Sunday, November 22, 2015

आभार आणि अभिनंदन, ‘जागत्या’ मित्रांनो!



१० ऑगस्ट रोजी माझ्या ‘जागता पहारा’ ब्लॉगने दहा लाखाचा पल्ला ओलांडला होता. त्याला आता तीन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. नेमके सांगायचे तर १०३ दिवस! या अवधीत ‘जागता पहारा’ आणखी पाच लाखाचा पल्ला आज ओलांडून पंधरा लाखाच्या पुढे गेला आहे. साधारणपणे मी ब्लॉगर आहे आणि क्वचित काही तातडीच्या विषयावर टिप्पणी करण्यासाठी फ़ेसबुकचा वापर करीत होतो. अन्यथा ब्लॉगच्या नव्या लेखाचा सारांश व लिन्क देण्यासाठीच फ़ेसबुकचा वापर केला. काही प्रसंगी मला आवडलेले इतरांचे लेख वा अन्य मजकुर व्हीडीओ शेअर करण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्यासाठी तीन फ़ेसबुक खाती मी एकाच नावाचे वापरत होतो. त्यापैकी दोन खाती मागल्या महिन्याभरात बंद झाली आहेत. कुणाच्या तक्रारीमुळे की अन्य कुठल्या कारणाने, ते मला समजू शकलेले नाही. पण एका खात्याच्या बळावर ‘भाऊमत’ हे पेजही चालविले होते, जेणेकरून अधिक मित्रांपर्यंत पोहोचता यावे. तेही यामुळे बंद झाले. त्याचा ब्लॉगच्या वाचक संख्येवर फ़ारसा परिणाम झालेला दिसला नाही. जवळपास तितक्याच प्रमाणात ब्लॉगचा वाचक वाढतो आहे. खेरीज ‘व्हाटस अप’ ग्रुपवर मोठ्या प्रमाणात ब्लॉगवरील लेख शेअर केले जात असल्याचे मी ऐकतो. मी स्वत: ‘व्हाटस अप’ या भानगडीत नाही. त्यामुळे तिथे काय चालते त्याचा अंदाज नाही. ऐकिव माहितीनुसार शेकडो ग्रुपवर माझे ब्लॉग शेअर होतात. त्याचा आनंदच आहे. मात्र हाती उरलेले एक खाते आणि एका नव्या खात्याचे मदतीने ‘भाऊ तोरसेकर’ हे पेज सुरू केले आहे. त्याचेही सदस्य दोन हजाराच्या जवळ अवघ्या पाच दिवसात पोहोचले. मी मुळचा ब्लॉगर वा पत्रकार असल्याने लेखनात जास्त रस आहे. त्याच निमीत्ताने सोशल माध्यमात आलो. तेव्हा इथे माझ्या लेखनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज खुप आनंद वाटतो.

मला हे तंत्र ठाऊक नव्हते आणि म्हणूनच ऑगस्ट २०१० मध्ये ब्लॉग नोंदला, तरी फ़ारसे काही लिहू शकलो नव्हतो. २०१२ च्या आरंभी दोघा तरूण मित्रांच्या आग्रहाने व प्रयत्नाने मी टायपिंग शिकलो आणि थोडे लिखाण सोशल माध्यमात करू लागलो. प्रत्यक्षात दैनिक ‘पुण्यनगरी’मध्ये जे दैनंदिन ‘उलटतपासणी’ सदर लिहीत होतो, तेच टाईप करू लागल्याने त्याच नावाचा दुसरा ब्लॉग फ़ेबुवारी २०१२ मध्ये सुरू केला. पण मे २०१३ मध्ये ते सदर बंद झाले आणि सोशल मीडियातली ‘उलटतपासणी’ही थांबली. ब्लॉगकडे वाचक आणावा म्हणून त्याच दोघा तरूण मित्रांनी फ़ेसबुक खाते काढून दिले आणि त्यात मित्रांना आमंत्रित करून ‘उलटतपासणी’चा सारांश व लिन्क टाकण्याला सुरूवात झाली होती. दिवसेदिवस मित्रांची संख्या फ़ुगत गेली आणि मित्रयादीची मर्यादा संपली म्हणून दुसरे खाते उघडले. काही मित्रांच्या आग्रहामुळे ‘भाऊमत’ हे पेजही सुरू केले. ज्यांना मित्रयादीत सामावणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी पेजवर सोय होऊ शकली. तरी अनेकजण नव्या खात्यातून मित्रयादीत आले. बघता बघता दोन खाती भरून गेली आणि घरगुती मित्र व परिवारातील लोकांसाठीचेही तिसरे खाते मित्रयादीने फ़ुगत गेले. वादविवादही वाढले होते. अनेक पुरोगामी मित्र वा आपल्या ठराविक राजकीय भूमिकेविषयी आग्रही असलेल्यांशी खटके उडू लागले. काहींना नावडते वाचायचे नसेल तर दुर्लक्ष करण्याचाही संयम त्यांच्यापाशी नसल्याने ब्लॉक करावे लागले. अशाच गडबडीत जुलै २०१३ पासून ‘जागता पहारा’ हा ब्लॉग खर्‍या अर्थाने सुरू झाला. म्हणजे नियमित लिहीणे सुरू केले. लोकसभा निवडणूक ऐन रंगात येत चालली होती आणि त्याचे निकाल लागत नाहीत, तोवर विधानसभेचे वेध लागले आणि ‘जागता पहारा’ वाचकाला अधिकाधिक आकर्षित करू लागला. फ़ेसबुकमुळेच हे शक्य झाले याबदल शंकेला जागा नाही. एखाद्या दैनिकाप्रमाणे ब्लॉगचा नियमित वाचक तयार झाला.

दहा दिवसांपुर्वीच दुसरे खातेही फ़ेसबुकने डिसेबल केल्याने अस्वस्थ झालो. त्यातून मग पर्यायाचा विचार सुरू केला. बंद झालेल्या खात्यावरील मित्रांनाही माझे त्यांच्या यादीतून बेपत्ता होणे गोंधळात पाडून गेले होते. म्हणून मधला मार्ग शोधला. आपण फ़ेसबुकवर केवळ लेखाची लिन्क टाकण्यासाठी असतो वा एखादी किरकोळ राजकीय सामाजिक कॉमेन्टच करतो. तेच काम मित्रांवर सोपवले तर फ़ेसबुकशी विवाद व्हायचे कारण शिल्लक उरणार नाही. ज्यांना भाऊचे लिखाण आणखी कोणी वाचावे किंवा अधिक लोकांपर्यंत जावे असे आग्रहाने वाटते, त्यांची मदत घ्यावी असा पर्याय सुचला. म्हणून तसे आवाहन फ़ेसबुकवरल्या उरलेल्या खात्यामार्फ़त केले आणि थक्क व्हायची पाळी आली. कारण सातशेहून अधिक मित्रमैत्रिणींनी पोस्टवर किंवा मेसेज बॉक्समधून आपापले ईमेल अड्रेस पाठवले. अर्थात उत्साह ठिक असतो. परंतु प्रत्येकानेच माझ्या ब्लॉगवरील लेखाची लिन्क त्यांच्या भिंतीवर टाकलीच पाहिजे, असा माझा अजिबात आग्रह नाही. त्यांना मनापासून तसे वाटत असेल आणि अधिक मित्रांपर्यंत ‘जागता पहारा’ न्यायचा असेल, तरच त्यांनी तो पर्याय स्विकारावा, असेच आजही माझे मत आहे. म्हणूनच मी जरी लिन्क व लेखाचा सारंश पाठवला, तरी मित्रांनी आपला विवेक व संयम राखूनच आपापल्या भिंतीवर ते शेअर करावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. अधिक लोकांपर्यंत जावे किंवा अधिकाधिक लाईक शेअर होण्यापेक्षा लेखातले विषय, मुद्दे व उपयुक्तता अधिक मोलाची मानावी. म्हणूनच नुसती कर्तव्य भावना म्हणून मार्केटिंग केल्यासारखी लिन्क भिंतीवर टाकण्याची गरज वा सक्ती नाही. पुन्हा विचार करूनच योग्य तो मित्रांनी निर्णय घ्यावा. आपले अन्य कोणाला पटले पाहिजे असा आग्रह नाही. पण भिन्न विचार समजून घेणे आवश्यक असते. तरच लोकशाही सम्रृद्ध होते, हे विसरता कामा नये.

कोणी यानंतर विचार बदलला तरी माझा राग नाही. पहिल्या फ़टक्यात ज्यांनी आपले ईमेल अड्रेस पाठवले, त्यांचे अभिनंदन! आभार मानणे मला आवश्यक वाटले. आज ‘जागता पहारा’ पंधरा लाखाचा टप्पा ओलांडत असल्याचा मुहूर्त साधून त्या सर्वांचे आभार! इतक्या चोखंदळ व चिकाटीच्या वाचकाशिवाय एक ब्लॉग एवढा दूरचा पल्ला इतक्या अल्पावधीत ओलांडू शकणार नव्हता मित्रांनो! जुलै २०१३ पासून २८ महिन्यांच्या कालावधीत १५ लाख ही छोटी गोष्ट नाही. किंबहूना वाचक मित्रांच्या या चिकाटीमुळेच लिहीण्यात सातत्य राखता आले. अन्यथा ब्लॉगर हा हौशी प्रकार असतो आणि रोजच्या रोज कोणी लिहायचा त्रास घेणार नाही. त्यासाठी मला नित्यनेमाने वेळ काढायला तुम्हा मित्रांनी सक्तीच केली. त्याचे हे फ़ळ आहे. म्हणूनच श्रेय जितके माझे आहे, तितकेच लेखनाविषयी आस्था व आपुलकी दाखवणार्‍या वाचक मित्रांचे सुद्धा! ब्लॉगला तुम्हा सर्वांचे योगदान लाभले आहे. आता फ़ेसबुकने खाते बंद केले तरी मला पर्वा नाही. कारण शेकडो मित्रांचे मेल अड्रेस माझ्याकडे आहेत आणि शेकड्यांनी मित्र लिन्क व सारांश आपापल्या भिंतीवर टाकणार असतील, तर मला फ़ेसबुकवर लुडबुडण्याची गरजही नाही. शक्य तितक्या लौकर ब्लॉगच्याही जाचातून सुटून आपली स्वतंत्र वेबसाईट बनवायचा विचार चालू आहे. तेही इथल्याच दोघा मित्रांच्या आग्रहातून व सहाय्यातून! जेव्हा वेबसाईट तयार होईल तेव्हा त्यांचे चेहरेही समोर येतीलच. पण खर्‍या आयुष्यात जितके जीवाभावाचे मित्र भेटले, तितकेच इथे आस्थावाईक दोस्त जमा झाले. या वयातही लिहायची उमेद निर्माण करणार्‍या वा त्याचा थकवा येऊ न देणार्‍या अशा मित्रांचे आभार तरी कसे मानू? त्यांच्याच जागवणार्‍या पहार्‍याने इतके लिहीणे शक्य झाले आहे आणि लिहीत रहावेच लागणार आहे. पंधरा लाखाचा आकडा इतका छोटा कधी वाटला नव्हता. अभिनंदन मित्रांनो!

