Tuesday, January 9, 2018

आसामचा जुना असाध्य आजार

assam violence के लिए इमेज परिणाम

१९७१ सालात बांगलादेश युद्ध झाले आणि त्याच्याही आधीपासून आसामसह अन्य इशान्य भारतीय राज्यांमध्ये बांगलादेशी निर्वासितांचा लोंढा सुरू झालेला होता. १९७० च्या सुमारास पाकिस्तानचे लष्करशहा याह्याखान यांनी पुन्हा लोकशाही आणण्यासाठी निवडणूका घेतल्या, तेव्हा आजचा बांगला देश हा पुर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. तिथली लोकसंख्या पश्चीम म्हणजे आजचा पाकिस्तानपेक्षाही अधिक होती. सहाजिकच निवडणूकांचे निकाल आले, तेव्हा संसदेतील सर्वाधिक जागा जिंकून पुर्व पाकिस्तानच्या अवामी लीग पक्षाचे नेते शेख मुजीबूर रहमान यांनी बहूमत प्राप्त केलेले होते. मात्र तेवढ्यामुळे त्यांना पंतप्रधान म्हणून स्विकारायला पाकिस्तानी पंजाबी लष्कर वा राजकीय नेते तयार नव्हते. म्हणून रहमान यांना चर्चेसाठी लाहोरला बोलावण्यात आले आणि त्यांनी उपपंतप्रधान होऊन झुल्फ़ीकार अली भुत्तो यांच्या हाताखाली काम करावे, असा सल्ला देण्यात आला होता. तो त्यांनी अमान्य केल्यावर त्यांना तिथेच स्थानबद्ध करण्यात आले आणि पुर्व पाकिस्तानात त्यावर तीव्र प्रतिक्रीया उमटल्यावर लष्करी कारवाई सुरू करण्यात आली. ही लष्करी कारवाई म्हणजे तिथल्या एकूणच जनतेवर बंदुका रोखल्या गेल्या आणि सार्वत्रिक कत्तलीचा कार्यक्रम सुरू झाला. महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि घरेदारेही जाळण्यात आली. त्यात जमाते इस्लामी या जातीय पक्षानेही पुढाकार घेतला होता आणि तिच्या गुंडांनी तिथल्या हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू केले. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पुर्व पाकिस्तानचे कोट्यवधी लोक जीव मूठीत धरून सैरावैरा पळू लागले. नजिकच्या देशात त्यांनी आश्रय घेतला आणि बहुतेक सीमा भारतालगत असल्याने त्यातले बहुसंख्य निर्वासित आसाममध्ये शिरले. तिथून आसाम या भारतीय राज्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांची समस्या सुरू झाली. ती आजही भडकलेलीच आहे.

पुढे ते युद्ध संपले आणि सीमेलगतच्या छावण्यांमधून लाखो निर्वासित परत गेले. तरी कित्येक लाख निर्वासित भारतीय भूमीतच बस्तान मांडून बसले. त्यांची कुठेही कसली नोंद नव्हती आणि भाषा व संस्कृतीच्या साम्यामुळे, त्यातले अनेकजण सहजगत्या आसाममध्ये मिसळून गेले. मात्र हळुहळू त्यांचे वेगळेपण किंवा सामुहिक कृती यातून स्थानिकांशी संघर्ष सुरू झाले. १९८०च्या दशकात त्याचा भडका मोठ्या प्रमाणात उडाला. त्यात राजकीय पक्षांनी आपल्या मतलबासाठी अशा घुसखोरांची मतदार म्हणून नोंदणी करून घेतली आणि पुढल्या काळात मायदेशीच्या गरीबीतून अनेक बांगलादेशी भारतात येतच राहिले. किमान वेतनात कष्टाचे काम करणार्‍या लोकांना स्थानिक व्यापारी व पैसेवाल्यांनी संभाळून घेतले. पण स्थानिकांना रोजगाराच्या संधी हुकण्यामुळे तो विषय अधूनमधून ऐरणीवर येतच राहिला. १९८० च्या सुमारास हा विषय आसामी विद्यार्थी संघटनेने हाती घेतला आणि त्याला हळुहळू व्यापक स्वरूप येत गेले. आरंभीची ही विद्यार्थी चळवळ लौकरच राजकीय रुप धारण करून बसली आणि बांगलादेशी घुसखोर व त्यांची अरेरावी तिथली डोकेदुखी होऊन गेली. हळुहळू बांगलादेशी घुसखोर भारताच्या अन्य प्रांत व प्रदेशातही जाऊन पोहोचले आणि त्यातून लोकसंख्येचे स्वरूप आमुलाग्र बदलत जाऊ लागले. त्यातही बांगलादेशी मुस्लीमांची एक राजकीय शक्ती उदयास येत गेली. तिला आळा घालणार्‍या स्थानिक अस्मिताही उदयास येत गेल्या. राजकारणात मतांची संख्या महत्वाची असल्याने कोणी राजकीय पक्ष तो विषय हाती घेत नव्हता. विद्यार्थी संघटनेनेही राजकीय अवतार घेतल्यावर अस्मिता गुंडाळून राजकारणच केले. परिणामी हा विषय सुप्रिम कोर्टापर्यंत गेला आणि वास्तविक समस्येची प्रथमच कायदेशीर दखल घेतली गेली. आज जी मूळनिवासी नागरिकांची नोंद चालू आहे, तो विषय असा जुने दुखणे आहे.

बांगला मुक्तीच्या युद्धाला आता साडेचार दशके उलटून गेली असून, घुसखोरांचीही एखाददुसरी पिढी इथे जुनी झालेली आहे. सहाजिकच कोण मूळनिवासी आसामींचे वारस वंशज ते निश्चीत करणे गुंतागुंतीचे काम झालेले आहे. तरीही सुप्रिम कोर्टाने एकविसाव्या शतकाच्या आरंभी यासाठी एकसदस्य आयोग नेमला आणि विषयाला चालना मिळाली. त्या आयोगाने आसामच्या नैसर्गिक व ऐतिहासिक स्वरूपाला घुसखोरीने धक्का बसल्याचे मान्य केले होते. एकप्रकारे भारतावर झालेले लोकसंख्यात्मक आक्रमण असल्याचे मत त्यातून व्यक्त झाले. म्हणूनच मूळनिवासी आसामी व घुसखोर यांची स्वतंत्रपणे नोंद करण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने घेतला आणि जबाबदारी राज्य ससरकारवर सोपवलेली आहे. त्यानुसार ही नोंदणी व तपासणी चालू असून, तोच एक वादाचा विषय होऊन बसला आहे. सरकारी नोंदणी व छाननी करताना पोलिस व अन्य सरकारी यंत्रणा वापरल्या जातात. त्यांचा कारभार हडेलहप्पी पद्धतीने होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होणे स्वाभाविक असते. तीन कोटीहून अधिक अशा आसामी लोकसंख्ये़ची तपासणी व छाननी करताना, प्रत्येकाला सन्मानपुर्वक वागवणे शक्य नाही. आदरातिथ्य करून नोंदणी होण्याची अपेक्षा करता येत नाही. साधारण तेव्हा १९७० च्या दशकात इथे येऊन वसलेले वा मुळचे रहिवासी यांची कुठल्या सरकारी दफ़्तरात नोंद असण्यावर ही छाननी तपासणी अवलंबून आहे. पण त्या काळत प्रत्येक नागरिकाची नोंद असेलच असे नाही. अनेकांचा जन्मच १९७१ नंतरचा असेल तर त्यांचे पुर्वज व त्यांच्या सरकारी दफ़्तरातील नोंदीनुसारच आजची तपासणी व खातरजमा होऊ शकते. म्हणूनच कोर्टाने सरकारवर सोपवलेले काम सोपे नाही की सुटसुटीत नाही. ते बहुतांश नागरिकांना त्रासदायकच असणारब आहे. मग त्यविषयी तक्रार करून काय फ़ायदा असू शकतो?

१९५१ साली जनगणनेच्या नंतर प्रथमच एन आर सी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंद हे दफ़्तर तयार करण्यात आलेले होते. त्यात नागरिकांची तपशीलवार माहिती नोंदलेली असे. त्याच्या प्रति उपविभागिय आयुक्त व अधिकार्‍यांच्या कार्यालयातही असायच्या. पुढे १९६० नंतरच्या काळात हे दफ़्तर पोलिस खात्याकडे सोपावण्यात आले. आता आसाममध्ये जी नागरिक नोंदणी व छाननी चालू आहे, ते त्याच दफ़्तराचे नुतनीकरणाचे आहे. त्याचे काम २०१४ मध्ये सुरू झालेले असून त्याचा नावनिशीवार मसूदा प्रकाशित केला जात आहे. ज्यांची नावे त्यात नागरिक म्हणून समाविष्ट होणार नाहीत, त्यांची नंतरच्या काळात उचलबांगडी होण्याची भिती आहे. म्हणूनच त्याविषयी काहुर माजलेले आहे. त्यात प्रामुख्याने बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे. अर्थात त्यात मुस्लिमांचा भरणा अधिक असल्याने त्याला धार्मिक रंग चढलेला आहे. नाहीतरी देशातील मुस्लिम संघटना व संस्था कायम आपल्यावर अन्याय होत असल्याचा गळा काढतच असतात. सहाजिकच एन आर सी हे अशा मुस्लिम नेत्यांना मिळालेले नवे कोलित आहे. त्यापैकी जमाते उलेमा हिंदचे म्होरके सय्यद अर्शद मदनी यांनी रक्तपाताच्या धमक्या देण्यापर्यंत मजल मारली तर अजिबात नवल नाही. ५० लाख लोकांना या नोंदणीतून वगळण्यात आले तर आसाम पेटल्याशिवाय रहाणार नाही, अशी धमकी त्यांनी दिलेली आहे. ४०० वर्षाहून अधिक काळ इथे वसलेल्यांचीही नावे नोंद दफ़्तरातून वगळली गेल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. पण जो मसुदा प्रसिद्ध झालेला आहे, तो पहिला असून असे तीन मसुदे प्रसिद्ध व्हायचे आहेत. सहाजिकच पहिल्या यादीतून सुटलेली नावे दुसर्‍या वा तिसर्‍या यादीतही येऊ शकतात. त्यासाठी संयमाची गरज आहे तशीच योग्य पुरावेही सादर करण्याची गरज आहे. पण इतका गंभीरपणे आपल्याकडे कुठला विषय चर्चिला जात असतो?

