Tuesday, April 28, 2015

ममता, मुलायम, मायावतींना इशारा



 वांद्रे या पोटनिवडणुकीत आपली मते वाढल्याचा दावा करून आपण एम आय एम या हैद्राबादच्या पक्षाला वेसण घातली, असा दावा दहा दिवसापुर्वीच कॉग्रेसने केला होता. त्याला ताज्या निकालांनी शह दिला आहे. कारण नवी मुंबई आणि औरंगाबाद या महापालिकांचे निकाल हाती आले असून, त्यात सर्वात धुलाई कॉग्रेस पक्षाची झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा नवी मुंबईतला गड काही प्रमाणार गणेश नाईक यांनी राखला असताना, औरंगाबादेत कॉग्रेसची आणखीच घसरगुंडी झाली आहे. अर्थात तिथे शिवसेना किंवा भाजपाने मुसंडी मारली असती, तर कॉग्रेसला मोठे दु:ख झाले नसते. कारण अशी मते माघारी फ़िरवणे शक्य असते. पण ताज्या निकालावरून नजर फ़िरवली, तर युतीतल्या पारंपारिक विरोधकांनी कॉग्रेसच्या मतांना कुठेच धक्का लावलेला नाही. उलट ज्यांना आजवर मित्र म्हणून राष्ट्रीय राजकारणात जवळ घेतले, अशा महाराष्ट्राबाहेरच्या पक्षाने इथे येऊन कॉग्रेसचा पाया खणायचे काम केले आहे. हैद्राबादच्या रझाकारांचा वारसा सांगणार्‍या ओवायसी बंधूंच्या एम आय एम या नवख्या पक्षाने पालिका निवडणूकीत जबरदस्त मुसंडी मरून औरंगाबाद महानगरातील कॉग्रेस व राष्ट्रवादीचा पायाच उखडून टाकला आहे. त्याची सुरूवात तीन वर्षापुर्वी प्रदेशाध्यक्ष अशिक चव्हाण यांच्या नांदेडमध्येच झालेली होती. तिथे पालिकेच्या निवडणूकीत या पक्षाने फ़क्त मुस्लिम वस्त्यांमध्येच मोजके उमेदवार उभे करून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. तीन वर्षात त्यांनी औरंगाबादेत राजेंद्र दर्डा या मंत्र्या विधानसभेत धुळ चारून आपले बळ सिद्ध केले होते. आता महापालिकेत अधिकृत विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आहे. विधानसभेला तरी सेना भाजपा परस्परांच्या विरोधात लढले म्हणून ओवायसींचा लाभ झाला असे म्हणायला वाव होता. पालिकेत सेना भाजपा एकत्रित होते आणि तरीही एम आय एमने २५ जागांपर्यंत मजल मारली आहे.

हे कॉग्रेसचे असाध्य दुखणे होऊ घातले आहे. कारण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुस्लिम हे स्वातंत्र्योत्तर काळात कॉग्रेसचे हुकमी मतदार राहिले होते. त्याखेरीज दलित हा घटकही कॉग्रेसचा हुकमी मतदार राहिला होता. आता त्यालाच तडा जाऊ लागला आहे. कारण ओवायसी बंधूंनी दुधारी शत्र परजले आहे. आपल्या आक्रमक धर्मांध भूमिकेला मुरड घालून त्यांनी दलित मुस्लिम आघाडीचा पवित्रा घेतला आहे. दलित व मुस्लिमांना कॉग्रेसने फ़क्त व्होटबॅन्क म्हणून वापरले. पण त्यांच्यासाठी काही केले नाही. त्यांना सत्तेत वाटा किंवा प्रतिनिधीत्व दिले नाही हे ओवायसींच्या प्रचाराचे सुत्र आहे. शहरी भागात आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरात प्रामुख्याने झोपडपट्टी व गलिच्छ वस्त्यांमध्ये याच वर्गाचा भरणा आहे. ओवायसींनी तेच भाग आपले लक्ष केलेले आहेत. विधानसभेला त्यांना काही प्रमाणात दलित मते मिळाली होती. आता पालिकेच्या छोट्या वॉर्डात अशी मते निर्णायक ठरत असतात. बंडखोरीत तर गठ्ठा मतांचे पारडे खुप वजनदार ठरते. म्हणूनच युती होऊन सेना भाजपाचे बहुतेक वॉर्डात बंडखोर एकमेकांना पाडायला सज्ज झालेले होते. अशा जागी ओवायसींना नक्कीच मोठे यश मिळालेले असू शकते. पण त्याला बोनस म्हणता येईल. त्यांचे खरे लक्ष कॉग्रेसच्या कच्छपी लागलेला मुस्लिम मतदार आपल्या कृपाछत्राखाली आणायचा आणि देशव्यापी मुस्लिमांचाच एकमेव पक्ष व्हायचे. सोबतीला दलितांना घ्यायचे. औरंगाबादेत त्याला प्रतिसाद मिळाला नसता तर या पक्षाला २५ जागा जिंकणे अशक्य होते. म्हणूनच हे निकाल युतीपेक्षा कॉग्रेस व दलित पक्षांना धक्का देणारे म्हणावे लागतील. त्याच शहरात आजवर दलित चळवळी व संघटनांचा खुप बोलबाला होता. पण नेत्यांच्या हमरातुमरीने दलित संख्या मोठी असूनही राजकारणात त्यांचा प्रभाव दिसू शकला नाही. ओवायसींनी हाताशी धरलेल्या दलित कार्यकर्त्यांना यात यश मिळाले असेल, तर तो दलित संघटनांच्या भवितव्याला धोका असू शकतो.

