Showing posts with label याकुब. Show all posts
Showing posts with label याकुब. Show all posts

Monday, August 3, 2015

याकुबची फ़ाशी आणि माया कोडनानी

   याकुब मेमन आता फ़ाशी गेला आहे आणि म्ह्णून त्याचा विषय संपला असे होत नाही. किंबहूना तसे होऊ दिले जाणार नाही. म्हणूनच जेव्हा याकुबची फ़ाशी थांबणे शक्य असल्याचे स्पाष्ट झाले, तेव्हापासून राजीव गांधींचे मारेकरी, गुजरात दंगलीच्या आरोपी माया कोडनानी यांच्या फ़ाशीचा विषय पटलावर आणला गेला आहे. आता काय युक्तीवाद सुरू झाला आहे? याकुबला फ़ाशी म्हणजे न्याय असेल, तर गुजरात दंगलीत नरोडा पाटिया येथील हत्याकांड प्रकरणी दोषी ठरलेल्या भाजपाच्या तेव्हा असलेल्या मंत्री माया कोडनानी यांनाही सामुहिक हत्याप्रकरणी फ़ाशी व्हायला हवी. चटकन अनेकांची इथे दिशाभूल होते आणि तोच तर अशा युक्तीवादाचा मुख्य हेतू आहे. कारण याकुबची फ़ाशी अनेक दिव्ये पर करून अंतिम टप्प्यावर पोहोचली. टाडा कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत त्याच्या फ़ाशीसाठी व विरोधात युक्तीवाद झालेले आहेत आणि त्यानंतरच फ़ाशीवर शिक्कामोर्तब झालेले होते. त्याहीनंतर राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज फ़ेटाळला गेला आणि इतके झाल्यावरही मागल्या आठ्वड्यातला मोठा तमाशा रंगवला गेला. तेव्हा कोणीही याकुबच्या गुन्ह्याविषयी बोलत नव्हता. तेव्हाचा सगळा युक्तीवाद फ़ाशीची शिक्षा अमानुष असल्याचा होता आणि मुंबईतल्या स्फ़ोटाच्या गुन्ह्याविषयी कोणाची तक्रार नव्हती. मुद्दा एकच लढवला जात होता, तो फ़ाशीची शिक्षा नसावी इतकाच. म्हणजेच जे कोणी याकुबचे सहानुभूतीदार म्हणून आठवडाभर किल्ला लढवत होते, त्यांना कुणालाही फ़ाशी होऊ नये असेच वाटत असल्याचा निदान आवेश होता. आणि त्यात किंचित जरी प्रामाणिकपणा असेल, तर आताही त्या सर्वांनी तितक्याच आवेशात पुढल्या प्रत्येक वेळी कोणालाही फ़ाशीची शिक्षा होत असेल, तर तिच्या विरोधात कंबर कसून उभे रहायला हवे. तेव्हा फ़ाशीशी शिक्षा झालेला आरोपी हिंदू वा मुस्लिम किंवा भाजपावाला किंवा सेक्युलर असला तरी त्याच्या बाजूने उभे रहायला हवे ना?

कुठलाही प्रामाणिक माणूस जेव्हा तत्वाचा आव आणतो, तेव्हा त्याने व्यक्ती-धर्म वा अन्य कुठल्या निकषावर आपल्या तत्वाला मुरड घालून चालत नाही. याकुबच्या बाबतीत ज्यांना पुळका आलेला होता, त्यांचा विषय पुरावे साक्षीशी नव्हता, तर फ़ाशीची शिक्षा लांच्छनास्पद असल्याची भूमिका होती. पण तीच भुमिका किती फ़सवी व भंपक बनवेगिरी होती, त्याची साक्ष त्याच मंडळींनी याकुब फ़ासावर लटकण्याच्या आधीच द्यायला सुरूवात केली होती. त्यांनी माया कोडनानीला फ़ाशी देण्याची मागणी गुजरात सरकारने केलेली नाही, असा आक्षेप घ्यायला सुरूवात केलेली होती. म्हणजे त्यांना फ़ाशीशी कर्तव्य आहे काय? असते तर त्यांनी माया कोडनानीला सरकारने फ़ाशीची शिक्षा मागितली नाही, त्याचे स्वागतच करायला हवे होते. कारण तिथे तरी त्यांच्या फ़ाशी विरोधाला एका सरकारचे समर्थन कृतीतून मिळालेले आहे. परंतु तसे झाले नाही आणि आता याकुब फ़ाशी गेल्यावर कालचेच फ़ाशी विरोधक कोडनानीला फ़ाशीची मागणी करायचा आग्रह धरू लागले आहेत. यातून एक गोष्ट लक्षात येते, की त्यांचे याकुबप्रेम जितके पक्के तितकाच, माया कोडनानीविषयी असलेला तिरस्कार भक्कम आहे. मग त्याचा अविष्कार करताना ही मंडळी कायदा, न्याय, तत्वज्ञान यांचा उपयोग कंडोमसारखा करीत असतात. मजा मारायला वापरायचे आणि काम संपले की उकिरड्यावर फ़ेकून द्यायचे. मात्र आपला कंडोम अत्यंत पवित्र व पुण्यवंत असल्याचाही दावा करायचा, इतकी बदमाशी त्यातून साफ़ नजरेला येते. आधी त्यांनी आपले याकुबप्रेम झाकायचा उद्योग केला व फ़ाशी विरोधाचे नाटक रंगवले आणि आता फ़ाशीचा आग्रह धरून कोडनानी विषयक द्वेषाची साक्ष दिलेली आहे. पण कोडनानी प्रकरण त्याच्याही पलिकडले आहे. गुजरात सरकारने तिला फ़ाशीची मागणी करू नये असा पवित्रा घेऊन पुरोगामी लोकांच्याच इच्छा पुर्ण केलेल्या नाहीत काय?
 
मागली तेरा वर्षे गुजरातच्या दंगलीचे राजकारण चालले आणि त्याचे पडसाद देशभर उमटत राहिले. सतत मोदींना लक्ष्य करताना प्रमुख आरोप कुठला होता? गुजरात सरकार दंगल पिडीतांना न्याय देत नाही, गुन्हेही नोंदले जात नाहीत. मग ही सर्व हजारो मुस्लिम पिडितांना न्याय देण्याची जबाबदारी भारतातल्या पुरोगाम्यांनी थोर कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड यांच्यावर सोपवलेली होती. मागल्या तेरा वर्षात तीस्ताने गुजरातच्या दंगलग्रस्तांच्या नावाने करोडो रुपयांची उलाढाल मस्त तेजीत केलेली होती. खरे तर गुजरात सरकारने तिचा धंदा उत्तम चालवण्यासाठीचे धोरण म्हणून दंगलपिडीतांच्या बाबतीत अनास्था दाखवली म्हणावे, इतकी परिस्थिती होती. गुजरातच्या दंगल व हिंसाचारात सरकार नेहमी दंगलखोरांच्याच पाठीशी उभे राहिले, असा पुरोगाम्यांचा दावा राहिला आहे. त्याच भूमिकेतून तेरा वर्षात गुजरात व अन्यत्रच्या निवडणूकामध्ये पुरोगाम्यांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या होत्या. मग आज अकस्मात त्यांना कुठल्या फ़ाशी वा शिक्षेसाठी गुजरात सरकारची मदत कशाला हवी आहे? सरकारने तरी असे काही करून तीस्ताच्या पोटावर पाय कशाला आणावा? पण इतके होत असताना तीस्ता कुठे आहे, असा सवाल या पुरोगाम्यांनी विचारायला हवा आहे. तीस्ताचा शोध घ्यायचे सोडून त्यांनी गुजरात सरकारच्या दारात फ़ाशीची भिक मागत वाडगा घेऊन कशाला उभे रहावे? माया कोडनानीला पकडण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी तीस्ता सध्या आहे तरी कुठे? गुजरातचे नरोडा पाटियाचे बिचारे पिडीत डोळ्यात अश्रू आणून न्यायाची प्रतिक्षा करीत असताना तीस्ता त्यांना सोडून कुठे गायब झाली आहे? तर मागल्या तेरा वर्षात जो तेजीत धंदा केला, त्यातल्या अफ़रातफ़रीचे हिशोब जुळवण्यात तीस्ता व्यस्त आहे. स्वत:लाच जामिन मिळवण्यासाठी तीस्ताची सध्या तारांबळ उडाली आहे. मग कोडनानी फ़ाशी जाते की जन्मठेप भोगते, याच्याशी तिला कर्तव्य काय?

