Friday, December 4, 2015

कथा नाट्याच्या शोधातील नानाविध पात्रे //// महायुद्धाची छाया (६)



हा सगळा प्रकार एखाद्या मोठ्या महाकादंबरी वा मालिकेसारखा असतो. ज्यात एक एक पात्र आपल्यासमोर पेश केले जात असते. अनेकदा एखादे दुसरे पात्र कथेशी कुठे संबंधित आहे, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. पण अशी अनेक पात्रे कथानकातून खेळवून आपल्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण केले जाते. पुढे कथानक उलगडत जाते, तेव्हा त्याची योजना कशासाठी होती, हे लक्षात येते. अन्यथा अशी पात्रे कथेत विसंगत वाटत रहातात. तशीच अनेक अनावश्यक वाटलेली पात्रे वास्तव जीवनात महत्वाच्या घडामोडीतून आपल्यासमोर येत असतात वा आणली जात असतात. त्यांचा एकूण सार्वजनिक जीवन वा घडामोडीशी असलेला संबंध आपल्याला तात्काळ संदर्भहीन वाटण्याइतका चमत्कारीक असतो. कुणा अनोळखी वा कधीच नावही ऐकले नाही अशा व्यक्तीला कुठले तरी मोठे सन्मानाचे पारितोषिक मिळते. मग त्याचा माध्यमातून गाजावाजा सुरू होतो. अगदी अलिकडची गोष्ट घ्या. कैलास सत्यार्थी नावाच्या भारतीयाला नोबेल पुरस्कार मिळाला आणि आपण बहुतेक भारतीय थक्क होऊन गेलो ना? कोण हा सत्यार्थी आणि त्यांनी असे कोणते काम केले, की त्यासाठी त्यांना जगन्मान्य असे पारितोषिक मिळावे? त्यांचे इतके मोठे महान कार्य एक टक्काही भारतीयांच्या कानी कधी आलेले नाही. पण त्यांची महत्ता थेट नोबेल पुरस्कार देणार्‍यांपर्यंत जाऊन पोहोचली. मग त्याचा इतका गाजावाजा सुरू होतो, की पुरस्कार मिळाला म्हणजे त्यांचे कार्य महान असणारच, याची खात्री आपल्याला पटते. कारण तात्काळ तमाम माध्यमातून त्यांच्या महान कार्याचा गदारोळ सुरू होतो. खरेच त्यांचे कार्य असे महान होते, तर भारतातल्या कुठल्याच प्रमुख माध्यमांनी त्याची आजवर साधी दखल कशाला घेतलेली नव्हती? कुठल्या वृत्तपत्र वा वाहिनीने त्यांची भारतीयांना ओळख कशाला करून दिलेली नव्हती?

असे प्रश्न क्वचित कुणाच्या मनात येऊ शकतात आणि येतातही. पण ते बोलून दाखवण्याची हिंमत कितीजणांपाशी असते? आणि समजा तुम्ही असा प्रश्न वा शंका उपस्थित केलीत, तरी त्याची कुठलेही प्रमुख माध्यम दखलही घेणार नाही. माध्यमातून इतका धुरळा मग उडवला जातो, की रातोरात सत्यार्थी भारतातले महान सामाजिक कार्यकर्ते होऊन जातात. कुठल्याही बाबतीत मग माध्यमांचे कॅमेरे-माईक त्यांच्या समोर येऊन त्यांना मत विचारू लागतात आणि सत्यार्थी जनमानसाचे खरे प्रतिबिंब म्हणून लोकांसमोर पेश होऊ लागतात. काही महिन्यापुर्वी जी व्यक्ती एक टक्का भारतीयांना माहितीसुद्धा नव्हती, तीच आता जनमानसाचे प्रतिबिंब म्हणून पेश केली जाऊ शकते. त्या्च सत्यार्थी यांच्या सोबत मलाला नावाच्या कोवळ्या पाकिस्तानी मुलीलाही नोबेल पारितोषिक देण्यात आले. दोनतीन वर्षापुर्वीच तिच्यावर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये तालिबानांनी प्राणघातक हल्ला केलेला होता. तिला उपचारार्थ युरोपात आणले गेले आणि तिथून मलाला जगाला ठाऊक झाली. आता तर नोबेल मिळाल्याने जगातल्या कुठल्याही मुली, मुलांचे शिक्षण वा इस्लाम विषयक कुठल्याही शंकेचे समाधान करणारी मलाला ही बुद्धीमंत होऊन गेली आहे. कारण ती नोबेलविजेता आहे. कधी नोबेल तर कधी मॅगसेसे, बुकर अशी पारितोषिके घेतल्यानंतरच महान व्यक्तीमत्वे अवतरली असल्याचा आपल्याला शोध लागत असतो. डॉ. अमर्त्य सेन हे पात्रही तसेच आहे. अमर्त्य सेन कोण, त्यांचे व्यक्तीगत जीवन काय आहे? त्यांनी कोणते पराक्रम गाजवलेत, याविषयी किती लोकांना काय ठाऊक असते? सेन यांच्या अनेक मतांना खोडून काढून खोटे पाडले गेले आहे. पण त्याचा उल्लेखही कधी केला जात नाही. आपल्याविषयीच्या आक्षेपांना उत्तर वा खुलासे देण्याचेही सौजन्य सेन यांनी दाखवलेले नाही. पण आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो.

नोबेलविजेते म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द थेट इश्वराची आकाशवाणी असल्याप्रमाणे आपल्यापुढे पेश केले जात असते. तीच कथा बहुतेक पुरस्कारप्राप्त मान्यवर असते. त्यांची खरीखुरी महिती आपल्याला कधी दिली जात नाही वा लपवली जात असते. पण त्यांचे मत म्हणजेच भारताचा वा जनतेचा आवाज, असेच पेश केले जात असते. परंतु वास्तवात सामान्य जनतेपासून अशी माणसे मैलोगणती दुर असतात. जनतेच्या मनातली कुठलीही गोष्ट त्यांना ठाऊक नसते. अरुंधती रॉय, अमर्त्त्य सेन, गिरीश कर्नाड असे शेकडो पुरस्कार विजेते तसे दिसतील. त्याखेरीज भारतातले विविध पुरस्कार मिळवणारेही त्यात आहेत. साहित्य अकादमी कशाच्या आधारावर पुरस्कार विजेत्याची निवड करत असते? आजवर ज्यांना हे पुरस्कार मिळाले, त्यांची जनतेतील वा वाचकातील मान्यता लोकप्रियता किती असते? मग त्यांना कोणत्या निकषावर सन्मान पुरस्कार दिलेले असतात? नोबेलपासून प्रत्येक पुरस्कार त्याच निकषावर तपासण्यासारखा आहे. हे पुरस्कार अशाच व्यक्तींना शक्यतो दिले जातात, ज्यांचा वापर पुढल्या काळात विशिष्ठ राजकीय सामाजिक वा धोरणात्मक व्युहरचनेमध्ये करता येणार असतो. अर्थात प्रत्येक पुरस्कार विजेता तितकाच बोगस नसतो. काही पुरस्कार खरेच योग्य व्यक्तीला दिलेले असतात. पण असे प्रतिभावंत कधी आपल्या क्षेत्राच्या बाहेरच्या घडामोडीविषयी भाष्य करताना दिसणार नाहीत. उलट ज्यांचे कर्तृत्व गुणवत्ता शंकास्पद आहे, तरीही पुरस्कार मिळाले आहेत, ते मात्र अगत्याने अशा राजकीय, धोरणात्मक कसोटीच्या प्रसंगी पुढे आलेले दिसतील. मग अशा बोगस लोकांचा पुरस्कार गुणवत्ता ठरावी, म्हणून काही प्रसंगी खर्‍या प्रतिभावंतांना पुरस्कार दिले जात असतात. अन्यथा बहुतांश बडे पुरस्कार हे माणसे समाजाच्या माथी मारण्याच्या हेतूनेच दिले-वाटले जात असतात. असे पुरस्कार देणार्‍या संस्था, फ़ौडेशन यांच्या हेतूविषयी म्हणूनच शंका घेणे भाग आहे.

