Thursday, June 7, 2018

शहरी नक्षलवादाचा चेहरा

या वर्षाच्या आरंभी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या अभिवादन समारंभाला विकृत वळण लागले आणि त्याची प्रतिक्रीया नंतर अनेक शहरात दंगली उसळण्यात झाली होती. अर्थात त्या दंगली वा हिंसाचार उत्स्फ़ुर्त होता, असे मानण्याचे काहीही कारण नव्हते. अनेकांनी त्यामागे संघटित प्रयत्न असल्याची शंका तेव्हाच व्यक्त केलेली होती आणि आता त्याचे धागेदोरे काही लोकांची धरपकड झाल्यामुळे समोर आलेले आहेत. मुळातच त्या घटनेच्या आधी पुण्यात शनवारवाडा परिसरात एल्गार परिषद भरवण्यात आलेली होती. त्याचे आयोजक व त्यात सहभागी झालेल्या लोकांचे चेहरेच आंबेडकरी चळवळीला नवखे होते. ज्यांची मुळात कुठल्याही दलित चळवळीशी नाळ जोडलेली नाही वा आंबेडकरी विचारांच्या आंदोलनाशी ज्यांची कधी जवळीक नव्हती, अशा लोकांनी ही परिषद भरवली होती आणि त्यात प्रामुख्याने कुख्यात नक्षली विचारांचा भरणा होता. त्यांनी राज्यातील भाजपा किंवा हिंदूत्ववादी पक्ष संघटनांशी कायम वैर असलेल्या संघटना व्यक्तींना हाताशी धरून ही परिषद योजलेली होती. जंगल भागात हिंसेचे थैमान घालणार्‍या नक्षली हिंसेला शहरात आणण्याचा तो एक प्रयत्न होता. त्यासाठीच अशा संघटनांना हाती धरण्यात आले होते. तेही अकस्मात झालेले नाही. मागली काही वर्षे विद्यापीठे व विविध सांस्कृतिक क्षेत्रात नक्षली विचारांच्या लोकांनी पद्धतशीर शिरकाव करून घेतला आहे. गेल्या लोकसभेत व नंतरच्या विविध निवडणूकांमध्ये पराभूत व नामोहरम होऊन गेलेल्या पुरोगाम्यांना ढाल करून हे नक्षलवादी तो डाव यशस्वी करू शकले. नंतरच्या घटना आपल्या समोर आहेत. एकूणच त्या घटनाक्रमाची मोडस ऑपरेन्डी नक्षली शैलीतली राहिली आहे. जिहाद व नक्षली हिंसेची हीच शैली असते. त्याचे बोलविते धनी बाजूला रहातात आणि निरागस चेहरे बळीचे बकरे म्हणून पुढे केले जातात.

महाराष्ट्रात आंबेडकरी संघटना, संस्था व समाज तसा कायम नेतृत्वहीन राहिला आहे. विविध नेत्यांच्या अहंकाराने त्या चळवळीला विस्कळीत करून टाकलेले आहे. पण तो विचार वा त्याची झिंग असलेली मोठी संख्या सुप्तावस्थेत असते आणि तिच्या भावनेला चुड लावली, तर क्षणार्धात मोठा आगडोंब उफ़ाळू शकतो. त्याचाच लाभ उठवण्याची मूळ योजना होती. त्यासाठी भीमा कोरेगाव हे स्थान व प्रसंग निवडण्यात आलेला होता. तिथे विजयस्तंभापाशी काही घडले तर राज्यभर त्याचे पडसाद उमटवणे शक्य होते आणि त्यासाठी आवाहन करू शकेल असा नेताही हाताशी धरलेला होता. प्रकाश आंबेडकर स्वत: पुण्यातल्या एल्गार परिषदेत नव्हते. पण तिथूनच कोरेगाव भीमाला चिथावणी दिली गेली होती. मात्र त्यासाठी कोणी आंबेडकरांना दोषी ठरवू शकत नव्हता. जे कोणी प्रतिवर्षी विजयस्तंभाला अभिवाद्न करायला जातात, ते नेहमीप्रमाणे तिथे गेले व जातच असतात. पण यावर्षी अचानक तिथली गर्दी वाढली आणि आपल्या आसपास कोण आहेत, त्याचे भान खर्‍या आंबेडकरवादी जनतेला नव्हते. त्य घोळक्यातून आलेल्या काहींनी योजनाबद्ध रितीने हिंसेला चुड लावली आणि त्यात बाकीचा आंबेडकरी समाज अनवधानाने ओढला गेला. स्थानिकांनाही अशा हिंसेची अपेक्षा नव्हती. बचावासाठी स्थानिक रहिवासीही त्यात ओढले गेले. अर्थात ज्यांनी हे सर्व योजना आखून पार पाडलेले होते, त्यांनी पोलिस येण्यापुर्वी व परिणाम होण्यापुर्वी तिथून काढता पाय घेतला आणि खापर आंबेडकरी समाज व स्थानिक रहिवाश्यांवर फ़ुटले. अर्थात कुठलाही गुन्हा आपले धागेदोरे मागे ठेवतो आणि उशिरा का होईना, त्याचा पत्ता लागतोच. आता त्याचे धागेदोरे शोधून काढण्यात पोलिस यंत्रणेला यश आले असून, दिल्ली नागपूर व मुंबईतून त्यातले सुत्रधार पकडले गेले आहेत. नुसतेच संशयित पकडलेले नसून त्यांना त्यात गोवणारी कागदपत्रे व दस्तावेजही हाती लागले आहेत.

