Showing posts with label पवार. Show all posts
Showing posts with label पवार. Show all posts

Saturday, August 22, 2015

‘जाणत्या राजा’च्या तोतया इतिहासाचे काय?



शेवटी कोर्टानेच अपशकुनी मामांना फ़टकारल्याने बुधवारी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा सोहळा यथासांग पार पडला. पण त्या निमीत्ताने अनेकांचे बुरखे व मुखवटे पुरते फ़ाटून गेले. काहींचे तर आजवर विश्वासार्ह वाटलेले चेहरेही टरटरा फ़ाटले. जाहिर आरोप आक्षेपापासून कोर्टात दाद मागण्यापर्यंतचा एकच प्रमुख मुद्दा असा होता, की पुरंदरे हे इतिहास संशोधक नाहीत. म्हणूनच त्यांनी लिहीलेले व सांगितलेले शिवचरित्र विश्वासार्ह नाही. पण म्हणून ते शिवरायाची बदनामी करणारे ठरते, हा कुठला तर्क होता? आणि त्याचा आधार कुठला होता? माध्यमातून सामान्य माणसांची दिशाभूल करणे सोपे असते आणि तथाकथित पुरोगामी म्हणवणार्‍यांनी सहा दशके त्याच हत्याराने धुळफ़ेक चालवली आहे. पण न्यायालयात नीरक्षीर विवेकाने काम चालते आणि प्रत्येक आरोप साक्षी पुराव्यानिशी तपासून बघितला जातो. तिथे अशा बोगस आरोपाचे पितळ संपुर्ण उघडे पडले. नुसता आक्षेप फ़ेटाळून कोर्ट थांबले नाही, तर कोर्टाने याचिकाकर्त्यांवर आक्षेपाच्या संदर्भात प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा त्यांच्यापाशी कुठलेही तर्कसंगत उत्तर नव्हते. तर केवळ वेळकाढूपणा व अपशकुनी वृत्ती याचाच प्रत्यय आला. मग बचाव पक्षाच्या वकीलांनी केलेली मागणी कोर्टाने मान्य करून, याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. पण यानिमीत्ताने एक महत्वाचा प्रश्न विचारणे भाग आहे. शिवशाहीर म्हणवणार्‍या बाबासाहेबांनी कधी आपण इतिहास संशोधक असल्याचा दावा केलेला नाही. तर शिवकालीन इतिहासाचे संदर्भ घेऊन शिवरायांचे गुणगान करणारा शाहीर, अशीच बिरूदावली मिरवली आहे. तर त्यांच्याकडून इतिहासाचे दाखले मागणेच गैरलागु होते आणि मागल्या अर्धशतकाच्या भारतीय इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना जाब विचारण्याचे कर्तव्य विसरलेलेच, ते पाप करीत होते. आजकाल ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली मिरवणार्‍या शरद पवार यांच्या नावावर, खात्यावर जो खोटा इतिहास संशोधन व अभ्यासपुर्वक लिहीला जातो, त्यावरच्या आक्षेपांना कोणी उत्तरे द्यायची?

जनमानसात खोटे कसे रुजवावे आणि त्याचेच आभासी वटवृक्ष कसे तयार करावेत, याचे कौशल्य आजकालच्या तोतया पुरोगामी इतिहासकारांपाशी ठासून भरलेले असते. म्हणूनच पुण्याच्या विद्यापिठातले राज्यशास्त्राचे दोन प्राध्यापक शरद पवारांना व त्यांच्या ‘मराठाप्रधान’ राजकारणाला पुरोगामी वाटचाल ठरवून ‘जाणता राजा’ बनवण्याचे उद्योग करतात. त्यासाठी खोट्यानाट्या गोष्टी व घटना भरलेला इतिहास लिहून काढतात आणि ग्रंथालीसारखी ख्यातनाम संस्था तो दिशाभूल करणारा ग्रंथ प्रकाशित करते. त्यातला खोटेपणा जगाला ओरडून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचे पोस्टमार्टेमही पुस्तक रुपाने प्रसिद्ध झालेले आहे. पण आजही विद्यार्थ्यांना तेच फ़सव्या इतिहासाचे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून सक्तीने अभ्यासायला भाग पाडले जाते. तेव्हा इतिहासाची चाड असलेल्यांना सत्याची किती चाड उरली आहे, त्याची प्रचिती येते. ग्रंथालीने केवळ शरद पवार यांना चव्हांणांनंतरच्या महाराष्ट्राचा एकमेव जाणता राजकारणी ठरवण्यासाठी ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचा ग्रंथरूप भ्रष्टाचार केला आहे. त्याची पुर्ण तपशीलवार लक्तरे मी एका पुस्तकाद्वारे काढलेली आहेत. बाबासाहेबांच्या इतिहासज्ञानाला आव्हान देणार्‍या एकाही सह्याजीरावाने त्यावर प्रतिक्रिया कशाला दिलेली नाही? आजही त्याच माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बुद्धी भ्रष्ट केली जात आहे. त्याची यापैकी एकालाही फ़िकीर कशाला नाही? ज्या राजकारणाचे आजच्या पिढीला भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, त्यालाच महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य ठरवणारी ऐतिहासिक अफ़रातफ़र मी समोर आणली. त्यावर चिडीचूप मुग गिळून गप्प बसणार्‍यांचा भूषण-विरोधी तमाशा म्हणूनच निव्वळ कांगावा असतो. म्हणूनच असल्या कांगाव्याला आशीर्वाद दिल्याप्रमाणे खुद्द शरद पवार त्यामध्ये लुडबुड करतात, तेव्हा खरोखरच संताप येतो.

शिवकाळाचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आज सापडू शकत नाहीत. म्हणून बाबासाहेब असोत की शरद पवार असोत, त्यांचे तेव्हाच्या इतिहासाबद्दल एकमत होऊ शकत नाही, वाद होणारच. पण मागल्या अर्धशतकातल्या घटनांचे खुद्द शरद पवार साक्षिदार आहेत. म्हणूनच राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर या दोघा प्राध्यापकांनी ग्रंथाली प्रकाशित जी पवार गौरवगाथा गायली आहे, त्यातला खरेखोटेपणा खुद्द पवारच सांगू शकतील ना? ज्यांना ‘जाणता राजा’ संबोधलेले आजही आवडते, त्याच पवारांनी आपल्याच नावावर खपवला जाणारा खराखोटा इतिहास तपासून बघितला आहे काय? त्यांच्या राजकारणातील वडाची साल पिंपळाला लावून सरड्याला हत्ती ठरवण्याचा उद्योग उपरोक्त प्राध्यापकद्वयांनी केलेला आहे. त्याबद्दल हा जाणता राजा ‘अजाणता’ आहे, असे कोणी मान्य करावे? बाबासाहेबांच्या डझनावारी पुस्तकांचे ‘वाचन’ करणारा माणुस आपल्याच गुणगान करणार्‍या ग्रंथाविषयी अजाणता असेल काय? मग त्यातल्या खोट्या घुसडलेल्या गोष्टी व घटनांविषयी त्याने कधीतरी ह्या प्राध्यापक व प्रकाशकांकडे तक्रार केली होती काय? नसेल तर मग आज त्याला बाबासाहेबांच्या इतिहास ज्ञानाविषयी शंका विचारण्याचा नैतिक अधिकार उरतो काय? स्वत:विषयी खोटा व विकृत इतिहास आजच्या पिढीला सत्यकथन म्हणून गळी मारला जाण्याची चिंता पवारांना कशाला नसते? तर खोटाच इतिहास लोकांच्या गळी मारणे हाच अजेंडा आहे. म्हणून यातला कोणी सह्याजीराव बुद्धीमंत व्होरा-पळशीकरांच्या फ़सव्या इतिहास ग्रंथाला विद्यापिठीय अभ्यासात स्थान देण्यावर आक्षेप घेत नाही. पण व्याख्यानातून खेडोपाडी गेलेल्या बाबासाहेबांच्या इतिहासावर काहुर माजवले जाते. मी असे छातीठोकपणे सांगू शकतो. कारण मान्यवर अशा बहुतेक लेखक संपादकांच्या नजरेस हाच विकृत इतिहास व अभ्यास मी कित्येक वर्षापुर्वी आणून दिला आहे. पण उपयोग नाही.