अरब स्प्रिंग असो किंवा भारतातील एनजीओ स्वयंसेवी संस्थांचे चाललेले काम असो, त्यामागची प्रेरणा म्हणूनच महत्वाची ठरते. त्यात येणारा पैसा व निधी कुठल्या मार्गाने व कुणाच्या तिजोरीतून येतो त्याचाही शोध म्हणूनच अगत्याचा आहे. एका बाजूला अमेरिकेतील फ़ोर्ड फ़ौंडेशन समाजातली नाराजी अन्यायाची भावना उभारायला मदत करणार आणि दुसरीकडे अशा उफ़ाळलेल्या जनक्षोभाला राजकीय हातभार लावायचे काम अमेरिकन सरकार व त्याचे गुप्तचर खाते करणार. असे असेल, तर त्यामागचे हेतू तपासणे आवश्यक होऊन जाते. इजिप्तपासून भारतापर्यंत भ्रष्टाचारी राजकीय मनमानीच्या विरोधातल्या उठावाला चालना देणार्‍या तमाम स्वयंसेवी संस्थांना पारदर्शक कारभार हवा, असा आग्रह धरला गेला. पण त्याच संस्थांचा कारभार वा आर्थिक व्यवहार कितीसे पारदर्शक असतात? आपल्याला कोणी किती देणगी दिली व कोणत्या हेतूने दिली, त्याविषयी लपवाछपवी कशाला असते? गेल्या एप्रिल महिन्यात अशा दहा हजार संस्थांची बॅन्केतील खाती भारत सरकारने गोठवली. खुद्द फ़ोर्ड फ़ौंडेशनकडे हिशोब मागून रितसर कायद्यानुसार नोंदणी करायला सक्ती केली. तिथूनच भारतात असंहिष्णुता असल्याचा साक्षात्कार अनेकांना होऊ लागला. किंबहूना हा साक्षात्कार भारतीय अभिजनांच्याही आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना झाला होता. ही फ़ोर्ड फ़ौंडेशनवरची सक्ती मोदी सरकारने मागे घ्यावी, म्हणून केरी यांनी रदबदली केलेली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि मगच भारतात असंहिष्णूतेच वातावरण असल्याचे साक्षात्कार एकामागून एक प्रतिभावंतांना होऊ लागला. त्याचा आवाज उठवणार्‍यांची यादी हाती घेतली, तर त्यात बहुतांश फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या निधीचे बेहिशोबी लाभार्थी असावेत, ह्याला योगायोग मानता येईल काय? याच फ़ौंडेशनच्या आर्थिक कृपेने संशोधन करणारी एक तरूणी (शिमरीत ली) अरब स्प्रिंग व लोकपाल आंदोलनात लुडबुडत असावी ह्यालाही योगायोगच म्हणायचे काय? महायुद्धाला तोंड फ़ुटण्यापुर्वी शत्रू प्रदेशात सुरक्षा पोखरणे आवश्यक असते ना? (अपुर्ण)

कितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल?



"In the End, we will remember not the words of our enemies, but the silence of our friends."  - Martin Luther King Jr.

अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा लढा एकहाती लढलेले व त्यासाठी आत्मबलिदान करणारे नेते म्हणून मार्टीन ल्युथर किंग ओळखले जातात. त्यांनी शांततावादी व अहिंसक संघर्ष करून अमेरिकेत समता प्रस्थापित करण्याचा पराक्रम गाजवला आहे. असा माणूस काय म्हणतो? ‘शेवटी आमच्या लक्षात शत्रूचे शब्द असणार नाहीत, तर मित्रांचे मौन लक्षात राहिल.’ वरकरणी अतिशय सौम्य वाटणारे हे शब्द आहेत. पण वास्तवात हे किती स्फ़ोटक शब्द आहेत, त्याचा अंदाज करणेही अवघड आहे. जेव्हा लढाई होते आणि कडवा संघर्ष होतो, तेव्हा शत्रू ठाऊक असतो, कारण तो समोरच असतो. त्याचे गुन्हे आपल्याला ठाऊक असतात. म्हणूनच त्याचा बंदोबस्त वा निर्दालन करायला आपण नेहमीच सज्ज असतो. पण त्याने केलेल्या इजा जखमांची वेदना जितकी भेदक व यातनामय नसते, तितके मित्रांच्या दगाबाजीचे दु:ख सतावणारे असते. शत्रूला संपवता येते, पण मित्राची दगाबाजी म्हणजे मोक्याच्या क्षणी राखलेले मौन, कधीच भरून येत नाही अशी जखम असते. मार्टीन ल्युथर यांच्यासारखा अत्यंत सौम्य व शांत प्रवृत्तीचा माणुस इतके स्फ़ोटक बोलू शकतो? तर त्यातली वेदना लक्षात घेण्य़ाची गरज आहे. ल्युथरनी कोणाही विरोधात व्यक्त केलेला तो राग व द्वेष नाही, तर वास्तविक मानवी वृत्तीचा दिलेला इशारा आहे. माणूस जखमा व वेदना विसरू शकतो. पण विश्वासघात विसरू शकत नाही, असेच त्यांना समजवायचे आहे. आणि विश्वासघात म्हणजे मोक्याच्या क्षणी दिलेला दगा असतो. मैत्रीचे व विश्वासाचे नाटक करून ऐनवेळी पाठ फ़िरवण्याला दगा म्हणतात. संकट समोरून अंगावर येत असताना ते संकटच नाही, तर आभास असल्याचे आस्थापुर्वक सांगण्याला विश्वासघात म्हणतात. असा दगा विसरता येत नाही. अगदी शांततावादी मार्टीन ल्युथरही त्याचीच ग्वाही देतात. अमेरिकेतील ताज्या हत्याकांडाचे काय?

कालपरवा लोकमतच्या एका लेखात डुकराचे चित्र प्रसिद्ध झाल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानी त्या वर्तमानपत्राचे अंक जाळले. कचेरीवर हल्ले केले. तर तो भावनेचा तितकाच धार्मिक आस्थेचा विषय असल्याचा बचाव मांडला गेला आहे. मुस्लिमांच्या धर्मप्रेमाविषयी किंवा धर्मवेडेपणाचा दाखला वेगळा देण्याची गरज नाही. युरोपात कुठे प्रेषिताचे व्यंगचित्र काढले, म्हणून इथलेही मुस्लिम रस्त्यावर येतात आणि जाळपोळ करतात. इशान्येला म्यानमार देशात मुस्लिमांवर हल्ले झाले, म्हणून इतले मुस्लिम रस्त्यावर येऊन हिंसा करतात. इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मुस्लिम मारले गेले, म्हणून मुस्लिमांच्या श्रद्धा दुखावल्या जातात. अशा प्रत्येक प्रसंगी आपल्या धर्माला धक्का लागला किंवा त्याची विटंबना झाली, म्हणूनच मुस्लिम रस्त्यावर आले व त्यांनी जमावाने हिंसा केली, हाच एकमेव बचाव असतो. युक्तीवाद म्हणून तो मान्य करू. कुठेही आणि केव्हाही इस्लामची विटंबना झाली, तरी मुस्लिम चवताळणार हा युक्तीवाद आहे. पण ठराविक निवडक वेळीच मुस्लिमांच्या भावना दुखावतात आणि इतर प्रसंगी इस्लामची कितीही अवहेलना झाली, तरी मुस्लिमांच्या भावना शांत रहाव्यात, अशी काही तरतुद आहे काय? कोणी इस्लामची विटंबना करावी आणि कोणी करू नये, असा काही नियम वा सुविधा आहे काय? नसेल तर कुठेही आणि केव्हाही इस्लामची अवहेलना झाली तरी तितकीच स्फ़ोटक व हिंसक प्रतिक्रीया मुस्लिमांकडून उमटली पाहिजे ना? पण तसा अनुभव येतो काय? इसिस वा अलकायदा नावाचे लोक जे काही इस्लामच्या नावाने करीत असतात, तो इस्लामचा गौरव आहे काय? तसे तर सांगायला कोणी मुस्लिम पुढे येत नाही. पण अशा घटना घडतात, तेव्हा इस्लामचा चुकीचा अर्थ लावून काही माथेफ़िरू मनमानी करतात असे सांगितले जाते.

लोकमत वा फ़्रान्सच्या कोणी चुकीचा अर्थ लावून काही केले तर तो भयंकर गुन्हा असतो आणि इसिस वा अलकायदा यांनी तसेच इस्लामचा गैर अर्थ लावून हिंसाचार केला तर तो गुन्हा नसतो काय? तेव्हाही इस्लामची विटंबनाच होत नाही काय? मग अशावेळी किती मुस्लिम वा त्यांच्या संघटना तितक्याच आवेशात रस्त्यावर येतात? म्यानमारमध्ये मुस्लिमांचे हत्याकांड झाले म्हणून रझा अकादमी मुंबईत जाळपोळ करते. पण तीच संस्था वा अन्य कुठली मुस्लिम संघटना इराक सिरीयामध्ये मुस्लिमांची कत्तल झाल्यावर किंचितही विचलीत होत नाही. कुठला मोर्चा काढत नाही, की घटनेचा निषेध करत नाही. मग त्या हिंसेचे ते मूक समर्थन नसते काय? सवाल सोपा आहे. मुस्लिमांच्या हत्याकांडाचा आवेग असतो, की त्याला मारणारा बिगर मुस्लिम असल्याचा आवेश असतो? इस्लामची विटंबना हा आस्थेचा विषय आहे की विटंबना कोणी केली यानुसार भावनांचा उद्रेक होत असतो? आपण अन्यधर्मियांशी गुण्यागोविंदाने नांदू शकतो व नांदतो, असे हवाले देणार्‍या ‘शांतताप्रिय’ मुस्लिम नागरिकांना याचे उत्तर शोधावे लागणार आहे. कारण दिवसेदिवस त्यांच्या वास्तविक भावना व त्याचे दिसणारे प्रदर्शन, यात मोठी तफ़ावत होत चालली आहे. अमेरिकेत एका शहरामध्ये पाकिस्तानी वंशाच्या एका मुस्लिम जोडप्याने अपंग सहाय्य करणार्‍या संस्थेत जावून बेछूट गोळीबार केला. त्यात पंधरा निरपराध मारले गेले. त्यानंतर प्रतिक्रीया देशाना तिथल्याच काही मुस्लिमांनी पहिली प्रतिक्रीया काय दिली? आता याचे दुष्परिणाम आम्हा स्थानिक मुस्लिमांना भोगावे लागतील. आमच्याकडे संशयाने बघितले जाईल. मुद्दा इतकाच, की पंधरा माणसे हकनाक मारली गेलीत आणि ज्यांनी मारली त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भाऊबंदाविषयी संशय घेणेही गुन्हा ठरवला जातो आहे. ही भूमिकाच समस्या वाढवणारी आहे.

