Thursday, November 26, 2015

‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता



उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट बसला, असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आधीच उंटावर नको तितके ओझे लादलेले असते आणि तेच उचलण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. म्हणूनच एका काडीचे वजन जास्त झाल्याने उंट बसलेला नसतो. तर त्याच्या कुवतीपेक्षा त्याच्यावर बोजा लादण्याचा अतिरेक झालेला असतो. म्हणून मग एक काडीही उंटाला जड होत असते. कुठलाही अतिरेक असेच परिणाम देत असतो. मग चर्चा काडीची करायची नसते, तर अतिरेकाची करायला हवी. आताही तेच झाले आहे. असंहिष्णूतेचे नाटक छान रंगले होते. पण त्याचाही अतिरेक होऊ लागला होता आणि लोकांना त्याचा कंटाळा नव्हेतर संताप येऊ लागला होता. नाटक आणि वास्तव याचे भान नाटककार व नाटकातल्या कलावंतांनीही ठेवायला हवे. अन्यथा त्यांची वेशभूषा व रंगभूशा सामान्य माणासाला खरडून काढायची वेळ येते. एकूणच संहिष्णूतेच्या नाटकाचा तोच अतिरेक होत गेला होता. मुख्यप्रवाहातील माध्यमांपासून राजकीय, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात त्याचा नको इतका अतिरेक झाल्यावर लोक कंटाळले होते आणि हळुहळू लोकांना संताप येऊ लागला होता. अशावेळी त्यात आमिरखानने उडी घेतली आणि तीच मग उंटाच्या पाठीवरची काडी झाली. त्याचा पहिला फ़टका आमिर खानला नव्हेतर त्याला आपल्या जाहिरातीचा ब्रॅड लिडर बनवणार्‍या कंपनीला बसला आहे. स्नॅपडील नावाची इंटरनेट व्यापार कंपनी आहे. आमिर तिच्या जाहिराती करतो. आमिरच्या ताज्या वक्तव्यांनी माध्यमातले पुरोगामी सुखावले असले, तरी त्याचा गाजावाजा करताना पुरोगामी पत्रकार व कलावंत यांनी आपल्याच पायावर आता धोंडा पाडून घेतला आहे. त्याचा पहिला फ़टका स्नॅपडील कंपनीला बसला आहे. आमिरच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीशी काडीमोड घेतला आहे. एका माहितीनुसार दोन दिवसात कंपनीने ३८ कोटीचा धंदा गमावला आहे.

अविष्कार स्वातंत्र्य, संहिष्णूता ही दिवसेदिवस देशात पाखंड व थोतांड बनत चालली आहेत. मग त्यात काळापैसा ओतून लोकांच्या माथी खोट्या गोष्टी व भ्रामक वार्ता मारण्याचा उद्योग चालू राहिला. त्याचा दुष्परिणाम मागल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आला असतानाही, एक वर्षात पुन्हा त्याच नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. आमिरने त्यातच उडी घेतली आणि त्याच्याच पोटावर आता पाय आला आहे. कारण जाहिरपणे काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीच्या मोबाईल खरेदीसुविधेचे साधन आपल्या फ़ोनवरून हटवले आहे. आमिर जाहिरातीत असल्याच्या निषेधार्थ आपण स्नॅपडीलला रामराम ठोकत असल्याच्या हजारो प्रतिक्रिया लोकांनी सोशल माध्यमातून दिल्याच. पण ज्यांनी शांतपणे रामराम ठोकला त्याचे आकडे कंपनीला कळू शकतात. हे आकडे सहा लाखाहून अधिक असल्याने ही कंपनी हादरून गेली आहे. आमिर खानला जाहिरातीतून बाजूला करण्यापर्यंत आपण या कंपनीशी व्यवहार करणार नाही, असा इशाराही काही लोकांनी सोशल माध्यमातून कंपनीला दिला आहे. त्याची सहसा कधी दाद घेतली जात नाही. असे काही माथेफ़िरू असतात. पण जेव्हा आपल्या ऑनलाईन ग्राहकांच्या नोंदबुकातली संख्या झपाट्याने घसरू लागली, तेव्हा कंपनीला खडबडून जाग आली आहे. अर्थात ही सुरूवात आहे. कारण आता माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे प्रभावी झाली असून, व्यापारावरही त्यांची हुकूमत चालते याचा साक्षात्कार यातून घडणार आहे. खरेच स्नॅपडील कंपनीला याचा आर्थिक फ़टका बसला, तर त्यांना आमिरला हटवावे लागेल. किंवा मग अशाच पैशावर नावारुपास आलेल्या आमिरला तरी आपले शब्द मागे घेऊन विरोधाला शरण जाणे भाग पडेल. आणि हे नवे अजिबात नाही, अविष्कार स्वातंत्र्य असो किंवा संहिष्णूतेचे नाटक असो, पैशासमोर सगळे पाखंडी शरण जातात हा जगाचा इतिहास आहे.

आठ वर्षापुर्वी अमेरिकेतली एक घटना त्याचा दाखला आहे. डोनाल्ड आयमस नावाचा अत्यंत लोकप्रिय रेडीओ कलाकार अशाच चक्रव्युहात सापडला होता. अमेरिकाभर त्याच्या रसभरीत खोचक भाषेतील शेरेबाजीसाठी तो प्रसिद्ध होता. शेकडो रेडिओ स्टेशनवरून त्याचा कार्यक्रम प्रसारीत केला जात होता. विविध नेटवर्क तो प्रसारीत करीत होती. रग्गर नामक विद्यापिठाच्या महिला बास्केटबॉल संघाने २००७ साली राष्ट्रीय अजिंक्यपद संपादन केले आणि त्याही अंतिम सामन्यावर आयमसने शेरेबाजी केली होती. त्या संघात बहुतांश कृष्णवर्णिय मुली होत्या आणि त्यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीने वादळ निर्माण झाले. त्याची शेरेबाजी वर्णद्वेषी असल्याचा गदारोळ उठला आणि अनेक संघटनांनी त्याच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अभिजन वर्ग, प्रतिष्ठीत मान्यवर (म्हणजे आपल्याकडे जसे असंहिष्णूतेचे नाटक करणारे आहेत तसे) लोक आयमसच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि बहुतेक नेटवर्क कंपन्यांनी आयमसला हाकलण्यास नकार दिला. ते अविष्कार स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर बंदीची मागणी म्हणजे मुस्कटदाबी व असंहिष्णुता असल्याचा तमाशा चालू झाला. दोन दिवस हा तमाशा जोरात चालला आणि अखेरीस रग्गरचा तो महिला संघ पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आला. त्यांनी एकच भूमिका जाहिर केली. ‘आयमसचा कार्यक्रम प्रसारीत करणार्‍या रेडीओ स्टेशन, नेटवर्क यांच्यावर जाहिरात करणार्‍या कुठल्याही कंपन्या वा जाहिरातदाराला आमचा संघ प्रायोजक म्हणून घेणार नाही’. ही घोषणा झाली आणि एका तासात पाच मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी आयमसचे प्रसारण करणार्‍या नेटवर्कच्या आपण जाहिराती थांबवत असल्याचा इशारा दिला. पुढल्या दोन तासात त्या नेटवर्कने आयमसचे पुढील सर्व कार्यक्रम रद्दबातल केल्याची घोषणा केली होती. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते.

दोनतीन दिवस अविष्कार स्वातंत्र्याचा तमाशा चालला. पण उत्पादक व जाहिरातदार कंपन्यांनी आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखून आयमसला वार्‍यावर सोडून देण्याचा दिलेला इशारा जादूची मात्रा ठरली. तमाम माध्यमे शेपूट घालून शिस्तीत वागू लागली. स्नॅपडील कंपनीवर सोशल माध्यमातून आमिर विरोधात सुरू झालेला बहिष्कार हे अतिरेकी अविष्कार स्वातंत्र्याचे फ़लित आहे. ही नुसती सुरूवात आहे. असा इशारा गोदरेज कंपनीला दिल्यावर त्यांनी आमिर आपला मॉडेल नसल्याचा खुलासा केला आहे आणि स्नॅपडील समोर दुसरा पर्याय नाही. पण आज हे चक्र सुरू झाले आहे, ते कुठवर जाऊ शकते? जे कोणी अशाप्रकारे संहिष्णूतेचे नाटक करत आहेत आणि अतिरेक करीत आहेत, त्यांची मदार जाहिराती व उत्पादक कंपन्यांच्या पैशावर आहे. उद्या आपल्याला नावडत्या भूमिका प्रेक्षक वाचकाच्या गळी मारण्याचा उद्योग असाच चालू राहिला, तर हेच प्रक्षुब्ध सामान्य लोक त्या माध्यमाला जाहिरात देणार्‍या कंपन्या वा तिच्या उत्पादनावर बहिष्कार घालू लागतील, तेव्हा संपादक पत्रकार काय करणार आहेत? उदाहरणार्थ राजदीप वा बरखा दत्त यांच्या खोटारडेपणाला सामान्य माणुस रोखू शकणार नाही. पण त्यांच्या कार्यक्रमाला प्रायोजक असेल त्या कंपनीच्या उत्पादनावर असा सार्वत्रिक बहिष्कार सुरू झाला मग? म्हणजे टाटा चाय प्रायोजक जाहिरातदार असेल आणि अशा बहिष्काराची घोषणा झाली, त्यातून मुंबई वा दिल्लीसारख्या शहरात साप्ताहिक चहाच्या खपात टाटा चहाची विक्री घटली तर काय होईल? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक राजा झाला आहे आणि तोच सुत्रधारही होऊ लागला, तर माध्यमांचे अविष्कार स्वातंत्र्याचे काय होईल? कुठलाही अतिरेक विनाशाला आमंत्रण देत असतो. मग तो मोदीभक्तांचा असो किंवा पुरोगामी विचारवंतांचा असो! संहिष्णूतेचा गळा घोटणारी संहिष्णुता लोकांना आता असह्य झालीय, इतकाच त्याचा अरर्थ आहे.

