भीमा कोरेगावचे निमीत्त करून जे रणकंदन मागल्या दोनचार दिवसात माजवण्यात आलेले आहे, त्यात नवे काहीच नाही. निमीत्त बदलते तरी हेतू कायम असतात. असे पेटलेले वातावरण आणि जीव मुठीत धरून सैरावैरा होणारी लोकसंख्या बघितली, मग भ्रमिष्टांना त्यात क्रांतीची बीजेही दिसू लागतात. ही बीजे किती फ़ळतात, त्याचे अनुभव ज्यांच्या गाठीशी असतात, त्यांना त्यातला फ़ोलपणा उमजलेला असतो. पण त्याचे राजकीय आर्थिक लाभ उठवणार्यांना मात्र त्यातून येऊ घातलेल्या क्रांतीची मोहात टाकणारी स्वप्ने रंगवावीच लागतात. जिग्नेश मे्वानी वा उमर खालीद ही त्यातली नवी नावे आहेत. पण बाकीचे पडद्याआडून सुत्रे हलवणारे कोणी वेगळेच आहेत. हळुहळू त्याचे धागेदोरे समोर येतील व काही झाकलेलेच रहातील. पण ज्या पद्धतीने हा संघर्ष मराठा-दलित वा पेशवाई विरुद्ध दलित असा रंगवण्याचा प्रयास आहे, त्यामागे एक सुत्रबद्धता दिसून येते. खुप दूर जाण्याची गरज नाही. आज जसे दलित त्यात ओढले गेले आहेत, तसेच चारपाच वर्षापुर्वी मराठा तरूणही ओढले गेले होते. तेव्हाही त्याला जातीसंघर्षाचा रंग देण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यातही काही राजकारण्यांनी आपापले हातपाय धुवून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठा आरक्षण असे गोंडस नाव देऊन खुप भडकावू कारवाया झाल्या होत्या आणि पुतळे हलवणे फ़ोडण्यापर्यंत मजल गेली होती. त्याचे नामोनिशाण आज शिल्लक राहिलेले नाही. कोपर्डीच्या घटनेनंतर मूक मोर्चाचे आयोजन झाले, त्यात अशा नेत्यांना वा म्होरक्यांना कोणी स्थान दिले नाही. आजही पेटलेल्या तापलेल्या वातावरणाने काहीसा धुरळा उडालेला आहे. पण जे सुत्रधार आहेत, त्यांची स्वप्ने त्यातून पुर्णत्वास जाण्याची बिलकुल शक्यता नाही. सामान्य माणूस कुठल्याही जातीपंथाचा असो, त्याची मतलबी लोकांचे हेतू ओळखून त्यापासून दूर रहाण्याची विवेकबुद्धी शाबुत असल्यानेच या देशातली लोकशाही आजवर टिकून राहिलेली आहे.
भीमा कोरेगावच्या निमीत्ताने जी एल्गार परिषद योजण्यात आलेली होती, त्यात अनेक संघटना असल्याचा दावा केला जातो. त्यांची नावी समोर आलेली नाहीत. पण अशा अनेक साध्या भासणार्या नावांमागची प्रेरणा शहरी नक्षलवाद असल्याचे आता लपून राहिलेले नाही. कधी कबीर कला मंच वा तत्सम नावे घेऊन पुढे यायचे. तर कधी कुठल्याही अन्य जाती समुहांच्या संस्था संघटनांमध्ये शिरकाव करून, त्यांच्या दुखर्या भागावर फ़ुंकर घालत आगी पेटवायच्या; ही रणनिती राहिलेली आहे. त्यात काही भूमीगत असतात, तर काही बाकीच्या समाजात मिसळून उजळमाथ्याने आपले उद्योग चालवित असतात. जितके म्हणून निराश वैफ़ल्यग्रस्त राजकीय गट व संघटना आहेत, त्यांनी त्यात परस्परांशी सहकार्य करीत आपापले हेतू साध्य करण्याचा समझोता केलेला असतो. नक्षलवादी प्रवृत्तीचे लोक त्यात साळसूदपणे शिरकाव करून बसलेले आहेत. देशात सत्तांतर झाल्यापासून सत्ताभ्रष्ट झालेले कॉग्रेसी त्यांना रसद पुरवण्याचे काम करीत असतात. त्यांचा हेतू भाजपा वा हिंदूत्ववादी विचारांच्या विरोधात वातावरण उभे करण्याचा आहे. म्हणून जिथे शक्य असेल तिथे कुठल्या तरी समाज समुहाच्या दुखर्या जागा शोधून त्यात ठिणगी टाकण्याचा उद्योग चालूच असतो. पुरस्कार वापसीतून काही साध्य झाले नाही, तेव्हा हा नवा मार्ग शोधण्यात आलेला आहे. सहाजिकच दोन वर्षापुर्वी नेहरू विद्यापीठातला कन्हैयाकुमार तेजीतला हिरो होता आणि आज जिग्नेश मेवाणी आघाडीवर आहे. यांचे गौरी लंकेश सोबतचे फ़ोटो दोन दिवसात बघायला मिळाले आणि त्यामुळे महाराष्ट्रात उफ़ाळलेल्या हिंसेचे हेतू उघड झालेले आहेत. त्याचा नक्षली चेहरा लपू शकलेला नाही. अर्थात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो हजारो दलित आंबेडकरवादी लोकांना कोणी नक्षली म्हणू शकणार नाही. पण चेहरा त्यांचा आणि हेतू नक्षल्यांचा, असा हा खेळ आहे.
