Wednesday, April 4, 2018

सभी मिले हुवे है

kejri cartoon के लिए इमेज परिणाम

गेल्या महिन्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफ़ीनामा यात्रा आरंभलेली आहे. राजकारणात आल्यापासून त्यांनी एकामागून एक बेछूट आरोपांचा सपाटा लावला होता. माध्यमांनाही असे काही सनसनाटी माजवणारे आरोप हवेच असतात. पण त्यामुळे कोणा व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळते वा बदनामी होते, त्याच्याशी जणू कोणाला कर्तव्यच राहिलेले नाही. त्यातून मग आरोपकर्त्यांना जोश चढला तर नवल नव्हते. केजरीवाल यांनी तर राजकारणात पाय रोवून उभे रहाण्यासाठी हा आपला अजेंडाच बनवून टाकला होता. जेव्हा त्यांच्यापाशी आरोप करायला कोणीच उरले नाही, तेव्हा त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांची एक लांबलचक यादीच पत्रकार परिषदेत दिली होती आणि भ्रष्ट म्हणून त्यांना लोकांनी पराभूत करण्याचे आवाहनही केलेले होते. केजरीवालांचा त्यातला लबाड हेतू उघड होता. पण अशा बेताल आरोपांना प्रसिद्धी देताना कुठल्याही वाहिनी वा वर्तमानपत्राला आपल्या जबाबदारीचे कितीसे भान होते? आज विषय उलटल्यावर केजरीवाल एकामागून एक माफ़्या मागत सुटले आहेत. पण त्यांच्या या पापात सहभागी असलेल्या माध्यमांचे काय? त्यांनी आपल्या पापाचे क्षालन कसे करावे? त्यांना पापक्षालनाची गरज तरी वाटली आहे काय? हल्ली हा एक खेळच होऊन बसला आहे. कोणीही उठावे आणि कोणावरही कसलेही बेछूट आरोप करून टाकावेत. त्यातून सनसनाटी माजवणे इतकेच माध्यमांचे काम होऊन बसलेले आहे. पण असे सगळेच आरोप विनासायास खपून जात नाहीत. कोणीतरी त्याला पुरून उरतो. म्हणूनच आज केजरीवाल आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांना शेपूट घालून माफ़ी मागावी लागली आहे. पण ‘गिरे तोभी टांग उप्पर’, ही मानसिकता काही या भामट्यांना सोडायला तयार नाही. म्हणून तर त्यातही खोटेपणा करण्याची संधी सोडली गेलेली नाही.

गेल्या महिन्यात सर्वप्रथम पंजाबचे अकाली नेते मजिठीयांच्या विरोधात केलेल्या अशा आरोपांसाठी केजरीवालनी माफ़ी लिहून दिली. पंजाब विधानसभा निवडणूक काळात त्यांनी मजिठीयांवर अंमलीपदार्थ व्यापाराचा आरोप केला होता. आता त्याला वर्षभराचा काळ उलटून गेला असून मजिठीयांनी त्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. तो आरोप सिद्ध करण्यासाठी हातात कुठले पुरावे नव्हते. मग विषय कोर्टात गेल्यावर बचाव कुठून मांडायचा? माध्यमातले दिवटे आणि न्यायालय यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. तिथे साक्षीपुराव्यांनी काम चालते. म्हणूनच केजरीवाल यांची तारांबळ उडाली, आपल्यापाशी कुठलेही पुरावे नसल्याचे मान्य करून त्यांनी चक्क मजिठीयांची माफ़ी मागून टाकली. त्यानंतर हा माफ़ीचा सिलसिला कायम सुरू आहे. कॉग्रेसनेते कपील सिब्बल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आता केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचीही माफ़ी मागून केजरीवाल मोकळे झालेले आहेत. ते करताना त्यांचे एक सहकारी मनिष शिसोदियांनी केलेला खुलासा बेशरमपणाचा अस्सल नमूना आहे. अशा कोर्टकचेर्‍यांमध्ये वेळ दवडण्यापेक्षा लोकांची सेवा व कामे करावीत, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मग हे कळायला इतका उशिर कशाला झाला? दिल्लीची विधानसभा प्रचंड मतांनी जिंकल्यापासून या टोळभैरवांना लोकांची अडलीनडली कामे करण्यापासून कोणी रोखलेले होते काय? ऊठसूट कुठलेही बेताल आरोप करण्याची कोणी सक्ती केलेली होती काय? नसेल, तर मग आज हे शहाणपण सांगण्याचे कारण काय? मुळातच जेटली यांच्यावर असे आरोप करण्याचे कारण काय होते? ते केल्यावर प्रकरण कोर्टात गेले. तेव्हाही या लोकांनी किती बेशरमपणा केला त्याचीही आठवण शिसोदियांना नाही काय? केजरीवालांचा बचाव मांडण्यासाठी एक कोटी रुपये जेठमलानींना वकील म्हणून सरकारच्या तिजोरीतून कोणी दिले होते?

पहिली गोष्ट म्हणजे भाजपाचेच बिहारचे खासदार व माजी क्रिकेटपटू किर्ति आझाद यांचे हे आरोप होते. ते स्वत: दिल्ली क्रिकेट संघटनेचे सदस्य होते आणि त्यांनीच दिर्घकाळ अरुण जेटली यांच्या विरोधात आघाडी उघडलेली होती. पण पक्षांतर्गत त्यांना कधी दाद मिळाली नव्हती. तर घरातलाच भेदी म्हणून त्यांना केजरीवालनी हाताशी धरले. त्यांचेच कुठल्याही पुराव्याशिवाय असलेले आरोप घेऊन पत्रकार परिषदेत धमाल उडवून दिली. तात्काळ जेटलींनी त्याचा इन्कार केला आणि केजरीवाल विरोधात न्यायायलात अब्रुनुकसानीचा दावा टाकला होता. अर्थात तेव्हाच पुरावे नसल्याने शहानिशा करून केजरीवाल या भानगडीतून निसटू शकले असते. कारण असा खटला भरण्यापुर्वीच जेटलींनी त्यांना रितसर नोटिस पाठवून आरोप मागे घेऊन माफ़ी मागण्याची मागणी केलेली होती. पण माघार घेण्यापेक्षा केजरीवाल व त्याच्या सहकारी मंडळीने आरोपांवरच्या चर्चांमध्ये वाहिन्यावर जाऊन युक्तीवादही केलेले होते. आज माफ़ी मागणार्‍यांमध्ये आशुतोष जा जुना पत्रकार आहे आणि त्याची लायकी बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी खुप आधीच ओळखलेली होती. आजतक वाहिनीचा पत्रकार म्हणून समोर आलेल्या आशुतोषला कॅमेरा चालू असतानाच थोबाडीत हाणली होती. आज त्यांची कृती योग्य असल्याचेच सिद्ध झाले आहे. नुसती वाचाळता आजकाल बुद्धीवादी असण्याचा जो निकष झाला आहे, त्याचा हा परिणाम आहे. पण मुद्दा त्याच्याही पुढे आहे. जेठमलानी यांनी जेटलींना कोर्टातच अपशब्द वापरले होते आणि त्यावरून त्यांनी केजरीवाल विरोधात आणखी एक खटला दाखल केल्यावर यांना अक्कल आलेली आहे. त्यातून हे माफ़ीसत्र सुरू झालेले आहे. पुरोगामी म्हणवणार्‍यांची ही मोडस ऑपरेन्डी कशी झाली आहे तेही समजून घेण्य़ाची म्हणूनच गरज आहे. ह्या एकाच प्रकरणात तसे झालेले नाही. माफ़ीने अशा लोकांना सोडले जाता कामा नये.

गेल्या काही वर्षात कोणालाही बदनामीकारक बातम्या टाकून ब्लॅकमेल करण्याची एक कार्यशैली निर्माण करण्यात आलेली आहे. त्यात जाणिवपुर्वक अर्धवट सत्य वा माहितीची भेसळ करून बदनामी केली जाते. ‘द वायर’ नामक पोर्टलद्वारे हेच तंत्र भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या विरोधात वापरण्यात आलेले होते. अमित शहांचा पुत्र जय शहा याच्या कंपनीने ५० लाखाचे भांडवल असतानाही १६०० पटीने नफ़ा कसा मिळवला? असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त याच पोर्टलवर देण्यात आले होते, त्यातली दिशाभूल अशी होती की ८० कोटीची उलाढाल म्हणजेच त्याच्या कंपनीला झालेला नफ़ा असल्याची सराईत थाप ठोकण्यात आलेली होती. त्याने कोर्टात धाव घेऊन या संपादक पत्रकारांना कोंडीत पकडल्यावर पळापळ सुरू झाली. कोर्टात खटला भरल्यावर लेखन स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप या शहाण्यांनी सुरू केला. मग जय शहाने काय करावे? निमूट आरोप सहन करावेत? आता तो खटला काढून टाकावा म्हणून ते संपादक सुप्रिम कोर्टात गेले आहेत. कशाला खटला नको आहे? जर तुमचे आरोप खरे आहेत, तर कोर्टात सिद्ध करावेत ना? पळायचे कशाला? तुम्ही नुसते आरोप केलेत. जय शहाने आरोप कोर्टात सिद्ध करण्याची संधी दिलेली आहे ना? मग पळता कशाला? पण ढुंगणाला पाय लावुन पळण्याचे कारण स्पष्ट आहे. कुठलेही पुरावे नाहीत. आपण खोटेपणा केल्याची खात्री आहे आणि ते कोर्टात सिद्ध झाले, तर घरदार विकून संपादकांना स्वत:लाच गहाण टाकावे लागणार ना? म्हणून तारांबळ उडालेली आहे. इतके झाल्यावरही आज अनेक वाहिन्यांवर वा पक्षांकडून पुन्हा पुन्हा अमित शहांना मुलाविषयी तोच लबाड प्रश्न विचारला जातच असतो. म्हणजे आधी एकाने खोटा आरोप करायचा आणि मग इतरांनी त्याच्या आधारे काहूर माजवायचे, ही शैली झाली. केजरीवाल त्याचा अतिरेक करून गाळात गेले आणि नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांनी शेपूट घालत माफ़ी मागितली आहे.