Saturday, November 21, 2015

धार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप



दोन महिन्यांपुर्वी ‘तरूण भारत’मध्ये ‘उलटतपासणी’ हा रविवारचा स्तंभ लिहायला मी सुरूवात केली, तेव्हा माझा पहिलाच लेख आठवतो कुणाला? ‘भाकड पुराणकथा आणि सत्यकथा’ असे त्याचे शिर्षक होते आणि १३ सप्टेंबरला तो प्रसिद्ध झाला होता. नेमक्या दोन महिन्यांनी त्यात वर्तवलेल्या भितीची १३ नोव्हेंबर रोजी प्रचिती आली. पश्चिम आशियातील मुस्लिम अरब निर्वासितांचे लोंढे युरोपकडे धावत होते आणि त्यांना जवळ करायला नजिकच्या अरबी श्रीमंत देशातले सत्ताधीश राजी नव्हते. अशा निर्वासितांपैकी एक कुटुंब बुडाले आणि त्यातल्या कोवळया बालकाचा वाहुन किनारी लागलेला मृतदेह बघून जग हळहळले होते. अशावेळी त्याच हृदयद्रावक घटनेची दुसरी भयंकर बाजू लिहायचे व बोलायचे धाडस कोणी करत नव्हता. तेव्हाच मी हे भाकित केले होते. नेमके शब्द सांगायचे तर मी म्हटले होते, ‘इतक्या सहजतेने घुसता येते असे दिसेल, तेव्हा निर्वासित म्हणून अरबी प्रदेशातून युरोपात त्सुनामीसारख्या लाटा येतच रहाणार आहेत आणि मग बंदुकीच्या गोळ्याही त्या लोंढ्याला रोखू शकणार नाहीत. कारण मग बंदुकधारी युरोपियन पोलिस व लष्कराला आतले घरभेदी आणि बाहेरचे घुसखोर अशा दोन्ही बाजूने लढावे लागणार आहे.’ १३ नोव्हेंबर शुक्रवारी त्याची प्रचिती पॅरीसकरांना आली. कारण ज्या घातपाती घटनांनी दिडशे लोकांचा बळी घेतला, त्यात नुकतेच युरोपात दाखल झालेल्यापैकी काही निर्वासित होते आणि त्यांनी निर्घृणपणे सामान्य निरपराध फ़्रेंच नागरिकांचा बळी घेतला. दोन महिन्यात जग किती बदलले? तेव्हा या निर्वासितांना आश्रय द्यायला पुढे धावलेले तेच युरोपिय देश, आता सुडाची भाषा बोलत आहेत आणि तेव्हा त्या कोवळ्या बालकाच्या मृतदेहासारखी वेशभूषा करून किनार्‍यावर लोळलेले भंपक नाटकी संवेदनाशील लोक, युरोपियन शहरात नव्याने मेणबत्त्या पेटवण्याचे जुनेच नाटक रंगवत आहेत.

वास्तव नाकारून भलताच आभास निर्माण जरूर करता येतो. पण म्हणून वास्तव संपवता येत नाही, तर ते चेंगटपणे तुमचा पाठलाग करीत रहाते. कधीतरी येऊन तुमचा गळा पकडत असते. आधीच काहीजणांना दुसर्‍या महायुद्धानंतर आफ़्रिकन व अरबी देशातून निर्वासित वा स्थलांतरीत म्हणून पाश्चात्य देशांनी आपल्याकडे सामावून घेण्याचा उद्योग केला. त्यामागे अर्थातच अपराधगंड होता. दिर्घकाळ त्या देशांवर साम्राज्य गाजवले आणि त्यांची आर्थिक लूट केल्याच्या भावनेतून ही उपरती पाश्चात्य देशांना झालेली होती, अधिक उदारमतवाद व पुरोगामी भूमिकेतून बहुसंस्कृती समाज निर्माण करण्याचे थोतांड युरोपात सुरू झाले. त्यातून ह्या स्थलांतरीतांना युरोपात आणायचा अव्यापारेषू व्यापार सुरू झाला होता. लौकरच त्याचे दुष्परिणामही दिसू लागले होते. पण ते वास्तव स्विकारले तर पुरोगामीत्वाचे पितळ उघडे पडले असते. म्हणून त्याच्यावर युक्तीवादाचे पांघरूण घालून सत्य दडपण्यात धन्यता मानली गेली. उलट छान चालले आहे, असे भासवण्यासाठी अधिकाधिक स्थलांतरीत मुस्लिमांना युरोपिय देशात आणले गेले. त्यातच पुन्हा मानवाधिकाराचे अवडंबर माजवण्यात आले आणि दुसरीकडे युरोपियन महासंघ म्हणून भौगोलिक सीमा पुसट केल्या गेल्या. प्रत्येक देशात निवडून आलेल्या सरकारला महासंघ म्हणून नेतृत्व करणारे ओलिस ठेवू लागले. आताही निर्वासितांचा लोंढा आल्यावर प्रत्येक देशाने सक्तीने अमुक इतके निर्वासित घेतलेच पाहिजेत, अशी सक्ती झाली आणि खोट्या पुरोगामीत्वाचे पितळ उघडे पडू लागले. मागल्या पाच दशकात जे मुस्लिम-अरब पाश्चात्य देशात आलेले होते, त्यांच्या धार्मिक उचापतींनी गांजलेल्या जनतेने व काही राजकारण्यांनी या निर्वासितांना घेण्य़ास साफ़ नकार दिला. तर दुसरीकडे पुरोगामीत्वाच्या नेत्यांनी सीमाच खुल्या करून टाकल्या. परिणाम व्हायचे थांबले नाहीत.

मागली दहा पंधरा वर्षे युरोपात स्थलांतरीत होऊन वसलेल्या अनेक मुस्लिमांनी आपापल्या संघटना उभ्या करून तिथे असलेल्या प्रस्थापित कायद्यांना आव्हान देत आपल्यासाठी इस्लामिक कायदे हवेत अशी मागणी सुरू केली होती. जिथे मुस्लिमांची दाट वस्ती आहे, तिथे अन्यधर्मिय वा स्थानिक मूळ रहिवाशांना हिंडणे फ़िरणेही अशक्य करून सोडले होते. आपल्या मनासारखे होत नसेल तर भीषण दंगली माजवण्याचा सपाटा लावला होता. सहासात वर्षापुर्वी याच पॅरीसमध्ये काही आठवडे अकस्मात गाड्या पेटवून देण्याचा उद्योग चालू होता. स्पेन, ब्रिटन या देशात जिहादी हल्ले झाले होते आणि अफ़गाण, इराक, सिरीयात त्या देशांचे सैन्य गेल्याच्या विरोधात आक्रमक निदर्शने मुस्लिम स्थलांतरीत करत होते. म्हणजेच नव्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे, पण भूमिका मात्र इस्लामिक धर्माशी निगडीत ठेवायची, असला दुटप्पी खेळ राजरोस चालू होता. आश्रित म्हणून पाश्चात्य देशात जायचे आणि तिथल्या सरकार व कायद्यावर कुरघोडी करायची, हे साधेसरळ धोरण राबवले जात होते. त्याला विरोध केल्यास पुन्हा मानवाधिकाराचा आडोसा घ्यायचा. हा खेळ इतका मोकाट झाला होता, की त्यातून हळुहळू युरोपियन अस्मिता डोके वर काढू लागली होती. अरब-मुस्लिम किंवा स्थलांतरीत नकोत, अशा भावनेला बळ मिळू लागले. तर तीच अस्मिता दडपण्याला पुरोगामी प्राधान्य दिले गेले. म्हणजेच समस्येला सामोरे जाण्यापेक्षा समस्या नाकारण्यात धन्यता मानली गेली. परिणामी सिरीया इराकमध्ये यादवी माजल्यावर लक्षावधी मुस्लिम-अरबांचा लोंढा युरोपकडे वळला. आज जे संकट युरोपला भेडसावते आहे, ते जिहादींनी आणलेले नाही, तर तिथल्या पुरोगामी नाटकाचे दुष्परिणाम आहेत. सत्य नाकारण्यातून आलेले संकट आहे. मुस्लिमांची धार्मिक आक्रमकता रोखण्यापेक्षा तिला चुचकारण्यातून उदभवलेला धोका आहे.

