Sunday, November 3, 2013

कलकलाट केला काकांनी



  लता मंगेशकर यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात जाहिरपणे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी नुसती सदिच्छा व्यक्त केली आणि स्वत:ला बुद्धीमान व शहाणे म्हणवणारा वर्ग त्यांच्यावत तुटून पडला आहे. ज्या गायिकेवर अतोनात प्रेम केले तिचीच विनाविलंब निंदानालस्ती करण्याची अशी स्पर्धा होताना पाहिल्यावर सामान्य माणसाला त्याचे आश्चर्य वाटले तर नवल नाही. पण त्याहीपेक्षा सामान्य माणसाला इतक्या असहिष्णू प्रतिक्रिया अपेक्षित नसतात. ज्यांना आपण बुद्धीमान वा विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते मानतो; त्यांनी एका नावाजलेल्या गायिकेच्या मतस्वातंत्र्यावर असा हल्ला कशाला चढवावा, त्याचेच मग सामान्यजनांना कोडे पडते. देशात अनेक उद्योगपती, मान्यवरांनी आजवर मोदींना अशाच शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधातही अनेक जाणकार नामवंतांनी मतप्रदर्शन केलेले आहे. अमर्त्य सेन नामक अर्थशास्त्रज्ञ किंवा नावाजलेले साहित्यिक अनंतमुर्ती यांनी मोदींच्या विरोधात आपली कडवी मते मांडलेली आहेत. तेव्हा मोदी समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मग त्यांच्या मतस्वातंत्र्याचे जे कोणी समर्थक होते, त्यांना आज लतादिदीच्या स्वातंत्र्याचे समर्थन करावेसे कशाला वाटलेले नाही? तर त्यांची बुद्धीमत्ताही मोदीभक्ताप्रमाणे एका भूमिकेकडे गहाण पडलेली आहे. असे लोक कधी विचारस्वातंत्र्याचे समर्थक पाठीराखे नसतात. ते आपापल्या सोयीनुसार नियम व तत्वांचा वापर करून घेत असतात. पण त्याच्याही पलिकडे अशा लोकांना एका भयगंडाने पछाडलेले असते; हे विसरता कामा नये. आत्मविश्वास गमावलेले असे लोक कुठल्या तरी एका बाजूला चिकटून बुद्धीवादाचा मुखवटा लावून वावरत असतात. मार्टीन ल्युथरने अशा भयगंडाची स्पष्ट शब्दात कबुली दिलेली आहे.

   ख्रिश्चन धर्मातील सुधारणावादी बंडखोर प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर म्हणतो, ‘परमेश्वराचे नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही; तेव्हा मी माझ्या शत्रूच्या, पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्यांच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. या आठवणी जाग्या होताच, माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो, माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा वाढताच; परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भूतलावर तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणू लागतो.’ मोदी विरोधकांची मानसिकता नेमकी अशाच दुबळ्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे. मोदींना विरोध करणार्‍यांचा स्वत:च्याच भूमिकेवर पुरेसा विश्वास नाही आणि आपल्या विचार भूमिकेबद्दल त्यांना खात्री राहिलेली नाही. म्हणूनच त्या भूमिकेला यशस्वी करण्यासाठी कार्यरत होण्यापेक्षा मोदी विरोधाचे बुडबुडे उडवण्यापलिकडे त्यांच्या हाती काही उपाय उरलेला नाही. मग अशा माणसांना आपण मोदी विरोधक आहोत, यापेक्षा आपण मोदीभक्त नाहीत; हे सिद्ध करण्यास सातत्याने प्रयत्नशील रहावे लागते. आपणही मोदींना स्विकारलेले नाही, हे स्वत:लाच पटवत रहाणे ही त्यांची गरज बनलेली आहे. त्यासाठी त्यांना आपल्या विचार व भूमिकांचा प्रसार-प्रचार, समर्थन करण्यापेक्षा मोदींच्या विरोधात निंदानालस्ती करण्याखेरीज गत्यंतर उरलेले नाही. मोदींना अपशब्द वापरले, तरच मग त्यांना आपल्या तथाकथित सेक्युलर विचारांच्या सामर्थ्याची अनुभूती होत असते. म्हणूनच असे लोक सातत्याने मोदीं विरोधाची संधी शोधत असतात, नसेल तर निर्माण करून मोदींच्या नावाने शंख करीत असतात. लतादिदींवरची टिका त्यातूनच आलेली आहे.

   ज्याला सेक्युलॅरिझमचे राजकारण म्हणतात, त्याचे गोडवे गाण्यासारखे काही उरलेले नाही. त्याचा फ़ोलपणा सामान्य जनतेप्रमाणेच आता त्या विचारधारेचे अवडंबर माजवणार्‍यांनाही लक्षात आला आहे. मागल्या दिडदोन दशकात सेक्युलर म्हणून जो राजकीय व सार्वजनिक जीवनाचा बट्ट्याबोळ करण्यात आला, त्याची अनुभूती खुद्द सेक्युलरांनाही आलेली आहे. म्हणूनच आग्रहपुर्वक त्या तथाकथित पुरोगामी राजकारणाचे ढोल पिटण्याची इच्छाशक्तीही हे लोक गमावून बसले आहेत. पण आपला मुर्खपणा किंवा चुका कबुल करण्याची दानत, प्रामाणिकपणा शहाण्यांकडे सहसा नसतो. म्हणुनच त्यांना पळवाटा शोधाव्या लागतात. तो उत्साह संपलेला असल्याने उसने अवसान आणावेच लागते. मग मार्टीन ल्युथर म्हणतो, तसा प्रतिक्रियेतून खोटा उसना उत्साह आणावाच लागतो. शत्रूचे नाव घेतले वा आठवले की असे उसने अवसान आणणे सोपे जात असते. म्हणूनच मग सभा मेळावे घेऊन आपले फ़सलेले विचार धोरणे लोकांना समजावण्याची हिंमत गमावलेले लोक मोदींच्या नावाने शिमगा करण्यात धन्यता मानू लागले आहेत. स्वत:विषयी चांगले उत्साहवर्धक काही शिल्लक उरलेले नाही, त्यातून मग मोदींनी काही करावे की ते कसे चुक आहे, तेवढेच पदोपदी सांगत बसण्यापलिकडे या लोकांकडे दुसरा उद्योगच राहिलेला नाही. मार्टीन ल्युथर जसा पोप वा त्याच्या हस्तकांच्या दगाबाजी ढोंगबाजीचे स्मरण करतो; तसेच भारतातले सेक्युलर गुजरातच्या बारा वर्षे जुन्या दंगलीचे स्मरण करतात. त्यातून त्यांचा नैतिक अहंकार फ़ुलून येतो. द्वेषाचा पारा चढला, की सेक्यु्लर विचारांचा जयजयकार शक्य असतो. आपल्या देशातील सेक्युलर राजकारण आता मोदी या एका व्यक्तीभोवती घुटमळून राहिले आहे. तेव्हा मोदीबद्दल चार शब्द कोणी खरे वा चांगले बोलला, तरी त्याच्यावर हल्ला करणे ही सेक्युलर अगतिकता आहे. मग ते चार शब्द लतादिदीच्या मधूर कंठातून का निघालेले असेनात, ते कर्कश व भेसूरच असल्याचे सिद्धांतही मांडले जाऊ शकतात. हा कावळ्यांनी कोकीळेला प्रमाणपत्र देण्य़ासारखाच उद्योग नाही का?