व्होरा-पळशीकर किंवा ग्रंथालीचे मुखंड पुरोगामी असतात आणि मग जातीसाठी खावी माती, याच तत्वानुसार बाकीचे पुरोगामी आपल्याच ‘जातभाईंच्या’ अब्रुला तडा जाईल म्हणून त्याबद्दल मौन धारण करून बसतात. त्यालाही हरकत नाही. ग्रंथाली वा तत्सम लोकांनी पवारांची शाहिरी करायला माझा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण जेव्हा तोच खरा इतिहास म्हणून विद्यापीठीय अभ्यासात संदर्भग्रंथ म्हणून गळी मारला जातो, तेव्हा चिंतेचा विषय बनतो. खोटे पुरावे कसे निर्माण करावेत आणि तर्कबुद्धीने युक्तीवाद करत अमावास्येला पौर्णिमा कसे ठरवावे, याचा उत्तम नमूना म्हणून व्होरा-पळशीकरांच्या मुळ पुस्तकाचे परिशीलन करावे आणि मगच त्यातला धडधडीत खोटेपणा म्हणून त्याचे पोस्टमार्टेम असलेले माझे पुस्तक `कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ अभ्यासावे.  ते पोस्टमार्टेम करून एकोणिस वर्षे उलटली आहेत आणि अजून आपल्या खोटेपणाचा अभ्यासपुर्ण खुलासा हे पुरोगामी लेखक-प्रकाशक देवू शकलेले नाहीत. पण आता तर ते खर्‍या इतिहास व अभ्यासालाही आव्हान देण्यापर्यंत मुजोर झालेत. म्हणूनच त्याच्या पुरोगामी खोटेपणाचे मुखवटे संधी मिळेल तिथे व तेव्हाच फ़ाडणे अगत्याचे होऊन बसले आहे. ह्यात विलंब झाला तर उद्या शिवराय हाच स्वराज्याला धोका व अफ़जलखान वा औरंगजेब हेच स्वराज्याचे प्रणेते असल्याचाही इतिहास आपल्या गळी उतरवण्यापर्यंत मजल जाऊ शकते. अब्दुल कलामांच्या जागी दाऊद इब्राहीम आदरणिय व्यक्तीमत्व म्हणून आपल्या माथी मारला जाऊ शकतो. तोतया पुरोगाम्यांना वेळीच बाजूला करण्यात खरे प्रामाणिक पुरोगामी तोकडे पडल्याचा हा दुष्परिणाम आहे. आता प्रतिगामी अशा तोतया पुरोगाम्यांच्या मुजोरीला वेळीच थोपवू शकले नाहीत, तर हा देशही इतिहासजमा होऊ शकणार नाही. कारण आपल्याला इतिहासच उरलेला नसेल.

बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराच्या निमीत्ताने जे तोतयांचे बंड झाले, त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात तपशीलाने मांडलेली पुरोगामी तोतयेगिरी सविस्तर उपलब्ध आहे. ज्यांना ते पुस्तक हवे असेल त्यांनी चपराक प्रकाशन यांच्याशी संपर्क साधावा.

http://www.chaprak.com/contact-chaprak/

'चपराक'चे कोणतेही पुस्तक घरपोहच हवे असल्यास संपर्क साधा- 020 24460909 / 7057292092

Tuesday, July 21, 2015

माननिय शरद पवार यांना अनावृत्त पत्र



माननिय शरदरावजी पवार यांच्या सेवेशी,

बुधवारच्या वर्तमानपत्रात आपण मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र वाचले आणि वात्रटिकाकार रामदास फ़ुटाणे यांचे स्मरण झाले. श्रीयुत फ़ुटाणे आपले चहाते म्हणून ओळखले जातात. पण आम्ही त्यांना वात्रट समजण्याची घोडचुक केली होती. अर्थात त्याला खुद्द फ़ुटाणेच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच कायम आपल्या नावामागे वात्रटिकाकार अशी बिरूदावली मिरवलेली आहे. त्यामुळे आमच्यासारखे बहुतांश लोक त्यांना वात्रट समजून कधी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहू शकले नाहीत. पण वास्तवात त्यांच्या तथाकथित वात्रटिका म्हणजेच पुरोगामी वेदमंत्र असल्याचे आपल्या पत्रामुळे लक्षात येऊ शकले. आपण देवेंद्र या तरूण मुख्यमंत्र्याला तसा दृष्टांत दिल्याबद्दल तुमचे खरे तर त्यांनी आभारच मानायला हवेत. आगामी राज्यकारभार चालवताना फ़डणवीस सरकार कुठल्याही घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यापेक्षा आधी फ़ुटाण्य़ांच्या वात्रटिकांचा सखोल अभ्यास करतील अशी खात्री वाटते. हा फ़ुटाणे मध्येच कुठून आणला, अशी आपल्या मनात शंका येऊ नये म्हणून थोडे विस्ताराने सांगणे भाग आहे. फ़ुटाणे त्यांच्या एका वात्रटिकेने लोकाच्या अधिक लक्षात राहिले, ती म्हणजे पाठ्यपुस्तकातील शपथेवर केलेल्या भाष्यामुळे. ‘भारत हा माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत’, अशी ती शपथ आहे. त्यावर भाष्य करताना फ़ुटाणे म्हणतात, ‘भारत हा कधीकधी माझा देश आहे’. देशाचा वा महाराष्ट्राचा कारभार करताना तोच निकष असल्याचे आपण देवेंद्रना पत्र पाठवून कळवले नाहीत का? महाराष्ट्र हा कधीमधी शाहु, फ़ुले, आंबेडकरांचा असतो आणि अन्य प्रसंगी तो भलत्याच कुणाचा तरी महाराष्ट्र असतो, असाच आपल्या पत्राचा गोषवारा नाही का?