गेल्या पंधरा वर्षात सातत्याने युरोपियन देशातल्या स्थानिक सरकारांचे अधिकार कमी करून त्यांच्या डोक्यावर महासंघाचे निर्णय लादले गेले. महासंघाची संसद म्हणून काम करणारी मंडळी प्रत्यक्षात कुठूनही निवडून आलेली नसतात, तर त्या त्या देशाच्या सरकारने नियुक्त केलेले अधिकारी वा प्रतिनिधी असतात. पण एकूण युरोपचे धोरण हेच जनतेने निवडून न दिलेले लोक करतात. मग त्यांनी धोरण ठरवायचे आणि बाकी निवडून आलेल्या प्रत्येक देशातील सरकारांनी त्यानुसार कार्यक्रम राबवायचे. असा लोकशाहीचा तिथे गळा घोटला गेला आहे. आपल्याकडे मागली दहा वर्षे सोनिया गांधींनी नेमलेल्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाने निर्णय घेतले आणि मनमोहन सिंग सरकार त्यानुसार कारभार करत गेले. त्यातलाच प्रकार युरोपियन महासंघात चालू असतो. थोडक्यात लोकशाहीचा बळी देण्याला आता लोकशाही ठरवले गेले आहे. म्हणून तिथल्या जनतेला नको असतानाही त्यांच्या माथी हे अरबी-मुस्लिम निर्वासित मारले गेले आणि नसलेली मुस्लिम बिगरमुस्लिम समस्या जन्माला घातली गेली. आपण आज बघत आहोत, ती समस्या अशी पुरोगामी राजकारणाने उभी केलेली आहे. म्हणजे स्थानिक लोकांच्या डोक्यावर सक्तीने लादलेले स्थलांतरीत मिर्‍या वाटत असतात. त्याबद्दल तक्रार केली, तर तुमच्यावर भेदभावाचा आरोप केला जातो. वास्तविक कोणी कसला भेदभाव करीत नाही, उलट आपण मुस्लिम वा अरब आहोत हा अहंकार निर्वासितांमध्ये आहे आणि त्यापुढे पाश्चात्य देशांनी व तिथल्या जनतेने झुकावे, असा आग्रह मुस्लिमांचा आहे. समस्या इतकी सोपी आहे. तुमच्याच घरात घुसून तुम्हालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रकार आहे. आणि त्याचे कर्तेकरविते तिथले पुरोगामी आहेत. आपल्याला भारतातले पुरोगामी पाकिस्तानचे पक्षपाती कशाला असतात असा प्रश्न पडतो, त्याचे हे पाश्चात्य उत्तर आहे. जगभरचे पुरोगामी असेच असतात.

सांगायचा मुद्दा इतकाच, की कालपरवा पॅरीसमध्ये जो हिंसाचार घडला, त्याला इसिसपेक्षा तिथले पुरोगामी खरे जबाबदार आहेत. कारण पुरोगाम्यांच्या लोकशाहीत अल्पसंख्यांची गुलामी म्हणजे बहुमताचे राज्य असते. आपल्याकडे भाजपा वा नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे बहुमताचा कौल लोकसभेत मिळवला आहे, तर तोच भारतीय पुरोगाम्यांना गुन्हा कशाला वाटतो, त्याची साक्ष यातून मिळू शकते. आमचे मान्य करणार असाल तर लोकशाही, अन्यथा लोकशाहीचा गळा घोटणारे युक्तीवाद आणि बुद्धीवाद म्हणजे लोकशाही; असे एकूण पुरोगामीत्वाचे स्वरूप आहे. लेखक समिक्षक प्रा. शेषराव मोरे यांनी पुरोगामी दहशतवाद असा शब्द वापरला, त्याचे हे जगभरचे प्रत्यंतर आहे. कुठल्याही देशात वा समाजात जे लोक सातत्याने संहिष्णूतेचा आग्रह धरत असतात, ते मुळातच असंहिष्णू असतात. त्यांना आपले अल्पमत इतरांच्या माथी मारण्यासाठी संहिष्णूता हवी असते. पण जेव्हा सत्ताधिकार त्यांच्याच हाती येतो, तेव्हा अतिशय निर्दयपणे हे पुरोगामी स्वातंत्र्य व संहिष्णूतेचा गळा घोटतात, असा जगाचा इतिहास आहे. अगदी रोमन ग्रीक साम्राज्य असेच संहिष्णूतेने रसातळाला गेले. ग्रीक-रोमन धर्माच्या देवतांची हेटाळणी नवोदित ख्रिश्चन धर्मीय पंडित करीत होते आणि त्यात सत्तेने कधी हस्तक्षेप केला नाही. त्यातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत गेला आणि एकदा त्यांची संख्या वाढल्यावर अन्य धर्मीयांना धर्मस्वातंत्र्यच उरले नाही. चर्चची सत्ता आली आणि अन्य धर्मीयांचे धर्मांतर किंवा कत्तल, इतका सोपा मार्ग अवलंबिला गेला. तेच पुढे मुस्लिम सत्ताधीशांनी केले आणि अलिकडल्या काळात पुरोगामी अशा मार्क्सवादी कम्युनिस्टांनी सत्ता हाती आल्यावर केलेले दिसेल. तेव्हा पुरोगामी वा तत्सम राजकीय भूमिकेतला हा छुपा डाव समजून घेतला नाही, मग कुठल्याही स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा विनाश व्हायला वेळ लागत नाही.

कालपर्यंत ख्रिश्चन असलेल्या युरोपातील बहुतेक राष्ट्रातून आता त्या धर्माचे प्रभाव वर्चस्व संपलेले आहे. पुरोगामीत्वाने ख्रिश्चन धर्माला विकलांग करून टाकल्यावर मुस्लिम धर्मीय तिथे क्रमाक्रमाने आपले संख्याबळ वाढवत आहेत आणि संहिष्णूतेच हवाले देणारे या जिहादी इस्लामचे बाहू पसरून स्वागत करीत आहेत. एकेकाळी रोमनांचा धर्म व संस्कृती याचप्रकारे बुडवणार्‍या ख्रिश्चनांवर काळाने उगवलेला हा सूड म्हणता येईल. सांगायचा मुद्दा इतकाच, की यात मुस्लिम वा ख्रिश्चन हा वाद नसून तिथे शिरजोर झालेल्या विध्वंसक पुरोगामीत्वाने पुढारलेल्या प्रगत युरोपियन समाजाला देशोधडीला लावण्याचे षडयंत्र यशस्वी केले आहे. आता जसजसे दिवस जातील तसतशी युरोपात ख्रिश्चन मुस्लिम यादवी आकार घेत जाईल. त्यात सध्या तरी लोकसंख्या ख्रिश्चनांची अधिक आहे. पण लढायची वा प्रतिकाराची शक्तीच युरोपियन गमावून बसले आहेत. कुठलाही समाज वा लोकसमुह कसल्या तरी अस्मितेसाठी लढत असतो. मुस्लिमांना आपण आक्रमक म्हणतो, कारण ते धार्मिक अस्मितेसाठी प्राण पणाला लावायला सज्ज असतात. पण ज्यांना असली कुठलीच अस्मिता नसते, ते कशासाठीही लढू शकत नाहीत. युरोपची तीच दुर्दशा पुरोगामीत्वाने केलेली आहे. म्हणून मुठभर जिहादी त्यांना ओलिस ठेवू शकतात. मनमानी कत्तल करू शकतात आणि सुसज्ज सशस्त्र दले खडी असूनही तिथले सरकार व सत्ताधीश दुबळे भासू लागतात. अगतिक होतात. त्यांना अधिकच खच्ची करण्यासाठी मग त्यांच्या हाती पुष्पगुच्छ वा मेणबत्तीचे हत्यार दिले जाते आणि त्यातून आपण अधिकच लढवय्ये झाल्याच्या भ्रमात त्यांना मशगुल करता येते. तितके मग जिहादींना सोपे बळी मिळू लागतात. थोडक्यात आता युरोप धार्मिक यादवीच्या दिशेने जाईल किंवा लौकरच त्याची पुढारलेला ख्रिश्चन प्रगत समाज ही ओळख पुसली जाईल. मोजक्या शब्दात बोलायचे तर युरोपचा सिरीया, अफ़गाणिस्तान व्हायची लक्षणे दिसू लागली आहेत.


पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार  २२/११/२०१५

भीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा

  

पूर्वी ज्या भाकडकथा वा पुराणकथा ऐकायला मिळायच्या, त्यात कुठल्या तरी भयंकर राक्षसाच्या उच्छादाने सामान्य जनता हैराण झालेली असते आणि त्याचा बंदोबस्त करू शकत नाही, अशीच ती कहाणी असायची. पण त्यात एक उपाय सांगितलेला असायचा. म्हणजे असे, की तो राक्षस कितीही शकतीशाली वा बलदंड असला आणि त्याच्यावर कुठलेही शस्त्र चालत नसले, तरी त्याला मारण्याचा संपवण्याचा एकमेव उपाय असे. तो म्हणजे त्या राक्षसाचा जीव कुठल्या तरी पक्षी प्राण्यामध्ये लपवलेला असायचा. एकदा का तो पिंजर्‍यात ठेवलेला पक्षी ठार मारला, मग त्या राक्षसाला ठार मारण्याची गरज नसे. इथे पक्षी तडफ़डून मेला, की तिथे राक्षसही मेलाच समजा. अर्थात हे आज कोणाला सहसा पटणार नाही. कारण आता आपण खुप बुद्धीवादी वा अंधश्रद्दा झुगारणारे विज्ञानवादी होऊन गेलोत. तेव्हा आपण पक्षी राक्षस आणि त्यांचा डीएनए वगैरे आक्षेप सुरू करू. पुरावे मागू! पण सुदैवाने पुर्वीच्या काळात लोकांन पुरावे मागण्याची बुद्धी नसे आणि कथेतला बोध समजण्याची अक्कल असायची. म्हणून लोकांना राक्षस ओळखता यायचे आणि त्याचा प्राण दडवून ठेवलेले पक्षीही कुठल्या पिंजर्‍यात आहेत ते ठाऊक असायचे. आता राक्षस राहिले नाहीत की त्यांचा प्राण ज्याच्यात ठेवलेला आहे, असे पिंजर्‍यातले पक्षी राहिलेले नाहीत. हल्ली पिंजर्‍यातल्या पक्षाला सीबीआय किंवा तत्सम काहीतरी म्हणतात. बाकी राक्ष्स कोणाला म्हणायचे आणि तो कसा ओळखायचा, ही मोठीच समस्या होऊन बसली आहे. पण अधूनमधून हिंसाचाराचा राक्षस, दहशतवादाचा राक्षस, भ्रष्टाचाराचा राक्षस वा महागाईचा राक्षस असे शब्द कानी येतात. तो राक्षस कुठे दिसत नाही, की त्याला पकडताही येत नाही. सहाजिकच त्याचा बंदोबस्तही होत नाही. त्याला मारण्याच्या गप्पा खुप चालतात, पण त्यातला कुठला राक्षस मेल्याचे कधी अनुभवास येत नाही.