Saturday, November 2, 2013

नटसम्राट आणि अभिनयसम्राज्ञी?


  मागल्या रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पाटणा येथे हुंकार मेळावा घेण्यासाठी गेले असताना, तिथे स्फ़ोटमालिका घडवली गेली. त्यात सहा सात माणसांचा बळी गेला आणि पाऊणशे लोक जखमी झाले. त्यानंतर सहा दिवसांनी सवड काढून मोदी यांनी पुन्हा बिहारला धाव घेतली. त्या स्फ़ोटमालिकेत ज्यांचा बळी पडला, त्यांच्या आप्तस्वकीयांचे सांत्वन करून सहाय्य देण्यासाठी मोदी मुद्दाम गेलेले होते. त्यापैकी काही जागी ते पोहोचू शकले तर दोन ठिकाणी त्यांना विपरीत हवामानामुळे शक्य झाले नाही. मग त्यांनी फ़ोनवर थेट संपर्क साधून त्यांचेही सांत्वन केले. आता मोदींनी जे केले ते माणूसकी म्हणून, असे त्यांचे समर्थक म्हणणारच. आणि आपोआपच त्यांच्या विरोधकांना त्यात धुर्तपणा व नाटक दिसणेही तितकेच स्वाभाविक आहे. सांत्वनाच्या या दौर्‍यामागे कुठलेही राजकारण नव्हते, असा दावा जितका भंपक आहे; तितकाच त्यात निव्वळ नाटक असल्याचा सात्विक आक्षेपही बदमाशी आहे. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हल्ली नेहमी भाजपावर आगी लावतो व ती आग विझवून सांत्वन आपल्यालाच करावे लागते, आरोप करीत असतात. भाजपावाले सांत्वन करा्यलाही जात नाहीत असाही त्यांचा आक्षेप असतो. पाटण्यात आग कोणी लावली ते सर्वश्रूत आहे. मात्र तिथे आग विझवायला किंवा सांत्वन करायला राहुल वा त्यांची मम्मी पोहोचली नाही. तिथे मोदी जाऊन पोहोचले. मग तक्रार कशाला? मोदी सांत्वनाचे नाटक करीत असतील, तर मुझफ़्फ़रनगर येथे सांत्वनाला गेलेले पंतप्रधान, राहुल व सोनिया सुद्धा नाटकच करीत नव्हते काय? मग कशाला नाटक म्हणायचे आणि कोणाला नटसम्राट ठरवायचे? की मोदींनी केले तर पाप आणि सेक्युलर बिल्ले लावलेल्याने तेच कृत्य केल्यास पुण्य़ असते काय?

   असो, अशा सांत्वनाला नाटकच म्हणायचे असेल तर असल्या नाट्य चळवळीची सुरूवात कोणी कधी केली त्याचाही इतिहास सांगणे अगत्याचे ठरावे. राहुल गांधी हल्ली अनेकदा आपल्या दादीची आठवण काढत असतात. त्यांच्या दादी म्हणजे इंदिरा गांधी १९७७ सालात निवडणूकीत पराभूत झाल्या होत्या आणि देशभरात त्यांच्या विरोधात एक संतापाची लाट उसळली होती. त्यातून पुन्हा सावरण्यासाठी इंदिराजी धडपडत होत्या. एकीकडे त्यांच्यावर आणिबाणीतल्या अन्याय अत्याचाराच्या आरोपांची चिखलफ़ेक रात्रंदिवस उडवली जात होती आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात अनेक चौकशी आयोगांचे शुक्लकाष्ट लावण्यात आले होते. त्याच प्रकरणात एकेदिवशी तात्कालीन गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांनी इंदिराजींना अटक केली. मात्र चोविस तासही त्यांना गजाआड ठेवणे चरणसिंगांना साधले नाही. त्यांच्या विरुद्धच्या आरोपांचा प्रथमदर्शनी दुजोरा देणारे पुरावे न्यायालयाने मागितले व सरकारी पक्षाला देता आले नाहीत; म्हणून तिथल्या तिथे कोर्टाने इंदिराजींची सुटका केली होती. त्यातून इंदिराजींना पहिला दिलासा मिळाला होता. निराशाग्रस्त इंदिराजी राजकारणाचा संन्यास घेण्याचा विचार करीत असताना, या अटक, आरोप नाट्यातून त्यांना पहिला आशेचा किरण दिसला आणि त्यांनी जनता लाटेच्या विरोधात पोहण्याचा पहिला प्रयास करायचे मनावर घेतले. त्यांचे मुठभर समर्थक त्यांच्या पाठीशी असले, तरी कॉग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिराजींकडे पाठ फ़िरवलेली होती. अशा वेळी योगायोगाने याच बिहारमध्ये अशी एक घटना घडली, की तिथूनच इंदिराजींनी पुनश्च हरीओम करण्याचा निर्णय घेतला. समस्तीपुर जिल्ह्यातील बेलची नामक एका दुर्गम, दुर्लक्षित खेड्यात दलितांचे एक सामुहिक हत्याकांड घडले होते.

