Monday, December 30, 2013

‘आप’ला ‘नव’वर्षाच्या शुभेच्छा

  तीन आठवड्यापुर्वी चार विधानसभांच्या निवडणूकीचे निकाल लागले आणि एकदम ‘आप’ नावाचे चक्रीवादळ देशभरच्या राजकारणात घोंगावू लागले आहे. दिल्लीत दोन वर्षे सतत विविध आंदोलनात आघाडीवर असलेल्या अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी राजकीय पक्ष स्थापन करून जे अपुर्व यश संपादन केले. त्यामुळे अनेक निराशाग्रस्त लोक नव्याने उत्साहीत झाले आणि त्यांनीच हे चक्रीवादळ जन्माला घातले आहे. त्या वादळाचा झंजावात इतका जबरदस्त आहे, की त्यामध्ये भाजपाने अन्य तीन राज्यात संपादन केलेले अभूतपुर्व यशही झाकोळले गेले आहे. ज्या भाजपाला राजस्थानात त्यांचे दांडगे अनुभवी नेते भैरोसिंह शेखावत नेतृत्व करत असतानाही साधे बहूमत कधी संपादन करता आलेले नव्हते; त्यापेक्षाही अफ़ाट बहुमत वसुंधराराजे शिंदे यांनी मिळवून दिले आहे. मध्यप्रदेशात उमा भारती यांनी दिग्विजय सिंग यांच्या नाकर्तेपणाचा लाभ उठवीत दहा वर्षापुर्वी यश मिळवले; तितके शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मुख्यमंत्री पदावर असूनही मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्याच्या सहानुभूतीवर स्वार झालेल्या कॉग्रेसला डॉ. रमणसिंग यांनी जमीनदोस्त केले. इतक्या अपुर्व यशालाही झाकोळून टाकणारी त्सुनामी ‘आप’च्या यशाने आणली. त्यामागे माध्यमांची अगतिकता लपून रहात नाही. मोदींचे यश वा लोकप्रियता झाकण्याचा तो केविलवाणा प्रयास आहे. पण त्याची झिंग ‘आप’च्या नेत्यांनाही इतकी चढली आहे, की जितके यश पदरी पडले त्याचे नेमके मूल्यमापन करण्याचीही शुद्ध त्या पक्षाच्या अननुभवी नेत्यांना उरलेली नाही. त्यातूनच मग कुणालाही आव्हान देण्यापर्यंत त्यांनी मजल मारणे स्वाभाविकच म्हणायला हवे. इतिहासाला पारखे असणारे इतिहासजमा होतात असे इतिहासच सांगतो.

   ‘आप’चे एक कविनेते कुमार विश्वास यांना विजयी सभेत त्यांचेच सहकारी मनिष शिसोदियांनी अमेठीत जाऊन राहुलना आव्हान देण्याचे आवाहन केले. या कविच्या डोक्यात इतकी हवा गेली, की त्यांनी तिथेच येऊन मोदींनीही निवडणूक लढवावी, असे प्रतिआव्हान देण्यापर्यंत मजल मारलेली आहे. त्याखेरीज अनेक ‘आप’ नेते व कार्यकर्ते मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आव्हान देण्याची भाषा सरसकट बोलू लागले आहेत. त्यामुळे अशा आव्हानाचा थोडा जुना इतिहास आठवून बघायला हरकत नसावी. ‘आप’चे एक नेते सुप्रिम कोर्टाचे नेते प्रशांत भूषण यांचे वडीलही ख्यातनाम वकील आहेत आणि त्यांनीही अशाच एका आव्हानवीर नेत्याचा खटला लढवून देशात इतिहास घडवला आहे. १९७१च्या निवडणूकीत रायबरेली मतदारसंघात पंतप्रधान इंदिराजींना समाजवादी नेते राजनारायण यांनी आव्हान दिले होते आणि पुढे इंदिराजींनी निवडणूक जिंकल्यावर त्यांनी गैरप्रकार केल्याचा खटला भरलेला होता. त्यांचे वकील म्हणून प्रशांतचे पिताजी शांतीभूषण यांनी काम केले होते. तो खटला त्यांनी जिंकला आणि इंदिराजींची निवड अलाहाबाद हायकोर्टाने रद्दबातल केली होती. त्यावर पांघरूण घालताना इंदिराजींनी देशावर आणिबाणी लादली, घटनादुरुस्त्या केल्या. पण पुढल्या सार्वत्रिक निवडणूकीत इंदिराजी त्याच जागेवर राजनारायण यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. मात्र तेव्हाचा विजय पचवता न आलेल्या जनता पक्षाने राजकीय अस्थिरता निर्माण केल्याने मध्यावधी निवडणूका झाल्या. तेव्हा तीन वर्षांनी त्याच रायबरेली मतदारसंघात राजनारायण प्रचंड मताधिक्याने पराभूत झाले होते. यशाचे अपचन होऊन जेव्हा बरळणे सुरू होते तेव्हा खांद्यावर घेऊन नाचणारा मतदार कसा जमीनीवर आपटतो, त्याचा तो ऐतिहासिक दाखला आहे.

