Showing posts with label दहिसर. Show all posts
Showing posts with label दहिसर. Show all posts

Friday, July 24, 2015

चिदंबरम यांचे शब्द आठवावे भाजपावाल्यांनी



मागल्या आठवड्यात जे काही दहिसर प्रकरण घडले, त्यातले खरेखोटे काय, याचे खुलासे देण्यात भाजपावाले आपली शक्ती खर्ची घालत आहेत. त्यात गुजराती लोकांची मुंबईतील अरेरावी हा विषय अशा लोकांच्या डोक्यात शिरलेला दिसत नाही. या घटनेचा गवगवा झाल्यावर ज्या प्रतिक्रीया अनेक भागातून व प्रामुख्याने मराठी लोकात उमटल्या, त्याचा अर्थ समजून घेण्य़ाची गरज आहे. वास्तविक अशाच स्वरूपाची एक घटना (मिसबाह काद्री) दोन महिन्यांपुर्वी माध्यमांनी मुद्दाम हवा देवून गाजवण्याचा प्रयास केलेला होता. तुलनेने तितके महत्व दहिसरच्या बातमीला माध्यमांनी दिलेले नाही. पण उमटलेल्या प्रतिक्रीया गंभीर आहेत. कारण दहिसरची घटना नाममात्र आहे. खरे म्हणजे मागल्या वर्षभरात मुंबई परिसरातील गुजराती लोकांचे वागणे खटकण्यापर्यंत गेलेले होते. म्हणूनच त्या स्थानिक घटनेला इतके महत्व प्राप्त झाले. खरेखोटे वेगळे आणि त्याबाबतीत जनमानसात उमटणार्‍या प्रतिक्रीया वेगळ्या असतात. त्याला पुर्वग्रह कारणीभूत असतात. समजा दहिसरची घटना जशी कथन झाली अथवा भासवली गेली, तशी नसेल. पण त्या संदर्भाने उमटलेल्या प्रतिक्रीया खोट्या म्हणायच्या काय? दाट वस्तीच्या गुजराती भागात ज्या पद्धतीने आगावूपणा चालतो, त्यातून त्या प्रतिक्रीया उमटलेल्या आहेत. मराठी वा बिगरगुजराती मनातली धुसफ़ूस त्या निमीत्ताने उफ़ाळून बाहेर आली. तसे शेकडो व हजारो बिगरगुजराती अनुभव नसते, अर तितक्या प्रखर व उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया उमटल्याही नसत्या. पण त्या उमटल्या, याचा अर्थच मुंबई परिसरातील गुजराती लोकांची वागणूक जाचक झालेली आहे. त्याबाबतची नाराजी बाहेर पडायला फ़क्त निमीत्त हवे होते आणि दहिसरच्या घटनेने ते पुरवले आहे. तेव्हा तेवढ्या घटनेचा खरेखोटेपणा करीत बचाव मांडणे म्हणजे दुखावलेल्यांना आणखी मीठ चोळून चिथावणी देणे असते आणि ते नंतरच्या काळात महाग पडते.

स्पेट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा आणि पुढे कोळसाखाण घोटाळा पाठोपाठ बाहेर आलेली प्रकरणे होती. त्यात आधीच्या तीन घोटाळ्यांनी लोकमत फ़ार बिथरलेले होते. त्यातून जनमानसात शंका जागवली होती. कोळसा घोटाळा तर सुप्रिम कोर्टानेच हस्तक्षेप करून रोखला होता. त्यावर खुलासा द्ययला कॉग्रेसने अतिशय बुद्धीमान व वकीली भाषेत नेमके बोलणार्‍या अर्थमंत्री चिदंबरम यांना पुढे केलेले होते. त्यांनी काडीमात्र खोटे न बोलता शंभर टक्के सत्यच लोकांना सांगितले होते. कोळसा खाणवाटप वादग्रस्त असेल. पण घोटाळा कुठे झालाय? अजून एक किलो कोळसाही भूगर्भातून उत्खनन करून बाहेर काढला गेलेला नाही किंवा विकलाही गेलेला नाही. सगळा कोळसा जिथल्या तिथे भूगर्भात शाबुत आहे. मग घोटाळा कुठे झाला? चिदंबरम यांच्या विधानात शंभर टक्के सत्य आहे. पण सवाल कोळसा उकरून विकायचा नव्हता. त्या खाणवाटपात गैरप्रकार झाले होते. ज्यांचा खाण व्यवसायाशी काडीमात्र संबंध नाही त्यांना परवाने व अधिकार देण्यात आलेले होते. म्हणजे पुढे त्यांनी ते नुसते परवाने खर्‍या खाण व्यावसायिकांना विकायचे आणि कोळसा खणल्याशिवाय नुसत्या परवान्याच्या बळावर करोडो रुपये उकळायचे, अशी योजना होती. तिला कोर्टाच्या हस्तक्षेपाने पायबंद घातला गेला. लिलावाशिवाय परवाने दिले गेल्याने सरकारी तिजोरीत जमा होणारा रॉयल्टीचा पैसा खाजगी लोकांच्या खिशात जाणार होता, तो रोखला गेला. म्हणजेच कोळसा खणलेलाच नाही, हे सत्य असले तरी खाणवाटपाचे व्यवहार शुद्ध ठरत नाहीत. त्यामुळेच लोकांनी चिदंबरम यांचा खुलासा मानला नाही आणि त्याचे परिणाम सव्वा वर्षापुर्वी कॉग्रेसला देशभर भोगावे लागले होते. त्याला घटना वा प्रकरण कारणीभूत नव्हते, तर जनमानसातील तयार झालेली प्रतिमा कारण झाली होती.