Wednesday, November 25, 2015

२६/११ आणि तिसरे महायुद्ध



आज २६/११ म्हणजे २६ नोव्हेंबर ही तारीख आहे. जगभर तिची ओळख आहे. कशामुळे ही तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली त्याचे काही स्मरण आपल्याला आहे काय? तर त्या दिवशी किमान दोनशे माणसे मुंबईत हकनाक मारली गेली. रक्ताचे पाट वाहिले आणि त्या फ़ेर्‍यात सापडलेल्या कोणालाही त्यापासून मुक्ती नव्हती. कारण रक्ताला चटावलेले दहा जिहादी पशू इथे मुंबईत आलेले होते. त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती. ते कराचीहून इथे मरायलाच आलेले होते आणि मरताना शक्य होतील तितक्या इतर निरपराधांना ठार मारून मरायचे, असा त्यांचा मनसुबा होता. त्याला हे दोनशेहून अधिक मुंबईकर बळी पडले. त्याखेरीज चारपाचशे मुंबईकर कमीअधिक जखमी झाले वा कायमचे जायबंदी झाले. तो दिवस म्हणून जग २६/११ या आकड्यांची इतिहासातली नोंद आहे. पण ज्या मुंबईत हा रक्तपात घडला तिथल्या मुंबईकरांना त्याचे स्मरण आहे काय? जे मेले वा जायबंदी झाले, त्यांच्यावर ही पाळी कशामुळे आली, आपण त्यातून बचावलो, असा थोडा तरी विचार कोणी मुंबईकर करतात का? अशा अनुभवाचा विचार आपण भारतीयांनी विचार केला असता आणि त्यापासून काही शिकलो असतो, तर मुळात कसाबच्या त्या टोळीला इथे येण्याची हिंमत झाली नसती. त्यांना रक्तपाताचे प्रशिक्षण देवून इथे धाडणार्‍यांच्या मनाला तसा विचारही शिवला नसता. पण तसे घडले, अनेकदा घडतेच आहे कारण आपणच त्यांचे प्रायोजक आहोत. आपल्याच हत्येला, रक्तपाताला प्रोत्साहन देणारा असा जगात दुसरा कुठला समाज वा देश नसेल, ज्याची भारताशी व भारतीय मानसिकतेशी तुलना होऊ शकेल. कुठल्याही ऐतिहासिक अनुभवातून शिकायचे नाही, की येऊ घातलेल्या संकटाला प्रतिकार करायची तयारी करायची नाही, हाच आपला इतिहास आहे. म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

कालपरवा मुंबईत सुधींद्र कुलकर्णी नामक एका माणसाच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडली. कशासाठी काही लोकांनी हा उद्योग केला? तर सुधींद्र कुलकर्णी यांनी खुर्शीद कसुरी नावाच्या पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्र्याला इथे बोलावले होते. त्याच्या पुस्तकाचे वाजतगाजत प्रकाशन करण्याचा समारंभ योजला होता. कोण हा कसुरी? तर जनरल परवेझ मुशर्रफ़ या पाक लष्करशहाचा सहकारी व पाक हेरसंस्थेच्या आश्रयाने चालणार्‍या संस्थेचा मुख्याधिकारी. ह्या हेरसंस्थेनेच मुंबईत कसाबला तयार करून कत्तलीसाठी पाठवला होता. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या मुंबईतल्या सात वर्षापुर्वीच्या कत्तलीत ज्याचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत असा हा खुर्शीद कसुरी! त्याला मुंबईत सन्मानाने बोलावले जाते आणि त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन होताना मुठभर मुंबईकर त्याला काळे फ़ासायला पुढे जातात. तेव्हा त्याच हिंमतबाजांचा निषेध करायला याच मुंबईचे एकाहून एक मोठे बुद्धीमंत वा प्रतिष्ठीत पुढे सरसावतात. निषेध कोणाचा होतो? ज्याचे हात निष्पाप मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, त्याचा निषेध होत नाही. तर त्याला विरोध करणार्‍यांचा निषेध होतो. हे काळे फ़ासणारे मुंबईकरच नव्हेत, बाकीची प्रचंड मुंबई व मुंबईकर संहिष्णू आहेत, असे सांगण्यात धन्यता मानली गेली ना? अगदी महाराष्ट्र सरकारही त्याच मुठभरांवर गुन्हे नोंदवायला पुढे आले. हे मुठभर कोण होते? बाकीची प्रचंड मुंबईकर संख्या कोण आहे? सात वर्षे मागे जा म्हणजे कळेल, की तेव्हाही बाकीची सर्व मुंबईकर लोकसंख्या शेपूट घालून भयभीत झाली होती आणि काही मुठभरच कसाबच्या टोळीशी दोन हात करायला पुढे सरसावले होते. बाकी सगळी मुंबई पुढे आलेली नव्हती. त्या मुठभरांनीच कसाबला आवरला, ठार मारला आणि त्यात आपलेही प्राण गमावले. मगच बाकीच्या लाखो मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला होता.

आज सात वर्षांनी काळ किती बदलला आहे ना? आम्हाला ओंबळे-करकरे आठवत नाहीत. त्यांचे बलिदान आठवत नाही. त्यापेक्षा आम्हाला गुलाम अलीच्या गजला ऐकण्यात स्वारस्य आहे आणि म्हणून त्याला रोखणार्‍यांचा आम्ही निषेध करतो. कसाबचा बोलविता धनी इथे सन्मानाने वागवला जात नाही, म्हणून आम्हाला लाज वाटतेय. आम्हा्ला त्या मुठभरांची लाज वाटतेय, ज्यांनी आपल्यावर गुन्हे ओढवून घेत, तो कार्यक्रम हाणून पाडला. उद्या वेळ आली तर या निषेधकर्त्यांपैकी कितीजण पुन्हा हल्ला झाल्यास कसाबसारख्या मारेकर्‍याला सामोरे जाणार आहेत? असे मुठभर कोणी असतात, जे अभिमानासाठी झीज सोसतात, म्हणून समाजाला सुरक्षितता मिळत असते. कसाबसारख्यांना रोखले जात असते. कसाबला कशासाठी रोखायचे असते? कसाबला मरायचेच होते. पण त्याच्या टोळीने ज्यांना हकनाक ठार मारले, त्यापैकी कोणाला मरायची इच्छा होती काय? त्यांना इच्छेविरुद्ध कशाला मरावे लागले? कोणीतरी कसाबला आधीच ठार मारला असता आणि त्याची मरायची इच्छा पुर्ण केली असती, तर बाकीच्या दोनशे लोकांना हकनाक मरावे लागले नसते ना? पण तसे झाले नाही वा होत नाही. अशा सामान्य लोकांना नेहमीच हकनाक मरावे लागते आणि शांततेच्य थोतांडासाठी हे सामान्य लोक नेहमीच बळीचे बकरे होत असतात. कधी ते मुंबईकर असतात कधी ते पॅरीसकर असतात, तर कधी न्युयॉर्कर असतात. त्यांना मरायचे नसते, पण शांततवाद्यांना मारेकर्‍यांचे चोचले पुरवता यावेत, म्हणून सामान्य लोकांनी बळीचे बकरे व्हावे अशी जगाची रीत झाली आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या समंजसपणासाठी सामान्य माणसाला मरावे लागते आणि युरोपियन युनियनच्या उदारमतवादी हट्टापायी तिथल्या सामान्य माणसाला हकनाक मरावे लागते. त्या सामान्य माणसाचा गुन्हा एकच असतो, तो मुर्खांना शहाणे समजून जगत असतो.

लिओ ट्रॉटस्की हा रशियन विचारवंत नेता म्हणतो, ‘तुम्हाला भले युद्ध नको असेल, पण तुम्ही मात्र युद्धाला (बळी म्हणून) हवे असता.’ त्याचा अर्थ समजून घेतला तर आपण असुरक्षित कशामुळे असतो, हे लक्षात येऊ शकेल आणि जीवन अधिक सुरक्षित होऊ शकेल. आपले दुर्दैव असे, की अशा जटील प्रश्नांची सोपी सुटसुटीत उत्तरे नसतात आणि फ़सवी उत्तरे आपल्याला नेहमीच भुरळ घालतात. मग आपण कसायाला शरण जात असतो. कधी तो हातात बंदूक घेऊन येतो, तर कधी साळसूद चेहरा लावून शांतता सामंजस्याचे मुखवटे लावून आपल्याला मृत्यूच्या गर्तेत लोटून देत असतो. कसाबला मरायचेच होते. अशा हल्ल्यानंतर आपण सुखरूप निसटणार नाही, हे त्यालाही ठाऊक होते. पण त्याच्या हातून जे मारले गेले, त्यांना तर कसाबला मारायचे नव्हते? त्यांना कुणालाच मारायचे नव्हते? स्वत:ही मरायचे नव्हते ना? मग त्यांच्या नशीबी हा असा हिंसक क्रुर मृत्यू कशाला यावा? तर युद्ध हे त्याचे उत्तर आहे. ते तुम्हाला नको असल्याने टाळता येत नाही. कारण कुणाला तरी युद्ध हवे असते आणि तो तुमच्यावर युद्ध लादत असतो. तेव्हा त्याच्यापासून पळ काढून सुरक्षा मिळत नसते की युद्धाची स्थिती नाकारून जगता येत नसते. त्याला सामोरे जाऊन अशा युद्धखोरीचा नि:पात करणे, हाच एकमेव मार्ग असतो. थोडक्यात ज्याला युद्धाची खुमखुमी असते, त्याच्यावर युद्ध लादून त्याचा खात्मा करणे, हाच एकमेव युद्ध थांबवण्याचा मार्ग असतो. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली व तसे प्रयत्न झाले. म्हणून युद्धे टळली नाहीत, की त्यात मरणार्‍या माणसांना जीवदान मिळू शकले नाही. उलट युद्धापेक्षा अधिक संख्येने माणसे मारली गेलीत. युद्धापेक्षा शांततेने अधिक लोकांचा बळी घेतला आणि सुरक्षेचे तर कुठे दुरदुर दर्शन होत नाही. किंबहूना त्याच पळपुट्या शांततावादाने जिहाद नावाचा भस्मासूर उभा केला आहे, जो आता तिसर्‍या महायुद्धाचे अक्राळविक्राळ रुप धारण करून सामोरा येतो आहे.