   असो, त्याहीपेक्षा आव्हानात्मक राजकीय मनोरंजन नेहरूंना दिल्या गेलेल्या आव्हानाबद्दल सांगता येईल. महाराष्ट्रातच कडवे सावरकरवादी ल. ग. थत्ते नावाचे गृहस्थ होते. हिंदू भित्रे असल्याचा राग असल्याने त्यांनी शिखधर्मात प्रवेश करून कर्तारसिंग असे नाव घारण केले होते. त्यांच्या आठवणी काढल्यास १९६०-७०च्या कालखंडातील पत्रकारांना हसू फ़ुटलयशिवाय रहाणार नाही. कारण हे कर्तारसिंग नेहमी थेट नेहरूंना निवडणूकीत आव्हान द्यायचे. पण नेहरूंना त्यांचे नावतरी माहित होते किंवा नाही, देवजाणे. इथे महाराष्ट्रात मात्र त्यामुळे कर्तारसिंग थत्ते बातम्यातून झळकायचे. आपण नेहरूंना कसे आव्हान दिले त्याच्या गप्पा कर्तारसिंगांशी मारताना मोठी मजा यायची. सध्या ‘आप’कवी कुमार विश्वास यांची भाषा ऐकल्यावर त्यांचे स्मरण झाल्याखेरीज रहात नाही. दिल्लीत केजरीवाल यांचे यश हे शीला दिक्षित यांच्याविषयीच्या कमाल तिरस्काराचा परिणाम आहे. १९७७ साली राजनारायण यांचा रायबरेलीत झालेला विजय इंदिराविरोधी संतप्त लाटेचा परिणाम होता. तो भर ओसरला तिथेच राजनारायण संपले होते. दिल्लीतले ‘आप’ वा केजरीवालांचे यश त्यांच्या पक्षाचे असण्यापेक्षा कॉग्रेसच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे. त्याला आपले यश वा लोकप्रियता समजून आव्हानाची झिंग चढलेल्यांचा कर्तारसिंग थत्ते व्हायला वेळ लागणार नाही. खरे तर ‘आप’च्या यशाची नशा त्या पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांपेक्षा मोदीविरोधकांनाच अधिक चढली आहे. त्यामुळेच त्यांना देशभरातच ‘आप’च्या परिवर्तनाची लाट आल्याचे भासू लागले असून त्यांनी त्याचेच चक्रीवादळ निर्माण केले आहे. या मोदी विरोधकांनी उभ्या केलेल्या या झंजावातात भरकटू लागलेल्या ‘आप’च्या नेत्यांना म्हणूनच ‘नव’वर्षाच्या शुभेच्छा देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment