Friday, April 26, 2019

मशागत ‘सामना’ची, पीक मनसे घेतेय

Image result for raj thackeray

सध्या राज ठाकरे यांच्या सभा खुप गाजत आहेत. भाजपा शिवसेना किंवा कॉग्रेस राष्ट्रवादी सुद्धा सभा घेत असले, तरी गाजावाजा राजच्याच सभेचा आहे. त्यांचा मनसे हा पक्ष राजकीय निवडणूकीच्या रिंगणात उतरलेला नाही. पण त्यांच्या सभा गाजत आहेत किंवा जाणिवपुर्वक गाजवल्या जात असतील. पण तो मुद्दा नाहीच. आपला उमेदवार नसताना आणि कुठल्याही पक्षाला स्पष्ट पाठींबा देत नसताना राज ठाकरे या सभांमधून काय साध्य करू इच्छीत असतील? अनेकांना हाच प्रश्न सतावतो आहे. मागल्या लोकसभेत बिनबुलाया मेहमान म्हणून अशाच परस्पर प्रचारात राज ठाकरे मोदींचे वारेमाप कौतुक करीत होते आणि त्यावेळी गुजरातच्या विकासाने ते भारावून गेलेले होते. आज नेमकी उलटी स्थिती आहे. तेव्हा आपली फ़सगत झाली वा मोदींनी विकासाचा भुलभुलय्या करून आपली दिशाभूल केली, असा राजचा आजचा दावा आहे. मग ती दिशाभूल कशी झाली वा होऊ शकली,? त्याचाही खुलासा व्हायला नको काय? कारण आणखी पाच वर्षांनी हेच राज ठाकरे नव्याने उलटी भाषा करून २०१९ सालात आपली राहुल-पवारांमुळे फ़सगत झाल्याचेही सांगू शकतील. त्यामुळे पुर्वी दिशाभूल कशी झाली व आज आपण छातीठोकपणे सांगत असलेले सत्य असल्याचा निर्विवाद पुरावा द्यायला हवा. पुलवामामध्ये आरडीएक्स आले कुठून? त्याचा पुरावा पंतप्रधानांकडे मागणार्‍याने आपली पाच वर्षापुर्वीची फ़सगत कशी झाली, त्याचाही पुरावा देणे हे कर्तव्यच नाही काय? पण सभा गाजत असताना असल्या शंका घेतल्या जात नाहीत की प्रश्न विचारले जात नाहीत. ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हटले की मजा येत असते. पण पाच वर्षापुर्वी असेच व्हिडीओ बघून राज यांची गुजरातमध्ये फ़सगत झालेली असेल तर? असे खुप प्रश्न विचारता येतील. पण तो मुद्दा दुय्यम आहे. आज राजना काय साधायचे आहे, त्याला महत्व आहे. त्यांच्या सभांना लोटणारी गर्दी कुठली आहे? कोणी जमवलेली आहे?

अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यापुर्वी अकस्मात राज ठाकरे अशा उलट्या भूमिकेत कधीपासून आले, ते बघायला हवे. मागल्या लोकसभा विधानसभा निवडणूकांमध्ये पक्षाचा धुव्वा उडाल्यापासून त्यांनी राजकीय बाबतीत फ़ारशा हालचाली केल्या नव्हत्या. अगदी महापालिका वा अन्य स्थानिक निवडणूकांपासूनही मनसे व राज ठाकरे दुरच राहिले. दरम्यान त्यांचे आरंभीचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. काही शिवसेनेत परतले तर काही भाजपाच्या वळचणीला गेले. सोशल मीडियाच्या भाषेतच बोलायचे तर राज ठाकरेंनी राजकारणातला आपले आपले खाते जणू ‘डीएक्टीव्हेट’ करून ठेवलेले होते. ते अकस्मात पुन्हा कार्यरत कधी झाले? किरकोळ काही पत्रके वा व्यंगचित्रे त्यांनी काढली. भाजपा विरोधी बोलायला सुरूवात केली ती नोटाबंदीनंतरच्या काळात. अशा वेळी मग त्यांचे किती पैसे बुडाले, असले शेलके आरोप होतातच. त्यात फ़ारसा अर्थ नसतो. पण शरद पवार यांची पुण्यात मुलाखत घेतल्यापासून हळुहळू राज ठाकरे यांचा पवित्रा बदलत गेला. तेव्हाही हे दोघे जवळ येण्याविषयी चर्चा झाल्या होत्या. पण फ़ारसे काही झाले नाही. मात्र राज यांचे शब्द व व्यंगचित्रे मोदींना लक्ष्य करू लागलेली होती. पण जोवर शिवसेना व ‘सामना’ भाजपावर जोरदार तोफ़ा डागत होता, तोपर्यंत राज ठाकरेंनी खुलेआम मैदानात उतरण्याचे कटाक्षाने टाळलेले होते. पत्रके, विधाने व व्यंगचित्रातून त्यांनी मोदीविरोधी आघाडी चालवली होती. त्यातून भाजपाचे अनेक समर्थक विचलीत झालेले होते. पण खुल्या मैदानात मोदींशी लढायचे काम शिवसेना करीत होती आणि राज ठाकरे पॅव्हेलियनमध्ये बसून ‘सामना’ बघत होते. अगदी लोकसभेत मोदींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला, तेव्हाही राज मैदानात नव्हते आणि शिवसेना खेळपट्टीवर होती. लोकसभेचे हाकारे सुरू झाले आणि अमित शहा मातोश्रीवर पोहोचल्यानंतर चित्र झपाट्याने बदलत गेलेले आहे.

मागल्या साडेचार वर्षात राज्यात विरोधी पक्षच नव्हता. विधानसभेच्या विरोधी बाकावर कॉग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष व त्यांचे अमदार बसलेले होते. पण बाहेर राजकीय आखाड्यात शिवसेनाच भाजपा विरोधातला ‘सामना’ लढवत होती. ते चित्र शहांच्या मातोश्री भेटीने बदलले आणि एकप्रकारे शिवसेनेची ‘विकेट’ पडली. अखेरची षटके सुरू होतात तेव्हा हाणामारी करणारा फ़लंदाज मैदानात धाडला जातो. तसे मग राज ठाकरे बॅट घेऊन मैदानात आले. शरद पवार क्रिकेटच्या प्रशासनातले मातब्बर आहेत आणि कधी कुठला खेळाडू पुढे करायचा, हे त्यांना अधिक कळते. आधीच्या फ़लंदाजांनी डाव स्थीरस्थावर करावा आणि चांगली धावसंख्या उभारली, की नंतर येणार्‍या फ़लंदाजाला आडवी बॅट करून कशीही फ़टकेबाजी करण्याची चैन परवडत असते. विकेट झटपट गेली तरी त्याला फ़िकीर नसते. काहीशा तशाच अवस्थेत राज ठाकरे लोकसभा प्रचाराच्या आखाड्यात आलेले आहेत. त्यांनी मागल्या पाच वर्षात गमावलेला मतदार व जनमानसातील पाठींबा, नव्याने मिळवण्यासाठी याच्याइतकी उत्तम संधी केव्हा शक्य होती? त्यांच्यासाठी शिवसेनेने व ‘सामना’ने मागल्या चार वर्षात इतकी मशागत करून ठेवलेली आहे, की फ़क्त पीक कापून न्यायचे एवढेच काम शिल्लक होते. सत्तेत सहभागी होऊन आणि तरीही विरोधकांपेक्षाही भाजपा व मोदींशी वैर पत्करून; शिवसेनेने केलेली मेहनत तशीच वाया गेलेली नाही. त्यातून सेनेतला एक वर्ग, तिचा काही चहाता वर्ग, मोदी व भाजपाचा कट्टर वैरी होऊन गेलेला आहे. त्याला अखेरच्या क्षणी झालेले जागावाटप व युती कितपत भावलेली आहे? नेत्यांमध्ये दिलजमाई होते, पण आपल्या गल्ली गावात एकमेकांशी उभे राहिलेले हेवेदावे त्या युतीने संपत नसतात. मिटतही नसतात. अशा शिवसेनेचा काही पाठीराखा आज सुद्धा भाजपा व मोदींना दुष्मनच मानतो आणि त्याला उद्धव ठाकरे यांचा युतीचा निर्णय तितका मानवलेला नाही. त्यांनी मग काय करावे?