मुद्दा इतकाच की इथे सगळी दिशाभूल होत असते. तीस्ताचे अनुयायी व याकुब बाबाचे भक्त यांचा मागल्या तेरा वर्षातला एकच आरोप होता, की गुजरात सरकार माया कोडनानीला वाचवते आहे. तिला पकडू देत नाही की तिच्यावर गुन्हा दाखल करू देत नाही. प्रत्यक्षात गुजरात सरकारने नेमलेल्या पोलिस पथकाकडूनच कोडनानी यांच्यावर आरोप दाखल झाले व त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. पण त्याचे किंचितही श्रेय कुणी पुरोगामी लोक गुजरात सरकारला देत नाहीत. तर तीस्ताला त्याचे श्रेय देत असतात. मग आताही त्यांना जी फ़ाशीची शिक्षा हवी आहे, त्यासाठी त्यांनी गुजरात सरकारला साकडे घालण्यापेक्षा तीस्ताला नवस बोलावेत. पण तसे होणार नाही. दुटप्पीपणा हेच पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे याकुब भक्ती करताना फ़ाशी अमानुष असल्याने रद्दबातल व्हायचा आग्रह धरायचा आणि कोडनानीचा खटला आला, मग मात्र फ़ाशीच्या मागणीसाठी आग्रही व्यायचे असे होणारच. त्यालाच तर पुरोगामीत्व म्हणतात. गंगा गये गंगादास जमना गये जमनादास अशी आजकाल पुरोगामीत्वाची सोपी व्याख्या झालेली आहे. अन्यथा कालपर्यंत याकुबचा फ़ास रोखायला धावणार्‍यांना आज कोडनानीचा फ़ास आवळायची उताविळ कशाला झाली असती? पण संधी साधून सामान्यजनांच्या मनाचा गोंधळ उडवायचा यासाठीच पुरोगामी बुद्धी वापरली जात असते. म्हणून तर सहा वर्षे याकुबच्या फ़ाशीची घोषणा होऊनही जी मंडळी गप्प होती. ती अखेरच्या क्षणी मैदानात आली. आता ती फ़ाशी उरकली गेल्यावर त्यांना नसलेली फ़ाशी व्हायलाच हवी, अशी उबळ आलेली आहे. त्यात कुठली मानवतावादी भूमिका नाही की न्यायाची चाड नाही. निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थांसाठी कुणाच्याही जीवाशी, भावनांशी व फ़ाशीच्या दोराशी खेळ चालू आहेत. जितक्या थंड माथ्याने टायगर-याकुब मेमन स्फ़ोट घडवतात वा पानसरे दाभोळकरांचे खुन पाडले जातात, तितक्याच थंड चित्ताने असले हिडीस युक्तीवाद होतात. त्यापासून सामान्यजनांनी आणि अगदी याकुबच्या कुटुंब व धर्मबांधवांनीही जागरूक रहाण्याची गरज आहे.


Saturday, August 1, 2015

पाकिस्तानी सेनानीचे भारतीय अनुयायी



   ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करणे अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’

उपरोक्त उतारा पकिस्तानी ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या पुस्तकातून घेतला आहे. कोण्या एका पाकिस्तानी सेनाधिकार्‍याचे मत वा पुस्तक अशी समजून करून घेण्याचे कारण नाही. मलिक हे शेकडो पाकिस्तानी निवृत्त अधिकार्‍यांपैकी एक नव्हेत. सोवियत युनियनने अफ़गाणिस्तान बळकावल्यानंतर तिथे मुक्तीयुद्ध आरंभले गेले त्याची प्रेरणा पाकिस्तानात होती व अमेरिकन चिथावणीने त्या गमिनी युद्धाच्या झळा अफ़गाण सोवियत सत्तेला सोसाव्या लागत होत्या, अफ़गाण ही इस्लामची भूमी आहे आणि ती बिगरमुस्लिमांच्या तावडीतून मुक्त करणे, हे पृथ्वीतलावरच्या प्रत्येक मुस्लिमाची धार्मिक कर्तव्य आहे, अशी त्यामागची मूळ संकल्पना होती. त्याला अमेरिकेने खतपाणी घातले की आणखी कोणी ते पाप केले, हा विषय अलाहिदा आहे. त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागत आहेत, त्याला प्राधान्य व महत्व आहे. म्हणूनच याकुब मेमन वा आज जगाला भेडसावणार्‍या इस्लामी दहशतवादाचे विश्लेषण करताना, मलिक यांचे पुस्तक महत्वाचे आहे. कारण अफ़गाण जिहादसाठी जी वैचारिक व धार्मिक भूमिका मांडली गेली, तिचे निरूपण याच पुस्तकात आलेले आहे. म्हणूनच मलिक यांच्या ‘कोरनिक कन्सेप्ट ऑफ़ वॉर’ या पुस्तकाला तेव्हाचे पाक लष्करशहा व सेनाप्रमुख जनरल झिला उल हक यांची प्रस्तावना लाभलेली आहे. याकुबच्या निमीत्ताने जो तमाशा मागले आठदहा दिवस चालला, त्यातले अनेक हेतू त्या पुस्तकात आढळतात व त्यापैकीच एक दाखला उपरोक्त परिच्छेदात आहे. जिहाद ही शस्त्राने जिंकण्याची लढाई नाही. जिहाद हे हिंसाचार माजवून जिंकायचे युद्ध नाही. शारिरीक वा शस्त्रास्त्रांच्या बळावर भूमी पादाक्रांत करण्याचा संघर्ष म्हणजे जिहाद नव्हे. तर मानवाच्या मानसिक व भावनिक भूमीवर दहशतीचे राज्य उभे करणे, म्हणजे जिहाद होय. विजय पराभव मानवी श्रद्धांचा होत असतो, याचे इतके नेमके विवेचन क्वचितच कुणा सेनापतीने केलेले असेल. याकुबने काय केले ते अगदीच नगण्य आहे. पण त्याला फ़ाशीच्या दोरापासून वाचवण्याचा जो तमाशा चालला होता, तो जिहादपेक्षाही भयंकर आहे. त्यात कुणी मुस्लिम मुल्ला मौलवी अथवा जिहादी मानसिकतेचा आढळत नाही, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

याकुबला मूळ खटला चालवणार्‍या कोर्टाने फ़ाशी फ़र्मावून काही वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्याने व त्याच्या आप्तस्वकीयांनी सुटकेचे डझनावारी प्रयास केलेले होते. पण शेवटच्या क्षणी त्याच्या मदतीला जी फ़ौज येऊन उभी राहिली, त्यापैकी कोणीच इतकी वर्षे त्यासाठी कशाला पुढे आले नाहीत? आणि नसतील तर मग आजच त्यांना याकुबविषयी इतका मायेचा पान्हा कशाला फ़ुटलेला आहे? मग हिंदूत्ववाद्यांना त्यात मुस्लिम लांगुलचालन दिसेल किंवा अन्य कुणाला सेक्युलर भूमिका दिसेल. पण वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले तर यापैकी कोणाला कुठल्याच धर्माचे वा कुठल्याही राष्ट्राविषयी आत्मियता नसल्याचे दिसून येईल. त्यांना याकुबविषयी सुद्धा आत्मियता नाही. त्यांची लढाई वेगळीच आहे. ते कुठल्या हिंदू श्रद्धेच्या विरोधात उभे ठाकलेले नाहीत. त्यांना हिंदू विरोधी मानणेही चुक आहे. कारण हिंदूंमध्ये कोणीही आपल्या धर्मासाठी वा श्रद्देसाठी लढायला पुढे सरसावणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. कितीही तोंडाळपणा केला तरी शेकड्यांनी हिंदूत्ववादी साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांच्या समर्थनाला मैदानात उतरले, असे एकदाही दिसलेले नाही. कारण हिंदू कधीच धार्मिक श्रद्धेसाठी लढत नाहीत हा इतिहास आहे. पण तेच बहुतांश हिंदू कायदा, संविधान व राष्ट्रीय एकात्मता यासाठी मात्र प्राणाची बाजी लावायला धावून येतील, याची तितकीच खात्री देता येते. थोडक्यात आज ज्यांना हिंदू म्हणून ओळखले जाते, त्यांच्यासाठी धर्मापेक्षा राष्ट्र, त्याची एकत्मता वा राष्ट्रीय स्वाभिमान हीच प्रभावी श्रद्धा झालेली आहे. तोच एक धर्म बनला आहे. मग त्यासाठी लढायची त्यांची हिंमत खच्ची केल्याशिवाय त्या राष्ट्राला पराभूत करणे शक्य आहे काय? सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा कसाबला थेट जाऊन भिडलेला तुकाराम ओंबळे असो, त्यांची श्रद्धा आपल्या धर्मापेक्षा संविधान, कायदा वा राष्ट्र या संकल्पनेशी निगडीत दिसेल. तीच श्रद्धा भारताचे खरे बळ आहे. तीच श्रद्धा खच्ची करायची म्हणून याकुबच्या निमीत्ताने कायदा, न्याय याविषयीच्या श्रद्धेवर आघात करायला जे समोर आले, त्याला जिहादचे नवे रूप म्हणून बघायला हवे. या तमाम लोकांनी कुठे हिंदूंना शिव्या घातल्या नाहीत की इस्लामचा गौरव केला नाही. पण त्यांनी न्यायप्रिय भारताची विटंबना करण्याचा अट्टाहास केला आहे.