अण्णा आणि मोदी

संबंधित इमेज

अण्णांचे फ़सलेले उपोषण चालू असताना आणि संपल्यावर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपाला शिव्याशाप देताना अण्णांच्या मागल्या उपोषणामुळे मोदी सत्तेत आल्याचा आवर्जून उल्लेख वा आरोप केलेला आहे. कुठल्याही यश वा विजयाची हीच तर गंमत असते. त्या विजयाला अनेक बाप असतात. पण अपयश नेहमी अनौरस असते. बिहार वा दिल्ली विधानसभात मोदी व भाजपाचा पराभव झाला, तेव्हा त्याला एकटे मोदी जबाबदार होते. तेव्हा अण्णा वा अन्य कोणाला ती जबाबदारी नको होती. पण २०१४ लोकसभा वा अन्य कुठल्या निवडणूकीत मोदी जिंकले, तर मात्र अण्णांसहीत अनेकजणांना त्याचे श्रेय असते. खरेच अण्णा वा अन्य कोणाला मोदींच्या पंतप्रधान होण्याचे इतके श्रेय घ्यायचे वा द्यायचे असेल, तर नोटाबंदी वा जीएसटीसह विविध बाबतीतले खापर एकट्या मोदींच्या माथी कशाला फ़ोडायचे? जे कोणी २०१४ च्या विजयाचे शिल्पकार आहेत, त्यांनीही तितक्याच उत्साहात पुढे येऊन आमच्याच पापामुळे असा त्रास झाला, म्हणून जगाची माफ़ीही मागण्याचे औदार्य दाखवायला हवे होते. पण तसे सहसा घडत नाही. कारण श्रेयाचे सगळे मानकरी असतात आणि जबाबदारीची वेळ आल्यावर प्रत्येकजण पाय काढता घेत असतो. उलट अशी जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायला तयार असतो, त्याच्याकडे सामान्य माणूस म्हणूनच नेता म्हणून बघत असतो. पण सध्या अण्णांच्या उपोषणाच्या निमीत्ताने काही गोष्टी स्पष्ट करणे अगत्याचे ठरेल. लोकपाल आंदोलन चालू होते, तेव्हा मोदींनी त्याला पाठींबा तरी दिला होता काय? पुढे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरले, तेव्हा अण्णांनी तरी त्यांचे समर्थन केले होते काय? नसेल तर अण्णाच्या उपोषणामुळे मोदी पंतप्रधान पदावर आरुढ झाल्याच्या वल्गना निव्वळ धुळफ़ेक आहे. दिशाभूल आहे. वास्तविक तेव्हा अण्णाही मोदी विरोधातच होते.

पहिल्या म्हणजे जंतरमंतर येथील प्रासंगिक उपोषणाने त्या आंदोलनाचा आरंभ झाला होता आणि त्यात अनेक स्वयंसेवी संस्था सहभागी झालेल्या होत्या. त्याची सांगता झाल्यावर अण्णा एका जागी म्हणाले होते, विकास कसा असतो, ते गुजरातला जाऊन बघा. ह्या विधानावरून त्यांच्या स्वयंसेवी पाठीराख्यांची तारांबळ उडालेली होती. अण्णा राजकीय प्रचार करतात, असा गदारोळ करीत मेधा पाटकर यांच्यासह अनेकांनी लोकपाल आंदोलनातून बाजुला होण्याचा निर्णय घेतला होता. मग अण्णाही आपले शब्द सावरत मोदी विरोधाची भाषा बोलू लागले होते. त्यामुळे २०१४ च्या शर्यतीमध्ये अण्णांचा आशीर्वाद घेऊन मोदी सत्तेपर्यंत पोहोचल्याचा दावा फ़क्त दिशाभूल करणारा आहे. अण्णांचे तात्कालीन आंदोलन ज्या कारणाने यशस्वी झाले होते, त्याचे खरे श्रेय मनमोहन सिंग व सोनिया गांधींना होते. तितकेच मोदींच्या विजयाचे श्रेयही त्याच दोन महानुभावांचे होते. या दोघांनी व त्यांच्याभोवती जमा झालेल्या टोळक्याने देशात जे अराजक माजवलेले होते, त्यामुळे लोकमत कमालीचे युपीए व कॉग्रेस विरोधात झालेले होते. ते समजून घेऊन त्यावर फ़ुंकर घालण्यापेक्षा त्यांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबिला. त्याची जी तीव्र प्रतिक्रीया तात्काळ उमटली, त्याने अण्णांना महात्मा करून टाकलेले होते. तरीही त्या नाराजीला ओळखून वागण्याचे वा सुधारण्याचे कुठलेही प्रयत्न कॉग्रेस नेत्यांनी अजिबात केले नाहीत आणि पर्यायाने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. त्याचे वादळ व चक्रीवादळ करण्याची किमया मोदींनी आपल्या प्रचारातून केली. त्यात अच्छे दिन वा इतर आश्वासनांमुळे सत्तापरिवर्तन झाले. थोडक्यात मोदी पंतप्रधानपदी पोहोचण्यासाठी शेकडो कारणे व निमीत्ते झालेली आहेत. त्यापैकी कोणा एकाने श्रेय घेण्याचे अजिबात कारण नाही, की आपला महिमाही सांगण्याची गरज नाही. ज्या अण्णा समर्थकांना असे वाटते, ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत.

खरे तर अण्णांच्या यशाचे वा महात्म्याचे मोठे श्रेय सोनिया व मनमोहन सिंग यांना आहे. अण्णांनी कधी ते श्रेय त्या दोघांना दिले आहे काय? देशात इतके मोठे अराजक माजवायचे आणि जनतेला सैरभैर करून टाकायचे. पुढे त्यावर अण्णा उपोषणाला बसले असताना जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे अण्णांवर पोलिसही घालायचे. याचे श्रेय अण्णांचे नक्कीच नाही. सभोवार वातावरण चिघळलेले असताना ते शांत करण्याचे प्रयास युपीएने केले असते, तर अण्णांच्या आंदोलनाला इतकी प्रसिद्धी वा प्रतिसाद मिळाला असता काय? पण अण्णांनी एकदाही त्या दोघांचे वा कॉग्रेसचे आभार मानलेले नाहीत. उलट मोदींकडे बघता येईल. त्यांनी अनेकदा आपल्या यशाचे श्रेय राहुल-सोनिया व मनमोहन सिंग यांना दिलेले आहे. ते वास्तव आहे. युपीएने इतका वाईट कारभार केला नसता वा अराजक माजवलेच नसते, तर देशभरात मोदींना इतका जबरदस्त प्रतिसाद कशाला मिळाला असता? गुजरातमधे मोदींनी कितीही विकास केलेला असला, म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या कानाकोपर्‍यातून इतका प्रतिसाद मिळणे निव्वळ अशक्य होते. पण मोदींना पंतप्रधान करूनच थांबायचे, असा चंग बांधलेल्या कॉग्रेस शासनाने त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण केली. त्याचा लाभ केजरीवाल यांनी जितका उठवला, त्याच्या अनेकपटींनी मोठी संघटना हाताशी असलेल्या मोदींनी देशव्यापी राजकीय लाभ घेतला. म्हणूनच अण्णांमुळे मोदी सत्ता मिळवू शकले, ही निव्वळ धुळफ़ेक आहे. म्हणूनच यावेळी सरकारने अण्णांची दखल घेतली नाही, तर शिव्याशाप देण्यात काही अर्थ नाही. अण्णांची इतकीच राजकीय महत्ता असती, तर मोदीच कशाला, त्यापुर्वीच्या युपीए सरकारनेही त्यांच्यासमोर तेव्हाच लोटांगण घालले असते. अरेरावी करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला नसता. सोनियांची मदार मग कोणावर होती?

भले आपल्या विरोधात कितीही लोकमत गेलेले असले आणि आपला कारभार उत्तम नसला, तरी आपल्याला मतदार झिडकारू शकत नाहीत, अशी मस्ती कॉग्रेस पक्षाला इतक्या टोकाला घेऊन गेलेली होती. निवडणूक चाचणी शास्त्रामध्ये त्याला ‘टिना’ घटक म्हणतात. त्याचा अर्थ अन्य कोणी पर्याय नाही, म्हणून होणारी निवड. २००९ साली त्याच कारणास्तव युपीएला दुसर्‍यांदा लोकांचा कौल मिळाला होता. तो उत्तम कारभारासाठी नव्हता. सोनिया मनमोहन यांचा कारभार उत्तम नसला तरीही त्यांना हटवल्यास पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेपाशी नव्हते. कोणी अन्य विरोधी पक्ष त्याचे उत्तर देण्यास पुढे सरसावलेला नव्हता. तसे बाकीचे विरोधी पक्ष सरकारला शिव्याशाप देत असले तरी पुन्हा पुरोगामी म्हणून त्यांच्याच पाठीशी उभे रहात होते आणि एकमेव खरा पर्याय असलेल्या भाजपाकडे अडवाणी यांचे दुबळे नेतृत्व होते. त्यापेक्षा असलेले मनमोहन सोनिया लोकांनी चालवून घेतलेले होते. २०१३ नंतर तसा पर्याय देण्याची हिंमत करीत मोदी पुढे सरसावले आणि लोकांनी त्यांना पर्याय म्हणूनच स्विकारले. अण्णांचे आशीर्वाद घेऊन मोदी पुढे आले नव्हते. युपीएविरोधी लाटेवर स्वार होऊन त्यांनी आपली प्रचार मोहिम हाती घेतलेली होती. म्हणूनच आता पुढल्या वर्षी काय होईल याचे उत्तर २००९ सालात शोधणे भाग आहे. मोदींनी लोकाच्या अपेक्षा पुर्ण केल्या नाहीत, असे विश्लेषणातून सांगितले जात असले, तरी मोदींना पर्याय म्हणून काही समोर आणलेला नाही. त्यामुळे मोदी सरकारविषयी भासवले जात तितकी नाराजी जनमानसात नाही. २०११ च्या तुलनेत निम्मे नाराजी असती, तरी रामलिला मैदानातल्या उपोषणाने मोदींचे धाबे दणाणले असते. बाकीच्यांची गोष्ट सोडून द्या, मोदीच धावत तिथपर्यंत आले असते आणि हातापाया पडून त्यांनी अण्णांसमोर शरणागती पत्करली असती. त्याची कारणे अण्णा समर्थकांनी शोधली तरी त्यांना सत्याचा साक्षात्कार होऊ शकेल.

Tuesday, April 3, 2018

शहाण्याला शब्दांचा मार

prakash ambedkar के लिए इमेज परिणाम

सोमवारच्या भारत बंद नंतर घाईगर्दीने एट्रोसिटी कायदा संबंधातील निर्णयाचा फ़ेरविचार करण्याचा अर्ज मोदी सरकारला सादर करावा लागला. मंगळवारी म्हणजे दुसर्‍याच दिवशी त्याची सुनावणी करण्याचे सुप्रिम कोर्टानेही मान्य केले. त्यामुळे सोमवारी घुडगुस घालाणार्‍यांना तो आपला मोठा राजकीय विजय वाटला, तर नवल नाही. पण ज्यांनी तो विजय साजरा करीत भारताचा सिरीया करण्याचे इशारे दिले होते, त्यांची अक्कल कोर्टाने पहिल्या सुनावणीतच चव्हाट्यावर आणलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोर्टाने आपल्या निकालावर फ़ेरविचार करण्याची मागणी साफ़ फ़ेटाळून लावली आहे आणि दुसरी गोष्ट अशा फ़ेरविचारासाठी सरकारला दडपणाखाली आणण्याचे दंगेखोर उद्योग करणार्‍यांना निकालही कळलेला नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. भारत बंद करतानाचा एकूण आवेश असा होता, की कोर्टाने एट्रोसिटी कायदाच रद्द करून टाकला असल्याने दलित आदिवासींना आपल्यावरील अत्याचाराच्या विरोधात न्याय मागण्य़ाची बंद झाली. पण वस्तुस्थिती तशी नसून कायद्यात असलेल्या कुठल्याही न्यायविषयक तरतुदीला कोर्टाच्या निकालाने हातही लावलेला नाही. तर त्या कायद्याच्या तरतुदींचा आधार घेऊन इतर कोणावर चालू असलेल्या अन्यायाला रोखण्यासाठी काही आदेश कोर्टाने दिलेले आहेत. न्यायाच्या नावाखाली निरपराधांना शिक्षा देण्याचे प्रकार थांबवण्यासाठी हा हस्तक्षेप करावा लागला, असेच कोर्टाचे म्हणणे असून त्याची सविस्तर चर्चा निकालात झालेली आहे. पण कुठल्याही मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीचा विपर्यास करण्याचा जो बुद्धीवाद मागल्या अनेक वर्षापासून बोकाळला आहे, त्याचे परिणाम अशा रितीने समोर आलेले आहेत. किंबहूना या ताज्या निर्णयातून प्रकाश आंबेडकरांनाच सुप्रिम कोर्टाने फ़टकारलेले आहे. कारण संभाजी भिडे यांना अटक करण्याची त्यांची मागणी नेमकी तीच तशीच होती.