उदाहरणार्थ सध्या असंहिष्णुता नावाचा एक राक्षस बोकाळल्याचे कानी येत असते. त्याला म्हणे पुरस्काराची भूक लागते. मग तो बकासूरासारखे गाडाभर पुरस्कार नित्यनेमाने खाऊन फ़स्त करीत असतो. महाभारतातल्या कथेत जसा बकासूर असतो आणि त्याला रोज गाडाभर अन्न लागते, अधिक ते घेऊन येणार्‍या माणसालाही बकासूर खाऊन फ़स्त करतो म्हणे. मग एके दिवशी कुंती आपला बलदंड पुत्र भीमालाच त्याच्याकडे पाठवून देते अशी कहाणी आहे. तिथे जाऊन बकासूरासाठी पाठवलेले गाडाभर अन्न भीमच ताव मारून खात बसतो, वगैरे. मग बकासूर चिडतो आणि दोघांची हाणामारी होते. त्यात बकासूर मारला जातो आणि त्या गावकर्‍यांची त्याच्या तावडीतून मुक्तता होते. पण ही झाली भाकडकथा! हल्लीही असे अनेक बकासूर तुरडाळ खातात, पैसे खातात किंवा आणखी काही खातात. मग जनता नावाची भारतीय कुंती आपल्या कुणा पुत्राला भीम बनवून बकासूराच्या बंदोबस्ताला पाठवून देते. गाडाभर मते घेऊन गेलेला हा आधूनिक भीम बकासूराचा बंदोबस्त नक्की करतो. पण तिथेच कथेतील साम्य साधर्म्य संपून जाते. बकासूराचा बध केल्यावर भीम आणखी शिरजोर होतो आणि माघारी येतो. त्याच्या विजयाचा महोत्सव लोक साजरा करतात आणि काही दिवसात लोकांसह जनता नावाच्या कुंतीला लक्षात येते, की बकासूराला संपवायला गेलेला आपला भीम आता बदलला आहे. बकासूराला संपवून परत आला तो भीम आता स्वत:च बकासूर झालेला आहे आणि त्यालाच गाडाभर अन्न, पैसा वगैरे गोष्टी पुरवताना आपला जीव पुन्हा मेटाकुटीला येऊ लागला आहे. पण याचा बंदोबस्त कसा करावा, या समस्येचे उत्तर त्यांना सापडत नाही. कधी हा भीम बकासूर तुरडाळ फ़स्त करतो, तर कधी तांदूळाचे गोदामच रिकामी करून टाकतो. त्याची भूक कशी संपवावी ते लोकांना उमजत नाही, की बंदोबस्त करायचे सुचत नाही.

आपण पुराणकाळातून व भाकडकथांतून बाहेर पडल्याचा तो दुष्परिणाम आहे. अन्यथा आपण असे राक्षस संपवायला आंदोलने, निवडणूका असले निकामी प्रयोग उपयोग कशाला केले असते? शास्त्र विज्ञानाच्या मागे धावण्यापेक्षा आपण भाकडकथेचा आधार घेऊन अशा राक्षसाचा जीव कशात वा कोणात लपलेला आहे, त्याचा शोध लावला असता आणि सरळ जाऊन त्या पोपट वा पक्षाची मान पिरगाळली नसती का? हल्लीच्या अशा राक्षसांचा जीव खरेच कुठल्या तरी पक्षात असतो. मात्र ह्या पक्षाला चोच नसते की पंख पिसे नसतात. त्याला राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात असते. असे पक्ष संघटना, कार्यकारीणी, पदाधिकारी अशा पिंजर्‍यात बंदिस्त कसतात. मात्र कुठल्याही मोकाट होणार्‍या आधुनिक राक्षसाचे प्राण अशा राजकीय ‘पक्षा’तच लपवलेले असतात. हे प्राण किंवा त्या राक्षसाची खरी शक्ती सामान्य माणसाची विस्मृती म्हणजे दुबळी विस्मरणशक्ती असते. आपण सामान्य माणसे काहीही लक्षात ठेवत नाही, की लक्षात ठेवायचा प्रयत्नही करीत नाही. पर्यायाने तीच राजकीय पक्षांची शक्ती बनून जाते. आता महागाईचा राक्षस बोकाळला आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या पत्नीनेही तशी तक्रार केलेली आहे. सामान्य जनता किंवा गृहीणीला तुरडाळीची महागाई सतावते आहे, असे सौ. फ़डणवीस यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किती लोक नुसत्या त्या शब्दांनी सुखावले ना? आता मुख्यमंत्री पत्नीच बोलली म्हणजे त्यांचे यजमान महागाईच्या राक्षसाला संपवणार असे काहीजणांना वाटले आणि त्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या आहेत. पण महागाईचा राक्षस नुसते जीआर काढून वा गोदामावर धाडी घालून मरेल कसा? अशा राक्षसांना अमरत्त्वाचे वरदान लाभलेले असते. त्यांना कुठले हत्यार मारू शकत नसेल, तर जीआर किंवा धाडी धरपकड कशाला इजा पोहोचवू शकेल? त्यासाठी पक्षाचीच मान पिरगाळली पाहिजे.

सौ. फ़डणवीस तुरडाळीबद्दल बोलल्या तसेच अकरा वर्षापुर्वी आणखी कोणीतरी बोलले होते, हे आपल्याला स्मरते का बघा! कितीही स्मृतीला ताण दिला तरी आपली स्मरणशक्ती दाद देणार नाही. कारण तेच तर कुठल्याही राजकीय पक्ष वा सत्ताधार्‍याला मिळालेले वरदान असते. अकरा वर्षापुर्वी देशात मोठे सत्तांतर झाले आणि सोनियांनी पंतप्रधान होण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांना त्या पदावर बसवले होते. त्यानंतर होऊ घातलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या पत्नीला त्याबद्दल विचारले होते. आपला पती पंतप्रधान झाल्याच्या बदल्यात तुम्ही काय अपेक्षा करता? या प्रश्नाला उत्तर देताना सौ. मनमोहन म्हणाल्या होत्या, बस गॅसच्या किंमती वाढू नयेत म्हणजे झाले! मनमोहन यांनी पुढल्या दहा वर्षात बाकी काय केले ते सोडून द्या. आपल्या पत्नीची इच्छा तरी पुर्ण केली काय? आजवर कित्येक वर्षे व दशके चालू होते ते गॅस सिलींडरवरचे अनुदान त्यांनीच काढून घेतले, अनुदानित सिलींडरची संख्या कमी केली. गॅसच्या किंमती वाढवल्या. आरंभीच्या आपल्या इच्छा सौ. मनमोहन सुद्धा कधीच विसरून गेल्या. हा आपला दांडगा अनुभव गाठीशी असताना, आपण सौ. फ़डणवीसांनी तुरडाळ स्वस्त व्हायची भाषा केल्यावर हुरळून गेलो ना? हेच तर राजकीय पक्षाचे खरे बळ असते. आपली विस्मृती हे पक्षाचे बळ असते आणि त्याच पक्षात कुठल्याही राक्षसाचा जीव लपलेला असतो. मग त्या राक्षसाचे निर्दालन कसे व्हायचे? सौ. फ़डणवीस असोत की सौ. मनमोहन असोत, त्यांनी तसे बोलायचे असते आणि पत्रकारांनी टाळ्या पिटुन आपल्याला उल्लू बनवायचे असते. यापेक्षा अशा राक्षसाच्या बाबतीत पुढे काहीही होत नाही. कारण आपण राक्षसाच्या निर्दालनालाच भाकडकथा समजून बसलोय. त्यातून मग पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या अर्धांगिनी वा गृहीणीच्या शब्दांच्या विधानांचा भाकडकथा सुरू होतात आणि नव्या पुराणकथांचा जन्म होत असतो. नवे बकासूर उदयास येतात आणि भविष्यातल्या बकासूराला आपण आजच भीम म्हणून डोक्यावर घेऊन नाचत असतो.

Friday, November 20, 2015

सौदी सिंहासन डळमळू लागलेय



फ़्रान्सच्या मोठ्या घातपाती हल्ल्यानंतर युरोपभर धमाल उडालेली असताना सर्वांचे लक्ष इसिस व सिरीया-इराकने वेधून घेतले आहे. म्हणूनच मग अन्य तितक्याच महत्वाच्या घडामोडी दुर्लक्षित होऊन जातात. किंबहूना पॅरीसच्या घातपाताशी संबंधित असूनही अशा घटनांकडे दुर्लक्ष होते. अशी एक घटना आहे येमेनचा परागंदा राष्ट्राध्यक्ष मायदेशी परतला आहे. अब्द रब्बु हादी हे येमेनचे राष्ट्राध्यक्ष मागले कित्येक महिने आपल्या देशातून परागंदा होऊन सौदी अरेबियात वस्तीला गेले होते. अज्ञातवासातून त्यांनी देशाचा कारभार चालविला होता. कारण इराण समर्थित हौथी नावाच्या जिहादी अतिरेक्यांनी येमेनमध्ये अराजक माजवले होते. तिथे फ़सलेल्या कित्येक हजार भारतीय व अन्य देशाच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची यशस्वी कारवाई भारतीय सेनेने पार पाडल्याचे आपल्या स्मरणात असेल. इतके अराजक होते, कारण हौथींनी तिथे उच्छाद मांडला होता. एकामागून एक मोठी शहरे वस्त्या त्यांच्या ताब्यात गेल्यावर हादी यांनी सौदीकडे पळ काढला होता. मित्र देश म्हणून त्यांना सौदी राजांनी आश्रय दिला व त्यांच्या वतीने यादवीत हस्तक्षेप करून आखाती अरबी देशांची आघाडी बनवली होती. त्यामार्फ़त येमेनमध्ये सौदीने सैन्य पाठवले व हवाई हल्ले चढवले होते. मात्र ते युद्ध सौदीला सोपे गेले नव्हते. इतके जवळ असूनही इसिसने त्यात नाक खुपसले नाही. कारण हौथी हे इराण समर्थक असून शियापंथीय जिहादी बंडखोर आहेत. किंबहूना इसिसच्या मागची खरी शक्ती सौदी घराणे आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही. म्हणून तर इसिसला संपवताना तशी वेळ आली तर सौदीवर हल्ले करण्याची धमकी पुतीन यांनी दिलेली होती. पण तशी वेळ अजून आलेली नाही. कारण इसिसने मोठी चुक करून फ़्रान्समध्ये घातपात केला किंवा त्याची जबाबदारी घेतली. सहाजिकच सौदीचा मित्र असलेल्या फ़्रान्सने पवित्रा बदलला आहे.