मुळातच मनसे हा पक्ष शिवसेनेतून फ़ुटून निघालेला गट आहे आणि मागल्या पाच वर्षात त्याचे अवसान गळून गेलेले होते. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत १८ खासदार निवडून आणले/ पुढे युती तुटल्यावरही स्वबळावर सेनेचे ६३ आमदार विधानसभेत आले होते. मग सत्तेत सहभागी होऊन त्यांनी हे दुहेरी राजकारण केले. त्यातून शिवसैनिक व सेना समर्थकांमध्ये गोंधळ माजलेला होता व आहे. त्या गोंधळाला खतपाणी घालंण्याचे महत्वपुर्ण काम त्याच पक्षाच्या ‘सामना’ दैनिकाने पार पाडलेले आहे. मोदी व भाजपाला अन्य खर्‍याखुर्‍या विरोधी पक्षाने लक्ष्य केले नसेल तितके उद्धव आणि सामनाने रोज उठून  केलेले काम आहे. सहाजिकच कसलेही राजकीय स्वार्थ नसलेला शिवसैनिक व समर्थक मनाने दुखावलेले होते आणि म्हणूनच अशा वर्गाला ऐनवेळी झालेली युती पटली असेल, असे अजिबात नाही. त्याच्या मनात मोदी वा भाजपा विरोधातील विष पेरण्याचे काम चार वर्षे ‘सामना’तून इमानेइतबारे पार पडलेले आहे. ती पेरणी अजिबातच वाया गेली वा काहीच उगवले नाही; असे कोणी म्हणू शकत नाही. विस्कटलेली मनसे आणि दुखावलेला शिवसेना समर्थक; यांच्यात आता तोच एक सांधा बनल्यास नवल नाही. ज्या शिवसैना समर्थकाला आज झालेली युती मान्य नाही, त्याचा ओढा सहाजिकच राजच्या घणाघाती टिकेकडे जाऊ शकतो आणि जातही असेल. आज राज जी भषा बोलत आहेत किंवा जे टोकाचे आरोप करीत आहेत, त्याचे धागेदोरे मागल्या चार वर्षे प्रकाशित झालेल्या ‘सामना’तून सहज मिळू शकतात. राज ठाकरेंचा आरंभीचा रोख मोदींवर होता. हळुहळू तो शिवसेनेकडेही वळला आहे. यातून राजना काय साध्य करायचे आहे? ‘सामना’तून केलेल्या मशागतीचे आलेले पीक कापण्याचे काम राज ठाकरे आज करीत नाहीत काय? त्यातून आपला नवा मतदारसंघ राज उभारत नसतील काय? 


सूचना - ‘युती तुटल्यावरही स्वबळावर सेनेचे ६३ आमदार लोकसभेत आले होते’. अशी चुक उपरोक्त शेवटच्या परिच्छेदात होती. काही चोखंदळ मित्रांनी नजरेस आणून दिल्यावर दुरूस्त केली आहे. धन्यवाद

20 comments:

  1. सेनेचे ६३ आमदार *लोकसभेत* आले होते. A small correction required.. भाऊ

    ReplyDelete
  2. हा लेख उद्धव ठाक-यांनी वाचलांच पाहिजे

    ReplyDelete
  3. राजने मोदी-शहांविरूद्ध कितीही आदळआपट केली तरी मनसे हा मृत पक्ष पुन्हा जिवंत होणे अशक्य आहे.

    ReplyDelete
  4. सेनेचे ६३ आमदार लोकसभेत?