वरकरणी यात नक्षलींचा हात असल्याचे म्हटले गेले व आरोपही झाले. पण अशा हिंसाचारी संघटनेपुरता हा विषय मर्यादित आहे काय? असेल तर गोष्ट वेगळी होती. पण जी काही धक्कादायक कागदपत्रे मिळाली आहेत, त्यात विविध राजकीय पक्षांचेही हात असल्याचे दिसते. नक्षली लोकांच्याच खटल्याचे काम बघणारा नागपूरचा एक वकील गडलिंग यात अटक झाला आहे आणि त्याच्यासह दिल्लीच्या विद्यापीठातला कोणी रॉनी नावाचा इसम आहे. त्याखेरीज कबीर कलामंच नावाच्या संघटनेचाही हात असल्याचे सांगितले जाते. दोनतीन वर्षापुर्वी ही संघटना व त्यातले ‘कलावंत’ अशाच आरोपाखाली तुरूंगात गेलेले होते. मागल्या काही वर्षापासून नक्षली घातपाताची पाळेमुळे जंगलातून उखडून टाकण्याची मोठी मोहिम राबवली गेली आहे. त्यामुळे तिथून उध्वस्त होणार्‍यांना शहरात आसरा शोधावा लागतो आहे. त्यातून अर्थात सर्वाधिक गरीब व वंचितांना लक्ष्य केले जाणे स्वाभाविकच होते. त्यासाठीच आंबेडकरी समाज व तशा वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले. विद्रोही साहित्यिक लेखक अशा जाळ्यात सहजासहजी अडकत असतात. त्याखेरीज प्रस्थापिताच्या विरोधात कायम नाराज असलेला वर्गही हाताशी धरणे सोपे असते. जेव्हा अशा व्यापक मोहिमा हाती घेतल्या जातात, तेव्हा त्यासाठी पैसाही आवश्यक असतो आणि तो उभा करणे फ़ार अवघड नसते. राजकीय नाराजांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकत असते. ती रणनिती यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. मोदींच्या विजयाने विचलीत झालेले पुरोगामी व सत्ताभ्रष्ट झालेल्या कॉग्रेसला हाताशी धरण्यात नक्षली नेतृत्वाला अडचण नव्हती. त्यातूनच मग एल्गार परिषदेचा डाव खेळला गेला आणि निदान तो कोरेगाव भीमापुरता तो यशस्वी झाला. त्याची प्रतिक्रीया शहरातून उमटण्यातही यश मिळालेले आहे. मात्र त्याच्या पुढे जाणे शक्य झाले नाही. कारण ही आग गल्लीबोळात घेऊन जाणारी पुरोगामी माध्यमे आज विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत.