आपल्याला दंडवत घालणे प्रशस्त वाटत नाही. उभ्या महाराष्ट्रात कोण आपल्यापुढे नतमस्तक होत नाही? मागल्या चार दशकातले राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याला मान्यता असल्याने आपले शब्द व मार्गदर्शन खुद्द देशाचे नवे पंतप्रधानच घेत असतात. म्हणूनच आपण जे काही बोलता वा सांगता, त्याकडे गंभीरपणे बघणे भाग आहे. किंबहूना आपण मार्गदर्शन केले नाही तर राज्याचे व देशाचे फ़ार मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊनच, आपण वेळोवेळी संबंधितांना त्यांच्या कर्तव्याची जाणिव करून देत असता, याची पुर्ण कल्पना आहे. अन्यथा आपण नवखे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना पत्र कशाला लिहीले असते? कदाचित महाराष्ट्र हा शाहू फ़ुले आंबेडकरांचा असल्याचे फ़डणवीसांना ठाऊक नसल्याने आपण त्यांना समजावण्याचे काम केलेले असावे. तेही योग्यच आहे. कारण महाराष्ट्र कधी शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो आणि कधी तो अशा विभूतींचा नसतो, याबद्दल आपल्या इतकी जाण कदाचित अन्य कोणालाच नसावी. अन्यथा आपण आजच असे पत्र कशाला लिहीले असते? सध्या महाराष्ट्र फ़ुले आंबेडकरांचा आहे किंवा नाही, यानुसारच सरकारचा कारभार चालायला हवा असेल, तर वेळोवेळी ते सांगणारा कोणीतरी हवाच ना? तसे नसते तर असेच पत्र आपण डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यावर तात्काळ तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहीलेच असते. पण बहुधा तेव्हा दोन वर्षापुर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्र शाहू फ़ुले आंबेडकरांचा नसावा. असताच तर असेच पत्र चव्हाण यांना पाठवण्यात आपण कशाला हलगर्जीपणा केला असता? तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याही बाबतीत म्हणता येईल. त्याही वेळेस आजचेच मुख्यमंत्री सत्तेत होते. पण महाराष्ट्र तेव्हाही बहुधा शाहू फ़ुले आंबेडकरांचा नव्हता. म्हणून आपण पत्र लिहीण्याचा उतावळेपणा केलेला नसावा. त्यासाठी आपण दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे.

कदाचित आमच्या अल्पमतीला यातला फ़रक समजत नसावा. पानसरे किंवा दाभोळकर भले पुरोगामी विचाराचे असतील आणि अत्यंत संयमी पद्धतीने आपले विचार मांडत असतील. पण त्यांची हत्या होऊनही आपल्याला पत्र लिहीण्याइतकी परिस्थिती गंभीर वाटली नव्हती. तितकी आज आपले पुत्रतुल्य जितेंद्र आव्हाड यांना नुसत्या धमक्या आल्यावर परिस्थिती चिंताजनक झालेली आहे. म्हणून आपण तातडी दाखवून देवेंद्रना पत्र लिहीले असणार. त्याचेही कारण समजून घ्यायचा आम्ही प्रयास करीत आहोत. आव्हाड त्यासाठी उंच उंच हंड्या उभारतात आणि त्यातून पुरोगामी विचार मांडण्याचे कष्ट घेतात, हे उमजण्यासाठी आवश्यक असलेली बारा-मती आमच्यापाशी नाही, त्याचा हा परिणाम. दाभोळकर वा पानसरे यांनी कधी अशा उंच हंड्या बांधल्या नाहीत किंवा त्याचे समारंभ थाटामाटात पार पाडण्यासाठी अभिनेते व कलावंताचा मेळा भरवला नाही. त्यांना पुरोगामी विचार मांडण्याची कला आत्मसात करता आलेली नसावी. शाहू फ़ुले आंबेडकरांच्या विचारांत दहीहंडी खेळणे, त्याच्या स्पर्धा योजणे वा त्यावर करोडो रुपयांचा चुराडा करणे; याच्या महत्तेचा थांगपत्ता पानसरे दाभोळकरांना लागला नव्हता. सहाजिकच ते पुरोगामी असले तरी त्यांच्या हत्येने बहुधा पुरोगामी विचार मागे पडण्याचे भय आपल्याला जाणवले नसावे. मग आपण त्यासाठी पत्र लिहीण्याचे कष्ट कशाला घेणार? पण ज्यांच्या खात्यात उंच दहीहंडी व करोडो रुपयांची बक्षीसे ठेवण्याचे कर्तृत्व जमा आहे, त्यांना नुसत्या धमक्या आल्याने आपण इतके हळवे व घायाळ झालात. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना व उभ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचार कसे कमीअधिक दर्जाचे असतात, ते समजू शकले. दाभोळकर पानसरे यांच्यापेक्षाही जितेंद्र आव्हाड हे किती अधिक प्रभावी पुरोगामी आहेत, त्याचा साक्षात्कार व्हायला मदत झालेली आहे. अन्यथा बहुतांश पुरोगामी मंडळी दहीहंडी म्हणजे पोरकट धार्मिक थोतांड समजून बसली होती.

शाहू फ़ुले आंबेडकराच्या महाराष्ट्रातच खैरलांजी वा जवखेडे नावाची गावे आहेत काहो शरदराव? कारण तिथे दलितांच्या अतिशय क्रुर हत्या झाल्या. त्यांना जिवानिशी मारणारे आणि त्यावर पांघरूण घालणारे कोणी पुरोगामी विचाराने प्रवृत्त होऊन इतके हिडीस कृत्य करीत होते काय? अवघ्या दलित समाजात त्यामुळे संतापाची लाट उठली होती आणि जागोजागी निदर्शने व रास्ता-रोको झालेला होता. पण तेव्हा आपल्याला दोन शब्द लिहून फ़ुले आंबेडकरांचे स्मरण करायची बुद्धी झालेली नव्हती. याचा एकच अर्थ निघू शकतो, की जवखेडा व खैरलांजी ही गावे पुरोगामी महाराष्ट्रातली नसावीत. किंवा तिथे झालेली हत्याकांडे पुरोगामी पराक्रम असावा. आव्हाडना मिळालेल्या धमक्यांपेक्षा तिथे मारले गेलेले सामान्य जीव नगण्य किंमतीचे असावेत. की आपल्याला अभिप्रेत असलेल्या शाहू फ़ुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे खेड्यापाड्यातले दलित पुरोगामीत्वाची किंमत आपल्या हत्येतून मोजायलाच जन्माला येतात असे म्हणायचे? कारण त्यांच्या हत्या, विटंबना व अत्याचार होऊन दिर्घकाळ उलटून गेला आहे. पण चार ओळीचे पत्र कुठल्या मंत्र्याला वा मुख्यमंत्र्याला लिहायची इच्छा आपल्याला झाल्याचे कुणाला दिसले नाही, शरदराव? म्हणून तर वाटते की हा महाराष्ट्र कायम स्वरूपी म्हणजे बारा महिने तेरा काळ पुरोगामी नसावा. कधी अधुनमधून तो पुरोगामी व अकस्मात कधीतरी प्रतिगामी असावा. त्यात मुहूर्त शोधून पुरोगामी काळात कार्यभार उरकला पाहिजे काय? पानसरे दाभोळकर यांच्या हत्या चुकीच्या ग्रहकाळात झाल्या काय? जवखेडा व खैरलांजीच्या घटना पुरोगामी ग्रह वक्री असताना झालेल्या होत्या काय? की त्या अत्याचार हत्याकांडे घडताना महाराष्ट्र पुरोगामी नव्हता? पुरोगामी व प्रतिगामी ह्या गोष्टी सोयीनुसार बदलणार्‍या असतात काय शरदराव? जरा उलगडून स्पष्ट शब्दात एकदा लोकांना समजावून सांगाल का?

