Showing posts with label पुरोगामी. Show all posts
Showing posts with label पुरोगामी. Show all posts

Saturday, October 17, 2015

मोदींचा जास्त भरवसा पुरोगाम्यांवर!



Insanity: doing the same thing over and over again and expecting different results.   -Albert Einstein

 साधारण तीन वर्षापुर्वीची गोष्ट असेल, गुजरात दंगलीचा उल्लेख करून नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या शर्यतीतून माघार घ्ययला लावण्याची जोरदार मोहिम पुरोगामी माध्यमे व विचारवंत जोशात राबवत होते. त्यातलाच एक पत्रकार व राजकीय नेता असलेला ‘नई दुनिया’ या उर्दू दैनिकाचा संपादक शाहीद सिद्दीकी मात्र बदलला होता. त्याने मोदींचे समर्थन कधीच केले नाही. पण खोट्या अपप्रचारातून मोदी कसे देशभर लोकप्रिय होत चाललेत त्याकडे आपल्या पुरोगामी सहकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा कसोशीचा प्रयत्न मात्र सुरू केला होता. पण आपल्या मुर्खपणावर अगाध श्रद्धा असलेल्यांकडून त्याचीही टिंगल सुरू झाली होती. आज तीन वर्षे उलटून मोदी पंतप्रधानपदावर चांगलेच स्थिरावले असतानाही, त्या मुर्खपणाचे परिणाम बघायचीही इच्छा अशा शहाण्यांना होत नाही, याचे म्हणूनच नवल वाटते. माझी कहाणी सुद्धा वेगळी नाही. तेव्हा म्हणजे भाजपाही मोदींना उमेदवारी द्यायला घाबरत होता, तेव्हा सिद्दीकीच्या शब्दांनी मला एक दिशा दिलेली होती. त्यावरून अभ्यास करताना मोदी कसे भाजपाला यश देवू शकतील, त्याचे विवेचन मी अनेक लेखातून व संदर्भासह करीत होतो. पण त्यातला पुरोगामी मुर्खपणा स्पष्ट शब्दात मांडत असल्याने मला मोदीभक्त ठरवण्यात पुरोगामी धन्यता मानली गेली. मात्र मी उपस्थित केलेले मुद्दे तपासून चुका सुधारण्याची इच्छा कुणाला झाली नाही. आजही त्यातले अनेकजण सोशल मीडियातील तेव्हाची त्यांचीच विधाने व मुर्खपणा तपासून बघू शकतील. त्याची जाहिरात करण्याची गरज नाही. पण चुका कुठे झाल्या आणि मोदींना त्याचा लाभ कसा मिळाला, त्याचे तरी आत्मपरिक्षण कराल की नाही? त्यातून आपल्या चुकांचे परिमार्जन शक्य नसले, तरी त्याच चुकांची पुनरावृत्ती तरी नक्कीच टाळता येईल ना? पण चुका नाकारून तेच करीत रहाणे, यालाच आता पुरोगामी आजारपणाचे स्वरूप आलेले आहे.

मोदींच्या यशाचे भाकित करणे सोडून द्या! त्यात खास असे काहीही नव्हते. कुठल्याही सामान्य पत्रकाराला निष्पक्षपाती राजकीय घडामोडी अभ्यासताना मोदींच्या यशाचे भाकित करता आले असते. त्यात माझे मोठेपण काडीमात्र नाही. पण त्याच निमीत्ताने पुरोगामी वा नेहरूवादी असलेल्यांना येऊ घातलेला धोका मी तेव्हाच समोर मांडला होता. निदान त्याचा तरी तेव्हा विचार व्हायला हरकत नव्हती. ‘आसाबियाचा आधुनिक अविष्कार’ या शिर्षकाचा एक लेख मी ‘पंचनामा’ या माझ्या ब्लॉगवर दोन वर्षापुर्वीच टाकला होता. त्यानंतर सात महिन्यांनी मोदी पंतप्रधान झाले. त्या लेखाचे महत्व मोदींच्या विजयाशी नव्हते. त्यांचा विजय पुरोगाम्यांनी खुप मेहनतीने पक्का केलेला होता. पण त्या मुर्खपणातून कुठला धोका नेहरूवादी पुरोगामीत्वावर येऊ घातला आहे, त्याचा इशाराही मी संगतवार दिलेला होता. राजकारणाची भावी दिशा निव्वळ देशातील सत्तापालटाची नाही, तर स्थित्यंतराची आहे, असे बहुधा मी वगळता अन्य कुठल्या विश्लेषकानेही मांडण्याचे तेव्हा धाडस केलेले नव्हते. कारण मुळात मोदी जिंकूच शकत नाहीत, याविषयीची कडवी अंधश्रद्धा! नेमके माझे शब्द काय होते? ‘सात आठ दशकातील सत्तेला नेहरू घराण्याचीच राजवट मानावे लागते. मोदी हा त्या अर्थाने आक्रमक वा बाहेरचा आहे आणि तो प्रस्थापित नेहरू राजवटीला आव्हान देण्यासाठी पुढे सरसावलेला आहे. जे काही स्वातंत्र्योत्तर काळात चालू आहे, ते तसेच पुढे चालवण्याची त्याची तयारी नाही आणि त्यात आमुलाग्र बदल करण्याचा मनसुबा घेऊनच ह्या लढवय्याने पाऊल उचलले आहे. मोडकळीस आलेली प्रस्थापित नेहरूवादी व्यवस्था व राजकीय सत्ता यांना परिघाबाहेरून धडका देणारे अनेक गट त्यामुळेच मोदी भोवती जमा होऊ लागले आहेत.’ थोडक्यात मोदी नुसती सत्ता हस्तगत करणार नाहीत, तर शतकभर चाललेली नेहरू व्यवस्था उध्वस्त करतील, हेच मी सुचवले होते.
 http://panchanaama.blogspot.in/2013/10/blog-post_5.html