तक्रार नोंदली आहे ना? मग ज्याच्या विरोधात तक्रार आहे, आरोप आहे, तो आरोप म्हणजेच पुरावा समजून आधी अटक करायची. नंतर तपासाच्या नावाखाली त्या व्यक्तीला छळायचे, हा खाक्या झालेला आहे. कधी राजकीय नेते तर कधी पोलिस, कुणालाही अशा तरतुदींच्या दडपणाखाली आणतात आणि त्याची कोंडी करतात. त्या व्यक्तीला त्यातून कुठलाही दिलासा, कायदा वा न्यायालये देऊ शकत नव्हती. म्हणून तर खेड्यापाड्यातल्या सवर्णांचा त्या कायद्याच्या विरोधात रोख झालेला आहे. कोपर्डीनंतर जेव्हा मराठा मोर्चे निघू लागले, तेव्हाही त्यातली एक प्रमुख मागणी एट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती. एखाद्या कायद्याचा गैरवापर होत असेल, म्हणून तो रद्द करण्याची गरज नसते. तर त्यातल्या जाचक तरतुदी सौम्य करून वा योग्य रितीने अंमल करूनही कायदा न्याय्य राखता येत असतो. एट्रोसिटी कायदा तक्रार होताच आरोपीला अटक करण्याची मुभा पोलिसांना देत होता आणि मग त्याचा सरसकट सूडबुद्धीने वापर होण्याला पर्याय उरला नाही. मोठ्या प्रमाणात त्याचा अशा खट्या तक्रारी वा खटल्यासाठी वापर झाला. न्यायप्रक्रीयेला विलंब होत असल्याने तितका काळ नंतर निर्दोष ठरणारा यमयातना भोगतो आणि तेही कायद्यानुसार असल्याने त्याला कुठेही दाद मागायची सोय नाही. हीच बाब इथे निर्णायक ठरलेली आहे. कोर्टाने कायद्यात कुठलीही दुरूस्ती केलेली नाही. तर त्यातली ही गैरवापराची सुविधा काढून घेतलेली आहे. त्याचे तपशीलवार विवेचन कोर्टाने आपल्या निकालात केलेले आहेच. पण ज्यांना त्याचा व्यक्तीगत अनुभव हवा असेल, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा अट्टाहास डोळसपणे बघितला तरी वास्तव कळू शकेल. भीमा कोरेगाव प्रकरणात भिडे गुरूजींच्या विरोधातला कुठलाही पुरावा आंबेडकर देऊ शकलेले नाहीत. पण ते अटकेचा हट्ट धरून बसलेले आहेत. त्यातला हट्टच सुप्रिम कोर्टाने नाकारला आहे.

कोणीही उठावे आणि कुठलाही आरोप करावा, त्याचे साक्षीपुरावेही नसतात. मात्र तक्रार आली म्हणून संबंधिताला अटक करायची. पुढे काय? तर पुरावे वा साक्षीदार देण्याची जबाबदारी कोणाची नाही. ते पोलिसांनी गोळा करायचे वा शोधायचे. ते मिळत नाहीत वा अन्य काही होत नाही, तोपर्यंत कुठलेही कारण नसताना आरोपीने मात्र तुरूंगवासात सडायचे. शेवटी काही निष्पन्न झाले नाही, तर त्याच्यावर तो अन्यायच नाही काय? अशा हजारो केसेस व प्रकरणे कोर्टासमोर आणली गेली आणि त्यात आरोप व तक्रारी खोट्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच कोणाच्या तरी न्यायासाठी असलेल्या या कायद्याचा अन्य कोणावर अन्यायासाठी होत असलेला वापर थांबवणे कोर्टाला अगत्याचे वाटले. त्यातून त्यांनी अटकेपुर्वी काही तरी पुरावे व तपास होण्याची सक्ती केलेली आहे. थोडक्यात मुस्लिमांना खुश करण्यासाठी नऊ वर्षे साध्वी प्रज्ञा सिंग व कर्नल पुरोहित यांना तुरूंगात डांबून ठेवण्यात आले, तसा गैरवापर या कायद्याचा होत असल्याने हा निकाल द्यावा लागलेला होता. त्यात अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, तर किमान काही पुरावे असण्याची सक्ती केलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय अजेंड्याला चालना मिळावी म्हणून भिडे गुरूजींना अटक करण्याची जी सुविधा आजवर होती, ती कोर्टाने काढून टाकलेली आहे. कोर्टाचा निर्णय किती योग्य होता, याची साक्ष खुद्द प्रकाशजींनीच आपल्या वागण्याबोलण्यातून दिलेली आहे. भिडे गुरूजींना अटक झाली नाही, तर होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार असेल. भारत बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराला सुप्रिम कोर्ट जबाबदार आहे, ही विधाने त्याची साक्ष आहे. आपण कुठला कायदा वा न्याय मानत नाही, की जुमानत नाही. जे कोणी कायदा मानत असतील, त्यांनी निमूट आमच्या अनागोंदीसमोर शरणागत व्हावे. हीच प्रवृत्ती सुप्रिम कोर्टाला कायद्यात सौम्यपणा आणायला भाग पाडणारी ठरली आहे.

कोर्ट व कायदाही जे जुमानत नाहीत, तेच मग भारताचा सिरीया होईल, असे इशारेही देतात. काय दुर्दैव आहे ना? ज्या महापुरूषाने देशाला संविधान दिले व न्यायाची व्यवस्था रचून दिली, त्याचाच वारसा चालविण्याच्या आवेशात त्यांचाच नातू संविधान व कायद्याला सुरूंग लावण्याच्या गमजा करतो आहे. आपण सिरीयातील त्रस्तग्रस्त पिडीतांच्या यातनांची भाषा बोलतोय, असा प्रकाश आंबेडकरांनी आव आणला आहे. पण ते बशीर अल असद या हुकूमशहाची अरेरावीची भाषा बोलत आहेत. असेल तर माझे राज्य वा माझीच हुकूमत. मान्य नसेल तर तुमची घरेदारे उध्वस्त करून टाकू, यादवी माजवू ही भाषा न्याय मागणार्‍याची नसते, की अन्यायपिडीत व्यक्तीची नसते. लोकशाहीत संसद व न्यायालये जनतेच्या अधिकाराचे रक्षण करणारी असतात. तिथे सिरीया करण्याची भाषा गैरलागू असते. जातीपातीवर न्यायाचे निकष मांडले जात नाहीत. अशी जी वर्णव्यवस्था होती, त्यात शिरजोर समाजघटक दलितांवर नुसता आरोप ठेऊनच त्याला शिक्षापात्र ठरवित होता आणि त्याविरुद्ध आवाज उठवणार्‍या महापुरूषाला जग बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखते. त्यांचे नातू म्हणून वाटेल ते बरळण्याचा कुठलाही अधिकार त्यांनी प्रकाशजींना दिलेला नाही. घटनाकारांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची व्यवस्था आपल्या संविधानातून मांडली. तिची प्रतिष्ठा ठेवता येत नसेल, तर नातवाने निदान नाते सांगून त्या महापुरूषाची विटंबना तरी करू नये. विषय दलितांच्या न्यायासाठी असलेल्या कायद्याचा नसून, त्याचा आडोसा घेऊन चाललेल्या अन्यायाचा आहे. त्यात पोरखेळ करू गेल्यास तीव्र प्रतिक्रीयाही दुसरीकडून उमटू लागतील. सिरीया करण्याची धमकी देऊन यांना तीच पेटवापेटवी करायची आहे? शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात. प्रकाश आंबेडकर ‘अतिशय’ शहाणे असल्याने त्यांना कोणी समजवायचे?

Monday, April 2, 2018

प्रमाणपत्रांची लॉटरी

Image result for CBSE students agitation

भारतातून हजारोच्या संख्येने मुले अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये प्रतिवर्षी उच्चशिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यासाठीची प्रवेश परिक्षा त्यांना इथे मातृभूमीत बसून देता येते. त्यासाठी कुठली प्रश्नपत्रिका नसते किंवा त्यात काही गफ़लत झाल्याचा गवगवा अजिबात होत नाही. त्याच्याही पुढे यापैकी अनेक मुले अशी आहेत, ज्यांच्या इथल्या पदवी परिक्षेचा निकालही लागलेला नसतो आणि तरीही त्यांना तिथल्या विद्यापीठात प्रवेश दिला जातो. त्यांचे पुढले शिक्षणही सुरू होत असते. इतरांचे सोडून द्या, माझा हा घरातला अनुभव आहे. माझ्या मुलीची इंजिनीयरिंगची चौथ्या वर्षाची म्हणजे पदवी परिक्षा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठव्ड्यात संपली आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात प्रॅक्टीकलही संपले होते. त्यानंतर अवघ्या सात दिवसात ती अमेरिकेतील विद्यापीठात दाखल झाली आणि तिचे शिक्षणही सुरू झाले. तिथली पहिली सेमिस्टर संपून त्याचा निकाल आला, तरी भारतातल्या चौथ्या वर्षाच्या परिक्षेचा निकाल लागलेला नव्हता. मग प्रश्न असा येतो, की त्या अमेरिकन विद्यापीठाने तिला प्रवेश दिला कसा आणि पुढले शिक्षण आरंभ का होऊ शकले? तर तिने इथून संगणकीय माध्यमातून दिलेल्या परिक्षेने तिची तिथल्या तिथे गुणवत्ता दोन वर्षे आधी दाखवली होती आणि आधीच्या तीन वर्षातील तिच्या गुणपत्रिकांचे मूल्यमापन करून या विद्यापीठाने तिला प्रवेश दिलेला होता. तिला पदव्यूत्तर पदवीही बहाल करण्यात आली. त्या विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या चौथ्या वर्षाची गुणपत्रिका वा प्रमाणपत्रही मागितले नाही. हे इतके सोपे व कुठल्याही गफ़लतीशिवाय होऊ शकत असेल, तर भारतात दहावी बारावीच्या परिक्षांचा इतका घोळ कशाला होतो? प्रश्नपत्रिका फ़ुटणे वा निकालात हेराफ़ेरी होण्यापासून आपल्याला मुक्ती कशाला मिळालेली नाही? असे कुठले तंत्रज्ञान आपल्यापाशी नाही वा अमेरिकेपाशीच आहे?