बरे पुरोगामी प्रतिगामी बाजुला ठेवूया,. धमकी या शब्दाचा अर्थ तरी कसा घ्यायचा? कोणीतरी आव्हाडांना चार शब्दांचा इशारा दिला, मग त्याला धमकी म्हणायचे? तर मध्यंतरी सर्व वाहिन्यांवर खुद्द जितेंद्र आव्हाड ठाण्यातल्या पोलिस वरीष्ठांना जे प्रेमाने समजावताना दिसत होते, त्याला धमकी म्हणायचे की कसे? मुंब्रा कळवा भागातल्या अनधिकृत बांधकामांना पाडायला जे सरकारी पथक गेले होते, त्याला संरक्षण देणार्‍या पोलिसांना आव्हाड काय समजावत होते? ‘तुम़ची नोकरी घालवू शकतो’ हेच शब्द होते ना? वाहिन्यांवर ते शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते आणि त्यातली धमकी जगाला ऐकू आली. मग आपले कान का ऐकू शकले नाहीत? आपण त्याबद्दल आव्हाडांना चार खडे बोल ऐकवले आहेत का? नसतील तर काही कारण असेलच ना? बहुधा आव्हाड पोलिसांना शाहू फ़ुले आंबेडकरांचे विचार समजावत असतील ना? आपणच तर मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हणता, आव्हाड महाराष्ट्रात पुरोगामी विचार प्रसाराचे काम करतात. त्याचे प्रात्यक्षिक पोलिसांच्या नोकर्‍या घालवण्याच्या धमकीतून मिळू शकते. पोलिसांनाच धमकी देण्यापर्यंत ज्याची मजल जाते, तो किती शांततावादी माणूस असेल ना? असे काम कधी दाभोळकर पानसरेंना जमले नाही. म्हणून तर आपण त्यांची हत्या होऊनही विचलीत झाला नाहीत, की पत्र लिहीण्याचा प्रपंच केला नाहीत. बहुधा आपल्याला आव्हांडांच्या कामातून शाहू फ़ुले आंबेडकरांचे पुरोगामी विचार अवगत झाले असावेत. जे कधी पानसरे वा तत्सम कार्यकर्त्यांना ऐकायलाही मिळाले नाहीत. अन्यथा त्यांनी हकनाक नुसत्या चर्चा भाषणात कालापव्यय करण्यापेक्षा आव्हाडांप्रमाणेच पुरोगामी दहीहंड्या बांधून किती महान कार्य केले असते ना? जरा सविस्तर लिहा शरदराव. शक्य झाल्यास आव्हाडांची वाहिन्यांवर प्रक्षेपण करून पुरोगामीत्वाची व्याख्याने व प्रवचने जारी करा. वेगाने महाराष्ट्र पुरोगामी होईल आणि दाभोळकर पानसरे यांच्या अनुयायांसहीत जवखेडा खैरलांजीच्या अन्यायाला न्याय मिळवू बघणारेही आव्हाडांच्या नेतृत्वाखाली क्रांतीची ध्वजा उंच फ़डकवू लागतील. जरा महाराष्ट्र कधी पुरोगामी व शाहू फ़ुले आंबेडकरांचा असतो व नसतो त्याचे पंचांगही बनवायचे काम त्वरेने हाती घ्यावे. ही आग्रहाची विनंती.

Monday, July 13, 2015

‘मागचे दोर’ कापणारे ‘शेलारमामा’



विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या मुहूर्तावरच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये तुंबळ जुगलबंदी जुंपली आहे. एका बाजूला सभागृहत विरोधकांना समर्थपणे तोंड देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच गोटातून आपल्या मित्र पक्षावर हल्ले करायची संधी शोधली जात आहे. अर्थात शिवसेनाही त्यात मागे नाही. दोन्ही मित्रपक्ष मैत्री कशी नसावी, याचा वस्तुपाठ महाराष्ट्रापुढे मांडण्यासाठी आपली बुद्धी व शक्ती पणाला लावत आहेत. तसे बघितले तर मागल्या वर्षी याच दरम्यान ही जुगलबंदी सुरू झाली होती. भाजपाचे नवे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची नेमणूक झाल्यावर त्यांनी मातोश्रीवर पायधुळ झाडावी, यासाठी पहिला हल्ला शिवसेनेच्या काही उतावळ्यांनी किंवा ‘शहा’ण्यांनी सुरू केला होता. त्याची काहीही गरज नव्हती. मग त्याला भाजपानेही तितक्याच उतावळेपणाने उत्तर देण्याचा ‘शहा’णपणा सुरू केला. त्याच्या परिणामी पाव शतकापासून चालत आलेली युती तुटण्यापर्यंत मजल गेली. मात्र अजून त्यातून सावरण्याची बुद्धी दोन्ही बाजूंना झालेली नाही. यात थोरला भाऊ कोण अशी स्पर्धा आहे. मतदानातून आपल्याला थोरला भाऊ सिद्ध करण्यात भाजपा यशस्वी झाला, तरी त्याला थोरल्याचा आब राखता येत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. शिवसेना आरंभापासून युतीतला थोरला भाऊ होता, तेव्हा धाकट्या भाजपाला संभाळून घेण्याचा मोठेपणा बाळासाहेब सेनाप्रमुख म्हणून दाखवत होते. म्हणून कितीही वादविवाद झाले तरी युती टिकून राहिली होती. तितका मोठेपणा भाजपाला आज दाखवता आलेली आहे काय, याचाही विचार आजच्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने करायला हरकत नाही. अन्यथा दिर्घकाळानंतर देशाचे नेतृत्व हाती आलेले आहे, त्याच्यावर गदा यायलाही विलंब होणार नाही. किंबहूना दिल्ली विधानसभेच्या निकालांनी तोच इशारा दिलेला आहे.

बांद्रा बुरूजावरून गर्जना करणार्‍या ‘शेलारमामां’ना त्याची जाण नसली तरी देवेंद्र फ़डणवीस व विनोद तावडे यांच्यासारख्या अभ्यासू नेत्यांनी परिस्थितीचा विचार करून असल्या जुगलबंदीला आवर घातला पाहिजे. अमित शहा यांना पक्षाध्यक्ष झाल्यापासून झिंग आलेली आहे. उत्तर प्रदेशातील यश शहांपेक्षा मोदींच्या लोकप्रियतेचे होते. तितकेच दिल्लीतल्या सातही जागा जिंकण्यात मोदी नावाची जादू सामावलेली होती. पण त्याच जादूची अवघ्या नऊ महिन्यात त्याच अमित शहांनी माती करून दाखवली, हे सुद्धा एक वास्तव आहे. दिल्लीत आयुष्य घालवलेल्या भाजपाच्या अनुभवी व तळागाळातील नेत्यांना बाजूला टाकून, उथळ उनाड नेत्यांना हाताशी धरून शहांनी जी रणनिती आखली; त्यानेच भाजपाचे फ़ेब्रुवारीत पुरते पानिपत करून टाकले. फ़ुटकळ केजरीवाल यांच्या पक्षाने संपुर्ण दिल्ली विधानसभा खिशात टाकताना मोदी लाट म्हणजे वावटळ असल्याचे सिद्ध करून दाखवले. तो मोदींचा पराभव नव्हता, की केजरीवाल यांचाही विजय नव्हता. इतका दिल्लीचा पराभव अमित शहांच्या उथळ रणनितीचा दारूण पराभव होता. कृतीपेक्षा नुसत्या शब्दातून लोकांना घायाळ करण्यातून शहा आपल्या मित्रांनाही शत्रू बनवण्यात कुशल आहेत. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसले आहेत. सहा महिन्यापुर्वी ज्या मोदींना डोक्यावर घेतलेले होते, त्यांनाच अफ़जलखान म्हणून हिणवल्यानंतरही एक कोटी मते शिवसेनेने मिळवली हा भाजपाचा नव्हेतर शहांचा पराभव होता. तितकाच तो शेलार व तत्सम तोंडाळ नेत्यांना पराभव होता. तो जिंकलेल्या जागांच्या संख्येने झाकला गेला होता. परंतु महापालिका व जिल्हा परिषदेच्या मतदानातून शहानितीचा तो पराभवच चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मागल्या तेरा वर्षात नरेंद्र मोदींनी राजकारणात एकही चुक न करता आपल्या विरोधकांना धुळ चारली. मात्र शहांना पक्षाध्यक्ष करण्यात त्यांनी पहिली ऐतिहासिक चुक केली असेच आता म्हणावे लागते आहे.

