Thursday, April 21, 2016

माघारीतली रणनिती

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तमाम बिगर भाजपा पक्षांना व शक्तींना एकत्र येण्याचे अवाहन केलेले आहे. तसे आवाहन करण्यात गैर काहीच नाही. कारण खुद्द भाजपानेच तशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याला एकूण किती प्रतिसाद मिळेल, हा वेगळा विषय आहे. पण चार वर्षापुर्वी भाजपाच्या गोटात असलेले नितीश आज असे आवाहन कशाला करतात, हे मुळात भाजपाच्या लोकांनी समजून घ्यायला हवे आहे. नितीश भाजपाच्या आघाडीतून बाहेर पडले, ते आपला व्यक्तीगत अहंकार जपण्यासाठी हे मान्य! त्यात फ़सल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यातून हा माणूस काही शिकला आहे. २०१२ नंतर जसजसे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये येत गेले, तेव्हा त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली होती. त्यात नितीशही सहभागी होते. आधी भाजपा अंतर्गत मोदीविरोधी आघाडी स्वत: लालकृष्ण आडवाणी चालवित होते. पण त्यांच्याच पक्षातल्या निराश तरूण कार्यकर्त्यांनी मोदींची बाजू उचलून धरली आणि अडवाणी बाजुला फ़ेकले गेले. त्यानंतर नितीशनी राष्ट्रीय आघाडीत राहुन मोदीविरोधाची पताका खांद्यावर घेतली. त्याची किंमत लोकसभेत त्यांना मोजावी लागली. त्यांचा आपल्याच राज्यात सफ़ाया झाला आणि खुद्द त्यांचीच खुर्ची धोक्यात आली. अशावेळी आपल्या शत्रूंनाही शरण जाऊन सोबत घेण्यापर्यंतची माघार नितीशनी घेतली. त्यांनी लालू यादव यांच्याशी समझोता केला आणि त्याला मतदार प्रतिसाद देतो बघितल्यावर आणखी दोन पावले मागे जाऊन विधानसभेसाठी मोठी माघार घेतली. सव्वाशे आमदार असताना नितीशनी फ़क्त शंभर जागा पत्करून बदल्यात भाजपाला विधानसभेत पाणी पाजले. ही माघार विजयाचा मार्ग खुला करणारी होती. किंबहूना भाजपानेही ती वेळ त्याच्यावर आणली आणि आता तीच मोदी विरोधातील रणनिती बनु लागली आहे.
भाजपाने लोकसभा बहुमताने जिंकली आणि कॉग्रेससारखा पक्ष नामोहरम झाला, तरी संपला नव्हता. तसेच भाजपालाही देशव्यापी समर्थन मिळाले नव्हते. त्याचा अर्थ इतकाच, की भाजपाला अजून अनेक राज्यात आपला पाया घालायचा होता आणि अनेक राज्यात आपले बस्तान बसवायचे होते. ते करताना जिथे आपली शक्ती निर्विवाद नाही, तिथे मित्रांना जपून सोबत ठेवायला हवे होते. मजेची गोष्ट बघा. लोकसभेनंतर चार महिन्यात दिर्घकालीन शत्रूत्व विसरून लालू-नितीश एकत्र येण्याची प्रक्रीया सुरू झाली आणि त्याच दरम्यान भाजपाने आपल्या मित्रांना दुरावण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचे व्यापक परिणाम दिसायला वर्ष गेले. शत-प्रतिशत भाजपा किंवा पंचायत ते पार्लमेन्ट भाजपा, असल्या घोषणांनी भाजपाची घसरगुंडी सुरू झाली. कॉग्रेसचे संपुर्ण देशात असलेले वर्चस्व ज्या आडमुठेपणाने ढासळू लागले, त्याचीच कास भाजपाने लोकसभेतील यशानंतर धरली. लहानसहान पक्षांना विभागलेले ठेवून पन्नास वर्ष कॉग्रेसने आपली सत्ता अबाधित राखली होती. त्यावरचा उपाय म्हणून १९६० च्या दशकात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहियांनी आघाडीची नवी रणनिती आणली. तत्वज्ञान विचारसरणी बाजूला ठेवून कॉग्रेस विरोधात एकाला एकच उमेदवार देण्याच्या या रणनितीने, १९६७ सालात कॉग्रेसला पहिला दणका दिला होता. नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली आणि त्यानंतर क्रमाक्रमाने स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक अस्मितेचे राजकारण मूळ धरत गेले. लोकसभा जिंकली तरी भाजपाने कॉग्रेसचे ते स्थान मिळवलेले नाही. म्हणूनच ‘शत-प्रतिशत’ ही घोषणाच थेट आत्महत्येसाठी उचललेले पाऊल होते. त्यातून आपल्या विरोधकांना एकत्र येण्यास वा लोहिया नितीप्रमाणे मतविभागणी टाळण्यास प्रवृत्त करण्याची चुक भाजपाने केली. अमित शहा पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी आणलेली ही कालबाह्य रणनिती आत्मघातकी ठरली.
