१० ऑगस्ट रोजी माझ्या ‘जागता पहारा’ ब्लॉगने दहा लाखाचा पल्ला ओलांडला होता. त्याला आता तीन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. नेमके सांगायचे तर १०३ दिवस! या अवधीत ‘जागता पहारा’ आणखी पाच लाखाचा पल्ला आज ओलांडून पंधरा लाखाच्या पुढे गेला आहे. साधारणपणे मी ब्लॉगर आहे आणि क्वचित काही तातडीच्या विषयावर टिप्पणी करण्यासाठी फ़ेसबुकचा वापर करीत होतो. अन्यथा ब्लॉगच्या नव्या लेखाचा सारांश व लिन्क देण्यासाठीच फ़ेसबुकचा वापर केला. काही प्रसंगी मला आवडलेले इतरांचे लेख वा अन्य मजकुर व्हीडीओ शेअर करण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्यासाठी तीन फ़ेसबुक खाती मी एकाच नावाचे वापरत होतो. त्यापैकी दोन खाती मागल्या महिन्याभरात बंद झाली आहेत. कुणाच्या तक्रारीमुळे की अन्य कुठल्या कारणाने, ते मला समजू शकलेले नाही. पण एका खात्याच्या बळावर ‘भाऊमत’ हे पेजही चालविले होते, जेणेकरून अधिक मित्रांपर्यंत पोहोचता यावे. तेही यामुळे बंद झाले. त्याचा ब्लॉगच्या वाचक संख्येवर फ़ारसा परिणाम झालेला दिसला नाही. जवळपास तितक्याच प्रमाणात ब्लॉगचा वाचक वाढतो आहे. खेरीज ‘व्हाटस अप’ ग्रुपवर मोठ्या प्रमाणात ब्लॉगवरील लेख शेअर केले जात असल्याचे मी ऐकतो. मी स्वत: ‘व्हाटस अप’ या भानगडीत नाही. त्यामुळे तिथे काय चालते त्याचा अंदाज नाही. ऐकिव माहितीनुसार शेकडो ग्रुपवर माझे ब्लॉग शेअर होतात. त्याचा आनंदच आहे. मात्र हाती उरलेले एक खाते आणि एका नव्या खात्याचे मदतीने ‘भाऊ तोरसेकर’ हे पेज सुरू केले आहे. त्याचेही सदस्य दोन हजाराच्या जवळ अवघ्या पाच दिवसात पोहोचले. मी मुळचा ब्लॉगर वा पत्रकार असल्याने लेखनात जास्त रस आहे. त्याच निमीत्ताने सोशल माध्यमात आलो. तेव्हा इथे माझ्या लेखनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज खुप आनंद वाटतो.
मला हे तंत्र ठाऊक नव्हते आणि म्हणूनच ऑगस्ट २०१० मध्ये ब्लॉग नोंदला, तरी फ़ारसे काही लिहू शकलो नव्हतो. २०१२ च्या आरंभी दोघा तरूण मित्रांच्या आग्रहाने व प्रयत्नाने मी टायपिंग शिकलो आणि थोडे लिखाण सोशल माध्यमात करू लागलो. प्रत्यक्षात दैनिक ‘पुण्यनगरी’मध्ये जे दैनंदिन ‘उलटतपासणी’ सदर लिहीत होतो, तेच टाईप करू लागल्याने त्याच नावाचा दुसरा ब्लॉग फ़ेबुवारी २०१२ मध्ये सुरू केला. पण मे २०१३ मध्ये ते सदर बंद झाले आणि सोशल मीडियातली ‘उलटतपासणी’ही थांबली. ब्लॉगकडे वाचक आणावा म्हणून त्याच दोघा तरूण मित्रांनी फ़ेसबुक खाते काढून दिले आणि त्यात मित्रांना आमंत्रित करून ‘उलटतपासणी’चा सारांश व लिन्क टाकण्याला सुरूवात झाली होती. दिवसेदिवस मित्रांची संख्या फ़ुगत गेली आणि मित्रयादीची मर्यादा संपली म्हणून दुसरे खाते उघडले. काही मित्रांच्या आग्रहामुळे ‘भाऊमत’ हे पेजही सुरू केले. ज्यांना मित्रयादीत सामावणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी पेजवर सोय होऊ शकली. तरी अनेकजण नव्या खात्यातून मित्रयादीत आले. बघता बघता दोन खाती भरून गेली आणि घरगुती मित्र व परिवारातील लोकांसाठीचेही तिसरे खाते मित्रयादीने फ़ुगत गेले. वादविवादही वाढले होते. अनेक पुरोगामी मित्र वा आपल्या ठराविक राजकीय भूमिकेविषयी आग्रही असलेल्यांशी खटके उडू लागले. काहींना नावडते वाचायचे नसेल तर दुर्लक्ष करण्याचाही संयम त्यांच्यापाशी नसल्याने ब्लॉक करावे लागले. अशाच गडबडीत जुलै २०१३ पासून ‘जागता पहारा’ हा ब्लॉग खर्या अर्थाने सुरू झाला. म्हणजे नियमित लिहीणे सुरू केले. लोकसभा निवडणूक ऐन रंगात येत चालली होती आणि त्याचे निकाल लागत नाहीत, तोवर विधानसभेचे वेध लागले आणि ‘जागता पहारा’ वाचकाला अधिकाधिक आकर्षित करू लागला. फ़ेसबुकमुळेच हे शक्य झाले याबदल शंकेला जागा नाही. एखाद्या दैनिकाप्रमाणे ब्लॉगचा नियमित वाचक तयार झाला.