लोकशाहीत जनमत असेच बनत असते आणि जसे त्याचे पुर्वग्रह होतात, तसे त्याचे मतात रुपांतर होत असते. मागल्या काही काळात मोदींच्या उदयामुळे मुंबईतील गुजराती लोकांच्या वागण्यात अरेरावी आलेली आहे आणि कुणाही बिगरगुजराती माणसाला ती सहज दिसू शकते. त्याचा पुर्वग्रह युती तोडण्याच्या राजकारणातून होत गेला. तसा झाला नसता, तर मुंबईत शिवसेनेला इतकी मते नक्कीच मिळाली नसती. युती तोडल्यापासून शिवसेनेने त्याच पुर्वग्रहाला मतांमध्ये परावर्तित करायचे राजकारण खेळले. किंबहूना मोदी-शहांना अफ़जलखानाची फ़ौज संबोधण्याचे प्रयोजन तेच होते. त्याची प्रादेशिक संकुचितपणा ठरवून भाजपा नेत्यांनी हेटाळणी केल्याने सेनेला अधिक लाभ होऊ शकला. तेव्हा सेनेसाठी मराठी मते पक्षाची तटबंदी झुगारून एकवटली होती, अन्यथा सेनेला इतक्या जागा मुंबईत स्वबळावर जिंकणे अशक्य होते. उलट भाजपाला एकहाती गुजराती मते मिळणार होती. त्यात सेनेच्या मराठीपणाला नाकारणारी अन्य भाषिक मतेही भाजपाकडे गेली. त्याचा भाजपालाही अधिक जागा जिंकायला लाभ झाला. तोटा कॉग्रेस व राष्ट्रवादीचा झाला. अन्यथा ही बिगरमराठी मते मोठ्या प्रमाणात कॉग्रेसच्या पारड्यात पडतात. ती आता माघारी फ़िरू लागल्याचे बांद्रा पुर्वेच्या पोटनिवडणूकीने सिद्ध केले. तसेच विरार वसई व नवी मुंबईच्या मतदानाने सिद्ध केलेले आहे. अशा मतदानाचा रोख भाजपाने समजून घेतला पाहिजे. सामान्य माणूस भाजपा आणि नरेंद्र मोदी यात फ़रक करतो. आजही पंतप्रधान पदाची लढत असेल, तर याच मुंबईतला बहुसंख्य मतदार मोदींनाच मते द्यायला पुढे येईल. पण त्याचा लाभ विधानसभेला जितका भाजपाने उठवला, तितका आता मिळू शकणार नाही. कारण मोदींच्या व शहांच्या राजकीय भूमिकेतला फ़रक लोकांना उमजू लागला आहे आणि त्याचे प्रत्यंतर पालिका व जिल्हा निवडणूकीतून आलेले आहे.