मोदीलाट ओसरण्यापर्यंत असल्या गमजा चालल्या. हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड अशा राज्यात थोडे यशही मिळाले. पण दिल्लीने जबरदस्त दणका दिला आणि अमित शहांची शत-प्रतिशत निती आत्मघात असल्याचा पहिला संकेत दिला होता. पण त्यातला धडा नाकारण्याने बिहारचा पराभव ओढवून आणला गेला. बिहारात यशस्वी ठरलेला प्रयोग राष्ट्रव्यापी पातळीवर यशस्वी होऊ शकणार नाही. कारण डझनभर मोठ्या व प्रादेशिक पक्षांची मोट बांधणे व त्या नेत्यांनी नितीशप्रमाणे आपले अहंकार गुंडाळून ठेवणे अशक्य आहे. किंबहूना पुढल्या लोकसभा निवडणूकीत मोदींना पराभूत करणेही अशक्य आहे. पण त्याचा अर्थ भाजपाला अजिंक्य आहे, असा होत नाही. आधीचे व उद्याचे यश मोदींचे आहे, ते भाजपाचे नाही. हे ओळखूनच नितीशनी संघमुक्त भारत किंवा बिगरभाजपा आघाडीची कल्पना मांडलेली आहे. ती मांडताना त्यांनी लोहियांच्या मूळ सिद्धांताची आठवण करून दिली आहे. त्या काळात माजोरी कॉग्रेसला धडा शिकवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज लोहियांनी मांडली होती. आजही भाजपाला रोखले नाही, तर एकेकाला गाठून भाजपा नामोहरम करून टाकील, अशी भिती नितीश घालत आहेत. त्याचा अर्थ असा, की आपापले अहंकार जपायचे असतील, तर मुळात आपले अस्तीत्व टिकवले पाहिजे आणि टिकून राहिलो, तरच अहंकार जपता येईल. भाजपाच्या आक्रमकतेसमोर आणि मोदींच्या लोकप्रियतेपुढे टिकून रहाणे, हा प्राथमिकतेचा विषय आहे. एकदा भाजपा हतबल झाला, मग आपण आपापसात पुन्हा उरावर बसायला मोकळे आहोत, असेच नितीश अप्रत्यक्षरित्या सांगत आहेत. तेच कॉग्रेसला लोहिया वा आघाडीच्या सिद्धांताने सांगितले होते. पण तेव्हा कॉग्रेसला मस्ती आलेली होती, ती अजून उतरलेली नाही. भाजपाला हल्लीच झिंग चढली आहे. त्यांना वा अमित शहांच्या भाजपाला नितीशचे म्हणणे कितपत उमजेल?
दोन वर्षात केंद्रातील सत्ता संपादन केल्यावर भाजपाने केरळ, बंगाल, आसाम अशा राज्यात कितपत संघटनात्मक काम उभे केले, त्याचे उत्तर पुढल्या महिन्यात विधानसभेच्या निकाल लागल्यावर कळेलच. पण आज ते महत्वाचे नाही. नितीश यांचे आवाहन समजून घेण्याची गरज आहे. ते आव्हान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाही. मोदी या एका व्यक्तीभोवती भाजपाला उभे रहायचे असेल तर त्याचीही कॉग्रेसच होऊन जाणार. आज जसे कॉग्रेसजन सोनिया नाहीतर राहुल, नसेल तर प्रियंका, म्हणत अगतिक होतात. पण पक्ष म्हणून त्यांना उभे रहाणे अशक्य झाले आहे. तसेच भाजपाचे होऊन जाईल. पुन्हा लोकसभा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी पुरेसे आहेत. पण त्यांचा चेहरा वा नाव वापरून राज्ये व महापालिका जिंकण्याचा मनसुबा कामाचा नाही. हेच नितीश सांगत आहेत. आपापल्या राज्यात व प्रदेशात भाजपाला उभे राहू देऊ नका. एकजुटीने भाजपाला नामशेष करू शकतो, हे त्यांचे आवाहन आहे. तसा विचार नितीश यांच्या डोक्यात येऊ शकला, किंवा त्याला प्रेरणा शत-प्रतिशत नामक मुर्खपणाने दिली. सर्व राज्यात भाजपाने पाय रोवून उभे राहू नये असे कोणी म्हणणार नाही. पण शत-प्रतिशत याचा अर्थ दुसरा पक्षच नको, ही अरेरावी झाली. त्यानेच अशा विचारांना प्रेरणा दिलेली आहे. जेव्हा इंदिराजींनी अशी भूमिका घेतली, त्यातूनच विविध राज्यात प्रदेशिक अस्मिता उदयास आल्या. प्रादेशिक नेते आपापले पक्ष घेऊन उभे राहिले आणि त्यातूनच कॉग्रेस खिळखिळी होत गेली. म्हणूनच नितीश यांचे आवाहन भाजपाने समजून घेतले पाहिजे. त्याची टवाळी करणे खुप सोपे आहे. पण नितीशनी लालूंशी तडजोड करण्यात लवचिकता दाखवून मिळवलेले यश भाजपाला दणका देऊन गेले ते विसरता कामा नये. खरेच तमाम बिगरभाजपा पक्षांनी एकत्र यायचा समजूतदारपणा दाखवला, तर मोदींनाही जिंकणे अवघड होऊन बसेल.