इथल्या पुरोगाम्यांनी मला मोदीभक्त ठरवून हसण्यावारी नेल्याने माझे व्यक्तीगत कुठलेच नुकसान झाले नाही. पण आज दोन वर्षानंतर तेच लोक माझे भकित खरे ठरल्याने कसे सैरभैर झालेत, ते आपण साक्षात बघू शकतो. पण दुर्दैव असे आहे, की शहाण्याची व पुरोगाम्यांची अंधश्रद्धा कमालीची कडवी असते आणि ती त्यांच्यातच असलेल्या विवेकबुद्धीला कधीच शिरजोर होऊ देत नाही. म्हणूनच अनुभूती आली तरी समजुतीमध्ये रममाण होण्याखेरीज त्यांना पर्याय नसतो. थोडक्यात जुन्याच चुकांची पुनरावृत्ती करण्यापासून त्यांचीही सुटका नसते. जसा मागल्या दोन वर्षातील मोदी विरोध कालबाह्य म्हणून निकामी ठरला, तशीच त्यातली रणनितीही आता कालबाह्य होऊन गेलेली आहे. ज्याच्याशी लढायचे व ज्याला पराभूत करायचे आहे, त्याला अशा डावपेचांनी ओरखडाही उठत नाही, हे आजचे वास्तव आहे. म्हणून मग नवी रणनिती आखणे भाग आहे. किंवा जुन्यातल्या चुका हेरून त्यात आमुलाग्र बदलही आवश्यक आहे. पण त्यासाठी आधी जुन्या कालबाह्य निरूपयोगी भुमिकांचा त्याग करावा लागेल. पुढे भवितव्याकडे बघण्याइतके खरोखरचे पुरोगामी व्हावे लागेल. पण त्याचेच नामधारी पुरोगाम्यांना वावडे आहे. म्हणून मग आपणच निर्माण केला त्या अंधारात ही मंडळी चाचपडत आहेत. जितके खोटे बोलून मोदींना बदनाम करण्याचा प्रयास झाला आणि त्यातूनच मोदी लोकपिय झाले असतील, तर आता आंणखी खोटे बोलून चालणार नाही. कल्पनेच्या नंदनवनातून बाहेर पडून वास्तवाला भिडावे लागेल. साहित्यिक वा पुरस्कार यांचे कौतुक कोणालाच नसते आणि म्हणुन त्याचे भांडवल करून माध्यमांना मोठी ब्रेकिंग न्युज मिळाली, तरी मोदी सत्तेवर त्याचा काडीमात्र परिणाम होत नाही. सवाल बातम्यात झळकण्याचा नसून परिणामकारी ठरण्याचा आहे. त्याचे भान अजून आलेले नाही. आपण अस्तित्वाची लढाई लढतोय, याचे भान उरले नाही, मग नामशेष व्हायला पर्याय उरत नाही.

अनेकदा कुठल्या तरी नाटक सिनेमावरून खुप गदरोळ होतो. कधीकधी मुद्दाम माजवला जातो. त्यातून मग प्रेक्षकांची झुंबड उडणार आणि गल्ला भरणार; याची खात्री असते. होतेही तसेच! मात्र बहुतेकदा असे वादग्रस्त झालेले सिनेमा वा नाटके एकदोन आठवड्यात कोसळतात. कारण जितके नाट्य फ़ुगवलेले असते, तितके त्यात काही असल्याचा गवगवा प्रथम घावलेल्यांकडून पुढे झाला नाही, तर बोर्‍या वाजतो. हे वादग्रस्त काही बघायला धावलेले निराश होऊन बाहेर पडतात, त्यांच्याकडून खरी किमया होत असते. त्यांनी ‘कुछभी नही यार’ अशी प्रतिक्रीया दिली, मग लोकांचे कुतूहल संपते आणि वादाने गाजलेले सिनेमे जमिनदोस्त होऊन जातात. मोदी विरोधात बहुतांश वेळी असे झाले आहे. कारण नसलेले मुद्दे घेऊन वा उकरून गदारोळ माजवला गेला आणि त्यातली हवा संपली, मग मोदीच लोकांना खरे वाटत गेले. अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी वा धर्मनिरपेक्षतेला धोका असल्या बाष्कळ विषयावर काहूर माजवण्यापेक्षा, हेच लेखक साहित्यिक विचारवंत महागलेली तुरडाळ, एकूणच बाजारातील महागाई असले मुद्दे घेऊन रस्त्यावर आले आणि पुरोगामी पक्ष संघटनांनी त्यांच्यामागे आपली शक्ती उभी केली, तर मोदी सरकार व भाजपा यांना नाकी दम यायला वेळ लागणार नाही. अशा आंदोलनात मग दादरी वा विचारवंतांच्या हत्या हे विषय असायला हरकत नाही. पण त्यातून जो कल्लोळ माजेल तेव्हा तुरडाळीचे मोल भाजपाच्या सत्तेला डळमळीत करू लागेल. त्याचा आवेश वाढू लागला असताना साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याची मोहिम राबवली असती, तर सामान्य जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असते. पुरोगामीत्वाला जनतेचा उत्स्फ़ुर्त पाठींबा मिळू शकला असता. मोदी विरोधातले असे अनेक मुद्दे आहेत, जे सामान्य जनतेच्या वास्तविक जीवनाला जाऊन भिडणारे आहेत. पण त्याचा थांगपत्ता पुरोगाम्यांना लागलेला नाही. म्हणून तर मोदी निश्चींत आहेत. मोदींचा आपल्या मतदारापेक्षाही पुरोगामी मुर्खपणावर जास्त विश्वास आहे. अन्यथा त्यांना इतका पल्ला अल्पावधीत कशाला मारता आला असता?

