राष्ट्र या संकल्पनेसाठी हिंदू समाज सर्वस्व पणाला लावू शकतो, हे त्यांना माहिती आहे. म्हणून आता हिंदूत्वापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद यांची खिल्ली उडवण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. हे सर्व अचानक झालेले नाही. अमेरिकन व सोवियत पैशाने रुजवलेली व पोसलेली ही विषवल्ली आहे. तिचा इतिहास समजून घेतल्याखेरीज या दुखण्याचे रोगनिदान होऊ शकत नाही की, त्यावरचे उपाय उपचार करणेही शक्य नाही. पुढल्या काही लेखातून त्याचे पोस्टमार्टेम म्हणूनच करावे लागणार आहे.

पोटनिवडणूकीच्या निकालांचे संकेत

नुकत्याच विविध राज्यात बारा जागी विधानसभा पोटनिवडणूका पार पडल्या. त्यात कर्नाटक, बिहार व उत्तर प्रदेशचे निकाल मोलाचे मानावे लागतील. कारण बिहारमध्ये अलिकडेच भाजपाचा दारूण पराभव करून नितीश कुमारप्राणित आघाडीने मोठे यश मिळवले होते. तिथे एकच जागी मतदान झाले आणि त्यामध्ये भाजपाप्रणित उमेदवाराचा दणदणित विजय झाला. याला नितीशच्या लालूप्रेमाची किंमत म्हणता येईल. कारण नितीश मुख्यमंत्री असले, तरी बिहारमध्ये पुन्हा लालूंचे जंगलराज येऊ लागल्याच्या बातम्या सतत झळकत असतात. त्याला वेळीच लगाम लावा असा इशारा या मतदानातून मिळाला असे म्हणता येईल. पण म्हणून तो भाजपाला मिळालेला कौल असे म्हणता येणार नाही. कारण नजिकच्या काळात तिथे कुठल्या मोठ्या निवडणूका नाहीत. मात्र कर्नाटक व उत्तरप्रदेश या दोन राज्यांची कहाणी वेगळी आहे. तिथे काही महिन्यात विधानसभांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यासाठीचे संकेत ताज्या निकालात शोधता येतील. यात उत्तरप्रदेशच्या तीन जागा व कर्नाटकच्या दोन जागा आहेत. कर्नाटकातील दोन्ही जागा भाजपाने जिंकल्या आहेत आणि म्हणूनच आगामी काळात भाजपासाठी तो शुभसंकेत म्हणता येईल. कारण मागल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने आपसातल्या बेबनावामुळे या राज्यातील आपली सत्ता गमावली होती. तितकेच नाही तर भाजपा तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला होता. कॉग्रेसने मोठे यश मिळवले तरी ते पक्षाचे वा कुणा नेत्याचे यश नव्हते. भाजपाच्या आत्महत्येचा लाभ म्हणून कॉग्रेस निर्णायक बहूमतासह सत्ता मिळवू शकली. त्याची प्रचिती दोनच वर्षात लोकसभा मतदानातून आली. पक्षातून बाहेर पडलेले व मतांची दुफ़ळी माजवणारे नेते येदीयुरप्पा, यांना भाजपात परत आणल्यावर लोकसभेतील कर्नाटकातल्या बहुतांश जागा भाजपाने सहज जिंकल्या होत्या. खरे तर तोच कॉग्रेससाठी इशारा होता. पण त्यासाठी काहीही केले नाही, त्याची किंमत कॉग्रेसला पोटनिवडणूकीत मोजावी लागली आहे. याचा सरळ अर्थ इतकाच, की भाजपाने शहाणपण राखले तर कर्नाटक कॉग्रेसच्या हातून निसटणार हे निश्चीत!