कुठलाही विषय किती महत्वाचा वा गुंतागुंतीचा आहे, त्यापेक्षा त्यातून किती सनसनाटी माजवता येईल, त्यालाच प्राधान्य दिले जाते. त्यात माध्यमे सहभागी असतात, तसेच राजकीय नेते व पक्षही हिरीरीने पुढाकार घेत असतात. त्यामुळेच समाजाच्या वा देशाच्या समस्या मार्गी लागण्यापेक्षाही त्यात व्यत्यय मात्र नित्यनेमाने आणले जात असतात. म्हणूनच एका बाजूला आसामातील घुसखोरांचा हा विषय वादाच्या भोवर्‍यात सापडला असताना; रोहिंग्या नावाचा नवा विषय मध्यंतरी ऐरणीवर आलेला होता. म्यानमार नावाच्या पुर्वेकडील देशात बौद्ध व मुस्लिम यांच्यात हिंसक दंगली उसळल्या आणि हजारोच्या संख्येने निर्वासित आसपासच्या देशात आश्रयाला गेले. त्यापैकी काही भारताच्या प्रदेशातही घुसलेले आहेत. निर्वासितांविषयी सहानुभूती असायला हवी. पण अशा गर्दीतून समाजाला घातक अशाही प्रवृत्ती येत असतात. त्यांना आश्रय हवा असण्यापेक्षा, जिथे होते तिथलेच आजार इतरत्र घेऊन जायचे असतात. ही वस्तुस्थिती असताना रोहिंग्या मुस्लिमांना विनाअट भारतात आश्रय देण्यावरून इथे गदारोळ माजवण्यात आला होता. तोच चार दशकांपुर्वी बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत झाला आणि आज आसामला ती समस्या भेडसावते आहे. दोन दशकापुर्वी मुंबई महाराष्ट्रात आढळलेल्या काही घुसखोर बांगलादेशी नागरिकांची पुरती झाडाझडती घेऊन त्यांना मायदेशी पाठवण्याची कारवाई करण्यात आली. तर बंगालच्या सीमेवर पोहोचण्याआधीच डाव्या आघाडीचे राज्य असलेल्या त्या प्रांतामध्ये मुंबई पोलिसांवर हल्ला चढवून घुसखोरांची मुक्तता करण्यात आली होती. अशी कायदेशीर आणि प्रशासकीय स्थिती असलेल्या देशात कुठल्या गोष्टी जपल्या जाऊ शकतात? त्यांच्याशी किती संयमाने वागले जाऊ शकते? शेवटी पोलिसही आपल्यासारखीच माणसे आहेत आणि त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात.

आसाममध्ये आज जी काही छाननी व तपासणी चालू आहे, ती मार्गी लागण्यापुर्वीच त्यातले दोष दाखवण्याचा व अन्यायाची बोंब ठोकण्याचा हेतू उघड आहे. त्यामध्ये ज्यांचे राजकीय वा कुटील हेतू लपलेले आहेत, त्याना असे काही व्हायलाच नको आहे. अर्थात पाकिस्तानसारख्या देशात अशा आगावूपणाला थेट गोळी घालून विषय निकालात काढला जात असतो. भारतात आपण लोकशाही मानतो, म्हणून मानवी हक्क आहेत आणि घुसखोरांचेही चोचले चालू शकतात. त्यांना पाठीशी घालणारेही लोक आहेत. तेच अशा गुन्ह्याला वा बेकायदेशीरपणाला न्याय्य ठरवण्याचे उद्योग करीत असतात. त्यांना कायद्यातील त्रुटी दिसत वा वापरता येत असतील. त्यांचा विश्वास कायद्याच्या दुबळेपणावर असल्याने हे चालू शकलेले आहे. पण सामान्य भारतीय नागरिकाच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा आहे. ती जेव्हा ओलांडली जाईल, तेव्हा कायदा आणि त्याच्या पावित्र्याला अर्थ उरणार नाही. त्याचे संरक्षण शिल्लक रहाणार नाही. असल्या मानवतावादाचे चोचले पुरवण्यापेक्षा गोळ्या घालून प्रकरण निकालात काढण्याला लोक डोक्यावर घेऊ लागतील. आसाम वा अन्य भारतीय प्रांतामध्ये अशा घुसखोरीने स्थानिकांच्या न्याय्य हक्क व सुरक्षेला धोका निर्माण झाला अशी धारणा झाली, तर त्याची हिंसक प्रतिक्रीया उमटू शकेल. चार वर्षापुर्वी कोक्राझार वा अन्य प्रदेशात अशाच दंगली पेटल्या होत्या आणि त्यालाही घुसखोर विरुद्ध स्थानिक असाच रंग होता. त्यातून शहाणपण शिकले नाही, म्हणून तिथले मुख्यमंत्री तरूण गोगोई यांना सत्ताभ्रष्ट व्हावे लागलेले आहे. त्यांना घुसखोरीने मतदार होऊ शकलेले मतदान वाचवू शकले नाही. आताही हे राजकारण असेच चालत राहिले तर संपुर्ण देशात जनमानस मानवतावाद व पुरोगामीत्वाच्या थोतांडाला विटून जाईल. त्यात घुसखोरांचा बळी जाईलच. पण पुरोगामी राजकारणही डबघाईला गेल्याशिवाय रहाणार नाही.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार आसाममध्ये नागरिकांची नोंद चालू आहे आणि त्यात अन्य कुठल्या जातीधर्माच्या समाज घटकांशी पक्षपात होण्याचे कारण नाही. निदान भारतात असे सहसा झालेले नाही. म्हणूना मदनी यांच्यासारख्या मुखंडांनी त्यावर काहूर माजवून धमक्या देण्याचे कारण नाही. प्रत्येक नागरिकाला आपली ओळख देता आली पाहिजे आणि त्याच्यापाशी ओळख नसेल तर त्याला कुठलेही संरक्षण मिळण्याचे काही कारण नाही. इतकी मोठी उलथापालथ होत असताना मुठभर लोकांना त्रास झाला तर त्याला अन्यायही म्हणता येणार नाही. कोट्यवधी लोकांच्या न्यायासाठी व सुरक्षेसाठी मुठभर लोकांनी थोडा त्रास काढला पाहिजे. विमानतळावर कुठल्या तरी एका प्रवाश्याला रोखण्य़ाला अन्याय म्हणता येत नाही. तिथून येजा करणार्‍या लाखो प्रवाश्यांच्या सुरक्षेपेक्षा त्या एका व्यक्तीची प्रतिष्ठा वा वैयक्तीक अधिकार कधीच मोठे नसतात. आसाममधल्या नव्या नागरिक नोंदणीची तीच महत्ता आहे. त्यात दोनचार नागरिकांना त्रास झाला किंवा पोलिस यंत्रणेकडून आक्षेपार्ह वागणूक मिळाली, म्हणून काहूर माजवण्याचे कारण नाही. याच देशात हजारो लोक असे आहेत, की नुसत्या संशयामुळे त्यांना अटक होते आणि पुराव्याशिवायही दीर्घकाळ तुरूंगात डांबले जाते. त्यांच्यावरही अन्याय होतो आणि बहुतांश अशा लोकांनी तो त्रास सहन केला आहे. म्हणूनच इथे कायद्याचे राज्य टिकून राहिले आहे. त्याचे लाभ उठवणार्‍यांना त्याच कायदा व्यवस्थेमुळे होणारा कमीअधिक गैरकारभारही निमूट सहन केला पाहिजे. जितके दुखणे जुने तितका त्यावरचा उपचारही मोठा व त्रासदायक असतो. तीच आसामची कहाणी आहे. सरकारही योजलेला उपाय अधिक सुसह्य व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. त्यात व्यत्यय वा अडथळे आणण्यात शहाणपाणा नाही. मग ते आक्षेप कुणा धर्मगुरूचे असोत वा कुणा मानवतावादी शहाण्याचे असोत.

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

udayan raje bhosle के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपका ठेवलेला आहे, तर मराठा ज्ञातीशी निगडीत असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने आजवर पूजनीय मानलेल्या छत्रपतींच्या वंशजांवरच शरसंघान करण्यापर्यंत मजल मारली आहे. मराठा अभिमान म्हणून मागल्या काही वर्षात ज्या संघटनांचे पीक आले, त्यात सर्वात आक्रमक म्हणून संभाजी ब्रिगेड या संघटनेचा समावेश होतो. पण क्रमाक्रमाने त्यातले मराठापण बाजूला पडून, ब्राह्मण या जाती समुहाविषयीचा मत्सर व द्वेष याच पायावर ही संघटना उभारली गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले. कारण मराठा हितापेक्षाही ब्राह्मण द्वेषासाठी वाटेल ते करण्यापर्यंत या संघटनांच्या नेत्यांची मजल गेलेली होती. आरंभीच्या काळात शिवराय किंवा शंभूराजे यांचा अभिमान व सन्मान यासाठीच आपण लढत असल्याचे चित्र निर्माण केले. पुढे या संघटनेने हळुहळू आपण ब्राह्मण जात व पर्यायाने हिंदू धर्माच्या विरोधातला आपला खरा चेहरा समोर आणला आणि जमा झालेले बहुतांश मराठा तरूणही त्यापासून दुरावत गेले. तरीही त्यांनी आपल्या आरंभीच्या काळात शिवरायांच्या विविध वंशज वारसांना पुढे करून आपला कार्यभाग साधलेला होता. जोवर अशा संघटनांना छत्रपतींचे वारस समर्थन देत होते व पाठ थोपटत होते, तोपर्यंतच त्या वारसांचे कोडकौतुक होते. परंतु या संघटनांच्या मूळ हेतूमुळे हे वारस वा मराठा तरूण दुरावत गेले, तेव्हा या संघटनेने मराठे व छत्रपतींच्या वारसांवरही आसूड ओढायला मागेपुढे बघितलेले नाही. कालपरवा त्यापैकी कोणीतरी थेट छत्रपती उदयनराजे यांनाही धमकावण्यपर्यंत मजल मारली, तेव्हा झुंडीचे मानसशास्त्र कसे असते आणि त्यातला सच्चा अंध अनुयायी कसा असतो, त्याचीच प्रचिती आली. प्रोटेस्टंट ख्रिश्चन पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर याचे बोल आठवले.

‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन.’ (प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर)

हा मार्टीन ल्युथर म्हणजे अमेरिकन कृष्णवर्णियांचे समतेचे आंदोलन चालविणारा नव्हेतर ख्रिश्चन धर्मातील पोपविरोधी वेगळ्या पंथाचा संस्थापक होय. आपले अनुयायी किती कडवे आणि अविवेकी निष्ठावान असावेत, याचे मार्गदर्शन करताना तो काय म्हणतो? जे काही येशूच्या नावाने वा देवविषयक येशूच्या शिकवणूकीतून समोर आले आहे, त्याला आपण घट्ट चिकटून राहिले पाहिजे. म्हणजे त्याची चिकित्सा वगैरे करायची नसते. सत्य वा तारतम्य आपल्याला वर्ज्य आहे. ही निष्ठा इतकी पक्की व आंधळी असली पाहिजे, की ज्या स्वर्गातील देवदूताकरवी धर्माची शिकवण आली, ते देवदूत सत्य नसून त्याविषयी येशूने दिलेली शिकवण मानली पाहिजे. मग खुद्द देवदूतच समोर अवतरला आणि तो काही वेगळे सांगत असेल, तर त्यालाही जुमानण्य़ाचे कारण नाही. किंबहूना तो देवदूत काही वेगळे सांगत असेल, तर ते ऐकूनही घेऊ नये. त्यासाठी आपले डोळे व कान बंद करून घ्यावेत. संभाजी ब्रिगेडच्या अनुयायांची कथा त्यापेक्षा वेगळी आहे काय? आरंभ काळात त्यांनी आपले बस्तान बसवण्यासाठी उदयनराजे वा संभाजीराजे अशा शिवछत्रपतींच्या वारसांचा उपयोग करून घेतला. त्यांचेही देव्हारे माजवले होते. पण जेव्हा खुद्द तेच आज़चे छत्रपती काही वेगळे सांगू इच्छित आहेत, तेव्हा त्यांचे शब्द ऐकायला ब्रिगेडच्या अनुयायांना प्रतिबंध आहे. याचा अर्थ इतकाच, की साक्षात शिवराय वा शंभूराजे पृथ्वीतलावर आज अवतरले; तरी त्यांच्याकडे बघायचे वा त्यांचे ऐकायचे कारण नाही. शिवराय व मराठेशाही याविषयी परमपूज्य खेडेकर कोकाटे इत्यादिकांनी जी शिकवण दिलेली आहे, त्यालाच आपण घट्ट चिकटून बसले पाहिजे. त्याला छेद देणारे काही ऐकायला लागू नये, म्हणून कान बंद करून घ्यावेत. असे काही बघायला लागू नये म्हणून डोळेही बंद करून घेतले पाहिजेत. अन्यथा या लोकांनी उदयनराजे यांना कशाला धमकावले असते?

