Monday, December 2, 2013

वाढलेल्या मतांचे रहस्य

   चार राज्यातील मतदान पार पडले असून केवळ दिल्ली विधानसभेचे मतदान व्हायचे बाकी आहे. येत्या बुधवारी दिल्लीतले मतदान संपले, मग आगामी लोकसभेपुर्वीचा शेवटचा जनमत कौल आपल्यासमोर येणार आहे. अर्थात त्याहीपुर्वी अनेकांनी आपापल्या यशाचे दावे केले आहेत. आता मतचाचण्या करता येतात आणि त्यापैकी अनेक चाचण्यांनी यशस्वी अंदाज यापुर्वी केलेले असल्याने त्याचाही उपयोग विविध राजकीय पक्ष आपल्या रणनितीमध्ये करू लागले आहेत. त्यांचाही वापर जनमत घडवायला किंवा बनवायला होऊ लागला आहे. म्हणूनच अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनातून पुढे आलेला केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही चाचणीचे हत्यार वापरतो आहे. अजून मतदान व्हायचे बाकी असताना, त्या पक्षाने आपल्याला दिल्ली विधानसभेत बहूमत मिळणार असल्याचे आकडेवारी देऊन दावे केलेले आहेत. तीन दशकांपुर्वी तेलगू देसम पक्षाने पहिल्या फ़टक्यात बहूमत मिळवण्याचा विक्रम केला, तो अबाधित आहे. त्याखेरीज कुठला पक्ष आजवर प्रथमच निवडणुकीत उतरून बहूमताची मजल मारू शकलेला नाही. त्याचेही कारण त्या पक्षाचा नेता रामाराव तेलगू चित्रसृष्टीतला सर्वधिक लोकप्रिय अभिनेता होता. केजरीवाल यांची तशी ख्याती नाही. पण लोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी आपली प्रतिमा उजळ करून घेतली हे कोणी नाकारू शकत नाही. मात्र अशा प्रतिमेचे मतांमध्ये रुपांतर होते, असे आजवर तरी दिसलेले नाही. त्यामुळेच त्यांचा दावा किंवा चाचणीचे निष्कर्ष थेट निकाल लागतील; तेव्हाच सिद्ध होऊ शकतील. मात्र एकूण मतदारांचा उत्साह बघता त्यातून एक संदेश दिला जातो आहे, तो भाजपासह कुठल्या पक्ष वा नेत्यांना उमगला आहे काय, ते रहस्यच आहे.

   छत्तीसगड राज्यातून दोन आठवड्यापुर्वी सुरू झालेली ही निवडणूक प्रक्रिया दिल्लीत पुर्ण होईल. पण चार राज्यातला मतदारांचा प्रतिसाद धक्कादायक आहे. आजवर या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत कधीही सत्तर टक्क्याहून अधिक मतदान झालेले नाही. म्हणूनच राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगडमधले मतदान विक्रमी मानले जात आहे. त्यातला विक्रम बाजूला ठेवा. इतक्या उत्साहाने मतदार कशाला बाहेर पडला आहे, या प्रश्नाचे उत्तर राजकारणी व पत्रकार अभ्यासकांनी शोधायला हवे आहे. सहसा लोक मतदानाबद्दल उदासिन असतात किंवा आळस करतात. म्हणूनच आणिबाणी वा इंदिराजींची हत्या ही पार्श्वभूमी वगळता कधीच विक्रमी मतदान झालेले नव्हते. यावेळी असे काय घडले आहे, की मतदार इतक्या उत्साहाने बाहेर पडून विक्रमी मतदान करतो आहे? जेव्हा मतदार इतक्या उत्साहाने घराबाहेर पडतो, तेव्हा तो चमत्कार घडवतो, उलथापालथ घडवतो, असा राजकीय इतिहास आहे. सर्वसाधारणपणे आपल्या देशामध्ये साठ टक्के मतदानाचा इतिहास आहे. त्यापेक्षा एकदम दहा पंधरा टक्के जास्त मतदान होते, याचा अर्थ उत्तेजित होऊन वा प्रक्षुब्ध होऊन मतदार बाहेर पडलेला आहे. मग आजच्या त्याच्या उत्साहाचे वा प्रक्षोभाचे कुठले कारण आहे? काहीतरी असल्याशिवाय मतदार असा बाहेर आलेला नाही. त्याखेरीज त्याने विक्रमी मतदान केलेले नाही. आणि म्हणूनच हे विक्रमी मतदान राजकीय भाकिते, अंदाज व मतचाचण्यांना धक्का देणारे असणार यात शंका नाही. याचे एक कारण म्हणजे मतचाचण्या जुन्या सर्वाधिक मताच्या टक्केवारीवर आधारीत असतात आणि त्याचे निकष वाढलेल्या टक्केवारीला लागू होत नाहीत. ह्या पुढल्या आठ, दहा, बारा टक्के मतांना लाट म्हणतात.