आपल्यातल्या एका मुस्लिमाने असे हिडीस हिंसक कृत्य केले, याची लाज वा खेद नाही. उलट त्यामुळे मरणार्‍यांच्या आप्तस्वकीयांना राग संताप येण्यावरच आक्षेप घेतला जात आहे. ही जगभरच्या मुस्लिमांची भूमिका व प्रवृत्ती त्यांना अधिकाधिक शंकास्पद बनवत चालली आहे. ज्यांनी कालपरवा लोकमत कार्यालयाची मोडतोड केली, त्यांनी इसिसने आपल्या कृत्यातून इस्लामची विटंबना चालविल्याच्या निषधार्थ काही केल्याचे आपल्या ऐकीवात वा़चनात आले आहे काय? नसेल तर मग अशा मुस्लिमांच्या धार्मिक आस्था शंकास्पद नाहीत काय? तस्लिमा नसरीनवर हल्ला करायला शिवशिवणारे हात, इसिसच्या बाबतीत थंड कसे पडतात? सलमान रश्दीला ठार मारायला उसळणार्‍या उर्मी, अलकायदाच्या उचापतींनंतर धर्माची प्रतिष्ठा राखायला पुढे कशाला येत नाहीत? धर्माचे पावित्र्य कोणी विटाळले, यानुसार भावना कार्यरत होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? किंवा त्याचा दुसरा अर्थ असा असतो की इसिस वा अलकायदा यांनी जो ‘धर्मार्थ’ लावलेला आहे त्याच्याशी हे असे चवताळणारे सहमत असतात. म्हणूनच तेव्हा सुप्तावस्थेत जातात. याला बुद्धीमान पुरोगामी माना डोलवतात. पण सामान्य माणुस बुद्धीमंत वा पुरोगामी नसतो. सामान्य माणसाला तत्वज्ञान व विचारसरणीपेक्षा अनुभव शिकवत असतो. आणि जेव्हा अशा दुटप्पी अनुभवातून माणसे शिकतात, तेव्हा तारतम्याने निर्णय घेत असतात. थोडक्यात जगभरच्या मुस्लिमांसाठी आता कसोटीची वेळ जवळ येत चालली आहे. जिहादी इस्लाम की गुण्यागोविंदाने नांदवणारा इस्लाम, यातून निवड करावी लागणार आहे. नुसते प्रेमाचे, आपुलकीचे व शाब्दिक नाटक लोकांच्या अधिक काळ पचनी पडणार नाही. त्यातला मानभावीपणा जगाच्या नजरेत भरू लागला आहे. कसोटीच्या प्रसंगीचे मौन लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणूनच धर्मवेड चुचकारणारे पुरोगामी व त्यांच्या बळावर धर्मांधतेचा अतिरेक करणारे मुस्लिम नेते हेच आता जगभरच्या सामान्य मुस्लिमांचे घातक शत्रू होत चालले आहेत.

Thursday, December 3, 2015

शत-प्रतिशत! अर्थात वाताहत



गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूका ऐन रंगात आलेल्या असताना मी पुण्यात होतो आणि तेव्हा वृत्तवाहिन्यांच्या चर्चेतही सहभागी व्हायचो. अशाच एका चर्चेत सहभागी होऊन माघारी घरी येत असतानाची गोष्ट! मला तिथून घरी सोडायला एबीपी माझा वाहिनीने गाडी दिलेली होती आणि माझ्यासह आणखी एका पक्षाचे जाणकार अभ्यासक नेतेही सोबत होते. आमच्या गप्पा चालू होत्या. इतक्यात ड्रायव्हर मध्येच म्हणाला, ‘या भाजपावाल्यांना वेड लागले आहे काय? सगळ्यांनाच एकदम अंगावर घेतात ते?’ मी स्तब्ध झालो आणि त्याच्याकडे बघू लागलो. त्या ड्रायव्हऱचे नाव अमोल! तोही आम्ही गप्प झालेले बघून वरमला. सॉरी म्हणू लागला. आपले काही चुकले काय, असेही विचारू लागला. पण मला त्याचा प्रश्न आवडला होता. सोबतच्या नेत्याकडे वळून म्हणालो, बघा, हा खरा मतदार व जागरूक सामान्य माणूस आहे. त्याला जितके राजकारण कळते, तितके आपण विश्लेषणाचे आव आणणार्‍यांना उमगत नाही. अमोललाही म्हटले, ‘तूच बरोबर आहेस’. आम्ही लिहीताना वा बोलताना मोठमोठे राजकीय दाखले देतो, थिअरीज मांडतो. पण वास्तवाशी त्याचा किती संबंध असतो? सामान्य माणूस म्हणजे मतदार कसा विचार करतो वा निर्णय घेतो, त्याचा आमच्यासारख्या शहाण्यांना थांगपत्ता नसतो. मग आम्ही आजवरचा अनुभव आणि समजुती यांच्या आधारावर आपले निष्कर्ष काढत असतो. पण सामान्य माणूस कसा बारकाईने विचार करतो, ते अमोलच्या बोलण्यातून एका वाक्यात व्यक्त झाले होते. महाराष्ट्रात भाजपाने कोणती चुक केली, ते सांगायला त्याला मोजके शब्द पुरेसे होते. जे आम्हाला प्रदिर्घ लेख लिहून वा विवेचन करून सांगता येत नव्हते. आम्हालाच उमजत नसेल, तर भाजपा वा अन्य कुठल्याही राजकीय पक्षाला तरी त्याचा थांग कशाला लागत असेल? ते तशाच चुका करत रहातात.

अमोलसारखा सामान्य ड्रायव्हर काय म्हणाला? ‘या भाजपावाल्यांना वेड लागले आहे काय? सगळ्यांनाच एकदम अंगावर घेतात ते?’ चटकन त्यात काही मोठे वाटणार नाही. पण त्याचा अर्थ समजून घेतला तर गहन आहे. एकाच वेळी अंगावर घेणे, म्हणजे अनेक शत्रू प्रतिस्पर्ध्यांशी एकाच वेळी लढाई सुरू करणे. तसे केले मग आपली तुटपुंजी शक्ती वा बळ विभागले जाते आणि पराभव अपरिहार्य असतो. इंग्रजीमध्ये त्याला ओपनिंग टू मेनी फ़्रंटस, असे म्हटले जाते. अमोलसारख्या सामान्य माणसाने किती नेमक्या शब्दात राजकीय विश्लेषण केले होते ना? अर्थात तेव्हा भाजपा देशभर मोदी लाटेवर स्वार झाला होता आणि शत्रूचे भय सोडा, त्याला मित्रांचीही अडचण भासू लागली होती. लोकसभेत मोठे यश मिळवून चार महिने झाले नाहीत, तर भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेशी असलेली पाव शतकाची मैत्री मोडण्याचा पवित्रा घेतला होता. तो योग्यही भासू शकत होता. पण लाट उंच उसळते, तेव्हा चिंता नसते, ती लाट जेव्हा वर जायची थांबते, तेव्हा खरा कसोटीचा प्रसंग असतो. लाटेवर स्वार होण्याचा एक खेळ आपण टिव्हीवर बघू शकतो. त्यात कसरत असते, ती लाटेच्या उंचीवरून खाली येतानाची. तेव्हा तोल सावरता आला नाही, तर जलसमाधी अपरिहार्य असते. म्हणूनच लाटेवर स्वार होणे दुय्यम आणि लाट कोसळू लागली, मग सावरणे महत्वाचे असते. तेव्हा आधार म्हणून तरंगणारी फ़ळी निर्णायक महत्वाची असते. त्याचे भान ठेवले नाही, तर माणूस चढणार्‍या लाटेवर असताना त्याच फ़ळीला लाथ मारण्याचा मुर्खपणा करतो. भाजपाने वर्षभरापुर्वी नेमके तेच चालविले होते. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी स्वबळावर लढण्याच्या हव्यासापायी शिवसेनेला लाथ मारली आणि आपण मित्रांनाही विश्वासाने वागवत नाही, याचीच ग्वाही राजकारणातून दिली. तो संदेश भाजपाविषयी शंका व संशय निर्माण करण्यास पुरेसा होता.