दहिसरच्या निमीत्ताने हा बेबनाव प्रकर्षाने पुढे आला. खरे तर अशावेळी भाजपाने त्यात पक्षीय भूमिकेतून उतरणे चुकीचे आहे. कारण जितका बचाव करायला जाल तितका हा पक्ष गुजराती अरेरावीचे समर्थन करतो, असा पुर्वग्रह व्हायला हातभार लागणार आहे. किंबहूना लागलेला आहे. म्हणूनच माध्यमांनी त्याला फ़ारसे स्थान दिले नाही, तरी सोशल माध्यमातून उमटलेला प्रक्षोभ अधिक घातक आहे. ज्यांना त्यामागचा रोष वा राग समजून घ्यायचा आहे, त्यांनी मुद्दाम उपनगरी रेल्वेतून मुलुंड, घाटकोपर वा पार्ले बोरीवली अशा स्थानकातले वातावरण अनुभवून यावे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात प्रक्षोभाचे कारण लक्षात येऊ शकेल. वास्तविक तिथे गुजराती जसे वागतात वा अरेरावी करतात, त्याचा भाजपाचे धोरण वा राजकारणाशी काहीही संबंध नाही. भाजपाने त्यांना तसे वागायची मुभा दिलेली नाही की प्रोत्साहनही दिलेले नाही. शिवाय ते वागणे महाराष्ट्रात अन्यत्र वसलेल्या गुजरात्यांमध्येही आढळून येत नाही. मग त्याची जबाबदारी भाजपाने घेण्याचे कारणच काय? भाजपाच्या यशापुर्वीही हे लोक असेच वागत होते. पण इतक्या आक्रमकपणे वागत नव्हते. म्हणूनच त्याचा मोदींच्या पंतप्रधान पदाशी काडीमात्र संबंध नाही. पण भाजपावाले जो पोरकट खुलासा अशा बाबतीत करतात, त्यातून मात्र हा आरोप भाजपा व मोदींना चिकटायला अकारण हातभार लागतो आहे. मग शिवसेना राजकारणासाठी त्याचा वापर करीत असेल, तर दोष कुणाचा? युती तुटल्यापासून सेनेला अशा निमीत्ताचा शोध होता व आहे. तेही राजकारणात साधूसंत म्हणून अवतरलेले नाहीत. तुंबलेल्या मुंबईचा चावा आशिष शेलार घेत असतील, तर सेनाही अशी संधी कशाला सोडणार? त्यावर चिदंबरम स्टाईलचे तपशीलवार खुलासे उपयुक्त नसून अंगलट येणारे आहेत. कारण अशा बचावामुळे मुळचे अरेरावी करणारे अधिक शेफ़ारतील आणि परिणाम मात्र भाजपाला भोगावे लागणार आहेत. म्हणूनच असे खुलासे देण्यापेक्षा विरार वसई व नव्या मुंबईच्या मतदानाचे बारकाईने परिशीलन करणे योग्य ठरेल. अन्यथा ते मोदींचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण बाहेर कोणी त्यांना हरवू शकणार नाही इतकी छान राजकीय परिस्थिती असताना, पक्षातलेच असे उथळ, उतावळेच मोदींना मिळालेल्या सदिच्छा मातीमोल करायला पुरेसे आहेत.

Monday, July 20, 2015

दिल्ली ते दहिसर, व्हाया विरार-वसई



आज जशी मुंबईत शिवसेना भाजपा यांची जुंपली आहे, तशीच तब्बल तीस वर्षापुर्वी जुंपलेली होती. योगायोग असा, की अवघ्या दोनतीन महिन्यापुर्वी त्यांच्यात प्रथमच युती झालेली होती आणि शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडिक कमळाची निशाणी घेऊनच लोकसभा लढलेले होते. मात्र राजीव लाटेत सपाटून मार खाल्ला तेव्हा भाजपाने सेनेला टांग मारून विधानसभेसाठी शरद पवारांच्या तात्कालीन पुलोदशी दोस्ती केली होती. त्यावर मल्लीनाथी करताना बाळासाहेबांनी म्हटले होते, ‘कमळाबाई गेली सोडून’. तिथून मग भाजपा व शिवसेनेची चांगलीच जुंपली होती. शिवसेनेने स्वबळावर तेव्हाच्या विधानसभा जागा लढवल्या, त्यात मराठी-गुजराती वाद उफ़ाळून आलेला होता. कारण भाजपाच्या जयवंतीबेन मेहता उभ्या होत्या आणि शिवसेनेच्या कुणा नेत्याने मराठी मतांना आवाहन करताना जयवंतीबेन गुजराती असल्याचे म्हटलेले होते. त्यामुळे खवळलेल्या बेन एका सभेत उत्तरल्या, ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची.’ त्याचा परिणाम तितक्या मतदानापुरता राहिला नाही, भले त्याचा लाभ सेनेला तेव्हा मिळाला नाही. पण त्या एका वाक्याने अवघ्या मुंबईत मराठी अस्मिता डिवचली गेली आणि तीन महिन्यांनी आलेल्या महापालिका निवडणूकीने मोठा चमत्कार केला होता. विधानसभेत कसाबसा छगन भुजबळ हा एकमेव आमदार निवडून आणू शकणार्‍या शिवसेनाला पालिकेत मुंबईकराने सत्ताच बहाल करून टाकली होती. राजीव लाट आणि गिरणगावात घोंगावणारी दत्ता सामंतांची लोकप्रियता त्या मराठी अस्मितेच्या वादळात कुठल्या कुठे वाहून गेले होते. अर्थात त्यात एका बाजूला जयवंतीबेन मेहतांचे ते डिवचणारे शब्द जितके कारणीभूत होते, तितकेच तेव्हा मुंबई कॉग्रेसमधील मुरली देवरा यासारख्या गुजराती नेत्याचे निरंकुश वर्चस्वही कारणीभूत झाले होते. पुढे सेना भाजपा युती झाली तेव्हा अनेकजण सेनेला खिजवण्य़ासाठी जयवंतीबेनचे ते शब्द मुद्दाम आठवण करून द्यायचे.