    ReplyDelete
  5. अगदी सटीक विश्लेषण आहे भाऊ, हे "राज"कारण त्यांनीच ओळखावे आणि करावे।
    LIVE TV च्या सर्वे नुसार भाजपला 150 पेक्षा कमी जागा मिळताना दिसतात, जरी हा सर्वे तंतोतंत नसला तरी जागा वाढल्या तरी अशा किती वाढणार आहेत? 200 पर्यंत जातील पण या 200 जागा म्हणजे भाजपचा त्रिफळा उडल्यात जमा आहे। भले काँग्रेसला बहुमत नसेल पण जे इतर पक्ष आहेत ते भाजपा पेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणे उचित समजतील। मागील शेवटच्या 3 वर्षाचा राजकीय घडामोडी पहिल्या तर खुद्द भाजपा मधले बडे बडे नेते मोदी शहा या जोडगोळीवर अतिशय नाराज असलेले दिसतात त्यामुळे इतर पक्षाच्या नेत्यांची मानसिकता मोदींना पाठिंबा देण्याची कधीच नसणार।
    थोडक्यात यावेळी भाजपला नामुष्की झेलावी लागणार आणि भविष्यात आपला अजेंडा बदलावा लागणार।
    23 मे नंतर आपला पहिला ब्लॉग "मोदींचा उदयास्त" या शीर्षकाखाली असेल अशी अपेक्षा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो।
    जय हिंद जय महाराष्ट्र।

    ReplyDelete
    Replies
    1. 150 जास्त सांगताय. 50 पण मिळणार नाहीत मोदींना

      Delete
    2. अहो ५० काय, ५-६ मिळाल्या तरी खूप आहेत. नाय म्हटलं कुठल्या ज्योतिषाकडे क्लास लावला होता ?

      Delete
  6. आदरणीय भाऊ सर आपण म्हणता त्या प्रमाणे पेंटर चे हे राजकीय डावपेच असतील ही, पण प्रश्न असा आहे की जेवढी गर्दी त्याच्या सभेला होते त्याचे रूपांतर मतात का होत नाही? मोदी द्वेषाचे नकारात्मक राजकारण करून राजकीय डावपेच साधायचे असेल तर त्या साठी संघटनात्मक पातळी वर काय करायचे आहे त्या वर ना नियोजन आहे ना प्रयोजन आहे
    मुळात भिती ही आहे की जर घसरत जाणार जनाधार रोखला नाही तर त्याच्या आणि त्याच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट उभे राहिल .दूसरे असे सभा घेऊन संघटन मजबूत करणे हे राजना जमत नाही कारण शिवसेना आजही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मनसे पाठीराख्यांचा आहे ज्यांना उद्देश्य आहे पण नियोजनबद्ध कार्यक्रमाचा अभाव आहे. दूसरे असे एकहाती राजकारण करून ते माणसे सांभाळू शकत नाही

    ReplyDelete
  7. Raj Thakre thyachi most awaited Maharashtra chi blue print kadhi denar ahe? Dev jane kuth print karayala dili ahe te, 2007 pasun vat baghat ahot amhi.

    ReplyDelete
  8. हा नचिकेत कोण आहे ?? साहेब आणि तो,दोघेही खोटे व्हिडिओ दाखवत आहेत. व्हाट्सएपवर आलेले बनावट मेसेज, व्हिडिओ खरे म्हणून दाखवतात . स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्तेच आणा रे त्यांना स्टेजवर म्हणून आणतात. साहेबांचा पप्पू होतोय .

    ReplyDelete
  9. *आधुनिक अंतू बर्वा..*

    मी: काय अंतूशेठ भाषणास गेला होतात का कालच्या?

    अंतू बर्वा: अख्खा महाराष्ट्रभर फिरला, नी सगळ्यात शेवटी नाशकात आलानीत, त्यास पक्के ठाऊक इथे त्याच्या भाषणाचेही कौतुक नाही नि त्याच्या एडिट केलेल्या व्हिडिओचे पण नाही.