दिडदोन वर्षापुर्वी राहुल गांधी ज्या बेफ़िकीरीने आपल्याच पक्षाच्या जागोजागी होत असलेल्या पराभवानंतर मुक्ताफ़ळे उधळत होते, त्याची परिणती पुढे लोकसभेच्या अफ़ाट मोठ्या परभवात झाली. होत असलेल्या चुका राहुल तेव्हाच सुधारू शकले असते. किंवा कॉग्रेसने राहुलना बाजूला करून त्या चुका सुधारल्या असत्या, तर पक्षाला इतक्या हास्यास्पद पराभवाला सामोरे जावे लागले नसते. पण इतके होऊनही राहुल गांधींना अजून त्याचा स्परर्श झालेला नाही. काहीशी तशीच अमित शहांची मनस्थिती दिसते. महाराष्ट्रात कालपरवा शहा आले आणि त्यांनी क्षेत्रिय कार्यकर्त्यांच्य शिबीरात मार्गदर्शन केले. पुन्हा त्यांनी शत-प्रतिशतची टेप वाजवली. माणसाला दोन दिवस आधी हाती आलेले गोंदिया-भंडार्‍याचे निकाल ठाऊक नव्हते काय? मागली पाच वर्षे तिथे भाजपाचा झेंडा फ़डकत होता आणि शत-प्रतिशत भाजपाचीच सत्ता होती, हे शहांना ठाऊक नव्हते काय? असेल तर ती सत्ता कशामुळे गमावण्याची वेळ आली, याचा पक्षध्यक्ष म्हणून त्यांनी विचार करायला हवा होता. त्यानुसारच मार्गदर्शन करायला हवे होते. पण महाराष्ट्रात कुठे कसले वारे वहात आहेत, त्याचा थांगपत्ता नसलेला हा माणूस इथे येऊन काय बोलला? विधानसभेत जी आयात करून संख्या हाती लागली, त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत करताना असलेली लोकमान्यताही गमावण्याची पाळी आली. याचेही भान नाही. अशा माणसाच्या हाती भाजपची सुत्रे असतील, तर मोदी त्या पक्षाला यापुढे किती वाचवू शकतील, याचीच शंका आहे. मग असा माणूस इथे येऊन वायफ़ळ बडबड करतो आणि बांद्रा येथील शेलारमामा त्याचेच तोरण बांधून तानाजीचा मामा असल्यासारखे ‘मागले दोर’ कापल्याच्या गर्जना करू लागतात. त्यांना एक आठवत नाही, की तानाजी धारातिर्थी पडल्यावर पळत सुटले त्या मराठ्य़ांना थोपवण्यासाठी तेव्हाच्या शेलारमामाने मागचे दोर कापले होते.

अजून शिवसेना भाजपा यांची युती सत्तेत एकत्र आहे आणि सेनेच्या पाठींब्याची गरज आहे. म्हणूनच तिला सोबत घेतांना मुख्यमंत्र्यांनी पुढल्या सर्व निवडणूका युतीनेच लढू, अशी ग्वाही दिलेली होती. औरंगाबाद, नवी मुंबई आणि विरार वसईच्या निवडणूकांना तसेच सामोरे जाऊनही भाजपाला लोकसभेचे यश टिकवता आलेले नाही. विधानसभेत छोटा भाऊ ठरलेल्या शिवसेनेने त्यात बाजी मारली. भंडारा-गोंदियात असलेली सत्ताही भाजपाला गमावण्याची पाळी आलेली आहे. म्हणजेच आहे ती सत्ता टिकवायची तर सेनेची गरज आहे. अर्थात पवारांच्या खांद्यावर बसून मुंबई क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष झालेल्या ‘शेलारमामां’ना ते कळायला वेळ लागेल. सेना गेली तरी पवारांच्या बाहेरील पाठींब्यावर देवेंद्र सरकार चालवू. अशा वल्गना शेलार करत असतील, तर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना पंधरवड्यासाठी कसे सत्तेला वंचित रहावे लागले त्याची आठवण करणे लाभदायक ठरेल. आघाडी मोडल्यावर राज्यपालांना भेटून राष्ट्रवादीने पाठींबा काढून घेतला आणि पृथ्वीराजांना मतदानाच्या पंधरा दिवस आधी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्याला ‘राष्ट्रवादीचा पाठींबा’ असे म्हणतात. मागचे दोर कापले, म्हणून गर्जना करणे सोपे असते. पण समोर कशाच्या आधाराने लटकत रहायचे, याचेही भान असावे लागते. शिवसेनेच्या कोपरखळ्यांकडे दुर्लक्ष करण्याने जितके नुकसान होणार नाही, तितके त्याला उत्तर देण्यातून होते आहे. माध्यमे व बातम्यातून हिशोब चुकते होतील. पण कसोटीचा प्रसंग आला तेव्हा मग नैसर्गिक मित्राचा धावा करावा लागला, हेही विसरून चालत नाही. अर्थात त्यामुळे बिघडलेली युती पुन्हा सांधली गेलेली नाही आणि तिचे परिणाम पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीला भोगावे लागत नाहीत, की लागणार नाहीत. देवेंद्र सरकार त्याचे परिणाम भोगते आहे. तेव्हा आशिष शेलार यांनी शेलारमामाच्या भूमिकेतून बाहेर पडावे आणि सेनेकडे दुर्लक्ष करायला शिकावे. प्रत्येक टिप्पणीला उत्तर देत बसले असते, तर बारा वर्षांनी मोदी पंतप्रधान पदावर झेपावू शकले नसते. मोदींच्या चहात्यांचे रुपांतर शहाभक्तांमध्ये होताना दिसते आहे, तोच भाजपासाठी सर्वात मोठा धोका आहे.