मग गेल्या फ़ेब्रुवारीपासून या नोव्हेंबरपर्यंतच्या लागोपाठ पराभवातून भाजपाला त्याची फ़ळे भोगावी लागली आहेत. पण दिल्ली बिहारचा पराभव समजून घेता येईल. आता गुजरातच्या स्थानिक संस्थांच्या निवडणूकात भाजपाला बसलेला फ़टका गंभीर आहे. कारण ज्या गुजरातने भाजपाला पहिला स्वबळावरचा पंतप्रधान दिला, तिथेच भाजपाला मोठा दणका बसला आहे. त्याकडे कॉग्रेसचे यश म्हणून बघायचे, की भाजपाचे अपयश म्हणून बघायचे; हा प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोण आहे. पण वास्तविक तो भाजपाने आपल्या कर्माने ओढवून आणलेला पराभव आहे. दिड वर्षापुर्वी जिथे कॉग्रेसला एकही लोकसभा जागा जिंकता आलेली नव्हती, तिथे आज जवळपास बहुसंख्य जिल्हा तालुका पंचायती कॉग्रेसने खिशात टाकल्या आहेत. त्याला भाजपाचे अपयश एवढ्यासाठी म्हणायचे, की मोदींचे नाव व फ़ोटो टाकला की काहीही अधिक करण्याची गरज नाही; अशा भ्रमात भाजपा मागले दिड वर्ष जगतो व वागतो आहे. जिथे कमी पडेल तिथे अन्य पक्षातून आयात उमेदवार नेते आणून गरज भागवावी, अशी चमत्कारीक रणनिती त्याचे कारण आहे. ज्या राष्ट्रवादी विरोधात महाराष्ट्रात चार वर्षे ओरडा केला, त्याच्याशीच जवळीक करण्यापर्यंत ही मस्ती गेली. चुकांवर पांघरूण घालण्याची सवय पडली, मग कपाळमोक्ष अपरिहार्य असतो. गुजरातच्या ताज्या निकालाचा धडा काय आहे? शहरी भागात भाजपा जिंकला ही शुद्ध थापच आहे. शहरी भागात ४६ टक्के म्हणजे कमी मतदान झाल्याचे अब्रु वाचलेली आहे. उलट ग्रामिण भागात ६० टक्केहून अधिक मतदान झाले, तिथे भाजपाचा धुव्वा उडाला आहे. म्हणजेच ज्या बालेकिल्ल्यातून लोकसभेची लढाई मोदींनी सुरू केली आणि जिंकली; त्यालाच खिंडार पडायला आरंभ झाला आहे. त्यासाठी कॉग्रेसला फ़ारसे कुठले प्रयत्न करावे लागले नाहीत. भाजपाच्या आत्महत्येत हस्तक्षेप न करून कॉग्रेसने हे यश मिळवले आहे.

लोकसभा जिंकल्यापासून भाजपा आत्महत्येच्या वाटेने वेगात धावत सुटला. त्याने नवे मित्र मिळवण्यापेक्षा असलेल्या मित्रांना शत्रूच्या गोटात पाठवण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला. शिवसेनेशी युती तोडणे, हा जागांपुरता विषय नव्हता. त्यामागची भूमिका मित्राला संपवण्याची होती. म्हणूनच त्यावर मी अतिशय कठोर शब्दात हल्ले केले होते. कारण मला शिवसेनेविषयी आत्मियता असण्यापेक्षा भाजपाची आत्मघातकी दिशेने चालू झालेली वाटचाल स्पष्ट दिसत होती. एकदा तशी वाटचाल सुरू झाली, मग ती प्रत्येक बाबतीत होऊ लागते. तेच मग सर्वत्र होऊ लागले आणि गुजरातमध्ये जी सर्व घटकांनी एकजुट मोदींनी मागल्या दहा वर्षात बांधली होती, तिलाही लाथ मारणे स्वाभाविकच होते. हार्दिक पटेल हा त्याचा प्रासंगिक उद्रेक होता. पण त्यानेच गुजरातमधील राजकीय तोल ढासळून टाकला. दिल्लीत प्रस्थापित असलेली सत्ता नुसती राजकीय नाही, तर विविध संस्था व यंत्रणातून विभागलेली आहे. त्यावर मांड ठोकण्यापर्यंत मोदी वा त्यांच्या पक्षाला स्वबळाचे स्वप्नही बघण्याची गरज नव्हती. आधी वास्तविक अडचणी संपवण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. नुसता प्रदेश पादाक्रांत करून चालत नाही. त्यातून लूट मिळते, साम्राज्य उभे रहात नाही. साम्राज्य उभे करायचे तर जो प्रदेश जिंकला, तिथे यशस्वी सत्ता राबवावी लागते. लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. इथे भाजपा असलेला विश्वासही पायदळी तुडवू लागला. मग यापेक्षा वेगळे काय व्हायचे होते? त्याच काळात मी एक सूचक इशारा दिला होता. ‘मित्रांमध्ये शत्रू शोधणार्‍यांसाठी बाहेरून कोणी शत्रू येत नाही, तशी गरजच नसते, असे लोक स्वत:च आपले शत्रू निर्माण करतात’. महाराष्ट्रात शिवसेनेला शत्रू बनवले आणि गुजरातमध्ये पटेल समाजाला शत्रू बनवले, हे अमोलसारखा सामान्य ड्रायव्हर समजू शकतो. पण भाजपाच्या ‘शहा’णक्यांच्या लक्षात यायला पराभवच आवश्यक असतो ना?

विच्छा माझी पुरी करा



१९६० च्या दशकात दादा कोंडके खर्‍या अर्थाने लोकांसमोर आले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याने त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. पुढे त्याच लोकप्रियतेवर स्वार होऊन त्यांनी चित्रपट माध्यमात शिरकाव केला आणि नाव कमावले. पण त्यांचे वगनाट्य बघितलेली पिढी अजून हयात आहे. ज्यांना कुणाला तेव्हाचे दादा आठवत असतील, त्यांना असे नक्कीच वाटेल, की आज दादा हयात आते तर देशातले महान बुद्धीमंत म्हणून मिरवू शकले असते. कारण कुठल्याही गंभीर वा महत्वाच्या विषयावर हास्यास्पद भाष्य करून हंशा पिकवण्यात दादाचा हातखंडा होता. त्या वगनाट्यातला एक प्रसंग अजून आठवतो. हवालदार दादांचा सहाय्यक शिपाई त्यांना मोठी मदत करतो. तेव्हा दादा त्याचे कौतुक करताना त्याला संत तुकोबाचे बोल ऐकवतात. ‘म्हणून संत तुकोबा म्हणतात, ‘फ़्रेन्ड इन नीड इज फ़्रेन्ड इन्डीड!’ अर्थात हे शब्द तुकोबाचे नाहीत. पण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी कुणाचेही शब्द वा कुठलाही प्रसंग कुठेही घुसवून थापा मारणे हीच विद्वत्ता असेल, तर दादा कोंडके त्याचे जनक म्हणावे लागतील. आणि आजकाल त्याचेच नमूने देशभर बुद्धीवादी क्षेत्रात बोकाळलेले आहेत. अन्यथा लोकसभेत बोलताना शशी थरूर या बुद्धीमान कॉग्रेस नेत्याने अकलेचे असे प्रदर्शन कशाला घडवले असते? असंहिष्णुता विषयक चर्चेत सहभागी होताना थरूर म्हणाले, या देशात मुस्लिमापेक्षाही गाय अधिक सुरक्षित आहे. यापेक्षा भयंकर विनोद कुठला असू शकतो? बाकीचे जग सोडा आणि देशाचीही गोष्ट बाजूला ठेवा. खुद्द थरूर हे केंद्रातले मंत्री असताना त्यांची पत्नी तरी सुरक्षित होती काय? एका मंत्र्याची पत्नी दिवसाढवळ्या एका पंचतारांकित हॉटेलात मारली गेली आणि कोणी व कशासाठी तिचा मुडदा पाडला, त्याचा शोध अजून लागलेला नाही. त्याचे तरी भान या बुद्धीमान नेत्याने राखायला नको काय?

शशी थरूर मंत्री होते आणि तेव्हाच त्यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्याच्या आधी त्यांचे आपल्या पत्नीशी सतत भांडण व्हायचे आणि त्यांना कुठेही भांडताना बघितल्याचे अनेक साक्षीदार आहेत. फ़ार कशाला आपल्या पतीवर पाकिस्तानी महिला ‘जादू’ चालावण्याच्या प्रयत्नात आहे आणि तिचा पाक हेरसंस्थेची संबंध आहे, असाही जाहिर आरोप थरूर पत्नी सुनंदा पुष्कर यांनी केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात सुनंदाचा शंकास्पद मृत्यू झाला आहे. अशा भानगडीत गुंतलेला माणूस इतक्या बेधडक मुस्लिमांपेक्षा गाय या देशात सुरक्षित असल्याचे विधान करतो, तेव्हा त्याचा गुरू दादा कोंडके असावा. किंवा थरूर नव्याने ते वगनाट्य रंगवण्याच्या तयारीत असावेत, असेच म्हणायला हवे ना? किंबहूना असंहिष्णुता असो किंवा अन्य कुठल्याही बाबतीत आजकाल आपल्या देशातला बुद्धीवादी युक्तीवाद बघितला, तर थेट थापेबाजीच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे. आपल्याला ठाऊक नसलेल्या गोष्टी बेधडक वस्तुस्थिती म्हणून कथन केल्या जातात. किंवा पुरावा म्हणून सादर केला जात असतो. सामान्य जनता सत्यापासून वंचित असल्याच्या विश्वासाने ही थापेबाजी चालू असते. म्हणून जग आता तितके आंधळे व अनभिज्ञ राहिलेले नाही, याचेही भान अशा दिवाळखोरांना उरलेले नाही. आता सोशल माध्यम म्हणून जी सुविधा लोकांच्या हाती आलेली आहे, त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात घडणारी घटना काही मिनीटात या माध्यमातून दुसर्‍या टोकाला जाऊन पोहोचत असते. त्यामुळे देशात कोण सुरक्षित आहे किंवा कोण असुरक्षित आहे, त्याचे दाखले वा हवाले थरूर यांनी देण्याची गरज उरलेली नाही. कारण भारतात किती धार्मिक सुरक्षितता वा संहिष्णुता नांदते, त्याचे दखले जगातले कोणीही देऊ शकतो, इतकी इथल्या संहिष्णूतेची ख्याती जगभर पसरलेली आहे. त्यासाठी बुद्धीमंतांवर विसंबून रहाण्याची लोकांना गरज राहिलेली नाही.

