Wednesday, July 20, 2016

सिद्धूशैली, ठोको ताली



क्रिकेटमुळे नावारूपाला आलेला आणि आपल्या विनोदी शैलीच्या समालोचनाने कलाकार म्हणून प्रसिद्धी पावलेला नवज्योतसिंग सिद्धू भाजपामुळे राजकारणात आला. बारा वर्षानंतर आता त्याने भाजपाला रामराम ठोकला आहे आणि त्यामुळे तसा राजकारणात वादग्रस्त नसलेला हा माणूस गाजतो आहे. त्यातही मजेची गोष्ट अशी, की सिद्धू नेहमी त्याच्या चटकदार बोलणे वा विधानाने गाजत असतो. पण यावेळी बहुधा प्रथमच चमत्कार घडला आहे. सिद्धू गाजतोय त्याच्या अबोल्याने वा मौनव्रत धारण केल्याने. सोमवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि त्याच दिवशी सभागृहाचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, यांच्याकडे सदस्यत्वाचा राजिनामा देऊन सिद्धू अज्ञातवासात निघून गेला आहे. त्याच्या पत्नीलाही पत्रकारांनी खोदून खोदून विचारले. पण हे गृहस्थ कुठे आहेत, त्याचा पत्रकारांना थांगपत्ता लागू शकलेला नाही. सहाजिकच पहिल्या दिवसापासून सिद्धूच्या भवितव्याविषयी तमाम लोक चिंतेत किंवा उत्सुक आहेत. कारण त्याने राज्यसभा सदस्यत्वाबरोबरच पक्षाचाही राजिनामा दिल्याचे वृत्त होते. त्याच्यासहीत त्याच्या पत्नीनेही पंजाब विधानसभेतील आमदारकीचा राजिनामा देऊन भाजपा सोडल्याचे वृत होते. पण ब्रेकिंग न्युज नेहमीच खरी नसते. म्हणून असेल, मंगळवारी सिद्धूच्या पत्नीने आपण आमदारकी वा पक्ष सोडला नसल्याचा खुलासा केला. सिद्धूने आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची व तोच आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार असल्याचीही ब्रेकिंग न्युज होती. त्यामुळे हुरळलेल्या आपनेत्यांनीही त्याचे स्वागत करून टाकले. मात्र मंगळवार उजाडण्यापर्यंत धुरळा बसत गेला. आपल्या अस्सल स्वभावानुसार त्याने इथेही प्रेक्षक सहकार्‍यांना चकवा दिला. त्याच्याच शब्दात नेमके सांगायचे तर ‘अरे, रुको रुको रुको; अब ठोको ताली’ अशी अवस्था माध्यमांची होऊन गेली.

सिद्धू त्याच्या क्रिकेटमुळे नाही इतका टिव्हीच्या कार्यक्रमांनी गाजला व गाजतो आहे. त्याच्या खास शैलीला सिद्धूवाद असेही संबोधले जाते. कुठलीतरी शेरोशायरी वा तात्विक विधान करून सिद्धू टाळ्या मिळवतो. क्रिकेटमध्ये समालोचनातला त्याचा हा गुण ओळखून त्याला विनोदी प्रहसनांच्या कार्यक्रमात ओढले गेले. त्याच्याच खास किस्से शेरोसायरीसह त्याच्या हास्याच्या गडगडाटासाठी तो ख्यातनाम झाला. असा सिद्धू भाजपाने २००४ सालात अमृतसरच्या लोकसभा जागेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणला आणि दोनदा जिंकून त्याने आपली कुवत सिद्ध केली. शिवाय टिव्हीस्टार असल्याने अन्यत्रही त्याला लोकप्रिय वक्ता म्हणून भाजपाने प्रचारसभात वापरले. आताही त्याच्या अनेक जुन्या भाषणांची चित्रणे काढून त्याने केजरिवाल यांची उडवलेली भंबेरी सोशल मीडियातून फ़िरते आहे. पण भाजपात रमलेल्या सिद्धूला पंजाबमध्ये अकाली दलाशी जुळवून घेता आले नाही. परिणामी २०१४ मध्ये त्याच्या उमेदवारीला अकाली दलाने विरोध केला आणि सिद्धू तेव्हापासून नाराज होता. कारण त्याला बाजूला करून भाजपाने अमृतसर येथून अरूण जेटलींना उभे केले आणि पराभव ओढवून घेतला. पराभव स्पष्ट असतानाही भाजपाने लोकसभेत अकाली दलाचा पाठींबा हवा, म्हणूनच सिद्धूला दुखावले होते. तरीही सिद्धू शांत राहिला. त्याने अन्य कुठून उभे रहाण्यास नकार दिला होता. म्हणून त्याला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत आणले गेले. दोनच महिन्यांपुर्वी त्याची ही नियुक्ती झालेली होती. तेव्हाही तो त्याला नकार देऊ शकत होता. पण त्याने सदस्यत्व घेतले. याचा अर्थ त्याला पक्षात रहायचे होते. मात्र नंतर काही घटना अशा घडलेल्या असाव्यात, की त्याला खासदारकी पुरेशी वाटेना आणि त्याने भाजपाला रामराम ठोकण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्याचा पुरता राजकीय लाभ उठवण्याची त्याची मनिषा असावी.