ज्या शिवराय वा शंभूराजे यांच्या नावाने राजकीय संघटन उभारून डावपेच खेळले गेले आहेत, त्यांना खुद्द छत्रपती वा त्यांच्या विचारांशी किती कर्तव्य आहे? त्याची़च प्रचिती या आठवडाभरात आलेली आहे. उदयनराजे यांनी छत्रपती पदाचा गैरवापर करू नये, असे आज त्यांना कोणी ब्रिगेडी नेता वा पदाधिकारी दमदाटी करून सांगतो आहे. हे पद उदयनराजे यांना ब्रिगेडने बहाल केलेले आहे काय? त्याचा वापर संभाजीराजे वा उदयनराजे यांनी कोणत्या प्रकारे करावा, ते संभाजी ब्रिगेडने ठरवावे, असे कुठे घटनेत लिहून ठेवलेले आहे काय? उदयनराजे यांचा जन्म त्या घराण्यात होण्यापुर्वी तशी कुठली अट घातलेली होती काय? छत्रपतींच्या वारसाने काय करावे किंवा काय बोलावे, हे ठरवण्य़ाचा अधिकार काही आगावू उचापतखोरांनी पुर्वीच्या काळात वापरल्याचा दुर्दैवी इतिहास आहे. त्याचाच जातीय तेढ वाढवण्यासाठी उपयोग करून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला. ती संघटना त्याच जातीद्वेषावर फ़ोफ़ावली होती. कुणा भुरट्या ब्राह्मणाने शाहू महाराजांना कोणते अधिकार आहेत किंवा नाहीत, त्याचा बागुलबुवा केला, हेच संभाजी ब्रिगेडचे स्थापनेपासूनचे भांडवल आहे. आज तीच संघटना वा तिचे कोणी पदाधिकारी नेमका तोच अधिकार आपल्या हाती घेऊन विद्यमान छत्रपतींना दमदाटी करीत आहेत. वैदिक म्हणून जे शाहू महाराजांच्या कालखंडात गाजलेले प्रकरण आहे, त्यातले भटजी आणि आजच्या संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्यात नेमका कोणता गुणात्मक वा व्यवहारी फ़रक आहे? ते भटजी महाराजांना त्यांची मर्यादा सांगत होते आणि आजचे ब्रिगेडी उदयनराजेंना त्याच थाटात पदाचा गैरवापर करू नका म्हणून दटावत आहेत. थोडक्यात बघितले तर आजची संभाजी ब्रिगेड शाहूकालीन भटजींच्या भूमिकेत आलेली आहे. त्यांनीच आजवर मांडलेल्या विकृतीच्या आहारी ही संघटना गेलेली नाही काय?

याला सच्चा अनुयायी वा अंधभक्ती म्हणतात. ज्यात दैवतापेक्षा त्याचा पुरोहित वा पुजारी महत्वाचा होतो. ज्या शिवछत्रपतींच्या पुण्याईवर अशा संघटना निर्माण झाल्या व त्यांच्याच वारसाला पुढे करून या संघटनांनी पत मिळवली, त्याच वारसांना आता यांनी दमदाटी सुरू केलेली आहे. त्यात मग उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या धमकीपर्यंत मजल गेली आहे. सातार्‍यात या राजाला कुणाच्या मर्जीने उमेदवारी मिळत नाही, की कुठल्या पक्षाचे ओशाळे रहावे लागत नाही. संभाजी ब्रिगेडप्रमाणे त्या छत्रपतीला कोणाची मर्जी संभाळावी लागत नाही. या आजच्या छत्रपतींचा मतदार ब्रिगेडच्या अनुयायांइतका आंधळा नाही. शिवराय वा शंभूराजे म्हणजे काय व किती मोठे, ते सांगण्यासाठी मराठी माणसाला कुणा खेडेकरने कोकाटण्याची कधी गरज भासली नाही. म्हणूनच उदयनराजेंनाही कुणा संघटनेच्या धमक्यांनी काहीही फ़रक पडत नाही. मात्र हा वारस बोलू लागला, तर पुढल्या काळात ब्रिगेडपाशी उरलेसुरले मराठेही तिथे शिल्लक रहाणार नाहीत. कारण कितीही अंधभक्ती असली तरी त्यातल्या माणसांना कधीना कधी डोळे व कान उघडण्य़ाची इच्छा होते आणि त्यांचा भ्रमनिरास होतच असतो. कारण शिवराय ही नुसती अंधभक्ती नाही. तो एक विचार आहे, ती एक भूमिका आहे. ती कुठल्या संघटनेची मोताद नसते की लाचार नसते. ती स्वयंभू असते. तिला सरकारी अनुदानावर पुतळे उभारून जगावे लागत नाही. जातीचे ठेकेदार तिचे अपहरण करू शकत नाहीत. त्यांनी खुशाल डोळे कान बंद करून घ्यावेत. मराठा समाज वा मानसिकता तितकी अगतिक नाही. अशा लोकांनी आजच्या छत्रपतींना दम देऊ नये, की शहाणपण शिकवू नये.

Monday, January 8, 2018

रिपब्लिकन ऐक्याच्या निमीत्ताने



इतिहासात रमणार्‍यांची एक वेगळी गंमत असते. त्यांना सोयीचा इतिहास खरा वाटत असतो आणि सोयीचा नसेल, तो इतिहासच नसल्याची खात्री ते बाळगून असतात. भीमा कोरेगावचा विषयच ऐतिहासिक असल्याने, त्यात अशा गफ़लती सगळीकडून झाल्यास नवल नाही. विरोधाभास असा आहे, की ज्यांनी त्याचा धुरळा उडवला, तेच आता कुठल्या कुठे गायब झालेत. मधल्या मध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते व हिंदूत्ववादी यांच्यावर सगळीकडून प्रश्नांचा भडिमार चालू आहे. प्रकाश आंबेडकर त्याविषयी बोलताना सतत संयोजक समितीवर आयोजनाची जबाबदारी ढकलून अंग झटकतात. यातून एल्गार परिषद भरवण्यात कोणी आंबेडकरवादी जबाबदार नसल्याची खात्री होऊ शकते. पण या निमीत्ताने पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा विषय ऐरणीवर आणला जात आहे. या घडामोडींनंतर पत्रकारांशी रामदास आठवले यांनी वार्तालाप केला. त्यात त्यांनी ऐक्याच्या भूमिकेला दुजोरा देत, प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा आणि आपण छोट्या कार्यकर्त्याची भूमिका घ्यायलाही तयार असल्याचे म्हटलेले आहे. हा ऐक्याचा कितवा प्रयत्न आहे, त्याचेही अशा लोकांनी स्मरण करायला हरकत नाही. कारण रिपब्लिकन ऐक्य वा आंबेडकरी चळवळीची एकजुट हा किमान अर्धशतकातला जुना विषय आहे. आज ती भाषा बोलणार्‍या अनेकांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून तशा एकजुटीवर चर्चा रंगलेल्या आहेत. तसे प्रयत्नही झालेले आहेत. जितक्या आवेशाने हे प्रयत्न झाले, तितक्याच आततायीपणे त्या एकजुटीला चुडही लावली गेलेली आहे. म्हणूनच पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्यात कोण दोस्त कोण शत्रू हे ठरवण्यापेक्षा यापुर्वीचा प्रत्येक प्रयास कसा व कशामुळे फ़सला, त्याचा तपशीलवार प्रामाणिक अभ्यास व्हावा. अन्यथा आणखी एक भ्रमनिरास आंबेडकरी जनतेच्या वाट्याला येण्यापेक्षा अधिक काहीही साध्य होऊ शकणार नाही.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला, तरी तो त्यांच्या संकल्पनेवर किती आधारलेला होता? लेबर पार्टी वा शेड्युल्ड क्लास फ़ेडरेशन असे प्रयोग केलेल्या बाबासाहेबांनी नव्या पक्षाची संकल्पना मांडताना, डॉ. राममनोहर लोहिया, मधु लिमये आणि आचार्य अत्रे अशा लोकांना विश्वासात घेत नवी राष्ट्रव्यापी राजकीय मांडणी केलेली होती. त्याचा लवलेश तरी पहिल्या रिपब्लिकन पक्षात होता काय? तो कशाला नव्हता? पुढे स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षात एकाच जातीचे वर्चस्व राहिले, तरी एकवाक्यता कशाला राहिली नाही. नेत्यागणिक गट कशाला निर्माण झाले. त्याचीही उत्तरे आज पन्नास वर्षानंतर शोधली गेलेली नाहीत. किंबहूना म्हणूनच वारंवार ऐक्याच्या गर्जना झाल्या, तरी प्रत्यक्षात एकही पुढले पाऊल टाकले गेले नाही. उलट त्या प्रत्येक ऐक्यासाठी अशाळभूतपणे प्रतिक्षा करणार्‍यांचा नेतागणाने आपल्या अहंकारासाठी बळी दिल्याचा तो निराशाजनक इतिहास आहे. आताही रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंबेडकरी लोकसंख्येचा बोजा खांद्यावर असल्यानेच ऐक्याच्या गोष्टी सुरू आहेत. पण ती प्रामाणिक इच्छा आहे, की लोकमताच्या दबावाखाली उभा केलेला देखावा आहे? आंबेडकरांवरची दलितांची भक्ती हे अशा नेत्यांचे भांडवल आहे. म्हणूनच तो समाज बेभान होऊन रस्त्यावर उतरला, मग नेत्यांना एकजुटीचे डोहाळे लागत असतात. त्यातून ऐक्यासाठी समिती वगैरे स्थापन केली जाते आणि पुन्हा सामान्य लोकांना एकजुटीचे गाजर दाखवून शांत केले जाते. पुढे रस्त्यावर उतरलेल्या लोकसंख्या ही आपली शक्ती असल्याचे मोठे मार्केटींग नेते करू लागतात. मागल्या पाव शतकाचा तरी तोच इतिहास आहे. प्रकाशजी वा रामदासजी यांना त्याचे स्मरण उरलेले नसेल, तर चेंबूरला नऊ कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाचा प्रसंग त्यांना नव्याने सांगावा लागेल.