   इंदिराजींनी तिथे जाऊन त्या दलित पिडीतांचे सांत्वन करण्याच धाडसी निर्णय घेतला. कारण तिथे पोहोचण्यासाठी कुठलेही वाहतुक साधन त्या काळामध्ये उपलब्ध नव्हते. विविध मार्गाने आपल्या मोजक्या सहकार्‍यांना सोबत घेऊन समस्तीपुरला पोहोचलेल्या इंदिराजींना बेलचीपर्यंत पायी वा वाहनाने पोहोचणे शक्यच नव्हते. कारण मधल्या नदीला पूर आलेला होता. त्यात होडी घालायलाही नावाडी राजी नव्हते. अशावेळी इंदिराजींनी हत्ती मागवला आणि हत्तीवर बसून नदी पार करीत त्या बेलचीला पोहोचल्या. तिथे भयग्रस्त पिडीत दलितांना आभाळ ठेंगणे वाटले होते. मृतांच्या नातलगांनी पदभ्रष्ट पंतप्रधानांचे स्वागत केले. आणि मग त्या बातमीने राजकारणात मोठेच काहुर माजवले. पुढे बेलचीच्या त्या दलितांना कुठल्या न्याय मिळाला वा इंदिराजींच्या सांत्वनाने काय लाभ मिळाले; हा संशोधनाचा विषय आहे. पण तिथून मग इंदिरा विरोधाची जनभावना अस्तंगत होत गेली. राजकारणातील जनता पक्षाची जादू ओसरत गेली. आणिबाणी व त्यातले अत्याचार विसरून लोक वास्तविक जीवनातील जनता पक्षाच्या अराजकाकडे डोळसपणे बघू लागले होते. त्यामुळेच इंदिराजींच्या समर्थ कारभाराची लोकांना गरज वाटू लागली आणि राजकारण उलटत गेले. त्यात बेलचीच्या पिडीतांचा विषय केव्हाच मागे पडला. म्हणूनच इंदिराजींनी सांत्वनाचे केले तेही नाटकच म्हणायला हवे. पण त्यातून त्यांनी राजकीय बदलाचा मुहूर्त साधला होता आणि लोकांपर्यंत तो संकेत नेमका पोहोचवला होता. आता मोदींनी सांत्वनाचे नाटक केले असाच दावा असेल, तर त्यांना नटसम्राटच म्हणायला हवे. पण मग अशी ही राजकारणातल्या सांत्वनाची नाटक चळवळ सुरू करणार्‍या इंदिराजींना अभिनय सम्राज्ञीच म्हणायला हवे ना? राहुल या दादीला कधी ओळखणार?

Friday, November 1, 2013

दिवाळी कोणासाठी?



   त्यांची रोजच दिवाळी असते, असे शब्द अनेकदा आपण पैसेवाल्या श्रीमंत वर्गाच्या बाबतीत ऐकत असतो. ती शब्दरचना उपरोधिक असली, तरी त्यातच दिवाळी शब्दाचा खरा अर्थ सामावलेला आहे. ज्यांना रोजच दोन वेळी पोटाची आग विझवताना तारांबळ होत असते; त्यांच्यासाठी नित्याच्या गरजांची पुर्ती करण्यातच आयुष्य़ खर्ची पडत असते. मग अशा लोकांना ऐषाराम किंवा चैनीचा विचारही करणे महाग असते. सुखसमाधानाच्या सुविधा किंवा साधनांबद्दल त्या गरीब वर्गामध्ये आकर्षण मोठे असते, तरी अशी साधने किंवा वस्तु आपल्याला परवडणार्‍या नाहीत, अशीच एक पक्की बोचणी त्या सामान्यजनांच्या मनात रुजलेली असते. सहाजिकच असा सुखवस्तूपणा म्हणजेच दिवाळी, असे तो वर्ग मानत असतो. म्हणूनच कुणा श्रीमंताची खर्चिक जीवनशैली बघितली मग तो गरीब म्हणतो, त्यांचे काय, त्यांची तर रोजच दिवाळी असते. थोडक्यात दिवाळी म्हणजे आपल्या खिश्याकडे किंवा उत्पन्नाकडे काणाडोळा करून आपापल्या पातळीनुसार उधळपट्टी करण्याचा मोसम. आकर्षण असलेल्या व अशक्य वाटणार्‍या सुखाच्या पुर्तीसाठी उचललेले पाऊल, म्हणून त्याला दिवाळी संबोधले जाते. म्हणून तर सामान्य माणूस त्या दिवाळीची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतो. अर्थात उधळपट्टी करण्याइतके पैसे त्याच्यापाशी नसतात वा त्यला तितके पैसे मिळण्याचीही शक्यता नसते. पण तरीही थोडा धोका पत्करून किंवा धाडस करून माणूस आपल्या आवाक्याबाहेर वाटणारा आनंद भोगू पहातो, ती असते दिवाळी. अशी की सर्व दु;ख वा समस्यांचा विसर पडून साजरा केलेला विमुक्त आनंद. दिवाळी खरी त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच येते. तिची महत्ता त्यांनाच कळत असते, कारण त्यांच्यासाठी रोजच दिवाळी नसते.

   कुठलाही सण उत्सव हा एकप्रकारे विरंगुळा असतो. नित्यजीवनातील गांजलेपणातून थोडी सुटका किंवा उसंत काढण्याचा प्रयास, म्हणजे सण असतो. दिवाळी तर वर्षभर प्रतिक्षा केलेला सण असतो. कारण त्या कालखंडात अधिक खर्च व मौज करण्यासाठी माणसे आधीपासून तयारी करीत असतात., सगळ्या गोष्टी व पैशाची जमवाजमव करीत असतात. स्वप्नातला आनंद उपभोगण्याची अतीव इच्छाच माणसाला दिवाळीबद्दल उत्सुक बनवित असते. सहाजिकच प्रत्येकाची दिवाळी वेगवेगळी असते. कुणा पैसेवाल्याची दिवाळी तसे बघितल्यास अधिकच कटकटीची असते. कारण त्याला सुबत्तेमुळे बहुतेक सुखे सुविधा उपलब्ध झालेल्या असतात. त्यामुळेच अशा वस्तु वा साधनांमुळे मिळणार्‍या आनंदाला श्रीमंत माणूस पारखा झालेला असतो. उलट ज्याच्यापाशी पैशाचा तुटवडा असतो, त्याच्यासाठी चैनीच्या वस्तू म्हणजेच स्वप्न असते. सहाजिकच अशा वस्तू संपादन करणे, हेच एक स्वप्न असते. पैसेवाल्यांसाठी सहज खरेदी करता येणारी वस्तु सामान्य गरीबासाठी अनमोल असले. म्हणून त्या वस्तुच्या खरेदीतही त्याला दिवाळी अनुभवता येते. त्यासाठी त्याला पैशाचे नियोजन, बचत करावी लागत असते. ते स्वप्न साकार करण्यासाठीची जमवाजमव व केलेली जुळवाजुळव, प्रत्यक्ष दिवाळी साजरी होण्याच्या आनंदापेक्षाही अधिक उत्सुकतेची म्हणून कौतुकाची असते. त्यासाठीचे प्रयास, केलेला विचार व स्वप्न साकारण्याची अतीव इच्छाच; सुखाची जाणिव असते. तितका दिवाळीचा आनंद आधीपासून सुरू होतो आणि दिवाळी संपल्यावरही टिकून रहातो. म्हणूनच कितीही कष्टाची वाटली तरी खरी दिवाळी गरीबाची असते. कारण त्यातून त्याला स्वप्नपुर्तीचा आनंद मिळवता येत असतो.