Sunday, September 6, 2015

तोतया पुरोगाम्यांची खर्‍या पुरोगाम्यांना दहशत



"Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr. (1929-1968)

चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे हे आता पुरोगामी हल्ल्याचे लक्ष्य झाले तर नवल नाही. अर्थात त्याला हल्ला म्हणायचा नसतो, तर टिका म्हणायची असते. मात्र तशीच टिका लेबल लागलेल्या प्रतिगाम्याने कुणा पुरोगाम्यावर केली म्हणजे त्याला हल्ला म्हणायचे असते. शब्द व त्यांचे अर्थ आजकाल असे सोयीनुसार बदलत असतात. तुम्ही कोणत्या गोटातले त्यावर तुमच्या बोलण्याचा व कृतीचा अर्थ लावला जात असतो आणि त्याला हेतूही चिकटवला जात असतो. शेषराव मोरे यांनी ज्या अर्थाने आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यासाठी जे शब्द वापरले आहेत, त्याचा आशय स्पष्ट आहे. मराठी भाषेच्या प्रांतामध्ये वैचारिक क्षेत्र आज सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या मुठभर मक्तेदारांनी ओलिस ठेवले आहे. फ़क्त महाराष्ट्रातच कशाला अवघ्या देशाची तीच अवस्था वेगळी नाही. या मुठभरांनी पुर्वीच्या धर्ममार्तंडांप्रमाणे समाजातील प्रतिष्ठेची मान्यता आपल्या हाती राखून ठेवली आहे. काही वर्षापुर्वी मानसिंग नावाची एक जगप्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका कुठल्याशा समारंभात सहभागी झाली, तर तिला तथाकथित कलावंत मुखंडांनी त्याबद्दल जाब विचारला होता. कारण तो कार्यक्रम योजणार्‍यांचा संघाशी संबंध होता. याचा अर्थ काय? संघाशी संबंध असणे हे कलाबाह्य असू शकते काय? पण त्यातलेच अनेकजण खुलेआम नेहरू वा कॉग्रेसी राजकारणाशी संबंधित असतानाही ‘फ़क्त’ कलावंत ठरवले जातात. शेषरावांना त्याच दहशतवादाचा निर्देश करायचा होता. कारण त्यात आणि तालिबानी खाप पंचायतीमध्ये फ़रक नसतो. तुम्ही त्या पंचायतीचे आदेश झुगारलेत वा त्यांनी आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडली, मग तुम्हाला भले इजा होणार नाही, पण तुम्ही सार्वजनिकरित्या बहिष्कृत केले जाता. शेषरावांचा रोख त्याच दिशेने आहे. पण इथे त्याच्यासह मूळ दहशतवादही समजून घ्यायला हरकत नाही.

अमूक एक बाब वा कृती आम्हाला मान्य नाही वा आमच्या पठडीत बसणारी नाही, म्हणून ती बहिष्कृत करण्याची वृत्ती हाच दहशतवाद असतो. त्याच्या दडपणाखाली आलात, मग तो अधिकाधिक हिंसक बनत जातो. आधी नुसता बहिष्कार असतो आणि पुढे अशा लोकांना सक्तीने व शक्तीने निकालात काढले जात असते. तालिबानी वृत्तीचा उदय अशाच असहिष्णुतेतून होत असतो. त्याचे तालिबानीकरण झाले मग त्याला दहशतवाद असे नाव दिले जाते. पण सुरूवात शेषराव म्हणतात तिथून होत असते. आपल्याला न पटणार्‍या वा अमान्य असलेल्या कृती वा गोष्टीला बहिष्कृत करण्यापासून ही दहशत सुरू होत असते. मागल्या काही दिवसात त्याची अत्यंत ठळकपणे प्रचिती येत आहे. अमुक एका जागी कोणाची मोदी सरकारने नेमणूक केली, मग त्याला आक्षेप घेण्याचा सपाटा काय सांगतो? पुण्याच्या फ़िल्म इन्स्टीट्यूट वा प्रसारभारतीचे संचालक मंडळ यात म्हणे संघाशी संबंधित लोकांचीच वर्णी लावली. मग कोणा नक्षलवाद्याची वा माओवाद्याची वर्णी लावली पाहिजे काय? सोनियांनी युपीए सरकारला मार्गदर्शक म्हणून जे राष्ट्रीय सल्लागार मंडळ निर्माण केले होते, त्यात कुठल्या संघ संबंधित सेवाभावी संस्थेच्या व्यक्तीची नेमणूक केली होती काय? मग तेव्हा अमूक कोणी माओवाद्यांशी वा पुरोगाम्यांशीच संबंधित आहे, असा ओरडा कशाला झाला नव्हता? ज्याचे सरकार त्याच्याच पठडीतले लोक नेमले जाणार ना? पण सरकार कुठलेही येवो आणि सत्तांतर कुणाचेही येवो, निर्णयसत्ता पुरोगामी मुखंडांच्याच हाती असली पाहिजे. कुठल्याही कामाचा शुभारंभ वा पायाभरणी आमच्याच मंत्राचे उच्चार करून झाली पाहिजे, असा हट्ट करायचा. आणि त्याला जुमानले नाही मग शिव्याशाप सुरू करायचे. ही दहशत नाही तर काय? आजकालच्या इंग्रजाळलेल्या भाषेत त्याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात, त्यातलाच हा प्रकार असतो. शेषरावांनी त्यावरच नेमके बोट ठेवले आहे.