Saturday, July 11, 2015

दाऊदची शरणागती आणि मी (भाग १)



माझ्या स्मरणशक्तीचे कौतुक वाचकांना तसेच माझ्या अनेक तरूण पत्रकार मित्रांनाही आहे. मलाही त्याचा थोडा अभिमान आहे. कारण पत्रकारितेत बातमी संदर्भाने अधिक संपन्न व प्रभावी होत असते. पण खरे सांगतो या शनिवारी एक असे स्मरण आले, की माझाच मी काहीसा खजील झालो. कारण दाऊदच्या शरणागतीची बातमी सर्वात आधी मी १९९४ साली दिलेली होती आणि त्याची कोणाला दखलही घ्यावीशी वाटलेली नव्हती. मात्र मलाच त्याचे गेला आठवडाभर स्मरण झाले नाही. अर्थात तेव्हा जेठमलानी यांनीही त्याविषयी मौन घारण केलेले होते. पुढे काही वर्षांनी जेठमलानी याविषयी बोलू लागले आणि अधूनमधून त्यावर धुरळा उडून बसत राहिला. पण कुठलेही गंभीर वा ठोस मुद्दे कोणी समोर आणू शकला नाही. आणूही शकत नव्हता. कारण अशा गोष्टी उघड होत नसतात किंवा सरकारी पातळीवरही हाताळल्या जात नसतात. अन्य मार्गाने त्याच्या हालचाली सुरू असतात. भलतेच कोणी मध्यस्थ त्यात निरोप्याचे काम करीत असतात. मग दोन्ही बाजूंना मान्य होणार्‍यांना त्यात पुढे केले जाते आणि त्यातली खरी देवाणघेवाण सुरू होते. नुसते जेठमलानींना दाऊदने ऑफ़र देवून पुढे काही होत नसते आणि जे काही होत असते, त्याची जाहिर वाच्यता कोणी करत नाही. त्यातून काही साधले तरी त्यातला सौदा लपवला जात असतो. मग आज शरद पवार वा अन्य कोणी काय खुलासे देतात, त्याला कुठला अर्थ असू शकेल? सहाजिकच ठराविक काळानंतर अशा अडगळीत पडलेल्या शिळ्यापाक्या बातम्यांना फ़ोडणी देवून ऊत आणला जातो. पण ठोस कुठलीच माहिती पुढे येत नाही. मग लोक गोंधळतात, विसरून जातात. पण तेव्हा खरोखरच दाऊदच्या शरणागतीच्या हालचाली निदान त्याच्याकडून चालू होत्या, असे मी तरी नि:संशयपणे सांगू शकतो. कारण त्याचा सज्जड पुरावा माझ्यापाशी आहे. जो खरे तर त्यात गुंतलेल्या कोणीतरी द्यायला हवा होता.

झाले असे, की मलाही ही बाब किंवा माझ्याच बातमीचा संदर्भ आठवला नाही. पण या विषयाला कालपरवा नव्याने हवा मिळाली आणि त्याचा खुलासा करताना कुठेतरी ‘१९९४’ सालचा उल्लेख झाला आणि माझी स्मरणशक्ती कामाला लागली. त्याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुरलीधर शिंगोटे यांनी ‘आपला वार्ताहर’ ह्या नव्या मराठी दैनिकाची सुरूवात केली. त्याचा आरंभीचा संपादक मीच होतो. तेव्हा आजच्यासारखा वृत्तवाहिन्यांचा पसारा उभा राहिलेला नव्हता. किंबहूना संपुर्ण दिवसभर बातम्या देणारा टिव्ही, ही कल्पनाच भारतात कुणाला सुचलेली नसावी. म्हणून लोकांना छपाई केलेल्या वृत्तपत्रावरच बातम्यांसाठी अवलंबून रहावे लागत असे. वाहिन्या नव्हत्या की मोबाईल आलेले नव्हते. इंटरनेट ही कल्पना मूळ धरत होती. त्यामुळे नवा पेपर मराठीत निघाला. त्याचा खप मिळवण्यासाठी सनसनाटी बातम्या व वेगळेपणाला खुप महत्व होते. त्याच काळात ‘नवाकाळ’ सामान्य माणसाचा लोकप्रिय पेपर होता आणि उद्याचा ‘नवाकाळ’ आज रात्री घरी परतणार्‍यांना रेल्वे स्थानकात विकला जात असे. उशीरा कामावरून परतणारे उपनगरातले रेल्वेप्रवासी विरंगुळा म्हणून अशा पेपरचे स्वागत करीत. ‘वार्ताहर’ आम्ही त्याच स्पर्धेत उतरवला होता. मात्र नऊच्या सुमारास विक्रेते दादरला व बोरीबंदरला जमा होत आणि मोजक्या प्रति घेऊन प्रत्येक स्थानकावर विकायला जात. असा तो काळ होता. आरंभानंतर दोन महिन्यात म्हणजे आक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान अशीच एक सनसनाटी बातमी माझ्या सुत्रांकडून मला मिळाली. ती धक्कादायक होती. दाऊद शरणागती पत्करून पुन्हा भारतात यायला उत्सुक आहे. मात्र अशा बातमीला कुठलाही ठोस आधार नव्हता, दिल्लीतल्या माझ्या एका ज्येष्ठ पत्रकार लेखकाकडून मिळालेली ही माहिती होती. पण त्यावर विसंबून प्रसिद्धी देण्याची मला हिंमत होत नव्हती.

कारण सरळ होते, विषय अतिशय नाजूक तितकाच गंभीर होता. कुठलाही पुरावा नव्हता किंवा सरकारी गोटातून त्याला कुठला आधार मिळत नव्हता. सहासात दिवस तरी ही माहिती माझ्याकडे असून छापायची हिंमत मला होत नव्हती. मग अचानक एकेदिवशी मुंबईतला एक वजनदार उर्दू संपादक भेटला आणि बोलता बोलता तोच संदर्भ सांगून गेला. मी त्याला अधिक छेडत गेलो आणि दिल्लीच्या सुत्रांकडून आलेल्या माहितीवर शिक्कामोर्तब होत गेले. किंचित तपशीलाचा फ़रक होता. दाऊद शरण यायचा प्रयत्न करतोय आणि सौदा करू बघतोय, अशी दिल्लीतून मिळालेली बातमी होती. तर हा उर्दू संपादक त्याच्या पुढली प्रगती सांगत होता. दाऊद थेट शरण येणार नाही. सौदा असा असेल, की आपल्या कोणातरी विश्वासू सहकार्‍याला तो आधी भारतात पाठवून देईल. त्याच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे अटीशर्ती अंमलात आणल्या गेल्यानंतरच दाऊद स्वत: यायला राजी असेल, अशी या उर्दू संपादकाकडून मिळालेली माहिती होती. पण अशा दोन अजिबात दोन टोकाच्या गोटातून माहिती एकच मिळत होती. दाऊद मायदेशी यायचे आणि त्यासाठी काही अटी घालून शरण यायचे प्रयत्न करतोय. दिल्लीचा गोट हा मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात वावरणारा होता, तर उर्दू संपादक मुंबईच्या मुस्लिम वस्तीतला जाणता होता. म्हणूनच त्याला दाऊद टोळीतल्या हालचालींची बित्तंबातमी मिळत असे. म्हणजेच मला आठवडाभर आधीपासून मिळालेली माहिती अगदीच बिनबुडाची नव्हती. मात्र अशा हालचाली कोणी कबुल करत नाही, की त्याला दुजोरा देत नाही. म्हणूनच आपल्या तारतम्याच्या आधारावरच त्या छापण्याचे धाडस करायचे असते किंवा त्याकडे साफ़ पाठ फ़िरवायची असते. म्हणून तर मी सहासात दिवस तिकडे पाठ फ़िरवली होती. पण उर्दू संपादकाने अधिक तर्कशुद्ध विवरण दिलेले असल्याने मला दिल्ली गोटातली माहिती विश्वासार्ह वाटली.