   चारही राज्यात पाऊणशे टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे आणि दिल्लीतही त्यापेक्षा थोडे जास्तच मतदान होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच हा पुढला उत्साहाने बाहेर पडलेला मतदार पारंपारिक राजकारणाला धक्का देणारा असणार आहे. त्याची दोन कारणे आजतरी दिसतात. एक म्हणजे प्रचलीत युपीए सरकारच्या नाकर्तेपणाने माजलेले अराजक, ज्याच्या विरोधात निषेध व नाराजी व्यक्त करायला बाहेर पडणारा प्रक्षुब्ध मतदार. दुसरीकडे नरेंद्र मोदी हा भाजपाने समोर ठेवलेला आशावादी पंतप्रधान पदाचा उत्साही उमेदवार. गेल्या सहा महिन्यात मोदी यांनी निवडणूका असलेल्या राज्यातच नव्हेतर अन्य अनेक राज्यात भव्यदिव्य मेळावे घेऊन युपीए व कॉग्रेस सरकारसह त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तमाम सेक्युलर पक्षांवर कडव्या टिकेची जोड उठवली आहे. त्यांना जनमानसातून व सभेला लोटणार्‍या गर्दीकडून मिळणारा प्रतिसाद नजरेत भरणारा आहे. तोच उत्साह मतदानात परावर्तित झाला असेल काय? लोकपाल वा रामदेव यांच्या आंदोलनात कॉग्रेसने केलेली अरेरावी व सामुहिक बलात्कार प्रकरणी मनमोहन सरकारने दाखवलेली निष्क्रियता, यांच्या विरोधात तेव्हाही लोक रस्त्यावर उतरले होते. ज्यांना सामोरे जाण्य़ाचेही सौजन्य कॉग्रेसने दाखवलेले नव्हते. त्या रागाने भारावलेला मतदार मैदानात उतरलेला असू शकतो. आणि त्यातूनच मग आठ दहा टक्के मतदानाची टक्केवारी वाढत असते. अशी मते कॉग्रेस वा युपीएच्या मित्रपक्षांना मिळू शकत नाहीत. त्यांचा कल युपीए विरोधातलाच असू शकतो. म्हणूनच मग ती वाढलेली घाऊक मते लोकप्रिय नेता व त्याच्या पक्षाकडे वळत असतात. त्यांचे प्रतिबिंब मतचाचणीत पडत नसते. त्यामुळेच रविवारी लागणारे निकाल राजकीय नेत्यांनाच नव्हेतर अभ्यासक व चाचणीकर्त्यांनाही धक्का देणारे असतील.

1 comment:

  1. BHAU TUMHI HE BHAVISHYA SHASHTRA ANUBHAVATUN SHIKLAT MHANUNACH TE KHARE THARTE....... TUMCHYA LEKHANCHYA PRATIKSHET ASNARA...

    ReplyDelete