Tuesday, November 24, 2015

मुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे?



एक मुस्लिम डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनाची अपेक्षा करत असेल तर त्याला कांगावा म्हणावे काय? त्याला कांगावा संबोधणे क्रुर नाही काय? आस्था, आपुलकी वा प्रेमाची भाषा आम्हाला समजत नाही काय? अशी शंका आधीचा लेख वाचून अनेकांच्या मनात नक्की अलेली असणार. पण त्या व्यक्तीने जो फ़लक झळकवला आहे, तो वाचून त्यातला अर्थबोध कितीजण घेतात? ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ हे वाचणे ठिक आहे. पण त्यातला अर्थ असा, की मुस्लिमांवरचा इतरांचा विश्वास उडाला असला तरी मुस्लिम मात्र बिगरमुस्लिमांवर विश्वास ठेवून आहेत. यात कितपत तथ्य आहे? आज जगात किती ठिकाणी आपल्याला मुस्लिमांविषयी अविश्वास दिसून येतो? तेही बाजूला ठेवा. मुस्लिमांनी अन्य कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमांवर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना? इसिस वा सुन्नी मुस्लिम अन्य पंथाच्या मुस्लिमांशी तरी विश्वासाने वागतात काय? जगातली आजची समस्या मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी नसून, त्यांच्या कडव्या धर्मश्रद्धांनी उभी केलेली समस्या आहे. कारण एक मुस्लिमच दुसर्‍या पंथाच्या मुस्लिमाच्या विश्वास व श्रद्धा नाकारून त्याच्या जीवावर उठलेला असल्याचे सातत्याने दिसते आहे. सवाल बिगरमुस्लिमाने मुस्लिमावर विश्वास दाखवण्याचा नसून, मुस्लिमाने अन्य पंथीय मुस्लिमावर विश्वास दाखवणेही खुप शांतता निर्माण करू शकेल. इसिसने कोणा अन्य धर्मियाची कत्तल केली, तो विषय सोडून द्या! त्यांनी सर्वाधिक कत्तल मुस्लिमांचीच केली आहे आणि त्यातून पन्नास लाख मुस्लिमच इस्लामी देशातून निर्वासित झाले आहेत. त्यांना आश्रय द्यायला कुठला मुस्लिम देश पुढे आला आहे? निर्वासिताचे लोंढे धावत पळत सुटले आहेत, त्यांना कुठला मुस्लिम (देश) विश्वासाने जवळ घेतो आहे काय?

एक साधी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते आहे. युरोपकडेच नव्हेतर अन्य पाश्चात्य देशांकडे आणि अतिदूर ऑस्ट्रेलियापर्यंत मुस्लिम देशातील निर्वासितांचे लोंढे धावत आहेत. जे देश मुस्लिम नाहीत वा ख्रिश्चन वा सेक्युलर आहेत, तिथेच हे मुस्लिम निर्वासितांचे लोंढे कशाला धावत सुटले आहेत? त्यांचा आपल्याच धर्माचे मुस्लिमांचे राज्य असलेल्या देशावर, तिथल्या मुस्लिम सत्ताधीशांवर किंवा तिथे वसलेल्या मुस्लिमांवर विश्वास नसल्याचे ते लक्षण नाही काय? सिरीया, इराक, पॅलेस्टाईन, लिबीया वा अफ़गाण अशा देशातले हे मुस्लिमांचे तांडे शेजारीच जवळ असलेल्या सुखवस्तू श्रीमंत सौदी, कुवेत ओमान वा आखाती तेलसंपन्न देशात आश्रयाला का जाऊ धजलेले नाहीत? तर तिथे आपल्याला कोणी स्विकारणार नाही. आपलेच धर्मबंधू मुस्लिम नागरिक वा सत्ताधीश गोळ्या घालून पिटाळून लावतील, हाच त्या निर्वासित मुस्लिम लोंढयांना वाटणारा विश्वास आहे ना? म्हणजेच आज जगापुढली सर्वात मोठी विश्वासाची समस्या आहे, ती मुस्लिम बिगरमुस्लिम अशी नसून मुस्लिमांचाच मुस्लिमांवर विश्वास उरलेला नाही. मग अशी आलिंगनाची नाटके हवीत कशाला? मुस्लिम असून इतरांवर विश्वास ठेवणे सोपे आणि नैसर्गिक आहे. सवाल मुस्लिमाने मुस्लिमांवर विश्वास ठेवण्याचा आहे. बिगर मुस्लिमाच्या जीवनशैलीत इतर धर्मियांवर विश्वास ठेवणे ही समस्याच नाही. सवाल मुस्लिमांच्या विश्वासार्हतेचा आहे. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमावर विश्वास ठेवू शकत नाही. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमाच्या जीवावर उठलेला आहे. तेव्हा समस्या समजून घेतली पाहिजे. मुस्लिमांवर इतरांचा विश्वास असणे नसणे ही समस्याच नाही. मुस्लिमांमध्येच आपसात विश्वासाला तडा गेलेला आहे. त्याची सर्वात मोठी साक्ष म्हणजे आखाती मुस्लिम देशांनी आपल्याच धर्मबंधू मुस्लिम निर्वासितांना वार्‍यावर सोडून दिले आहे, तर बिगर मुस्लिम देशांनी त्यांना आश्रय दिलेला आहे.

मग हे नाटक कशाला? जेव्हा आश्रय देणार्‍यांवरच मुस्लिम जिहादी अतिरेक्यांनी प्राणांतिक हल्ला केलेला आहे, तेव्हा सवाल नाटकाचा नसून कृतीचा आहे. बेल्जमपासून तमाम युरोपियन देशांनी अशा आलिंगनातून आपल्या देशात व जीवनात असलेली सुरक्षितता धोक्यात आणली आहे. मजेची गोष्ट म्हणजे मुस्लिम देशातून हजारो मैल दूर निर्वासित पळत आहेत. युरोपातील कडाक्याच्या थंडीत उघड्यावर पडलेले आहेत आणि कुणी कुराणाचा अवमान केला, म्हणून दंगलीही करीत आहेत. त्यानंतरही हा तमाशा सोसण्याची परमावधी युरोपियन देशांनी दाखवली आहे. पण शेजारी सौदी अरेबिया नामक मुस्लिम देशात एकाच वेळी ३० लाख लोकांना तात्पुरता आश्रय देता येईल, इतकी यंत्रणा सज्ज आहे. हाज यात्रा करायला येणार्‍या जगभरातील मुस्लिमांना तात्पुरती वास्तव्याची सुविधा म्हणून उभारलेली ही व्यवस्था ३० लाख लोकांना आश्रय देवू शकते. तिथे अद्ययावत नागरी सुविधा आहेत. पण देशोधडीला लागलेल्या आपल्याच धर्मबांधवांना सौदी तिथे घ्यायला आश्रयाचे आलिंगन द्यायला तयार नाही. याला कसला विश्वास म्हणायचे? की सौदी राजे व मक्का मदिना या प्रमुख धर्मस्थळांचे राखणदारच मुस्लिम नाहीत आणि ते मुस्लिमांवरही विश्वास ठेवत नाहीत असा दावा आहे? सवाल म्हणूनच मुस्लिमाने बिगर मुस्लिमांवर विश्वास असल्याचे नाटक रंगवण्याचा नाही. सवाल मुस्लिमांनीच आपल्याच धर्माच्या इतर पंथाच्या अनुयायांवर विश्वास दाखवण्याचा विषय आहे. त्यावरून इतरांचे लक्ष उडवण्याचे हे नाटक आहे. आपला धर्म आपल्याला कुणावरच विश्वास ठेवू देत नाही आणि अगदी आपल्याच धर्माच्या अन्य पंथांचाही द्वेष करायला शिकवण देतो, या वास्तवापासून इतरेजनांची दिशाभूल करण्याचा हा कांगावा आहे. यात किंचित प्रामाणिकपणा असता, तरी हे फ़लकधारी व डोळ्यांवर पट्टी बांधणारे मुंबई पॅरीसपेक्षा सौदीच्या रस्त्यावर जाऊन तसे उभे राहिले असते.