दहा दिवसांपुर्वीच दुसरे खातेही फ़ेसबुकने डिसेबल केल्याने अस्वस्थ झालो. त्यातून मग पर्यायाचा विचार सुरू केला. बंद झालेल्या खात्यावरील मित्रांनाही माझे त्यांच्या यादीतून बेपत्ता होणे गोंधळात पाडून गेले होते. म्हणून मधला मार्ग शोधला. आपण फ़ेसबुकवर केवळ लेखाची लिन्क टाकण्यासाठी असतो वा एखादी किरकोळ राजकीय सामाजिक कॉमेन्टच करतो. तेच काम मित्रांवर सोपवले तर फ़ेसबुकशी विवाद व्हायचे कारण शिल्लक उरणार नाही. ज्यांना भाऊचे लिखाण आणखी कोणी वाचावे किंवा अधिक लोकांपर्यंत जावे असे आग्रहाने वाटते, त्यांची मदत घ्यावी असा पर्याय सुचला. म्हणून तसे आवाहन फ़ेसबुकवरल्या उरलेल्या खात्यामार्फ़त केले आणि थक्क व्हायची पाळी आली. कारण सातशेहून अधिक मित्रमैत्रिणींनी पोस्टवर किंवा मेसेज बॉक्समधून आपापले ईमेल अड्रेस पाठवले. अर्थात उत्साह ठिक असतो. परंतु प्रत्येकानेच माझ्या ब्लॉगवरील लेखाची लिन्क त्यांच्या भिंतीवर टाकलीच पाहिजे, असा माझा अजिबात आग्रह नाही. त्यांना मनापासून तसे वाटत असेल आणि अधिक मित्रांपर्यंत ‘जागता पहारा’ न्यायचा असेल, तरच त्यांनी तो पर्याय स्विकारावा, असेच आजही माझे मत आहे. म्हणूनच मी जरी लिन्क व लेखाचा सारंश पाठवला, तरी मित्रांनी आपला विवेक व संयम राखूनच आपापल्या भिंतीवर ते शेअर करावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. अधिक लोकांपर्यंत जावे किंवा अधिकाधिक लाईक शेअर होण्यापेक्षा लेखातले विषय, मुद्दे व उपयुक्तता अधिक मोलाची मानावी. म्हणूनच नुसती कर्तव्य भावना म्हणून मार्केटिंग केल्यासारखी लिन्क भिंतीवर टाकण्याची गरज वा सक्ती नाही. पुन्हा विचार करूनच योग्य तो मित्रांनी निर्णय घ्यावा. आपले अन्य कोणाला पटले पाहिजे असा आग्रह नाही. पण भिन्न विचार समजून घेणे आवश्यक असते. तरच लोकशाही सम्रृद्ध होते, हे विसरता कामा नये.
कोणी यानंतर विचार बदलला तरी माझा राग नाही. पहिल्या फ़टक्यात ज्यांनी आपले ईमेल अड्रेस पाठवले, त्यांचे अभिनंदन! आभार मानणे मला आवश्यक वाटले. आज ‘जागता पहारा’ पंधरा लाखाचा टप्पा ओलांडत असल्याचा मुहूर्त साधून त्या सर्वांचे आभार! इतक्या चोखंदळ व चिकाटीच्या वाचकाशिवाय एक ब्लॉग एवढा दूरचा पल्ला इतक्या अल्पावधीत ओलांडू शकणार नव्हता मित्रांनो! जुलै २०१३ पासून २८ महिन्यांच्या कालावधीत १५ लाख ही छोटी गोष्ट नाही. किंबहूना वाचक मित्रांच्या या चिकाटीमुळेच लिहीण्यात सातत्य राखता आले. अन्यथा ब्लॉगर हा हौशी प्रकार असतो आणि रोजच्या रोज कोणी लिहायचा त्रास घेणार नाही. त्यासाठी मला नित्यनेमाने वेळ काढायला तुम्हा मित्रांनी सक्तीच केली. त्याचे हे फ़ळ आहे. म्हणूनच श्रेय जितके माझे आहे, तितकेच लेखनाविषयी आस्था व आपुलकी दाखवणार्या वाचक मित्रांचे सुद्धा! ब्लॉगला तुम्हा सर्वांचे योगदान लाभले आहे. आता फ़ेसबुकने खाते बंद केले तरी मला पर्वा नाही. कारण शेकडो मित्रांचे मेल अड्रेस माझ्याकडे आहेत आणि शेकड्यांनी मित्र लिन्क व सारांश आपापल्या भिंतीवर टाकणार असतील, तर मला फ़ेसबुकवर लुडबुडण्याची गरजही नाही. शक्य तितक्या लौकर ब्लॉगच्याही जाचातून सुटून आपली स्वतंत्र वेबसाईट बनवायचा विचार चालू आहे. तेही इथल्याच दोघा मित्रांच्या आग्रहातून व सहाय्यातून! जेव्हा वेबसाईट तयार होईल तेव्हा त्यांचे चेहरेही समोर येतीलच. पण खर्या आयुष्यात जितके जीवाभावाचे मित्र भेटले, तितकेच इथे आस्थावाईक दोस्त जमा झाले. या वयातही लिहायची उमेद निर्माण करणार्या वा त्याचा थकवा येऊ न देणार्या अशा मित्रांचे आभार तरी कसे मानू? त्यांच्याच जागवणार्या पहार्याने इतके लिहीणे शक्य झाले आहे आणि लिहीत रहावेच लागणार आहे. पंधरा लाखाचा आकडा इतका छोटा कधी वाटला नव्हता. अभिनंदन मित्रांनो!



