Wednesday, December 25, 2013

आता प्रसिद्धी का नको?

 
   आम आदमी पक्षाचे बुद्धीमान नेते योगेंद्र यादव यांनी दोन दिवसांपुर्वी एक धक्कदायक विधान पत्रकारांसमोर केले. आम्ही राजकारणात नवे आहोत तेव्हा आमच्याकडे जरा कमी लक्ष द्या, असे आवाहनच त्यांनी पत्रकारांना केले. ज्यांचे आजवरचे राजकारणच मुळात पत्रकारांसमोर होत आले आणि प्रसिद्धी मिळेल असेच कार्यक्रम ज्यांनी सातत्याने योजलेले आहेत; त्यांनी असे का म्हणावे? गेल्या दोन वर्षातली केजरीवाल यांची वाटचाल बघितली, तर माध्यमांत त्यांचे अधिक कार्यकर्ते आहेत, की काय असे म्हणायची पाळी येते. कारण केजरीवाल वा त्यांच्या सहकार्‍यांना माध्यमांनी बारीकसारीक गोष्टीसाठी जितकी प्रसिद्धी दिली, तितकी क्वचितच अन्य कुठल्या संघटनेला मिळू शकली असेल. त्याच बळावर त्यांचा पक्ष व संघटना उभी राहिली आहे. असे असताना आम्ही नवखे आहोत, तेव्हा आमच्याकडे कमी लक्ष द्या किंवा आम्हाला कमी प्रसिद्धी द्या; असे यादव कशाला म्हणत असावेत? त्याचे सोपे कारण आहे; ते विपरित प्रसिद्धीचे किंवा सवाल करणार्‍या प्रसिद्धीचे. निवडणूका लढवताना किंवा निकाल लागल्यापासून सतत आम आदमी पक्षाचे किरकोळ नेतेही प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहेत. आता दिल्लीच्या यशानंतर हा पक्ष व त्याचे नेते अटकेपार झेंडाच जाऊन रोवणार आहेत, अशा थाटात त्याच्या यशाचे वर्णन चालले होते, तेव्हा यादव किंवा अन्य कुणा पक्षनेत्याने प्रसिद्धी नको असे म्हटलेले नव्हते. मग आताच प्रसिद्धीचा कंटाळा कशाला आला आहे? तर आता बोचरे सवाल विचारले जाऊ लागले आहेत. जी आश्वासने देऊन दिल्लीकरांची मते मिळवली आहेत, ती पुर्ण करण्याची जबाबदारी डोक्यावर येऊन पडली असून ती कशी साकारणार, असे प्रश्न सतत विचारले गेल्याने यादव विचलित झालेले असावेत.

   निवडणूकांचे निकाल लागल्यापासून केजरीवाल वा ‘आप’पेक्षा अनेकपटीने मोठे यश मिळवणार्‍या शिवराजसिंग चौहान, वसुंधराराजे शिंदे किंवा डॉ. रमण सिंग यांच्याकडे माध्यमांनी साफ़ काणाडोळा केलेला होता. त्या तिघांनी जणू कुठल्या क्षुल्लक महापालिका किंवा तालुका पंचायती जिंकल्या असाव्यात आणि केजरीवाल यांनी देशाच्या लोकसभेतच सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली असावी; अशी प्रसिद्धी त्यांना गेले दोन आठवडे मिळत राहिली आहे. अन्य तीन नेत्यांना निकालाच्या दुसर्‍या दिवसापासून प्रसिद्धीतून वगळण्यात आले. त्यांनी शपथा घेऊन मंत्रीमंडळही बनवले, त्याचा कुठे गाजावाजा नाही. परंतु केजरीवाल यांच्या सरकारचा कुठे थांगपत्ता नसताना, त्यांना आगामी लोकसभा निवडणूकीतलाही हिरो बनवण्यापर्यंत माध्यमांनी मजल मारली, तेव्हा यादवांनी कुठे तक्रार केली नव्हती. अजून आमचे दिल्लीतही बस्तान बसलेले नाही; तर आम्हाला देशव्यापी पक्ष कशाला बनवता; असे यादव बोलल्याचे कोणी ऐकले आहे काय? उलट तसे सुचित केल्यावरही पत्रकार परिषदेत त्यांचा चेहरा उत्साहित होतानाच आपण पाहिले आहे. मग अशा संयमी नेत्याला प्रसिद्धीचा इतका कंटाळा कशाला यावा? त्यांची तक्रार प्रसिद्धीबद्दल नसून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांबद्दल आहे. आजवर अन्य पक्षांना त्यांनी प्रश्न विचारले, सवाल केले, तेव्हा त्यासाठी मिळणारी प्रसिद्धी त्यांना सुखावह वाटत होती. पण आपल्यावरच ती पाळी आल्यावर त्यांचा संयम सुटू लागला आहे. कारण सरळ आहे, यादवच नव्हेतर प्रत्येक ‘आप’नेत्याला आपल्या समोरचे आव्हान जाणवले आहे. मागण्याचीच सवय जडलेल्यांना देण्याची वेळ आल्यावर घाम फ़ुटला आहे. दुसर्‍यांना दिलेले सल्ले स्वत:च पाळायची वेळ आल्यावर जीव रडकुंडीला आलेला आहे.