4 comments:

  1. bhau pan tyamule bihar che jungle raj suru zale parat 5/6 mothe eng marle gele na

    ReplyDelete
  2. भाऊ अत्यंत समर्पक लेख भाजप थिंक टँकने/टँकरने (शहा)आपल्या लेखाची पारायणे करणे आवश्यक आहे
    परंतु याचीच दुसरी बाजू पण समजुन गनिमी (संघ), धुत॔(शहा गडकरी ) व अग्रेसिव्ह (मोदी) रण निती वापरणे आवश्यक आहे. कारण लढाई केवळ स्थस्थानिक, राजस्शरीय देशस्थरीय नाही तर विदेशी व जास्त घातक व शक्तीला विदेशी व विकाऊ मिडीया शी आहे. व जास्तीत जास्त भारतीय जनतेचा सहभाग आवश्यक आहे.
    भाऊ अत्यंत म॔मभेदी लेख
    जेव्हा पासून लोकसभा निवडणुकीत मोदी नावाच्या तुफानाने मिडियाच्या मोदींना लोकसभे पय॔ंतं न पोहचण्या साठी च्या गेली 4-5 वष्रे पासुन चाललेल्या हरएक प्रयत्नाना सुरुंग लावला तेव्हा पासुन मिडियाने गनिमी काव्याचा वापर करण्याचा प्रयत्‍न केला आहे. ज्या संघ परिवाराचा या यशा मागे हात असल्याचा दावा केला जातो (अनेकांना वाटते व खुद्द संघ कार्यकर्त्यांना वाटते कि आपल्या मुळेच भाजपा/मोदींना यश मिळाले परंतु सामान्य माणसाला जरी संघाच्या सामाजिक कार्याची जाणीव आहे तरी हा गेली हजारो वर्षे यांच्याच/यांच्यातील पुरोहीती जे उपाहासी /बहिष्कृत करणारे / बळी ठरवणारे/अन्याय करणार्‍या (पुरोहीता कडे बघुन नव्हे (सहज वत॔मानपत्रांवर नजर टाकली तर राज्याच्या याच समाजाच्या मंत्र्याच्या जेवणावळी च्या बातम्या पसरवण्यात यशस्वी झाले आहेत ( व इतिहासाने ह्याच समाजाच्या अती पराक्रमी पिढ्या पाठोपाठ विलासी व भावकिने/सग्यासोयरयांच्या लुडबुडीने मरहाटी राज्य बुडवलेले पाहिले आहे) बहुजन समाजाने (ह्यात पुरोहीती समाजा व्यतिरिक्त इतर समाज येतो) मोदी यांच्या कणखर, विकासी, सोशल मिडियाचा प्रभावी वापर व अल्पसंख्यांक चे लंगुचालन न करणाऱ्या नेतृत्वा कडे बघुन प्रचंड बहुमताने निवडून दिले. व मिडियाने लोकसभा निवडणुकी न॔तर याच संघाच्या आदेशानुसार सध्याचे भाजप सरकार चालते अशी भावना जनमानसात रुजवली.