   साध्यासाध्या गोष्टी व वस्तुमधून त्या गरीबाला मिळवता येणारा दिवाळीचा आनंद श्रीमंत पैसेवाल्याला मिळवता येत नाही. कुणाला असे बोलणे च चमत्कारीक वाटेल. पण वास्तवात तीच स्थिती आहे. श्रीमंताला किंवा पैसेवाल्यांना आपल्या आनंद सुखापेक्षा दुसर्‍या कुणासाठी तरी कष्ट उपसावे लागत असतात. अन्य कुणापेक्षा आपल्याकडे काही अजोड आहे, हे दाखवण्यासाठी पैसेवाल्यांना उत्सव सणाच्या निमित्ताने काही वेगळे करावे लागत असते. त्यातून त्यांना इतरेजनांना खिजवायचे असते. आपले वेगळेपण दाखवण्याची खटपट करावी लागत असते. तसेच काही दुसर्‍याकडे असले, मग आपण खरेदी केले वा मिळवले, त्याचाही आनंद असे पैसेवाले उपभोगू शकत नाहीत. थोडक्यात त्यांचा आनंद स्वत:साठीचा असण्यापेक्षा दुसर्‍या कोणाला काही तरी दाखवण्यासाठी वा दुस‍र्‍याला खिजवण्यासाठीच असतो. उलट सामान्य माणसाची स्थिती असते. त्याला आपण आपल्याला अलभ्य दुर्लभ्य वाटणारे काही तरी साध्य केले वा मिळवल्याचा निखळ व्यक्तीगत आनंद उपभोगता येतो. कारण त्यासाठी त्याने नियोजन जुळवाजुळव करून ते उद्दीष्ट गाठलेले असते. आपण आयुष्यात कुठला महत्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान त्याला आनंदी करीत असते. तितकेच नाही, तर जे काही घेतले मिळवले, त्याच्या उपयोगात त्याचा आनंद वृद्धींगतच होत जातो. म्हणूनच कुणा पैसेवाल्या श्रीमंताला किरकोळ वाटणार्‍या साध्या गोष्टीतही गरीबाची दिवाळी दडलेली असते. म्हणूनच दिवाळी मनापासून गरीबच साजरी करू शकतो. कारण दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे. आपले जीवन प्रकाशमान झाल्याच्या अनुभुतीचा सण आहे. ज्याला तो पल्ला गाठता येतो, तोच खरी दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळी खरी व त्यांचीच असते, ज्यांच्या रोजच्या आयुष्यात दिवाळी नसते. अशी दिवाळी तोच आनंद घेऊन प्रत्येकाच्या आयुष्यात यावी व साजरी केली जावी, हीच सर्वांसाठी शुभेच्छा.

Thursday, October 31, 2013

तक्रारींचा पोरखेळ



  गाजलेले प्रमुख निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आताच्या पिढीला आठवणारही नाहीत कदाचित. पण आयोगाचा दबदबा त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाला. उमेदवार, पक्ष व निवडणूकीचा प्रचार यांच्या बाबतीत त्यांनीच प्रथम आचारसंहितेचा बडगा उचलून दाखवला होता. किंबहूना त्यांच्यामुळेच आयोगाचे स्वरूपही बदलले होते. शेषन यांच्या आधीचे तमाम आयोग एकसदस्य आयोग होते. एकच निवडणूक आयुक्त असायचा आणि त्यालाच आयोग मानले जात असे. पण शेषन यांनी सत्ताधारी पक्षाच्या नाकी इतका दम आणला, की त्यांच्या एकमुखी सत्तेला लगाम लावण्यासाठी मग आणखी दोन आयुक्त नेमायचा पर्याय तात्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी स्विकारला होता. पण शेषन तिथेही नडले होते. त्यांनी त्या नेमणूका मानायलाच नकार देऊन त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते. सहाजिकच त्यांचे सहकारी म्हणून नेमलेल्या दोघा वरीष्ठ अधिकार्‍यांना दिर्घकाळ रिकामे माशा मारत बसावे लागले होते. पुढे न्यायालयानेच तिन्ही आयुक्तांना समान अधिकार असून त्यांनी सहमतीने निर्णय घ्यावेत; असा निर्णय दिला तेव्हा शेषन यांची एकहाती सत्ता संपलेली होती. पण याच कारकिर्दीत निवडणूक आयोगाचा दबदबा तयार झाला. पैशाच्या बळावर किंवा हाती असलेल्या सत्तेच्या दादागिरीने, निवडणूका लढवायच्या प्रकाराला तेव्हापासून मोठा आळा घातला गेला. पण शेषन यांच्यानंतर तितका खमक्या कोणी आयुक्त आयोगात आला नाही आणि आला तरी त्याला शेषन यांच्याइतकी मान्यता मिळाली नाही. उलट शेषन यांच्या नंतरच्या कालखंडात त्यांनी निर्माण केलेला आयोग व आचारसंहितेचा दबदबा मात्र खुप कमीच होत गेला. आज पुन्हा विविध प्रकारे पैशाच खेळ व उधळपट्टी सुरू झाली आहे. सत्तेचा गैरवापर उघडपणे होताना दिसू लागला आहे. पण त्याचवेळी आचारसंहिता व कायद्याचा आडोसा घेऊन अनेक पोरकटपणा सुद्धा उजळमाथ्याने होतानाही दिसू लागले आहेत. विरोधी उमेदवार वा प्रतिपक्षाला सतावण्यासाठी आचारसंहिता वापरण्याचे प्रकारही खुप बोकाळले आहेत. आचारसंहितेचा भंग होताना दिसला किंवा नियमांचे उल्लंघन होत असेल, तर आयोगाकडे तक्रार करण्याची मुभा देण्यात आलेली असली; तरी त्याचा पोरकटपणा करण्याला कुठला पायबंद नाही. म्हणूनच मग हास्यास्पद तक्रारीही होऊ लागल्या आहेत. मध्यप्रदेशातील अशीच एक तक्रार किंवा मागणी हास्यास्पद झाली आहे.