कर्नाटक कॉग्रेससाठी अतिशय महत्वाचे राज्य आहे. कारण मोठे वा मध्यम म्हणावे अशी तीन राज्ये अजून कॉग्रेसच्या हाती आहेत. आसाम, केरळ व कर्नाटक अशी त्यांची नावे आहेत. त्यात लोकसभेतील प्रतिनिधीत्वानुसार कर्नाटक मोठे राज्य आहे. म्हणूनच तिथली सत्ता टिकवण्याला प्राधान्य असायला हवे. कॉग्रेस त्या दिशेने काहीही करताना दिसलेली नाही. दुसरीकडे देवेगौडा थकलेले असून त्यांच्या पुत्रामध्ये पक्ष पुढे घेऊन जाण्याची किमया नाही. म्हणूनच कर्नाटकात भाजपासाठी मैदान साफ़ असल्याचा संकेत ताज्या निकालांनी दिला आहे. त्यात भाजपाला एकच शक्ती पराभूत करू शकते, ती म्हणजे पक्षांतर्गत भाऊबंदकी! ती होऊ दिली नाही, तर भाजपाला वर्षभरात आणखी एक राज्य पादाक्रांत केल्याचा पराक्रम गाजवता येऊ शकेल. त्यासाठी विनाअट येदीयुरप्पा यांच्यासारख्या दांडग्या नेत्याच्या हाती राज्यातील पक्षाची सुत्रे सोपवली पाहिजेत. बाकी त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप किती, याला महत्व नसते. वीरभद्र सिंग नावाच्या हिमाचली नेत्याला मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने मंत्रीपदावरून काढून टाकले होते. पण पक्षाने त्यांच्यावर हिमाचलच्या निवडणूकीची जबाबदारी टाकली. प्रचारातही सिंग यांच्यावर खुप चिखलफ़ेक झाली. तरीही कॉग्रेस सत्तेत येऊ शकली आणि तेच तिथले मुख्यमंत्री झाले. तेच कर्नाटकात भाजपा तेव्हाही करू शकला असता. पण माध्यमातून काळवंडलेली येदीयुरप्पा यांची प्रतिमा विचारात घेऊन भाजपाने तिथे आत्महत्या केली आणि कॉग्रेसचे काम सोपे करून दिले होते. लोकसभेत ती चुक सुधारल्याचा लाभ मिळाला. तोच पुढल्या विधानसभेत मिळवण्यासाठी आतापासून येदीयुरप्पा यांना नेतृत्व सोपवणे लाभदायक ठरू शकेल. माध्यमांचा वा पत्रकारी विश्लेषणांचा आता वास्तविक जनमानसाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. म्हणूनच आगामी विधानसभांवर डोळा ठेवून राजकारण करताना, भाजपाला काही ठोस निर्णय विनाविलंब घ्यावे लागतील. त्यातला एक येदीयुरप्पा यांच्यावर कर्नाटक सोपवण्याचा आणि उत्तरप्रदेशात पुन्हा राजनाथसिंग यांना आणण्याचा!
देशाची सत्ता हाती आली ती टिकवायची असेल, तर भाजपाला उत्तरप्रदेशची सत्ता मिळवणे अगत्याचे आहे. पण ज्याप्रकारे गेल्या दीड वर्षातील विधानसभांची रणनिती भाजपाने आखली, ती आत्मघातकी आहे. कुठेही मुख्यमंत्र्याचा चेहरा न दाखवता लढलेल्या त्याच निवडणूकांनी मोदीलाट ओसरण्याला चालना दिली. महाराष्ट्र व झारखंडात सत्ता मिळाली, तरी कुणाच्या तरी कुबड्या घ्याव्या लागल्या. दिल्ली व बिहारमध्ये तर नामूष्कीचा पराभव बघावा लागला. कारण मोदी नावावर सत्ता मिळवण्याचा हास्यास्पद डाव! मोदी आजही देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत. पण इंदिराजींच्या शब्दावर किंवा नावावर मते मिळायची, तशी प्रतिमा अजून लाभलेली नाही. म्हणूनच राज्यातील नेते उभे करण्याला भाजपाने प्राधान्य द्यावे लागेल. जे अडवाणी वाजपेयी यांनी उमा भारती, वसुंधरा राजे, शिवराज सिंग चौहान वा येदीयुरप्पा यांच्या रुपाने उभे केले होते. ती चाकोरी अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून सोडून देण्यात आली आणि प्रादेशिक पक्ष व