इतक्या मागे जायचे नसेल तर लागोपाठ २००९ च्या लोकसभा विधानसभा लढतीमध्ये सपाटून मार खाणार्‍या शिवसेनेला २०१२ च्या महापालिका निवडणूकीत मिळालेले मोठे यश कोणत्या कारणाने मिळालेले होते? त्या लढतीच्या ऐन कालखंडात तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वादग्रस्त विधान सेनेच्या पथ्यावर पडलेले होते. ‘पालिका निकालानंतर ठाकरे यांचे नामोनिशाण शिल्लक उरणार नाही’, असे चव्हाण म्हणाले आणि नैराश्याने घेरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त मोठे यश मिळून गेले. तेव्हा शिवसेना उत्तम कारभार करीत होती आणि मुंबईचे नाले-गटारे अत्यंत साफ़सुथरी होती, असे कोणाला म्हणायचे आहे काय? तसे अजिबात नव्हते. तर मुंबईचा मराठी माणुस डिवचला गेला होता आणि त्यातून सेनेला नवे स्फ़ुरण चढलेले होते. तेव्हाच मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी पद्धतशीर मराठी उमेदवारांना तिकीटे नाकारल्याचा खुला आक्षेप, अजित सावंत या कॉग्रेस नेत्यानेच केलेला होता. मनसेचे उमेदवार मोठे यश मिळवत असतानाही शिवसेनेचे शंभरावर नगरसेवक निवडून आले. त्यात सेनेचे कर्तृत्व किती आणि अन्य विरोधकांनी मराठी अस्मित्ता डिवचल्याचे श्रेय किती; याचा कोणी तौलनिक अभ्यास केलेला आहे काय? दहिसरची घटना व त्यावर उमटणार्‍या प्रतिक्रीया समजून घ्यायच्या असतील, तर अशा जुन्या घडामोडी आधी समजून घ्याव्या लागतात. कृपाशंकर सिंग वा पृथ्वीराज चव्हाण १९८५ च्या मुरली देवरांच्या अरेरावीचे परिणाम समजून घेऊ शकले नाहीत, त्यांनी शिवसेनेला बहुमोलाची मदत केली. तर युती मोडणार्‍यांनी स्वबळावर शिवसेनेला गेल्या आक्टोबरमध्ये मराठी मतावर मुंबईत १५ आमदार निवडून आणायला निर्णायक सहाय्य केले. मराठी माणुस डिवचला गेला म्हणजे शिवसेनेला फ़ायदा होतो. पण त्यापेक्षा तो मराठी मतदार अशा डिवचणार्‍याला धडा शिकवायला एकवटतो, हे विसरता कामा नये.

