
२३ मे २०१९ रोजी सतराव्या लोकसभेचे निकाल लागले आणि राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेऊन पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा सादर केला. पण ज्यांना त्यांनी राजिनामा दिला, त्यापैकी कोणाचीही तो राजिनामा स्विकारण्याची हिंमत नव्हती, की त्यांच्यात तितकी कुवत नव्हती. म्हणून दोन महिने उलटून गेले तरी त्यावर पुढला काही निर्णय होऊ शकला नाही. खरेतर निवडणूकांचे मतदान संपण्यापुर्वीच राहुल गांधी रणमैदान सोडून पळालेले होते. मतदानाच्या चार फ़ेर्या पुर्ण झाल्या होत्या आणि पाचवी फ़ेरी होत असताना, राहुल गांधींनी युद्ध संपल्याची एकतर्फ़ी घोषणा ट्वीटरवर केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुलचे पिताजी राजीव गांधी यांच्या बोफ़ोर्स प्रकरणाची आठवण करून दिली आणि राहुलनी हत्यार ठेवलेले होते. आपल्या पित्याच्या पापकर्माचे स्मरण करून देणे, म्हणजेच मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली असा दावा करून राहुलनी शापवाणी उच्चारली होती. ५ मे रोजी ट्वीटरवर राहुल म्हणतात, ‘युद्ध संपले आहे आणि तुमचे कर्म तुमची प्रतिक्षा करते आहे. त्यापासून माझ्या पित्याचे स्मरणही तुम्हाला वाचवू शकणार नाही.’ अशी ती शापवाणी होती. त्याचा अर्थ इतकाच होता, की मोदींचे दिवस भरले आहेत आणि आता त्यांना परिणामांपासून कोणीच वाचवू शकत नाही. अगदी राजीव गांधींच्या पापाचा पाढा वाचला, म्हणूनही मोदींचे पंतप्रधान शाबूत राहू शकत नसल्याचा निर्वाळा राहुलनी दिला होता. अवघ्या अठरा दिवसांनी त्यांना आपल्या कर्माचा हिशोब मिळाला आणि राजिनामा द्यावा लागला होता. पण त्या राजिनाम्याचा अर्थ काय होता? राहुल त्यातून काय सांगू इच्छित होते? परिणामांची वा पराभवाची जबाबदारी घेऊन राजिनामा देणार्याला जबाबदारी शब्दाचा अर्थ तरी कधी उमगला आहे काय? राहुलच्या राजिनाम्याचे कोडकौतुक करीत बसलेल्यांना तरी जबाबदारी शब्दाचा अर्थ कळला आहे काय?
पराभवाची जबाबदारी राहुलनी घेतली म्हणजे काय? मागल्या दीड वर्षात पक्षाचे अध्यक्ष म्हणून, किंवा त्यापुर्वी साडेचार वर्षे उपाध्यक्ष म्हणून राहुल गांधीच पक्षाची सर्व धोरणे वा निर्णय ठरवत होते. त्यात पक्षाच्या इतर कुणा नेत्याला आपले मत मांडण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा अधिकारही नव्हता. एखादी भूमिका वा धोरण आवडले नाही वा पटले नाही म्हणून कुठले वाद झाले नाहीत. ज्यांचे राहुलशी पटले नाही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे राहुल एकाकी लढत होते. कारण त्यांनीच अन्य कुणाला निर्णयात भागिदारी दिलेली नव्हती. मग एकाकी लढण्याला पर्याय कुठे होता? सहाजिकच पक्षाचे जे काही नुकसान झालेले आहे, त्याला सर्वस्वी राहुलच कारणीभूत आहेत. त्यांनी तो आपला नाकर्तेपणा या राजिनामापत्रातून मान्य केला, इतकाच त्याचा अर्थ होतो. पण त्यातून पक्षाला बाहेर काढण्याची खरीखुरी जबाबदारी मात्र राहुलनी टाळलेली आहे. ज्या पराभवाचे राहुल शिल्पकार आहेत, त्याची भरपाई कोणी करायची? ती भरपाई करून देण्याला जबाबदारी घेणे म्हणतात ना? तुमच्या मुलाने वा कुणा जवळच्याने अन्य कुणाचे काही नुकसान केलेले असेल, तर त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता, तेव्हा ‘जबाबदारी माझी’ असेच शब्द वापरताना? मग इथे शतायुषी कॉग्रेस पक्षाला देशोधडीला लावण्याने झालेले नुकसान भरून काढायला राहुल पुढे आलेले नाहीत. त्यांच्या मातोश्री वा भगिनीनेही ती जबाबदारी उचललेली नाही. त्यांनीही हात झटकले आहेत आणि उर्वरीत होयबा कॉग्रेस नेत्यांना आपले काय ते बघावे म्हणून पळ काढलेला आहे. त्याला मुजाहिदीन वा जैश तोयबाप्रमाणे जबाबदारी घेणे म्हणतात. कुठेही घातपात स्फ़ोट वगैरे होतात, त्यानंतर अशा घातपाती संघटना जबाबदारी घेतल्याचे जाहिर करतात. त्यापेक्षा राहुल गांधींनी जबाबदारी घेण्यात कुठला फ़रक आहे?