आपण मुस्लिम आहोत आणि आपल्याच धर्माच्या शिकवणूकीचा आधार घेऊन हजारो निरपराधांची नित्यनेमाने जगात कुठेतरी हत्या चालली आहे, तर आपल्या धर्माची शिकवण बदनाम होते आहे, याचे तरी भान असायला नको का? सुन्नी लोक शिया मुस्लिमांची हत्या करत आहेत. सिरीयातील मुस्लिमांना घरदार सोडून परागंदा व्हावे लागले आहे. जगात कुठेही मुस्लिमांचा हिंसक चेहरा समोर आला आहे. अशा वेळी ज्या धर्माच्या प्रेरणेने हे चालले आहे असा दावा केला जातो, त्याला आव्हान देण्याची गरज आहे. किंबहूना आपल्या धर्माची चाललेली विटंबना रोखण्यासाठी तरी इतर धर्मातील लोकांना येऊ घातलेल्या धोक्यापासून सावध करण्याची प्रामाणिक गरज आहे. अशावेळी हे आलिंगनाचे नाटक म्हणूनच घातपाताचाच प्रकार आहे. दोन महिन्यापुर्वी बाहू पसरून युरोपियन देश निर्वासितांचे स्वागत करत होते. त्या लोंढ्यातून काही जिहादी येतील, ही शंकाही कुणाच्या मनात आली नाही. कारण आलिंगनाची नशाच और असते. आता दोन महिन्यानंतर पॅरीसमध्ये आलिंगनाचे धमाके झाल्यावर तिथे सरकार व लोकांना जाग येऊ लागली आहे. बेल्जमने तर सगळ्या सार्वजनिक सुविधा ठप्प करून एक एक घराची झडती आरंभली आहे. त्याला विश्वासाला तडा जाणे म्हणतात. तो विश्वास तोडणारे कोणी बिगरमुस्लिम नाहीत तर मुस्लिमच आहेत. आणि त्यांचे डाव हाणुन पाडण्यानेच विश्वासाचा पुरावा समोर येऊ शकतो. आपण मुस्लिम असण्यापेक्षा आपण हिंसक जिहादी तत्वज्ञानाचे विरोधक आहोत, असे फ़लक घेऊन रस्त्यावर मुस्लिमांनी उतरण्याची गरज आहे. आज असे आलिंगनाचे नाटक रंगवावे लागते आहे, कारण मुस्लिमांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि अकारण कुठल्याही मुस्लिमाकडे लोक संशयाने बघू लागलेत. त्यावरचा उपाय आलिंगनाचे नाटक नाही, तर आपल्या आसपास जिहादी शिकवण देणार्‍यांना शोधून पोलिसांच्या हवाली करण्याची गरज आहे. त्याची शक्यता किती आहे?

तिसर्‍या महायुद्धाची चाहुल



“You may not be interested in war, but war is interested in you.” ― Leon Trotsky

आज मंगळवारी सिरीयातील जिहादी अतिरेक्यांवर हल्ला करायला नेहमीप्रमाणे उड्डाण केलेल्या रशियन लढावू विमानाला तुर्कस्तानच्या लष्कराने विमानविरोधी हल्ला करून पाडले. ही येऊ घातलेल्या महायुद्धाची चाहुल आहे. आपण ज्याला जिहाद वा दहशतवाद म्हणून चिवडत बसतो, त्याने आता जगाच्य राजकारणाची सुत्रे हाती घेतली असून, त्यात एकामागून एक देश ओढले जात आहेत आणि ओढले जाणार आहेत. सात दशकापुर्वी पुन्हा युद्धाचा विध्वंस नको म्हणून स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या उदारमतवादी भूमिकेचे हे पाप आहे. त्यामुळेच महायुद्धात जितकी माणसे मारली जणार नाहीत, त्यापेक्षा अनेकपटीने लोक उदारमतवादी शांततेच्या भूमिकेने बळी घेतले आहेत. राजकारण वा राजकीय तत्वज्ञान कोणतेही असो, त्याला सत्तेची ओढ लागली, मग असे डावपेच खेळले जातात, की युद्ध नको म्हणत जग युद्धाच्या खाईत लोटले जात असते. जिहाद नावाच्या भस्मासूराला ज्या उदारमतवादी राजकारणाने जोजवले, त्याचे खरे स्वरूप आता समोर येत चालले असून, येत्या काही महिन्यात वा वर्षात जग युद्धाच्या खाईत लोटले जाणार आहे. आज सिरीयात हवाई हल्ला करायला गेलेल्या रशियन लढावू विमानाला पाडून तुर्कस्तानने त्याची नांदी केली आहे. प्रथमच दोन देशांत थेट युद्धाची स्थिती उभी ठाकली आहे. ज्यापैकी एका बाजूला अमेरिका तर दुसर्‍या बाजूला रशिया खडा उभा आहे. दिसायला भले हा दोन देशातील वाद दिसेल. पण रशियाने उघड इराण व सिरीयाच्या राजसत्तेशी हातमिळवणी केली आहे आणि अमेरिका आधीपासूनच सौदी व तुर्की यांच्याशी इसिसला मदत देण्याबाबत संमनमत करून बसली आहे. राहिला प्रश्न युरोपमधल्या प्रगत राष्ट्रांचा व नंतर उदयास आलेल्या भारत, ब्राझील, चीन वा अन्य देशांचा! त्यांना यापासून फ़ार काळ अलिप्त रहाता येणार नाही. म्हणूनच हा सगळा गुंता समजून घ्यावा लागेल.

युद्ध कोणालाच नको असते. पण ते व्हायलाही पर्याय नसतो. कारण युद्ध तुमच्या इच्छेनुसार होत नाही, की टाळता येत नाही. युद्ध तुमच्यावर लादले जात असते आणि मग त्यापासून सुटका नसते. आपला बचाव करणे किंवा पराभव मान्य करून शरण जाणे; इतकेच पर्याय असतात. यात मग युद्ध नको आणि शांतता हवी असा घोषा लावणारेही तितकेच जबाबदार असतात. तालिबान, मुजाहिदीन, अलकायदा, बोको हराम, इसिस वा तत्सम डझनावारी जिहादी गट कुठल्या ना कुठल्या समर्थ देशाच्या पैशाने व पाठबळानेच हिंसाचार करीत असतात. इसिसचे दैनंदिन उत्पन्न पंधरा लाख डॉलर्स इतके आहे. हे कुठून येत असते? नुसते बलात्कार करून वा बॉम्ब फ़ोडून पैसे मिळत नाहीत. लूटमारीतून इतकी प्रचंड रक्कम दरोडेखोरही मिळवू शकत नाहीत. मग इसिसला इतके दैनंदिन उत्पन्न कुठून मिळते? त्यांनी व्यापलेल्या इराक व सिरीयातील प्रदेशातल्या खनीज तेलाच्या खाणीतून आजही तेलाचा उपसा चालू आहे आणि त्याची विक्रीही चालू आहे. त्यातूनच हा पैसा येत असतो. शिवाय असदला नामोहरम करण्यासाठी व जिंकलेल्या प्रदेशावर आपला कब्जा राखण्यासाठी त्या हिंसक संघटनेला सौदी व आखाती देशांकडून रितसर पैसे-हत्यारे मिळत असतात. युरोपातून तुर्कस्थान मार्गे कोणीही अन्य देशातला मुस्लिम सुखरूप इसिसमध्ये लढवय्या व्हायला पोहोचू शकत असतो. बदल्यात इसिस चोरलेले वा उपसलेले खनीज तेल तुर्कस्थानला बहाल करीत असतो. अमेरिका व नाटो इसिसचा बंदोबस्त करीत नाहीत. पण इसिसचा कणा मोडू बघणार्‍या सिरीयाच्या असदशी निष्ठावान सैन्यावरच हल्ले करतात. पर्यायाने इसिस बळकट होत गेली, शिरजोर होत गेली. रशियाने त्यात हस्तक्षेप केल्यावर इसिसचा दबदबा संपू लागला तरी रशियाला उघडपणे अमेरिका वा सौदी आव्हान देवू शकत नव्हते. म्हणून तुर्कस्थानला पुढे केलेले आहे.

रशियन लढावू विमाने आपल्या हवाई हद्दीचा भंग करीत असतात, अशी तुर्कस्थानची तक्रार होती. तेच कारण पुढे करून त्यांनी मंगळवारी एक लढावू विमान पाडले आहे. पण आपल्या हवाई दलाने तुर्कस्थानच्या हवाई हद्दीचा कुठेही भंग केलेला नाही, असा दावा रशियाने केलेला आहे. त्यात तथ्यही दिसते. कारण पडलेले रशियन विमान कित्येक किलोमिटर्स आत सिरीयाच्या प्रदेशात पडलेले आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानवर पाठीत वार केल्याचा आरोप केला आहे. तो करताना त्यांनी विमान पाडणारे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचेही म्हटले आहे. मध्यंतरी पुतीन यांनी चाळीस देश इसिसला सहाय्य करीत असल्याचा आरोप केला होता. आता तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी तुर्कीवर इसिसचे साथीदार असल्याचा आरोप केला आहे. मजेची गोष्ट म्हणजे हा आरोप फ़क्त तुर्कस्थानला लागत नाही. कारण तो देश अमेरिकाप्रणित नाटो लष्करी आघाडीचा सहसदस्य आहे. म्हणजेच इसिसचा पाठीराखा अमेरिका व सौदी असल्याचाच अप्रत्यक्ष आरोप पुतीन यांनी केला आहे. त्यात तथ्यही वाटते. कारण जोवर सिरीयाचा अध्यक्ष असद व त्याचे सैन्य कमकुवत होते, तोवर अमेरिका वा तुर्कीने कुठलेही हल्ले सिरीयात केले नव्हते आणि इसिसला शिव्या घालत प्रत्यक्षात असदच्या अधिकृत राष्ट्रीय सेनेला कमकुवत करण्यात धन्यता मानलेली होती. पण रशियाने सिरीयाला मदत देण्यासाठी इसिसच्या प्रभावक्षेत्रात सरसकट हल्ले सुरू केले, त्यात इसिसचा कणा मोडला आहे. त्यांना वाचवायचे तर रशियन हल्ल्यांना पायबंद घालणे आवश्यक आहे. तुर्कस्थानने रशियन विमान पाडून तेच काम केले आहे. मात्र त्यातून थेट दोन देशांना एकमेकांशी भिडण्याचा प्रसंग येऊ शकतो. कारण पुतीन शांतपणे हा प्रतिहल्ला सहन करतील अशी शक्यता नाही. म्हणूनच ही येऊ घातलेल्या महायुद्धाची नांदी वाटते.