१९८९ सालात जेव्हा राजीव गांधींच्या कॉग्रेसचा पराभव झाला व सत्ता गेली, तेव्हाची गोष्ट आहे. भाजपाचा त्या निवडणूकीने पुनरुद्धार झालेला होता आणि विजयाचा मेळावा शिवाजी पार्कवर झालेला होता. त्यातले कार्यकर्ते माघारी फ़िरत असताना चेंबूर अमर महाल येथे हाणामारीचा प्रसंग उदभवला होता. दलित वस्तीवर हल्ला व गडबड झाल्यानंतर संतापलेल्या नऊ तरूण पोरांनी चेंबूरला बाबासाहेब उद्यानात उपोषण आरंभले होते. तमाम रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे, इतकीच त्यांची मागणी होती आणि आठदहा दिवसात नेते त्यांना शरण आलेले होते. त्यातून ऐक्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्याचा खरा बोलविता धनी कॉग्रेसच होती. शिवसेना-भाजप युती हे महाराष्ट्रात राजकीय आव्हान झालेले ओळखून, मुख्यमंत्री शरद पवारांनी आंबेडकरी मतांची बेगमी करण्यासाठी त्या ऐक्य प्रयत्नांचा साळसूद वापर करून घेतला. त्या बैठकांचे आयोजन व त्यातल्या निर्णयात हस्तक्षेप करायला कसे कॉग्रेस नेते व हस्तक लुडबुडत होते. त्याचा संगतवार इतिहास ज, वि. पवार यांनी पुस्तक रुपाने प्रकाशित केलेला आहे. मुद्दा इतकाच, की त्या उपोषणातून आकाराला येणार्‍या रिपब्लिकन ऐक्याला पवारांनी यशस्वीरित्या सुरूंग लावून, रामदास आठवले यांना हाताशी धरले. त्यात गवई वगैरे जुन्या पिढीचे मुळचे रिपब्लिकन नेते कायमचे निकालात निघाले. आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षाच्या नव्या नेत्यांची पिढी उदयास आली. त्यात बारा जागा रिपब्लिकन आठवले गटाला देऊन पवारांनी एकूण एकजुटीला शह दिला. कॉग्रेसच्या हातून जाऊ शकणारी सत्ता बचावण्यापलिकडे त्या उपोषण व ऐक्याने अन्य काही साधले नाही. मजेची गोष्ट म्हणजे ऐक्याचे तारू विधानसभा निवडणूकीत कोणाशी हातमिळवणी करावी, या खडकावर येऊन फ़ुटले होते. नंतर असे किती प्रयत्न व आटापिटा झाला तरी एकजुट होऊ शकलेली नाही.

पुढे पवारांच्याच जमान्यात नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आणि पुन्हा नामांतरासाठी एकजूटीची आरोळी ठोकली गेली. तेव्हा रामदास आठवले राज्यात मंत्री होते आणि एकजुटीसाठी त्यांनी मंत्रीपदाचा राजिनामा देण्याची अट घातली गेली होती. ते साध्य झाले नाही. पण नामांतर बाबतीत तडजोड होऊन विषय निकाली निघाला आणि रिपाब्लिकन ऐक्याचा विषय पुन्हा धुळ खायला अडगळीत जाऊन पडला. एकजुट व ऐक्याच्या प्रत्येक प्रयत्नाने नवे नवे दलित नेते उदयास आले. पण दलित मते वा पक्षांची एकजुट कधी होऊ शकली नाही. युतीची सत्ता असताना रमाबाई आंबेडकर नगर दंगलीच्या नंतर तसा प्रयत्न झाला होता. पण तेव्हाही कॉग्रेसी खेळीने त्यात यश येऊ शकले नाही. पुढे रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत व्हावे लागल्यावर, त्यांनी वेगळा विचार करीत सेना भाजपा युतीच्या गोटात जाण्याची वेळ आली. आज ते मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री आहेत. आता वेगळ्या कारणाने पुन्हा रिपब्लिकन एकजुटीचा विषय पुढे आला आहे. पण त्यामागचा इतिहास कोणी विचारात घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यात ज्यांना खरेच आस्था आहे, अशा कार्यकर्त्यांनी व भीमसैनिकांनी भावना बाजूला ठेवून, ज. वि. पवार यांनी संगतवार लिहून ठेवलेला ऐक्याचा इतिहास व त्याविषयीची कारणमिमांसा अभ्यासावी. त्यामुळे ऐक्य होईल असे नाही. पण वारंवार आंबेडकरी समाजाच्या नव्या पिढीच्या पदरी येणारी निराशा तरी कमी होईल. या विषयाकडे प्रामाणिकपणाने बघायची व समस्येवर उत्तर शोधण्याची सुरूवात होऊ शकेल. तेच मग दलित चळवळीला नवी उमेद व नवे नेतॄत्व देऊ शकेल. पॅन्थरच्या रुपाने नव्या दलित नेतृत्वाचा १९७० च्या दशकात उदय झाला, तसा एकविसाव्या शकतातील आंबेडकरी नेतृत्वाला आकार येण्याची शक्यता निर्माण होईल. ते झाले नाही, तर या भावनाविवश समुदायाच्या पदरी कायमच वैफ़ल्य व निराशाच येत राहिल.

Sunday, January 7, 2018

पाकिस्तानची घालमेल

 kulbhushan family के लिए इमेज परिणाम

गोलंदाजाने चेंडू टाकण्यापुर्वीच चार पावले पुढे जाऊन बॅट सरसावत षटकार ठोकायला निघालेल्या फ़लंदाजाचा आवेश मोठा शौर्यपुर्ण नक्कीच असतो. पण बॅटच्या आवाक्यातून चेंडु निसटला, तर थेट यष्टीवर जाऊन आदळतो आणि नामोहरम होऊन माघारी तंबूत परतावे लागत असते. अगदी चेंडू यष्टीवर आदळला नाही आणि तो यष्टीरक्षकाच्या हाती गेला तरी बाद होण्यातून सुटका नसते. काहीशी तशीच अवस्था आता पाकिस्तानची झालेली आहे. गतवर्षी पाकने मोठ्या चतुराईने इराणमधून कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले. तालिबानांच्या मदतीने हे अपहरण केल्यावर कुलभूषण हा कसा भारतीय हेरखात्याचा अधिकारी म्हणून पाकिस्तानात घातपात व हिंसाचार घडवत होता, त्याचाही डंका पिटुन घेतला. अशा गोष्टी घडतात, तेव्हा त्याचा इतका डंका पिटला जात नाही. हेरखात्याचा माणूस शत्रू देशात पकडला गेला, तर आधी तशी माहिती त्याच्या देशाला म्हणजे सरकारला कळवली जाते आणि सौदेबाजी सुरू होते. कारण प्रत्येक देश दुसर्‍या देशत असे उद्योग करीत असतो. त्यामुळे आपला कोणी दुसर्‍या देशात पकडला गेला असेल, तर त्यांची अदलाबदल करून विषय निकालात काढला जात असतो. कुलभूषण हा तसा भारतीय हेर असता तर पाकने असले उद्योग नक्कीच केले नसते. उलट त्याच्या बदल्यात भारताच्या ताब्यात असलेल्या आपल्या काही हेरांची अदलाबदल करण्याचा छुपा गेम केला असता. पण पाकने तसे केले नाही. कारण त्याला आपल्या मुरब्बी धुर्तपणावर अधिक विश्वास होता आणि कुलभूषणला पकडून त्याचा जागतिक तमाशा बनवण्याचाच मुळ हेतू होता. मात्र असे डाव खेळताना धोका असतो आणि ते जपून खेळावे लागतात. अन्यथा बॅट सरसावून पुढे धावलेल्या फ़लंदाजासारखी नामुष्की पदरी येत असते. पाकिस्तानची आता कुलभूषण प्रकरणात तशीच अडचण होऊन बसलेली आहे.

पाकने कुलभूषण भारताचा हेर असल्याचे घोषित केल्याने भारताने तशी जबाबदारी घेण्याचा मार्ग बंद करून टाकलेला होता. पण खरेच तो भारताचा तसा घातपाती हेर असता, तरी भारताला त्याला सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागला असता. पण कुलभूषण हेर नसेल तर भारताच्या कुठल्याही कारस्थानाचा गवगवा होण्याची भिती नाही. त्याला एक अपहरण झालेला नागरिक म्हणून सुटकेची मागणी करणे भारताला शक्य झालेले आहे. म्हणूनच शिष्टाचारानुसार भारताने आधी कुलभूषणला भारतीय राजदूतांची भेट देण्याची मागणी केली. अनेकदा प्रयत्न करूनही ती मागणी मान्य झाली नाही, तेव्हा आपल्या निरपराध नागरिकाच्या मुक्ततेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावले. त्यापुर्वीच पाकने कुलभूषणला लष्करी कायद्यानुसार फ़ाशीही फ़र्मावली होती आणि विनाविलंब जागतिक व्यासपीठावर न्यायाची मागणी करण्याचा भारताचा मार्ग खुला झाला. तिथे भारताने अशी खेळी केली, की पाकिस्तानची पुरती नाचक्की होऊन गेली. आता आपणच योजलेल्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची तारांबळ उडालेली आहे. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या एका खर्‍याखुर्‍या हेराला नेपाळमधून पळवून नेल्याचा पाकचाच आरोप आहे. मात्र भारताने ते मान्य केलेले नाही वा पाकिस्तानने तसा उघड आरोप केलेला नाही. त्यामुळेच त्याच्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टातही जाऊ शकत नाही. पण ज्याचे अपरहण भारताने केल्याचा दावा आहे, तो खराखुरा पाक हेरखात्याचा निवृत्त अधिकारी असल्याने, त्याची कुठल्याही मार्गाने सुटका करून घेण्यासाठी पाकिस्तानवर दडपण आलेले आहे. पण कुणाशी सौदा करायचा? कारण भारताने झहीर नामे पाकहेर आपल्याकडे असल्याचे कुठेही सुचवलेले नाही. पाकला कुलभूषणच्या बदल्यात झहीरची मुक्ती हवी असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत.

मागल्या आठवडाभरात पाकिस्तानच्या विविध वर्तमानपत्रात हा विषय मुद्दाम चघळला जातो आहे. कुलभूषणची अदलाबदल होऊ शकली असती, पण भारतानेच थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊन तो मार्ग बंद करून घेतला, अशा आशयाच्या अनेक बातम्या पाक वर्तमानपत्रात झळकत आहेत. ह्या बातम्या वा लेख कुणा भारतीय अनुभवी अभ्यासक वा विश्लेषकांनी लिहील्या असल्याचेही भासवले जात आहे. पण त्यातला तपशील महत्वाचा नसून त्यातला पाकिस्तानचा उतावळेपणा महत्वाचा आहे. कुलभूषण प्रकरणात रंगवलेल्या नाटकाच्या सापळ्यात पाकिस्तानच अडकला असल्याने त्याला कुलभूषणची अदलाबदल करण्याचा प्रस्तावच देता येत नाही. कुणाच्या बदल्यात अदलाबदल करायची? तशी करायची होती, तर कुलभूषण हा विषय इतका जाहिरपणे गाजवायची गरज नव्हती. ज्याला हेर म्हणून भारताने मानलेलेच नाही, त्याच्या बदलीचा सौदा भारत कसा करू शकतो? त्यासाठी भारताला हेरगिरीचा आरोप पान्य करावा लागेल. ते अशक्य असल्याने आणि पाकला तशी काही ऑफ़र देणेही शक्य नसल्यानेच, अशा बातम्या व लेखनातून संकेत दिले जात आहेत. पण त्याची काहीही गरज नाही. त्याचेही योग्य मार्ग ठरलेले आहेत. शिष्टाचारानुसार अशा गोष्टी दोन देशांचे वकील वा परराष्ट्र खात्यामार्फ़त गुपचुप केल्या जात असतात. त्याची बाहेर कधी वाच्यता केली जात नाही. पाकने आगावूपणे ती चुक केली असल्याने त्यांनीच रचलेल्या सापळ्यात त्यांचे हातपाय अडकलेले आहेत. मात्र त्त्यातून सुटण्याच मार्ग मिळेनासा झाला आहे. मग अशा लेखातून आपण सौदा करायला तयार असल्याचे संकेत दिले जात असतात. पण ज्याप्रकारे माध्यमे व वर्तमानपत्राचा त्यासाठी वापर केला जातो आहे, त्यातून पाकिस्तान अधिकच केविलवाणा झालेला दिसू लागला आहे. कारण कुलभूषणचे अपहरण झाले, तेव्हापेक्षा पाकची स्थिती आज आमुलाग्र बदलून गेली आहे.