त्यांनी दहशतवाद म्हणजे हिंसक अर्थाने शब्द वापरलेला नाही. हिंदू या शब्दाशी जवळचे काहीही बोलले, तर आपल्याला प्रतिगामी बहिष्कृत ठरवले जाण्याचा भयगंड अशा अर्थाने शेषरावांनी शब्दयोजना केलेली आहे. ती तक्रार करणार्‍यांना उमजलेली नाही असे अजिबात नाही. पण जाणूनबुजून त्याचा विपर्यास करायचा. दुर्दैव असे, की अशाच विपर्यासाने मागल्या दहाबारा वर्षात त्याची दहशत ओसरत गेली आहे. ‘लांडगा आला रे आला’ अशी पुरोगामी दहशतीची दुर्दशा होऊन गेली आहे. कुठल्याही गोष्ट वा बाबतीत पुरोगामीत्वाचा इतका पोरखेळ करण्यात आला, की लोकांना आता पुरोगामी नसण्यात धन्यता वाटू लागली आहे. अन्य काहीही असलो तरी चालेल, पण आपल्यावर पुरोगामीत्वाचा शिक्का नको, अशी मानसिकता मागल्या लोकसभा निवडणूकीत मोदींना प्रचंड यश देवून गेली. त्याला वास्तविक पुरोगामीत्व किंवा सेक्युलर विचारसरणीचे अपयश म्हणता येणार नाही. तो पुरोगामीत्वाच्या तोतयेगिरीचा परिणाम आहे. ब्राह्मणविरोधी जातिय विषारी प्रचार करून समाजात विसंवाद पेरण्याला प्रोत्साहन देण्य़ाचेही समर्थन जेव्हा होऊ लागले, तशा वागण्यातून पुरोगामीत्व म्हणजे तोतयेगिरी आहे याचे भान सामान्य माणसाला येत गेले. त्याचेच राजकीय सामाजिक प्रतिबिंब जनमानसात दिसते आहे. पुरोगामी बुद्धीजिवी आणि सामान्य जनता यांच्यात कुठलाही ताळमेळ उरलेला नाही. या लोकांची सामान्य माणसाशी असलेली नाळ पुर्णपणे तुटलेली आहे. तरीही फ़ेरविचार करून चुका सुधारण्याची बुद्धी त्यांना होताना दिसत नाही. मेलेले पोर पोटाशी घट्ट धरून त्याला दूध पाजू बघणार्‍या माकडीणीच्या केविलवाण्या कृतीप्रमाणे हे तथाकथित पुरोगामी आजही तोच खेळ करीत आहेत. ज्याची दहशत संपलेली आहे, अशी दहशत घालण्याच्या त्या उद्योगाकडे शेषरावांनी बोट दाखवून खरे तर अशा दहशतीखालील खर्‍या पुरोगाम्यांना शहाणे करण्याचा प्रयास केला आहे. पण उपयोग काय?

मध्यंतरी बाबासाहेब पुरंदरे यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला, त्यावरून काहुर माजवले गेले. त्यातून तर ही मंडळी पुरती उघडीच पडली. त्यांचे पुरोगामी नव्हेतर जातियवादी चेहरेच समोर आले. खरे तर त्यातूनही शिकता आले असते. पण शिकेल व शहाणा होईल त्याला आजकाल पुरोगामी म्हणता येत नाही. कारण आता खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारांवर प्रामाणिक विचार करणार्‍यांचाही कब्जा राहिलेला नाही. ठराविक जातिय व धर्मांध शक्तींनी पुरोगामी व्यासपीठ काबीज केले असून, त्यांच्या तालावर माकडाप्रमाणे पुरोगामी म्हणवणारे अगतिक होऊन नाचत असतात. ज्याप्रकारे त्यांनी जीतेंद्र आव्हाड यांच्यानंतर भूषण पुरस्काराला विरोध करणारा केविलवाणा पवित्रा घेतला, त्यातून त्यांच्यावर तोतया पुरोगाम्यांनी बसवलेली दहशत स्पष्टपणे समोर आली. शेषरावांशी आमचे एकाच बाबतीत दुमत वा भिन्न मत आहे. पुरोगामी दहशत ही आता इतरांना वाटेनाशी झाली आहे आणि सामान्य माणसाने त्याची प्रचिती मतदानातून दाखवली आहेच. मात्र तीच तोतया पुरोगामीत्वाची दहशत खर्‍याखुर्‍या प्रामाणिक पुरोगामी लोकांवर कायम आहे. कारण आता कोणालाच पुरोगामी असण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. पण ज्यांना आपला चेहरा पुरोगामी राखण्याची हौस आहे, असे लोक त्या दहशतीखाली आहेत. आपण सत्य बोललो आणि विवेकी वागलो, तर आपली पुरोगामीत्वाची बिरूदावली हिरावून घेतली जाईल, अशा भयाने ज्यांना पछाडले आहे. त्यांना अशा दहशतीखालून बाहेर काढण्याची गरज आहे. सच्चे पुरोगामी आहेत, त्यांना तोतया पुरोगाम्यांची दहशत इतकी भेडसावते आहे, की त्यांना ब्रिगेड वा जिहादी धर्मांधांच्या दडपणाखाली केविलवाण्या कसरती कराव्या लागत आहेत. म्हणूनच शेषरावांनी तोतया पुरोगाम्यांची दहशत असा शब्द वापरायला हवा होता. कदाचित त्यातून मुठभर तरी पुरोगाम्यांना सत्य बोलायचे धाडस मिळू शकले असते.

Friday, July 31, 2015

पुरोगामी जिहाद संपलेला नाही



मुंबई बॉम्बस्फ़ोटातला आरोपी आणि एक महत्वाचा सुत्रधार याकुब रझ्झाक मेमन याच्या फ़ाशीवरून उठलेले वादळ त्याला फ़ासापासून वाचवण्यासाठी होते अशी अनेकांची समजूत आहे. म्हणूनच त्याचे कुटुंबिय वा वकीलांनी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल शंका घ्यायचे काही कारण नाही. त्यांचे ते कर्तव्यच असते. पण त्यांच्या व्यतिरीक्त अखेरच्या क्षणी ज्यांनी याकुबला वाचवण्याचा तमाशा मांडला होता, त्यांना याच्याशी काय कर्तव्य होते? तर हे लोक स्वत:ला फ़ाशीच्या शिक्षेचे विरोधक मानतात. फ़ाशी ही आधुनिक युगात व जगात रानटी शिक्षा असल्याच्या समजुतीने भारावलेला एक वर्ग जगभर असून इथले तमासगीर त्याच पंथाचे होते. त्यात आणखी याकुब मुस्लिम असण्याने व विद्यमान सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या पुर्वग्रहाची भर होती. पण हा सगळा तमाशा तिथेच संपणारा आहे काय? त्यात अन्य काही हेतू वा उद्दीष्ट नाही, असे ठामपणे म्हणता येईल काय? हेतू असेल तर तो शोधण्याची गरज आहे. कारण याकुबने दोन दशकापुर्वी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटापेक्षा असा हेतू अधिक घातक असू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या नावे शिव्याशाप देत बसण्यापेक्षा त्यांचे कुटील हेतू ओळखायला हवेत आणि त्यांच्या मागे फ़रफ़टत गेलेल्या अन्य वेंधळ्या मुर्खांना त्यापासून वेगळे काढणे भाग आहे. म्हणूनच नुसता अशा तमासगीरांच्या नावाने शंख करण्यापेक्षा त्यांचे चेहरे व मुखवटे ओळखण्याची गरज आहे. यात एका बाजूला असाउद्दीन ओवायसीसारखे थेट कट्टरपंथी मुस्लिम नेते आहेत तर दुसर्‍या बाजूला नक्षलवादी हिंसेला न्यायाची लढाई असा मुखवटा लावणारेही आहेत. तिसर्‍या बाजूला नुसत्याच हिंदूत्ववादाने बिथरलेल्यांचा एक गट आहे, तर चौथ्या बाजूला अशा सेक्युलर गोतावळ्यात आपणही आहोत असे दाखवायला उथळपणा करणार्‍यांचा गट आहे.

शत्रुघ्न सिन्हा भाजपाचा खासदार असून त्याने अशा गोतावळ्यात कायम येजा राखलेली आहे. मंत्रीपदाला वंचित राहिल्यापासून त्याची कायम चलबिचल होत असते. तर कॉग्रेस वा अन्य पक्षातले काही नेते कट्टर संघद्वेषाने अशा सह्याजीरावांच्य गोतावळ्यात वावरत असतात. ह्यांना आपण काय करीत आहोत त्याचा थांगपत्ता नसतो. पण तसे नक्षलवाद्यांचे समर्थक वा ओवायसीचे पाठीराखे यांच्याविषयी म्हणता येणार नाही. ही मंडळी जाणिवपुर्वक काही कुटील हेतूने अशा संधी शोधत असतात आणि त्यात मग बाकीच्या बावळटांना ओढून आणत असतात. जयचंद राठोड हे नाव वाचल्यावर अनेकांना तो इतिहास आठवला. पण त्यामागची मनस्थिती किती उमगली? पृथ्वीराजच्या द्वेषाने जयचंद पेटलेला होता, त्याचे हेतू भिन्न तर महंमद घोरीचे उद्दीष्ट वेगळे होते. पण घोरीने आपले हेतू साध्य करण्यासाठी जयचंदाचा कुटीलपणे वापर करून घेतला. आज त्याचप्रमाणे नक्षलवादी व जिहादी प्रवृत्ती सेक्युलर मुर्खांचा आपल्या हेतूसाठी वापर करून घेत आहेत. त्यातून मग सेक्युलर व जिहादी अशा दोन्हीतला मुखवटा कुठला व चेहरा कुठला याचा अंदाजच येत नाही. तिथे मग आपण त्या सर्वांना शिव्याशाप देत बसतो. पण त्यामागचे हेतू शोधत नाही. त्यातली लबाडी वा बनवेगिरी तपासून बघत नाही. नक्षलवाद्यांना भारतीय लोकशाही व घटनात्मक शासनव्यवस्था खिळखिळी करून टाकायची आहे. मग नुसत्या शस्त्राच्या धाकाने भारतीय लोकसंख्येवर राज्य करता येईल, असे त्यांचे स्वप्न आहे. तर जिहादी मानसिकतेचे ओवायसी व त्यांचे पाठीराखे हिंदू असलेल्यांच्या मनात कायम अपराधगंड निर्माण करून दुसरीकडे मुस्लिमांना चिथावण्या देण्याचे धोरण राबवत असतात. त्या दोन्ही गटांना भारतीय शासन व कायदा व्यवस्था आडवी येते आहे. अकबरुद्दीन ओवायसी काय म्हणाला होता आठवते?