अनेकांचा असा गैरसमज आहे की या युद्धाचा, हवाई हल्ल्याचा वा तिथून निघालेल्या निर्वासितांचा मामला सिरीया, इराक वा युरोपपुरता मर्यादित आहे. भारताचा त्याच्याशी काय संबंध? आपण युरोपपासून खुप दूर आहोत आणि सिरीया इराकही मैलोगणती दूर आहेत. युद्ध पेटले तरी आपल्यावर त्याची सावलीही पडणार नाही, असेही वाटू शकते. पण वस्तुस्थिती खुप भयंकर आहे. आपल्याला दिसत आहेत वा दाखवले जात आहेत, ते एका भयंकर जटील कोड्याचे अनंतविध तुकडे आहेत. ते संगतवार मांडले, तरच त्याचा खरा अर्थबोध होऊ शकेल. मग छोटा राजनला मायदेशी आणणे असो, किंवा पुरस्कारवापसी असो. अकस्मात देशात असंहिष्णूतेचे काहूर माजवून निर्माण केला जात असलेला भयगंड असो, किंवा दिड वर्षात पंतप्रधान मोदींनी लागोपाठ केलेले विविध देशांचे दौरे असोत. मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी पाकिस्तानची ‘मागितलेली मदत’ असो, किंवा सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याला मुंबईत आणून सन्मानित करताना सोसलेली मानहानी असो. फ़ोर्ड फ़ौडेशनचे अब्जावधीचे देशात येणारे निधी व त्याचे लाभार्थी असोत, वा मॅगसेसे वा नोबेल पारितोषिके असोत. यांचा येऊ घातलेल्या युद्धाशी, पेटलेल्या जागतिक जिहादशी, जगभर उत्पन्न झालेल्या राजकीय अस्थीरतेशी कसा गुंतागुंतीचा संबंध आहे, ते उलगडायला हवे. तरच मंगळवारी रशियन विमान तुर्कीने पाडण्यातून काय भयंकर भविष्य पुढ्यात वाढले आहे त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. किंबहूना येत्या काही दिवसात तीच गुंतागुंत उलगडण्याचा प्रयास मी करणार आहे. सहज डोळ्यांना न दिसणारे हे विस्काटलेले धागे जुळवून व्यापक परिस्थितीचे चित्र उभे करायचा माझा प्रयास असेल. त्यामुळे काहीकाळ स्थानिक राजकारण वा त्यामधले दुवे मांडण्याला वेळ देता येणार नाही, की मित्रांच्या प्रश्न शंकांना उत्तरे वा खुलासे देता येणार नाहीत. तेव्हा कृपया तसा आग्रह धरू नये ही नम्र विनंती!

Monday, November 23, 2015

तुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र

   

प्रिय तुकारामजी ओंबळे,

मला ठाऊक आहे की हे पत्र वाचायला तुम्ही आज हयात नाही. खरेच ती किती चांगली गोष्ट आहे ना? कारण जखमी होऊन हयात राहिला असता, तर पश्चात्तापाने तुम्ही त्या विकलांग अवस्थेत आत्महत्याही करू शकला नसता. त्यापेक्षा अजमल कसाबला ‘आलिंगन देवून तुम्ही या जगाचा निरोप घेतलात, तेच खुप चांगले झाले. किंबहूना तेव्हा देश किती संहिष्णू व सुरक्षित होता, त्याचीच तुम्ही आपल्या ‘आलिंगन’ कृतीतून साक्ष दिलीत. ज्या गिरगाव चौपाटीवर तुम्ही कसाबला असे आलिंगन दिलेत, तिथेच आजची तरूण पिढी कुणा मुस्लिमाला विश्वास असल्याचे सांगायला आलिंगन द्यायला पुढे जाताना बघितल्यावर तुमच्या कृतीचा जो अर्थ घेतला गेला हे तुम्हाला कितपत मानवले असते? देश सुरक्षित होता म्हणून त्याने संहिष्णूतेचा आदर्श निर्माण केला ना तेव्हा? कसाबच्या टोळीचे दहा शांतता सैनिक सागरी मार्गाने मुंबईत आले आणि त्यांनी कशी स्मशान शांतता प्रस्थापित केली होती ना? त्या ओबेराय टॉवर्स, ताजमहाल या पंचतारांकित हॉटेलपासून बोरीबंदरच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकातही किती शांतता पसरली होती ना? शाहरुख, आमिर वा मणिशंकर अय्यर व सुधींद्र कुलकर्णी किती सुखावले होते? देशातले तमाम पुरोगामी विचारवंतही शांत बसले होते. तुम्ही त्या कसाबला ‘आलिंगन’ दिलेत आणि त्या शांतता सोहळ्याची समाप्ती झाल्यावर बुद्धीमंतांनी ‘मुंबई स्पिरीट’ म्हणून त्या संहिष्णू सोहळ्याचा दांडगा समारोह गेटवेपाशी साजरा केला होता. तेव्हाही इथल्या तरूण पिढीने तिथे मेणबत्त्या पेटवायला झुंबड उडवली होती. आमच्यासारखे मुठभर लोक मात्र तुम्ही आणि करकरे, साळसकर, कामथे इत्यादी लोक शहीद झाल्याचा अंधश्रद्ध टाहो फ़ोडून आक्रोश करीत राहिले. पण इतक्या मोठ्या देशात काही लोक तरी मुर्ख अंधश्रद्ध असणार ना? बरे झाले हे सर्व बघायला तुम्ही हयात नव्हता.

आता तो अमिर खान काय म्हणाला ऐकलेत? त्याच्या पत्नीला देश असुरक्षित वाटतोय. स्वाभाविकच आहे. मागल्या दिड वर्षात देशात कुठेही मोठी घातपाताची घटना घडलेली नाही, देशातले जिहादी हिंसाचाराचे प्रकार अकस्मात थंड पडलेत. माणसे हकनाक मारण्याच्या तमाम उदात्त शांततामय मोहिमा संपुष्टात आल्यात. मग देशाच्या सुरक्षेची चिंता खर्‍या संवेदनाशील माणसांना भेडसावणारच ना? त्यांनी नाही तर कोणी टाहो फ़ोडायचा अशा काळात? ओंबळेजी, तुम्ही गेल्यापासून मागल्या सात वर्षात देशातली भाषा व शब्दकोषच काहीच्या काही बदलून गेलेत. तुम्ही ज्या अर्थाने सुरक्षा, संहिष्णूता वा शांततेचा अर्थ लावत होता, त्याच्या उलट अर्थाने आजकाल सगळे शब्द वापरले जातात. कोणीही उठून देशाच्या पंतप्रधानाची खिल्ली उडवू शकतो, इतकी इथे अविष्कार स्वातंत्र्याची सध्या गळचेपी झालेली आहे. कुणालाही देशात आंदोलन करण्याची मुभा असल्याने लोकशाही धोक्यात आलेली आहे. खुल्या वातावरणात मुक्त मतदान व निवडणुका होत असल्याने, देशात एकप्रकारे भयंकर हुकूमशाही प्रस्थापित झाली आहे. माणसे किती हिंसक झालीत ठाऊक आहे? कालपरवा तुमच्यासारखेच कर्नल संतोष महाडिक काश्मिरात जिहादींकडून मारले गेले. त्यांची पत्नी आपल्याला पतीच्या जागी सैन्यात भरती करावे, अशी इच्चा व्यक्त करते. किती हा हिंसेचा हव्यास ना? नाहीतर आमच्या आमिर खानची पत्नी किरणकडे बघा. ती इतक्या सुरक्षित भारतात वास्तव्य करायलाच घाबरून गेली आहे. तिच्यासह आमिरला भारतातली सुरक्षा भयभीत करू लागली आहे. देश सोडून कुठे इराक सिरीया वा हिंसाग्रस्त युरोपात जायचे डोहाळे त्यांना लागले आहेत. सर्वच शब्द आणि त्यांचे अर्थ कुठल्या कुठे बदलून गेलेत. आजची भाषा तुम्हाला कळली नसती ना? किती बदलून गेला ना आपला देश ओंबळेजी?