इथे तंत्रज्ञानाची गरज नसून कल्पकतेची गरज असते. कधीकाळी लाखभर मुलांची परिक्षा घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेच्या माथी आज २८ लाख मुलांची परिक्षा घेण्याचे काम सोपवण्यात आलेले आहे. त्या परिक्षा घेण्यासाठी ज्या विविध गुणवत्ता आयोजकांपाशी हव्यात, त्याची पात्रता कोणी तपासली आहे काय? कुठल्याही सरकारी दफ़्तराचा कारभार जसा चालतो, त्याच पद्धतीने आपण मुलांना घडवण्याच्या व शिक्षणाच्या व्यवस्थेकडे बघत असतो. ही खरी समस्या आहे. मुलीच्या पदवी समारंभाच्या निमीत्ताने मी तेव्हा अमेरिकेला गेलेला होतो. त्या गजबजलेल्या सभागृहात स्थानिक मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ज्याचे नाव घेतले जाई, त्याचे आप्तस्वकीय गर्दीतून गजर करायचे. मला हे थोडे चमत्कारीक वाटले होते. सोहळा संपल्यावर माझी मुलगी व तिचे भारतीय सह्कारी यांच्याशी त्याच संदर्भात बोललो, तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. ही बहुतांश अमेरिकन मुले कशीबशी पदवीपर्यंत पोहोचली होती आणि त्यातली ९० टक्के पुढले शिक्षण घेणार नव्हती. ते इथपर्यंत पोहोचले तेच अमेरिकन समाजातील सामान्य कुटुंबांना मोठे वाटते. बरीचशी मुले शालेय शिक्षणाच्या पुढे मजल मारत नाहीत. अमेरिकन विद्यापीठात आज अर्ध्याहून अधिक विद्यार्थी परदेशी आहेत आणि स्थानिक मुलांची संख्या निम्मेही नाही. कारण तिथे प्रमाणपत्राला किंमत नसून गुणवत्ता व पात्रतेला प्राधान्य आहे. मग मुले आपल्या कुवतीनुसार वरचे शिक्षण घेतात, किंवा त्यांना कॉपी वगैरेची गरज भासत नाही. पेपरफ़ुटीचाही विषय येत नाही. मुलगी तिथे व मी भारतात असतानाही तिच्या परिक्षेची विचारपूस अन्य भारतीय पालकांप्रमाणे करीत होतो. प्रत्येक विषयाचे काय झाले वगैरे. त्याच चर्चेतून आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली आणि आपली परिक्षा पद्धती किती बोगस झाली आहे, त्याचाही साक्षात्कार झाला.

अशाच एका विषयाची परिक्षा होती आणि नेहमीप्रमाणे मी इथून फ़ोनवर विचारणा केली, तर मुलगी म्हणाली अजून पेपर झालेला नाही. मला गंमत वाटली. काही तास उलटून गेले व एव्हाना ही घरी आलेली असेल, तर पेपर झाला नाही म्हणजे काय? तर ती म्हणाली टेकहोम पेपर आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका तिला दिलेली होती आणि दोन दिवसात तिने जमेल तशी उत्तरपत्रिका लिहून जमा करायची होती. याचा अर्थ ती प्रश्नपत्रिका घरी आणुन वा विद्यापीठात बसूनही लिहायची मोकळीक होती, वेळेचे बंधन नव्हते. मी चपापलो. याचा अर्थ मुलांना खुलेआम पुस्तकातून कॉपी करायची मुभाच झाली ना? त्यावर मुलीने केलेला खुलासा डोके चक्रावून टाकणारा होता. तिची प्रश्नपत्रिका ज्या विषयावर होती, त्याची एकूण तेरा पुस्तके होती आणि सरासरी प्रत्येक पुस्तकाची पाने आठशे हजार होती. म्हणजेच प्रश्नाचे उतर कुठल्या पुस्तकात आहे व कुठल्या पानावर आहे, ते नुसते आठवण्यासाठीही किमान दहाबारा हजार पाने चाळलेली तरी असायला हवी. मी निरूत्तर झालो. असाच आणखी एक अनुभव आहे. एका विषयाच्या परिक्षेत तिला माहित असलेले उत्तरही ती चुकीचे लिहून आलेली होती. तर त्या प्राध्यापकाने नंतर वेळ काढून तिला गाठले आणि गप्पा मारताना सहज त्याच विषयाला हात घातला. तिच्या नकळत त्याने चुकलेल्या उत्तराविषयी तिची जाण तपासली आणि मग विचारले, तुला हे ठाऊक आहे, तर उत्तरप्रत्रिकेत चुकीचे उत्तर कशाला लिहीलेस? तिनेही मग प्राध्यापकाला आपण चुकीचे लिहीले ते घरी गेल्यावर लक्षात आल्याचे स्पष्टच सांगून टाकले. त्याने ‘नेव्हर माईंड’ म्हणून निरोप घेतला. पण निकाल आला तेव्हा त्याने त्याही प्रश्नाचे पुर्ण गुण तिला दिलेले होते. मुद्दा परिक्षेच्या वेळेत काय लिहीले असा नसून, विषय मुलांना किती समजला व आत्मसात झाला आहे, त्याची परिक्षा असायला हवी. नाहीतर ती नुसती प्रमाणपत्रांची लॉटरी होऊन जाते.

भारतीय शिक्षण व्यवस्था आता प्रमाणपत्रांची लॉटरी झालेली आहे. त्यात विद्यार्थ्याला काय समजले आहे वा त्याने विषय किती आत्मसात केलेला आहे, त्याची काही किंमत उरलेली नाही. एका पदवीचे प्रमाणपत्र मिळवण्याला प्राधान्य आलेले आहे. त्या विषयात वा क्षेत्रात त्याला कसलेही ज्ञान वा अनुभव असण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. अनुभव किंवा ज्ञानी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे फ़क्त शिक्षणाच्याच बाबतीत नाही. साहित्यिक, कलावंत, जाणकार किंवा शास्त्रज्ञ सुद्धा प्रमाणपत्रावर निश्चीत केला जात असतो. सहाजिकच परिक्षा व्यवस्था चालविणाराही प्रमाणपत्रधारी असला म्हणजे झाले. त्याला परिक्षा शिक्षण वा इतर तत्सम गोष्टींविषयी काहीही माहिती असण्याची गरज नाही. बिहार वा उत्तरप्रदेशातल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक जे विषय शिकवतात, त्यांनाच त्याचा थांगपत्ता नसतो, अशा बातम्या चित्रीत करून अनेक वाहिन्या नित्यनेमाने दाखवित असतात. मग त्यांची भरती कशी होते? कोण भरती करतो? कशाच्या आधाराने त्यांना शिक्षकाच्या जागी नेमले जाते? परिक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्याही बाबतीत चाललेले गोंधळ आपण अनेक वाहिन्यांवरून बघितलेले आहेत. इतके सर्वकाही चालत असेल, तर मुद्दा शिक्षण वा परिक्षेचा नसून केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचा होऊन जातो. ते प्रमाणपत्र कॉपी करून मिळवा किंवा खोटे बनवा, काय फ़रक पडणार आहे? आपल्या जागी अन्य कुणा हुशार विद्यार्थ्याला बसवूनही उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळवता येतो किंवा पदवी परिक्षा उत्तीर्ण होता येते. कारण महत्ता प्रमाणपत्राची आहे. बोगस रेशनकार्ड वा जातीचे खोटे प्रमाणपत्र चालत असेल, तर शिक्षणाच्या पात्रतेचे वा ज्ञानाचे प्रमाणपत्र तरी खरे असण्य़ाचा आग्रह कशाला? केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाच्या परिक्षेचा बोर्‍या वाजला, म्हणून जो गदारोळ चालला आहे, त्यात कुठे शिक्षण व्यवस्था आमुलाग्र सुधारण्याचा मुद्दा तरी आला आहे काय?

राजकारण्यांपासून माध्यमांपर्यत प्रत्येकाला कोणाला तरी आरोपी म्हणून पिंजर्‍यात उभे करण्यामध्ये रस आहे. कुणाचा तरी राजिनामा हवा आहे, किंवा कुणाला तरी गुन्हेगार म्हणून रंगेहाथ पकडल्याचे नाटक रंगवण्याची अतीव इच्छा आहे. पण जी व्यवस्था निकामी ठरलेली आहे, जिचे दुष्परिणाम दरवर्षी लाखो मुलांना भोगावे लागत आहेत, त्यात सुधारणा करण्याचा विषय आहे काय? शिक्षण हे नव्या पिढीला उत्तम माणूस व समाजोपयोगी नागरिक घडवण्याची एक उदात्त प्रक्रीया असल्याचे भान कुठेतरी दिसते आहे काय? प्रत्येकजण त्या रुग्णशय्येवर पडलेल्या शिक्षण व्यवस्था व परिक्षा यंत्रणेला आपल्या मतलबी नजरेने बघतो आहे. पण त्या मरणासन्न व्यवस्थेला जगवण्याची इच्छा कुणातही दिसत नाही. मुलांना आपल्या येऊ घातलेल्या वर्षाची वा नंतरच्या विविध प्रवेश परिक्षांची फ़िकीर आहे. अधिकार्‍यांना अंगावर उलटलेल्या भानगडीतून सुटण्याची चिंता आहे. सत्ताधार्‍यांना आलेले बालंट संपावे अशी काळजी आहे. विरोधकांना मुलांच्या तारांबळीत आपली मते वाढवून घेण्याची अपुर्व संधी दिसते आहे. माध्यमांना रसभरीत खतरनाक कथाकथनाची संधी सापडली आहे. मागल्या वर्षी असेच काही घडले आणि पुढल्या वर्षी असेच आणखी काही घडेल, याचे भान कोणालाही राहिलेले दिसत नाही. जगाच्या स्पर्धेत भारतातली कुठलीही शिक्षण संस्था पहिल्या शभर दोनशे क्रमांकात नसल्याची वेदनाही दिसत नाही. महिलांना घराच्या चौकटीतून बाहेर काढून शिकवायला पुढाकार घेणारे महात्मा फ़ुले व त्यासाठी आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे विस्मृतीत गेले आहेत. आता पालकांना ग्राहक बनवून त्यातून अब्जाधीश झालेले शिक्षणसम्राट उदयास आले आहेत. त्या देशात यापेक्षा अधिक सुटसुटीत शिक्षण व्यवस्था कुठून उभी राहू शकेल? बुडायला उतावळा झालेल्याला कोण वाचवू शकतो? लॉटरी सर्वांना लागत नसते. आपल्या देशातील शिक्षण प्रमाणपत्रांची लॉटरी झाली असेल, तर यातून सुटका आहे काय?


पुढारी ऑनलाईन  

३१ विरुद्ध ६९

mamta banarjee pawar के लिए इमेज परिणाम

मार्क ट्वेन या लेखक विचारवंताने म्हटले आहे, खोट्याचे तीन प्रकार असतात. एक असते साधे सरळ खोटे, दुसरे असते धडधडीत खोटे आणि तिसरे त्यापेक्षाही भयंकर म्हणजे आकडेवारी! याचा अर्थ असा, की आकड्यांच्या मदतीने लोकांच्या डोळ्यात धूळफ़ेक करणे खुप सोपे वा सहजसाध्य असते. अर्थात दुसर्‍यांची फ़सगत करण्यासाठी अशी लबाडी केली तरी समजू शकते. पण इतरांना उल्लू बनवण्यासाठी बोललेल्या खोट्यावर तुमचाच विश्वास बसू लागला, मग तुम्हाला अन्य कोणी फ़सवण्याची गरज उरत नाही. भारतातील बहुतांश विरोधी पक्षांची काहीशी तशीच स्थिती झाली आहे. मागल्या चार वर्षात त्यांना मोदी वा भाजपाला लोकसभेत स्वबळावर बहूमत प्राप्त झाले, हे सत्य स्विकारला आलेले नाही. मग ते खोटे पाडण्यासाठी ज्या खोट्यानाट्या कसरती चालू झाल्या, त्याला सामान्य मतदार अजिबात बळी पडलेला नाही. पण चार वर्षाच्या सलग खोटारडेपणाला आता खुद्द विरोधी पक्षच बळी पडू लागलेले दिसत आहेत. त्याचा पहिला बळी म्हणून आपण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांच्याकडे बघू शकतो. त्यांनी मोदींना पुढल्या वर्षीच्या लोकसभा निवडणूकीत निर्णायक पराभूत करण्याचा रामबाण उपाय शोधला आहे. त्यासाठी अशाच आकडेवारीचा आधार घेतला आहे. त्यांच्या मते मोदींनी लोकसभेत भले बहूमताने खासदार निवडून आणलेले असतील. पण प्रत्यक्षात भाजपाला फ़क्त ३१ टक्के मते मिळालेली होती. म्हणूनच पर्यायाने मोदींच्या विरोधात ६९ टक्के मतदारांनी कौल दिलेला होता. या ६९ टक्के मतदारांना भाजपा विरोधात एकास एक उमेदवार दिला, तर २०१९ सालच्या मतदानात मोदींची धुळधाण उडायला अजिबात हरकत नाही. मुद्दा इतकाच आहे, की खरोखरच मोदी विरोधात ६९ टक्के मते पडली होती काय? त्याचे उत्तर ममतांना वा कोणालाही शोधण्याची गरज वाटलेली नाही, की गणित तपासून बघण्याची इच्छा झालेली नाही.