मुंबई वा दिल्ली काश्मिरात कुठलाही घातपात झाल्यावर आयसिस वगैरे संघटना आपणच ते हानिकारक कृत्य केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्याला जबाबदारी घेतली असे बातम्यातून म्हटले जाते. वास्तवात त्यापैकी कोणी पुढे येऊन छातीठोकपणे पुढल्या परिणामांना सामोरे जातात का? उलट मजा केली म्हणून दुर बसून दुर्दशा झालेल्या लोकांचे हाल गंमत म्हणून बघत असतात. त्या जनतेला संरक्षण देण्यात तोकड्या पडलेल्या सरकार शासनाला वाकुल्या दाखवित असतात. राहुलनी घेतलेली भूमिका त्यापेक्षा कितीशी वेगळी आहे? त्यांनी कॉग्रेसचे नुकसान भरून काढण्यासाठी काहीही करू शकत नाही, असे़च एकप्रकारे जाहिर केले आहे. घातपात्त्यांची घोषणा जशी पापाची कबुली असते, त्यापेक्षा राहुलनी पक्षाध्यक्ष पदाचा दिलेला राजिनामा तसूभर वेगळा नाही. म्हणूनच तो गुन्ह्याचा कबुलीजबाब आहे. त्याला कोणी जबाबदारी घेणे म्हणत असेल, तर ती बदमाशी आहे किंवा निव्वळ मुर्खपणा आहे. थोडक्यात राहुल गांधींनी आपण कॉग्रेसचे भरपूर नुकसान केले आणि त्या पक्षाला नामशेष करायचेच बाकी ठेवले, याचीच राजिनामापत्राने कबुली दिली आहे. किंबहूना घातपातानंतर जशी अराजकाची व अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण झालेली असते, तशी कॉग्रेसची दुर्दशा करून टाकलेली आहे. मात्र त्याची ‘जबाबदारी’ घेणारा समोर असूनही कॉग्रेसमध्ये कोणाला त्याला पकडून ‘जाब’ विचारण्याची हिंमत उरलेली नाही. ही कॉग्रेसची किती दयनीय अवस्था आहे ना? एकूण मागल्या सहा वर्षातले राजकारण व घडामोडी बघितल्या तर नरेंद्र मोदींनी कॉग्रेसमुक्त भारताची नुसतीच कल्पना मांडलेली होती. पण वास्तवात राहुल गांधींनी अतिशय मनोभावे ती कल्पना ‘साकारण्याचे’ कष्ट व अपरंपार मेहनत घेतलेली आहे. त्यांनी नुसती कॉग्रेस उध्वस्त करून टाकलेली नाही. तो पक्ष पुन्हा आपल्या पायावर उभा रहाण्याचा विचारही करू शकत नसल्याच्या अवस्थेला आणून ठेवला आहे.
तसे बघायला गेल्यास लालूंचा राजद, चंद्राबाबूंचा तेलगू देसम वा मुलायमचा समाजवादी पक्षही नामशेष झाल्यासारखे आहेत. पण त्यांनी जबाबदारी घेऊन हात झटकले नाहीत. जे काही नुकसान व विध्वंस झाला आहे, त्याचा अंदाज घेत संयम दाखवला आहे. झालेली हानी कशी भरून काढावी आणि नव्या जोमाने कसे पुन्हा उभे रहावे, त्यावर त्यांनी विचार चालविला असणार यात शंका नाही. अगदी बंगालच्या ममता बानर्जी किंवा दिल्लीचे केजरीवालही आपल्या पक्षाची झालेली पडझड सावरण्यासाठी कामाला लागलेले आहेत. पण ज्याचे सर्वाधिक नुकसान झाले, त्या कॉग्रेस पक्षात आनंदीआनंद आहे. तिथल्या बहुतांश नेत्यांना पक्षाची फ़िकीर नसून राहुलच्या जागेवर कोणी खरेच हुशार समर्थ नेता आला, तर आपल्याला प्रथम डच्चू मिळेल्, म्हणून चिंता लागलेली आहे. त्यापेक्षा पडझड झालेल्या वा मोडकळीस आलेल्या वाड्यातही आश्रय टिकून रहावा, म्हणून त्यांच्या कसरती चालू आहेत. जसे जिहादी वा नक्षलींचे छुपे समर्थक पकडले जाऊ शकणार्यांना पाठीशी घालायला पुढे येतात, तशीच सध्या कॉग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी राहुलना वाचवण्यासाठी खटपट चालू आहे. एकूण काय राहुलनी कॉग्रेस उध्वस्त करून टाकलेली आहे आणि ते काम एका दिवसात झालेले नाही. आधीच घराणेशाहीने पोखरून निघालेल्या कॉग्रेसचा डोलारा राहुलनी दणक्यात लाथ घालून कोसळून टाकलेला आहे. मात्र त्या अवशेषातही अनेकांना अजून काही लाभ मिळण्याची आशा आहे. पण ज्याने तो विध्वंस घडवून आणला, त्याला कशाचीही फ़िकीर नाही. तो मस्तपैकी खुलेआम मोकाट फ़िरतो आहे. महात्माजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉग्रेस बरखास्त करून टाकण्याचा दिलेला सल्ला पणजोबाने फ़ेटाळला. आज त्यांचाच पणतू त्या गांधींची इच्छा प्रत्यक्षात पुर्ण करतो आहे. राहुल गांधींचे हे कर्तृत्व इतिहासालाही नोंदवून ठेवावे लागणार आहे. पुढल्या पिढीतले इतिहासकार व विश्लेषक त्याची योग्य कारणमिमांसा करतील नक्कीच.