आजपर्यंत इसिसपेक्षा असदला व त्याच्या सेनेला संपवणारे हल्ले अमेरिका व नाटो देश करीत होते. पण शुक्रवारच्या हल्ल्यानंतर फ़्रान्सने थेट इसिसच्या अड्ड्यावर आणि बालेकिल्ल्यावर हल्ले सुरू केले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन पुतीन यांच्याशी जुळवून घेत संयुक्त हल्ले करण्याची योजना आखलेली आहे. त्यामुळे सौदी राजे मोठ्या अडचणीत आले आहेत. कालपर्यंत इराण, इराकच्या सत्ताधीशांना हैराण करणारे इसिसचे लढवय्ये आता घाबरले असून, आपला बचाव करण्यासाठी त्यांनी सौदी राजांना साकडे घातल्यास नवल नाही. पण तसे सौदी घराणे उघडपणे करू शकणार नाही. म्हणजेच इसिसला वाचवणे सौदीला शक्य नाही. अशा वेळी येमेनच्या अध्यक्ष हादी यांचे लोढणे सौदीला गळ्यात नको होते. म्हणूनच त्याला विनाविलंब माघारी धाडलेले आहे. म्हणजे़च आता येमेनच्या युद्धातून सौदी माघार घेत असल्याचा संदेश दिला गेला आहे. सौदी त्यात माघार घेत आहे, कारण आता त्या राजेशाहीला त्यांनीच उभा केलेला भस्मासूर भेडसावतो आहे. कालपर्यंत सिरीयाच्या असदला अडचण करण्याच्या बोलीवर इसिसला सौदीने मदत केलेली आहे. त्यासाठीच इसिसला रोखण्याचे नाटक रंगवून अमेरिकेनेही असदलाच निकामी करणारे हल्ले केले होते. परंतु त्यात पुतीन यांनी उडी घेऊन सगळाच खेळ विस्कटून टाकला आहे. पुतीन यांनी थेट व नेमके इसिसवर हल्ले चढवून असदची शक्ती वाढवली आहे. त्यात अमेरिका व नाटो देश असद विरोधात पुढे आले नाही, तर इसिसची ससेहोलपट होणार आहे. त्यांना पळायला जागा उरणार नाही. अशावेळी त्यांनी नजिकचे प्रदेश म्हणून सौदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना रोखणे सौदी सेनेला व लष्कराला अशक्य होऊन जाऊ शकते. शिवाय इसिसचे लढवय्ये सूडबुद्धीने अतिशय क्रुर वागतात. म्हणूनच सौदीला त्यांचा धाक असल्यास नवल नाही. त्याला सामोरे जाण्याची सौदी राजे तयारी करीत असल्याची ही खुण आहे.

आपल्याच पायाशी आग जळू लागली म्हटल्यावर सौदी राजांनी येमेनच्या अध्यक्षाला पिटाळून लावले, असे म्हणायला हरकत नाही. मागल्या काही वर्षात जगभर जिहादी व वहाबी हिंसा व धार्मिक आक्रमतेची आग पेटवण्यात सौदीच्या राजघराण्याने सतत पुढाकार घेतला होता. कधी ओसामा वा इसिसचा बगदादी किंवा पाकिस्तान यांना पुढे करून सौदी राजे सतत नामानिराळे राहिलेले आहेत. पण मुशर्रफ़ म्हणतात तसा सौदीचा भस्मासूर आता त्यांच्यावरच उलटण्याचे भय सतावते आहे. ओसामा वा जिहादी आम्हीच तयार केले, पण आता ते आमच्यावर उलटले आहेत, असे मध्यंतरी मुशर्रफ़ म्हणाले होते. सौदीची कहाणी भिन्न नाही. पेट्रोलच्या पैशाने जगभरात मुस्लिम तरूणांना जिहादमध्ये ओढण्याचे कारस्थान मूळात सौदीचे आहे. मागे राहुन त्यांनी ते पाप बगदादी, ओसामा इत्यादि हस्तकांकडून करून घेतले. वेळ आल्यावर ओसामाला देशातून हाकलण्यापर्यंत मजल मारली. पण बगदादी ओसामासारखा नाही. तो अतिशय क्रुरकर्मा व सुडबुद्धीने पेटलेला जिहादी आहे. म्हणूनच आपल्याला सौदी राजांनी वापरून फ़ेकल्याची धारणा झाल्यास तो सौदीलाही गवसणी घालण्याचा धोका आहे. किंबहूना त्याने स्वत:ला खलिफ़ा म्हणूनच घोषित केले आहे. धार्मिक निकषावर मग त्याला सौदीत धुसणेही भाग आहेच. कारण खलिफ़ा हा इस्लामी सत्ता व जनतेचा सार्वभौम सुलतान असतो आणि मक्का मदिना अशा धर्मस्थळांवर त्याची सत्ता चालावी, असाही संकेत आहे. म्हणजेच उद्या बगदादीने सौदीत घुसून मक्का मदिनेवर अधिकार सांगितला, तर सौदी घराण्याची सत्ता डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही. कारण वहाबी पंथाचेच अधिक सौदी लढवय्ये बगदादीला सामील आहेत आणि एकूणच सौदी राजापेक्षा तिथली लोकसंख्या वहाबी पंथाशी निष्ठावान आहे. ह्या भयाने सौदी घराण्याची सध्या तारेवरची कसरत सुरू झाली आहे.

कालपर्यंत शियांच्या विरोधात सुन्नी अशी लढाई लढवून पश्चिम आशियात आपले वहाबी वर्चस्व निर्माण करण्याचे साळसुद डावपेच सौदी घराण्याने यशस्वीरित्या खेळले. पण आता सर्वच डाव उलटू लागले आहेत. आधी रशियाने हल्ले करून इसिसचा कणा मोडला आणि आता त्याच्या मदतीला फ़्रान्स गेल्यास अमेरिकेला त्यात कुणाची बाजू घ्यावी, असा पेच पडणार आहे. इसिसच्या विरोधात अमेरिका हल्ला करायला पुढे झाली नाही आणि निष्क्रीय राहिली, तरी पुतीन यांचा डाव यशस्वी होऊ शकतो. कारण पुतीन यांना पश्चिम आशियात इराण-असद यांना शिरजोर करायचे आहे. पर्यायाने सौदीला खच्ची करायचे असून, तसे झाल्यास अमेरिकेचे त्या भागात असलेले वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. फ़्रान्समध्ये घातपात करून इसिसने सौदीच्या गोटातील फ़्रान्सला पुतीन-असद यांच्या गोटात जायला भाग पाडले आहे. त्यामुळे सौदी घराण्याला नाटो व अमेरिका यांचे असलेले सुरक्षा कवच विस्कटले आहे. परिणाम सरळ आहे. सौदीला आता पश्चिम आशियात स्वत: उडी घ्यावी लागेल, अथवा त्या एकूण राजकारणातून माघार घ्यावी लागेल. त्याच कारणास्तव मग येमेनमधून सौदीने एकप्रकारे माघार घेतली आहे. तिथल्या अध्यक्ष हादी यांना मायदेशी पाठवून त्याचा आरंभ झालेला दिसतो. पॅरीसमधील घातपाती हल्ला अनेक राजकीय डावपेच व राजकीय समिकरणांना कलाटणी देणारा ठरू लागला आहे. एकूणच जगभरात जे जिहादचे हिंसक तांडव चालू आहे, त्यामागे सुन्नी मुस्लिमांची शक्ती आहे. तीच खच्ची झाली तर पर्यायाने सौदी व आखाती देशांचे मनोधैर्य खचणार असून इराणला आपला व शिया पंथाचा वरचष्मा निर्माण करण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. हीच स्थिती आल्यास मग सौदी घराण्याचे सिंहासन डळमळीत होऊ शकते. किंबहूना म्हणूऩच कुठलाही गाजावाजा न करता सौदीने येमेनच्या अध्यक्षाला मागे पिटाळले आहे.