फ़क्त शब्दाचा आधार घ्यायचा तर भाजपाला ३१ टक्केच मते मिळाली, हे कोणी नाकारू शकत नाही. पण त्याच समिकरणाची दुसरी बाजू दिशाभूल करणारी आहे. शंभरातून ३१ टक्के वजा केल्यावर ६९ टाक्के मते उरतात आणि ती सर्व भाजपाच्या विरोधात होती, ही शुद्ध बनवेगिरी आहे. कारण आणखी बारा टक्के मते अशी आहेत, जी भाजपाच्या मित्रपक्षांना मिळालेली आहेत आणि त्या मित्रपक्षांनी एनडीए म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली होती. किंबहूना त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपाने मतेही मागितली नव्हती, उलट अशा मित्रपक्षांच्या उमेदवारांचाही मोदींनीच प्रचार केलेला होता. सहाजिकच ६९ टक्के मते मोदी विरोधात असल्याची दिशाभूल प्रचारासाठी करायला अजिबात हरकत नाही. पण ती दिशाभूल करणार्‍यांनी आपल्याला ६९ टक्के मतांचा पाठींबा असल्याचे गृहीत धरणे, त्यांचीच फ़सवणूक होण्यासारखे आहे. मित्रपक्षांसह मोदींच्या एनडीएला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४३ टक्के होती. म्हणजेच मोदींना वा भाजपाच्या एनडीए आघाडीला मत नाकारणार्‍या तमाम मतदारांची टक्केवारी फ़ार तर ५७ टक्के इतकी होते. म्हणूनच या सर्वांनी एकत्र येऊन मोदी विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे समिकरण मांडायला हरकत नाही. ४३ विरुद्ध ५७ अशी लढत झाली, तर मोदी वा भाजपासह एनडीएला पुन्हा सत्तेत येणे केवळ अशक्य आहे. पण तितके प्रामाणिक गणित विरोधकांनी मांडायला हवे आणि त्यानुसार वाटचाल करायला हवी. अर्थात आजवरच्या इतिहासात इतकी स्पष्ट दुहेरी मतविभागणी कधीच झालेली नाही. अनेक लहानसहान प्रादेशिक पक्ष, अपक्ष व अन्य पक्षांचे बंडखोर मिळून निदान पाचसात टक्के मते खातच असतात. ती बाजूला केली तर एकजुट केलेल्या विरोधकांच्या खात्यात पन्नास टक्के मते येतात आणि तेवढीही भाजपाला धुळ चारण्यास पुरेशी नक्की आहेत.

याचा अर्थच भाजपाला पराभूत करण्यासाठी ममता वा सोनियांनी जे आघाडीचे गणित मांडले आहे, त्यात तथ्य जरूर आहे,. पण त्यातले गृहित मात्र फ़सवे आहे. त्यांच्या मागे येऊ शकणार्‍या मतांची टक्केवारी ६९ नसून फ़ार तर ५० टक्के असू शकते. तितकी मते मिळवायची आणि त्यासाठी सगळे मतभेद गुंडाळून ठेवायचे, असा निर्णय एकजुटीने तमाम प्रमुख विरोधी पक्ष घेऊ शकले, तर मोदीमुक्त आघाडीला यश मिळू शकेल. हे झाले अखिल भारतीय गणित. मात्र त्यात विरोधी एकजुट सहजगत्या होण्यासाठी त्यांचा एकमेव नेता नाही, किंवा त्यांच्यापाशी एकजीव संघटनाही नाही. जिल्हा तालुका पातळीपासून राज्य पातळीवर प्रत्येक पक्ष व नेत्यामध्ये असलेले व्यक्तीगत हेवेदावे, लक्षात घेतले; तर एकजूट किती जिकीरीचे काम आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. यासाठी आपली कामे सोडून दिल्लीत आलेल्या ममतांनी मिळेल त्या लहानसहान पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पण कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे त्यांनी साफ़ पाठ फ़िरवली होती. याचा अर्थच स्पष्टपणे त्यांनी राहुलचे नेतृत्व मोदी विरोधी आघाडी झाल्यास अमान्य असल्याचा संकेत दिलेला आहे. अशा आघाडीत कॉग्रेस किती मनमोकळेपणाने सामील होऊ शकते? नसेल तर मग विरोधातल्या पन्नास टक्के मतांची बेरीज कशी जुळणार आहे? कुठल्या कार्यक्रम व तत्वावर अशी आघाडी अस्तित्वात येऊ शकते? मोदी नको यावर सर्वांचे एकमत होऊ शकले, तरी मोदींच्या जागी कोण याविषयी नेते तितकी मते आहेत, त्याचे काय? पण तोही विषय बाजूला ठेवला, तरी समिकरणातल्या गृहीताचे करायचे काय? ज्यांना आपल्या बाजूला किती मते येऊ शकतात, त्याचाही अजून पत्ता नाही, ते कुठल्या गणितावर विजयाची स्वप्ने बघत आहेत? ही स्वत:ची केलेली फ़सगत नाही काय? यात नवे काहीच नाही. सहा वर्षापुर्वी अशीच एक धावपळ झालेली नव्हती का?

२०१२ सालात प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपती पदाची मुदत संपत आली होती आणि नव्या निवडीचे वेध लागलेले होते. तेव्हा ममता आजच्या मोदीविरोधा इतक्याच्या कॉग्रेस विरोधाने फ़डफ़डत होत्या. त्यांनी थेट राष्ट्रपती पदाचा विरोधी उमेदवार घोषित करण्यापर्यंत मजल मारलेली होती. मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने तेव्हा नुकताच उत्तरप्रदेश जिंकला होता आणि ममतांनी दिल्लीत येऊन मुलायमची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर येऊन राष्ट्रपती पदासाठी डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाची घोषणाच करून टाकलेली होती. इतके ठाम पाऊल उचलून ममता कोलकात्याला निघून गेल्या आणि मुलायमनी दोन दिवसातच आपण उमेदवार घोषित केला नसल्याचे स्पष्टीकरण देऊन टाकले. पुढे यथावकाश सोनियांनी प्रणबदा मुखर्जी यांना उमेदवार केले आणि ममताही त्यांना पाठींबा देऊन मोकळ्या झाल्या होत्या. दिड वर्षापुर्वी त्यांनी नोटाबंदीच्या विरोधात मोठी आघाडी उघडली होती आणि केजरीवालांसह दिल्लीच्या बाजारात जाहिरसभा घेऊन आंदोलन पुकारले होते. पुढे काय झाले? दोन वर्षापुर्वी त्यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावही आणलेला होता. पण संख्येअभावी तो दाखलही होऊ शकला नाही. ममतांचे हे सगळे प्रयत्न जोरदार सुरू होतात आणि शेवटी त्यांच्या हेकटपणावर येऊन त्याचे तारू फ़ुटत असल्याचा इतिहास ताजा आहे. याहीवेळी काही वेगळे होण्याची शक्यता नाही. उत्तेजित होऊन ममता कुठल्याही गोष्टी करायला पुढे सरसावतात, तेव्हा त्यांना वास्तवाचे भान सुटलेले असते. जेव्हा ते भान येते, तेव्हा त्या गायब होतात आणि भलत्याच गोष्टीचा बागुलबुवा करू लागतात. आताही मोदी ३१ टक्के मतांवर बहूमत मिळवून आल्याच्या समजूतीतून त्यांना बाहेर पडता आलेले नाही आणि आपल्याच सापळ्यात त्या दिवसेदिवस फ़सत चालल्या आहेत.

Sunday, April 1, 2018

अयोध्येतील मंदिराचा धसका?

rebel SC judges के लिए इमेज परिणाम

तीस वर्षापुर्वी अयोध्येतील बाबरी व रामजन्मभूमीचा वाद राजकीय बनला. पुढे ती भग्न मशिद पाडली गेली आणि तेव्हापासून तो राजकारणाचा गाभा बनून गेला आहे. आता तर भाजपाला त्या विषयाची राजकारणात गरजही उरलेली नाही. पण तथाकथित पुरोगाम्यांसाठी मंदिराचा विषय जीवनमरणाचा होऊन बसला आहे. ते मंदिर झाले आणि सुप्रिम कोर्टातला निर्णय मंदिराच्या बाजूने गेला, तर आयुष्यात हिंदूंची मते मागायला जागा उरणार नाही, असा आता पुरोगामी पक्षांनी धसका घेतला आहे. कारण आता त्यांचे विभाजनवादी राजकारण दोन्ही बाजूंनी कैचीत सापडले आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी हा अत्यंत लोकप्रिय नेता भाजपाचे नेतृत्व करतो आहे आणि त्याने चार वर्षात कुठलेही आरोप होऊ नयेत, असे सरकार चालवून आपली लोकप्रियता कायम राखलेली आहे. अशा वेळी २०१९ च्या लोकसभेची निवडणूक दार ठोठवत असून तिला सामोरे जाताना मोदींचे आव्हान पेलण्याची कुठल्याही पक्षात ताकद नाही. म्हणून मग कारस्थाने व डावपेच खेळून आपले अस्तित्व टिकवण्याची केविलवाणी लढाई विरोधक करताना दिसत आहेत. महागठबंधन म्हणजे सर्व विरोधकांची एकमेव आघाडी, किंवा बिगरकॉग्रेसची तिसरी आघाडी करण्याचे प्रयास जोरात सुरू झालेले आहेत. त्यावरही या लोकांचा विश्वास नाही, म्हणून मग मंदिर मशिदीचा मामला त्या बुडत्यांना काडीचा आधार वाटू लागला आहे. त्या विषयाचा सुप्रिम कोर्टात निकाल लागूच नये, म्हणून आटापिटा सुरू झाला आहे. याला आत्महत्येची धडपड असेच म्हणावे लागते. या आठवड्यातील राजधानी दिल्लीतल्या घटना त्याची साक्ष देणार्‍या होत्या. एका बाजूला आघाडीचे गणित जमवण्याचे प्रयास, तर दुसरीकडे देशाच्या सरन्यायाधीशाच्या विरोधात महाअभियोग आणायची कसरत, विरोधकांना अधिकच केविलवाणी करताना दिसू लागली आहे.

