Tuesday, July 25, 2017

बंगाली समिकरण

mamta muslims के लिए चित्र परिणाम

भारतातील तथाकथित पुरोगाम्यांना मुस्लिमांविषयी खुप प्रेम आहे, अशी एकूण समजूत आहे. किंबहूना काहीजण तसा आरोप नित्यनेमाने करीत असतात. पण वास्तविक तशी स्थिती नाही. राजकारणात मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळावीत, असा त्यामागचा स्वार्थ असतो. सर्वसाधारणपणे मुस्लिम हा आपल्या धर्मात खुप गुंतलेला असल्याने व त्याची धर्मविषयक अस्मिता प्रखर असल्यामुळे, मुस्लिम कळपाच्या मानसिकतेत जगत असतात. सहाजिकच त्यांची ही कळपाची मानसिकता जपली व जोपासली, तर त्यांना कळपाप्रमाणे वापरता येत असते. आपले वर्चस्व त्या लोकसंख्येवर रहावे म्हणून मौल्ला मौलवी कायम धर्माचे थोतांड माजवित असतात आणि जगण्याच्या प्रत्येक बाबतीत धर्माचे अवडंबर निर्माण करीत असतात. आपल्या व्यक्तीगत जीवनातही जे मौलवी धर्माचे इतके काटेकोर पालन करीत नाहीत, तितके सामान्य मुस्लिमाने पाळावे यासाठी ते आग्रही असतात. त्यासाठी सामान्य मुस्लिमाच्या धर्मभावनांचा खेळ चालविलेला असतो. अमूक एक गोष्ट इस्लामला मान्य नाही वा तमूक एक गोष्ट धर्माच्या चौकटी बाहेरची आहे, म्हणून गदारोळ केला जात असतो. जेणे करून मुस्लिमांना आपल्या धर्माचे पावित्र्य जपण्यासाठी सक्तीच चाललेली असते. परिणामी असा कळपातला समाज मौलवी व धर्ममार्तंडांच्या मुठीत बंदिस्त होतो आणि त्या लोकसंख्येला घाऊक भावाने विकण्यासाठी लोकशाहीत असे धार्मिक नेते आपले प्रस्थ माजवून घेत असतात. सहाजिकच त्या मतांसाठी लाचार असलेले लोकशाहीतील पक्ष व नेतेही त्या मौलवींना आपल्या गोटात ओढायला पुढे असतात. अशा रितीने भारतात मुस्लिम व्होटबॅन्क तयार झालेली आहे. आधी ही व्होटबॅन्क राजकीय पक्ष वापरत होते आणि हळुहळू ती व्होटबॅन्क म्हणजे तिचे म्होरकेच राजकीय पक्षांना वापरू लागले वा ओलिस ठेवू लागले.

मागल्या दोनतीन दशकात म्हणूनच मुस्लिम व्होटबॅन्क हे एक गारूड होऊन गेले. त्याचा इतका गाजावाजा करण्यात आला, की हळुहळू राजकीय विश्लेषक व पत्रकारांना सुद्धा त्याची बाधा झाली आणि एकूणच निवडणूकीच्या प्रचारात वा विश्लेषणात मुस्लिम व्होटबॅन्क हा सार्वत्रिक प्रकार होऊन गेला. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत कुठल्याही मतदानात वा मतदारसंघात किती संख्येने वा टक्केवारीने मुस्लिम लोकसंख्या आहे, त्याचा हिशोब अगत्याने सादर केला जाऊ लागला. किंबहूना मुस्लिमांना दुर्लक्षित करून भारतात कोणी सत्ता मिळवू शकत नाही की सरकार चालवू शकत नाही, अशी एक समजूत तयार झाली. ही समजूत अभ्यासक व विश्लेषक म्हणवून घेणार्‍यांमध्ये इतकी भक्कम झालेली होती, की नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायचा निर्णय घेतला, तेव्हापासून त्यांच्यासह भाजपाच्या पराभवाची ठाम भाकिते करण्यात सर्वच जाणकार गर्क होऊन गेले. मुस्लिम व्होटबॅन्क नावाच्या गृहीत वा पाखंडाची थोडी चाचपणीही करावी, अशी बुद्धी कोणाला झालेली नव्हती. पर्यायाने मोदींच्या विजयाबरोबर नुसता कॉग्रेसचा पराभव झाला नाही, तर पुरोगामीत्वाची वस्त्रे धारण करणार्‍या पत्रकारिता व विश्लेषक अभ्यासकांचाही दारूण पराभव होऊन गेला. कारण मुस्लिम व्होटबॅन्क हे कितीही सत्य असले तरी जितके तिच्या प्रभावाचे व्यापक चित्र रंगवण्यात आलेले होते, तितकी त्या व्होटबॅन्केची शक्ती नव्हती. तितका तिचा प्रभाव कुठल्याही मतदानावर पडत नव्हता. पण ते सिद्ध करायला कोणी पुढे आला नव्हता. सहाजिकच ज्या व्होटबॅन्केची इतकी मोठी किंमत नव्हती, त्यापेक्षा अनेकपटीने जाणते राजकारणीही त्याची किंमत मोजत होते. तो बुडबुडा २०१४ च्या लोकसभेने फ़ोडला. पण अजून राजकीय पुरोगामी पक्ष व पत्रकार त्या संभ्रमातून बाहेर पडायला राजी दिसत नाहीत. अन्यथा ममता बानर्जी आपल्या पायाने पराभवाची बेगमी करताना दिसल्या नसत्या.