राजकारणात अस्मितेचे भांडवल करणे कितपत रास्त आहे? हा राजकीय तात्विक चर्चेचा विषय जरूर आहे. पण चर्चेच्या पलिकडे ज्याला निवडणूका लढवायच्या आणि जिंकायच्या असतात, त्याला वास्तवाला सामोरे जाण्याखेरीज पर्याय नसतो. मुंबई परिसराची ही वस्तुस्थिती आहे, तशीच भारतीय मतदाराची मानसिकता अशीच एक चमत्कारीक वास्तविकता आहे. मागल्या वर्षी विधानसभा निवडणूकीत युती तुटल्याचा लाभ राष्ट्रवादी व कॉग्रेसला जास्त मिळू शकेल, असे अनेक जाणकारांना वाटले होते. पण एकमेकांच्या विरोधात लढूनही सेना भाजपाला एकत्रित दोनशेच्या आसपास जागा मिळवता आल्या. कारण त्यांच्यापैकी कोण येतो, त्यापेक्षा मतदाराला पुन्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत येऊ नयेत, इतकेच करायचे होते. मग सेना जिंकते की भाजपा, असा विचार झाला नाही. त्याचेच प्रत्यंतर दिल्लीत अधिक ठळकपणे बघायला मिळाले. लोकसभेतील बहूमत व दिल्लीतील निर्णायक यशाने दिल्लीकर भाजपापेक्षा त्याचे नवे अध्यक्ष अमित शहा इतके धुंद झाले होते, की आपण कुठल्याही राज्यात व प्रदेशात जिंकू शकतो, अशा समजूतीने त्यांना पुरते पछाडले होते. परिणामी त्यांचा तो उर्मटपणा स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही दुखावत गेला. दिल्लीकरांना तर शहानितीची इतकी किळस आलेली होती, की भाजपाला सत्ता मिळू नये यासाठीच विरोधातील जिंकू शकणार्‍या उमेदवाराच्या मागे मतदार एकवटत गेला. त्याचाच फ़ायदा केजरीवाल यांना मिळू शकला. त्यांनी आधीच्या ४९ दिवसात असे कुठले दिवे लावले नव्हते, की त्यांना ७० पैकी ६७ जागा मिळाव्यात. पण लोकांना तरी केजरीवाल यांना कुठे जिंकून आणायचे होते? दिल्लीकरांना भाजपाला धडा शिकवायचा होता. म्हणून वर्षभरापुर्वी मिळालेल्या ३२ पैकी तीन आमदार टिकवताना ‘शहा’ण्यांचा शत-प्रतिशत पुरता वाताहत होऊन गेली. पण म्हणून भाजपा धडा कुठे शकला आहे?

दहिसरच्या घटनेचे गांभिर्य त्याच दृष्टीने महत्वाचे आहे. लोकसभेचे मोठे व विधानसभेचे तुलनेने बरे यश मिळाल्यावर भाजपावाले भरकटले आहेत आणि इथले गुजराती तर आपणच मोदींना पंतप्रधान बनवले अशा थाटात दादागिरी व उद्धटपणा करू लागले आहेत. त्याचे परिणाम नुसत्या दहिसरमध्ये बघायचे कारण नाही. थोडे आजुबाजूला बघितले तरी गुजराती अरेरावीची किंमत भाजपा कशी मोजतोय, त्याचा ताळेबंद मिळू शकेल. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात मंदा म्हात्रे भाजपाच्या आमदार आहेत. पण तिथेच पराभूत झालेल्या गणेश नाईकांचे अनुयायी प्रचंड संख्येने निवडून कशामुळे निवडून आले? भाजपाची इथे वाढलेली ताकद कुठे गायब झाली? विरार-वसई ज्या पालघर लोकसभेचा भाग आहे, तिथे लोकसभेत मिळवलेली लाखो मते भाजपाने ताज्या पालिका मतदानात कशामुळे गमावली? केवळ आठरा हजार मते शिल्लक उरलीत आणि त्यावरून कळते, की त्या दोन विधानसभा क्षेत्रात सगळे गुजरातीही भाजपाला मते देताना दिसत नाहीत. ही किमया हितेंद्र ठाकुरची वा गणेश नाईकांची अजिबात नाही. त्याला अमित शहा नावाची गुजराती जादू म्हणतात. शत-प्रतिशत गुजराती अशी ती रणनिती आहे. आपल्याशी जुळते घेणार नाही, त्याला उचलून फ़ेकून द्या किंवा हाकलून लावा. देशात आपले राज्य आहे आणि आपण म्हणू तसेच लोकांनी जगले वागले पाहिजे, अशी सक्ती म्हणजे शहानिती होय. तिचाच प्रयोग १६ मे २०१४ पासून निदान मुंबई परिसरात दिसू लागला आहे आणि त्याचा खुला चेहरा युती मोडून समोर आला. तेव्हा उद्धव किंवा कोणी शिवसेनानेता अफ़जलखानाशी तुलना कशाला करतोय, त्याची प्रचिती जशी येत चालली आहे, तसे भाजपापासून मतदार दुरावत चालले आहेत. दुसरा कोण निवडून येईल त्याची फ़िकीर न करता भाजपाला मतदार धडा शिकवणारे निकाल दिल्ली ते दहिसर व्हाया विरार-वसई समोर येत आहेत. अर्थात त्यामुळे भाजपाचे झिंग चढलेले नेते शहाणे होण्याची अजिबात शक्यता नाही. पाठोपाठच्या पराभवाने राहुल वा त्यांच्या भक्तांना तरी कुठे जाग आलेली होती? ते काम काळच करीत असतो.