   मध्यप्रदेशात कोणीतरी भाजपाची निशाणी कमळ असल्याने सर्वच तलावातील कमळांना झाकण्याची मागणी आयोगाकडे केलेली आहे. कारण त्या राज्यात निवडणूका होणार असून भाजपा हा प्रमुख राजकीय पक्ष आहे. अशीच मागणी दीड वर्षापुर्वी कोणी उत्तरप्रदेशात केली होती आणि तिथल्या विविध पार्कामध्ये असलेले मायावती-कांशीराम यांचे पुतळे झाकण्याचा उद्योग आयोगाने केला होता. वास्तविक बघता, हे पुतळे तिथे दिर्घकाळ असल्याने लोकांनी सातत्याने बघितलेले असतात. त्यांना प्रचाराचे साधन समजणेच गैरलागू होते. पण ती मागणी मान्य झाली आणि त्यातूनच पुढला पोरकटपणा सुरू झालेला आहे. पुतळे झाकल्याने लोकांचे लक्ष तिथेच अधिक वेधले जाते त्याचे काय? त्याचीच मग चर्चा होते आणि दुर्लक्षित पुतळे अधिक लक्ष वेधून घेतात. जेव्हा तिथे पुतळे नव्हते, तेव्हा मायावतींच्या पक्षाने बहूमत मिळवले होते. म्हणजेच पुतळे किंवा सार्वजनिक ठिकाणी निशाणी सादृष्य असलेल्या गोष्टी प्रचाराचे साहित्य मानणेच गैर आहे. पण तसे झाले, मग आता सर्वच तलावातील कमळे झाकण्याच्या मागणीतून त्याचेच पुढे पाऊल टाकले गेले आहे. त्याला मान्यता दिली, तर उद्या कॉग्रेसची निशाणी असलेल्या हाताच्या पंजाचे काय? लोकांनी रस्त्यावर यायचे जायचेच नाही काय? की आपापले हात झाकून फ़िरायचे? मतदान तरी कसे करायचे? शिक्का मारणे किंवा मशीनचे बटन दाबायला हाताचा पंजा लागणारच. सहाजिकच अशा मागण्या किंवा तक्रारी करणार्‍यांची आयोगाकडून कसून उलटतपासणी व्हायला हवी. मागल्या लोकसभा निवडणूकीत एका भाषणात वरूण गांधी काही बोलले, म्हणून काहूर माजवण्यात आले. त्यातही मग आयोगाने हस्तक्षेप केला आणि वरूणला अटक झाली होती. त्यांनी भडकावू भाषा वापरल्याचा आरोप होता. त्याची शहानिशा न करताच कारवाईचा बडगा उचलला गेला. पुढे त्यातून कोर्टाने वरूणची निर्दोष मुक्तता केली होती. पण एक चुकीचा पायंडा पाडला गेला. आता त्याचाच आधार घेऊन भाजपाने राहुल गांधी यांचे मुझफ़्फ़रनगर दंगली संदर्भातील विधान भडकावू असल्याची तक्रार आयोगाकडे केली आहे. थोडक्यात निवडणूक व प्रचारातील आचारसंहिता यांचा पोरकटपणा होऊ लागला आहे. अशा तक्रारी व त्यांची वैधता याविषयी शहानिशा करण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आयोगाने करावी आणि त्यात तथ्य नसेल, तर अशा तक्रारदारांना कामात व्यत्यय आणल्याचा काही दंडही आकारावा, तरच हा पोरखेळ थांबू शकेल.

Monday, October 28, 2013

खोटेपणा उघडा पडला



  रविवारी पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फ़ोट मालिकेनंतर आपला मुंगेरचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री नितीशकुमार पाटण्यात आले व त्यांनी घटनेच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. आपण सत्ताधारी म्हणून पुर्ण खबरदारी घेतली होती.म्हणूनच यात राजकारण आणू नये असे त्यांनी आग्रहपुर्वक सांगितले. पण त्यांच्या बोलण्यात कितीसे तथ्य आहे? पहिली गोष्ट म्हणजे राजकारणातला विरोध व्यक्तीगत जीवनात असता कामा नये असे नितीश म्हणाते, त्यात किती सत्य आहे? कुठल्याही राज्याचा मुख्यामंत्री वा केंद्राचा मंत्री राज्यात आला असताना त्याला सरकारी पाहुणा म्हणून सन्मानित करायचा शिष्टाचार असतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी पाटण्याला आलेले होते. तेव्हा मित्र पक्ष भाजपाच्या संपूर्ण कार्यकारीणीला भोजनाचे आमंत्रण नितीशकुमार यांनी दिलेले होते. पण तिथे मोदी येता कामा नयेत, अट घातलेली होती. याला व्यक्तीगत पातळीवरचा द्वेष नाही तर काय म्हणायचे? ज्या द्वेषासाठी नितीशनी राजकीय शिष्टाचारालाही हरताळ फ़ासला होता. तोच माणूस रविवारी दुर्घटना घडल्यावर राजकारणातले हेवेदावे व्यक्तीगत जीवनात नसावेत, असा मानभावीपणे सांगत होता. एका व्यक्तीचा द्वेष करतानाच त्यांनी सतरा वर्षाची जुनी मैत्री निकालात काढली, याला व्यक्तीद्वेष नाही तर काय म्हणतात? तेवढ्यावरच भागत नाही. सहा महिने आधीपासून ज्या मेळाव्याची तयारी भाजपा करीत होता, त्यालाच अपशकून घडवण्यासाठी याच नितीशकुमारांनी ऐनवेळी दोन दिवसांसाठी राष्ट्रपतींना बिहार भेटीचे आमंत्रण देऊन मेळाव्याला सुरक्षा देण्यात अडचणी उभ्या केल्या होत्या. यातून त्यांचा व्यक्तीद्वेष साफ़ स्पष्ट होतो आणि तरी माणूस शहाजोगपणे सहिष्णूतेचे बोल बोलत होता.