सध्या पश्चीम बंगालच्या बशिरहाट भागात व २४ परगणा जिल्ह्यात मुस्लिम जमावाच्य दंगेखोरीने उच्छाद मांडलेला आहे. अर्थात अशी ही पहिलीच घटना नाही तर मालदा आदि जिल्ह्यातही अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत आणि त्याची व्याप्ती अन्य जिल्ह्यातही विस्तारत चालल्याचे अनुभव येत आहेत. बशिरहाट येथे हिंदू वस्तीवर कुठल्याशा नगण्य कारणास्तव मुस्लिम जमावाने हल्ला चढवला आणि जाळपोळ हाणामारी झाली. तेव्हा कुठलाही पोलिस त्यांच्या मदतीला आला नाही. तिथे जमावाला धुमाकुळ घालू देण्यात आला आणि त्याविषयी मुख्यमंत्री ममता बानर्जी यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या, तरी त्यांनी काणाडोळा केला. तसेच गतवर्षी मालदा जिल्ह्यात कालीचक येथे झालेले होते. मुस्लिमांचा हजारोचा जमाव तिथे एकवटला आणि त्यांनी हिंदू वस्तीवर हल्ला केला. दुकाने घरे जाळली. हिंसाचाराचे थैमान घातले गेले. अगदी पोलिस ठाणेही पेटवून देण्यात आले. पण त्याचा कुठलाही बंदोबस्त होऊ शकला नाही. उलट तिकडे पत्रकारांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आणि त्याविषयी कोणी प्रश्न विचारल्यास ममतांनी भाजपा अपप्रचार करीत असल्याचा प्रत्यारोप केलेला होता. बशिरहाट येथे तर त्याच्याही पुढली मजल मारली गेली. नंतर तिथे हिंदू रस्त्यावर उतरले आणि टिव्हीच्या कॅमेरासमोर त्यांनी पोलिस फ़क्त मुस्लिम गुंडांची पाठराखण करण्यासाठी असल्याचे ओरडून सांगितले. ममतांना असे आरोप मान्य नसले तरी ती बंगालची आजची वास्तविकता आहे. ममता मुस्लिम एकगठ्ठा मतांमुळे सत्तेवर येऊ शकल्या, हे सत्य आहे आणि आताही तीच व्होटबॅन्क टिकवण्यासाठी त्या मुस्लिम गुंडगिरीला पाठीशी घालत आहेत. त्याला मुस्लिम समाज जबाबदार नसून राजकीय नेते व ममताचा पक्ष तृणमूल कॉग्रेसचे मुस्लिमकेंद्री राजकारण जबाबदार होत आहे. त्यातून आपली सत्ता व मते भक्कम होतील हा ममतांचा भ्रम त्याला कारणीभूत आहे.