आज जगभर ज्याला भारत म्हणून ओळखले जाते, त्याला मुठभर पुरोगाम्यांनी हिंदूत्वाचा रंग भले दिलेला असो, पण या उपखंडाचा धर्म नेहमी व आजही ‘राष्ट्र’ हाच राहिला आहे. त्याच ‘धर्म’श्रद्धेने इस्लाम वा अन्य कुठल्या आक्रमणाला दाद दिली नाही. परक्यांशी झुंज धर्माच्या आधारे दिली नाही. इथल्या बहुसंख्यांचा व्यक्तीगत जीवनातील हिंदू हे कर्मकांड राहिले असेल. पण त्यांचा सामुहिक धर्म कायम राष्ट्र हाच राहिला आहे. आणि तीच ‘राष्ट्र’धर्मश्रद्धा कुणाला पराभूत करता येत नाही. जोवर ती श्रद्धा भक्कम आहे, तोवर पाकिस्तान काय किंवा अन्य कोणीही या खंडप्राय राष्ट्राला पराभूत करू शकत नाही. शतकानुशतके आक्रमणे पचवून इथे राष्ट्रीय श्रद्धा टिकून राहिली, ती हिंदू नामक धर्मश्रद्धा नव्हती व नाही. तीच राष्ट्रश्रद्धा होती. आणि ती जितकी भक्कम आहे तितके भीषण हल्ले पचवण्याशी कुवत अधिक आहे. दहशतीला आपण भीक घालत नाही, त्याचे तेच एकमेव कारण आहे. ती श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा मार्ग पूजापाठ नसून कायदा, घटना व न्यायाचा आदर होय. याकुबच्या निमीत्ताने कशावर हल्ला झाला? त्याच न्याय व कायद्याच्या श्रद्धेवर हल्ला झालेला आहे. कारण ती भारतीयांची धर्मश्रद्धा बनलेली आहे. इतके गुन्हे सिद्ध होऊनही याकुबच्या अंत्ययात्रेला हजारो मुस्लिमांनी गर्दी केली, त्याला इस्लामवरची श्रद्धा म्हणता येईल. उलट साध्वी वा पुरोहित यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा अजून सिद्ध झालेला नसला, तरी त्यांच्या समर्थनासाठी मुठभरही हिंदूलोक पुढे येत नाहीत. कारण ती त्यांची धर्मश्रद्धा नाही. तो धर्म त्यांच्या व्यक्तीगत श्रद्धेचा भाग आहे. उलट राष्ट्र हा धर्म आहे. म्हणून पुरोगामी हल्ला कुठे केला जातोय? न्याय, कायदा व राज्यघटनेवर. आणि चवताळून प्रतिक्रिया त्याचसाठी उमटल्या आहेत. साध्वी वा कर्नलसाठी उठत नाहीत, इतक्या संतप्त प्रतिक्रिया न्यायपालिकेविषयी शंका घेतल्यावर उमटल्या. आणि त्याच श्रद्धा खच्ची केल्यास दहशत माजवता येईल, असे ब्रिगेडियर मलिक सांगतात. मग याकुबला वाचवायला सरसावले तो पुरोगामी जिहाद नाही काय? त्यांना इथली राष्ट्रभावना, राष्ट्राभिमान खच्ची करायचा आहे? हा विषय हिंदू मुस्लिम असा नाहीच. तो राष्ट्र विरुद्ध पुरोगामी जिहाद असा आहे. म्हणून हल्ले सतत तुमच्या राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद अशा संकल्पनांवर होत आहेत आणि होणार आहेत. त्यात याकुब वा कसाब, अफ़जल यांचे मुडदे प्यादे-मोहरे म्हणून वापरले जात असतात.


Friday, July 31, 2015

पुरोगामी जिहाद संपलेला नाही



मुंबई बॉम्बस्फ़ोटातला आरोपी आणि एक महत्वाचा सुत्रधार याकुब रझ्झाक मेमन याच्या फ़ाशीवरून उठलेले वादळ त्याला फ़ासापासून वाचवण्यासाठी होते अशी अनेकांची समजूत आहे. म्हणूनच त्याचे कुटुंबिय वा वकीलांनी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल शंका घ्यायचे काही कारण नाही. त्यांचे ते कर्तव्यच असते. पण त्यांच्या व्यतिरीक्त अखेरच्या क्षणी ज्यांनी याकुबला वाचवण्याचा तमाशा मांडला होता, त्यांना याच्याशी काय कर्तव्य होते? तर हे लोक स्वत:ला फ़ाशीच्या शिक्षेचे विरोधक मानतात. फ़ाशी ही आधुनिक युगात व जगात रानटी शिक्षा असल्याच्या समजुतीने भारावलेला एक वर्ग जगभर असून इथले तमासगीर त्याच पंथाचे होते. त्यात आणखी याकुब मुस्लिम असण्याने व विद्यमान सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या पुर्वग्रहाची भर होती. पण हा सगळा तमाशा तिथेच संपणारा आहे काय? त्यात अन्य काही हेतू वा उद्दीष्ट नाही, असे ठामपणे म्हणता येईल काय? हेतू असेल तर तो शोधण्याची गरज आहे. कारण याकुबने दोन दशकापुर्वी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटापेक्षा असा हेतू अधिक घातक असू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या नावे शिव्याशाप देत बसण्यापेक्षा त्यांचे कुटील हेतू ओळखायला हवेत आणि त्यांच्या मागे फ़रफ़टत गेलेल्या अन्य वेंधळ्या मुर्खांना त्यापासून वेगळे काढणे भाग आहे. म्हणूनच नुसता अशा तमासगीरांच्या नावाने शंख करण्यापेक्षा त्यांचे चेहरे व मुखवटे ओळखण्याची गरज आहे. यात एका बाजूला असाउद्दीन ओवायसीसारखे थेट कट्टरपंथी मुस्लिम नेते आहेत तर दुसर्‍या बाजूला नक्षलवादी हिंसेला न्यायाची लढाई असा मुखवटा लावणारेही आहेत. तिसर्‍या बाजूला नुसत्याच हिंदूत्ववादाने बिथरलेल्यांचा एक गट आहे, तर चौथ्या बाजूला अशा सेक्युलर गोतावळ्यात आपणही आहोत असे दाखवायला उथळपणा करणार्‍यांचा गट आहे.