खलाफ़ अल हरबी नावाचा एक उदारमतवादी लेखक सौदी अरेबियामध्ये आहे. तो अरब मुस्लिम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या धर्मांधता व इसिसच्या हिंसाविषयक जिहादची टवाळी करणारा त्याचा टिव्ही कार्यक्रम अरबी देशात खुप लोकप्रिय झालेला आहे. धर्माशी थोडी जरी गफ़लत झाली, तरी आपली मुंडी छाटली जाईल याची पुरेपुर खात्री असलेला हा खलाफ़ भारताविषयी काय लिहीतो, ते थरूर वा तत्सम अडाणी भारतीय बुद्धीमंतांनी थोडे जाणून घ्यायला हरकत नाही. जगाच्या पाठीवर सर्वात जुना व आजही तितकाच पक्का संहिष्णू देश, असा त्याने भारताचा गौरव केला आहे. तिथेच न थांबता भारतात आपल्याच गुणवत्तेविषयी असलेल्या न्युनगंडावरही त्याने हल्ला चढवला आहे. तो म्हणतो, ‘‘भारतात शंभरावर धर्म आहेत अणि शंभरावर भाषा आहेत. तरीही तिथले लोक शांतता व सौहार्दाने जगतात. आपल्या देशाला विकसित करण्यासाठी हे सर्व लोक एकजुटीने राबतात आणि कपडे शिवण्याच्या सुईपासून मंगळावर जाणारे रॉकेट बनवण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. मला त्यांचा (भारतीयांचा) हेवा वाटतो, हे कबुल करायला हवे. कारण मी अशा जगातला आहे, जिथे एकच धर्म आणि एकच भाषा आहे. तरीही तिथे बघाल त्या दिशेला नुसताच रक्तपात व हिंसा बघायला मिळते. जग संहिष्णूतेबद्दल काय बोलते, त्याला अर्थ नाही. भारत हे जगाला शांतता व संहिष्णुता शिकवणारी सर्वात जुनी शाळा आहे. वांशिक, धार्मिक, सामाजिक भिन्नतेच्या पलिकडे जाऊन सौहार्द शिकवणारा तोच एकमेव देश आहे. जगातले सर्व अरब उचलून एक प्रयोग म्हणून भारतात नेवून सोडले, तर तिथे दखलपात्र म्हणावेत इतकीही त्यांची संख्या होणार नाही. ते तिथल्या निर्भय मानवी सागरात मिसळून जातील. त्यांचा भाषिक व राष्ट्रीय अहंकार तिथे विरघळून जाईल आणि आपल्याच भावाबहिणींना मारण्यासाठी कुठलेही न्याय्य कारण असू शकत नाही, हा साक्षात्कार त्यांना होईल.’

खलाफ़ हरबी इथे कोणाला वाचायला मिळणार नाही. कारण त्याची मते इथे लोकांपर्यंत गेली, तर मग ह्या नव्या कोंडकेवादी विनोदवीर बुद्धीमंतांची दुकाने बंद पडतील ना? भारतीय बुद्धीमंतांना खलाफ़पेक्षा बगदादी आवडतो. त्याने चालविलेला अविचारी रक्तपात त्यांना खूणावतो. त्याची ओळख करून द्यायला त्यांच्यात स्पर्धा चालते. पण खलाफ़ हरबी मात्र वाचक श्रोत्यांपुढे आणला जात नाही. बगदादी व लादेन यांच्या रक्तपाती मानसिकतेतून अरबांना बाहेर काढायला हरबी जगातल्या तमाम अरबांना भारतात आणून संहिष्णुता शिकवण्याचा प्रयोग करायचा सुचवतो आहे. तर आमचे इथले बुद्धीमंत शांततावादी नसलेल्या असंहिष्णूतेचा डंका जगभर पिटत फ़्रिरत आहेत. मग वाटते दादांच्याच शब्दात सांगायचे तर तो अबु बगदादी आपल्या साथीदारांना सांगत असेल, हे भारतीय बुद्धीमंत म्हणजे इसिससाठी फ़्रेन्ड इन नीड म्हणून फ़ेन्ड इन्डीड आहेत. जिहादचा रक्तपात आणखी रक्तरंजित करण्यासाठी यांच्यासारखे मित्र जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाहीत. स्वर्ग आणि नरक यातला हा फ़रक असतो. स्वर्गात असणार्‍यांना नरक ठाऊक नसतो, म्हणून त्यांना स्वर्गातच नरक दिसू शकतो, त्यांना नरकाचे डोहाळे लागतात. तशी इथल्या बुद्धीमंत वर्गाची अवस्था आहे. उलट नरकात जगणारा व त्याच्या वेदना असह्य झालेला हरबी आहे. त्याला भारतातला स्वर्ग खुणावतो आहे. तो आपल्या सहकारी अरब बांधवांना जन्नत कुठे असेल, तर ती भारतात असल्याचे हवाले देतो आहे. आणि हे काम त्याच्यासाठी सोपे नाही. भारतीय बुद्धीमंतांप्रमाणे तो कांगावा करणारा नाही. प्रत्यक्षात त्याच्या विरोधात फ़तवे काढले जात आहेत आणि त्याला धमक्या दिल्या जात आहेत. खर्‍या धमक्या व खरे धोके समोर उभे राहिले, मग संहिष्णूतेची किंमत कळते आणि भ्रमातच जगणार्‍यांना कोणी वाचवू शकत नाही. तेव्हा हे बगदादी नरकात जाण्याची भारतीय बुद्धीमंतांची ‘विच्छा पुरी कर!’

Wednesday, December 2, 2015

गिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळी



बुद्धीमंत कोणाला म्हणतात त्याचे नमूने हवे असतील, तर काही संपादक व पत्रकारांचे लिखाण नियमित वाचावे. ‘लोकसत्ता’चे गिरीश कुबेर त्यापैकीच एक आहेत. म्हणून मी सहसा त्यांचे वाचत नाही. पण काही प्रसंगी इथे सोशल मीडियातील मित्रांच्या आग्रहामुळे तिकडे वळावे लागते. कुबेरांचा नवा मुर्खपणा अगत्याने सांगणार्‍या अशा मित्रांचा आग्रह नाकारताही येत नाही. कारण भन्साळी वा रामगोपाल वर्मा जर संपादक झाले असते, तर त्यांनी कसे अग्रलेख वा विवेचन केले असते, त्याचा अनुभव काही प्रसंगी कुबेरांच्या बुद्धीचातुर्यातून अनुभवायला मिळत असतो. यातला मजेशीर भाग असा असतो, की कुबेर काय लिहीतात ते सहसा वाचत नाहीत. त्यामुळे काल लिहीले त्याच्या तब्बल उलट्या टोकाला जाऊन तर्कविहीन लिहीण्यात त्यांचा ‘हात’ कोणी धरू शकणार नाही. म्हणूनच क्वचित प्रसंगी असे विनोदी अग्रलेख वाचण्याची मौज काही और असते, हे नाकारता येत नाही. भन्साळीच्या मस्तानी चित्रपटात म्हणे तिच्यासह बाजीरावाच्या पत्नीचा नाच दाखवला आहे. त्यावर खुप चर्चा सोशल मीडियात बघायला मिळाली. नेमका काहीसा तसाच बौद्धीक नाच कुबेरांनी दोन भिन्न अग्रलेखातून रंगवला आहे. एक आहे १६ नोव्हेंबरचा पॅरीसच्या घातपाती हल्ल्यानंतरचा अग्रलेख (फ्रेंच ‘धर्म’क्रांती) आणि दुसरा आहे मुंबईतल्या राष्ट्रगीत घटनेचा (बिनडोकांची राष्ट्रभक्ती) उहापोह करणारा! या दोन्हीतले तर्क व युक्तीवाद व मुद्दे तपासले, तरी भन्साळीलाही कुबेर लाजवू शकतात, याची खात्री पटेल. कारण भन्साळीने तरी मस्तानी व बाजीरावाची पत्नी वेगवेगळ्या दाखवल्या आहेत. पण इथे कुबेर एकाच विषयाला डबल रोल करायला लावून चमत्कारीक बौद्धिक कसरत करताना दिसतात. त्यामुळे यापुढे बहुधा भन्साळी आपल्या पटकथा व डायलॉग लिहीण्याचे आमंत्रणही कुबेरांना देवू शकेल अशी खात्री बाळगावी.