कारण ओवायसींचे खरे लक्ष उत्तर भारत आहे जिथे खर्‍या अर्थाने मुस्लिम प्राबल्य असलेले दिडशेहू अधिक लोकसभा मतदारसंघ आहेत, खेरीज निदान तिनशेहू अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. पण त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा कुठलाच मुस्लिम राष्ट्रीय पक्ष नाही, मुस्लिम लीगच्या मरगळीनंतर तसे प्रयत्न झालेच नाहीत. म्हणूनच बहुतेक मुस्लिम नेत्यांनी सेक्युलर पक्षात आश्रय घेतला आहे. एक प्रयत्न आसाममध्ये एका मुस्लिम व्यापार्‍याने केला. दुसरा प्रयत्न मागल्या पालिका निवडणूकीत मालेगाव येथे काही उलेमांनी केला होता. त्यांना स्थानिक पातळीवर यशही मिळाले होते. आसामच्या त्या पक्षाचे लोकसभेत आज तीन खासदार आहेत आणि मालेगाव येथील तिसरा महाज हा पक्ष वर्षभरापुर्वी पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन झाला. आता अर्थातच ओवायसी यांचे पुढले लक्ष भिवंडी व मालेगाव या पालिका असतील. तिथे मोठ्या प्रमाणात परप्रांतिय मुस्लिमांची दाट वस्ती आहे आणि इतक्य यशानंतर तिथे ओवायसींचा गवगवा झालेला असणारच. एव्हाना त्या पक्षाच्या शाखा या दोन्ही महानगरात स्थापन झालेल्या असतील आणि विविध पक्षात विखुरलेले मुस्लिम नेते प्रतिनिधी ओवायसींच्या दारात जाऊन रांगा लावतही असतील. पण त्यातून कॉग्रेस अधिक गोत्यात येणार आहे. सतत भाजपा व शिवसेनेवर दुगाण्या झाडताना हिंदू मतांवर कॉग्रेसला पाणी सोडावे लागते. पण ज्या मुस्लिम लांगुलचालनाचा आरोप या पक्षावर होऊन हिंदू मते घटतात, त्याच मुस्लिम मतांनी कॉग्रेसकडे पाठ फ़िरवली तर व्हायचे कसे? मागल्या लोकसभेत त्याचाच दणका जास्त बसला आणि कॉग्रेसला नुसती सत्ताच गमवावी लागली नाही, तर तिची लोकसभेतील संख्याही कमालीची रोडावली. पुढल्या विधानासभेतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यात कॉग्रेसला हिंदू विरोधी रंगवण्यात भाजपा यशस्वी झाला असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचा विचार त्या पक्षाला करावा लागेल.

केवळ कॉग्रेसच नाही तर सेक्युलर म्हणवणार्‍या व मुस्लिम दलित पिछड्यांच्या मतांचे गठ्ठे खिशात असल्याप्रमाणे राजकारण करणार्‍या प्रत्येक पक्षासाठी ओवायसी हे नवे राजकीय आव्हान आहे. औरंगाबादेत जे शक्य झाले ते समिकरण बंगालमध्ये ममता आणि उत्तर प्रदेशात मुलायम-मायावतींना शह देण्यात कामी येऊ शकणार नाही काय? तितकेच ते हिंदूत्वाच्य पायावर उभे असलेल्या भाजपासाठीही आव्हान असल्याचे निदान महाराष्ट्रात सिद्ध झाले. कारण एम आय एमचा धोका असतानाही युतीत झालेल्या बंडखोरीनेच त्या पक्षाला निसटत्या संख्येने औरंगाबादेत इतकी मोठी मजल मारता आली. युती पक्षातील महत्वाकांक्षेचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. विधानसभेच्या वेळी युती फ़ोडण्याचा परिणाम आता स्थानिक निवडणूकांमध्ये जाणवतो आहे.

मी मराठी लाईव्ह २५/४/२०१५

1 comment:

  1. विधानसभेत युती फोडणे आणि बंडखोर उमेदवार यांच्यामुळे एम‍ाय‍एमला इतके यश मिळाले आहे. शिवसेना -भाजप एकत्र जरी झाले असले तरी कार्यकर्त्यांची मने दुभंगलेलीच आहेत.

    ReplyDelete