शत्रुघ्न सिन्हा भाजपाचा खासदार असून त्याने अशा गोतावळ्यात कायम येजा राखलेली आहे. मंत्रीपदाला वंचित राहिल्यापासून त्याची कायम चलबिचल होत असते. तर कॉग्रेस वा अन्य पक्षातले काही नेते कट्टर संघद्वेषाने अशा सह्याजीरावांच्य गोतावळ्यात वावरत असतात. ह्यांना आपण काय करीत आहोत त्याचा थांगपत्ता नसतो. पण तसे नक्षलवाद्यांचे समर्थक वा ओवायसीचे पाठीराखे यांच्याविषयी म्हणता येणार नाही. ही मंडळी जाणिवपुर्वक काही कुटील हेतूने अशा संधी शोधत असतात आणि त्यात मग बाकीच्या बावळटांना ओढून आणत असतात. जयचंद राठोड हे नाव वाचल्यावर अनेकांना तो इतिहास आठवला. पण त्यामागची मनस्थिती किती उमगली? पृथ्वीराजच्या द्वेषाने जयचंद पेटलेला होता, त्याचे हेतू भिन्न तर महंमद घोरीचे उद्दीष्ट वेगळे होते. पण घोरीने आपले हेतू साध्य करण्यासाठी जयचंदाचा कुटीलपणे वापर करून घेतला. आज त्याचप्रमाणे नक्षलवादी व जिहादी प्रवृत्ती सेक्युलर मुर्खांचा आपल्या हेतूसाठी वापर करून घेत आहेत. त्यातून मग सेक्युलर व जिहादी अशा दोन्हीतला मुखवटा कुठला व चेहरा कुठला याचा अंदाजच येत नाही. तिथे मग आपण त्या सर्वांना शिव्याशाप देत बसतो. पण त्यामागचे हेतू शोधत नाही. त्यातली लबाडी वा बनवेगिरी तपासून बघत नाही. नक्षलवाद्यांना भारतीय लोकशाही व घटनात्मक शासनव्यवस्था खिळखिळी करून टाकायची आहे. मग नुसत्या शस्त्राच्या धाकाने भारतीय लोकसंख्येवर राज्य करता येईल, असे त्यांचे स्वप्न आहे. तर जिहादी मानसिकतेचे ओवायसी व त्यांचे पाठीराखे हिंदू असलेल्यांच्या मनात कायम अपराधगंड निर्माण करून दुसरीकडे मुस्लिमांना चिथावण्या देण्याचे धोरण राबवत असतात. त्या दोन्ही गटांना भारतीय शासन व कायदा व्यवस्था आडवी येते आहे. अकबरुद्दीन ओवायसी काय म्हणाला होता आठवते?

‘फ़क्त चोविस तास पोलिस बाजूला काढा, मग बघा हिंदूंचा कसा फ़डशा पाडतो’, हीच त्याची धमकी होती ना? ती खोटी समजण्याचे कारण नाही. हिंदू आपल्या धर्मासाठी रक्त सांडायला उभे रहाणार नाहीत, पण मुस्लिम प्राण पणाला लावून हिंदूंना ठार मारतील, असेच त्याला म्हणायचे होते. किंबहूना त्यांनी तशी शिकवणच जिहादी संकल्पनेतून दिलेली आहे. सगळेच मुस्लिम तसे नाहीत. पण जे राजकीय व सार्वजनिक जीवनात पुढे असतात, ते अशाच हिंसक मानसिकतेने भारवलेले आहेत. त्यांच्या वतीने अकबरुद्दीन बोलत होता. मात्र पोलिस, कायदा व न्यायव्यवस्था कार्यरत असेपर्यंत तशी थेट लढाई शक्य नाही, ही त्याची अडचण आहे. नेमकी तीच अडचण नक्षलवाद्यांची आहे. जोवर घटनात्मक कायदेशीर राज्य भक्कम आहे, तोवर नुसत्या शस्त्रबळाने सत्ता गाजवता येणार नाही,. ही नक्षलवाद्यांची समस्या आहे. जोवर तथाकथित सेक्युलर मानले जाणारे सरकार देशात होते, तोवर अशा दोन्ही मनोवृत्तींना हातपाय पसरायला कुठला अडथळा नव्हता. त्याचेच लाभ उठवून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे. जेव्हा कृती केली आणि कायदा आडवा आला, तेव्हा त्यांचे छुपे सुत्रधार ‘प्रतिष्ठीत’ मुखवटे लावून असेच बचावाला सरसावले आहेत. असे मान्यवर पत्रके काढणार, बैठका घेणार, निदर्शने करणार आणि जनमानसात नेहमी कायदा व न्यायव्यवस्थेच्या विषयी शंका निर्माण करणार, हाच त्यांचा जिहाद बनून गेला आहे. एका बाजूला हेच लोक गुजरातच्या दंगलीत कायदाव्यवस्था नव्हती म्हणणार आणि तेच दुसरीकडे कायद्याने दिलेला न्यायही शंकास्पद आहे असे म्हणणार. यातला दुटप्पीपणा ओळखण्याची गरज आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नसतो, तर लोकांच्या मनातला कायदा व न्यायावरील विश्वास ठार मारायचा असतो. एकप्रकारे हा नजरेत न भरणारा जिहाद आहे.

जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे हिंसाचार अशी आपण एक चुकीची समजूत करून घेतली आहे. याकुबपासून अफ़जल गुरूपर्यंत कोणालाही निरपराधांना ठार मारण्यात रस नसतो आणि नव्हता. त्यांना मुठभर लोकांना ठार मारून करोडो लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती किंवा असते. दोन दशकांपुर्वी मुंबईत पहिले बॉम्बस्फ़ोट झाल्यापासून आपल्या नित्यजीवनात किती आमुलग्र बदल झालाय, त्याकडे आपण कधी गंभीरपणे बघितले आहे काय? विमानतळ व मंत्रालय अशा महत्वाच्या स्थळी सुद्धा त्यापुर्वी तपासणी यंत्रे नव्हती. आता तर रेल्वे बसस्थानकातही स्फ़ोटके शोधणारी यंत्रे तैनात केलेली दिसतात. त्याला दहशत म्हणतात. जनतेचा अथवा कायदा सुव्यवस्था राबवणार्‍यांना कुठेही केव्हाही स्फ़ोट होऊ शकतात, अशी कायम भिती वाटत असेल, तर याकुबने दहशतीची योजना यशस्वी केली ना? लोकांना त्या स्फ़ोटाची वा जीवानिशी मरण्याची भिती केव्हा वाटते? जेव्हा कायदा व्यवस्थेने सुरक्षा देण्याविषयीची लोकांना खात्री वाटत नाही. तो विश्वास मारणे म्हणजेच जिहादी युद्ध जिंकणे असते. याकुब वीस वर्षापुर्वी बिनधास्त शेकडो निरपराध लोकांना ठार मारायची योजना आखतो व अंमलात आणतो. पण त्याला कायद्यानुसार दोषी ठरवल्यानंतर बंदिस्त तुरूंगात फ़ाशी देतानाही सरकारला बाहेर गडबडी होऊ नयेत, याची खास दक्षता घ्यावी लागते. ह्याला आत्मविश्वास म्हणायचा की दहशत? ही दहशत याकुब वा त्याच्या माथेफ़िरू मुस्लिम अनुयायांनी निर्माण केलेली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्याला वाचवायला उजळमाथ्याने फ़िरणार्‍यांनी आपल्या मनात तशी दहशत निर्माण केली आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नव्हताच. तुमचा-आमचा व सामान्य माणसाचा न्याय व कायद्यावरील विश्वास खच्ची करायचा होता. शिव्यशाप देण्यापेक्षा आपण हे कुटील हेतू ओळखणे व त्याच्याशी दोन हात करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर एस, के. मलिक यांनी समजावून दिलेला जिहाद जाणून घ्यावा लागेल.