पॅरीस हल्ल्यानंतर कुबेर लिहीतात, ‘इस्लामी दहशतवाद्यांकडून फ्रान्स या देशास वारंवार लक्ष्य केले जाते यामागे कारण आहे आणि ते त्या देशाच्या प्रामाणिक निधर्मवादी विचारांत आहे. सेक्युलर म्हणवून मिरवणाऱ्या आपल्याकडील पुरोगाम्यांसारखे फ्रान्समधील निधर्मवादी भंपक नाहीत. आपल्याकडे ही अशी मंडळी जो काही आहे तो शहाणपणा फक्त हिंदुत्ववाद्यांनाच सांगावयास जातात. अन्य धर्मीयांच्या अतिरेकाबाबत भाष्य करावयाची वेळ आल्यास आपल्या निधर्मीवाद्यांना दातखीळ बसते. फ्रान्समध्ये तसे नाही.’ आता तेच कुबेर दोन आठवड्यांनी काय अक्कल पाजळतात बघा. ‘बिनडोक राष्ट्रभक्ती’ शीर्षकाखाली ते लिहीतात, ‘चित्रपटगृहात राष्ट्रगीत सादर होत असताना बसून राहिले म्हणून मुंबईतील एका कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढण्याचे शौर्य आसपासच्या काही मंडळींनी गाजवल्याचे वृत्त सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले आहे. या कुटुंबात एक महिला होती. त्यांच्यासह लहान मूल होते. ती महिला आणि तिच्या समवेतचे तिघे हे पडद्यावर राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उठून उभे राहिले नाहीत. तेव्हा हा देशाचा अपमान आहे असे अन्य आसपासच्यांनी मानले आणि तो करणाऱ्यांची त्यांनी निर्भर्त्सना केली. राष्ट्रभक्ती, नैतिकता ही अशी घाऊक पातळीवर प्रदर्शित करावयाची संधी मिळाल्यावर एरवीच्या मुखदुर्बळांनाही चेव येतो. तसा तो याही वेळी आला. त्यामुळे या अपमानकर्त्यांच्या विरोधात हुल्लडबाजी वाढली. या कुटुंबीयांनी चित्रपटगृहातून काढता पाय घेतल्यानंतरच ती शांत झाली. त्यानंतर चित्रपटगृहातील सर्व राष्ट्रभक्तांच्या भडकलेल्या भावनाही शांत झाल्या.’

दोन आठवड्यापुर्वी आपण ‘दातखिळ बसते’ असा शब्दप्रयोग कोणासाठी वापरला त्याचे तरी स्मरण कुबेरांना राहिले आहे काय? की त्यांचीच आता दातखिळी बसली आहे? की त्यांनी राष्ट्र प्रतिकांचा कायदा सांगून राष्ट्रभक्तीची खिल्ली उडवावी? यासंदर्भाने आणखी काही तपशील महत्वाचा आहे. पॅरीसच्या हल्ल्यानंतर तिथे चालू असलेला सामना सोडून दिला गेला आणि अवघे स्टेडीयम मोकळे करण्यात आले. त्यानंतर जगभर एक चित्रण अगत्याने दाखवले गेले. इतकी भयंकर घटना घडून गेली असतानाही, फ़्रेंच क्रिडारसिक घोळक्याने संथपणे स्टेडीयमच्या बाहेर पडत होते आणि सगळेच्या सगळे एकसूरात फ़्रेंच राष्ट्रगीत गुणगुणत होते. सामुहिक राष्ट्रगीत गायन त्यांनी अशा प्रसंगी गुणगुणण्याचे सार्वत्रिक व जागतिक कौतुक कशासाठी चालले होते? समोरून बंदुका व बॉम्ब वापरले जात असताना, या लोकांना आधार कुठला होता? राष्ट्रगीताचा ना? म्हणून ते राष्ट्रगीत त्यांचे कसले संरक्षण करू शकणार होते का? त्यातच आणखी कोणी अतिरेकी जिहादी असता आणि त्याने उरलेला बॉम्ब फ़ोडला असता, किंवा पुन्हा गोळीबार सुरू केला असता, तर त्यातून हे राष्ट्रगीत वाचवू शकणार होते काय? अजिबात नाही! पण त्यांचे नुसते गुणगुणणे त्याना संकटात धीर देण्याचे काम करीत होते. प्रतिके त्यासाठीच असतात आणि ते सामान्य माणसाला कळते. म्हणून त्या फ़्रेंच घोळक्याने सामुहिक राष्ट्रगीत गायन सुरू केले होते. व्यवहारी विचार केला तर राष्ट्रगीत प्राण वाचवू शकणार नसेल, तर त्याही क्षणी त्याचे गायन हा बिनडोक देशभक्तीचाच दाखला होतो. कुबेरांच्या शब्दात सांगायचे तर, ‘एरवीच्या मुखदुर्बळांनाही चेव येतो’. आणि त्याचीच अशा संकटकाळात गरज असते. जेव्हा देशातले कायदे, सुरक्षा यंत्रणा, बुद्धी व नेते नपूंसक ठरतात आणि सामान्य माणसाला सुरक्षिततेची हमी देवू शकत नसतात, तेव्हा अशीच प्रतिके बुडत्यांना काडीचा आधार वाटू लागतो. त्यातली भ्रामक जादू त्यांना आधार वाटू लागतो आणि असा भ्रम म्हणूनच सतत टिकवावा लागतो. चित्रपटगृहात तीच जादू टिकवण्याचा अट्टाहास झाला. पण कुबेरांसारख्या भंपक बुद्धीवादाच्या तो आवाक्यातला विषय नाही. त्यासाठी सामान्य बुद्धी आवश्यक असते. कुशाग्र बुद्धी कामाची नसते.

जगभरच्या सामान्य बुद्धीच्या अब्जावधी लोकांना ‘पिगी बॅन्क’ म्हणजे एक डुकराचे व्यंगचित्र किंवा त्याचे प्रतिक असलेली पैशाची पेटी हे कळते. त्यासाठीच हे प्रतिक बनवलेले आहे. म्हणून असे चित्र वा आकार म्हणजे नाणी जमवण्याचे साधन असल्याचे चटकन उमजते. त्यासाठी त्यावर पैसा साठवण्याची जागा असे लिहावे लागत नाही. ते नुसते प्रतिक आहे. आणि त्याच प्रतिकाचा वापर सरसकट जगभरच्या कुठल्याही भाषेत होत असतो. ‘लोकमत’ नावाच्या मराठी दैनिकातही एका चित्रकाराने आयसिस या जिहादी संघटनेचा पैसा कुठून कसा जमा होतो, त्याचे आशयचित्र बनवताना त्याचाच वापर केला. ते अधिक स्पष्ट व्हावे म्हणून त्यावर उर्दू वा अरबी दिसणारी काही अक्षरे टाकली. त्यातून काय चमत्कार झाला आपल्या महाराष्ट्रात? तर ओवायसी यांच्या एम आय एम नामक पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी लोकमतच्या अनेक कार्यालयात घुसून मोडतोड केली. लोकमतचे अंक जाळले. त्यामागे कोणती बुद्धी काम करत होती? तर डुक्कर हे इस्लाममध्ये अत्यंत निषिद्ध मानलेले प्रतिक आहे. डुक्कर आणि त्यावर अरबी अक्षरे बघून आपल्या धर्माचा अपमान व अवमान झाल्याचा दावा करीत हे गुंड वर्तमानपत्राच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी प्रचंड घुडगुस घातला. त्यालाही निव्वळ प्रतिकच कारण होते ना? त्याला बुद्धीचे कुबेर काय म्हणणार? ‘बिनडोक भक्ती’ म्हणायचे तर त्यावर आपली अक्कल पाजळायला काय हरकत होती? पण तिथे या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या कुबेराची ‘दातखिळ’ बसली. अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला झाला आणि प्रतिकासाठीच झाला. प्रतिक वापरले एका अर्थाने होते आणि अर्थ भलताच घेतला गेला, त्याला निर्बुद्धतेचा कळस म्हणायला हवा. पण ते काम डोके ठिकाणावर असेल तर होऊ शकते, बिनडोक संपादक असो किंवा बुद्धीमान बिनडोक असो, त्याला प्रतिके कळत नाहीत की त्यामागचा आशय कळत नाही. म्हणून छापणार्‍या संपादकाने चित्रकाराची हाकालपट्टी केली आणि हल्ला करणार्‍या गुंडांची जाहिर माफ़ी मागून शरणागती पत्करली. दुसरीकडे बुद्धीचे कुबेर असलेल्यांना खरा बिनडोकपणा लपवायचा असल्याने आपली दातखिळ बसली आहे हे झाकण्यासाठी त्यांनी तोंडाला कुलूप लावले आणि लेखणी हाती घेऊन आपल्या बिनडोकपणाची साक्ष दिली. पत्रकारितेवर झालेला असंहिष्णू हल्ल्यावर लिहायची हिंमत नव्हती. ती अगतिकता झाकण्याचा उत्तम उपाय म्हणजे हिंदूत्ववादी वा तथाकथित राष्ट्रभक्तांची खिल्ली उडवणे. याला म्हणतात गिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळी!


सवाल राष्ट्रगीताच्या सन्मानाचा नाहीच!