   पुढे भाजपाच्या नेत्यांनी ही लबाडी राष्ट्रपतींच्या नजरेस आणून दिल्यावर, त्यांनीच रविवारी पाटण्यात थांबायचे नाकारले आणि इच्छेविरुद्ध पाटण्यात मोदींचा मेळावा योजण्यात आडवे येण्य़ाची संधी नितीशना नाकारली गेली. त्यावर मग त्यांच्या अनुयायी व प्रवक्त्यांनी भाजपासह मोदींवर तोफ़ा डागलेल्या होत्या. हा माणूस स्वत:पेक्षा राष्ट्रपतींनाही छोटा समजतो; असली शेलकी टिका केलेली होती. त्यातून नितीशची मोदीविषयक पोटदुखी साफ़ व्यक्त झाली आहे. मग आता त्यांनी दुर्घटना घडल्यावर मगरीचे अश्रू ढाळण्यात काही अर्थ आहे काय? लाखो लोक आपल्याच बालेकिल्ल्यात मोदींना ऐकायला व बघायला जमणार, या कल्पनेनेच नितीशचे पित्त खवळले होते. म्हणून त्यांनी राष्ट्रपती दौर्‍याचे कारण दाखवून सुरक्षेचा बंदोबस्त नाकारला होता. पण अखेरीस सुरक्षा द्यायची वेळ आल्यावर ती पुरेशी नसावी, याची पुरेपुर काळजी घेतली होती. म्हणूनच जिहादी बॉम्ब घेऊन वावरत असताना पोलिस त्यांना रोखू शकले नाहीत आणि पुन्हा अशी कुठली सुचना मिळाली नव्हती, अशी थाप नितीशनी पत्रकार परिषद घेऊन ठोकली. वास्तवात तशी सुचना चार दिवस आधी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळाल्याचे त्यांच्याच वरीष्ठ अधिकार्‍यांनी नंतर एका वाहिनीकडे कबुल केले. मुद्दा म्हणूनच गंभीर आहे. असे स्फ़ोट घडवण्यामागे नितीशचा हात आहे, असा आरोप कोणी करणार नाही. करूही नये. पण तसे काही घडण्याची शक्यता असेल, तर तेही रोखायची त्यांची इच्छा नव्हती, हेच यातून स्पष्ट होते. पण भाजपाच्या नेतृत्वाची पाठ थोपटावीच लागेल, की त्यांनी गंभीर प्रसंगात योग्य पवित्रा घेऊन शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. नितीशच्या प्रशासनावर अवलंबून राहिले असते तर हजार पंधराशे लोक तरी नक्कीच मेले असते.


   गेल्या वर्षी याच पाटण्यात छटपूजेसाठी लाखो लोक नदीकिनारी जमलेले होते. तिथली व्यवस्था नितीश प्रशासनाने केलेली होती. त्यातला एक तात्पुरता पुल कोसळताच लोकांमध्ये धावफळ व घबराट होऊन जी चेंगराचेंगरी झाली; त्यात शंभरावर लोकांचा हकनाक बळी गेला होता. त्याला नितीश प्रशासन म्हणतात. नेमकी तीच घातपाती जिहादींची योजना होती. त्यांना स्फ़ोटातून माणसे मारायची नव्हती. तर स्फ़ोटाने घबराट निर्माण करून गोंधळ उडवून द्यायचा होता. मग मेळाव्यासाठी जमलेल्या लाखो लोकांची पळापळ होऊन त्यात नुसत्या चेंगराचेंगरीनेच हजारोंचा सहजगत्या बळी पडला असता. पण सभास्थानी पाठोपाठ स्फ़ोट होत असतानाही, आयोजक भाजपा नेत्यांनी व्यासपीठावरून लोकांना शांत रहाण्याचा व फ़टाके फ़ुटत असल्याचे सांगून घबराट पसरणार नाही याची काळजी घेतली. गर्दीतल्या कार्यकर्त्यांनी लोकांना पळापळ करण्यापासून रोखले आणि म्हणुनच जिहादींची घातक योजना फ़सली. ह्याच सभेचा बंदोबस्त पुर्णत: नितीश सरकारच्या पोलिसांच्या हाती असता, तर चेंगराचेंगरीतच कित्येक लोक मारले गेले असते. सुदैवाने तसे काही घडले नाही आणि विद्वेषाचे राजकारण न खेळणार्‍या मोदींनी आपल्या भाषणातही त्या घातपाताचा उल्लेख टाळला. ज्यायोगे जमावात संतप्त भावनेचा उद्रेक होईल; असे बोलायचेही मोदी यांनी टाळले. उलट सुखरूप लोकांनी शांतपणे आपापल्या घरी परतण्याचे जातीने आवाहन केले. या एकाच चालीतून मोदी यांनी बिहारींना जिंकले. प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा त्याची पावती नितीशना मिळेल. द्वेष व मत्सराचे राजकारण कितीही सभ्य भाषेतले असले; म्हणुन त्याचे पितळ उघडे पडायचे थांबत नाही, याचाच हा पुरावा आहे. इतक्या स्फ़ोटानंतरही सभा सुरळीत पार पाडून मोदींनी आपल्या नेतृत्व गुणांचीच साक्ष दिली आहे.

Sunday, October 27, 2013

रसातळाला गेलेले तारतम्य



   रविवारी पाटणा येथे भाजपाने मोठा मेळावा योजला होता. त्याची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू होती. इतके असूनही तिथे जिहादी घातपात व स्फ़ोट झालेच. त्यासाठी मग कोणाच्या डोक्यावर खापर फ़ोडायचे? असे खापर कोणाच्या डोक्यावर फ़ोडून आपण म्हणजे भारतीय सुरक्षित होणार आहोत काय? आपल्याला समोर जे दिसते आहे आणि त्यातून काही सुचवले जात आह; त्याकडे डोळसपणे व समंजसपणे बघायची आपल्यात कुवत नसेल तर मग आपल्याला देवही वाचवू शकणार नाही. बाकीच्या तपशीलात नंतर जाऊ. स्फ़ोट किती झाले, कोणी केले, त्यामागची प्रेरणा कोणाची हे विषय बाजूला ठेवा. ही आग कोण लावतो आहे आणि त्यासाठी चिथावणी कोण देतो आहे; त्याचाच आधी विचार करू. त्यासाठी कुणा कुशाग्र बुद्धीमंताच्या विश्लेषणाची अथवा चतुर डिटेक्टीव्हची गरज नाही. दोन सभा आपल्यासमोर आहेत आणि त्यातली दोन भाषणेच आपल्या समोर आहेत. त्यातली विधाने व वक्तव्ये नुसत्या नि:ष्पक्ष दृष्टीने तपासली, तरी अशा हिंसाचाराचे चिथावणीखोर राजकारण कोणाला करायचे आहे; ते लपून रहात नाही. तीनच दिवस आधी राजस्थानात एका सभेत भाषण करताना अशा हिंसाचाराचे आपण व आपले कुटूंबिय बळी आहोत, असे भांडवल करताना राहुल गांधी काय म्हणाले होते? आधी माझ्या आजीला मारले. नंतर माझ्या पित्याला मारले. हे लोक उद्या मलाही मारून टाकतील. असे विधान त्यांनी करण्याची काय गरज होती? कारण मागल्या दहा  वर्षात राहुल गांधी सार्वजनिक जीवनात खुलेआम वावरत आहेत. पण त्यांना ठार मारण्याची धमकी वा शक्यता कुठूनही व्यक्त झालेली नाही. पण त्याच काळात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याच्या अनेक योजनांची माहिती पोलिस व गुप्तचरांनी कित्येकदा समोर आणली आहे.