त्रिपुरातील भाजपाचा विजय आणि उत्तरप्रदेशातील भाजपाचा पोटनिवडणूकीतला पराभव, यांनी प्रादेशिक व लहानसहान पक्षांना नवी उभारी मिळाल्यासारखे वाटले होते. त्यामुळेच बंगालच्या ममता व तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी उभी करण्याचे मनसुबे रचले. त्यांच्यात गुफ़्तगु झाल्यावर ममता दिल्लीत दाखल झाल्या व त्यांनी विविध पक्षांशी विचारविनिमय सुरू केला. त्याच दरम्यान तेलगु देसम पक्षाने मोदींची साथ सोडली. मग विरोधकांना चेव आल्यास नवल नाही. पण इतके सर्व विरोधक एकत्र येऊन मोदी वा भाजपाला निवडणूकीत हरवू शकतील काय? विरोधकांच्या एकजुटीचा विपरीत धृवीकरणालाही लाभ होत असतो. म्हणजे असे की अमूक एका विरोधी पक्षाने दुसर्‍या कुठल्या पक्षाशी केलेली युती, त्याच्याच मतदाराला भावत नसते आणि तो तिसर्‍या पक्षाकडे वळतो. त्याचा लाभ त्या तिसर्‍या पक्षाला अनाहुतपणे मिळतो. हा तिसरा पक्ष म्हणजे अर्थातच ज्याच्या विरोधात महाआघाडी उभी केलेली असते, तोच असतो. ही विरोधकांची दुविधा आहे. उदाहरणार्थ बंगालात सगळे विरोधक एकत्र आले, तर त्यांच्या विरोधातील मतांसाठी फ़क्त भाजपा एवढाच पर्याय शिल्लक रहातो आणि तीच ममता वा तत्सम लोकांची डोकेदुखी आहे. मग परिणाम असा होतो, की कॉग्रेसला वगळून आघाडी करावी. हे सगळे पर्याय वापरूनही मोदींना पराभूत करण्याविषयी आज बहुतांश विरोधकांना आत्मविश्वास नाही. मोदी त्यावर मात करतील आणि त्यात अयोध्येतील मंदिराच्या बाबतीत कोर्टाने पुरक कौल दिला, तर असलेली हिंदू मतेही पुरोगाम्यांच्या विरोधात जातील, ही कॉग्रेसला भेडसावणारी चिंता आहे. म्हणून सुप्रिम कोर्टात त्या खटल्याची सुनावणीच होऊ नये यासाठी कॉग्रेस धडपडते आहे. तसे नसते तर कॉग्रेसचे माजी मंत्री व प्रसिद्ध वकील कपील सिब्बल यांनी २०१९ निवडणूकीपुर्वी या खटल्याची सुनावणी होऊ नये, अशी मागणी केलीच नसती.

काही महिन्यांपुर्वी सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठासमोर अयोध्या विषयाची सुनावणी सुरू झाली आहे. ती सलग करून विनाविलंब विषय निकालात काढावा, असे ठरलेले आहे. तर त्यात सुन्नी मुस्लिमांच्या संस्थेतर्फ़े युक्तीवाद करताना सिब्बल यांनी ह्या निकालाचा राजकीय परिणाम संभवत असल्याने लोकसभा निवडणूकीपुर्वी ही सुनावणी होऊच नये व झाल्यास आपण तिच्यावर बहिष्कार घालू; असे सांगितले होते. ती मागणी कोर्टाने धुडजावून लावली व सुन्नी बोर्डानेही सिब्बल आपला राजकीय अजेंडा खटल्यात घुसवित असल्याचा आरोप केला होता. त्यातून सत्य समोर आलेले आहे. सुन्नी मुस्लिम बोर्ड वा मुस्लिम धर्मियांपेक्षाही कॉग्रेसला हा वाद चिघळत ठेवायचा आहे. किंबहूना यापुर्वी जे मुद्दे वा पुरावे दडपून ठेवलेले आहेत, ते सरकारी बाजूने समोर आणले गेले, तर निकाल मंदिराच्या बाजून जाण्याची शक्यता कॉग्रेस पक्षाला भेडसावते आहे. अन्यथा त्याने खटल्याच्या सुनावणीत मोडता घालण्याची काहीही गरज नव्हती. तो विषय कोर्टात फ़ेटाळला गेला, तेव्हा एक नवीच मागणी पुढे आली. त्यात सरन्यायाधीशांनी खटल्याचे वितरण वाटप करू नये. महत्वाचे विषय ज्येष्ठ न्यायाधीशांसमोरच आले पाहिजेत, असा आग्रह धरला गेला. त्यातही नेमका अयोध्येचा विषय असावा, याला योगायोग मानता येणार नाही. जेव्हा त्यालाही कोणी धुप घातली नाही, तेव्हा आता थेट सरन्यायाधीशांनाच आपले राजकीय लक्ष्य बनवण्याचा घाट घातला गेला आहे. त्यात सरन्यायाधीशांच्या विरोधात महाअभियोग चालवण्याच्या हालचाली कॉग्रेसने आरंभलेल्या आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविषयी अनेक तक्रारी असू शकतात आणि आक्षेपही घेतले जाऊ शकतात. त्यांच्याच सहकार्‍यांनी ते घेतलेले आहेत. पण त्यावेळी कॉग्रेस चिडीचुप गप्प बसली होती. आता काही काळ लोटल्यावर तेच मुद्दे पुढे करून कॉग्रेसने महाअभियोगाचे नाटक आरंभले आहे.

हा महाअभियोग काय असतो? सर्वोच्च वा उच्च न्यायालयात नेमलेल्या न्यायाधीशांना बाजूला करण्याचा कुठलाही अधिकार सरकारला सोपवलेला नाही. त्यांच्या नेमणूका सरकार करीत असले तरी त्यांना दबावमुक्त काम करत यावे, म्हणून त्यांची बदली वा हाकालपट्टी हे अधिकार सरकारकडून काढून घेण्यात आलेले आहेत. पण यामुळे न्यायाधीशही मोकाट होऊ शकतात. सहाजिकच त्यांना रुळावर ठेवण्यासाठी काही सोय हवी, म्हणून महाअभियोगाची कल्पना ठेवलेली आहे. त्यानुसार अशा घटनात्मक पदावरील व्यक्तीला हटवण्यासाठी महाअभियोग संसदेत आणला जाऊ शकतो. पण अविश्वास प्रस्तावासारखा पोरखेळ होऊ नये म्हणून काटेकोर नियम केलेले आहेत. त्यानुसार लोकसभेतील शंभर व राज्यसभेतील पन्नास सदस्यांच्या सहीने अध्यक्षांना प्रस्ताव द्यावा लागतो. त्यात सदरहू पदाधिकार्‍याच्या विरोधातील गंभीर आरोपांची जंत्री देणे आवश्यक असते. तो प्रस्ताव पीठासीन अधिकार्‍याने स्विकारला तर त्यावर चर्चा होऊन हटवण्याची प्रक्रीया होऊ शकते. याहीपुर्वी असे प्रयत्न झाले असले तरी कोणालाही त्या मार्गाने हटवण्याचा इतिहास नाही. ज्यांच्या बाबतीत तसे महाअभियोगाचे प्रस्ताव आले, त्यांनी तत्पुर्वीच राजिनामे दिल्याने हे प्रस्ताव पुढे सरकू शकले नव्हते. पण त्या प्रत्येकवेळी कुठल्या राजकीय हेतून तसे प्रस्ताव आणायचा प्रयत्न झाला नव्हता. आज मात्र यातला राजकीय मतलब लपून राहिलेला नाही. अतिशय महत्वाच्या खटल्यांची सुनावणी दीपक मिश्रांच्या खंडपीठासमोर चालू असून, त्यात दबाव आणण्य़ासाठीच हे प्रस्ताव बनवले जात आहेत. त्यातला हेतू लपून राहिलेला नसल्याने अनेक विरोधकांनी व पक्षांनी, कॉग्रेस्ला त्यात साथ देण्याचे साफ़ नाकारले आहे. त्यामुळे मुळात पुरेशा सदस्यांच्या सहीअभावी प्रस्ताव सादर होण्यात अडचण आहे आणि तो संमत होणार नाही, याचीही पुर्ण खात्री आहे. मग हा उपदव्याप कशासाठी चालला आहे?

महाअभियोगाचा प्रस्ताव स्विकारला गेला तर संसदेत त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र तो प्रस्ताव संमत करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रत्येक सभागृहात दोन तृतियांश मते प्रस्तावाच्या बाजूने पडावी लागतात. लोकसभेत तमाम विरोधक एकवटले तरी एकतॄतियांश मते होत नाहीत. म्हणजे तिथे वा राज्यसभेतही हा प्रस्ताव संमत होण्याची तीळमात्र शक्यता नाही. मुळात प्रस्ताव संमत होण्याची गोष्ट दूर आहे. ह्या प्रस्तावाला सादर करण्यासाठी आवश्यक तितक्या सदस्यांचाही पाठींबा मिळवताना कॉग्रेसच्या नाकी दम आलेला आहे. मग प्रश्न असा पडतो, की हमखास नाकारल्या जाणार्‍या प्रस्तावाचे सुतोवाच करून कॉग्रेस कुठला हेतू साध्य करून घेऊ बघत असेल? राजकीय आत्महत्या यापेक्षा त्या प्रश्नाचे अन्य कुठलेही उत्तर असू शकत नाही. आधीच आपल्या हातून लोकमत निसटले आहे, ते पुन्हा मिळवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज असते. लबाडी वा कारस्थानाने विध्वंस नक्की करता येतो. पण त्यातून जनमानसाचा विश्वास संपादन करता येत नाही. इथेच कॉग्रेसचे गाडे येऊन फ़सलेले आहे. बाकीचे लहानमोठे विरोधी पक्ष कॉग्रेसच्या मागून फ़रफ़टताना आपले अस्तित्व आणखी धोक्यात आणत आहेत. कारण असल्या खेळी लोकमत मिळवून देत नसतात. माध्यमातून त्याचा गाजवाजा जरूर होतो, पण तो जनमत जिंकून देण्यासाठी उपयुक्त नसतो. लोकभावना पायादळी तुडवण्यातून काय साध्य होऊ शकते? सत्तेत आल्यापासून वा मागली लोकसभा निवडणूक लढवत असतानाही मोदींनी एकदाही अयोध्येतील मंदिराचे राजकारण केलेले नाही. त्यांच्यावर तसे आरोप होऊनही त्यांनी तसा कुठलाही प्रचार केला नाही. पण विरोधकांच्या आततायीपणाने असे वादग्रस्त विषय न्यायालयाच्या कक्षेत आणुन कायदेशीर उत्तर मिळण्यास मोदींनी हातभार लावला आहे. त्यातून मग कॉग्रेससह विरोधक अधिकच सैरभैर झाले आहेत.