 

कुठल्या तरी चित्रपटगॄहात राष्ट्रगीत सुरू असताना काही मुस्लिम प्रेक्षक तिथे हजर होते आणि उभे राहून त्यांनी राष्ट्रगीताचा सन्मान राखला नाही म्हणून इतर काही प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला. या लोकांनी त्या चौघांना जाब विचारला आणि अन्य लोकही त्यात सहभागी होऊन वादाचा भडका उडाला. शेवटी त्या मुस्लिम प्रेक्षकांना बाहेर काढूनच चित्रपटाला सुरूवात झाली. अर्थात त्याची बातमीही कुठे आली नाही. कोणा अन्य प्रेक्षकाने त्याचे चित्रण आपल्या मोबाईलवर करून सोशल मीडियात टाकल्याने गवगवा झाला आणि म्हणून मग बातमीही आली. पण बातमीचा सूर असा होता, की ज्यांनी राष्ट्रगीताचा सन्मान करण्याचा आग्रह धरला, तेच गुन्हेगार आहेत आणि त्यांनी तमाशा केला. किंबहूना आजच्या भाषेत बोलायचे तर अशा राष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन मांडणार्‍यांनी आपल्या असंहिष्णूतेचे प्रदर्शन केले. असल्या भाषा व युक्तीवादाचा अर्थ थोडा समजून घेतला पाहिजे. कुठल्याही देशात गेलात तर तिथले राष्ट्रगीत हे सन्मानाचे व अभिमानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे त्याचा सन्मान राखणे वा त्याला अन्मान देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण आपला धर्म त्याला मान्यता देत नसल्याने आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहिलो नाही, असा मुस्लिम प्रेक्षकांचा युक्तीवाद आहे. अर्थातच ते मुस्लिम असल्याने व इस्लामचा हवाला देत असल्याने त्यांची भूमिका, आपल्या देशात पुरोगामी वा सेक्युलर ठरत असते. कारण आता आपल्या देशात कुठल्याही कायदे वा नियमांना इस्लामची मान्यता असावी लागते. त्यामुळेच मुस्लिम प्रेक्षकांचा नकार पुरोगामी व योग्य असतो आणि कायद्यानुसार राष्ट्रगीताचा सन्मान राखण्याचा आग्रह गुंडगिरी असते; अशी आपल्या पत्रकार माध्यमांची समजूत झाली आहे. तसे असेल तर बिचार्‍या त्या मुस्लिम प्रेक्षकांना दोष कसा देता येईल? म्हणून म्हटले समस्या थोडी समजून घ्यावी लागेल.

कालपरवा पॅरीसमध्ये मोठ्या घातपाती घटना घडल्या. त्यामागे जिहादी होते हे लपून राहिले नाही. तर त्या घातपाती हिंसाचाराचे समर्थन करताना पुरोगामी बुद्धीमंत व कॉग्रेसनेते मणिशंकर अय्यर कय म्हणाले होते? फ़्रान्सने तिथे मुस्लिम महिलांना बुरखा वापरण्यावर बंदी लागू केली, त्याचा हा परिणाम आहे. कारण बुरखा घालणे ही इस्लामने आपल्या महिलांसाठी सांगितलेले कर्तव्य आहे. म्हणूनच फ़्रान्स सरकारने बुरख्याला बंदी घालणे हा गुन्हा होता, त्याची शिक्षा मग फ़्रेंच जनतेला भोगावी लागली. इतका अय्यर यांच्या विधानाचा सरळ अर्थ आहे. याची दुसरी बाजू अशी, की आपल्याला अन्याय वाटेल तिथे आपण कायदा हाती घेऊन स्वत:च न्यायनिवाडा करू शकतो व त्यातील शिक्षेची अंमलबजावणी करू शकतो, असाही मुस्लिमांना आपोआप अधिकार मिळालेला असतो, असेच अय्यर म्हणत आहेत. जगात कुठला असा देश आहे जिथे मुस्लिम सुखाने व तिथल्या कायद्याचा सन्मान राखून गुण्यागोविंदाने नांदतात, हे तरी एखादा पुरोगामी सांगू शकेल काय? नसेल तर त्या मुस्लिमांची तिथली समस्या तरी काय असते, याचा खुलासा कोणी देवू शकेल काय? जगात प्रत्येक देशात जिथे मुस्लिम आहेत आणि त्यांना जे नागरी अधिकार तिथल्या कायद्याने दिलेले आहेत, तिथून त्यांची समस्या सुरू होते. पण जिथे वा ज्या देशात कुठलेच आधुनिक नागरी स्वातंत्र्याचे अधिकार कायदा देत नाही, तिथे मात्र मुस्लिम लोकसंख्येची कायद्याशी कुठलीच समस्या असलेली दिसत नाही. सौदी, दुबई वा तत्सम अरबी देशात कुठलेही प्रचलीत नागरी अधिकार कुणालाच नाहीत. तिथे बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि त्यापैकी कुणाचेही कायद्याशी कसलेच भांडण होत नाही. बाकी जगात मात्र मुस्लिमांचा कायद्याच्या राज्याशी सतत संघर्ष चाललेला दिसेल. म्हणूनच ही समस्या व तिचे मूलभूत स्वरूप जरा समजून घेतली पाहिजे.

ही समस्या सर्वत्र सारखीच आहे. कुठल्याही देशात, संस्थेत वा कार्यक्रमात मुस्लिम आपला धर्म घेऊन जातात. मग तिथे जे काही नियम, प्रथापरंपरा असतील, त्यामध्ये मुस्लिमांच्या इच्छा व धर्म यांचे पालन व्हावे, असा त्यांचा आग्रह असतो. राजकारणापासून सांस्कृतिक कुठल्याही बाबतीत मुस्लिमांचा आग्रह असतो, की त्यांच्या धर्माचे व त्यातील प्रतिकांचे पालन झाले पाहिजे. तसे होत नसेल तर मग तो मुस्लिमांना अन्याय वाटतो. सहाजिकच ते त्या कार्यक्रम वा प्रथेला विरोध करू लागतात. तिथून खरी समस्या सुरू होते. आज भलतेच वादग्रस्त झालेले निवृत्त न्यायमुर्ति मार्कंडेय काटजू सुप्रिम कोर्टात कार्यरत असताना, त्यांच्या समोर एक प्रकरण आलेले होते. त्यात चर्चप्रणित एका शाळेच्या मुस्लिम विद्यार्थ्याचा खटला होता. आपल्याला धर्मपालनाचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे आणि त्यात शाळा आडकाठी आणते, असा त्या मुलाचा दावा होता. ही आडकाठी कुठली? तर त्याला दाढी वाढवायची होती आणि धर्माने मुस्लिम पुरूषावर दाढी वाढवण्याचे कर्तव्य सोपवलेले आहे. पण शाळेच्या संचालकांनी दाढी काढण्याची सक्ती केल्याने आपल्यावर धार्मिक अन्याय होतो, असे ते प्रकरण होते. त्याच्या वकीलांनी तसा धार्मिक युक्तीवाद मांडला, तेव्हा काट्जूंनी त्याला उलट सवाल केला होता. मुस्लिमाला धर्मासाठी दाढी वाढवणे सक्तीचे असेल, तर मुस्लिम असूनही त्या वकीलानेच दाढी कशाला राखलेली नाही? इथे एक गंमत लक्षात येते, की धर्माचा आडोसा घेऊन तिथे तिथे असलेले नियम पायदळी तुडवण्याची मानसिकता आहे. त्या मुलावर त्या ख्रिश्चन शाळेत जाण्याची कोणी सक्ती केली नाही किंवा या चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते, तिथेच जाण्याची सक्ती कोणी त्या मुस्लिम प्रेक्षकांवर केलेली नाही. पण तिथे जायचे आणि मग तिथले नियम कायदे प्रथा मोडण्यासाठी धर्माचा मुखवटा चढवायचा, हा आडमुठेपणा नाही काय?

जगभर मुस्लिमांचे अन्य बिगरमुस्लिमांशी असलेले भांडण यापेक्षा वेगळे दिसणार नाही. युरोपात तुम्ही आपल्या आर्थिक भल्यासाठी व अन्य स्वार्थासाठी जाणार आणि मग तिथल्याच प्रस्थापित कायद्याला झुगारण्यासाठी धर्माचा आडोसा घेणार. खरेच धर्म व त्याचे काटेकोर पालन इतकेच सर्वाधिक प्राधान्याचे असेल, तर आपल्या मूळच्या इस्लामी देशात ही मंडळी कशाला थांबत नाहीत? त्या देशात असा कोणी अन्यधर्मिय वा नास्तिक पोहोचला, तर त्याला असे आपले आग्रह धरण्याचा अधिकार आहे काय? तिथले इस्लामी नियम व प्रथांचे सक्तीने पालन करावे़च लागते ना? मग समस्या कुठून सुरू होते? मुस्लिम देशात मुस्लिम धर्मनियमांचे पालन झालेच पाहिजे. पण जिथे बिगरमुस्लिम वा सेक्युलर निधर्मी राज्य असेल, तिथेही इस्लामचेच काटेकोर पालन करण्याची सक्ती असली पाहिजे. इतरांनी इस्लामचा आदर केला पाहिजे आणि अन्य कुठल्याही श्रद्धा वा कायदे असतील, ते पायदळी तुडाण्याचा मुस्लिमांना जन्मदत्त अधिकार आहे. त्यात पृथ्वीतलावरचा कुठला कोणाचा अन्य कायदा हस्तक्षेप करू शकत नाही, ही मुस्लिमांची भूमिका जगभरची समस्या आहे. हे अर्थातच आमचे मत नाही, तर त्या दुखण्यावर इस्लामचे गाढे अभ्यासक मौलाना वहिउद्दीन यांनीच काही वर्षापुर्वी बोट ठेवलेले आहे. जोपर्यंत हा हेकेखोरपणा मुस्लिम सोडत नाहीत, तोवर जगातल्या कुठल्याही बिगरमुस्लिमांशी त्यांना सुखाने व गुण्यागोविंदाने नांदता येणार नाही. किंबहूना अशा वागण्यातूनच प्रत्येक बिगर मुस्लिमाला मुस्लिम समाज आपला शत्रू बनवत चालला आहे. मात्र ते मानायची कुणा पुरोगाम्याची तयारी नाही आणि म्हणूनच जगाची विभागणी क्रमाक्रमाने मुस्लिम व बिगरमुस्लिम अशी होत चालली आहे. त्याचा कडेलोट होईल, तेव्हा हा संघर्ष थेट मुस्लिम व बिगरमुस्लिम अशा हिंसक टोकाला जाणारा आहे आणि तो दिवस फ़ार दूर नाही.