एका बाजूला तुमच्या बलिदान स्थळी कसाबचा धर्मबंधू फ़लक घेऊन आपल्यावर विश्वास ठेवायचे आवाहन करतोय आणि दुसरीकडे त्याचाच धर्मबंधू आमिरखान देशावर विश्वास राहिला नाही म्हणून ग्वाही देतोय. विश्वास, सुरक्षा, संहिष्णूता, प्रतिष्ठा, न्याय कशाला म्हणून नेमका अर्थ उरलेला नाही. दोन दिवसांनी तुमचे व सहकार्‍यांचे पुण्यस्मरण करायचा दिवस आहे. किती तरूण मुंबईकर तिकडे फ़िरकतील याची मला शंका आहे. पण त्याचवेळी आमिरखान, शाहरुखखान यासारखे महानुभाव रस्त्यात विश्वास दाखवा म्हणून ‘आलिंगन’ मागायला उभे राहिले; तर कोट्यवधी तरूण तरूणी तिथे धावतील. त्यातल्या कुणाला सुद्धा तुमची आठवण उरलेली नाही. देशप्रेम आता शहीद शिकवत नाहीत, त्याचा वास्तवाशी संबंध नाही. तुमच्यासह कित्येकांची कुटुंबे उध्वस्त होऊन गेली. कशासाठी? तर देश व भारतीयांना सुरक्षित राखण्यासाठी, अशी माझ्यासारख्या काही बेअक्कल लोकांची समजूत आहे. कालपरवा कर्नल महाडिक त्यासाठीच हरपले असे मला वाटते. पण तो निव्वळ मुर्खपणा असतो, आजच्या व्याख्येनुसार! तुमच्या अनाथ झालेल्या कन्येला पित्याप्रमाणे पोलिसात जावेसे वाटले, पण परदेशी पळून जायची कल्पनाही तिच्या मनाला शिवली नाही. घर उध्वस्त झाले याचे भान विसरून कर्नल महाडीक यांची पत्नी सैन्यात भरती व्हायला बघते. याला असंहिष्णुता म्हणतात आजकाल. संहिष्णूता व सुरक्षा आपल्याला किरण खान शिकवतात. त्यासाठी रामनाथ गोयंका फ़ौंडेशन व्यासपीठ उपलब्ध करून देते. तुम्हा शहीदांच्या कुटुंबिय पत्नीच्या भावना मांडायला कुठले व्यासपीठ उरलेले नाही. कारण हे तुमचे कुटुंबिय असंहिष्णू वा हिंसक काहीतरी बोलण्याचीच शक्यता भयभीत करते आजच्या बुद्धीवादाला. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे खुप चांगले झाले. अन्यथा मरणाच्या यातनांपेक्षा अधिक वेदना सहन कराव्या लागल्या असत्या तुम्हाला!

आजकाल आम्ही भारतात रहातच नाही. आम्ही जगतो, ‘आयडिया ऑफ़ इंडिया’ नावाच्या भासमात्र जगात! त्याचा वास्तवातल्या कुठल्याही घटना घडामोडींशी संबंधच उरलेला नाही. आमचे जग टिव्हीच्या पडद्यावर असते आणि चित्रपटाच्या कथानकातून वा काल्पनिक कथा कादंबर्‍यातून आम्ही जगतो. आमच्या त्या कल्पनिक जगात खर्‍या धोक्याच्या जाणिवा नसतात. मात्र काल्पनिक भ्रामक भितीने आम्ही पछाडलेले असतो. जिथे म्हणून हिंसेने थैमान घातले आहे, त्यात शांतता सुरक्षा दिसू लागते आणि शांत सुरक्षित जीवनाला आम्ही घाबरून जातो. तसे नसते तर कसाबच्या हल्ल्यानंतर शाहरुख आमिर व पर्यायाने त्यांच्या चहात्यांना भिती वाटली असती आणि त्यांनी तेव्हाच देश सोडायचा विचार बोलून दाखवला नसता का? ज्या देशाने व समाजाने प्रतिष्ठा पैसा व यश देवून डोक्यावर घेतले, त्याची आमिरला कशाला भिती वाटली असती? ज्या इस्लाममध्ये चित्रपट नाचगाण्याला अक्षम्य गुन्हा मानले आहे. त्याच विचारसरणीचे भय आमिरला वाटत नाही आणि त्याचा धंदा करून प्रतिष्ठीत झालेला हा माणूस आज आपल्याच चहात्यांच्या प्रेमाने भयभीत होऊन गेलाय, याचा अर्थ कसा लावायचा? ओंबळेजी तुम्ही गेल्यानंतर देश खुप बदललाय हो! आता शब्दांचे अर्थ जसेच्या तसे वाचणार्‍या, ऐकणार्‍यापर्यंत पोहोचतील याचीही शाश्वती उरलेली नाही आपल्या देशात. अर्थाचा अनर्थ करण्याचा उद्योग इतका तेजीत आलेला आहे, की शब्दांनाही आपल्यात सहभागी असलेल्या अक्षरांचा विश्वास वाटेनासा झाला आहे. याकुब मेमनला शहीद ठरवून अंत्ययात्रेला लोटलेल्या हजारो लोकांच्या गर्दीने इथे कोणी विचलीत होत नाही, पण नथूरामच्या स्मृतीदिनी शे-सव्वाशे लोक जमले तर इथल्या बुद्धीवाद्यांना दरदरून घाम फ़ुटतो. कदाचित काही वर्षांनी तुमच्याही स्मृतीदिनी मुठभर लोक जमले तर देश धोक्यात आल्याचा ओरडा सुरू होऊ शकेल. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे बरे झाले. सुटलात ओंबळे, तुम्ही आणि तुमचे अन्य सहकारी या देशाच्या, समाजाच्या पाशातून!
-----------------------------------
तुम्ही २६/११ रोजी काय करणार?

मागल्या सहा वर्षापासून मी व्यक्तीगतरित्या एक व्रत पाळतो. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर विचलीत झाल्यावर काय करावे अशा विचारांनी मी अस्वस्थ होतो. दु:खात सहभागी होण्याची भंपक कल्पना मला मानवत नाही. कारण त्यातल्या वेदना यातनांची भागिदारी शक्य नसते. पण ज्याच्याविषयी सहवेदना आहे, त्याच्या वेदनांची थोडी अनुभूती घ्यावी असे डोक्यात आले. ओंबळे वा २६/११ च्या घटनेत जे शहीद झाले, त्यांना मनाविरुद्ध या जगाचा निरोप घ्यावा लागला. जगण्याची इच्छा आकांक्षा हा जबरदस्त मोह असतो आणि त्याच्यावर पाणी सोडण्याची वेदना तितकीच असह्य असते. थोडक्यात आपल्याला मानवणार नाही वा असह्य होईल असे काही करून त्या शहीदांना आपल्या परीने श्रद्धांजली देण्यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला. व्यक्तीगत पातळीवर शक्य असलेले एक व्रत मी सुरू केले. गेल्या सहा वर्षात २६ नोव्हेंबर या दिवशी मी अनवाणी असतो. घरात असो किंवा बाहेर असो, कुठेही पायात चप्पल वा पादत्राणे घालत नाही. रस्त्यावरची घाण चिखल वा काच पत्रा लागून जखम होण्याची चिंता मन पोखरते. बाहेर पडलो की लोक विचित्रपणे बघतात. कोणी विचारलेच तर मी कारण सांगतो. आपणहून काही सांगत नाही. पण माझा अनुभव चांगला आहे. श्रद्धांजली म्हणून योजलेला हा मार्ग अनेकांना भावतो. काहीजण त्याचे अनुकरणही करतात. आमिर खानला दोष देणे सोपे आहे. आपण काय करणार याचे उत्तर कधीतरी शोधायला हवे. माझे उत्तर मी शोधले आहे. व्रत म्हणून पाळतो आहे. ज्यांना यात तथ्य वाटेल, त्यांनीही आपल्या परीने असे काही करावे, ज्याची जाहिरात व्हायची गरज नाही. पण त्यातून आपल्यासाठी हौतात्म्य पत्करतात, त्याची जाणिव कायम उरात रहावी असे काहीही करावे. मात्र मनात महाडीक, ओंबळे वा देशासाठी शहीद होणार्‍यांविषयी आत्मियता असेल, तरच असे काही करावे. आपण काही उदात्त वा सक्तीने करतोय अशी भावना असेल, तर अजिबात असे काही करू नये. कारण हा अनुभूतीचा व सहवेदनेचा विषय आहे. देश समाज आणि आपले व्यक्तीगत जीवन यांच्यात तसूभर फ़रक ज्यांना वाटला नाही, त्यांच्या त्या भावनेशी श्रद्धेशी एकरूप होण्याचा हा किंचित प्रयत्न अशी माझी धारणा आहे. ती भावना मला सुरक्षेची हमी देते म्हणून!   - भाऊ तोरसेकर

(आवडले भावले तर शेअर करा)

इटाली‘वाल्या’ कोळीणीचा जावई



मागल्या दहा वर्षात देशाचाच जावई असल्यासारखी शाही वागणूक मिळालेले ‘उद्योग’पती रॉबर्ट वाड्रा यांना मोदी व भाजपाची सरकारे सतावत असल्याचे त्यांनीच एका मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण या देशातले कायदे सामान्य माणसाला लागू होत असले, तरी नेहरू-गांधी खानदानाशी कुठलाही संबंध असेल, तर त्या व्यक्तीला कायदे नियमातून सूट मिळत असते. देशाच्या राज्यघटनेत नसलेली ही अलिखीत तरतुद आहे. पण मोदी घटनाच मानत नसतील, तर त्यातल्या अलिखीत गोष्टींचे पालन त्यांच्याकडून कसे होईल? सहाजिकच देशात सत्तांतर झाल्यापासून वाड्रा यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लागला आहे. त्यांनी ‘उद्योग’पती म्हणून जी विकासाची कामे हाती घेतली होती, त्यात खंड पाडला जात आहे. उदाहरणार्थ हरयाणामध्ये वाड्रा यांनी हजारो एकर जमिन खरेदी केली होती. ज्यांच्याकडून ही जमिन खरेदी केली, त्याच कंपनीने वाड्रा यांना जमिन खरेदीसाठी कोट्यवधी रुपये उसने व बिनव्याजी दिले होते. मग पुन्हा तीच जमिन काही काळानंतर त्याच कंपनीने वाड्रा यांच्याकडून पुन्हा खरेदी केली आणि अनेकपटीने त्याची किंमत मोजली. कुठलीही खरेदी करायला खिशात पैसे असावे लागतात, हा सामान्य व्यवहाराचा नियम आहे. खिशात दमडा नसताना तुम्ही कुठली खरेदी करू शकत नाही. पण हा नियम नेहरू खानदानाचे जावई असल्याने वाड्रांना लागू होत नाही, विकणाराच त्यांना खरेदीसाठी पैसे उसने देतो आणि पुन्हा तीच वस्तू अनेकपटीने किंमत देवून विकत घेऊ शकतो. हे अर्थशास्त्र मोदी सरकार वा भाजपाला अजून उमगलेले नाही. म्हणून त्यांनी वाड्रा यांना छळायला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला लागणारे नियम वाड्रांना लावणे, हा अन्यायच नाही काय? मग त्यांनी तक्रार केल्यास चुक ते काय? इथपर्यंत वाड्रा यांचा आक्षेप समजू शकतो. पण दुसरा भाग थोडा चमत्कारीक वाटला.

आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाड्रा यांनी एका माध्यमाला मुलाखत देवून वाचा फ़ोडली. त्यात वाड्रा म्हणतात, ‘आपण सोनिया वा गांधी खानदानाशी संबंधित आहोत म्हणूनच आपल्याला लक्ष्य केले जात आहे. राजकीय हत्याराप्रमाणे आपला वापर होत आहे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला व्यवसाय करू दिला जात नाही.’ गडबड इथे आहे. वाड्रांची अपेक्षा अशी आहे, की त्यांना सामान्य भारतीयाप्रमाणे कारभार व उद्योग करू दिला पाहिजे. त्यात काही चुक नाही. पण वाड्रा हे देशाचे तितके सामान्य नागरिक कुठे आहेत? ते कायदे व नियम ज्यांना लागू होत नाहीत, अशा घराण्याशी निगडीत आहेत. म्हणूनच त्यांना विशेष वागणूक मिळत असते. सामान्य नागरिकाला विमानतळावर कसून तपासले जाते. त्याच्या सामानाची झडती घेतली जाते. वाड्रा यांना तसे सामान्य पद्धतीने कधी कोणी वागवले नाही. कितीही सुरक्षेचा मामला असो, कुठल्याही तपासणीशिवाय त्यांना विमानतळावर येजा करता आली, तेव्हा त्यांनी कधी सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला वागणूक मिळत नाही, अशी तक्रार केल्याचे कोणी ऐकले आहे काय? कुठल्याही सरकारी खात्यात वा मंत्रालयात सामान्य माणसाचे साधे अर्ज धुळ खात पडलेले असतात. त्यावर वर्षानुवर्षे निर्णय होत नाहीत. पण वाड्रांनी कुठल्याही जमिनी घेतल्या, तर विनाविलंब त्यांच्या नावावर त्याचे दस्तावेज तयार करून द्यायला सरकारी यंत्रणा राबत होती. तेव्हा आपल्याला सामान्य माणसाप्रमाणे ताटकळत ठेवले जात नाही आणि तत्परतेने आपल्या विषयात सरकारी निर्णय होतात, अशी तक्रार वाड्रा यांनी केल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे काय? सतत ‘समर्था घरीचे’ म्हणून त्यांना विशेष वागणुक मिळत राहिली, म्हणून त्यांनी एकदाही तक्रार केलेली नाही. मग आताच त्यांना असे सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याचे, वागण्याचे डोहाळे कशाला लागले आहेत?

ज्या कंपनीकडे कित्येक वर्षे एक जमिन होती आणि त्याविषयी सरकार कुठलाही निर्णय घेत नव्हते, त्याला सामान्य नागरिकाला मिळणारी वागणूक म्हणतात. परंतु त्याच कंपनीने मग तीच जमिन वाड्रांना विकली आणि पैसे नव्हते तर पैसेही दिले. मग तीच जमिन वाड्रांची होताच सरकारी तत्परता कार्यरत झाली आणि रातोरात तीच जमिन विकासाला योग्य व वेगळ्या कामासाठी वापरण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले. एकदा त्या जमिनीवरील आरक्षण उठले आणि वाड्रांनी तीच जमिन पुन्हा त्याच मूळ मालक असलेल्या कंपनीचा परत विकून टाकली. केवळ वाड्रा त्यात सहभागी झाले आणि जमिनीलाही खास वागणुक मिळाली. ह्याची तक्रार वाड्रांनी केलेली नव्हती की जमिनीने केलेली नव्हती. ह्याला वाड्रा ‘उद्योग’ म्हणतात. त्यांनी कुठले उत्पादन वा कारखाने उभे केले म्हणून त्यांना उद्योगपती म्हटले जाते, त्याचाही कधी कोणी खुलासा केलेला नाही. पण पुन्हा अमूक एक गोष्ट म्हणजे उद्योग आणि तो करणार्‍याला उद्योगपती म्हणावे, ही बाब सामान्य माणसाला लागू होत असते. वाड्रा सामान्य नागरिक कधी होते? सोनियांची कन्या वा इंदिराजींची नात असलेल्या प्रियंका गांधींचे पती झाल्यावर वाड्रा यांना कसलाही ‘पती’ म्हणवून घेण्याचा विशेष अधिकार आपोआपाच प्राप्त होतो ना? तसे वाड्रा अकस्मात उद्योगपती होऊन गेले. सामान्य माणूस ज्याला उद्योग म्हणतो, त्यापेक्षा वाड्रांचे ‘उद्योग’ वेगळे असतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. केवळ सोनियांचे जावई वा राहुलचे जीजाजी म्हणून त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तो निव्वळ पक्षपात आहे. तेव्हा आपल्याला अकारण राजकारणातले हत्यार बनवले जात असल्याची वाड्रा यांची तक्रार योग्यच आहे. एक सामान्य भारतीयाप्रमाणे त्यांच्या विरोधात काही आक्षेप असतील, तर त्याची चौकशी सामान्यपणे व्हायला हवी. त्यासाठी खास चौकशी आयोग कशाला नेमायचा?

मोदी सरकार वा हरयाणाच्या भाजपा सरकारने खास चौकशी नेमून पुन्हा वाड्रा यांना सामान्य नागरिक म्हणून जगण्यापासून वंचित केले आहे. त्याबद्दल त्यानी एक मुलाखत देवून नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यासाठी आतापर्यंत आणखी काही साहित्यिक वा कलावंतांनी आपापले पुरस्कार परत देण्याची मोहिमच हाती घ्यायला हवी होती. कारण हा लोकशाहीचा संकोच आहे, नेहरू खानदानाच्या कुणा व्यक्तीला वा संबंधिताला अशाप्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचे प्रयत्न, हा असंहिष्णूतेचा कळसच नव्हे काय? या देशात नियम कायदे व व्यवस्था म्हणून नेताजींच्या आप्तस्वकीयांवर पाळत ठेवली जाऊ शकते. कागदोपत्री घोळ घातला जाऊ शकतो. पण नेहरू घराण्याला कुठलेही नियम लावणे, म्हणजे चक्क लोकशाहीचा व सभ्यतेचा गळा घोटणेच नाही काय? मग मोठ्या माध्यमांनी गरीब बिचार्‍या वाड्रा यांच्या दु:खाला वाचा फ़ोडायला प्रदिर्घ मुलाखत घेणे आवश्यकच नव्हते का? पण त्यात एक प्रश्न राहुन गेला. तो असा की नेहरू-गांधी खानदानाशी संबंध आहे, म्हणून छळ होतो, अशी तक्रार आहे, तर त्याच खानदानाशी संबंध असल्याचे लाभ वाड्रांनी आजवर कशाला घेतले? सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी आपली कंपनी चालवली नाही की खिशात दमडा नसताना कुठला पोटापाण्याचा उद्योग केला नाही. म्हणजेच नेहरू खानदानाशी संबंध जोडून त्याचे सर्व लाभ वाड्रा मस्तपैकी उकळत राहिले. त्याचे फ़ायदे घेताना त्यांना कुठला त्रास वा मनस्ताप झाला नाही. मग जेव्हा त्याच नातेसंबंधांचा जाच सोसायची वेळ आली, तेव्हा वाड्रा सामान्य नागरिक व्हायला निघाले आहेत. असे इतिहास वा पुराणात एकच उदाहरण मिळते. वाल्या कोळ्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पापाचे लाभ उठवायला संमती दिली होती. पण त्याच पापाची भागिदारी व परिणाम भोगायला नकार दिला होता. वाड्रा यांचा पवित्रा त्यापेक्षा वेगळा आहे काय? मग त्यांना काय म्हणायचे? इटाली‘वाल्या’ कोळणीचा जावई?