दोन वर्षापुर्वी पाकिस्तान हा अमेरिकेचा जवळचा मित्र होता आणि आज पाकला ट्रंप प्रशासनाने अनुदानही नाकारलेले आहे. राज्यकर्ते आणि लष्कर यांच्यात बेबनाव सुरू झालेला आहे. त्यात सौदी अरेबियाला हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे आणि देश आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर येऊन उभा आहे. त्यामुळे लष्करे तोयबा वा अन्य जिहादी टोळ्यांना लगाम लावावा लागतो आहे. अर्थकारण गळ्याशी आलेले आहे. कुठल्याही बाबतीत एकवाक्यता उरलेली नाही. अशावेळी कुलभूषण जाधव हे पाकसाठी गळ्यात फ़सलेले ओझे झाले आहे. तो विषय सन्मानाने निकालात निघावा, अशीच पाकची किमान अपेक्षा आहे. मात्र तो निकालात काढताना भारताच्या मागणीला शरण गेलो, असेही तिथल्या राज्यकर्त्यांना वा लष्कराला दिसू द्यायचे नाही. म्हणून मग सौहार्दाने अदलाबदलीचा पर्याय पाकला हवा आहे. त्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत म्हणूनच अशा लेखातून दिले जात असतात. मुळातच कुलभूषणच्या खटल्याचे नाटक रंगवण्याची काही गरज नव्हती. त्यातला विनोदही मजेशीर आहे. तीन महिन्यापुर्वी पाकमध्ये अशा बातम्या होत्या, की भारताने हेरांची अदलाबदली करायची पाकला ऑफ़र दिलेली आहे. कुलभूषण कोणाच्या बदल्यात पाकिस्तानने द्यावा? असा कोण भारताच्या कब्जात आहे? पाकचे पररष्ट्रमंत्री ख्वाजा महंमद आसीफ़ यांनी तसे म्हटलेले होते. अफ़गाणिस्तानच्या तुरूंगात असलेल्या कुणा एका दहशतवादी कैद्याच्या बदल्यात म्हणे भारताने कुलभूषणची मुक्ती मागितली आहे. जो कैदी भारताच्या ताब्यातच नाही, त्याचा सौदा भारत कसा करू शकतो? ख्वाजा यांनी अफ़गाण तुरूंगातील त्या कैद्याचे नावही सांगितलेले नाही. पण तो पेशावरच्या शाळा संकुलात बॉम्बस्फ़ोट करणारा असल्याचे म्हटलेले होते. आज त्याच पाकचे संरक्षणमंत्री पेशावरच्या घातपाताचे खापर हफ़ीज सईदवर फ़ोडत आहेत.

एकूणच पाकची किती दुर्दशा झाली आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. तीन महिन्यापुर्वी एक पाक मंत्री पेशावरच्या शाळा संकुलातील स्फ़ोटाचा आरोप कुणावर तरी करतो आणि आज त्याच पाकचा दुसरा मंत्री त्याच घातपाताने खापर हफ़ीजार फ़ोडतो आहे. मुद्दा सोपा आहे. कुलभूषणला फ़ाशी देऊन हा विषय संपणारा नाही, याची पाकला खात्री पटलेली आहे. त्यावरून जो तमाशा केला, त्याचा कुठलाही लाभ होऊ शकलेला नाही. मात्र भारताच्या ताब्यात असलेल्या कुणा पाक हेराला सोडवून घ्यायलाही कुलभूषणचा उपयोग राहिलेला नाही. त्यातच असले खेळ व पोरखेळ करण्याइतकी पाकची स्थिती सुखदायी उरलेली नाही. अमेरिकेने व जगाने पाकवर मोठे दडपण आणायचा वेग वाढवलेला आहे. अशा स्थितीत कुलभूषणचा विषय जितका लौकर निकालात निघेल तितका पाकला हवा आहे. मात्र पुन्हा एकदा भारताकडून थप्पड खाल्ली, असेही जनतेला दिसू नये अशी कोंडीही झालेली आहे. त्यामुळेच गयावया केल्यासारख्या या हेरांच्या अदलाबदलीच्या बातम्या व लेख पाक वर्तमानपत्रात छापले जात आहेत. अर्थात अशा सौदेबाजीला भारत प्रतिसाद देण्याची बिलकुल शक्यता नाही. सप्टेंबरमध्ये ख्वाजा या मंत्र्याने भारताची तशी ऑफ़र असल्याची थाप मारून काही साधलेले नाही. म्हणून आता जाणकार विश्लेषकांच्या नावाने पुड्या सोडल्या जात आहेत. त्यापेक्षा आपली अब्रु राखण्यासाठी पाकिस्तानने सत्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न केल्यास, त्या देशाचे अधिक कल्याण आहे. कारण आता जगात पाकला चीनखेरीज कुठलाही मित्र शिल्लक उरलेला नाही आणि चीनही अधिक काळ पाकचे समर्थन करण्याची बिलकुल शक्यता नाही. मुळात आपली कुवत नसताना इतका आगावूपणा करायचा नसतो. कारण नुसता आवेश आणुन भ्रम निर्माण करता येत असला, तरी खर्‍या लढाया शौर्यानेच जिंकल्या जातात.

आमिष दाखवून बलात्कार?

kejriwal kumar vishwas के लिए इमेज परिणाम

अलिकडल्या काळात अनेक अशा प्रकरणांची सुनावणी कोर्टात होऊन वेगवेगळे निकाल आलेले आहेत, जी प्रकरणे वास्तवात दोन व्यक्तींच्या दरम्यानचे खाजगी संबंध होते. त्यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण वा बलात्काराची प्रकरणे होती. त्यावर कोर्टानेही वेगवेगळे मतप्रदर्शन केलेले आहे. आमिषाने असो किंवा कुठल्याही कारणाने असो, जबरदस्तीशिवाय शरीरसंबंध झालेला असेल, तर त्याला बलात्कार संबोधू नये, असे एक ठाम मत पुढे आलेले आहे. कारण आमिष दाखवले हा आरोप खरा असला, तरी त्याला फ़सवणूक म्हणता येईल. पण शरीरसंबंध संगनमताने झालेला असतो. थोडक्यात साधले नाही म्हणून त्या कृतीला बलात्कार म्हणता येत नाही. कालपरवा आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी तीन उमेदवार जाहिर केल्यावर त्या पक्षाच्या आजीमाजी नेते कार्यकर्त्यांच्या तक्रारी नेमक्या तसाच कांगावा करणार्‍या होत्या. लोकपाल आंदोलन काळापासून अरविंद केजरीवाल व त्यांचे निकटवर्तिय काहीजण मिळून एक निर्णय घेतात आणि तोच पक्षाचा निर्णय मानण्याची पद्धत आहे. ती कधीच लोकशाही पद्धत नव्हती. पण आरंभी जेव्हा त्याविषयी तक्रारी झाल्या, तेव्हा आक्षेप घेणार्‍याला खड्यासारखे बाजूला करण्यात आले. अशावेळी आज तक्रार करणार्‍यांच्या भूमिका काय होत्या? त्यांनीही त्या अन्याय्य पद्धतीचे समर्थन केलेले नव्हते काय? केजरीवाल यांच्या चुका दाखवणे किंवा त्यावर आक्षेप घेण्याला गद्दारी ठरवण्यात कोण पुढे असायचा? केजरीवाल यांची मनमानी प्रस्थापित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांना कसले तरी आमिष केजरीवाल यांनी दाखवलेले असणार. किंवा तशा अपेक्षा बाळगूनच ह्या लोकांनी त्या हुकूमशाहीचे समर्थन केलेले असणार ना? मग आज त्यांनी बलात्कार झाल्यासारखी बोंब ठोकणे भामटेगिरी नाही काय? योगेंद्र याद्व किंवा कपील मिश्रा यांची तक्रार म्हणूनच भंपकपणा आहे.

विधानसभेत ७० पैकी ६७ जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या, तेव्हाच त्यांना राज्यसभेच्या मोकळ्या होणार्‍या तिनही जागा मिळणार ही खात्री होती. सहाजिकच त्यात आपली वर्णी लागेल, अशा आशाळभूत प्रतिक्षेत अनेकजण सहभागी होते. त्यात पत्रकारिता सोडून आलेले आशुतोष होते, तसेच आरंभापासून केजरीवालचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कुमार विश्वासही होते. ज्या अण्णा हजारे यांच्या दिर्घकालीन उपोषणाच्या भांडवलावर केजरीवालना देशव्यापी प्रसिद्धी मिळाली, त्यांनाच राजकारणात जाण्यासाठी केजरीवालनी टांग मारली. तो पहिला विश्वासघात होता. त्यात अण्णांचा बळी गेला आणि ती शिकार केजरीवाल यांनी पचवली. त्यानंतर कोणाचीही शिकार करायला ते श्वापद बिनधास्त झालेले होते. रक्ताची चटक लागलेले श्वापद कधीही कोणाचीही शिकार करू शकते असे म्हणतात. मग अण्णांना झुगारण्यासाठीची शक्ती केजरीवाल यांच्यात आणायला ज्यांनी मदत केली, ते सगळे आपलीही शिकार व्हायला मान्यता देत नव्हते काय? प्रथम जेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या एका आमदाराने मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर पांघरूण घालायला अवेळी त्याच्या घरी जाऊन, खीर खायला गेलो असल्याच्या थापा कुमार विश्वास यांनीच मारल्या होत्या ना? पक्षातली एकजूट दाखवण्यासाठी त्यांच्याकडून केजरीवालनीच खोटेपणा करून घेतला होता. तेव्हा पक्ष शिस्त नव्हेतर आपण खोट्याचे समर्थन करत आहोत, याचे भान विश्वास यांना नव्हते काय? जगाला सराईतपणे उल्लू बनवणारा आपल्याशी प्रामाणिक वागेल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल, तर गुन्हा एकट्या केजरीवाल यांचा होत नाही. शिकार करण्यासाठी सावजे शोधून देणारेही तितकेच जबाबदार असतात. आपलीच शिकार झाल्याचे कुमार विश्वास यंचे दुखणे म्हणूनच धादांत खोटेपणा आहे.