मोदींना राजकीय मार्गाने वा प्रशासकीय डावपेचांनी पराभूत करता येत नसेल, तर लोकशाही संस्था व प्रणालीलाही सुरूंग लावण्यापर्यंत विरोधकांची दिवाळखोरी चाललेली आहे. त्याचा एक भाग म्हणून मग अश तमाम घटनात्मक संस्था व संघटनांवरही राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत. भारतीय सेनादल वा निवडणूक आयोगावरही असे हल्ले अलिकडल्या काळात झालेले आहेत. संसदेचे कामकाज चालवू द्यायचे नाही, हा नेहमीचाच भाग झाला आहे. आता लोकांची शेवटची आशा असलेली न्यायव्यवस्था उध्वस्त करण्याची खेळी सुरू झालेली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना लक्ष्य करण्यातून त्यांच्याविषयी जनमानसात शंका व संशय निर्माण करण्याचा डाव खेळला जात आहे. कारण दीपक मिश्रा यांच्या ठामपणामुळे बाहेर राजकारण व कोर्टात कायद्याचा बुरखा पांघरणार्‍यांची कोंडी झालेली आहे. ठराविक न्यायपीठासमोर जायचे आणि आपल्याला हवा तसा कौल मिळवायचा, हे आजवर चाललेले नाटक मिश्रांच्या वागण्याने संपुष्टात आलेले आहे. नामवंत वकील आपले अर्ज कुठल्या न्यायाधीशापुढे यावे, इथपासून फ़िक्सीग करीत होते आणि त्यालाच मिश्रांनी सुरूंग लावलेला आहे. तिथे गफ़लत झाली आहे. तोच खरा आक्षेप आहे. म्हणून मागण्या काय आहेत? तर आजवर मुख्य न्यायाधीशाकडे असलेला खटले वाटण्याचा अधिकार काढून घ्या. आजवर ती मागणी कशाला नव्हती? तर आजपर्यंत मनासारखे निकाल मिळत होते. अनेक ख्यातनाम व ‘स्वयंसेवी’ वकिलांच्या विरोधात निकाल जाऊ लागल्यामुळे आता स्वयंभू न्यायालयालाच बदनाम करण्याचा घाट घातला गेला आहे. न्या. मिश्रांना असे दबावाखाली आणण्यासाठीच मग महाअभियोगाचे नाटक आरंभण्यात आले आहे. तो डाव यशस्वी होणार नाही, याची खात्री आहे,. पण दरम्यान न्यायाधीशाला यथेच्छ टिकेतून बदनाम करून घेण्य़ाचा खरा हेतू आहे. त्याला दबावाखाली आणायचा डाव आहे.

हा डाव अजिबात यशस्वी होणार नाही की त्याचा कुठलाही राजकीय लाभही कॉग्रेसला मिळणार नाही. उलट त्याचे दुष्परिणाम कॉग्रेससहीत विविध पुरोगामी पक्षांनाच भोगावे लागणार आहेत. त्रिपुरा हे त्याचे उत्तर आहे. हिंदू समाजाला दाबून ठेवण्याची प्रतिक्रीया २०१४ मध्ये अनेक राज्यात उमटली आणि आता त्रिपुरातही उमटलेली आहे. त्यामुळे तशा राजकारणाला आजवर सोकावलेल्यांचा धीर सुटला आहे. ममता म्हणून भयभीत झाल्या आहेत. त्यांच्यापाशी बंगालमध्ये प्रचंड बहूमत आहे आणि विधानसभा तीन वर्षे दुर आहे. पण वर्षभरात व्हायच्या लोकसभेत आपल्या जागा टिकतील वा नाही, अशा भितीने ममता बेचैन झाल्या आहेत. पुरोगामित्वाच्या नावाने इस्लामी जिहादी लांगुलचालन करणार्‍या पक्षांचा म्हणूनच धीर सुटत चालला आहे. त्यातच अयोध्येतील मंदिराचा कौल हिंदूंच्या बाजूने गेला, तर मुस्लिमही पुरोगामी पक्षांना लाथाडतील ही खरी भिती आहे. त्यातून मग ही आत्मघाती प्रवृत्ती बळावली आहे. सूडाला पेटलेला माणूस जसा आत्मघात करूनही दुष्मनाचे नुकसान करायला पुढे सरसावतो, तशी ही मनोवस्था आहे. सत्तर वर्षात आपणच ज्या लोकशाही संस्था व व्यवस्था उभ्या केल्या असे कॉग्रेस अभिमानाने सांगते, त्याच संस्थांचा विध्वंस करण्याचे डाव आज कॉगेसच खेळताना दिसत नाही काय? मुठभर मुस्लिम मतांवर कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळू शकणार नाही. त्यापेक्षा बहुसंख्य जनतेत जाऊन तिचा विश्वास नव्याने संपादन करणे, इतकाच मार्ग उपलब्ध आहे. मोदी हा विषय दुय्यम असून पुरोगामी व कॉग्रेसने हिंदू समाजाचा गमावलेला विश्वास त्यांच्या आजच्या दुर्दशेचे खरे कारण आहे. आपले धर्मनिरपेक्ष असणे व नि:पक्षपाती वागणे जनतेच्या अनुभवास येण्यातून त्या पक्षांना लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. नुसतेच मोदींना हरवण्याचे बेत कारस्थान वा डावपेच कामाचे नाहीत. राहुल गांधींनी मंदिराच्या वार्‍या करून तो विश्वास पुर्ववत होऊ शकणार नाही.

सत्याग्रहाची विटंबना

संबंधित इमेज

साडेतीन वर्षापुर्वी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक खुप अटीतटीची व नाट्यमय झालेली होती. तेव्हा तीन आठवडे मतदानाला बाकी असताना महाराष्ट्रातील दोन्ही दिर्घकालीन राजकीय आघाड्या अकस्मात एके दिवशी मोडीत निघाल्या होत्या. सहाजिकच विधानसभेची निवडणूक चौरंगी झाली आणि त्रिशंकू विधानसभा निवडून आली होती. तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने अल्पमताचे सरकार स्थापन केले आणि विधानसभेत आवाजी बहूमतही सिद्ध केले. तो तमाशा आज अनेकजण विसरून गेले आहेत. शिवसेनेला सोबत न घेतलेले ते सरकार कोणी धोक्यात आणले, त्याचेही आज कोणाला स्मरण राहिलेले नाही. जेव्हा त्या बहूमत सिद्ध करण्यावरून वाद सुरू झाला, तेव्हा शिवसेना ओरडत राहिली व माध्यमेही चर्चा करत राहिली. पण त्या घटनात्मक व कायदेशीर गफ़लतीला सरळ करण्याची चतुराई एका राजकीय नेत्याने दाखवली होती आणि त्याचे नाव होते प्रकाश आंबेडकर! आवाजी मतदान व प्रत्यक्ष बहूमताची विधानसभेत गणतीही झाली नाही, त्याला आंबेडकरांनी हायकोर्टात आव्हान दिले होते आणि त्याची सुनावणी सुरू झाल्यावर भाजपाचे अवसान गळाले होते. धावपळ करून देवेंद्र फ़डणवीस यांनी शिवसेनेची समजूत काढली व तिला सरकारमध्ये सहभागी करून घेतले. त्याच्या परिणामी त्या सरकारवर आलेले गंडांतर टळले होते. म्हणजेच अशा प्रसंगी काय करावे, त्याची जाण असलेला प्रकाश आंबेडकर हा नेता आहे, याविषयी कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. मग त्याही वेळी आंबेडकर यांनी मोर्चा काढून राज्यपालांना जाब कशाला विचारला नव्हता? मुख्यमंत्र्यांचा राजिमाना मागण्यासाठी मोर्चा कशाला काढलेला नव्हता? भिडे गुरूजी यांच्या अटकेसाठी मोर्चा काढणारे तेच गृहस्थ आज मोर्चाचे नाटक कशाला करीत आहेत? त्याचे उत्तर स्वच्छ व साफ़ आहे. आपली मागणी गैरलागू व बेकायदा आहे, याचे त्यांनाही पक्के भान आहे.

मोठी लोकसंख्या जमवून व मोर्च्याच्या दबावातून आपल्या गैरलागू मागण्य़ा पुढे रेटण्याचे हे राजकारण कोण करीत आहेत? भिडे गुरूजी यांना गुन्ह्यासाठी अटक करायची असेल, तर त्यांच्या विरोधात पुरावे आवश्यक असतात आणि तसे पुरावे असतील तर मोर्चे काढण्याची अजिबात गरज नाही. पुरावे घेऊन कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागितली तरी सरकारला नाक मुठीत धरून अटकेची पावले उचलावी लागू शकतात. पण आपल्यापाशी गुरूंजींच्या विरोधात पुरावे नाहीत आणि अन्य कोणकडेही पुरावे नाहीत, याची आंबेडकरांना पक्की जाणिव आहे. त्यामुळे त्यांना गैरलागू मार्गाने भिडे गुरूजींना आरोपी बनवायचे आहे आणि एकदा अटक झाली, मग सातत्याने आरोपी म्हणून गुरूजींना बदनाम कराय़चे आहे. हेच साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित यांच्या बाबतीत झाले. नऊ वर्षापुर्वी मालेगावच्या बॉम्बस्फ़ोट प्रकरणासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नसताना त्यांना नऊ वर्षे तुरूंगात जामिनाशिवाय सडवण्यात आले. त्यासाठी आधी घातपाताचे आरोप लावून अटक झाली आणि ठराविक मुदतीनंतर जामिन देण्याची नामुष्की येण्याआधी त्यांना मोक्का लावण्यात आला. हा कायदा लावला, मग वर्षभर तरी जामिनही मागण्याची तरतुद रद्द होते. पुढे एकामागून एक जुन्या नव्या आरोपात त्यांना गोवण्याचा सपाटा लावला गेला आणि नऊ वर्षे उलटून गेली, तरी कुठल्याही खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. ही आहे पुरोगामी संविधानवादी लबाडी. त्यात कायद्याचे आडोसे व वळणे घेत निरपराधला गुंतवायचा खेळ चालतो. कुठल्याही पुराव्याखेरीज कोणालाही तुरूंगात सडवण्याची एक शैली तयार झालेली आहे. सुप्रिम कोर्टाने गेल्या ऑगस्ट महिन्यात पुरोहितांना जामिन देताना त्याचा स्वच्छ उल्लेख केलेला आहे. तो प्रकाश आंबेडकर वा तत्सम लोकांना उमजत नाही, असे अजिबात नाही. म्हणून मग मोर्चाची नाटके रंगवली जात असतात.

आजकाल म्हणजे मागल्या दोनतीन वर्षात संविधान बचाव नावाचे एक नाटक चालू असते. त्यात देशाच्या संविधानाला धोका असल्याच्या आरोळ्या सातत्याने ठोकल्या जात असतात. मजेची गोष्ट म्हणजे त्यात पुढाकार घेणार्‍या कोणालाही संविधान, म्हणजे घटनात्मकतेची किंचीतही फ़िकीर नसते. उदाहरणार्थ घटनेच्या पायावर देशात निवडणूका झाल्या आहेत व होत आलेल्या आहेत. पण त्याच घटनात्मक मार्गाने सत्तेत आलेल्या मोदी सरकारला मागल्या चार वर्षात कोणी लोकसभेत कामकाज करू दिलेले नाही? लोकसभा वा राज्यसभा हे संविधानाने जनतेच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिलेले देशातील सर्वात उच्च व्यासपीठ आहे. तिथे जनतेच्या प्रश्नांची आणि विषयांची चर्चा उहापोह व्हावा, अशीच घटनेची योजना आहे. पण गेल्या चार वर्षात तिथे कुठल्याही चर्चेत सातत्याने व्यत्यय आणला गेलेला आहे आणि गोंधळ घातला गेला आहे, तो गोंधळ घालणार्‍यांचा भरणा संसदेच्या बाहेर संविधान बचाव मेळाव्यात व मिरवणूक मोर्चामध्ये दिसेल. संसदेचे कामकाज चालवण्यात व्यत्यय आणण्याला संविधानाची पायमल्ली नाही तर काय म्हणता येईल? ते संविधान संसदेत पायदळी तुडवणारेच आपल्याला संविधानवादी म्हणवून घेत असतात. कुठल्याही घटनात्मक तरतुदी व नियमांना झुगारण्यात अशाच लोकांचा पुढाकार असतो. म्हणजेच त्याच लोकांनी संविधान व त्यातून उभी राहिलेली व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. मात्र त्यांच्या मागण्या बघितल्या तर त्या चमत्कारीक वाटतील. घटनात्मक मार्गाने सत्तेत आलेल्या राज्यकर्त्याला कुठलाही निर्णय घेण्यात वा राबवण्यात व्यत्यय आणणे, ही या लोकांसाठी संविधानाची प्रतिष्ठा होऊन बसली आहे. संविधानाने ज्या पोलिसांना, प्रशासनाला व राज्यकर्त्यांना कायद्याचे राज्य राबवण्याचा अधिकार दिला आहे, त्यांच्यावर कुरघोडी करण्याच्या कारवाया सातत्याने चाललेल्या असतात.