‘फ़क्त चोविस तास पोलिस बाजूला काढा, मग बघा हिंदूंचा कसा फ़डशा पाडतो’, हीच त्याची धमकी होती ना? ती खोटी समजण्याचे कारण नाही. हिंदू आपल्या धर्मासाठी रक्त सांडायला उभे रहाणार नाहीत, पण मुस्लिम प्राण पणाला लावून हिंदूंना ठार मारतील, असेच त्याला म्हणायचे होते. किंबहूना त्यांनी तशी शिकवणच जिहादी संकल्पनेतून दिलेली आहे. सगळेच मुस्लिम तसे नाहीत. पण जे राजकीय व सार्वजनिक जीवनात पुढे असतात, ते अशाच हिंसक मानसिकतेने भारवलेले आहेत. त्यांच्या वतीने अकबरुद्दीन बोलत होता. मात्र पोलिस, कायदा व न्यायव्यवस्था कार्यरत असेपर्यंत तशी थेट लढाई शक्य नाही, ही त्याची अडचण आहे. नेमकी तीच अडचण नक्षलवाद्यांची आहे. जोवर घटनात्मक कायदेशीर राज्य भक्कम आहे, तोवर नुसत्या शस्त्रबळाने सत्ता गाजवता येणार नाही,. ही नक्षलवाद्यांची समस्या आहे. जोवर तथाकथित सेक्युलर मानले जाणारे सरकार देशात होते, तोवर अशा दोन्ही मनोवृत्तींना हातपाय पसरायला कुठला अडथळा नव्हता. त्याचेच लाभ उठवून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे. जेव्हा कृती केली आणि कायदा आडवा आला, तेव्हा त्यांचे छुपे सुत्रधार ‘प्रतिष्ठीत’ मुखवटे लावून असेच बचावाला सरसावले आहेत. असे मान्यवर पत्रके काढणार, बैठका घेणार, निदर्शने करणार आणि जनमानसात नेहमी कायदा व न्यायव्यवस्थेच्या विषयी शंका निर्माण करणार, हाच त्यांचा जिहाद बनून गेला आहे. एका बाजूला हेच लोक गुजरातच्या दंगलीत कायदाव्यवस्था नव्हती म्हणणार आणि तेच दुसरीकडे कायद्याने दिलेला न्यायही शंकास्पद आहे असे म्हणणार. यातला दुटप्पीपणा ओळखण्याची गरज आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नसतो, तर लोकांच्या मनातला कायदा व न्यायावरील विश्वास ठार मारायचा असतो. एकप्रकारे हा नजरेत न भरणारा जिहाद आहे.

जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे हिंसाचार अशी आपण एक चुकीची समजूत करून घेतली आहे. याकुबपासून अफ़जल गुरूपर्यंत कोणालाही निरपराधांना ठार मारण्यात रस नसतो आणि नव्हता. त्यांना मुठभर लोकांना ठार मारून करोडो लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती किंवा असते. दोन दशकांपुर्वी मुंबईत पहिले बॉम्बस्फ़ोट झाल्यापासून आपल्या नित्यजीवनात किती आमुलग्र बदल झालाय, त्याकडे आपण कधी गंभीरपणे बघितले आहे काय? विमानतळ व मंत्रालय अशा महत्वाच्या स्थळी सुद्धा त्यापुर्वी तपासणी यंत्रे नव्हती. आता तर रेल्वे बसस्थानकातही स्फ़ोटके शोधणारी यंत्रे तैनात केलेली दिसतात. त्याला दहशत म्हणतात. जनतेचा अथवा कायदा सुव्यवस्था राबवणार्‍यांना कुठेही केव्हाही स्फ़ोट होऊ शकतात, अशी कायम भिती वाटत असेल, तर याकुबने दहशतीची योजना यशस्वी केली ना? लोकांना त्या स्फ़ोटाची वा जीवानिशी मरण्याची भिती केव्हा वाटते? जेव्हा कायदा व्यवस्थेने सुरक्षा देण्याविषयीची लोकांना खात्री वाटत नाही. तो विश्वास मारणे म्हणजेच जिहादी युद्ध जिंकणे असते. याकुब वीस वर्षापुर्वी बिनधास्त शेकडो निरपराध लोकांना ठार मारायची योजना आखतो व अंमलात आणतो. पण त्याला कायद्यानुसार दोषी ठरवल्यानंतर बंदिस्त तुरूंगात फ़ाशी देतानाही सरकारला बाहेर गडबडी होऊ नयेत, याची खास दक्षता घ्यावी लागते. ह्याला आत्मविश्वास म्हणायचा की दहशत? ही दहशत याकुब वा त्याच्या माथेफ़िरू मुस्लिम अनुयायांनी निर्माण केलेली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्याला वाचवायला उजळमाथ्याने फ़िरणार्‍यांनी आपल्या मनात तशी दहशत निर्माण केली आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नव्हताच. तुमचा-आमचा व सामान्य माणसाचा न्याय व कायद्यावरील विश्वास खच्ची करायचा होता. शिव्यशाप देण्यापेक्षा आपण हे कुटील हेतू ओळखणे व त्याच्याशी दोन हात करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर एस, के. मलिक यांनी समजावून दिलेला जिहाद जाणून घ्यावा लागेल.