Thursday, July 30, 2015

न्यायाचे मारेकरी आणि दाभोळकरांचे मारेकरी



कधी कधी असे वाटते की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक वा इतर स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इतका मोठा संघर्ष केला ही त्यांची मोठी चुक असावी. महात्मा फ़ुले, आगरकर अशा समाजसुधारकांनी आपले आयुष्य़ विविध आंदोलनात खर्ची घालून अव्यापारेषु व्यापार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीमधील त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी अकारण मोठा उहापोह करून देशाची सखोल राज्यघटना बनवण्य़ाचे कष्ट उपसले. त्यातून लोकशाहीचा एक आकृतीबंध तयार केला. त्याच्याआधारे देशात कायद्याचे राज्य व न्याय प्रस्थापित होण्याची अपेक्षा बाळगून अशा थोरामोठ्यांनी काही चुक केलेली असावी का? तसे नसते तर आज त्याच भारत नामे खंडप्राय देशातले मान्यवर त्याच राज्यघटनेने स्थापन केलेल्या न्यायालयाच्या प्रदिर्घ प्रक्रियेने दिलेला न्यायनिवाडा गुंडाळून ठेवण्याचा आग्रह इतक्या सन्मानपुर्वक कशाला करू शकले असते? दोन दशकाचा तपास चौकश्या व खटला चालवून आणि त्याच्याही नंतर अनेक अपिले व फ़ेरविचार केल्यानंतर जी फ़ाशी याकुब मेमनला दिली जाणार होती, तीच रद्दबातल करायचे संयुक्त निवेदन राष्ट्रपतींना द्यायचे धाडस कोणाला कशाला झाले असते? पण ते झाले आणि याच देशातील दोनशेहून अधिक मान्यवर प्रतिष्ठीतांनी त्यावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यात हे लोक कुणा एका याकुब मेमनच्या गळ्यातला फ़ाशीचा दोर काढून घ्यायला उतावळे झाले, असे मानायचे अजिबात कारण नाही. कारण याकुब मेमन तितका मोठा वा अद्वितीय माणूस नाही. त्याची फ़ाशीही तितकी महत्वाची नाही. याकुबसारखे शेकडो भारतीय रोजच्या रोज कुठेतरी अपघातात वा हत्याकांडात मरत असतात. म्हणूनच अशा कोणाचा मृत्यू रोखायला कोणी पुढे सरसावताना आपल्याला दिसत नाही. यातला कोणी मान्यवर त्या मृत्यूने विचलीत झालेला आपण बघितला आहे काय? नसेल तर या निवेदनामागचा हेतू काय?

त्यांनी याकुबची बाजू घेतली किंवा त्याच्यासाठी हे लोक पक्षपाती झालेत असा प्रत्यारोप लगेच सुरू झाला होता. तेही आता नेहमीचेच झाले आहे. असे कोणी बोलले वा त्याचा विरोध केला, मग त्यांना कुठले तरी रंग चढवले जातात आणि आरोप प्रत्यारोपाचे नाटक रंगते. पण एका याकुबसाठी इतके नाटक होत नसते किंवा दुसर्‍या बाजूला कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंगचा विषय निघाला, मग तशाच दोन बाजू उभ्या रहातात. व्यक्ती वा तिचा रंग बदलला, मग तात्काळ आधी कायद्याचे समर्थन करणारे विनाविलंब त्याच कायद्याने केलेल्या निवाडा वा घेतलेल्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह लावायला धावतात. दोन्ही बाजूंमध्ये कितीसा फ़रक असतो? पण दोन्ही बाजू तितक्याच न्यायाच्या असल्याचेही आग्रही प्रतिपादन होत असते. आता ज्यांनी हे निवेदन काढले, त्यांना कायद्याच्या प्रक्रियेत गुन्हेगार व दोषी ठरलेल्याची कणव आलेली होती आणि त्यासाठी कायद्याने लवचिक व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. तेव्हा मग पुरावे, साक्षी वा खटल्यातले कायद्याचे मुद्दे आपोआप दुय्यम होऊन जातात. पण त्याच लोकांशी दाभोळकर वा पानसरे यांच्या हत्येबद्दल बोलून बघा. तात्काळ त्यांचा अविर्भाव बदलून जाईल. तेव्हा मग गुन्हेगार शोधून त्यांना कडक व कठोर शिक्षा दिली पाहिजे, असा आग्रह सुरू होईल. म्हणजे याकुबची फ़ाशी असेल तर त्याच कायद्याने लवचिक व्हायला हवे आणि पानसरे दाभोळकरांचे हत्याकांड असेल, तर कायद्याने शक्यतेपेक्षा अधिक कठोर व्हायला हवे, अशा भूमिका बदलत असतात. अशा लोकांना साध्वी, कर्नल, याकुब वा पानसरेंचे मारेकरी यांच्याविषयी व्यक्तीगत रागलोभ अजिबात नसतो. किंबहूना त्यांना कायद्याशी वा न्यायाशीही काडीमात्र कर्तव्य नसते. त्यातून ही सर्व मंडळी आपापला राजकीय अजेंडा पुढे करत असतात आणि त्या केविलवाण्या राजकीय नागड्या भूमिकेला न्यायाची वस्त्रे चढवायला धडपडत असतात.

पण म्हणून विषय तिथे संपत नाही. अशा मान्यवर प्रतिष्ठीत लोकांच्या पलिकडे समाज असतो आणि त्याचेही काही मत असते. त्याच्या मनात यातून गोंधळ माजवला जात असतो. सहानुभुती निर्माण करून कायद्याच्या अंमलाबददल शंका निर्माण केल्या जात असतात. पण तोही भाग बाजूला ठेवून आपण अशा निवेदनाचा कधीतरी विचार करणार आहोत किंवा नाही? साध्वी असो किंवा याकुब असो, त्यांच्याविषयी भूमिका घेऊन जेव्हा ही मंडळी उभी रहातात, तेव्हा ते त्या व्यक्तीच्या बाजूने उभे रहातात, असा आपला गैरसमज असतो. आपुलकीने सहानुभूतीने असे लोक मागणी करतात, असेही काहींना वाटू शकते. पण ही मंडळी वास्तवात कायद्याला व घटनेला आव्हान देत असतात, याकडे कोणाचे लक्ष वेधले जात नाही. प्रामुख्याने अफ़जल गुरू, कसाब किंवा याकुब यांच्या फ़ाशीविषयी जेव्हा असे मुद्दे उपस्थित करून फ़ाशी स्थगित करायची मागणी होते, तेव्हा त्यामागे देशातल्या घटनाधिष्ठीत कायद्याला व न्यायनिवाड्याला निकामी करण्याचाच हेतू नसतो काय? कित्येक वर्षे खर्ची घालून तपास व खटला चालवला जातो आणि त्यावर करोडो रुपये खर्च होऊन एक निकाल आलेला असतो. त्याच्या अंमलबजावणीच्या प्रसंगी अशा शंका उपस्थित करण्यमागे काय हेतू असतो? कशाला आव्हान देणे असते? त्यातून प्रत्यक्षात राज्यघटना वा कायद्याच्या राज्यालाच सुरूंग लावायचा प्रयास होत नसतो काय? अशाप्रकारे दोषी ठरलेल्यांना माफ़ी द्यायची किंवा फ़ाशीतून सोडवायचे असेल आणि तोच प्रगल्भतेचा उपाय असेल, तर मग खटल्याचे तरी नाटक कशाला हवे? अमूकाला दोषी ठरवणे वा निर्दोष ठरवणे असे मुठभर लोकांच्या इच्छेनुसार व्हायचे असेल, तर स्वातंत्र्य, घटना व कायदे, कोर्टे कशाला हवी होती? ब्रिटीश राज्यपद्धती इथे येऊन पुढे घटनात्मक कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यापुर्वी मुठभरांच्या हातीच तर न्यायव्यवस्था बंदिस्त नव्हती काय?

आज आम्ही खापपंचायत वा जातपंचायतीला विरोध करतो किंवा त्याला जुलूम म्हणतो. ती व्यवस्था हजारो वर्षे या भूमीत कार्यरत होती व काही प्रमाणात आजही कार्यरत आहे. तिथे मुठभर लोक पंच असतात. तेही तेवढ्या लोकसंख्येतले मान्यवर म्हणून पंच मानले जातात व त्यांचा न्यायनिवाडा अंतिम मानला जातो. त्यासाठी त्यांना कुठल्या कायद्याने अधिकार दिलेला नाही, की मान्यता दिलेली नाही. पण त्या समाजातील, जातीतील मान्यवर असल्याने त्यांनी व्यक्त केलेली इच्छा व दिलेला निर्णय न्याय मानण्याची सक्ती असते किंवा झुगारण्याची मुभाही असते. कारण त्याला प्रचलीत कायदा मान्यता देत नाही. पण जनमानसावर पंचायतीचे इतके दडपण असते, की त्यांचा निवाडा सहसा झुगारला जात नाही. त्यापेक्षा असे मुठभर मान्यवर याकुबची फ़ाशी रद्द करायची मागणी करतात, त्यात काय वेगळा हेतू आहे? तिथे पंचायत प्रस्थापित कायदा गुंडाळून वागते म्हणून ती घटनाबाह्य असेल; तर राष्ट्रपतींना असे निवेदन देणारे काय वेगळे करीत होते? यांना असे निवेदन करायचा काय अधिकार आहे? कारण ते घटनात्मक न्यायनिवाड्याला झुगारण्याचे आवाहन राष्ट्रपतींना करत होते. अगदी स्पष्ट सांगायचे तर अशाप्रकारचे कुठलेही आवाहन वा निवेदन हे देशाच्या घटनेला व पर्यायाने कायद्याच्या राज्याला आव्हान देते. गांधी, आंबेडकर इत्यादींनी प्रयत्नपुर्वक संपादन केलेले स्वातंत्र्य, बनवलेली राज्यघटना यांच्या अतित्वालाच हे लोक सुरूंग लावत नाहीत काय? कारण एका बाजूला हेच लोक दाभोळकर पानसरेंच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हायचा आग्रह धरतात, तर तेच लोक कोर्टात सिद्ध झालेल्या सामुहिक मारेकर्‍याला फ़ाशीपासून माफ़ी देण्याचाही आग्रह धरतात. तेव्हा सामान्य माणसाच्या कायद्यावरील विश्वासाला सुरूंग लावत असतात. कायदा नुसता शब्दात नसतो, तर जनतेचा त्यावरील अढळ विश्वास कायद्याला बलवान बनवत असतो. इथे त्याच विश्वासाला सुरूंग लावला जातो आहे आणि तेच पाप करणारे उजळमाथ्याने प्रतिष्ठीत म्हणूनही मिरवत असतात.