मागली चार वर्षे कुठे मागमूस नसलेले अण्णा हजारे यांना अकस्मात लोकपाल अजून नेमला गेला नसल्याची आठवण झालेली आहे. त्यांनी लोकपाल व स्वामिनाथन आयोगाच्या शिफ़ारशी लागू करण्यासाठी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. अण्णा स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेतात. पण सत्याग्रही असूनही त्यांनी कधी गांधींचे अनुकरण केलेले नाही. गांधीजी उपोषणाला बसायचे, तेव्हा शक्यतो मौन पाळायचे. उलट अण्णा उपोषणाला बसल्यावरच मुलाखतींचे फ़ड जमवत असतात. महात्माजींच्या उपोषणापेक्षाही त्यांच्या मौनाला ब्रिटीश सत्ता वचकून होती. उपोषणातले बापू दोन शब्द बोलले तरी भडका उडेल, याची ब्रिटीश सत्तेला चिंता असायची. उलट अण्णांना प्रसिद्धीचा मोह आवरत नाही. लोकशाहीने प्रस्थापित सरकार अन्यायकारक असेल, तर उलथून पाडण्यासाठी सामान्य जनतेला मताचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. अण्णांच्या मागल्या उपोषणानंतर जनतेने तोच वापरून सत्तापालट करून दाखवला आहे. इतकीच खुमखुमी होती तर अण्णांनी तेव्हा आपला कार्यक्रम लोकांसमोर मांडून लोकमताचा कौल घ्यायला पाहिजे होता. मोदी सरकार निवडून आले आणि आठ निवडणूकांच्या नंतर जनतेने प्रथमच बहूमताने एक पक्षाला सत्ता बहाल केली. त्याने अपेक्षाभंग केला असे अण्णांना वाटत असेल, तर आगामी निवडणूकीत त्यांनी हे सरकार जमिनदोस्त करण्याचा निर्धार करावा आणि राजकीय आंदोलन छेडावे. अपेक्षा एकट्या अण्णांच्याच नसतात. लोकशाहीत लाखो लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि प्रत्येकाची प्रत्येक अपेक्षा पुर्ण करता येत नसते. सरकार लोकपाल नेमत नसेल वा स्वामिनाथन शिफ़ारशी अंमलात आणत नसेल, तर कोर्टात जाण्याचा मार्गही खुला आहे. संविधानाने दोन मार्ग दिलेले आहेत. मग अण्णा त्यातला एकही उपाय करायला पुढे कशाला येत नाहीत?

उपोषणाच्या धमक्या द्यायच्या किंवा वजन घटल्याचे इशारे देऊन सरकारला दमदाटी करायची, हा नेहमीचा खेळ झालेला आहे. पण संविधानाने जो मार्ग उपलब्ध करून दिला आहे, त्याचा मात्र उपमर्द चाललेला असतो. आजही अण्णांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. कुठल्याही राजकीय पक्ष वा नेत्याला मंचावर येऊ देणार नाही. यासारखा विनोद नाही. सगळ्या मागण्या राजकीय असताना राजकीय नेत्यांनाच झिडकारून लावायची काय गरज आहे? त्यापैकी जे कोणी तुमच्या मदतीला येत असतील त्यांना आंदोलन पुढे नेण्यासाठी सोबत घेण्यात काय अडचण आहे? बदल राजकीय हवा तर राजकारणाला गुन्हा समजून कसे चालेल? लोकशाहीत व घटनात्मक राज्यामध्ये राजकीय नेते व पक्ष अपरिहार्य असतात. त्यांना गुन्हेगार ठरवुन अण्णांना महात्म्याचा आव आणता येईल. पण कुठलाही प्रश्न सुटणार नाही. किंबहूना त्यातून संविधान व घटनात्मकतेचाच लोकांना कंटाळा येईल. कारण हे मोर्चे व उपोषणे दिवसेदिवस पोरकट व हास्यास्पद होत चालली आहेत. त्यातून मोठ्या शहरातील मोठ्या संख्येचे जनजीवन ओलिस ठेवण्याचा खेळ चालत असतो. आज शेतकरी मोर्चाला पाठींबा देणारे उद्या सत्तेत आल्यावर त्यांच्या मागण्यांकडे पाठ फ़िरवतात आणि काल ज्यांनी पाठ फ़िरवली, तेच आज शेतकर्‍यांचे कैवारी असल्यासारखी नाटके रंगवतात. हे सामान्य माणसाच्या लक्षात आलेले नाही, असे कोणाला वाटते काय? आपल्या राजकीय व अधिकाराच्या मर्यादा ओळखून कोणी राज्यकर्ता वागत असेल, तर अशा हंगामी तारणहारांवर लोक विश्वास ठेवायचे बंद होतात. अण्णांच्या उपोषणाचे ते़च होऊन बसले आहे. आंबेडकरांच्या अटकेच्या मागणीला म्हणून सरकारने दाद दिलेली नाही, की शेतकरी मोर्चाने कितीही पायपीट करूनही काही पदरात पडलेले नाही. असल्या दिखावू आंदोलने व चळवळींनी लोकशाही व संविधान दुबळे व निष्प्रभ करून टाकलेले आहे. ती सत्याग्रहाचीच विटंबना होऊन गेली आहे.

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणे वा विविध अशा मार्गाने सरकारवर घटनाबाह्य कृतीसाठी दडपण आणण्याचे उद्योग देशातील संवैधनिक व्यवस्थेला सुरूंग लावण्याचे प्रकार आहेत. सत्याग्रह करून वा मोर्चे काढून आपल्या अपेक्षा मागण्यांच्या रुपाने समोर आणण्यापर्यंत लोकशाहीच्या घटनात्मक मर्यादा संपत असतात. त्याच्या पुढे जाऊन आजच अमूक मागण्या मन्य झाल्या पाहिजेत आणि अमूक मुदतीत तमूक झाले पाहिजे, ह्याला अराजक म्हणतात. अमूक एक इतकी रक्कम आणून दिली नाही, तर तुमची मुले पत्नी वा कुटुंब सुखरूप रहाणार नाही, अशा धमक्या देणार्‍या खंडणीखोर वा गुन्हेगारांपेक्षा ही आंदोलने कितीशी वेगळी उरली आहेत? प्रकाश आंबेडकर आठ दिवसात भिडे गुरूजींना अटक झाली पाहिजे, अन्यथा होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार असेल, अशी धमकी देतात. त्याचा अर्थ वेगळा होतो काय? कुणाचे अपहरण करून खंडणी मागणारा परिणामांना कुटुंबीयच जबाबदार असल्याचे इशारे देत नसतो काय? जर त्यातली कृती धमकावणार्‍याचे अनुयायी वा साथीदार करणार असतील, तर त्यात सरकार वा पोलिस कसे जबाबदार असू शकतात? ही कुठली घटनात्मक व्यवस्था वा तरतुद आहे? सत्याग्रहाचे जनक महात्मा गांधीही लोकांना आंदोलनासाठी मैदानात आणत होते आणि त्यात अनुयायांकडून हिंसाचार झाला, तर जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे नाही. ते जबाबदारी पत्करून आत्मक्लेश सहन करायचे. आंदोलन तिथेच थांबवायचे. आज ज्याप्रकारे आंदोलनाचे नेते इशारे व धमक्या देतात, ती महात्माजींची व सत्याग्रहाची विटंबना नाही काय? विध्वंस होईल, हिंसाचार माजेल आणि तशी वेळ आली तर जबाबदार मात्र इशारे देणारे नसतील, हा कुठला सत्याग्रह आहे? बेजबाबदारपणा म्हणजे घटनात्मकता हा कुठला नवा शोध आहे?

कुठल्याही सरकार सत्ताधार्‍याला संविधानाने काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. घटनात्मक मर्यादेत कुठलाही कायदा नियम बनवता येतो, त्यानुसारच कायद्याचे राज्य चालवावे लागते. जे सरकार त्या मर्यादा ओलांडत असेल, त्याला न्यायालयीन वा निवडणूकीच्या मार्गाने रोखण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. त्याचे जर सरकार उल्लंघन करीत नसेल, तर इतरही कोणाला त्याचे उल्लंघन करता येणार नाही. मग तो जिहादी असो, नक्षली असो वा आंदोलनवादी असो. पण अलिकडल्या काळात त्याला काही धरबंद राहिलेला नाही. शब्द कुठलेही बोलले जातात आणि त्याचे कसलेही अर्थ सांगितले जातात. चार वर्षे लोकपाल नेमला गेला नाही, तर सुप्रिम कोर्टात दाद मागण्यापासून अण्णांना कोणी रोखलेले नव्हते. पण अण्णांना कायदेशीर मार्गापेक्षाही आपल्या उपोषणाचे हत्यार उपसून दमदाटी करण्यातच प्रामुख्याने रस आहे. आंबेडकरांना रस्त्यावर उतरून हिंसा वा विध्वंसाची धमकी देण्यात घटनात्मकता आढळली आहे. मग नक्षली वा जिहादींना तरी घातपाती कशाला म्हणायचे? तेही आपल्या कुठल्याही कृतीचे वा विध्वंसाचे खापर सरकारच्या माथी फ़ोडून मोकळे होऊ शकतात. तेही आपल्याला गोळ्या घालणार्‍या सैनिक वा पोलिसांना अमूक वेळेत अटक करण्याच्या अटी घालू शकतात. सरकार वा कायदे घटना हवीच कशाला? जो रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी आणू शकेल वा अधिकाधिक विध्वंसाची तयारी दाखवू शकेल, त्याचेच राज्य होणार ना? आंबेडकरांच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात भिडे गुरूजींच्या समर्थकांनीही मोठे मोर्चे काढले. मग त्यांनी आंबेडकरांना अटक करण्याची मागणी केली असेल, तर फ़डणवीस सरकारने कुणाची मागणी मान्य करावी? बळी तो कानपिळी हाच कायदा व तेच संविधान झाले ना? लाखा लाखाचे भव्य शिस्तबद्ध मोर्चे काढलेल्या मराठा जनसमुदायाने कधी अशा धमक्या दिल्या नाहीत, की अटी मुदती घातल्या नाहीत. त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. अण्णांनी आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा. अन्यथा ती लोकसंख्या मैदानात उतरली तर घटना वा कायदाही असल्या चळवळ्यांना वाचवू शकणार नाही.