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या पक्षाच्या संस्थापकांशी मतभेद झाल्यावर केजरीवाल यांनी चक्क आंगावर गुंड घालून पक्षातून पळवून लावलेले होते. तेव्हा कपील मिश्रा वा यादव यांना त्यातली गुंडगिरी दिसलेली नव्हती काय? तरीही म्हणजे धक्काबुक्की होऊनही यादव कालपरवापर्यंत केजरीवाल यांच्या चारित्र्याचे हवाले देतच होते. मध्यंतरी केजरीवाल व त्यांचे एक सहकारी मंत्री यांच्या आर्थिक लूटमारीच्या कहाण्या समोर आल्या आणि त्यावर आयकर विभागाने कारवाई सुरू केली होती. तेव्हाही अरविंद बाकी चुकत असेल, पण पैसे खाणार नाही; असे यादव छाती ठोकून सांगत होते. म्हणजे त्यांचा बळी आधीच गेलेला असूनही ते भामट्याचे समर्थन करत होते. ही वैचारिक लाचारीच अशा लोकांना शिकार बनवत असते. शाझिया इल्मी वा किरण बेदी यांच्यासारखे लोक विचारवंत नसतात. म्हणूनच आपच्या बदमाशीला कंटाळून बाजूला झाल्यावर त्यांना भाजपात जायला वेळ लागला नाही. पणा प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव यांची एक वैचारिक अगतिकता असते. जगाला आपण जो पुरोगामी चेहरा दाखवलेला आहे आणि भाजपावर प्रतिगामीत्वाचे आरोप केलेले आहेत, त्याच्याशी निष्ठावान रहाण्यासाठी असे बुद्धीमान लोक बलात्कार सहन करूनही लग्न टिकवण्याचे पातिव्रत्य दाखवत असतात. म्हणूनच काही महिन्यापुर्वी आपचा पालिका मतदानात दारूण पराभव झाल्यावर कपील मिश्रा हा आमदार संतापून आरोप करू लागला, तरी योगेंद्र यादव केजरीवालच्या चारित्र्याची प्रमाणपत्रे वाटत होते. कुमार विश्वास नाराज असूनही खुलेआम केजरीवाल विरोधात एकही शब्द बोलायची हिंमत करत नव्हते. कारण त्यांची आशाळभूत नजर राज्यसभेच्या सदस्यत्वावर रोखलेली होती. कपील मिश्राच्या सत्याला दुजोरा देण्याची हिंमत तेव्हा विश्वास दाखवू शकले नाहीत, की यादवना सत्य बोलायचे धाडस झालेले नव्हते.

आता केजरीवाल यांनी आपल्याच सहकार्‍यांना टांग मारून दोन उद्योगपती पैसेवाल्यांना राज्यसभेच्या जागा विकल्या, तेव्हा आशावाद संपलेला आहे. त्यामुळे विश्वास व यादव यांना शहाणपण सुचलेले आहे. कुठल्याही कामाशिवाय दिल्ली सरकारच्य तिजोरीतून दहा कोटी रुपयांची रक्कम खोटी बिले दाखवून वळवली गेली; त्यावरही यादव यांचा विश्वास नव्हता. मग आज कुठल्याही पुराव्याशिवाय त्यांनी केजरीवालांकडे संशयाने कशाला बघावे? सगळ्यात दयनीय स्थिती बिचार्‍या आशुतोष नावाच्या पत्रकाराची आहे. त्याने एका वाहिनीचा संपादक म्हणून काम केले आणि अखेरीस दिवाळखोर म्हणून त्याची तिथून मालकाने हाकालपट्टी केली होती. तेव्हा मालकाला क्रोनी कॅपिटॅलिझम म्हणून शिवीगाळ करत आशुतोष आम आदमी पक्षात दाखल झालेला होता. आज साडेतीन वर्षांनी त्याच्या पुरोगामी आम आदमी पक्षाला केजरीवाल यांनी गुप्ता नामक दोघा उद्योगपतींना विकून टाकलेले आहे. मग दोन्हीत फ़रक काय राहिला? तेव्हा वाहिनीचा मालक होता, आता पक्षाचा मालक आहे. आशुतोषने अजून तोंड उघडलेले नाही. पण त्याचा कोमेजलेला चेहरा सर्व काही सांगून जातो. काही दिवसातच त्यालाही यात गफ़लती असल्याचे साक्षात्कार होतील आणि हळुहळू त्यालाही ढुंगणावर लाथ मारून बाजूला केले जाईल. त्यानंतर हा माजी संपादकही कुमार विश्वास किंवा योगेंद्र यादव यांच्याप्रमाणे केजरीवाल यांना भामटा ठरवायला उत्साहात पुढे येईल. पण त्याचा काही उपयोग नसेल. ही गुन्हेगारी कार्यशैली असते. बलात्कार झाल्याचे कबुल करण्यात आपलीच अब्रु जाते, म्हणून अनेकजणी निमूट सहन करतात आणि केजरीवाल यांच्यासारख्या भामट्यांना अशा वैचारिक दिवाळखोरांनी आपला जनानखाना नित्यनेमाने भरता येत असतो. त्यामुळे आमिषाला बळी पडलेल्यांनी बलात्काराचे आरोप करण्यात अर्थ नसतो.

Saturday, January 6, 2018

भीमा कोरेगाव नंतरचा धडा

Image result for bheema koregaon

कालपरवा म्हणजे नववर्षाच्या मुहूर्तावर पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या भागात जो सोहळा व हिंसाचार झाला, त्याचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या अन्य शहरातही उमटले. त्यावरून आता आरोप प्रत्यारोपाची झुंबड उडालेली आहे. या स्थानी दोनशे वर्षापुर्वी एक युद्ध झालेले होते. ते उतरणीस लागलेली पेशवाई व नवे सत्ताधीश होऊ घातलेले इंग्रज, यांच्यातली लढाई होती. त्यात पेशव्यांचा सेनेचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला. त्यामुळे देशात इंग्रजांची राष्ट्रव्यापी सत्ता प्रस्थापित होण्यास चालना मिळाली. इंग्रजांच्या सैन्यात तेव्हा मोठ्या संख्येने महार जातीचे लोक होते आणि पेशव्यांचा पराभव म्हणजे ब्राह्मणांचा पराभव, असे त्याचे आजच्या संदर्भातील आकलन आहे. म्हणूनच दोनशे वर्षानंतर तो विषय ऐरणीवर आलेला आहे. खरे तर तो विजय व विषय कधीच मागे पडलेला होता. इंग्रजांनी त्या विजयाचे स्मारक म्हणून त्या गावात विजयस्तंभ उभारलेला आहे आणि पुढे दलित वा प्रामुख्याने आंबेडकरवादी चळवळ सुरू झाल्यावर, त्या विजयस्तंभाला महत्व प्राप्त झाले. त्याचे कारण दलितांच्या उद्धारासाठी झटलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी त्या ठिकाणाला भेट दिली होती आणि त्याला नंतरच्या काळात महार समाजाचे शौर्यप्रतिक मानले गेल्यास नवल नव्हते. मात्र तरीही त्याचे कधी सोहळे साजरे होत नव्हते. अनेक दलित अगत्याने त्या स्मारकाला ठरल्या दिवशी भक्तीभावाने भेट द्यायचे. पण १९९० सालात प्रथमच तिथे सोहळा साजरा होऊ लागला. आजचे भारतीय सैन्य हे मुळातच ब्रिटीश परंपरेतून आलेले असल्याने, त्याही लढाईच्या विजयाचा वारसा त्याच सेनेकडे आहे. आजही सेनेत महार बटालियन आहे. म्हणूनच हा विजय भारतीय सेनेने अगत्याचा मानला तर गैर काहीच नाही. पण त्याला कधी राजकीय रंग चढावला गेलेला नव्हता. अलिकडे तो रंग चढला आणि त्यानेच एकूण स्थितीला विकृत वळण मिळालेले आहे.

यावर्षी त्या युद्धाला दोनशे वर्षे पुर्ण होत असल्याने एक सोहळा पुण्याच्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात योजलेला होता आणि त्याला महाराष्ट्र सरकारनेही मान्यता दिली होती. नुसती मान्यता नाही तर अनुदानही दिल्याने वादाचा विषय वाढत गेला. १९९० सालात भीमा कोरेगावला सोहळा होऊ लागला, म्हणून भारतीय सेनेने पुढल्याच वर्षी तिथे विजयस्तंभाला मानवंदना देण्याचीही तत्परता दाखवली होती. पण दोनच वर्षात तिथला विजय स्तंभ हा राजकारणाचा आखाडा बनू लागला आणि त्याचा धर्म व जातीय फ़ाटाफ़ुटीचे लाभ उठवण्यासाठी वापर होऊ लागला. म्हणूनच भारतीय लष्कराने त्या मानवंदना कार्यक्रमातून अंग काढून घेतले. ठराविक राजकारणी लोकांसाठी तो विजयस्तंभ हे राजकीय हत्यार होऊन गेले. तसे नसते तर यंदा तेच निमीत्त व मुहूर्त धरून एल्गार परिषदेचे आयोजन कशाला झाले असते? दोनशे वर्षात त्या विजयस्तंभाला धक्का लागला नव्हता की तिथे भावना व्यक्त करायला येणार्‍यांना धक्का बसला नव्हता. तर आज त्यावरून राज्यभर उन्मादाचे थैमान घातले जाण्याचे काय कारण होते? त्याचे उत्तर राजकारणात सापडते. कुठलेही निमीत्त करायचे आणि बहुसंख्य लोकांच्या भावनांशी खेळ करायचा, असा एक राजकीय खेळ मागल्या काही अर्षात देशात सातत्याने होत आलेला आहे. दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात असलेले विद्यार्थी स्वातंत्र्य वापरून देशविघातक प्रवृत्तीला थैमान घालू दिले जात असते आणि अतिशय साळसूदपणे त्याला विचार स्वातंत्र्याचे नाव दिले जात असते. अशा मर्यादेत धुमाकुळ घालायचा, की कायद्याच्या शब्दात कचाट्यात फ़सणार नाही, याची काळजी घ्यायची. परिणामी डोळ्यांना गुन्हा दिसत असूनही त्याला कोणी हात लावू शकत नाही. ही कायद्याची अगतिकता तुमच्याच विरोधात सराईतपणे वापरली जात असते. भीमा कोरेगावच्या निमीत्ताने झालेली हिंसा त्याचेच उदाहरण आहे.

पहिली गोष्ट म्हणजे युद्ध ब्रिटीश कंपनी व पेशव्यांच्यातले होते. पेशवे भले ब्राह्मण असतील पण त्यांचे सैनिक झाडून सगळे ब्राह्मण नव्हते, की ब्रिटीश सेनेत लढलेले महार सैनिक आपल्या जाती अस्मितेसाठी वगैरे लढलेले नव्हते. म्हणूनच त्याला महारांनी ब्राह्मणांवर मिळवलेला विजय ठरवण्याचा प्रकार गैरलागू होता. बाबासाहेब अशी चुक करू शकत नाहीत. तरीही त्यांनी अगत्याने त्या विजयस्तंभाला भेट दिलेली होती. तेव्हा ते महार वा दलित समाजाच्या उत्थानाचे आंदोलन चालवत होते. अशा आंदोलनात समाजातील लोकसंख्येचा सुप्त पुरूषार्थ जागवण्यासाठी त्याच्या पुर्वजांच्या शौर्यकथा सांगितल्या जातात. म्हणूनच महार बटालियन हे दलितांच्या पुरूषार्थाचे प्रतिक म्हणून पुढे करण्यामागे शुद्ध व पवित्र हेतू होता. तो हेतू ब्राह्मण समाजाच्या विरोधातल्या भावना उत्तेजित करण्याचा नव्हता. आज भीमा कोरेगाव विषय ज्यासाठी गाजवला जातो आहे, किंवा त्या परिषदेत जी वक्तव्ये झाली, ती नेमकी त्याच पवित्र हेतूला हरताळ फ़ासणारी होती. त्या स्मारक स्थळी झालेली हिंसा परिषदेच्या आदल्या दिवसाची आहे. पण परिषदेत जी भडकावू भाषणे झाली, त्याने इतरत्रच्या दलितांच्या भावना चेतवण्याचे काम पार पडले. तो विजय महार जातीचा नव्हेतर ब्रिटीश सत्तेचा होता आणि तो पराभवही ब्राह्मण राज्यकर्त्यांचा असला तरी एका जातीच्या वर्चस्वाचा नव्हता. मग अशा भाषणांची भीमा कोरेगाव सोहळ्याच्या निमीत्ताने काय गरज होती? म्हणजेच परिषदेचे आयोजक वा वक्ते यांचा हेतू भलताच होता आणि त्यात ते पुर्णपणे यशस्वी झाले. कारण भीमा कोरेगाव येथे हिंसा झाली आणि त्याचे पडसाद मग राज्यात अन्यत्रही उमटले. त्या गावात एक तरूण मुलगा मारला गेला आणि तो सवर्ण जातीचा होता. तरीही तिथली हिंसा किंवा गडबडीचा, परिषद वा नंतर झालेला प्रचार यात असा प्रसार करण्यात आला, की ही जातीय हाणामारी आहे.