मग मी धाडस करण्याचा निश्चय केला. धाडस एवढ्यासाठी, की आमचे दैनिक अगदीच नवे आणि वाचकाच्या व पत्रकारितेच्या खिजगणतीत नगण्य होते. कितीही धमाल बातमी असली, तरी त्याची फ़ारशी दखल घेतली जाणे शक्य नव्हते. मात्र रात्रीच्या बाजरात एकाच दिवसात मोठी झेप घ्यायला ती बातमी दमदार ठरणारी होती. पण दुसरीकडे माहिती अगदीच फ़सवी निघाली, तर आमच्या नवजात दैनिकाची मुंडी कायद्याने पिरगाळली असती. शिंगोटे हा उत्तम विक्रेता होता. त्याने माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या रात्री दुप्पट प्रती छापून आम्ही बाजारात धमाल उडवली. दाऊद आपल्या जवळच्या साथीदारासह भारताला शरण येणार, अशी ती बातमी आम्हाला त्या रात्रीचा मोठा खप मिळवून द्यायला पुरेशी ठरली. पण त्याची अन्य माध्यमांनी कुठे दखल घेतली नाही. ज्या उर्दू संपादकाने ती माहिती मला दिलेली होती, त्याने मात्र दुसर्‍या दिवशी त्याचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध केलेले होते. त्यात काही गैरही नव्हते, कारण दाऊद शरण येण्याची कल्पनाच कोणाला पटणारी नव्हती आणि त्याबाबत कुठे चर्चाही नव्हती. इतर माध्यमांनी वा पत्रकारांनी आमच्यावर कशाला विश्वास ठेवायचा? कारण सरकारी पातळीवर तसे कुठे प्रयत्न असल्याची खबर नव्हती, की तशा हालचाली होत असल्याचेही वृत्त नव्हते. मग एका नवख्या दैनिकाच्या हेडलाईनला कोणी कशाला किंमत द्यावी? माझी तशी अपेक्षाही नव्हती. मात्र आपल्यावर पोलिस वा सरकारी बडगा उगारला जाऊ नये, ही अपेक्षा होती. तीही पुर्ण झाली. कारण कुणाची कटकट झाली नाही. मात्र आमची ती बातमी खोटी ठरली नाही. तिचे धागेदोरे समोर येत गेले आणि दाऊदच्या आजही चर्चेचा विषय होणार्‍या शरणागतीच्या बातमीचा तोच सज्जड पुरावा होता व आहे. ‘आपला वार्ताहर’ ने ती बातमी प्रसिद्ध केली आणि सहाव्या दिवशी एक धमाका झाला. त्याची मात्र अवघ्या भारतातील पत्रकार माध्यमांना दखल घ्यावीच लागली. तीच तर मी दिलेली व ‘जुनी झालेली’ बातमी होती. आज जेठमलानींचा जो गवगवा सुरू असतो, त्याचा तोच ठोस पुरावा आहे. त्याचा तपशील पुढल्या भागात वाचू. तोवर नोव्हेंबर १९९४ च्या खळबळजनक बातम्या आठवून बघा. स्मरणशक्तीला थोडा ताण देवून बघा. (क्रमश:)

Friday, July 10, 2015

पवारांनी नारायण राणेंचे नेतृत्व स्विकारले?



मालवण : बाळासाहेब असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.  राज्यात एकहाती सत्ता आणा असे आवाहन करणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी एकप्रकारे सेनेलाच इशारा दिला आहे. अमित शहा यांचे कालचे विधान हे भाजपसाठी नसून सेनेसाठी केलेले आहे. सेनेच्या मदतीने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. शहानी केलेल्या मार्गदर्शनातून सेनेने आता तरी शिकावे. असा सल्ला देत जर सेनेचा स्वाभिमान जागृत झाला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात असे पुन्हा एकदा सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेनेला डिवचले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे ताजे विधान आहे. त्यामुळे अर्थातच शिवसैनिकांना संताप आल्यास नवल नाही. प्रामुख्याने निष्ठावान कार्यकर्ता असलेले शिवसैनिक त्यामुळे चवताळतील यात शंका नाही. तशा काही प्रतिक्रीया ऐकूही येऊ लागल्या आहेत. पण पवारसाहेब उर्फ़ शरदबाबू थोरल्या साहेबांचे निकटवर्ति मित्र होते. म्हणूनच आपल्या दिवंगत मित्राच्या वडिलधार्‍या अधिकारात पवारांनी उपरोक्त उपदेश केलेला आहे. त्याचे भान राखूनच शिवसैनिकांनी प्रतिक्रीया द्यायला हव्या. पण तसे खचितच होणार नाही. शिवसैनिक व तिचे नेते पवारांच्या विधानावर तुटून पडल्याशिवाय रहाणार नाहीत. कुठलाही मागचापुढचा विचार न करता धावून जाणे, हाच शिवसैनिकाचा बाणा आहे. मग पवारांच्या या विधानाचे गर्भितार्थ शोधण्याचे कष्ट कशाला घेतले जातील? पण म्हणून शरदबाबूंचे विधान फ़ालतू ठरत नाही. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये गहन अर्थ नसला, तरी गुढ हेतू नक्की सामावलेला नक्कीच असतो. त्याचा वेध घेण्याची गरज असते. त्यासाठी मग अनेक संदर्भांना सोबत घेऊनच विधान तपासावे लागते. उदाहरणार्थ पवार कुठे बोलले? कधी बोलले? कुणाच्या संदर्भात बोलले आणि काय बोलले, अशा अनेक कोनाड्यातून विधानाचा विचार करणे भाग असते.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे साहेबांचे हे विधान मालवण सिंधूदुर्गातले आहे. त्याचा अर्थ त्याचा कुठेतरी नारायण राणे यांच्याशी संबंध असू शकतो. कारण मालवणचा आणि ‘स्वाभिमान’ शब्दाचा गहन संबंध आहे. यापुर्वी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात पवारसाहेबांनी अनेक महत्वपुर्ण विधाने केलेली आहेत. पण चुकूनही त्यांनी स्वाभिमान शब्दाला हात लावलेला नव्हता. नेमके मालवणात गेल्यावरच त्यांना ‘स्वाभिमान’ शब्द कशाला आठवला? आणि ते म्हणालेत तरी काय? शिवसेनेत पुर्वी स्वाभिमान होता आणि आता राहिला नाही. म्हणजे सामान्य लोक ‘स्वाभिमान’ शब्द ज्या अर्थाने वापरतात, तो पवारसाहेबांना अभिप्रेत नाही. शिवसेनेत ‘स्वाभिमान’ राहिला नाही, म्हणजे नारायण राणे आता शिवसेनेत नाहीत, असे शरदबाबूंना म्हणायचे आहे. ते वास्तविक आहे ना? ते वास्तव विसरून पवार किती स्वाभिमानी आहेत असला उफ़राटा सवाल विचारणे गैर नाही काय? म्हणूनच म्हटले साहेब काय म्हणतात ते शांत चित्ताने समजून घेण्याची गरज आहे. स्वत:च्या स्वाभिमानाचीच गोष्ट असती, तर मग पवारांनी पाच दशकात अनेक पक्ष बदलताना शिवसेनेत प्रवेश केला नसता काय? त्यांना स्वाभिमान इतकाच मोलाचा वाटला असता, तर बाळासाहेबांनी स्वत: पवारांना सेनेत आमंत्रित करून महत्वाचे पद दिले नसते काय? पण ते शक्य झाले नाही, कारण शिवसेनेत व्यक्तीगत व संघटनात्मक स्वाभिमान आवश्यक होता आणि शरदबाबूंना त्याचेच तर वावडे होते. ही बाब नेमकी ठाऊक असल्याने बाळासाहेबांनी आपल्या या निकट मित्राला कधी पक्षात बोलावले नाही, की मैत्री टिकवताना पवारांनी कधी वाट वाकडी करून शिवसेनेत प्रवेश केला नाही. म्हणून तर त्यांना ‘जाणता’ राजकारणी म्हणतात. जितके इतरांचे गुणदोष पवारांना कळतात तितकेच स्वत:चेही गुणदोष पवार चांगले ओळखून आहेत.