आज अकाली दल पंजाबमध्य आपली सर्व कुवत गमावून बसली आहे. त्याचे प्रत्यंतर गेल्या लोकसभेतच आलेले आहे. कॉग्रेसला जोर आला आहे आणि नगण्य नवखा असलेल्या आम आदमी पक्षाचे सर्व चार खासदार निवडून आले ते पंजाबमधून! याचे कारण ते आपचे कोणी झुंजार नेते वा कार्यकर्ते नव्हते. पंजाबमध्ये मागल्या दहा्पंधरा वर्षात जो नशेचा विळखा घट्ट होत गेला आहे, त्यामुळे राजकीय पक्षांविषयी नाराजी आहे. त्याच नशेबाजी विरुद्ध जे सेवाभावी कार्यकर्ते व संस्था कार्यरत आहेत, त्यांचेच म्होरके आपतर्फ़े लोकसभेला उभे होते आणि जिंकले. ती केजरीवालची वा लोकपालची किमया नव्हती. त्यापासूनही अकाली धडा घेऊ शकले नाहीत व विधानसभा दार ठोठावत असताना आपचे पारडे जड झालेले आहे. मात्र त्या राज्यात शीखधर्मिय असा कोणी चेहरा ‘आप’पाशी नाही. केजरीवाल त्यासाठी अनेकदा फ़ेटे बांधून मिरवूनही आले आहेत. पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारले जाणे अशक्य आहे. दुसरा कोणी राज्यव्यापी चेहरा नाही. अशा स्थितीत नाराज सिद्धू आपचा उमेदवार होऊ शकतो. हे ताडल्यावर ‘सिद्धूपाजी’ भाजपाला विटले असतील, तर त्यांची कृती गैरलागू म्हणता येणार नाही. आपल्याला पंजाबसाठी काही करायचे आहे. पण त्यासाठी भाजपात वाव नाही. भाजपा स्वबळावर पंजाबमध्ये लढायला तयार नाही, अशी तक्रार करून त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यांच्या पत्नीवर विश्वास ठेवायचा तर स्वबळावर पंजाब लढण्याचे व अकालींशी आघाडी तोडण्याचे आश्वासन सिद्धूला भाजपा नेतृत्वाने दिले होते. ते पाळले गेले नाही, म्हणून त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. त्यात तथ्य असेल, तर सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले आहेत. ते भाजपा अकाली दलाशी आघाडीत राहुन शक्य नव्हते. मग पक्षात राहुन उपयोग काय? त्यापेक्षा आपमध्ये जाऊन किस्मत आजमावणे अपरिहार्य नव्हते काय?

पण अजून तरी सिद्धूनी आपमध्ये प्रवेश केल्याची बातमी खरी ठरलेली नाही. केजरीवालसह अनेकजण त्यांच्या स्वागताला हारतुरे घेऊन सज्ज आहेत. इतक्यात कॉग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी सिद्धूचे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सिद्धूला अनेक ऑप्शन खुले आहेत. थोडक्यात मुख्यमंत्री कोण करणार किंवा तसे गाजर कोण दाखवणार, त्याच्या प्रतिक्षेत हा नेता दडी मारून बसला आहे. पण त्याच निमीत्ताने भारतीय राजकारणाची अगतिकताही समोर आलेली आहे.  कुठल्याही पक्षातून फ़ेकलेला किंवा पक्ष सोडणारा नेता, इतर पक्षात किती पवित्र असतो ना? प्रामुख्याने निवडणुक काळात तर अशा त्यक्त वा मुक्त नेत्यांचा बाजार खुप तेजीत चालतो. बुधवारी लोकसभेत दलित विषयावर बोलताना विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे नेमके बोलले. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी कॉग्रेस युपीए कालखंडात दलितांवर किती अत्याचार झाले, त्याची यादीच वाचून दाखवली होती. त्यावर प्रतिक्रीया देताना खर्गे म्हणाले, जी आकडेवारी गृहमंत्र्यांनी सादर केली, त्या कालखंडात आजच्या सत्ताधारी पक्षातील ऐशी टक्के सदस्य कॉग्रेस व युपीएमध्येच होते. हे आजचे राजकारण आहे. कॉग्रेस काळात अत्याचाराचे समर्थन करणारे भाजपा काळातही सत्तेतच असतात. मग कालपर्यंत केजरीवालच्या खोकल्याची टवाळी करणारे सिद्धू आता आम आदमी पक्षाचे उमेदवार झाले तर वावगे काय? त्यालाच तर आपल्या देशात राजकारण म्हणतात. सगळाच कॉमेडी शो झालेला असेल तर त्याच्यावर सिद्धू खळाळून हसण्यात गैर काय? या देशात गंगाजल शिंपडून पापही पुण्य बनवता येते अशी ख्याती आहे ना? मतभेद असतात गंगा कोणाला म्हणावे आणि कुठले पाणी गंगाजल समजावे इतकाच! बघू सिद्धूचे शुद्धीकरण करणारी गंगा कुठली आणि ते गंगाजल कुणाच्या हातातून शिंपडले जाते.

4 comments:

  1. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  2. He may be dealing with BJP it self. Rest article is as good as before....

    ReplyDelete
  3. मित्रांनो, भाऊंच्या लेखनावर ठोको ताली!
    क्रिकेट पटू स्लिप मध्ये कॅच देऊन परतताना जसा चडफडताना दिसतो तसेच सिद्धू निवडणुकीनंतर काहीतरी करून वर ठोको ताली म्हणून कॉमेडी कार्यक्रमात विनोदी बोलण्याचे गंगाजल शिंपडून सिंहासनावर विराजमान झाले आहेत असे चित्र रंगवायला हरकत नाही...
    गुरू ठोको ताली!!

    ReplyDelete
  4. arun dhang Right explainationJuly 25, 2016 at 10:49 AM

    Right explaination

    ReplyDelete