Sunday, July 26, 2015

पुरोगामीत्वाचा बळी याकुब मेमन



याकुब मेमनच्या फ़ाशीला पहिला विरोध हैद्राबादचे असाद्दीन ओवायसी यांनी केला होता. त्यावरून काहुर माजले होते. त्यानंतर सलमान खान याने तसे ट्वीट केले आणि त्याच्या विरोधात झोड उठली. तोपर्यंत हा मामला अशा ‘नगण्य’ मानल्या जाणार्‍या ‘अप्रतिष्ठीतां’पुरता मर्यादित होता. पण या दोघांच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया बघून मग बहुतांश सेक्युलरांना जाग आली. त्यांचे पुरोगामीत्व अकस्मात कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागे झाले. कारण त्यांच्या पुरोगामीत्वाला हिंदूत्वाची झणझणित फ़ोडणी आवश्यक असते. मागली दोन दशके चालू असलेल्या मुंबई बॉम्बफ़ोट खटल्याच्या कालखंडात कधीही यापैकी एकानेही याकुब मेमन वा अन्य कुणाचे समर्थन केले नव्हते. याकुब भारतीय पोलिस यंत्रणेच्या तावडीत सापडला त्यालाही आता वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण तेव्हाही कोणी त्याची ‘वकिली’ करायला पुढे आलेला नव्हता. कारण एकूणच भारतीयांच्या मते याकुब शेकडो निरपराधांच्या हत्याकांडातला एक प्रमुख आरोपी होता. सहाजिकच त्याच्या बचावाला जाण्यात कुठले पुरोगामीत्व असणार? कारण याकुब वा अन्य आरोपींवर गुन्हेगारी आरोप होते आणि फ़क्त हिंदूत्ववादीच नव्हे, सर्वच त्याच्या विरोधात बोलत होते. त्याच्यावरच खटला दिर्घकाळ चालला आणि वेळोवेळी त्याच याकुबने आपल्यावर अन्याय होत असल्याचा टाहो फ़ोडला होता. पण कुणा तथाकथित पुरोगाम्याने याकुबच्या टाहोला प्रतिसाद दिल्याचे कोणाला आठवते काय? न्यायालयातही त्याने थैमान घातले होते आणि न्यायाधीशासह कोणावरही बेताल आरोप केलेले होते. पण आजच्या सह्याजीरावांपैकी एकानेही याकुबच्या यातना-वेदनांची दखल घेऊन एक शब्द उच्चारला नव्हता. अगदी त्याला टाडा कोर्टात फ़ाशी झाली, तेव्हाही यातल्या कुणी साधे दु:ख व्यक्त करायला चार शब्द खर्ची घातले नव्हते. मग आजच अशा तमाम प्रतिष्ठीत मान्यवरांना याकुबचा पुळका कशाला यावा?

काहीतरी कारण असेल ना? खरेच त्यांना याकुबचा पुळका असता तर त्यांना असे निवेदन काढायला इतका आणखी आठवडाभर उशीर व्हायचे काही कारण नव्हते. ज्या दिवशी फ़ाशीची तारीख घोषित झाली, त्याच दिवशी ओवायसीच्या सुरात सुर मिसळून त्यांनीही याकुबवर अन्याय होत असल्याचा गळा काढायला हवा होता. पण त्यापैकी काही झाले नाही आणि सुप्रिम कोर्टात याकुबची अखेरची याचिका निकालात निघेपर्यंत यापैकी कोणी याकुबकडे ढुंकून बघायला तयार नव्हते. किंवा त्यांना तशी सवडही मिळू शकली नाही. ती याचिका फ़ेटाळली गेली तरीही हे तमाम मान्यवर गप्प व अनभिज्ञ होते. मात्र ओवायसी वा नंतर सलमान खानच्या वक्तव्यावर तथाकथित हिंदूत्ववाद्यांना चेव आला आणि पुरोगाम्यांची झोपमोड झाली. त्यांना अकस्मात जाग आली, की ज्याअर्थी हिंदूत्ववाद्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत, त्याअर्थी घडणारी घटना नक्की प्रतिगामी असली पाहिजे. पर्यायाने त्यांना हस्तक्षेप करणे भाग पडले. कारण आजकाल पुरोगामीत्वाचा अजेंडा प्रतिगामी ठरवत असतात. पुरोगाम्यांना जे कोणी प्रतिगामी वाटतात, त्यांनी एखादी कृती केली, मग त्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकणे, इतके पुरोगामीत्व शिल्लक राहिले आहे. जर हे प्रतिगामी गप्प बसले मग पुरोगामी लोकही शांत चित्ताने झोपा काढतात. इथेही काही भिन्न घडलेले नाही. याकुबला फ़ाशी ठोठावली जाऊन काही वर्षे उलटलेली आहेत. त्यावर अनेक अपिले झाली आणि अखेरीस त्यावर सुप्रिम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलेले आहे. पण ती नुसती न्यायप्रक्रिया होती. त्यात कुठे हिंदुत्ववादी नव्हते की तथाकथित प्रतिगामीही नव्हते. मग त्यात पुरोगाम्यांचे काय काम? पुरोगाम्यांना याकुबकडे ढुंकून बघण्याची गरज तरी होती काय? तो कुढत मरत होता. टाहो फ़ोडत होता. त्याचे वकील प्रत्येक कोर्टाचे दार ठोठावत होते. पण कुणा पुरोगाम्याने त्याकडे वळून तरी बघितले काय?