   रविवारी मोदी यांची पाटण्यात भव्य सभा होती आणि त्यासाठी काही महिने तयारी चालली होती. त्याचवेळी त्या मेळाव्याला अपशकून घडवण्याचा जोरदार प्रयास तिथल्या सत्ताधार्‍यांनीच चालविला होता. आधीच ठरलेल्या त्या सभेला सुरक्षा व्यवस्था देण्याची जबाबदारी राज्यसरकार म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची होती. त्यांनी मुद्दाम मेळाव्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना समारंभाचे आमंत्रण देऊन; एक दिवस पाटण्यात मुक्काम करायचा आग्रह धरला. मग राष्ट्रपती पाटण्यात असल्याने मेळाव्याला सुरक्षा देता येणार नाही, असा कांगावा सुरू झाला. म्हणजेच नितीशकुमार जाणीवपुर्वक मोदींना अपशकून करायला टपलेले होते. पण भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतींच्या नजरेला सत्य आणून दिल्यावर त्यांनीच त्यातून अंग काढून घेतले आणि शनिवारी रात्रीच पाटणा सोडायचे मान्य केले. मुद्दा इतकाच, की मेळावा भव्य होणार आणि त्याला सुरक्षा नाकारायची इच्छा आधीच स्पष्ट झाली होती. त्याचे प्रतिबिंब मग पुढल्या घटनाक्रमामध्ये पडलेले आहे. पण तोही मुद्दा सध्या बाजूला ठेवू या. कारण मेळाव्याच्या दोनतीन तास आधी सभास्थानी व पाटण्यात बॉम्बस्फ़ोट मालिका घडलेली आहे. त्यात रंगेहात पकडलेल्या आरोपीने मोदी हेच आपले लक्ष्य असल्याचे व मुझफ़्फ़रनगरचा सूड म्हणून असे घातपात केल्याचे स्पष्ट सांगून टाकले आहे. पण इतक्या हिंसक घटनेनंतरही तिथे भाषण करणार्‍या मोदींनी आपल्या भाषणात कुठेही त्याचा उल्लेख केला नाही, की आपल्या जीवावर कोणी उठल्याचे भांडवल केले नाही. मात्र भाषणाच्या अखेरीस शांतपणे अपघातही होऊ न देता घरोघरी पोहोचण्याचे आपल्या चहात्यांना आवाहन केले. इथे राहुलसह तमाम विरोधक व खुद्द मोदी यांच्यातला जमीन अस्मानाचा फ़रक लक्षात येऊ शकतो.

   एकीकडे एक नेता आपल्याला मारले जाईल असे अकारण टाहो फ़ोडून सांगतो आहे आणि लोकभावना भडकवण्याचा जाणीवपुर्वक प्रयास करतो आहे. उलट दुसरीकडे दुसरा नेता आहे, ज्याच्या सभा मेळाव्यावर प्रत्यक्षात बॉम्बहल्ला झालेला आहे आणि त्यालाच लक्ष्य करण्यासाठी हल्ला झाल्याचे पुरावे हाती आले आहेत; असा नेता मात्र त्याबद्दल संयमाने मौन पाळतो आहे. आपल्यासमोर असे दोन नेते आहेत. त्यातून कोणाला हिंसा माजवायची आहे व त्यातून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे, ते ओळखता येऊ शकते. दुसरीकडे कोणाला आपला जीव धोक्यात असला तरी त्यापेक्षा सामान्य जनतेची सुरक्षा व सामाजिक शांततेची अधिक फ़िकीर आहे; त्याचा स्पष्ट पुरावा मिळू शकतो. ज्या आवेशात राहुल राजस्थानात ‘मुझेभी मार डालेंगे’ असे म्हणत होते, त्यातून चिथावणी द्यायची होती, हे लपून रहाते काय? उलट मोदींच्या मेळाव्याच्या जागी नेमक्या वेळी प्रत्यक्ष स्फ़ोट घडवले गेले; तरी त्यांनी आपल्या जीवावर कोणी उठला आहे, असा आरोपही केला नाही. केला असता तर त्यांना कोणी नावे ठेवू शकले नसते. पण त्यापासून राजकीय लाभ उठवण्याचा मोह त्यांनी टाळलेला आहे. उलट राहुल गांधी वीस-तीस वर्षापुर्वीच्या आपल्या कुटुंबियांच्या हत्येचे भांडवल आजही करू बघत आहेत, याचीच साक्ष मिळते ना? अकरा वर्षापुर्वी झालेल्या दंगलीसाठी मोदींना अखंड धारेवर धरणार्‍या कुणाही बुद्धीमंत व पत्रकाराला हा लक्षणीय फ़रक का दिसू नये? त्याची वाच्यता कशाला होऊ नये? सातत्याने दंगलीसाठी मोदींना झोडण्यात बुद्धी खर्ची घालणार्‍यांकडे तेच मोदी अत्यंत कमालीचे संयमी व समंजस वागताना दिसले; तर पाठ थोपटण्याची दानतही राहिली नाही काय? राहुल हा पोरकटच आहे. पण इथल्या सेक्युलर बुद्धीचे दिवाळे वाजल्याचाच हा पुरावा नाही काय?