दोन दशकांपासून ममतांनी बंगालमध्ये डाव्या आघाडीची सत्ता उलथून पाडण्यासाठी कंबर कसली होती. पण जेव्हा मुस्लिम एकगठ्ठा त्यांच्या मागे आले, तेव्हाच त्यांना सता बळकावता आली. तोपर्यंत बंगालमध्ये डाव्या पक्षांचे बस्तान पक्के होते. पण सिंगुर नंदिग्रामच्या औद्योगिक विकासासाठी जमिनी ताब्यात घेण्याची सक्ती झाली आणि तिथे मुस्लिम डाव्यांपासून दुरावला. तेव्हाही स्थिती वेगळी नव्हती. मुस्लिमांच्या मौलवींना आपल्या गोटात राखून डाव्यांनी सत्ता हाती राखली होती. ममतांनी सत्ता मिळाल्यावर तेच केले आणि लागोपाठ दुसर्‍यांदा विधानसभेत बहूमत संपादन केले. पण ही सत्ता त्यांना एकट्या मुस्लिम व्होटबॅन्केने दिलेली नाही. हिंदू मतांचा मोठा हिस्सा ममताच्या पाठीशी असताना अधिकच्या मुस्लिम मतांनी ममतांचा तृणमूल पक्ष ही बाजी मारू शकला. बंगालमध्ये कधी हिंदू मते एकजीव होऊन कुठल्या पक्षाला मिळू शकली नाहीत. म्हणून मुस्लिम व्होटबॅन्क निर्णायक ठरलेली होती. तेच समिकरण उत्तरप्रदेश, बिहार वा आसाम आदि राज्यात राहिलेले आहे. गुजरात दंगलीनंतर वाजपेयी सरकारला पराभूत करण्यासाठी मोदी नावाचा एक बागूलबुवा मुस्लिम मतांचे नवे गठ्ठे निर्माण करण्यासाठी उभारला गेला आणि त्यातूनच देशभर मोदींचे नाव झाले. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात पुरोगाम्यांनी आपला स्वार्थ बघितला. पण त्याची प्रतिक्रीया म्हणून देशात प्रथमच हिंदू मतांची एक व्होटबॅन्क होण्याची प्रक्रीया सुरू झाली. पुरोगाम्यांच्या मुस्लिम लांगुलचालनाला कंटाळलेला वर्ग क्रमाक्रमाने मोदींकडे तारणहार म्हणून बघू लागला आणि व्होटबॅन्केच्या राजकारणला शह देण्याची प्रक्रिय़ा सुरू झाली. त्याच्याच परिणामी भाजपाला मोदींच्या नेतृत्वाखाली प्रथमच लोकसभेत बहूमत प्राप्त करता आले. तर त्यातून पुरोगामी पक्षांनी धडा शिकण्याची गरज होती. पण त्यांनी फ़सलेल्या जुगाराचाच खेळ पुढे चालू ठेवलेला आहे.