Thursday, November 19, 2015

छोटा शकील आणि खोटा शकील



मध्यंतरी म्हणजे बिहार निवडणूकांचा प्रचार रंगात आला असताना अकस्मात देशातील बुद्धीमंत, कलावंत असंहिष्णूतेने चिंतित झाले होते. पण बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावर त्यांना त्याच असंहिष्णूतेचा विसर पडला आहे. ती भाषा एकदम बंद झाली आहे. आता दुसरी बाजू बघा. कॉग्रेसचे नेते आणि प्रवक्ते शकील अहमद यांनी छोटा राजन वा अनुप चेतिया यांच्याबाबतीत एक वादग्रस्त विधान केले. ‘राजन वा चेतीया हे मुस्लिम नाहीत. अन्यथा मोदी सरकारची त्यांच्या बाबतीतली भूमिका वेगळी राहिली असती.’ यावरून वादळ उठले आणि झाल्या प्रकाराबद्दल माफ़ी मागून शकील यांना विषय गुंडाळता आला असता. पण त्याऐवजी त्यांनी नाराज प्रतिक्रीयांची भाजपा समर्थक म्हणून खिल्ली उडवली आणि देशातील ‘बुद्धीमंतांनी’ आपली पाठराखण केल्याचे दुसरे विधान केले. याचा अर्थ असा, की शकील यांनी जे वादग्रस्त विधान केले, त्याचे या देशातील बुद्धीमंत समर्थन करतात. म्हणजे बुद्धीमंतांनाही असेच वाटते, की छोटा राजन व अनुप चेतिया मुस्लिम असते, तर मोदी सरकारने त्यांच्याशी वेगळी वागणुक केली असती. ह्याचा एकूण अर्थ स्पष्ट आहे. भारत सरकार वा आजचे मोदी सरकार मुस्लिमांना पक्षपाती वागणुक देत असते. हा केवळ शकील यांचा दावा नाही, तर देशातील बुद्धीमंतांचाही तोच दावा आहे. अर्थात शकील खोटे बोलत नाहीत. कारण त्यांना जे बुद्धीमंत वाटतात वा माध्यमातून ज्यांना बुद्धीमंत म्हणून पेश केले जाते, त्यांची वागणूक तशीच असते. भारतात हिंदू समाजाविषयी आकस व्यक्त करण्याला बुद्धीमंत असा दर्जा मिळत असतो. उलट हिंदूंवर अन्याय होत असल्याने चिडून प्रतिक्रीया देण्याला इथे प्रतिगामी ठरवले जात असते. तेच सलमान खुर्शीद किंवा मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन सांगत असतात. एकूण या प्रकारातून भारतातल्या तथाकथित बुद्धीमंतांचा खरा चेहरा समोर आला आहे.

पण नुसताच या बुद्धीमंतांवर आरोप करण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी तपासणेही योग्य ठरेल. शकील यांनी जे विधान केले आहे त्यांना गुन्हेगार ठरवण्यात माध्यमातल्या जाणत्यांनी उतावळेपणा केला किंवा सत्य दडपण्यासाठी धावाधाव केली, असेही म्हणता येईल. किंबहूना त्यावरून असे काहुर माजवले, की सामान्यत: हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रप्रेमी असतील त्यांनी शकील यांच्यावर तुटून पडावे. आणि झालेही तसे्च! पण शकील यांचे विधान किती लोकांनी तपासले? त्याचे स्पाष्टीकरण तरी कोणी मागितले काय? समजा त्यांचा दावा खरा आहे, तर शकील यांनी आपल्या विधानाचा संकोच कशाला केलेला आहे? राजन व चेतिया मुस्लिम असते तर मोदी सरकारची भूमिका वेगळी राहिली असती, म्हणजे कशी राहिली असती? आता जी भूमिका या दोघांबद्दल मोदी सरकारने घेतली आहे, त्यात शकील यांना काय आक्षेपार्ह वाटले आहे? समजा त्यांच्याच लाडक्या कॉग्रेस पक्षाचे सरकार असते, तर त्यांनी मुस्लिम नाहीत म्हणून या दोघांबद्दल कोणती भूमिका घेतली असती? असे प्रश्न शकीलना विचारले गेले पाहिजेत. तेव्हाच त्यांची वास्तव भूमिका स्पष्ट झाली असती आणि मगच त्यांच्यावर टिका करणे वा त्याचे समर्थन करणे योग्य ठरले असते. पण यातले काहीही झाले नाही. नुसताच धुरळा माध्यमांनी उडवला आणि त्यात तितक्याच उत्साहात मोदी समर्थकही सहभागी झाले. किंबहूना तसा गोंधळ माजवण्यासाठी व राजन व चेतिया यांच्या अटकेसंबंधी शंका निर्माण करण्याच्याच हेतूने शकील यांनी अर्धवट विधान केले आणि माध्यमांनी त्यावर गदारोळ माजवून सामान्य माणसाची निव्वळ दिशाभूल करण्यात धन्यता मानली. शकील यांचा हेतू स्पष्ट आहे. मुस्लिम असते तर त्यांना जिवंत मायदेशी आणण्यापेक्षा मिळतील तिथे ठार मारण्याचा डाव मोदी सरकारने खेळला असता, असे त्यांना म्हणायचे आहे. मात्र तेवढेच बोलायचे त्यांनी सराईतपणे टाळले आहे.

पाकिस्तानात दडी मारलेल्या दाऊदला ठार मारण्याचे अनेक डाव आजवर भारतीय गुप्तहेर खात्याने योजलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. अगदी जेव्हा शकील यांच्या लाडक्या सोनिया गांधींच्या इशार्‍यावर नाचणारे मनमोहन सरकार सत्तेत होते, तेव्हाही दाऊदला ठार मारण्याच्या योजना आखल्या गेल्या व सज्जताही केली गेली. पण ती अखेरच्या क्षणी सरकारी हस्तक्षेप झाल्याने पुर्णत्वास जाऊ शकली नाही, हे आता उघड गुपित आहे. अनेक माजी अधिकार्‍यांनी आणि गुप्तचरांनी त्याची जाहिर साक्ष दिलेली आहे. आणि तीच तर शकील अहमद यांची खरी पोटदुखी आहे. पण सोनियांच्या हाती सत्ता असतानाही छोटा राजनला वा चेतियाला असतील तिथे ठार मारण्याच्या योजना भारतीय हेरखात्याने कघी आखल्या नाहीत. ही शकील यांची वेदना आहे. किंबहूना कॉग्रेस प्रवक्ते शकील अहमद आणि त्यांच्याशीच नाम-साधर्म्य असलेला दाऊदचा विद्यमान उजवा हात ‘छोटा शकील’ याचेही तेच दुखणे आहे. पाकिस्तानात बसलेल्या व पाक हेरखात्याच्या इशार्‍यावर इथे भारतात उत्पात घडवणार्‍या शकीलने कितीदा तरी राजनला ठार मारण्याचे बेत आखले. पण त्याला ते डाव तडीस नेता आले नाहीत. ही त्याची पोटदुखी आहे आणि नेमकी तीच कॉग्रेस प्रवक्ता शकील अहमद यांची पोटदुखी आहे. मात्र त्याविषयी मौन धारण करून हे महाशय अतिशय संदिग्ध भाषेत ‘वेगळी भूमिका’ असे शब्द योजतात. तर निदान त्यांना काय हवे आहे, ते तरी विचारले गेले पाहिजे ना? म्हणजे राजन-चेतिया बाजूला ठेवा, दाऊदचा विषय घ्या! त्याच्याशी मोदी सरकारने कसे वागावे अशी शकील यांची अपेक्षा आहे? दाऊदलाही भारतात सुखरूप आणावा, असे त्यांना मनापासून वाटते काय? राजनला आणले तसे दाऊदलाही आणा, अशी मागणी त्यांनी कशाला केलेली नाही? असे सवाल शकीलना कोणीच का विचारू नये?

खरे तर शकील यांचे दुखणे सोपे आहे. त्यांना राजनपेक्षा दाऊदची चिंता सतावते आहे. कारण पाकिस्तानात जाऊन दाऊदला मारण्याच्या योजना मोदींच्या कारकिर्दीत यशस्वीरित्या पार पाडल्या जातील, अशा भयाने शकील अहमद व्याकुळ झालेले आहेत. आणि तिथेच मोदी सरकारची ‘वेगळी भूमिका’ त्यांच्या पोटात गोळा आणताना दिसते आहे. पण तसे उघडपणे बोलण्याची हिंमत त्यांना झालेली नाही. दाऊदला ठार मारण्याच्या योजना आखता, तर राजनलाही परदेशातच ठार मारण्याची भूमिका का घेतली नाही, असा त्यांच्या विधानाचा खरा रोख आहे. पण तसे बोलण्याऐवजी त्यांनी ‘वेगळी भूमिका’ अशा शब्दांची पळवाट शोधली आहे. इतकीच या शकील मियांना आपल्या लाडक्या दाऊदची चिंता सतावत असेल, तर त्यांनी तशी तयारी करून दाऊदला मायदेशी आणण्याची योजनाच मोदी सरकारला सादर करावी. त्याला सरकारने नकार दिला, मग आपल्या मनातील गरळ भरचौकात येऊन ओकावी. वास्तविक खुर्शीद अहमद वा मणिशंकर अय्यर यापासून सुधींद्र कुलकर्णी, बरखा दत्त असे एकाहून एक पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे सखे-सोबती अहमद यांच्या सेवेला सज्ज आहेत. त्यांच्या मध्यस्थीने दाऊदशी बोलणी करून व पाक सरकारच्या मदतीने दाऊदला मायदेशी आणता येऊ शकेल. अडचण एकच आहे, की पाक सरकारला तोच दाऊद आपल्या देशात दडला असल्याचे मान्य करावे लागेल. बोगस नावाचा पासपोर्ट खोटा ठरवण्यात राजन प्रकरणी इंडोनेशिया सरकारने जे सहकार्य केले, ते पाक सरकारला करावे लागेल. ती सुविधा अहमद यांनी उपलब्ध करून देणे शक्य आहे. पण त्यातून भारतातले पाकिस्तानप्रेमी व छुपे समर्थक चव्हाट्यावर येतील ना? म्हणून अपुरे व ‘छोटे’ विधान करून ‘शकील’ यांनी नुसती मळमळ व्यक्त केली. खरे दुखणे मात्र सराईतपणे लपवून ठेवले आहे. दाऊद मारला जाण्याची चिंता त्यांना खरे तर सतावते आहे, इतकेच! थोडक्यात छोटा शकील तरी खरे मनातले बोलतो, हा खोटा शकील मात्र मनातले दडवून दिशाभूल करतोय.