   पत्रकारांनी असे कुठले प्रश्न विचारले, की यादव व अन्य ‘आप’नेते अस्वस्थ व्हावेत? निवडणूकीत जी आश्वासने दिलीत व ज्यामुळे इतके मोठे यश त्यांच्या पदरात पडलेले आहे, ती आश्वासने पुर्ण करणे अशक्य कोटीतले आहे. ती आश्वासने कशी पुर्ण करणार व त्याचे मार्ग कोणते; असे सवाल पुढे येत आहेत. त्याची समाधानकारक उत्तरे ‘आप’ नेत्यांकडे नाहीत हेच त्या अस्वस्थतेचे खरे कारण आहे. वीजेचे दर तीन महिन्यात निम्मे करणे किंवा कुटुंबाला प्रत्येकी सातशे लिटर प्रतिदिन पाणी पुरवण्याच्या गोष्टी कागदावर दिसतात, तितक्या सोप्या नाहीत. अशा कसोटीच्या गोष्टीवर मार्ग काढताना कायदे व नियमांच्या जंगलातून वाट काढावी लागत असते. त्यातला भष्टाचार हाच एकमेव अडथळा नसतो. नियम व कायद्याच्या अडचणींमुळेच भ्रष्टाचाराला वाव मिळतो. ते कायदे व नियम झटपट जादूची कांडी फ़िरवून बदलता येत नाहीत. म्हणूनच अशा जीवनावश्यक गरजा झटपट निकालात काढता येत नसतात. नियमात व प्रक्रियेत सुलभता आणून सेवा सुधारता येतात. त्यातून भ्रष्टाचाराला आळा घालता येतो. भ्रष्टाचार थांबला म्हणून प्रश्न सुटत नाहीत. तर भ्रष्टाचाराला मुभा देणार्‍या प्रक्रियांवर मात करावी लागत असते. त्यातून मुळची प्रक्रिया सुटसुटीत होते व परिणामी भ्रष्टाचारालाही आळा घातला जातो. तीच प्रशासकीय यंत्रणा व त्याच नियम कायद्यातून ‘आप’ कशी वाट काढणार असे सवाल म्हणूनच विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे देण्यापेक्षा आमची पाठ सोडा, म्हणणे म्हणजे शुद्ध पळवाट आहे. यादव यांच्या उत्तरातली अस्वस्थता त्यांचाही निरूपाय झाल्याची साक्ष आहे. म्हणूनच केजरीवाल भ्रष्टाचार्‍यांना पकडून शिक्षा देण्याची भाषा करतात, पण भ्रष्टाचाराला वाव देणार्‍या प्रक्रिया व नियमांवर मात करण्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत.

1 comment:

  1. Atyant samarpak mudde. Dukh hech ki Jayaptakash Narayan, Anna Hajare,Ramdeo Baba pramanech ha hi manushya kewal lokanna nirashaach denar ani lokancha badala waracha vishwas udawnar ! Durdaiwa khare te ahe...

    ReplyDelete