Saturday, July 29, 2017

लोकशाही, अहिरावण, महिरावण

ahiravan mahiravan के लिए चित्र परिणाम

पुराणात अनेक चमत्कारीक नवलाईच्या गोष्टी असतात. शहाण्यांना ती बाष्कळ बडबड वाटते. पण सामान्य माणसे शहाण्यांना ऐकत असतात, तशीच किर्तन प्रवचनही ऐकत असतात. सहाजिकच सामान्य माणसाला दोन्हीतली साम्येही सहज दिसू शकत असतात. उदाहरणार्थ रामायण कथेमध्ये अहिरावण महिरावण अशी एक मस्त मनोरंजक कथा आहे. रावणाशी झालेल्या लढाईत राम लक्ष्मण लागोपाठ शरसंधान करून त्याला घायाळ करीत असतात. पण मरून पडलेले अहिरावण आणि महिरावण पुन्हा पुन्हा जिवंत होऊन लढतच असतात. कारण त्यांच्या मृतदेहावर कोणी भुंगे म्हणे अमृताचा थेंब आणून टाकत असतात. असा कोणी मेलेला अमृताचे थेंब टाकल्याने जिवंत होतो, हे विज्ञानाला मान्य नाही. पण आजच्या शहाण्यांचा राजकारण्यांचा मात्र त्यावर विश्वास असावा. अन्यथा मागल्या दोनतीन दिवसात भाजपाने वा नितीशकुमारांनी मारलेली लोकशाही आलीच कुठून असती? मागल्या तीन वर्षात कित्येकदा लोकशाहीची हत्या झाल्याचे आरोप व बातम्या सामान्य माणसाने ऐकल्या वा बघितल्या आहेत. अरुणाचल वा उत्तराखंडात कॉग्रेसचे आमदार फ़ुटले आणि त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करून वेगळे सरकार स्थापन केले; तेव्हा असाच लोकशाहीचा खुन झाल्याचा हलकल्लोळ ऐकायला मिळाला होता. त्यासाठी खुनाचे प्रकरण कोर्टातही गेलेले होते. मग मणिपुर व गोव्यातील निवडणूकात भाजपाला कमी जागा मिळूनही भाजपाने अन्य कुणाच्या मदतीने तिथे सरकार स्थापन केल्यावर पुन्हा लोकशाहीची हत्या झाली होती. अशा हत्या नित्यनेमाने झालेल्या असताना देशात लोकशाही हयात तरी कशी राहिल? ती केव्हाच मेलेली असेल, तर आता बिहारमध्ये कुठल्या लोकशाहीचा भाजपा व नितीशकुमार यांनी खुन पाडला आहे? लोकशाही अशी कुणाला ठार मारता येते काय?

एका सरकारचे बहूमत गेल्यावर किंवा सत्ताधारी पक्षात फ़ाटाफ़ुट झाल्यावर दुसरे सरकार येणे आणि त्यात आधीच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा समावेश असणे; ही हत्या असते काय? तसे असेल तर लोकशाहीची या देशात पन्नास वर्षाहून अधिक काळ हत्या होतच आलेली आहे. जगातले पहिले निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार अशी केरळातील नंबुद्रीपाद सरकारची ओळख होती. ही तब्बल साठ वर्षे जुनी गोष्ट आहे. ते सरकार समाजवादी पक्षाच्या पाठींब्यावर स्थापन झाले होते आणि त्यावरच चालतही होते. पण देशातले हे एकमेव बिगरकॉग्रेस सरकार कॉग्रेस अध्यक्षा इंदिराजी गांधींना बघवले नाही आणि त्यांनी त्या सत्ताधारी आघाडीत फ़ुट घडवून आणलेली होती. त्यासाठी प्रजा समाजवादी पक्षाच्या सर्व आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवून फ़ोडलेले होते. मग पट्टम थाणू पिल्ले यांना केरळचे मुख्यमंत्री व सर्व समाजवादी आमदारांना मंत्री करून वेगळे सरकार स्थापन करण्यात आले. त्याला कॉग्रेसने बाहेरून पाठींबा दिलेला होता. मग त्याला लोकशाहीला दिलेली संजिवनी म्हणायचे, की लोकशाहीचा मुडदा पाडणे म्हणायचे? राज्यपालांच्या मदतीने हा उत्पात इंदिराजींनी घडवून आणलेला होता. त्याला लोकशाहीची हत्या म्हणायचे नसेल, तर कालपरवा बिहारमध्ये महागठबंधन सरकार पाडले गेले; त्याला तरी लोकशाहीची हत्या कशी म्हणता येईल? नुसती आमदारांची लोकसंख्या वा बहूसंख्या म्हणजे लोकशाही असला अजब सिद्धांत इंदिराजींनी साठ वर्षापुर्वी निर्माण केला. तिथून या नव्या लोकशाहीला सुरूवात झाली. पण आपल्या आजीच्या हौतात्म्याचे हवाले देऊन व त्याच पुण्याईवर आजही जगू बघणार्‍या राहुल गांधींना आपली आजी वा तिचे कर्तृत्वही माहिती नाही. त्याच्या सोबत कॉग्रेस चालवणार्‍यांनाही बहुधा या इंदिराजी ठाऊक नसाव्यात. अन्यथा त्यांनी लोकशाहीची हत्या झाली म्हणून ऊर कशाला बडवला असता?