ताज्या घटनाक्रमाने आणखी एक गोष्ट साफ़ झाली. आजवर आपण ज्यांच्याकडे माध्यमे वा पत्रकार म्हणून बघत होतो. त्यांचा खरा चेहरा समोर येत चालला आहे. जे लोक उठसुट कुठल्याही बारीकसारीक गोष्टीत लोकशाही, विचारस्वातंत्र्य धोक्यात आल्याच्या आरोळ्या ठोकत होते, त्यांचा मुखवटाही फ़ाटत चालला आहे. रिपब्लिक वा टाईम्स नाऊ अशा वाहिन्या वा अन्य माध्यमांना नक्षली धमक्या मिळणे वा तत्सम इशारे मिळाल्यावरही पुरोगामी पत्रकार व माध्यमे मुग गिळून गप्प बसलेली आहेत. कालपरवा उपरोक्त तीन संशयितांना अटक झाल्यावर एका वाहिनीच्या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांनी संपादकालाच धमक्या दिल्या, पण त्यांचा निषेध करण्याचे सौजन्य अन्य माध्यमांनी दाखवलेले नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर विचारस्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा कांगावा करणारे सगळेच या बाबतीत चिडीचुप आहेत. याचा अर्थच त्यांचे विचारस्वातंत्र्य वा लोकशाही एका विचारधारेपुरती मर्यादित आहे. त्या विचारधारेचे शहाणे, पत्रकार व माध्यमे चळवळी यांना स्वातंत्र्य असले म्हणजे लोकशाही. त्यांच्या विरोधातल्या भूमिकेची गळचेपी म्हणजेही लोकशाहीच असते. अशा लोकांनी इतरांवर बेछूट आरोप व हल्ले करण्याची मुभा म्हणजे स्वातंत्र्य असते आणि इतर कोणी त्यांच्या वागण्याविषयी प्रश्न विचारणेही गुन्हा म्हणजे लोकशाही असते. ही लोकशाही घटनात्मक नक्कीच नाही. ती बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही नक्कीच नाही. ती नक्षलवादी वा साम्यवादी कम्युनिस्ट लोकशाही जरूर आहे. ती माओवादी लोकशाही असू शकते. आता मोदी विरोधासाठी कॉग्रेससह पुरोगामी पक्षही नक्षलवादी हिंसाचाराच्या आहारी गेले असल्याची ही साक्ष आहे. या धरपकडीने आता अनेकांचे चेहरे व मुखवटे टरटरा फ़ाडले जाणार आहेत आणि एका वाहिनीवर बोलताना प्रकाश आंबेडकरांचा मुखवटा नक्कीच फ़ाटला आहे. अनेक रहस्ये आता उलगडत जातील.

5 comments:

  1. शहरी नक्षलवादाचा ढळढळीत पुरावा म्हणजे सकाळ ,लोकसत्ता चा कमेंट सेकंशन !
    एकच व्यकती (कॉमेंट्स चा मॉडरेटर ) असंख्य फेक अकाउंट्स वरून वेगवेगळ्या कमेंट्स टाकत असते . मॉडरेटर म्हटल्यावर ती पत्रकार किंवा पगारी कर्मचारी असणार .
    नेटकरी अंदाज बांधू शकतो कि मुंबईतील कुठली चिनी कम्पनी कुणाला रसद पुरवते ते ,सायबर क्राईम वाले झोपलेत .
    कदाचित अमृताताईंच्या गाण्याबजावण्याची वाट पाहत असावेत .

    ReplyDelete
  2. भाऊ , मत मांडायला संधी दिली म्हणून धन्यवाद !!
    अनेक ढोंगी इंग्रजी भाजपवादी ब्लॉग ,मोदी किंवा भाजपवर कमेंट्स ऍक्सेप्टच करीत नाहीत , आणि केली तरी फेरफार करून खोटी कमेंट टाकतात .
    मात्र तुमची पत्रकारिता आणि ऍप्रोच स्तुत्य आहे .
    शुभेच्छा !!

    ReplyDelete
  3. कर्तुत्ववान हुशार देशभक्त आजोबांचा अतीसुमार बुद्धिमत्तेचा नातु.

    ReplyDelete
  4. वेगवेगळ्या TV channel च्या व वर्तमान पत्रांच्य मालकांची माहिती उपलब्ध झाल्याने त्यांची उद्दिष्ट स्पष्ट आहेत (जी बहुतांशी देशाशी /सामाजिक सौहार्दाशी गद्दारी करणारी) तेव्हा अशांकडून राष्ट्रीय उपयोगी विचार प्रसारीची अपेक्षा ठेवणे व्यर्थच

    ReplyDelete