या परिषदेत दिल्लीहून उमर खालीद नावाचा विद्यार्थी नेता आलेला होता, तर गुजरातचा नुकताच आमदार झालेला जिग्नेश मेवानी नावाचा तरूण नेता आलेला होता. या लोकांचे भीमा कोरेगाव किंवा राज्यातील दलित चळवळीशी कोणते नाते आहे? ज्यांना महाराष्ट्र आंबेडकरी नेते वा चळवळ म्हणून ओळखतो, त्यापैकी कोणीही अशा परिषदेतला आयोजक म्हणून दिसला नाही. ज्यांची फ़क्त ब्राह्मणविरोधी भूमिकांसाठी ख्याती आहे आणि हिंदू वा भारत विरोधी आक्रमक पवित्रे घेण्यासाठी ओळख आहे, त्यांचाच भरणा ह्या परिषदेत होता. प्रामुख्याने हिंसेवर आणि बंदुकीने सत्ता मिळवण्याचा आग्रह धरणार्‍या संघटना व व्यक्तींचाच त्यात भरणा दिसेल. त्यापैकी कोणालाही दलित उद्धार वा पिछड्यांचे कल्याण, याच्याशी कर्तव्य असल्याचे काम त्यांनी आजवर केल्याचे दिसलेले नाही. जातीजातीत द्वेष माजवणे किंवा जातीय द्वेष फ़ैलावण्यात़च त्यांना कायम पुढाकार राहिलेला आहे. पण त्याला जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याने, त्यांनी आता शहरी व अन्य भागात प्रस्थापित संस्था संघटना यात हातपाय पसरून आपल्या संकल्पना भेसळ करून मांडायला आरंभ केलेला आहे. बाबासाहेब कम्युनिस्ट विचारांचे कडवे विरोधक होते. मग त्यांच्याच नावाने चळवळ करून मार्क्सचे तत्वज्ञान बाबासाहेबांच्या नावाने खपवण्याचा हा उद्योग आहे. मेवाणी वा खालिद यांची भाषणे ऐकली तरी त्यात बाबासाहेबांच्या विचारांचा कुठे लवलेश आढळ्णार नाही. सामाजिक परिवर्तनाचा मुखवटा चढवून ही मंडळी आपला डावा अजेंडा सराईतपणे दलित चळवळीच्या माथी मारण्याची लबाडी करीत असतात. तेच दिल्लीत नेहरू विद्यापीठात झाले, तेच हैद्राबादला रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर झाले आणि तेच पानसरे वा गौरी लंकेश हत्येनंतरही झालेले आहे. देशाची सत्ता गमावलेल्या कॉग्रेसने राजकीय विरोधाचा ठेका त्यांच्याकडे सोपवलेला आहे.

यातले कारस्थान काय असू शकते? प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र बंद़चे आवाहन करतात आणि त्यानंतर अनेक महानगरात धुमाकुळ सुरू होतो. त्यामुळे आज प्रकाशजी खुश असतील. पण त्याचे दुरगामी परिणाम त्यांना अनुभव येऊनही शिकता आलेले दिसत नाही. तब्बल वीस वर्षापुर्वी मुंबईत असेच रान उठलेले होते. तेव्हाही राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री व युतीचे राज्य होते. अशा काळात अकस्मात घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे कोणाच्या तरी लक्षात आले. तिथे सर्वात आधी जाऊन पोहोचलेला नेता कोणी रिपब्लिकन वा आंबेडकरवादी नव्हता. त्याचे नाव होते छगन भुजबळ. त्याने तिथे आक्रमक भाषण करून दलितांच्या न्यायाच्या बाता मारल्या होत्या आणि उशिरा तिथे बाकीचे आंबेडकरवादी नेते पोहोचले, तेव्हा दलित जमावानेच त्यांची हुर्यो उडवून त्याना पळवून लावलेले होते. अक्षरश: या दलित नेत्यांना आपल्याच समुदायाच्या प्रक्षोभासमोर जीव मूठीत धरून पळ काढावा लागलेला होता. हळुहळू मुंबईच्या विविध वस्त्यातून दलित रस्त्यावर आले आणि त्यांचे नेतृत्व करायला पुढे येण्याची हिंमत अगदी प्रकाश आंबेडकरही दाखवू शकलेले नव्हते. पुढे त्या बेफ़ाम जमावावर गोळीबार झाला आणि अवघ्या मुंबईत हिंसेचे थैमान घातले गेलेले होते. त्यावेळी मोर्चा काढला होता तो अरूण गवळीच्या नव्या अखील भारतीय सेना नावाच्या पक्षाने. त्यात लाखोच्या संख्येने आंबेडकरी समुदाय सहभागी झालेला होता. पण कुणा दलित नेत्याची पुढे यायची हिंमत झालेली नव्हती. जणू काही आंबेडकरी समाजाने त्यांचेच सर्व पुढारी झुगारून दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. पुण्यातल्या परिषद वा नंतरच्या वक्तव्यात त्याचेच प्रतिबिंब पडलेले कोणी बघू शकलेला नाही काय? प्रकाश आंबेडकरांना यावेळी थोडा पुढाकार मिळालेला असला, तरी सुत्रे कोणाच्या हाती गेली आहेत?

यावेळी एक मोठा फ़रक आहे. प्रक्षुब्ध होऊन आंबेडकरी समाज रस्त्यावर आला व बंदच्या निमीत्ताने धुमाकुळ घातला गेला, तेव्हा सरकार अतिशय सावध होते. कारण अशा हिंसा व फ़ोडाफ़ोडीला पोलिसांनी कठोर उपाय योजून उत्तर द्यावे, हीच परिषदेत भडकावू भाषणे देणार्‍यांची अपेक्षा होती, ती अजिबात पुर्ण झाली नाही. कोरेगावच्या निमीत्ताने दलितांना रस्त्यावर आणायचे आणि कायदा व्यवस्था म्हणून पोलिसांनी त्यांना झोडपायचे. ही मुळ कारस्थानातील अपेक्षा होती. तसे झाल्यास काहीजणांचा त्यात मृत्यू झाला असता. अनेकजण जखमी झाले असते आणि मग त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा गळा काढून सरकारच्या विरोधात धमाल उडवून देता आली असती. पण सरकारने जपून पावले उचलली आणि कुठेही पोलिसी अतिरेक होऊ दिला नाही. पोलिसही प्रसंगी मार खाऊन, जखमी होऊन शांत राहिले. मराठे वा सवर्ण अशी झुंबड होण्याचीही अपेक्षा फ़ोल ठरली. कारण अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही मोठी समयसूचकता दाखवली. अन्यथा १९९७ सालच्या दंगलीप्रमाणे हिंसाचाराचे थैमान घातले गेले असते. विविध जाती व समुहांमध्ये वैमनस्याची बीजे पेरली गेली असती. किंबहूना तोच हेतू होता. पण तो पुर्णत: अपेशी ठरला. थोडक्यात दलित विरोधात सवर्ण, अशी ठिणगी टाकण्याचा डाव फ़सला. मुद्दा इतकाच, की ही १९९७ सालचीच पुनरावृत्ती आहे. पण तेव्हाची चुक यावेळी सरकार व पोलिसांनी केली नाही. त्यातून सरकार धडा शिकले. पण प्रकाश आंबेडकर मात्र त्यात फ़सले आहेत. तात्पुरत्या लाभासाठी त्यांनी अशा प्रवृत्तीचे समर्थन केलेले आहे. लौकरच त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. कारण यामागे नुसता विविध जातींमध्ये संघर्ष माजवण्याचा डाव नव्हता तर एकूणच आंबेडकरी चळवळ नक्षली हिंसाचाराच्या प्रवृत्तीमध्ये ओढून घेण्याचा आहे व होता. त्याने भाजपा वा अन्य कोणाचे नुकसान होणार नसले तरी आंबेडकरी चळवळ मात्र कुणाकडे तरी गहाण पडण्याची भिती आहे.

मागल्या काही वर्षात नक्षली संघटनांनी आपले हातपाय शहरी भागात रोवण्याचा प्रयास चालविला आहे. त्यातली रणनिती म्हणून स्थानिक, प्रादेशिक, सामाजिक वा जातीय संघर्षात खुबीने प्रवेश केला जातो. त्यात नक्षली व पाकवादी जिहादींनी आपला शिरकाव करून घेतला आहे. म्हणून मग उमर खालिदसारखे लोक अफ़जल गुरू वा याकुब मेमनचे महात्म्य पोसत असतात. गुजरातच्या उना येथील घटनेत जिग्नेश मेवानी याने आपले बस्तान बसवून घेतले आणि त्यासाठी आंबेडकरी मनोवृत्तीला ओलिस ठेवले. कॉग्रेसने त्याचे तत्कालीन राजकीय लाभासाठी समर्थन केलेले आहे. पण क्रमाक्रमाने कॉग्रेसमध्येही ही वृत्ती आपला शिरकाव करून घेणार आणि पुढल्या काळात त्याच वृत्तीला रोखण्याची जबाबदारी आल्याने, लोकशाहीवादी व शांततावादी समाजाला भाजपाशिवाय अन्य पर्याय शिल्लक उरणार नाही. असल्याच कारणामुळे १९९७ नंतरच्या काळात महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ क्षीण होऊन गेली. त्यांना मेवाणी वा उमर खालिद अशा आयात पाहुण्यांना आणावे लागते आहे. त्यांचे अनेक प्रामाणिक लढावू कार्यकर्ते नक्षली चळवळीच्या आहारी गेले. आंबेडकरांच्या नावाखाली मार्क्सवाद बडबडू लागलेले आहेत. जो विचार बंगालच्याही मतदाराने उखडून टाकला त्याला अन्य राज्यात फ़ारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. पण त्यानेच आंबेडकरी चळवळ गिळंकृत करून टाकली, तर आंबेडकर वा इतर दलित नेत्यांना राजकारणात काय स्थान शिल्लक उरेल? १९९७ च्या अनुभवातून प्रकाशजी हे शिकले असते, तर आज भीमा कोरेगावचा विषय अन्य कोणी राजकीय विचारांचे लोक बळकावू शकले नसते. आज तोच धडा प्रकर्षाने समोर आला आहे. पण शिकायचे नसेल तर धडा काय कामाचा? असल्या उचापतींनी भाजपाच्या वाटचालीत तात्पुरता व्यत्यय दहाबारा वर्षे नक्की आला. पण नक्षली व बेताल प्रवृत्तीला रोखण्यासाठीच लोकांनी भाजपावर विश्वास दाखवला व कॉग्रेसवर नामशेष होण्याची नामुष्की आलेली आहे. मुलायम, मायावती, लालू, शरद पवार असे अनेक नेते व त्यांच्या संघटना संदर्भहीन होऊन गेल्या आहेत. आंबेडकरी चळवळीचे भवितव्य काय?