Saturday, October 26, 2013

लौकर निघा वेळेवर पोहोचा



   मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष व कृषीमंत्री शरद पवार यांनी सल्ला द्यावे तसे भाष्य केले होते. राज्यात फ़िरून लोकांना व समस्यांना समजून घेऊन पक्षाची उभारणी करावी लागेल; असे काहीसे पवार बोलले होते. मग पत्रकारांनी संधी साधून एका बातचितीमध्ये राज ठाकरे यांना त्यावर प्रतिक्रिया विचारली होती. तेव्हा आपल्या व्यंगशैलीमध्ये राज ठाकरे म्हणाले होते, पवार कोणाला सल्ले देतात तेच समजत नाही. आपल्याच पुढल्या पिढीला समजावण्याचे सल्ले त्यांनी माझ्या नावे कशाला द्यावेत, तेच लक्षात येत नाही. थोडक्यात पवार नेहमीच असे गुंतागुंतीचे बोलत असतात. मग त्याचा अर्थ लावताना त्यांनी नाव कोणाचे घेतले आणि बोलले कोणाविषयी; तेच शोधत बसावे लागते. आताही राहुल गांधी कॉग्रेसचे भावी पंतप्रधान होण्याच्या संदर्भात बोलताना पवारांनी राहुलचे प्रतिस्पर्धी मानल्या जाणार्‍या मोदींबद्दल असेच काहीसे अनाहुत मतप्रदर्शन केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षातर्फ़े पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. त्यानंतर नव्हेतर त्याच्याही खुप आधीपासून मोदींनी आपल्या ध्येयाच्या दिशेने क्रमाक्रमाने वाटचाल सुरू केलेली आहे. अलिकडल्या काळात मोदींचा वेग वाढला आहे. म्हणूनच महिन्याभरात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणूकांनाही लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा रंग चढू लागला आहे. त्याच संदर्भात पवार यांनी आपले मतप्रदर्शन करताना सांगितले, 'मी आजपर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुकांबाबतचा माझा एकूण अनुभव सांगतो की या क्षेत्रात जो लवकर आणि वेगाने सुरुवात करतो, तो अदृश्यही लवकर होतो.' यातून पवार कोणाबद्दल व काय मतप्रदर्शन करीत आहेत?

   लोकसभा निवडणूका अजून सहासात महिने दूर असताना मोदींनी त्यासाठी आतापासूनच मुलूखगिरी सुरू केली. त्यामुळेच त्यांनी लौकर सुरूवात केली आहे आणि म्हणूनच तितक्याच वेगाने मोदी भारतीय राजकारणातून अस्तंगत होतील; असे भाकित पवारांनी केले आहे. तसे करताना त्यांनी आपल्या मागल्या अर्धशतकातील राजकारणाच्या अनुभवाची पुस्तीही जोडली आहे. आपण चौदा निवडणूका लढवल्याचा हवालाही पवारांनी दिला आहे. त्याचा अर्थ पंतप्रधान व्हायच्या आपल्या महत्वाकांक्षेचा बोजवारा कसा उडाला, त्याचे कथाकथन पवार करीत आहेत, की त्यापासून काही धडा घेण्याचे आवाहन मोदींना करीत आहेत? पवारांचा अनुभव कोणता? बावीस वर्षापुर्वी राजीव गांधींच्या घातपाती हत्येमुळे कॉग्रेसी राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी पवारांनी थेट पंतप्रधान पदावर दावा सांगण्यापर्यंत मजल मारली होती. त्याची फ़लनिष्पत्ती काय झाली? राज्यातले मुख्यमंत्रीपद सोडून तात्काळ दिल्लीच्या आखाड्यात उडी घ्यायला पवारांनी विलंब केला, तोपर्यंत अशा राजकारणात मुरलेल्या नरसिंहरावांनी पवारांना सहजगत्या चितपट केले होते. तिथेही लुडबुड केल्यामुळे पवारांना अकस्मात पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसायला माघारी येण्याची पाळी आली होती. त्यानंतर १९९६-९८ या कालखंडात लोकसभेतील कॉग्रेसचा गटनेता व संसदेतील विरोधी नेता व्हायची संधी पवारांना मिळाली. पण तिथेही आपले पाय रोवून उभे रहाण्याआधीच डावपेचाचे राजकारण खेळताना त्यांना कॉग्रेसमधूनच बाहेर पडायची नामुष्की पत्करावी लागली. थोडक्यात लौकर सुरूवात करणार्‍या पवारांना लौकर आणि घाईगर्दी यातला नेमका फ़रक कळला नाही. म्हणूनच दिल्लीच्या राजकारणातून अस्तंगत व अदृष्य व्हायची पाळी आली.

    महाराष्ट्राच्या विविध हायवे, हमरस्त्यावर वाहन चालकांना सावधानतेच्या सूचना देण्यासाठी फ़लक लावलेले असतात. त्यापैकी एक अशी सुचना असते, ‘लौकर निघा आणि वेळेवर पोहोचा’. महाराष्ट्र उभाआडवा फ़िरलेल्या पवारांच्या नजरेतून ती सुचना निसटलेली दिसते. अन्यथा त्यांनी मोदींना असला सल्ला दिला नसता. वेळेवर सुरक्षित पोहोचण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे ‘लौकर’ निघणे हाच असतो. उशीरा निघून नंतर घाई करणे, अपघाताला आमंत्रणच असते. महाराष्ट्रातल्या रस्त्यावरच्या सूचना क्वचितच वाचलेल्या मोदींनी तोच सल्ला मानला आहे. म्हणूनच नंतर घाईगर्दी करण्यापेक्षा त्यांनी लौकर सुरूवात केली होती. त्यांनी पक्षाने नेमल्यानंतर सुरूवात केली नाही, तर पक्षाने आपलीच उमेदवारी घोषित करावी, यासाठी दोन वर्षे आधीपासून आरंभ केला. त्याकरीता पक्षात व राज्यातच नव्हेतर देशाच्या कानाकोपर्‍यात आपली प्रतिमा व लोकप्रियता निर्माण व्हायचे योग्य प्रयत्न केले. लोकप्रियतेचे ठेकेदार असलेल्या विविध राज्य वा जिल्ह्यातील सुभेदारांना हाताशी धरून पवारनितीने उमेदवारीवर हक्क सांगण्यापेक्षा त्यांनी जनतेतून आपल्या लोकप्रियतेच्या बळावर वाटचाल केली आहे; जे शक्य असून पवारांनी कधीच केले नाही. म्हणून बावीस वर्षापुर्वी खुपच लौकर सुरूवात केल्यावर, प्रत्येकवेळी घाई करून संधीच मातीमोल करणार्‍या पवारांपासून मोदींनी योग्य धडा घेतला आहे. पवारांच्या अनुभवातून मोदी खुप काही शिकले आहेत, पण आपल्याच अपयशातून मोदींनी अनेक धडे घेतल्याचा पवार यांनाच थांगपत्ता लागलेला नाही. पवार स्वानुभवातून शिकले नाहीत, पण पवारांनी केलेल्या चुका मोदींनी पद्धतशीरपणे टाळल्या आहेत. तेव्हा बाकीचे सल्ले बाजूला ठेवून पवारांनी लौकर आणि घाई या दोन शब्दातला फ़रक शिकून घ्यावा. त्यांना पुढे राहुलच्या कारकिर्दीतली राजकीय वाटचाल करताना धोके टाळता येतील आणि अदृष्य व्हायची पाळी येणार नाही.