Wednesday, July 29, 2015

आजच्या जमान्यातले जयचंद आणि पृथ्वीराज



शेकडो वर्षापुर्वीची कहाणी आहे. कोणी याकुबची फ़ाशी रद्द करा म्हटल्यावर आज आपण खवळतोय. पण आपला इतिहासच तसा नाही काय? जयचंद राठोड आठवतो आपल्याला? त्याच्या डोक्यावर खापर फ़ोडून आपण मोकळे होतो ना? त्यानेच संयोगिताच्या स्वयंवरातून तिला पृथ्वीराज चौहानने पळवली, म्हणून इतिहास घडवला नव्हता काय? कितव्या शतकातली गोष्ट आहे? शतक आणि साल शोधण्याची गरज आहे काय? त्याने काय होणार? शतक अकरावे असो किंवा एकविसावे असो, त्यात जयचंद आणि पृथ्वीराज असतातच. भारतीय स्वभावाचा तो गुणदोष आहे. आपल्या वादात वितुष्टात शत्रूला साथ देवून भाईबंदांसह आपल्यावरच नामुष्की ओढवण्याचा वारसा शतकानु शतके चालत आलेला आहे ना आपल्याकडे? पण पृथ्वीराज शहाणा होत नाही की जयचंदला अक्कल येत नाही. बहिणीशी प्रेम करून तिला पळवून नेणार्‍या पृथ्वीराजला धडा शिकवण्यासाठी जयचंदाने महंमद घोरीला साथ दिली होती ना? सग्यासोयर्‍याचा घात केला होता ना? पण म्हणून पृथ्वीराज निरपराध होता असे म्हणता येते काय? कित्येकदा त्याने घोरीला युद्धात पराभूत केले. पण तो शरण आला आणि मोठ्या औदार्याने त्याला अभय देण्याचे पाप कोणाचे होते? साक्षात आपल्याच दगाबाज मृत्यूला जोपासण्याचे पाप पृथ्वीराजाने केले नव्हते काय? आज गुरदासपूरचा हल्ला असो किंवा दिल्लीत राष्ट्रपतींना याकुबची फ़ाशी रद्द करण्याचे सादर झालेले निवेदन असो, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपण अनुभवत नाही काय? जे याकुबच्या कृत्यामुळे हकनाक मारले गेले त्याविषयी काडीमात्र भावना ज्यांना नाहीत, असे लोक आपल्या देशातले प्रतिष्ठीत म्हणून उभे आहेत आणि याकुबसाठी गळा काढत आहेत. पण त्यापैकी एकानेही कधी मारल्या गेलेल्या निरपराध मुंबईकरांसाठी अश्रू ढाळला नव्हता. याकुबसाठी त्यांना इतकी सहानुभूती कशाला आहे?

उद्या संधी मिळाली तर हाच याकुब वा अन्य कुठलाही जिहादी असाच आणखी कित्येक निरपराधांचे जीव घ्यायला क्षणाचाही विलंब लावणार नाही. तेव्हाही खरेखोटे न तपासता याकुबने आपल्या भावाशी संगनमत करून घातपाताचे षडयंत्र रचले आणि अंमलात आणलेले होते. महंमद घोरी असो किंवा याकुबसारखा जिहादी असो, त्यांची मानसिकता तसूभर वेगळी नाही. प्रत्येक मुस्लिम तसा असतो असे नाही. याकुब वा अन्य कुठला मुस्लिम याच्यातला फ़रक आपल्याला करता येणार नसेल, तर मग इतिहासाची पुनरावृत्ती होतच रहाणार आहे. दंगलखोर आणि कारस्थानी मारेकरी यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. थंड डोक्याने जो हत्येची योजना आखतो आणि काळजीपुर्वक नियोजन करून अंमलात आणतो, तो जिहादी वा सैतान असतो. अकस्मात उदभवलेल्या परिस्थितीने जो हिंसेला प्रवृत्त होतो, त्याला दंगलखोर म्हणतात. त्याच्या हातून एका ठराविक परिस्थितीत हिंसा घडून गेलेली असते. पण दोन भिन्न गोष्टींची गल्लत करायची आणि मग सामान्य माणसांचा गोंधळ उडवुन द्यायचा हे एक घातक तंत्र झाले आहे. जेव्हा त्यात मुस्लिम जिहादी पकडले जातात, तेव्हा मग दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि हिंदू दंगलखोर असला तरी त्यावर धर्माचे लेबल अगत्याने लावायचे, हा नेहमीचा खेळ झालेला आहे. यात फ़सवणुक कुठे आणि कशी आहे, तेही समजून घेणे भाग आहे. कारण आपल्या देशाला याकुब वा तत्सम घातपाती जिहादींपासून धोका नाही, इतका अशा दिशाभूल करणार्‍या बुद्धीवादी मान्यवरांपासून धोका आहे. कुंटणखान्यात येऊन फ़सलेल्या मुलीला मोल देवून जबरदस्ती करणारा गुन्हेगार नसतो, इतका तिला प्रेमात फ़सवून कुंटणखान्यात आणून विकणारा सैतान असतो. आज याकुब आपल्याला सैतान वाटतो आहे. पण सत्य विचित्र असते. त्या याकुबपेक्षा त्याला वाचवायला पुढे सरसावलेत, असे लोक अधिक भयंकर सैतान आहेत.

प्रेमात पडलेली मुलगी आपल्या सगेसोयर्‍यांना सोडून ज्या प्रियकराच्या सोबत पळून येते. तिने विश्वासाने त्याला साथ दिलेली असते. कुठल्याही संकटात तो आपल्याला वाचवणार व सोडवणार अशा विश्वासावर ती मुलगी उठून आलेली असते. त्यानेच तिला कुंटणखान्यात नेवून विकणे म्हणजे किती मोठा दगाफ़टका असतो? आपल्या समाजात आपण ज्यांच्याकडे मान्यवर प्रतिष्ठीत जाणते म्हणून बघत असतो, त्यांनी नेहमी कायद्याच्या राज्याची प्रवचने दिलेली आहेत. यातले बहुतेक लोक गुजरात दंगलीत दोषींना शिक्षा देण्यासाठी अहोरात्र रडतेले आहेत. जे आरोप सिद्ध झाले नाहीत वा त्याचे पुरावेही सापडत नाहीत, अशा बाबतीत मोदींना शिक्षा व्हावी म्हणून गळा काढणार्‍यांचा यात भरणा दिसेल. मग त्यांचे तेव्हाचे कायदाप्रेम खरे होते, की आज न्यायाला धुडकावण्याची भूमिका खरी आहे? न्याय व कायद्याची कदर असेल तर शिक्षा कोणालाही होवो, तिचे समर्थन व्हायला हवे. पण ही माणसे एका बाजूला शिक्षेचा पुराव्याशिवाय आग्रह धरतात आणि दुसरीकडे पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या गुन्ह्याच्या शिक्षेला अतिरेक ठरवू बघतात. इथेच त्यांच्यातला फ़सवा प्रियकर आपल्या लक्षात येऊ शकतो. दिशाभूल उमजू शकते. माथी भडकलेली असताना बेभान होऊन केलेली दंगल त्यांना चिंतेचा विषय वाटतो आणि योजनापुर्वक केलेल्या हत्या त्यांना दुर्लक्षणिय क्षमाशील चुक वाटते. असे लोक समाजाला गाफ़ीलपणे खाटकाच्या हाती सोपवत असतात. कुठल्याही फ़सव्या योजनेत लाखो रुपये गुंतवून अधिक लाभ मिळण्याचे आमिष दाखवणार्‍या लफ़ंग्या सेल्समनपेक्षा अशा निवेदनकारांची लायकी अधिक नाही. कारण हे लोक सहानुभूतीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत आहेत आणि प्राणघातक संकट म्हणजे लोकशाही वा सुरक्षितता असल्याचा भास निर्माण करीत आहेत. त्यांना स्वत:च्याही भविष्याचे भान उरलेले नाही.