तो मोर्चा आणि हा एल्गार

maratha morcha के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगावच्या निमीत्ताने काही गोष्टी ठळकपणे पुढे आल्या. या निमीत्ताने दलित वा आंबेडकरवादी गटांनी आपले शक्तीप्रदर्शन घडवण्याचा प्रयास केला, तर त्यात काही गैर मानायची गरज नाही. कुठल्याही देशात व समाजात त्यातल्या एखाद्या घटकाला आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल, तर त्याने त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तसा त्याला अधिकारच असतो. पण असे आवाज उठवण्यासाठी जेव्हा मोठ्या लोकसंख्येने जमाव एकत्र येतो, तेव्हा त्यावर नियंत्रण राखणे त्याच्या नेतृत्वालाही अशक्य होऊन जाते. म्हणूनच जितका मोठा जमसमुदाय जमतो, तितकी त्याच्या नेतृत्वाची जबाबदारी वाढत असते. कायदा व सुव्यवस्था राखणे ही भले सरकारची जबाबदारी असली, तरी त्यात बाधा आणणे हा कुणा जमावाचा किंवा त्याच्या नेत्याचा अधिकार असू शकत नाही. त्यामुळेच अलिकडल्या घटनांमध्ये सरकार वा पोलिस तोकडे पडले, असा दावा करणे शुद्ध लबाडी आहे. खास करून जे बंद यशस्वी झाल्याचे श्रेय घेतात, त्यांना त्यात झालेल्या हिंसाचाराचीही जबाबदारी घेता आली पाहिजे. पण इथे तसे काहीही घडलेले नाही. हिंसेची जबाबदारी घेण्य़ाची वेळ आल्यावर शासन व पोलिसांकडे बोट दाखवणे, ही म्हणूनच लबाडी म्हणायला हवी. कुठलीही हिंसा म्हणजे शक्तीप्रदर्शन होऊ शकत नाही. त्यात भीमा कोरेगावच्या निमीत्ताने झालेला बंद तोकडा पडला, हे मान्यच करायला हवे. प्रामुख्याने त्यात पुढाकार घेतलेल्या नेतृत्वाचे ते अपयश मानावे लागेल. पण आजकाल अपयशात नैतिक यश सिद्ध करण्याचा जमाना असल्याने, असली अक्तव्ये येत असतात आणि युक्तीवादही चाललेले असतात. मोर्चा वा आंदोलनाचे म्होरकेपण करणार्‍यांची जबाबदारी किती व कशी असते, त्याचे म्हणूनच विवेचन व्हायला हवे. या पार्श्वभूमीवर मागल्या वर्षभर निघालेल्या मराठा मूकमोर्चाचे कौतुक सांगावे लागते. किंबहूना तोच एल्गार व मोर्चा यातला फ़रक आहे.

नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे जी घटना घडली होती, त्यामुळे एकूणच मराठा समाजात अस्वस्थता होती. पण कोणीही मराठा जातीचा, कुठल्याही संघटनेतला नेता त्यावर आवाज उठवण्यासाठी पुढाकार घेत नव्हता. अशावेळी अकस्मात एका जागी संघटित मोर्चा निघाला. पण त्याला कुठल्याही ख्यातनाम नेत्याचे नेतृत्व मिळालेले नव्हते की कुणा पुढार्‍याचे त्यात भाषण झाले नाही. किंबहूना त्या मोर्चालाच मूक मोर्चा असे ना्व देण्यात आल्याने त्यात कुठे घोषणांची आतषबाजीही होताना दिसली नाही. मराठा जातीचे नाव घेऊन डझनावारी संघटना व संस्था उभ्या आहेत आणि त्यांनी आरक्षण मिळावे म्हणून अनेक कार्यक्रम आजवर योजलेले होते. पण कोपर्डीनंतरची घुसमट व्यक्त करण्याची वेळ आली, तेव्हा त्यातला प्रत्येक नेता वा संघटना राजकीय सक्तीमुळे अलिप्त राहिलेले होते. त्यांना झुगारून हा मोर्चा निघाला आणि त्यात सर्व गटातटाच्या नेत्यांना पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेले होते. लाखोच्या संख्येने निघणारे विविध भागातील हे मोर्चे बघून, अनेकांच्या पोटात गोळा उठलेला होता. मराठे संख्येने अधिक आहेत आणि त्यांनीच रस्त्यावर उतरायचे ठरवले, तर इतर लहानमोठ्या लोकसमुहांचे काय होईल, अशी भिती दबल्या आवाजात व्यक्त केली जात होती. मोर्चा वा आंदोलन म्हणजे फ़क्त हिंसा, अशीच त्या भितीमागची प्रेरणा होती. पण लौकरच स्पष्ट झाले की त्या मोर्चात केवळ मराठा नव्हेतर इतर अनेक जाती समुहाचेही लोक मुक्तपणे सहभागी झालेले होते. पण त्यात कुठेही चुकून कुठल्या अन्य जातसमुह विरोधी वा राजकीय स्वरू्पच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत. सूडभावनेचा कुठलाही लवलेश त्यात नव्हता. म्हणून हा समाज व त्याचा मोर्चा अवघ्या महाराष्ट्राच्या सदिच्छा मिळवून गेला. नुसत्याच गांधीज़ींच्या नावाने जपमाळ ओढणार्‍यांना त्या मोर्चाने खराखुरा गांधी अवतरून दाखवला.

अहिंसा म्हणजे हिंसा करायची शक्ती नसताना पांघरलेले कवच नाही. तर हिंसेची कुवत असतानाही हिंसेपासून परावृत्त राहून केलेले शक्तीप्रदर्शन, असे गांधीजी म्हणत. शेळपट वा भित्र्याने अहिंसा बोलण्याने तिचे पालन होत नाही, असेच महात्म्याचे म्हणणे होते. आपल्या नुसत्या जमण्याच्या संख्येतूनच मराठा मूकमोर्चाने आपली शक्ती दाखवून दिली. इतक्या संख्येने कोणी हिंसा करायला सिद्ध झाला, तर त्याच्यासमोर बंदूका व हत्यारेही तोकडी पडतील असा त्यातला संदेश होता. परंतु नुसता मोर्चा निघणार म्हटल्यावरही अनेकांची धाबी दणाणली होती. त्याविषयी शंका कुशंका व्यक्त झालेल्या होत्या. जणू मराठ्यांनी आपल्या मनातला प्रक्षोभ व्यक्त करणेही गुन्हा असल्याचाच सूर लागला होता. कुठे त्या मोर्चाला गालबोट लागले नाही. कुठे हिंसा झाली नाही. त्याच्या तुलनेत कालपरवाचा एल्गार बघितला पाहिजे. मनातला राग वा विरोध व्यक्त करतानाही एकूण समाजाला ओलिस ठेवण्याचे कारण नसते. हिंसाचाराने भिती दहशत माजवली जाते. उलट नुसत्या संख्याबळावर शक्तीप्रदर्शन होऊन जात असते. हिंसेची गरज नसते. जेव्हा आपल्या शक्तीवर किंवा भूमिकेवर आपलाच विश्वास नसतो, तेव्हा त्याला पाठींबा मिळण्याची खात्री नसते आणि हिंसाचाराचा आश्रय घ्यावा लागतो. एल्गार पुकारणार्‍यांचा आपल्या शक्ती व भूमिकेच्या न्याय्य असण्यावर विश्वास असता, तर त्यांनी जमणार्‍या लोकसंख्येला नियंत्रणाखाली ठेवून हिंसा होऊ दिली नसती. जनजीवनाला भयभीत केले नसते. चुका झाल्या तर त्याची जबाबदारी उचलली असती. यापैकी काहीही झाले नाही. जमावाने धुमाकुळ घालण्याला कोणी समतेचे आंदोलन व यश समजत असेल, तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो. एक मात्र खरे आहे की या एल्गार पुकारणार्‍यांनी आंबेडकरवादी लोकांना पुढे करून बहुजन मराठ्यांच्या मनात नको त्या शंका संशय निर्माण करून ठेवले आहेत.

मराठा मूकमोर्चाच्या ज्या मागण्य़ा होत्या, त्यातली पहिली वा प्रमुख मागणी अट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती आणि कालपरवाच्या हिंसाचारानंतर पुन्हा अट्रोसिटी कायद्यानुसार काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते समाजात वितुष्ट माजवणारे व आंबेडकरी समाजाला अलिप्त एकाकी पाडणारे आहेत. अर्थात त्याला आंबेडकरवादी नेते वा गट कारणीभूत नाहीत. ज्यांनी भीमा कोरेगाव विषयाचे अपहरण करून त्यालाच आपला राजकीय अजेंडा बनवला, ते खरे गुन्हेगार आहेत. त्यांनी उच्छाद केला व चिथावण्य़ा देऊन ते परस्पर निसटले आहेत. उमर खालिद वा मेवाणी इथे वास्तव्य करणारे नाहीत. पण त्यांच्या नादाला लागून ज्यांनी धुमाकुळ घातला, त्यांना मात्र इथेच जगायचे आहे. त्या जगण्यात आजवर जपलेल्या सदिच्छांना हरताळ फ़ासला गेला आहे. उपर्‍यांचा एल्गार साजरा करताना आपल्या भोवतीच्या विविध समुहांमध्ये असलेल्या सदिच्छांची होळी होऊन गेलेली आहे. मूक मोर्चाने नुसत्या संख्यात्मक व शांततापुर्ण वर्तनातून नव्या सदिच्छा निर्माण केल्या आणि एल्गारच्या नावाखाली आंबेडकरवादी मंडळींनी दिर्घकाल जमलेल्या सदिच्छांचा विध्वंस करून टाकला आहे. त्याचा आंबेडकरी चळवळीशी काहीही संबंध नाही की त्यातून त्या चळवळीला फ़ायदाही मिळणार नाही. पण मूकमोर्चा काढणार्‍या मराठा वा तत्सम बहुजन समाजातील विविध घटकांना मौन सोडण्याची वेळ आणली गेली आहे. ज्यांनी अशी आग लावली, ते आपला कार्यभाग सिद्ध करून पळाले आहेत आणि आंबेडकरवादी मात्र भोवतालाच्या सदिच्छा दोन दिवसात गमावून बसले आहेत. डिवचले गेल्यास मूकमोर्चा कितीकाळ मूक राहू शकेल? मुठभरांनी ब्राह्मणी आरोपांची आतषबाजी केली, पण दुखावला गेलेला बहुजन मराठा समाज आहे. हे अर्थात एल्गार पुकारणार्‍यांना माहितीही आहे. त्यांना जातीयुद्धाची हिंसाच हवी असेल, तर बाबासाहेबांच्या अनुयायांची जबाबदारी वाढत असते. हे विसरून चालणार नाही.