नेत्यांकडून भाजपाला मार खावा लागला आहे. दिल्लीत केजरीवाल आणि बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या तोडीचा नेता नसल्याने भाजपाचा बोर्‍या वाजला. नेमकी तीच स्थिती आज उत्तरप्रदेश भाजपाची आहे. तिथे मतदान बारा महिन्यांवर येऊन ठेपले आहे आणि पक्षाला प्रादेशिक चेहरा असलेला नेता पुढे आणता आलेला नाही. भाजपाची शक्ती प्रादेशिक नेत्यांमधून उभी राहिली आणि त्यावर स्वार होऊनच मोदी पंतप्रधान पदापर्यंत मजल मारू शकले. पण अमित शहांच्या कालखंडात त्यालाच तिलंजली देण्यात आली आणि सोनिया इंदिराजींच्या शैलीने दिल्लीतून पक्ष हाकण्याची हडेलहप्पी सुरू झाली. उत्तरप्रदेशमध्ये तसे चालणार नाही. कारण मायावती व मुलायम यांच्या तोडीचा कुठलाही प्रादेशिक नेता भाजपापाशी नाही. कल्याणसिंग राज्यपाल होऊन गेलेत आणि राजनाथसिंग गृहमंत्री बनुन बसलेत. यात राजनाथसिंग तुल्यबळ नेता म्हणता येईल. म्हणूनच आतापासून स्पर्धेत त्यांना आणणे भाग आहे. त्यासाठी पोषक निकाल पोटनिवडणूकीने दिले आहेत. त्याची दखल घेतली गेली तर उपयोग आहे.
समाजवादी पक्षाच्याच तीन आमदारांच्या रिक्त झालेल्या जागी हे मतदान झाले आणि त्यात फ़क्त एक जागा त्या पक्षाला राखता आली. म्हणजेच मुलायमच्या विरोधात लोकमत जात असल्याचा हा कौल आहे. काही महिन्यापुर्वी स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यात मायावतींनी मतांच्या टक्केवारीत प्रथम क्रमांक पटकावला होता. पण कटाक्षाने त्या पोटनिवडणूकीपासून दूर राहिल्या. म्हणूनच तीनपैकी एकेक जागा भाजपा व कॉग्रेसला सहज मिळू शकली. यावर पुढील विधानसभेच्या अंदाज बांधणे अवघड आहे. पण मुझफ़्फ़रनगर ही भाजपाने मारलेली बाजी आहे, तर देवबंद या मुस्लिमबहुल जागी कॉग्रेसचे यश मुलायमकडून मुस्लिम मते निसटत असल्याचा इशारा आहे. मुलायमची सत्ता जाणार यात शंका नाही. पण म्हणून भाजपाचे काम सोपे नाही. मायावती मध्ये उभ्या आहेत. तेव्हा त्यांच्याशी टक्कर देवू शकणारे व्यक्तीमत्व नेता म्हणून पुढे करावे लागेल. ते नरेंद्र मोदी नाही. कारण मोदी मुख्यमंत्री व्हायला तिथे येणार नाहीत. पण राजनाथ येऊ शकतात. यापुर्वीही मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवले आहे. म्हणूनच आतापासून त्यांचा चेहरा पुढे करणे भाजपाला लाभदायक ठरू शकेल. तो चेहरा बघूनच मायावती व मुलायम यांना आपली रणनिती आखावी लागेल. त्या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि राजनाथ यांच्यावर नाहीत, ही जमेची बाजू आहे. अधिक राजनाथ कट्टरपंथी वा आगखावू बोलणारे नाहीत. मात्र तशी प्रतिमा जनमानसात काही महिने ठसवण्याचा प्रयास आवश्यक आहे. त्यात विलंब केला तर दिल्ली वा बिहारची पुनरावृती उत्तरप्रदेशात होऊ शकेल. देशातील वातावरण व पोटनिवडणूकीतील कौल बघितला, तर भाजपाला वर्षभरात चाखलेल्या पराभवावर मात करण्याची अपुर्व संधी आहे. सवाल योग्य पावले उचलून कामाला लागण्याचा आहे. इतर पक्षातले नेते फ़ोडण्याच्या रणनितीपेक्षा आपली संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्याचा बळावर लढाई जिंकण्याचे मनसुबे आवश्यक आहेत. बघू किती ‘शहा’णपणा दाखवला जातो. पण पोटनिवडणूकीचे निकाल कॉग्रेसला संजीवनी देणारे नाहीत हे नक्की!