युझफ़ुल इडीयट असा एक इंग्रजी शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ असा, की असे मुर्ख शत्रूला उपयुक्त असतात आणि स्वत:साठी मुर्ख असतात. इराणमध्ये शहा विरोधात क्रांती झाली तिचे नेतृत्व तिथल्या कम्युनिस्टांकडे होते. पण सामान्य जनतेला सोबत ओढण्यासाठी त्यांनी परागंदा असलेला मुल्ला आयातुल्ला खोमेनी याचा चेहरा पुढे केला. जेव्हा इराण पेटला आणि शहाला पळून जावे लागले, तेव्हा सत्तासुत्रे खोमेनीच्या हाती आली. त्याने फ़्रांसहून मायदेशी परत आल्यावर सर्वप्रथम कम्युनिस्टांचे शिरकाण केले. थोडक्यात शहाच्या विरोधात इराणी कम्युनिस्टांनी आपल्याच जीवावर उठण्यार्‍याला बळ देण्याचा मुर्खपणा केला होता. इथेही आज याकुब वा जिहादीच्या समर्थनाला उभे राहणारे तथाकथित डावे उदारमतवादी वेगळे काय करीत आहेत? दुसरीकडे तशाच मतांच्या लाचारीने अनेक इतरही पक्ष भरकटले आहेत. अशा राजकीय पक्षांचे वर्तन जयचंद राठोडचा इतिहास नव्याने घडवत असतात. कॉग्रेसच्या साथीने देशात नाव कमावल्यानंतर ओवायसीने महाराष्ट्रात त्याच कॉग्रेसची कबर बांधायला हातभार लावला ना? आज ओवायसी कोणते डाव खेळतो आहे, त्याचे परिणाम दोनतीन वर्षांनी याकुबच्या समर्थक दिवट्यांना कळतील. सुदैवाने आज भारतात राजेशाही नाही आणि सामान्य जनताही पृथ्वीराजसारखी भोळीभाबडी नाही. तिनेच आधी इथल्या जयचंदांचा सुपडा साफ़ करून मागल्या लोकसभेत आपला कल स्पष्ट केला आहे. त्यातून इथले एकविसाव्या शतकातले जयचंद धडा शिकलेले नसतील तर घोरीकडून संपवले जाण्याआधी जनताच त्यांना निकालात काढील. भाजपा वा मोदी जर पृथ्वीराज व्हायची उदार स्वप्ने बघत असतील तर मतदार त्यांनाही पर्याय शोधल्याशिवाय रहाणार नाही. कारण नेता कितीही महत्वाचा असला तरी आधुनिक युगात जनताच इतिहास घडवत असते आणि बदलतही असते, हे आजच्या जयचंद व पृथ्वीराजांनी विसरू नये.

Sunday, July 26, 2015

पुरोगामीत्वाचा बळी याकुब मेमन



याकुब मेमनच्या फ़ाशीला पहिला विरोध हैद्राबादचे असाद्दीन ओवायसी यांनी केला होता. त्यावरून काहुर माजले होते. त्यानंतर सलमान खान याने तसे ट्वीट केले आणि त्याच्या विरोधात झोड उठली. तोपर्यंत हा मामला अशा ‘नगण्य’ मानल्या जाणार्‍या ‘अप्रतिष्ठीतां’पुरता मर्यादित होता. पण या दोघांच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया बघून मग बहुतांश सेक्युलरांना जाग आली. त्यांचे पुरोगामीत्व अकस्मात कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागे झाले. कारण त्यांच्या पुरोगामीत्वाला हिंदूत्वाची झणझणित फ़ोडणी आवश्यक असते. मागली दोन दशके चालू असलेल्या मुंबई बॉम्बफ़ोट खटल्याच्या कालखंडात कधीही यापैकी एकानेही याकुब मेमन वा अन्य कुणाचे समर्थन केले नव्हते. याकुब भारतीय पोलिस यंत्रणेच्या तावडीत सापडला त्यालाही आता वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पण तेव्हाही कोणी त्याची ‘वकिली’ करायला पुढे आलेला नव्हता. कारण एकूणच भारतीयांच्या मते याकुब शेकडो निरपराधांच्या हत्याकांडातला एक प्रमुख आरोपी होता. सहाजिकच त्याच्या बचावाला जाण्यात कुठले पुरोगामीत्व असणार? कारण याकुब वा अन्य आरोपींवर गुन्हेगारी आरोप होते आणि फ़क्त हिंदूत्ववादीच नव्हे, सर्वच त्याच्या विरोधात बोलत होते. त्याच्यावरच खटला दिर्घकाळ चालला आणि वेळोवेळी त्याच याकुबने आपल्यावर अन्याय होत असल्याचा टाहो फ़ोडला होता. पण कुणा तथाकथित पुरोगाम्याने याकुबच्या टाहोला प्रतिसाद दिल्याचे कोणाला आठवते काय? न्यायालयातही त्याने थैमान घातले होते आणि न्यायाधीशासह कोणावरही बेताल आरोप केलेले होते. पण आजच्या सह्याजीरावांपैकी एकानेही याकुबच्या यातना-वेदनांची दखल घेऊन एक शब्द उच्चारला नव्हता. अगदी त्याला टाडा कोर्टात फ़ाशी झाली, तेव्हाही यातल्या कुणी साधे दु:ख व्यक्त करायला चार शब्द खर्ची घातले नव्हते. मग आजच अशा तमाम प्रतिष्ठीत मान्यवरांना याकुबचा पुळका कशाला यावा?

काहीतरी कारण असेल ना? खरेच त्यांना याकुबचा पुळका असता तर त्यांना असे निवेदन काढायला इतका आणखी आठवडाभर उशीर व्हायचे काही कारण नव्हते. ज्या दिवशी फ़ाशीची तारीख घोषित झाली, त्याच दिवशी ओवायसीच्या सुरात सुर मिसळून त्यांनीही याकुबवर अन्याय होत असल्याचा गळा काढायला हवा होता. पण त्यापैकी काही झाले नाही आणि सुप्रिम कोर्टात याकुबची अखेरची याचिका निकालात निघेपर्यंत यापैकी कोणी याकुबकडे ढुंकून बघायला तयार नव्हते. किंवा त्यांना तशी सवडही मिळू शकली नाही. ती याचिका फ़ेटाळली गेली तरीही हे तमाम मान्यवर गप्प व अनभिज्ञ होते. मात्र ओवायसी वा नंतर सलमान खानच्या वक्तव्यावर तथाकथित हिंदूत्ववाद्यांना चेव आला आणि पुरोगाम्यांची झोपमोड झाली. त्यांना अकस्मात जाग आली, की ज्याअर्थी हिंदूत्ववाद्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत, त्याअर्थी घडणारी घटना नक्की प्रतिगामी असली पाहिजे. पर्यायाने त्यांना हस्तक्षेप करणे भाग पडले. कारण आजकाल पुरोगामीत्वाचा अजेंडा प्रतिगामी ठरवत असतात. पुरोगाम्यांना जे कोणी प्रतिगामी वाटतात, त्यांनी एखादी कृती केली, मग त्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकणे, इतके पुरोगामीत्व शिल्लक राहिले आहे. जर हे प्रतिगामी गप्प बसले मग पुरोगामी लोकही शांत चित्ताने झोपा काढतात. इथेही काही भिन्न घडलेले नाही. याकुबला फ़ाशी ठोठावली जाऊन काही वर्षे उलटलेली आहेत. त्यावर अनेक अपिले झाली आणि अखेरीस त्यावर सुप्रिम कोर्टानेही शिक्कामोर्तब केलेले आहे. पण ती नुसती न्यायप्रक्रिया होती. त्यात कुठे हिंदुत्ववादी नव्हते की तथाकथित प्रतिगामीही नव्हते. मग त्यात पुरोगाम्यांचे काय काम? पुरोगाम्यांना याकुबकडे ढुंकून बघण्याची गरज तरी होती काय? तो कुढत मरत होता. टाहो फ़ोडत होता. त्याचे वकील प्रत्येक कोर्टाचे दार ठोठावत होते. पण कुणा पुरोगाम्याने त्याकडे वळून तरी बघितले काय?