    त्याच बरोबर विधान सभा निवडणुकी पासुन मिडियाने एका बाजूने मोदींना परदेशी वारी पर्यटक म्हणून बदनाम करुन दुसर्‍या बाजूने समाजातील सर्वात शेवटच्या थरातील माणूसाला या सरकारने/ परदेशी फेर्‍यानी तुम्हाला काय दिले व संघ प्रमुखांच्या आरक्षण विषयक विधानाचे भांडवल करून, दादरि प्रसंग व त्यां वरील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेउन लोकसभेला भरभरून मतदान करणाऱ्या ह्याच बहुजन समाजाची मते फिरवण्यात मिडीया यशस्वी झाला. व काही राज्यांतील भाजपा च्या पराभवा मध्ये मोठे यश मिडिया ने मिळवले.
    त्यामुळे यापुढे भाजपला सर्व समावेशक व आपण अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे स्थानिक चेहरा देणे आवश्यक आहे.

    आपण गेली 60 वष्रे सत्ता उपभोगणारया पक्षा प्रमाणे थेट देश नेतृत्वा बरोबर संपर्क असणाऱ्या तालुका पातळीवरील कार्यकर्ते निर्माण केलेले दिसत नाहीत. य (कदाचित भ्रष्टाचार अरोपाला घाबरुन अंतर ठेवत असेल)
    तसेच आत्मकेंद्रीत, स्वार्थी व अजुनही सेलिब्रिटी सिनेकलाकाराना निवडून देणार्‍या साउथ इंडियन (आपला गैरसमज आहे की साउथ इंडियन हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांनी दशकानुदशके फिल्मी नेत्यांना निवडून दिले आहे व एकही वेळा या मद्रशानी राष्ट्रीय कैउला/लाटे प्रमाणे मतदान केले नाही ) साउथ इंडियन याना सुशिक्षित करुन राष्ट्रीय प्रवाहात सामील केले पाहिजे. व सक्षम परंतु राष्ट्रीय लोकभावनेत साथ देणारे साउथ मधे स्थानिक नेतृत्व तयार करणे आवश्यक आहे.

    अमुल शेटे पनवेल
    9769887707

    ReplyDelete
  3. भाऊ.. शतप्रतिशत याचा अर्थ दुसरा पक्षच नको असा विचार तुम्ही जेवढा करताय तेवढा भाजपा नेतृत्व पण करत नसेल..
    या देशात एकच सर्वमान्य विचार खूप कमी वेळा आणि कमी काळ वरचढ झालाय हे वास्तव भाजपा नेत्यांना नक्कीच माहिती असेल.. सध्या असलेल्या अनुकुलतेचा फायदा घेऊन पक्षाचा विस्तार करणे हे ध्येय ठेवणे चूक नाही..

    ReplyDelete
  4. शतप्रतिशत अपेक्षा बाळगणे चूक नाही.भ्रष्ट मित्रांना इशारा देणेही गैर नाही.ज्या उद्दिष्टासाठी सत्ता संपादन केली आहे,त्याच्या पूर्तीसाठी भाजप प्रयत्नशील असेल तर ते बरोबरच आहे.नितीश लालू ममता जयललिता पटनायक असे प्रांतिक शिलेदार( खरंतर संस्थानिक) एकत्र येतीलही,पण त्यांचे उद्दिष्ट भ्रष्टाचार हेच राहणार आहे.मोदींनी कुटुंबकबिला,नातीगोती, वैयक्तिक उत्कर्ष असे स्वार्थी हेतू कधीच बाळगले नाहीत हे देश जाणतो.त्यामुळे काजव्यांनी कितीही ** पेटवली तरी सूर्याची बरोबरी होणार नाही.मोदीराज मध्ये सुरू असलेला विकास जनता पाहते आहे.न‌ॅशनल हायवे,रेल्वे,संरक्षण सामग्री यात होणारा बदल सुखावह व आनंदित करणारा आहे.

    ReplyDelete