Sunday, November 22, 2015

आलिंगनाचे कांगावखोर नाटक



सर्वात भयंकर नशा कुठली असेल तर ती उदात्त मानसिकतेची! आपण काही महान कार्य करीत असल्याची समजूत एखाद्या व्यक्तीची करून दिली, मग त्याची सारासार बुद्धी निकामी होऊन जाते. माणसाला जी उपजत विवेकबुद्धी लाभलेली असते, त्यामुळे माणुस समोरच्या घटनांचा अर्थ लावतो आणि त्यानुसार प्रतिक्रीया देत असतो. पण तो विवेक त्याने गमावला, मग त्याला कुठलेच तारतम्य उरत नाही आणि कुठल्याही हानिकारक गोष्टीलाही तो प्रवृत्त होऊ शकतो. गर्द वा तत्सम कुठल्या नशेच्या आहारी गेलेली माणसे अत्यंत विक्षिप्त वागतात, हे आपल्याला ठाऊक आहे. पण निदान ती माणसे नशेच्या आहारी जाऊन आपला विवेक सोडत असतात. काही माणसे कुठल्याही नशेच्या आहारी गेलेली नसूनही तारतम्य सोडून विक्षिप्त कशाला वागतात, असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. मणिशंकर अय्यर वा सुधींद्र कुलकर्णी यासारखी माणसे जाणिवपुर्वक भारताला हानिकारक वागत असतील, तर त्यात त्यांचे स्वार्थ असल्याची शंका आपण घेऊ शकतो. पण जे कोणी त्याला पुरक असे वागतात आणि त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, असे आपल्याला पक्के ठाऊक असते, तेव्हा त्यांच्या वर्तनाविषयी आपल्यावर चकीत व्हायची पाळी येते. सध्या सोशल मीडियात एक चित्रण बघायला मिळते आहे. कोणी एक मुस्लिम वेशभूषेतला माणूस मुंबईच्या पदपथावर एक हस्तलिखीत फ़लक घेऊन उभा आहे. त्याचे डोळे पट्टीने बांधले आहेत आणि त्याच्या पायाशी एक फ़लक आहे. त्यावर लिहीले आहे, ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ त्याच्या आपसास अनेक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी हिंडत फ़िरताना गोळा होताना दिसतात आणि मग कोणी एक तरूण पुढे जाऊन त्याला आलिंगन देतो, मग इतरही हळुहळू त्याचे अनुकरण करतात.

असाच एक व्हीडिओ आणखी कुठल्या पाश्चात्य देशातला आहे. त्यात एक इसम सिरीयात शांतता नांदावी म्हणून भर चौकात हात वर करून डोळ्यावर पट्टी बांधून उभा आहे आणि आपले हात उभे ठेवण्यासाठी लोकांना आवाहन करणारा फ़लक त्याच्या पायाशी आहे. वरकरणी ह्यात मोठे उदात्त हेतू दिसून येतात. मग ज्यांना अन्य काही उदात्त करणे शक्य नसते किंवा ज्यांनी कधी काही समाजोपयोगी कुठले कर्तव्य बजावलेले नसते, असे लोक ह्या सोप्या गोष्टीतून ‘पुण्य’ गाठीशी बांधायला सहजगत्या पुढे येतात. तसे या चित्रणातून बघायला मिळते. या डोळ्यांना पट्टी बांधलेल्या कुणा अनोळखी व्यक्तीला आलिंगन दिल्याने आपण जगात धार्मिक सौहार्द निर्माण करायला मोठा हातभार लावला, असे खोटे समाधान त्यात पुढे येणार्‍यांना मिळते. कसला खर्च नाही की कसली तोशिस नाही. कसल्याही कष्ट मेहनतीशिवाय गाठीशी पुण्य बांधल्याचे पोकळ समाधान मात्र मिळते. आपण धर्मांध नाही, आपण द्वेषाला झिडकारणारे संहिष्णू असल्याचा खोटा अभिमान काळजात जमा होतो. त्या कुणा इसमाच्या हात उंचावण्याने सिरीयात शांतता स्थापन होत नाही, की तिथे हकनाक मरणार्‍या कुणाला जीवदान मिळत नाही. तिथे वा अन्यत्र हिंसाचार माजवणार्‍या जिहादींना कुठला पश्चात्ताप होत नाही, की जग सुरक्षित सुखी होत नाही. पण दरम्यान या प्रत्येक आलिंगन देणार्‍याला मात्र आपण फ़ार मोठे उदात्त कार्य केल्याचे समाधान पदरी पडलेले असते. यातला कोणी रस्त्याच्या कडेला माजलेला कचरा साफ़ करून जीवन निरोगी होण्यासाठी कष्ट करणार नाही. पण हत्याकांड वा हिंसाचार होऊन गेल्यावर मेणबत्त्या किंवा गुलाबाचे फ़ुल तिथे ठेवायला अगत्याने हजेरी लावील. कारण त्यांना समोरची हिंसा थोपवण्याचे बळ त्यांच्यात नसते. तोच आपला नाकर्ता स्वभाव लपवण्यासाठी त्यांना असे काही पळपुटे उपाय हवे असतात.

मग कोणी डोळ्यांना पट्टी बांधून उभा रहातो, तो डोळे बंद असूनही काय होत आहे ते सहज बघू शकत असतो. कारण डोळे त्याचे बंद असतात, पण उघड्या डोळ्यांनी अशा नाटकात सहभागी होणारे किती आंधळे असतात, त्याची गंमत त्याला बघायची असते. पॅरीसमध्येही अशाच एकाने तो प्रयोग केला आणि अनेक डोळस आंधळ्यांनी त्याला आलिंगन देवून आपणही अजून मुस्लिमावर विश्वास ठेवतो, याची भर चौकात येऊन ग्वाही दिली. पण मुळात अशा विश्वासाचा प्रश्नच कशामुळे येऊ शकला, याचे भान यातल्या कुणा आलिंगनकाराला आहे काय? मुस्लिमांवर अन्य बिगर मुस्लिमांचा विश्वास नसता, तर त्या त्या देशात मुस्लिमांना सुखनैव वास्तव्य करता आले असते काय? अनेक युरोपिय देशांनी निर्वासित म्हणून मुस्लिमांना आपल्यात सामावून घेतले त्याला मुस्लिमांवरील विश्वास नाही तर दुसरा कुठला शब्द आहे? त्या पॅरीसच्या वा इथल्या मुंबईतल्या डोळ्यावर पट्टी बांधणार्‍याने आपल्या वस्तीत लपून व मुखवटे पांघरून जिहादी कृत्ये करणार्‍यांवर ‘(डोळ्यावरची धर्माची पट्टी सोडून) नजर ठेवून पोलिसांना खबर दिली असती तर? तर तिथे इसिस वा मुंबईत कसाब रक्तपात करू शकले नसते. डोळ्यावरची पट्टी काढून मुस्लिमांनी आपली विश्वासार्हता सिद्ध करायची वेळ आलेली असताना असली नाटके काय कामाची? चेंबूरच्या त्या दुकानात तलवार घेऊन गुंड घुसला, तेव्हा नासिरुद्दीन मन्सुरी नावाचा मुस्लिम पुढे सरसावला आणि त्यानेच एका बिगरमुस्लिम दुकानदाराचा जीव वाचवला. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्‍या नासिरुद्दीनला कुठे डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनासाठी उभे रहावे लागले नाही. त्याने कृतीतून आपण मुस्लिम असताना माणुसकीवर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवतो, हे सिद्ध केले. विश्वास कृतीतून निर्माण होतो व कसोटीला लागतो.

यातला भंपकपणा किती धोकादायक आहे त्याचे भान अजून जगाला आलेले नाही. म्हणून अशी नाटके चालतात. मुस्लिमाचा विश्वास सर्वप्रथम अल्लाहवर असावा लागतो. आज त्याच अल्लाहवर विश्वास दाखवायला म्हणून धर्माच्या शिकवणूकीचा हवाला देवून राजरोस निरपराधांच्या कत्तली चालल्या आहेत. तेव्हा सवाल मुस्लिमाने अन्य कुणा बिगर मुस्लिमावर विश्वास असल्याची साक्ष देण्याचा नाही. विषय बिगर मुस्लिमांनी मुस्लिमांवर विश्वास ठेवायचा नाही. तर आपण धर्मापेक्षा माणुसकीवर विश्वास ठेवतो, याची साक्ष देण्याची गरज आहे. ते काम असे डोळ्यावर पट्टी बांधून वा एकमेकांना आलिअंगने देवून साध्य होणार नाही. नाटके खुप रंगतील, पण विश्वासाचा ठिसूळ झालेला पाया मजबूत होणार नाही. तेव्हा असल्या नाटकातून लोक फ़सतात व बळी पडतात, ही विवेकबुद्धीला गुंडाळलेली पट्टी काढून टाकायची वेळ आली आहे. जगभर जिहाद नावाचा हिंसाचार इस्लाम धर्माच्या नावाने चालू आहे आणि त्याला नाटकाने रोखता येणार नाही. हेच काम जेव्हा कसाब सामोरा आलेला तेव्हा कोणी कशाला केले नाही? कसाब वा त्याचे साथीदार धर्माच्या नावानेच बेछूट गोळ्या झाडत होते, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून साक्षात मृत्यूला आलिंगन देणे ही विश्वासाची कसोटी होती? कितीजण तेव्हा पुढे सरसावले? रस्त्यावर कुणाला विश्वासाचे प्रतिक म्हणून आलिंगन देण्याच्या पळवाटेने धोका संपत नाही, अधिक भयंकर रूप धारण करून अंगावर येतो. युरोप त्याच अनुभवातून जातो आहे. असे डोळ्यावर पट्टी बांधणारे नव्हे तर पोलिसी गणवेशातील तुकाराम ओंबळे क्साबला आलिंगन द्यायला पुढे गेला होता. त्याच मुंबईत असली आलिंगनाची नाटके करणार्‍यांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. चार दिवसांनी त्या आलिंगनातून शहीद झालेल्या शूरवीर तुकाराम ओंबळेची पुण्यतिथी आहे आणि आपण किती बेशरम होऊन असली नाटके करतोय ना?

https://www.youtube.com/watch?v=lRbbEQkraYg


https://www.youtube.com/watch?v=N96W8CeiT3I&feature=youtu.be