Wednesday, November 18, 2015

खरे घातपाती आपल्याच आसपास



काही गोष्टी आपल्याला दिसत असतात, पण त्याचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नसतो. म्हणून आपण त्याविषयी गोंधळलेले असतो. अशा अनेक गोष्टी जाणिवपुर्वक घडवलेल्या असतात आणि त्यातली गुंतागुंत आपल्याला उलगडत नसल्याने, त्याचे अर्थ आपल्याला लागत नाहीत. धोकादायक असूनही आपण त्याविषयी गाफ़ील रहातो. अनेकदा तर आपल्यालाही आत्मनाशासाठी प्रवृत्त केले जात असते. आपण चांगुलपणाच्या आहारी जाऊन डोळसपणे आपल्याच हानीसाठी हातभार लावत असतो. काही महिन्यांपुर्वी याकुब मेमन या घातपात्याच्या फ़ाशीवरून देशात मोठा तमाशा झाला, तेव्हा अहोरात्र लढणारे बुद्धीमान वकील फ़ाशी या अमानुष शिक्षेच्या विरोधात लढत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. इतके मोठे नावाजलेले वकील कधी कुठल्या सामान्य नागरिकाच्या अन्यायाला वाचा फ़ोडण्यासाठी एकत्र आलेले वा लढलेले आपण बघितलेले नाहीत. मग गुन्हा सिद्ध झालेल्या एका खतरनाक आरोपीसाठी त्यांनी आपली सर्व शक्ती कशाला पणाला लावलेली असते? हा प्रश्न आपल्याही मनात उदभवतो आणि आपल्याला बुचकळ्यात टाकतो. मात्र त्याचा खुलासा वा उत्तर कुठूनही मिळत नसल्याने आपण त्या प्रश्नाकडेच पाठ फ़िरवतो. म्हणून प्रश्न संपत नाही, की त्यातून येऊ घातलेला धोका संपत नाही. पॅरीस वा मुंबई हल्ल्याने तेच आपल्याला सांगितले व समजावले आहे. पण आपण त्यातले काही समजून घ्यायला कितीसे तयार असतो? पॅरीसच्या हल्ल्यानंतर जी२० राष्ट्रांच्या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडेच जगाच्या नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पैसा, आडोसा आणि शस्त्रास्त्रे यापासून जिहादींना वंचित करायला जग एकत्र आले, तरच ह्या हिंसाचाराचा बंदोबस्त होऊ शकेल असेच मोदी कशाला म्हणाले? त्याचा माध्यमातून कितीसा उहापोह झाला आहे?

पॅरिस असो किंवा मुंबई असो, त्या हल्ल्याचे, त्यातल्या भीषणतेचे भयंकर वर्णन आपल्याला माध्यमातून ऐकू येते, बघायला मिळते. त्यातल्या आरोपी वा संशयितांची खुप माहिती दिली जाते. पण त्यांचे धागेदोरे कधी उलगडून सांगितले जात नाहीत. कारण तोच खरा रोग आहे. आपल्याला रोगाचा बळी दाखवला जातो, पण त्याची लक्षणे जाणिवपुर्वक लपवली जातात. माहिती देण्याच्या आवेशात बोलणारे, लिहीणारी माध्यमेच आपल्यापासून महत्वाची माहिती लपवित असतात. किंबहूना आता माध्यमांचा वापर माहिती लपवायला वा दिशाभूल करायला होत असतो. म्हणून माध्यमांनी याकुबला फ़ाशीतून वाचवायला निघालेल्यांचे बाकीचे तपशील आपल्यासमोर कधी उघड करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा महागड्या वकीलांना कोणी किती पैसे दिले आणि त्यांनी कशासाठी याकुबचा बचाव मांडला होता? अन्य कित्येक लोक फ़ासावर लटकले आहेत, तेव्हा यापैकी कोणी इतक्य़ा टोकाला जाऊन बचावाचा आटापिटा केलेला नव्हता. मग याकुबची वकीली करणे हा गुन्हा आहे काय? अजिबात नाही. पण त्यातला तत्वाचा आव निव्वळ ढोंग आहे. याकुब असो किंवा कसाब त्यांचे बोलविते धनी भलतेच असतात. घातपाती व देशद्रोही विविध रुपात भिन्न स्तरात काम करीत असतात. त्यात जसा गुंड गुन्हेगारांचा समावेश असतो, तसाच अतिशय प्रतिष्ठीत म्हणून समाजात वावरणार्‍यांचाही समावेश असतो. असे नावाजलेले लोक हाताशी धरून गुन्हेगारी व घातपाती कृत्ये करणार्‍यांना सुरक्षा कवच बहाल केलेले असते. थोडक्यात अशा प्रतिष्ठीतांना घातपाती गुन्हेगारांचे सहप्रवासी म्हणता येईल. एक गट भूमीगत अनोळखी वा अप्रतिष्ठीत राहुन काम करीत असतो, तर दुसरा गट प्रतिष्ठीत राहुन त्याला विविध प्रकारची रसद पुरवणे, बचाव मांडणे असे काम करत असतो. हे दुसरे काम अतिशय समाजविघातक असते.

घातपाती तुमच्याआमच्या जीवावर हल्ला करीत असतो. पण त्याच्या विरोधात समाजाने संयुक्त वा सामुहिक प्रतिकाराला सज्ज होऊ नये, याची काळजी त्याचे मान्यवर साथीदार घेत असतात. उदाहरणार्थ मुंबईत कसाब टोळीने हल्ला केल्यावर सामुहिक प्रतिक्रीया उमटण्याचा धोका असतो, तेव्हा हे लोक शांततेचे आवाहन करण्यात आघाडीवर दिसतील. हिंसेला हिंसा हे उत्तर नाही, तर मेणबत्त्या लावून वा ठराविक जागी प्रतिकात्मक फ़ुलांचे गुच्छ ठेवून आपण ‘शौर्य’ सिद्ध करतो, असा भ्रम फ़ैलावण्याचे काम हे मान्यवर करीत असतात. थोडक्यात माणसातील उपजत सुरक्षेची व सावधानतेची असलेली जाणिव निष्क्रीय व निकामी करण्याची कामगिरी घातपात्याचे समाजातील मान्यवर साथीदार पार पाडत असतात. म्हणूनच मुंबईत रझा अकादमीने दंगल माजवल्यानंतर संयम शांततेचे आवाहन करणारे दादरीच्या तुलनेने किरकोळ घटनेचे मोठे अवडंबर माजवताना दिसतील. नक्षलवाद्यांनी हिंसा केल्यावर ते कुणा मृताच्या सांत्वनाला जाणार नाहीत. पण त्यातला कोणी मारेकरी पकडला गेल्यास त्याच्यावरच अन्याय झाल्याचा ओरडा करताना दिसतील. समाजाच्या विविध घटकात व क्षेत्रात प्रतिष्ठीत म्हणून मिरवणार्‍या अशा लोकाचे परस्पर संबंध सामान्य माणसांना ठाऊक नसतात. ते उघड करण्याची जबाबदारी असलेली माध्यमे त्यावरचा पडदा कधी उठवत नाहीत. कोणी उठवायचा प्रयत्न केला, तरी त्याला प्रसिद्धी दिली जात नाही वा त्याच्याच विरोधात काहूर माजवले जात असते. कारण ही मोठी गुंतागुंतीचे साखळी असून त्यांनी देशाची सुरक्षा व समाजाची मानसिकता यांनाच सुरूंग लावला आहे. त्याचे धागेदोरे अशा विविध मान्यवरांच्या संस्था, त्यांना मिळणारा निधी, त्या निधीचे देणगीदार इत्यादींचे साटेलोटे असते. ते परस्पर पुरक भूमिका पार पाडत असतात. आपल्याला दिसतो केवळ घातपाती वा जिहादी!

मोदींनी जी२० परिषदेत जिहादच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा व जगभर दहशतवादाची एकमेव व्याख्या असण्याचा आग्रह धरला. खेरीज प्रगत देशांनी व जगाने एकत्र येऊन अशा हिंसाचाराचा एकजुटीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्याचे कारण खुद्द मोदीच मागल्या बारा चौदा वर्षातले अशा दहशतवादाचे मोठे बळी आहेत. गुजरात दंगलीचे जे काहुर माजवण्यात आले. त्याची गुंतागुंत उलगडायला गेल्यास जगभरच्या दहशतवादी हिंसाचाराचे मोठे षडयंत्र उघडकीस येऊ शकते. माध्यमातले हस्तक पत्रकार, शत्रू देशाचे हेरखाते, विविध देशातील फ़ौंडेशन व त्यांचा निधी, त्यांच्याच आश्रयाखाली पोसलेल्या शेकडो एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्था आणि त्यांनी जोपासलेले जागतिक हिंसाचाराचे कारस्थान, गुजरात दंगलीनंतर अधिक सुसंघटित होऊन कामाला लागलेले होते. तसे नसते तर महिनाभर आधी पुरस्कार वापसी नावाचे चाललेले नाटक बिहारच्या निकालानंतर बंद कशाला पडले असते? फ़ोर्ड फ़ौंडेशनकडून अशा हजारो संस्थांना येणारा निधी मोदी सरकारने बंद केल्यावरच देशात असंहिष्णूता पसरल्याचा गवगवा कशाला सुरू झाला असता? छोटा राजनला हिंदू म्हणून संरक्षण आणि मुस्लिम गुन्हेगारांना पक्षपाती वागणुक, असे विधान कॉग्रेसनेते शकील अहमद यांनी कशाला केले असते? मोदी इंग्लंडमध्ये गेले असताना अम्नेष्टी इंटरनॅशनलने त्यांच्या विरोधातली निदर्शने कशाला योजली असती? आपल्याजवळ आसपास प्रतिष्ठीत म्हणुन वावरणारे हे घातपाती खर्‍या जिहादी वा हल्लेखोरांपेक्षा अधिक घातक असतात. कारण येऊ घातलेल्या धोक्यापासून आपल्याला गाफ़ील ठेवण्याची दगाबाजी हेच लोक करत असतात. आपण जोवर अशा उजळमाथ्याने वावरणार्‍यांना ओळखून बहिष्कृत करणार नाही, तोवर कितीही पोलिस, सैन्य वा शस्त्रे आपल्याला सुरक्षित करू शकणार नाहीत.

पाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे



पाकिस्तानात जाऊन मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या पंतप्रधानाला हटवायची मागणी करावी, याचा अनेकांना राग आलेला आहे. पण त्यात नवे असे काय आहे? मणिशंकर अय्यर हे कॉग्रेसचे नेता आहेत आणि हेच मागल्या काही वर्षात कॉग्रेसचे धोरण राहिलेले आहे. सत्तेच्या पुढे त्यांना देश वा भारतीयत्वाचा अभिमान वगैरे काहीही राहिलेले नाही. तसे नसते तर त्यांची सत्ता असताना परदेशात मोदींना प्रवेश मिळू नये असे प्रयास त्यांनी थांबवले नसते का? गुजरातचा दोनदा निवडून आलेला मुख्यमंत्री आणि कुठल्याही कोर्टाने गुन्हेगार न ठरवलेल्या व्यक्तीला अमेरिकेने प्रवेश देवू नये, असे आवाहन इथल्या अनेक खासदारांनी संयुक्त पत्र लिहून केलेले होते. त्यांच्या बाबतीत तेव्हा युपीए सरकारने वा त्याचे नेतृत्व करणार्‍या कॉग्रेस पक्षाने कोणती कारवाई केलेली होती? आता ज्या वक्तव्यासाठी अय्यर यांना दोष दिला जात आहे, ते वक्तव्य दोन आठवड्यापुर्वीचे आहे. ज्या प्रकाशनाच्या निमीत्ताने मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फ़सले होते, त्याच पुस्तकाचे पुन्हा पाकिस्तानात प्रकाशन करण्याचा एक समारंभ आयोजित केला होता. तिथे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ़ यांच्यासह अय्यर यांनाही आमंत्रण देण्यात आलेले होते. तिथे बोलताना अय्यर यांनी ही मुक्ताफ़ळे उधळली होती. मोदींना हटवल्याशिवाय भारत-पाक बोलणी होऊ शकत नाहीत, ह्या त्यांच्या विधानाशी मुशर्रफ़ही सहमत झाले नाहीत. तिथेच व त्याच कार्यक्रमात मुशर्रफ़ यांनी तशी असहमती व्यक्त केली होती. याचा अर्थ मुशर्रफ़ मोदीप्रेमी वा भारतप्रेमी अजिबात नाहीत. तर मोदींना हटवायला २०१९ साल उजाडेल आणि तोपर्यंत पाकिस्तानला शांत बसून चालणार नाही, असे मुशर्रफ़ना सुचवायचे होते. त्यांना अय्यर यांचे विधान नावडलेले नव्हते, तर त्यातला कालावधी नावडला होता.

अर्थात अय्यर वा तत्सम लोकांनी हेच तर बोलावे आणि भारतीयांच्या मनात गोंधळ माजवावा, म्हणून पाकिस्तानी विविध सरकारी संस्था त्यांची बडदास्त ठेवत असतात. भारतीय राष्ट्रवादाला हतोत्साहीत करण्याचे काम त्यांनी पार पाडायचे असते. किमान भारतीयांना विचलीत करण्याचेच काम त्यांच्यावर सोपवलेले असते. तेच अशा विधानातून अय्यर करीत असतात. तेच कशाला, अनेक नावाजलेले पत्रकार बुद्धीमंत आपल्याला असे पाकधार्जिणे बोलताना दिसतील. त्याच्या बदल्यात त्यांना परदेशी दौरे वा मौजमजा करण्यासाठी अनेक कार्यक्रम पार्ट्या योजल्या जात असतात. सेमिनार वा परिसंवाद असे सोज्वळ नाव त्याला दिलेले असते. मागल्या वर्षी वेदप्रकाश वैदिक नावाचे एक पात्र अशाच निमीत्ताने पाकिस्तानात गेले आणि थेट सईद हाफ़ीजला भेटल्याचा गदारोळ आपल्याला आठवत असेल. भारतात पाकिस्तानी कलावंत, खेळाडू वा साहित्यिक राजकारण्यांना बोलवायचे किंवा इथल्या काहींना तिथे नेवून ऐषारामाचे चोचले पुरवायचे, हा उद्योग करणार्‍या काही संस्था असतात. पाकच्या माजी हेरसंस्था प्रमुखांची एक संस्था तशी असून त्यातला एक संचालक अय्यर आहेत. ज्याचा सगळा खर्च पाकिस्तान उचलते, अशा संस्थेत अय्यर संचालक असतात आणि त्याच संस्थेने योजलेल्या परिसंवादासाठी बरखा दत्त, दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वर्दराजन, सलमान खुर्शीद, सुधींद्र कुलकर्णी आमंत्रित असतात. याला योगायोग म्हणता येईल का? नेमके हेच लोक भारतविरोधी पाकिस्तानवादी मुक्ताफ़ळे उधळतात, याला तरी योगयोग म्हणता येईल का? तर त्यामागचा हेतू व कारण आपण समजून घेतले पाहिजे. शत्रूराष्ट्राला असे घरभेदी हवे असतात. ज्यांचे काम आपल्या मायदेशाशी गद्दारी करून सतत देशबांधवांना हतोत्साहित करायचे असते. तीच कामगिरी पार पडायची असते. अय्यर यांनी तेच केलेले नाही काय?

इथल्या कुठल्याही टिव्ही चर्चेत तुम्हाला असे अनेक चेहरे दिसतील, जे सतत शत्रूराष्ट्रांची दोस्ती हवी आणि युद्ध वा शत्रूत्व नको, असा आग्रह धरताना दिसतील. मग अशा लोकांना ते शत्रूदेश पाहुणे म्हणून आमंत्रित करून पाहुणचार देताना दिसतील. पण तिथे जाऊन त्या शत्रूदेशाला मैत्री वा संवादाचा सल्ला यातला कोणी कधी देणार नाही. उलट हे लोक मायदेशी सरकारच्या पवित्र्यावर हल्ला करताना दिसतील. काश्मिर असो किंवा मुंबई हल्ला असो, यापैकी एकाने तरी पाकिस्तानात जाऊन तिथले राजकारणी वा धोरणकर्ते यांना जाब विचारल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय? उलट इथे पाकिस्तानने काही घातपाती कृत्ये केली, मग आक्रस्ताळेपणा नको हा शहाणपणा हेच लोक शिवसेना वा संघाला शिकवताना दिसतील. त्याचसाठी तर पाकिस्तानने त्यांना पोसलेले असते. मात्र प्रचलित कायदे त्यांचा कुठला गुन्हा सिद्ध करू शकत नसतात, ही कायद्याच्या राज्याची अडचण असते. त्यांच्यावर तुम्ही देशद्रोह, राजद्रोह असले आरोप करू शकत नाही. कारण त्यांची वक्तव्ये अथवा कारवाया कायद्याच्या व्याख्येत गुन्हा ठरवता येत नसतो. पण तेच लोक दुसरी महत्वाची कामगिरीही पार पाडताना दिसतील. मोदी वा तत्सम कोणी काही बोलले, मग त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून जगभर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे कर्तव्य हीच मंडळी मोठ्या इमाने इतबारे पार पाडत असतात. व्ही के सिंग वा त्याच्याही आधी मोदींनी आपल्या मुलाखतीत कुत्र्याच्या पिल्लाच्या मरणाचा उल्लेख केला, त्यावरून काहुर माजवणारे कोण होते? नेमकी अशाच मंडळींची नावे तुम्हाला आठवतात की नाही? तर त्यामागची रणनिती ओळखली पाहिजे. मायदेशी राहुन गद्दारी करण्यासाठीच त्यांची अघोषित नेमणूक झालेली असते. म्हणून त्यातला एक कोणी बोलतो आणि बाकीचे त्यावरून गदारोळ उठवून गाजावाजा करण्याची कामगिरी पार पाडतात.



असे काही घडते तेव्हा चवताळून आपण त्यांचा निषेध करावा आणि शिव्याशाप द्यावेत, अशीच त्यांची अपेक्षा असते. कारण त्यातून त्यांची पाकिस्ताननिष्ठा प्रदर्शित होते किंवा त्यांच्या निष्ठा खर्‍या मालकाकडे सिद्ध होत असतात. म्हणून अशा शिव्याशाप देत बसण्यापेक्षा अशा लोकांचे धागेदोरे शोधणे व त्यांचे परपस्परांत गुंतलेले हितसंबंध जनतेसमोर आणणे अगत्याचे आहे. योगायोग बघा, हे लोक पाकिस्ताननिष्ठ भासतात तर त्यांच्याशी सहकार्य करणारे बहुतांश लोक फ़ोर्ड फ़ौडेशन वा तत्सम परदेशी निधीतून ‘देशसेवा’ किंवा समाजसेवा’ करताना दिसतात. यामागचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. मध्यंतरी पुरस्कार वापसीचे पेव फ़ुटले होते, त्यामागची खरी प्रेरणा आपल्याला हुडकून काढणे अगत्याचे आहे. गेल्या एप्रिल महिन्यात फ़ोर्ड वा तत्सम परदेशी संस्थांकडून इथल्या अशा देशसेवी समाजसेवींना मिळणार्‍या बेहिशोबी पैशाला मोदी सरकारने चाप लावला आणि अकस्मात देशात असंहिष्णूता घोंगावू लागल्याचा साक्षात्कार मोठमोठ्या जाणत्यांना झाला. एप्रिलमध्ये फ़ोर्ड फ़ौडेशनचे नाक मोदी सरकारने दाबले आणि जुलै ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडून येणारा पैसा बंद केला. पैशाची चणचण या तमाम लोकांना ऑगस्टअखेर जाणवू लागली आणि बघता बघता देश असंहिष्णूतेच्या गर्तेत लोटला गेला. पुरस्कार वापसीतले बहुतांश महनीय लोक फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या निधीचे लाभार्थी असावेत, याला योगायोग म्हणता येत नाही. तिथे अय्यर जसे पाकिस्तानी संस्थेचे लाभार्थी, तसे इथे पुरस्कार वापसीचे म्होरके फ़ोर्डच्या परदेशी निधीचे लाभार्थी असावेत, यातले धागेदोरे समजून घेणे व सामान्य जनतेपुढे उलगडणे अगत्याचे आहे. त्यातला बोचणारा काटा म्हणूनच मोदी आहे. कारण त्यांच्याच सरकारने अशा पैशाला चाप लावून यांच्या ऐषारामाला वेसण घातली आहे. मग पाकप्रेमी अय्यर हुतात्मे वा फ़ोर्डप्रेमी महात्मे चवताळून शिव्याशाप देवू लागले, तर नवल कुठले?