लोकांनी महागठबंधनाला मते दिली होती, असे दावे करणार्‍यांना चार वर्षापुर्वी बिहारमध्ये काय घडले तेही आठवत नाही काय? तेव्हा भाजपा नितीश यांचीच संयुक्त सत्ता होती. तेव्हा नितीशना मतदाराने सेक्युलर नाटक रंगवण्यासाठी मते दिली नव्हती, की मोदीविरोधात ढोल बडवण्यासाठी मते दिली नव्हती. २००५ वा २०१० सालात बिहारच्या जनतेने नितीशना जे काही आमदार दिलेले होते, ते लालू नावाचे अराजक संपवण्यासाठी होते. असे असताना २०१३ सालात नितीशनी सेक्युलर मुखवटा चढवला आणि भाजपाच्या मंत्र्यांची सरकारमधून हाकालपट्टी केली होती. तेव्हा त्यांनी मतदाराल दगा दिलेला नव्हता काय? कारण २०१० सालात मोदी हा विषय बिहारच्या मतदानात नव्हता. तरीही त्या ‘दगाबाज’ नितीशचे हारतुरे देऊन ज्यांनी स्वागत केले; त्यांना आज मतदार आठवला आहे. तेव्हा याच लोकांनी भाजपाची साथ सोडायची तर नितीशनी विधानसभा बरखास्त करून मतदाराचा पुन्हा कौल घ्यावा, असा शब्द तरी उच्चारला होता काय? पण आज अशा लोकांना मतदाराला दिलेल्या शब्दाची महत्ता मोठी वाटते आहे. सोयीचे असेल तेव्हा मतदार देव असतो आणि गैरसोयीचे असले मग लोकशाही महत्वाची असते. ह्याला दुटप्पीपणा म्हणतात. बहुधा असा दुटप्पीपणा अंगी भिनवल्याखेरीज पुरोगामी विचारवंत म्हणुन मान्यता मिळत नसावी. अन्यथा अशा लोकांनी आज काहूर कशाला माजवले असते? लालूपुत्र तेजस्वी याने विधानसभेत विश्वासमत ठरावावर बोलताना भाजपाला इशारा दिला आहे. आज आम्हाला दगा देणारा नितीश उद्या तुम्हालाही दगा देईल, असा तो इशारा आहे. या पोराला २०१३ सालात भाजपाला नितीशने असाच दगा दिल्याचाही इतिहास ठाऊक नाही. कदाचित तेव्हा तो दाढीमिशा फ़ुटण्याच्या प्रतिक्षेत असावा. त्याशिवाय राजकीय अक्कल येत नसल्याचा परिणाम आहे, की तेवढ्यासाठी राहुल अधूनमधून दाढीमिशा वाढवत असतात?

बिहारमध्ये नितीशनी अकस्मात राजिनामा दिला आणि वेगळ्या पक्षाशी हातमिळवणी करीत नवे सरकार स्थापन केले. मग देशातील राजकीय अभ्यासकांना मोठेच नवल वाटलेले आहे. पण त्यातून त्यांचे अज्ञानच समोर आलेले आहे. कारण अशा रितीने रातोरात पक्ष व निष्ठा बदलण्यातून सरकार बदलण्याचा बिहारचा इतिहास पन्नास वर्षे जुना आहे. सतीश प्रसाद सिंग नावाचा इसम बिहारमध्ये अवघ्या चार दिवसांसाठी मुख्यमंत्री झाला. त्याने मंत्रीमंडळही स्थापन केले नाही. त्याने एका व्यक्तीला विधान परिषदेचा सदस्य म्हणून नेमण्याची शिफ़ारस राज्यपालांना केली आणि तो अध्यादेश निघाल्यावर आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. सदरहू नेमलेला आमदार नंतर मुख्यमंत्री झाला. किंबहूना मुख्यमंत्री आमदार असावा लागतो व तशी निवडणूक जिंकणे अशक्य असल्याने, त्या व्यक्तीने आपली आमदारपदी नेमणूक करण्यापुरता सतीश सिंगला मुख्यमंत्रीपदी बसवला होता. कारण आपणच आपल्या नेमणूकीची शिफ़ारस करणे शक्य नव्हते. इतक्या थराला बिहारी राजकारण घसरलेले होते. अशा रितीने मुख्यमंत्रीपदी आरुढ झालेल्या त्या नेत्याचे नाव बिंदेश्वरी प्रसाद मंडल असे होते. आजही प्रत्येक पत्रकार विश्लेषकाच्या तोंडी त्याचे नाव असते. कारण १९७७ नंतर नेमलेल्या इतरमागास आरक्षण आयोगाचे अध्यक्षपद त्याला़च मिळालेले होते. ज्याला आपण मंडल आयोग म्हणतो. अशा अनुभवातून बिहार गेलेला असेल, तर लोकशाहीची हत्या वगैरे बाष्कळ गोष्टी कुठला बिहारी मतदार ऐकून घेईल? राजकारण निदान भारतात असेच चालते. त्यात आपला तो बाब्या असतो आणि दुसर्‍याचे ते कारटे असते. म्हणूनच कोणी नितीशच्या नावाने नाक मुरडू नये किंवा लालूंची हेटाळणी करू नये. अशा लबाडी वा बदमाशीला तत्वज्ञानाची शाल पांघरणारे बुद्धीमंत या देशात आहेत, तोवर रावण मरत नसतो.

3 comments:

  1. परवा चॅनलवर मटाचे एक पत्रकार नितीशवर खुप चिडले होते.तावातावाने भाजपशी भांडत होते इतका तर काॅंगरेसचा प्रवक्ता पन विरोध करत नव्हता.कारन त्यांचा नेता तथाकथित पुरोगामी दुस्रया कळपात गेला .आता ते मोदिविरोधी कुणाला उभे करणार?

    ReplyDelete
  2. अमृताचा थेंब मृताच्या तोंडावर टाकणारे बुद्धिवंत भुंगे!! हाहाहा!!

    ReplyDelete
  3. भक्तमंडळी ना समजवणे मुश्किलच नाही तर ना मुमकीन आहे

    ReplyDelete