देशभरात १७-१८ टक्के मुस्लिम लोकसंख्या असल्याचे मानले जाते. तितके एकगठ्ठा मतदान करतात असे गृहीत धरले तरी तेवढ्याने लोकसभेत वा कुठल्याही विधानसभेत बहूमत मिळवणे शक्य नाही. ७५ टक्केहून अधिक हिंदू वा बिगर मुस्लिम मतांच्या जोडीला मुस्लिम गठ्ठा निर्णायक ठरू शकतो. याची उलट बाजू अशी, की तितक्या म्हणजे १७-१८ टक्के हिंदू मतांची एक व्होटबॅन्क उभारली, तर मुस्लिम मतांचा गठ्ठा सपाट होऊन जातो. त्याच्यापलिकडे जी मते उरतात, ती मुस्लिम असू शकत नाहीत आणि ती मते जिकडे झुकतील, त्या बाजूला निर्णायक विजय मिळू शकतो. मोदींच्या राजकारणाचा तिथेच विजय झाला आहे. म्हणूनच २३ टक्के मुस्लिम मते असूनही त्यांनी उत्तरप्रदेश विधानसभेत वा तिथल्या लोकसभा निवडणूकीत अफ़ाट यश मिळवलेले होते. पण ते समिकरण समजून घेण्याची विरोधी पक्षांना गरज वाटली नाही. म्हणून त्यांचा सातत्याने पराभव होत गेला आहे. एका बाजूला मोदींनी अमित शहांच्या संघटनात्मक कौशल्याचा वापर करून मुस्लिम लांगुलचालनाला पर्याय म्हणून हिंदू व्होटबॅन्क उभी केली आहे. तर दुसरीकडे त्याच समिकरणाला हातभार लावत पुरोगाम्यांनी मुस्लिम मतांवरच विसंबून रहाण्याचा अतिरेक केला आहे. १७-१८ टक्के मतांमध्ये सर्व पुरोगामी भागी करायला उतावळे असतात आणि उर्वरीत ७५-८० टक्के हिंदू वा बिगरमुस्लिम मते त्यांनी जणू मोदी शहांना आंदण देऊन टाकली आहेत. या मतांची आपल्याला गरज नाही, असेच जर पुरोगामी पक्षांचे वर्तन राहिले तर त्यांच्याकडून दुखावला जाणारा प्रत्येक हिंदू मतदार केवळ भाजपा वा मोदींकडेच वळू शकतो. कारण त्याच्यासाठी अन्य पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. आताही बंगाल असाच भाजपाच्या घशात घालण्याचे डावपेच ममता बानर्जी खेळत असल्यास, पुढल्या काळात तिथे भाजपा निर्णायक बहूमताने जिंकला तर नवल वाटण्याचे कारण नाही.

तीन राज्ये मुस्लिम लोकसंख्येच्या दृष्टीने महत्वाची आहेत. देशात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य म्हणून आसाम ओळखले जाते. तिथे ३४-३५ टक्के मुस्लिम संख्या आहे. इतके असूनही भाजपाने मागल्या विधानसभेत तिथे मोठे यश मिळवले. त्यानंतर बंगालचा क्रमांक लागतो आणि तिथे २७-२८ टक्के मुस्लिम संख्या आहे. तर उत्तरप्रदेशात २४ टक्के मुस्लिम आहेत. यापैकी बंगालमध्ये भाजपाला आजवर कधी फ़ारसे यश मिळाले नव्हते. पण मागल्या लोकसभा व विधानसभेत भाजपाचा तिथे स्वबळावर चंचूप्रवेश झालेला आहे. म्हणजेच प्रथमच तिथे हिंदू गठ्ठा मतदानाची प्रक्रीया सुरू झालेली होती. अशावेळी मुस्लिम मतांपेक्षा भाजपापासून दूर असलेल्या हिंदूंना भयभीत होण्यापासून रोखण्याला प्राधान्य असायला हवे. पण ममता असोत की पुरोगामी पक्ष असोत, त्यांनी मुस्लिमांच्या आक्रमकतेला खतपाणी घालून हिंदूंना अधिकाधिक भेडसावण्याला प्राधान्य दिलेले आहे. उत्तरप्रदेशात काय घडले, त्याचा अभ्यासही या लोकांनी केलेला नाही. उत्तरप्रदेशातून एकही मुस्लिम उमेदवार लोकसभेत पोहोचला नाही. तर विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६८ वरून २३ इतकी घटलेली आहे. याचा अर्थच मुस्लिम व्होटबॅन्क आसाम असो वा उत्तरप्रदेशात पुरती नामोहरम होऊन गेलेली आहे. इतक्या संख्येने मुस्लिमांची घट हा मतविभागणीचा परिणाम नसून, त्याला पर्यायी हिंदू व्होटबॅन्केचा उदय त्याचे खरे कारण आहे. अशी हिंदू व्होटबॅन्क पुरोगामी पराभवाचे कारण होत असेल, तर हिंदूंची गठ्ठा मते ही भाजपाची मक्तेदारी होऊ देण्यातच पुरोगाम्यांचा पराभव सामावलेला आहे. सहाजिकच बंगालसारख्या प्रांतामध्ये जिथे आजवर हिंदू मतांचे धृवीकरण होऊ शकले नाही, तिथे भाजपाला तशी संधी नाकारण्याचे राजकारण व्हायला हवे. पण बशिरहाट वा कालीचक आदि घटनाक्रम बघता, पुरोगामीच हिंदू व्होटबॅन्क उभारण्यात गर्क झालेले दिसतात.