यापुर्वीही दलित वस्त्यांच्या भागात अशी हिंसा व बंद झालेले आहेत. पण बुधवारी ज्याप्रकारे रस्त्यावर जमाव फ़िरून बंदसाठी धुमाकुळ घालत होते, त्यातकी कार्यशैली वेगळीच होती. दोन वाहिन्यांच्या वार्ताहरांनी एकाच नाक्यावरून तासभर केलेल्या चित्रण वार्तांकनामध्ये तो फ़रक नजरेत भरणारा होता. दोनतीनशे लोकांचा एक जमाव घोषणा देत, झेंडे फ़डकावर वहाने दुकाने बंद करण्यासाठी फ़िरत होता आणि तो मैलभर पुढे सरकला, की दुसरा दोनतीनशेचा जमाव अन्य कुठून तरी तिथेच अवतीर्ण व्हायचा. यापुर्वी हजारोचा जमाव घोषणा देत निघून गेल्यावर माघारी शांतता असायची. ही नवी कार्यशैली अनेक जागी दबा धरून बसणार्या व एकामागून एक हल्ले करीत दहशत माजवणार्या नक्षली यादवीची होती. हा फ़रक नजरेत भरणारा आहे. यातून कुठेतरी पोलिसांचा संयम सुटावा किंवा अन्य कुठल्या समाजसमुहाने रस्त्यात उतरून दोन हात करावेत, ही अपेक्षा लपून राहिली नाही. शिवसेना वा अन्य कुठल्या तत्सम संघटनेने प्रत्युत्तर द्यावे आणि हिंसेचा भडका उडावा, अशीच अपेक्षा होती. पण ती फ़ोल ठरली. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही, की बाकी कुठली संघटना वा लोकसमुहाने प्रत्युत्तर दिले नाही. सहाजिकच बंद समर्थकांनी केलेल्या हिंसेपलिकडे कुठलीही हिंसा होऊ शकली नाही. नेमक्या भाषेत सांगायचे तर कुठलीही जातीय वा सामुहिक दंगल त्यातून उसळू शकली नाही. हिंसा वा धुमाकुळाला कुठूनही थोडातरी प्रतिसाद वा प्रतिकार झाला असता, तरी मुंबई वा अन्य शहरात काही दिवसांची दंगल पेटत राहिली असती. आताही तसाच प्रकार गुरूवारी गुजरातच्या राजकोट शहरात झाल्याच्या बातम्या आहेत. भीमा कोरेगाव आणि राजकोटचा दुरान्वये तरी संबंध येतो काय? नसेल तर तिथे बसेस पेटवल्या जाणे वा वहानांवर दगडफ़ेक व्हायचे काय कारण आहे? ही खास गोरिला वॉर किंवा घातपाती युद्धाची संकल्पना आहे.
ही रंगीत तालिम समजायला हरकत नाही. आजवर जंगलात किवा दुर्गम खेड्यात अकस्मात उफ़ाळणारा नक्षली हिंसाचार, आता शहरी भागात सरकू लागल्याची चिन्हे या दोन दिवसातल्या घटनांनी दाखवली आहेत. राज्याच्या गुप्तचर विभागाने मिळवलेल्या माहितीनुसार यामागे नक्षली नियोजन असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. त्याची पत्रके वा अन्य काही पुरावे मिळणे ही वेगळी बाब आहे. पण या दोन दिवसांच्या धुमश्चक्रीची कार्यशैली त्याचीच साक्ष देणारी आहे. म्हणूनच या उद्रेकाचे समर्थन करणार्यांच्या राजकीय भूमिका तपासून बघितल्या, तर त्यामागचे हेतू उघड होऊ शकतील. नेहरू विद्यापीठात भारताचे तुकडे व बरबादी करण्याच्या गर्जना करणार्यांनी आता संविधानाच्या मुखवट्याखाली नक्षलवाद विकायचे दुकान उघडले आहे. ज्यांचा लोकशाही वा निवडणूकांच्या मार्गाने सत्तांतर करण्यावर विश्वास नाही वा बंदुकीच्या हिंसेच़्या मार्गानेच सत्ता बळकावण्यावर निष्ठा आहे, तेच आता गांधी आंबेडकरांच्या नावाने क्रांतीची स्वप्ने बघत असल्याचा हा साक्षात्कार आहे. आज जे दलितांच्या अस्मिता घेऊन आपला चेहरा त्यामागे लपवित आहेत, तेच उद्या अल्ला हो अकबरची डरकाळी फ़ोडून मुस्लिमांच्य अस्मितेचा मुखवटा पांघरतील, याबद्दल खात्री बाळगायला हरकत नसावी. कधी प्रादेशिक अस्मिता, तर कधी पर्यावरणाचे बुरखे पांघरून आपला अजेंडा पुढे रेटण्याचा हा खेळ आहे. त्यात उदारमतवादी मनोरंजन करून घेण्य़ासाठी सहभागी होणार आणि त्यांचाच त्यात बळी पडण्याची शक्यता नेहमी असते. रोहित वेमुलापासून मेवाणी खालीदपर्यंत हेही त्यातले मोहरेच आहेत. त्यांच्याच तात्कालीन भावना प्रक्षोभाच्या इंधनावर अशा हिंसक क्रांतीच्या सोहळ्यांचे आयोजन केले जात असते. मात्र त्यात सरपणासारखे होरपळून गेल्यावर त्यांच्याकडे तक्रार करण्याचेही अवसान शिल्लक राहिलेले नसते. असे एल्गार स्वातंत्र्योत्तर काळात शेकड्यांनी होऊन गेलेत. पण भारतीय लोकशाही त्याला पुरून उरलेली आहे.