    मी: म्हणजे तुम्ही भाषणास गेला होतात तर?

    अंतू बर्वा: गेलो बघायला, सांगतो हीsss तुडुंब गर्दी, मुंगीस शिरावयास जागा नाही.

    मी: बघा जोरदार प्रतिसाद आहे

    अंतू बर्वा: नसावयास काय झाले?फुकट ना ते?

    मी: मग? तुम्हाला मिळाली का जागा?

    अंतू बर्वा: छ्या, इतक्या गर्दीत जाणार कोण? मी आपलं घटकाभर छाप बाजूला करून बघितलं. तितकाच विरंगुळा.

    मी: कसं? वाटलं?

    अंतू बर्वा: पिचकावणी वाटलं, अरे कसल्या त्या नकला आणि कसलं ते बोलणं? वाजपेयींचं-बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं काय?

    मी: पिचकावणी म्हणता? मग इतकी गर्दी कशी? लोकं टाळ्या वाजवून डोक्यावर घेतात.

    अंतू बर्वा: गर्दी तर डमरू वाजीवणाऱ्या मदऱ्याभोवती देखील होते, म्हणजे लगेच त्याला शो मन की काय ते तुमचं मास पुलर वगैरे म्हणता का त्याला? नाही, नेता असेलही मोठा, पण लोकशाहीत मतं मिळाली, उमेदवार निवडून आले तर खरं! इथे स्वतःही उभं राहायचं नाही आणि असलेले सोडून जातात! पाण्याबाहेर राहून दुसऱ्यास पोहवायच्या गोष्टी सांगाव्यात कशाला? आणि ते टाळ्यांच म्हणशील तर पूर्वी त्या सावरकरांनाही मिळाल्या पण लोकांनी मत दिले नाही. जिथे सावरकरांचे तसे झाले तिथे बाकीच्यांची काय कथा? आणि हे तर सावरकरांना शिव्या घालणाऱ्यांना मत द्यायला सांगतात. इथे एक नगरपालिका नै सांभाळता आली त्यांनी देश चालवण्याच्या गोष्टी कराव्यात कशाला?

    मी: मग काय वाटतं अंतूशेठ? कोणाची सत्ता येणार? मोदी, राहुल की अजून कोणी?

    अंतू बर्वा: शेवटी जनता जनार्दन ठरवेल तेच होणार. आपण त्या केजरीवाल सारखं गावगांधी बनून कांदेवाडी ते धसवाडी - धसवाडी ते फणसवाडी, बोंबलत फिरून काय फायदा? आणि सत्तेचं म्हणशील तर सत्ता राहुलचीही नाही, ममताचीही नाही आणि पवारांचीही नाही सत्ता आहे त्या "काशी" विश्वेश्वराची!

    ReplyDelete
  10. राज ठाकरे हे खरे म्हणजे मोदी शहा विरोधात नसून फडणवीसांच्या विरोधात आहेत असे वाटते. विधानसभेच्या वेळी खरे पत्ते उघड होतील असे वाटते.

    ReplyDelete
  11. Raj Thakre thyachi most awaited Maharashtra chi blue print kadhi denar ahe? Dev jane kuth print karayala dili ahe te, 2007 pasun vat baghat ahot amhi.

    ReplyDelete
  12. गणित कुणालाही कुणाच्याही बाजूने मांडता येते. मोदी लाट ओसरली, अंडर करंट BJP विरूध्द आहे वगैरे वगैरे. २३ मे नंतर सर्वांनी निकालावर प्रतिक्रिया देणे. राहुल व सोनिया फॉर्म भरताना त्यांच्या बरोबर एकही विरोधी नेता नव्हता. का?

    ReplyDelete
  13. किती सकारात्मक विश्लेषण ?

    ReplyDelete
  14. निवडणूक न लढवता पीक कापलं असं कसं म्हणता येईल? फार तर पिकाला कुंपण घातलं आणि विधानसभेच्या निवडणुकीत पीक कापणार असे म्हणता येईल.

    ReplyDelete