अलिकडेच दोनतीन वाहिन्यांनी मतचाचाण्या घेतल्या होत्या. त्यात भाजपाचा मतांचा हिस्सा बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो आहे. त्याचे अन्य काही कारण दिसत नाही. ममतांनी अलिकडल्या काळात इतक्या टोकाचे मुस्लिम लांगुलचालन आरंभलेले आहे, की मुस्लिम गुंडांच्या टोळ्या बंगालभर मोकट हिंसाचाराचे रान उठवित आहेत आणि ममतांचे सरकार त्यांना वेसण लावू शकलेले नाही. बशिरहाटच्या घटनेनंतर तिथल्या हिंदू महिला व जमाव रस्त्यावर येऊन काय घोषणा देत होता, ते तपासून बघण्यासारखे आहे. बंगालमध्ये पोलिस फ़क्त मुस्लिम गुंडांचे संरक्षण करतात आणि हिंदूंना कुठलेही संरक्षण नाही, असे जमाव कॅमेरासमोर सांगतो. हा धक्कादायक संकेत आहे. बंगालचा हिंदू मोठ्या संख्येने भयभीत असल्याची ती खुण आहे. तिथला मुस्लिम ममतांच्या संरक्षणामुळे मोकाट झाला असून हिंदूंच्या सुरक्षेसाठी अन्य काही राजकीय पर्याय शोधायला हवा, अशी ही मानसिकता आहे. ती मानसिकता भाजपाला पोषक जमिन निर्माण करणारी आहे. त्या हिंदूंना ममता सुरक्षेची हमी देऊ शकलेल्या नाहीत. उलट त्यांनी मोदी व भाजपा यांच्यावर खापर फ़ोडण्याचा कांगावा केलेला आहे. त्यामुळे हिंदूंचा आत्मविश्वास कसा वाढणार त्याचे उत्तर मिळत नाही. कॉग्रेस वा डाव्यांनीही हिंदूंच्या या दुखण्यावर फ़ुंकर घालण्यात पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे हिंदूंच्या बाजूने बोलणारा एकमेव पक्ष म्हणून लोक भाजपाच्या आश्रयाला जाऊ लागले तर नवल नाही. त्यातून २५-३० टक्के हिंदू व्होटबॅन्क उभी रहाणे सहजशक्य आहे आणि त्याचा नजिकच्या काळातील परिणाम बंगालमध्येही आसाम उत्तरप्रदेशप्रमाणे भाजपाचा निर्विवाद विजय होऊ शकतो. कारण पुरोगाम्यांसह ममतांनी ७० टक्के हिंदूंना वार्‍यावर सोडून दिलेले आहे. त्यातली ३५ टक्के मतेही भाजपाला राज्यातील सत्ता बहाल करू शकतात. पण कांगावखोर ममता वा पुरोगाम्यांना हे कोणी समजवायचे?


2 comments:

  1. युपी मतदानाअदोगर कितीतरी वाहिन्या मुस्लिम मते कुठे कशी आहेत त्याची समीकरने काय हेतात हेच दाखवत होत्या.पन शहांनी हिंदु मतदानाचा टक्का वाढवला एका चॅनलवर मत न देनारे हिंदु मतदान करुन भाजपला मत दिल्याचे सांगत होते कारन काय तर मुस्लिम एकगठ्ठा मत दैत होते काॅगरेसला.हेच आता बंगाल मध्ये होणारेय.लेख खुप समर्पक आहे.

    ReplyDelete
  2. जुनी गृहीतके कामाची राहिली नाही की ती सोडून नवी त्रैराशिके मांडावी लागतात. ममता अजून जुनं मुस्लिम हेकट धरून बसल्यात.नव्या मुत्सद्देगिरीशी दोन हात करताना जुनी मुस्लिम अनुनयाची गन्जलेली शस्त्रे टिकणार काय हा विचारही सत्ता गुर्मीत डोक्यात बसत नसेल तर भाजपा तयार आहेच.

    ReplyDelete