सर्व मार्ग संपले आणि याकुबची फ़ाशी निश्चीत झाली. तेव्हा राज्य सरकारवर ते काम पुर्ण करायची जबाबदारी आली. सरकारने त्यासाठी तारीख नक्की करून सज्जता सुरू केली. तरीही पुरोगामी निवांत निद्रेत होते. मात्र ओवायसी व सलमान खान यांनी सर्व गडबड केली. त्यांच्या विधानांनी प्रतिगामी हिंदूत्ववादी चवताळले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर पुरोगामीत्वाला आव्हान उभे राहिले. यातली याकुबची फ़ाशी दुय्यम बाब आहे. त्याच्याशी एकाही पुरोगामी सह्याजीरावाला सोयरसुतक नाही. याकुब जगला काय आणि मेला काय? एकाही पुरोगाम्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यातून प्रतिगामी आनंदित होत असतील, तर दु:खाचा तमाशा मांडणे पुरोगामी लोकांचे कर्तव्य होत नाही काय? थोडक्यात सलमान वा ओवायसीच्या बकवास करण्यावर हिंदूत्ववादी गप्प बसले असते, तर यातला एकही सह्याजीराव याकुब वा त्याच्या फ़ाशीबद्दल अवाक्षर बोलला नसता. किंबहुना याकुब मेमन नावाचा कोणी होता वा फ़ाशी गेला, याचीही खबर त्यांना लागली नसती. सगळा मुर्खपणा त्या हिंदूत्ववाद्यांचा आहे. त्यांच्या उतावळेपणाने कुंभकर्णाची झोप काढणार्‍या पुरोगाम्यांची झोपमोड झाली. धावपळ सुरू झाली आणि मान्यवर लोकांची यादी बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात मग नेहमीचेच कलाकार सहभागी होत गेले. एक लांबलचक यादी राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. यातल्या कुणाला मुंबई स्फ़ोटात प्राण गमावणारीही माणसे होती आणि त्यांना कुठल्याही सुनावणीशिवाय ठार मारले गेले, याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यासाठी त्यांना दोष द्यायचेही कारण नाही. कारण आता ज्या याकुबसाठी त्यांनी आक्रोशाचे नाटक चालविले आहे, त्याच्याही मरण्याशी यांना कर्तव्य नाही. त्यांना कर्तव्य आहे ते प्रतिगामी हिंदूत्ववाद्यांचा मुखभंग करण्याशी. त्याची एक संधी याकुबने त्यांना दिली, यापेक्षा त्यांना याही प्रकरणात किंचीत आस्था नाही.

इथे मग ‘बिचार्‍या’ याकुब मेमनची दया येते. कारण त्याची फ़ाशी वा त्याचे मरण हे त्याच्या पापासाठी असेलही. पण पुरोगामी लोकांनी त्याच्या मरणाचाही धंदा बनवला आहे. जीवानिशी जायचा आहे याकुब, पण पुरोगाम्यांनी आपल्या राजकीय अजेंडासाठी त्याच्या मरणातही संधी शोधली आहे. दाखवायला हे सर्व लोक याकुबला वाचवायला पुढे सरसावले असेच कोणालाही दिसते आहे. पण वास्तव तसे अजिबात नाही. याकुबचा गळफ़ास आपल्या राजकीय विरोधकांना चिमटे काढण्यासाठी वापरण्याचा हिडीस हेतू त्यातून साधला जात आहे. याकुबच्या गळ्यातला फ़ास आवळणाराही जितका कृर नसेल आणि शेकडो निरपराधांचे हकनाक जीव घेणारा याकुब जितका क्रुरकर्मा म्हणता येणार नाही; इतके हे राक्षसी क्रौर्य आहे. दुसर्‍याच्या मुडद्यावर आपले राजकीय हेतू साधून घेण्याची ही मानसिकता घातपात्यांपेक्षा भयंकर आहे. अन्यथा याच लोकांनी याकुबला फ़ाशी झाली, तेव्हा किंवा राष्ट्रपतींकडे त्याचा दयेचा अर्ज पडून होता, तेव्हा असे निवेदन काढले असते. याकुबला फ़ाशीपासून वाचवायची तीच खरी वेळ होती. पण त्या प्रत्येक वेळी यापैकी कोणीही काहीही केले नाही. याकुब नावाच्या माणसाविषयी कुठली माहितीही त्यांनी कधी घेतली नाही किंवा त्याच्या खटल्याचे कामकाज विचारले नाही. मात्र आज प्रतिगामी वा हिंदूत्ववाद्यांना डिवचण्याची संधी म्हणून हे लोक याकुबच्या गळ्यातल्या फ़ासाशी खेळायला सिद्ध झाले आहेत. दुसर्‍या कुणाच्या जीवन मरणातून आपल्या राजकीय संधी शोधणारे कसाब वा याकुबपेक्षा भयंकर नाहीत काय? कारण याकुब वा अफ़जल गुरू लोकांच्या मनात एक गुन्हेगार म्हणून बदनाम झालेला असतो. आणि त्यांच्यापेक्षा राक्षसी कृत्य करणारे असे सह्याजीराव मात्र समाजात उजळमाथ्याने वावरत व मिरवत असतात. याकुबवर गुन्हा दाखल करता येतो, खटला भरता येतो, आणि त्यापेक्षा भयंकर राक्षस असूनही अशा प्रतिष्ठीतांना कायदा काहीही करू शकत नाही.