म्हणून तर कधी उर्वरीत महाराष्ट्रात फ़िरताना त्यांनी स्वाभिमान शब्द तोंडातून येऊ दिला नाही. अगदी १९९९ सालात पुन्हा कॉग्रेस सोडल्यावर नवा तंबू राष्ट्रवादी अशा नावाने ठोकला. तेव्हाही त्यांनी स्वाभिमान शब्दाला जवळ घेतले नव्हते. राष्ट्रवादी संबोधण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानी कॉग्रेस असेही पक्षाचे नाव ठेवता आले असते. पण सगळे घोडे तिथेच येऊन फ़सते ना? म्हणून त्यांनी राष्ट्रवादी असे विशेषण आपल्या पक्षाला लावले. त्यातली दूरदृष्टी अवघ्या सहा महिन्यातच जगाला अनुभवता आली. सोनियांवर परदेशी नागरिक असल्याचा आक्षेप घेत कॉग्रेसशी काडीमोड घेणार्‍या पवारांनी १९९९ अखेरीस महाराष्ट्रात आपल्याच बगबच्च्यांसाठी सत्तापदे मिळवताना किती स्वाभिमान जोपासला होता? सोनियांनी तर विलासरावांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडले होते. पण स्वाभिमानापेक्षा सेक्युलर विचारांची महता सांगत पवारांनी राज्यात आघाडीची सता आणली आणि त्यात स्वाभिमानाचा बळी दिला नव्हता काय? पण तेव्हाही मुंडे-महाजन पवारांना सोबत घेऊन महायुतीचे सरकार आणायला उतावळे होते. पण बाळासाहेबांनी त्याला साफ़ नकार दिला. त्याला स्वाभिमान म्हणतात. मित्र शरदबाबूंच्याच पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायला शिवसेनाप्रमुखांचा नकार म्हणजे स्वाभिमान असतो. असे पवार सुचवत आहेत, सांगत आहेत. म्हणूनच त्यांनी अमित शहांच्या विधानाचा संदर्भ घेतला आहे. सेनेशी मदत घेऊन सरकार स्थापन करावे लागले याची अमित शहांना खंत आहे. त्याचा शिवसेनेला राग येत नाही म्हणून पवार विचलीत आहेत. सेनेचा पाठींबा घ्यावा लागला म्हणून शहांच्या बेचैनीची जाण पवारांना आहे. कारण पवारांनीच बाहेरून दिलेला पाठींबा भाजपाला जाहिरपणे का होईना नाकारावा लागला. त्याची खंत शरदबाबूंना बोचते आहे. किंबहूना शहांना राष्ट्रवादीचाच पाठींबा घ्यायचा होता, असे पवारांना सुचवायचे आहे.

राज्यात तालुका पंचायतीपासून विधानसभेपर्यंत शत-प्रतिशत सत्ता स्वबळावर आणायला हवी, असे अमित शहांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पण त्यातले हे विधान भाजपासाठी नसून सेनेसाठी ‘मार्गदर्शन’ आहे, असे पवार म्हणतात. पण तितकेच खुद्द पवारांचे विधानही सुचक नाही काय? सेनेने स्वाभिमान जागवून सत्तेच्या बाहेर पडावे, म्हणजे राज्यात मध्यावधी निवडणूका संभवतील, असेही पवार पुढे म्हणाले आहेत. आणि अशा मध्यावधी निवडणूका आल्या वा तशी शक्यता दिसली तर? तर मग पवार काय करतील? १९ आक्टोबरला त्याचे उत्तर शरदबाबूंनी आधीच देवून ठेवले आहे. राज्याला वारंवार निवडणूका परवडणार्‍या नाहीत. म्हणून त्यांनी ‘तात्काळ आपली सेवा’ भाजपाच्या चरणी रुजू केली नव्हती का? ‘बिनमागे परोसे वह मॉं होती है’, या नरेंद्र मोदींच्या शब्दाचे स्मरण करून पवारांनीच बाहेरून भाजपाला पाठींबा जाहिर केला नव्हता का? आताही तशी पाळी आली तर पवार मध्यावधी होऊ देतील का? दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी अवर्षणाने भरडला जातोय, अशावेळी ‘जाणता राजा’ निवडणूकीची उधळपट्टी होऊ देईल काय? तशी शक्यता दिसली, तरी पवार स्वाभिमान विसरून भाजपाचे सरकार चालवण्याची जबाबदारी घेतील. कारण शरदबाबू नेहमी स्वाभिमानापेक्षा ‘परवडणार्‍या’ निकषावर आपले राजकीय निर्णय घेतात. मग भले त्यांच्यासकट अनुयायांची ‘परवड’ झाली तरी बेहत्तर. म्हणून त्यांना शिवसेनेच्या स्वाभिमानाचे कौतुक वाटते. तोटा पत्करूनही शिवसेना स्वाभिमान जपते, याचे पवारांना कौतुक आहे. मात्र आज त्यांना स्वाभिमान आठवला आहे, तो मालवणला आणि त्यांना तोच ‘स्वाभिमान’ आपल्या पक्षात बाणवावा अशी इच्छा झालेली असावी. त्यातून स्वाभिमानाची भाषा आलेली आहे. आठवते तीन महिन्यापुर्वी बांद्रा पुर्वेला होत असलेल्या पोटनिवडणूकीत नारायण राणेंच्या प्रचाराला आलेल्या शरदबाबूंनी काय ‘गौप्यस्फ़ोट केला होता?

‘बाळासाहेबांना राणे यांची गुणवत्ता कळली होती, म्हणूनच मनोहरपंतांना बाजूला करून राणे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले’. आज मालवणला गेल्यावर त्याच शरद पवारांना नारायण राणे यांचा आणखी एक गुण उमगला असावा. तो म्हणजे ‘स्वाभिमान’. तेव्हा स्वपक्षातील नाकर्त्यांना झुंजार ‘स्वाभिमानी नारायण राणे’ यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लावायचा हेतू पवारांनी बोलून दाखवला आहे काय? अमित शहांचे विधान जसे भाजपा कार्यकर्त्यांपुढले असले तरी शिवसेनेसाठी असल्याचे पवार सांगतात, तसे त्यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसमोरचे हे विधान स्वपक्षातील ‘स्वाभिमान’ हरवलेल्या भुजबळ अजितदादांसाठी नसेल कशावरून? तेव्हा उगाच शिवसैनिकंनी आदळआपट करण्याचे कारण नाही. थोरल्या साहेबांच्या जीवलग वडिलधार्‍या मित्राचे ‘जाणते’ शब्द समजून घ्यायला हवेत. पवार साहेब आता नारायण राणेंचे नेतृत्व स्विकारून बहुधा आपला पक्ष ‘स्वाभिमान’ या नितेश राणेंच्या संघटनेत विसर्जित करण्याची ही नांदी नसेल कशावरून?