Tuesday, December 1, 2015

ये कहॉ आगये हम, युही बात करते करते? //// महायुद्धाची छाया (५)



"Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide."  - Abraham Lincoln

स्वातंत्र्यप्रेमी समाज वा देशाचा शत्रू कुठून, परदेशातून येत नसतो. अवघ्या जगाची सेना एकवटली आणि जगातला महान योद्धा जरी त्या सेनेचा सेनापती असला, तरी त्याला सार्वभौम राष्ट्र पादाक्रांत करता येत नसते. स्वयंभू समाजाचे राष्ट्र कधी परकीय शत्रूकडून संपवले जात नाही. त्याला संपवण्यासाठी त्याच समाजात विध्वंसक दगाबाज पैदा व्हावा लागतो, अशी ग्वाही अब्राहम लिन्कन यांनी दिलेली आहे. तो इशारा शतकापेक्षा अधिक काळ आधी या महापुरूषाने दिलेला आहे आणि तो इशारा केवळ अमेरिकेलाच लागू होत नाही. जगातल्या कुठल्याही देशाला, समाजाला व कुठल्याही कालखंडाला लागू पडतो. कालपरवा भारतात काही देशद्रोही हेर वा पाक हस्तक पकडले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी मनात राग धरू शकतो. पण त्यांच्यामुळे देशाचे फ़ारसे नुकसान होत नाही, इतके छुपे हस्तक उजळमाथ्यने आपल्यातच वावरतात, ते करीत असतात. कारण ते भारतीयांच्या मनात दुफ़ळी, असुरक्षितता व गैरसमज निर्माण करून शत्रूला हातभार लावत असतात. आज चारपाच परकीय हस्तक विविध जागी पकडले म्हणून आपण रागावलेले असू शकतो. कारण त्यांच्याकडून पाकला काही महत्वाची माहिती मिळाली आहे. भारतावर कुठे कसे हानिकारक हल्ले करावेत, याची माहिती शत्रूला मिळाली म्हणून आपल्याला राग येतो. ह्या माहितीचा उपयोग कसा होतो? सीमेवर कुठून जिहादी घुसखोरी करू शकतील, ती माहिती पाकला मिळाली. सहाजिकच त्याचा वापर घातपाती करणार आणि तेव्हा आपले सैनिक सुरक्षा दले गाफ़ील असणार, याचा राग आला ना? पण आपण किती गाफ़ील आहोत त्याचा पत्ता आहे? नित्यनेमाने कोणीतरी गाफ़ील ठेवून शत्रूच्या तोंडी देतो आहे, त्याचे आपल्याला किती भान असते? शत्रूला हाकलून लावण्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे आपले हितचिंतक असतात की शत्रू?

दोनच महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? शिवसेनेने त्याला विरोध केल्यावर गदारोळ माजवला गेला. पण गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

१९९० च्या दशकातली ही गोष्ट आहे. पुढे अटलबिहारी वाजपेयी हे कविमनाचे पंतप्रधान भारताला लाभले आणि त्यांच्याच कारकिर्दीत शांतता व सांस्कृतिक देवघेवीच्या नावाखाली पुन्हा गुलाम अलीला भारताचे दरवाजे खुले झाले. अर्थात अटलजींनी स्वेच्छेने असे काही केले नाही. पण त्यासाठी कोणीकोणी प्रयत्न केले असतील, त्यांची नावे देण्याची इथे गरज नाही. मागल्या पंधरावीस वर्षात भारत-पाक मैत्री संबंध वा नागरिकांचा आपसात संवाद घडवण्यासाठी जे लोक प्रयत्नशील असतात, त्यांची नावे इथे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. शिवसेनेने त्यावर प्रतिबंध लावायचा म्हटल्यावर खवळून कोण कोण रस्त्यावर आले, ते तपासले की इथे गुलाम अलीचे समर्थक कोण आहेत आणि पर्यायाने पाकिस्तानचे पुरस्कर्ते कोण आहेत, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्यांचे काम हेच असते. गुलाम अली आणि पाक सरकार यात फ़रक असल्याचे तुमच्या आमच्या डोक्यात भरवायचे. सीमेवर सैनिकांची होणारी कत्तल आणि भारतातल्या कलाजीवनाचा काडीमात्र संबंध नाही, असे गैरसमज आपल्या डोक्यात भरवणारे आपल्याला गुलाम अलीपासून गाफ़ील ठेवत असतात. गुलाम अली भारतीय संस्कृतीवर इथल्या माणसावर किती प्रेम करतो, असे हेच लोक आपल्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पण गुलाम अलीला भारताविषयी इथल्या माणसांविषयी कसे ‘कसाब’प्रेम आहे, त्याची साक्ष त्याने तेव्हा विमान प्रवासात दिलेली आहे. अर्थात हे आपल्यापर्यंत आणण्याचे काम कोणाचे असते? पत्रकार, शोधपत्रकारिता करणारे अभ्यासक किंवा माध्यमांची असते ना? मग त्यांनी गुलाम अलीचा असा खरा भेसूर चेहरा आपल्यासमोर कशाला आणला नाही? त्यांनी हा भयंकर गुलाम अली आपल्यापासून लपवण्याचे कारणच काय? तर तीच त्यांची ‘ड्युटी’ म्हणजे कर्तव्य असते. कुठल्याही परकीय हस्तकाचे हेच तर काम नसते का?

सुभाष सरीन नावाचे भारतातील पाक-अफ़गाण विषयक जाणकार आहेत. त्यांनी हा किस्सा व घटना सोशल माध्यमात मुद्दाम उधृत केली. शिवसेनेने गुलाम अलीचा कार्यक्रम बंद पाडला, तेव्हाच सरीन यांनी हा किस्सा व गुलाम अलीवर भारतात लागलेला प्रतिबंधाचा जाहिर खुलासा केला. पण कुठल्याही मुख्य प्रवाहातील माध्यमाने, वाहिनी वा वृत्तपत्राने त्याचा फ़ारसा उहापोह केला नाही. शोभा डे यासारख्या बेअक्कल बाईची प्रतिक्रीया विचारणार्‍या वाहिन्यांना, याविषयात सुभाष सरीन यांची मुलाखत प्रतिक्रिया घ्यावी असे कशाला वाटले नाही? अन्यथा कुठल्याही नामवंताच्या शौचालयातही कॅनेरा घेऊन घुसणार्‍यांची सुभाष सरीन विषयक अनिच्छा थक्क करणारी नाही, तर हेतुपुरस्सर होती. कारण त्यांना गुलाम अली भारतावर व भारतीयांवर प्रेम करतो, असा भास निर्माण करायचा होता. तर सुभाष सरीन त्याच गजल गायकाचा भारतद्वेष सिद्ध करणारे पुरावे समोर आणण्याचा धोका होता. म्हणूनच कुठल्याही माध्यमाने सरीन यांनी समोर आणलेले सत्य दडपण्यात धन्यता मानली. उलट सर्व माध्यमे व पत्रकार शिवसेनेवर दुगाण्या झाडण्यात आघाडीवर होती. ते आपले कलाप्रेम दाखवत होते. पण त्याच कलाप्रेमी मुखवट्याआड लपलेला पाक हस्तकाचा चेहरा बाहेर येऊ नये, म्हणून मग सरीन यांनी उघड केलेले सत्य दडपणे भाग असते. त्याचा परिणाम असा होतो, की आपण घातपाती असलेल्या पाक हस्तकांविषयी गाफ़ील होऊन जातो. एकदा असे गाफ़ील झालो, मग आपल्याला सीमेवर पाकिस्तानकडून मारल्या जाणार्‍या सैनिकाच्या प्राणापेक्षा गुलाम अलीचे गाणे आवडू लागते. आपल्या खर्‍या सुरक्षेपेक्षा आभासी संस्कृती गुंगवू लागते. जेव्हा समाज असा गाफ़ील व बेसावध केला जातो, तेव्हा मग कसाबच्या टोळीचे अर्ध्याहून अधिक काम सोपे होऊन जाते. परकीय हस्तक हा म्हणूनच कुठल्याही रुपात, कुठल्याही क्षेत्रातला असू शकतो. लिन्कन काय वेगळे सांगतो? आपल्या इतके क्रिकेटप्रेमी वा गुलाम अलीचे चहाते असल्यावर बाहेरून धोका येण्याची गरज आहे काय? (अपुर्ण)