सर्व मार्ग संपले आणि याकुबची फ़ाशी निश्चीत झाली. तेव्हा राज्य सरकारवर ते काम पुर्ण करायची जबाबदारी आली. सरकारने त्यासाठी तारीख नक्की करून सज्जता सुरू केली. तरीही पुरोगामी निवांत निद्रेत होते. मात्र ओवायसी व सलमान खान यांनी सर्व गडबड केली. त्यांच्या विधानांनी प्रतिगामी हिंदूत्ववादी चवताळले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यावर पुरोगामीत्वाला आव्हान उभे राहिले. यातली याकुबची फ़ाशी दुय्यम बाब आहे. त्याच्याशी एकाही पुरोगामी सह्याजीरावाला सोयरसुतक नाही. याकुब जगला काय आणि मेला काय? एकाही पुरोगाम्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यातून प्रतिगामी आनंदित होत असतील, तर दु:खाचा तमाशा मांडणे पुरोगामी लोकांचे कर्तव्य होत नाही काय? थोडक्यात सलमान वा ओवायसीच्या बकवास करण्यावर हिंदूत्ववादी गप्प बसले असते, तर यातला एकही सह्याजीराव याकुब वा त्याच्या फ़ाशीबद्दल अवाक्षर बोलला नसता. किंबहुना याकुब मेमन नावाचा कोणी होता वा फ़ाशी गेला, याचीही खबर त्यांना लागली नसती. सगळा मुर्खपणा त्या हिंदूत्ववाद्यांचा आहे. त्यांच्या उतावळेपणाने कुंभकर्णाची झोप काढणार्‍या पुरोगाम्यांची झोपमोड झाली. धावपळ सुरू झाली आणि मान्यवर लोकांची यादी बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात मग नेहमीचेच कलाकार सहभागी होत गेले. एक लांबलचक यादी राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. यातल्या कुणाला मुंबई स्फ़ोटात प्राण गमावणारीही माणसे होती आणि त्यांना कुठल्याही सुनावणीशिवाय ठार मारले गेले, याच्याशी कर्तव्य नाही. पण त्यासाठी त्यांना दोष द्यायचेही कारण नाही. कारण आता ज्या याकुबसाठी त्यांनी आक्रोशाचे नाटक चालविले आहे, त्याच्याही मरण्याशी यांना कर्तव्य नाही. त्यांना कर्तव्य आहे ते प्रतिगामी हिंदूत्ववाद्यांचा मुखभंग करण्याशी. त्याची एक संधी याकुबने त्यांना दिली, यापेक्षा त्यांना याही प्रकरणात किंचीत आस्था नाही.

इथे मग ‘बिचार्‍या’ याकुब मेमनची दया येते. कारण त्याची फ़ाशी वा त्याचे मरण हे त्याच्या पापासाठी असेलही. पण पुरोगामी लोकांनी त्याच्या मरणाचाही धंदा बनवला आहे. जीवानिशी जायचा आहे याकुब, पण पुरोगाम्यांनी आपल्या राजकीय अजेंडासाठी त्याच्या मरणातही संधी शोधली आहे. दाखवायला हे सर्व लोक याकुबला वाचवायला पुढे सरसावले असेच कोणालाही दिसते आहे. पण वास्तव तसे अजिबात नाही. याकुबचा गळफ़ास आपल्या राजकीय विरोधकांना चिमटे काढण्यासाठी वापरण्याचा हिडीस हेतू त्यातून साधला जात आहे. याकुबच्या गळ्यातला फ़ास आवळणाराही जितका कृर नसेल आणि शेकडो निरपराधांचे हकनाक जीव घेणारा याकुब जितका क्रुरकर्मा म्हणता येणार नाही; इतके हे राक्षसी क्रौर्य आहे. दुसर्‍याच्या मुडद्यावर आपले राजकीय हेतू साधून घेण्याची ही मानसिकता घातपात्यांपेक्षा भयंकर आहे. अन्यथा याच लोकांनी याकुबला फ़ाशी झाली, तेव्हा किंवा राष्ट्रपतींकडे त्याचा दयेचा अर्ज पडून होता, तेव्हा असे निवेदन काढले असते. याकुबला फ़ाशीपासून वाचवायची तीच खरी वेळ होती. पण त्या प्रत्येक वेळी यापैकी कोणीही काहीही केले नाही. याकुब नावाच्या माणसाविषयी कुठली माहितीही त्यांनी कधी घेतली नाही किंवा त्याच्या खटल्याचे कामकाज विचारले नाही. मात्र आज प्रतिगामी वा हिंदूत्ववाद्यांना डिवचण्याची संधी म्हणून हे लोक याकुबच्या गळ्यातल्या फ़ासाशी खेळायला सिद्ध झाले आहेत. दुसर्‍या कुणाच्या जीवन मरणातून आपल्या राजकीय संधी शोधणारे कसाब वा याकुबपेक्षा भयंकर नाहीत काय? कारण याकुब वा अफ़जल गुरू लोकांच्या मनात एक गुन्हेगार म्हणून बदनाम झालेला असतो. आणि त्यांच्यापेक्षा राक्षसी कृत्य करणारे असे सह्याजीराव मात्र समाजात उजळमाथ्याने वावरत व मिरवत असतात. याकुबवर गुन्हा दाखल करता येतो, खटला भरता येतो, आणि त्यापेक्षा भयंकर राक्षस असूनही अशा प्रतिष्ठीतांना कायदा काहीही करू शकत नाही.

Wednesday, July 15, 2015

याकुब मेमनच्या फ़ाशीच्या निमीत्ताने



अखेर २२ वर्षांनी मुंबई बॉम्बस्फ़ोट मालिकेतील एका महत्वाच्या आरोपीला फ़ाशी होणार आहे. म्हणजे आज तरी आपण छातीठोकपणे त्याची हमी देऊ शकत नाही. कारण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सहाजिकच गळफ़ास आवळून माणूस मेला याची खातरजमा, फ़ाशी झाली असे म्ह्णायची कोणाची या देशात बिशाद नाही. अर्थात महाराष्ट्र सरकारने तशी तारीख जाहिर केली आहे. पण म्हणून ती पाळली जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण अजून सुप्रिम कोर्टात याकुब मेमनची एक फ़ेरविचाराची याचिका पडून आहे. तिची सुनावणी कुठल्या दिशेने जाते, त्यानुसारच राज्य सरकारला फ़ाशीची अंमलबजावणी करता येऊ शकेल. हा खेळ कित्येक वर्षे चालू आहे आणि तो अफ़जल गुरू व कसाबच्याही बाबतीत झाला होता. दोन्ही वेळी अगदी तारखाही लपवून ठेवल्या गेल्या आणि या कानाचे त्या कानाला कळू देण्यात आलेले नव्हते. त्याचेही कारण आहे. जितक्या जिद्दीने अफ़जलची केस इथल्या मानवतावाद्यांनी जिव्हाळ्याने लढवली होती, तितका ओलावा कसाब किंवा याकुबच्या बाबतीत दाखवलेला नव्हता. पण त्यापैकी अफ़जल हा काश्मिरी होता आणि त्यावरून तिकडे काही प्रतिक्रीया उमटण्याचे भय सरकारला वाटत असावे. कसाबची गोष्ट वेगळी होती. त्याला कोणी वालीच नव्हता. ज्यांनी इथे पाठवले, त्यांना त्याची ब्याद नको होती. तरीही त्या दोन फ़ाशीचा गवगवा खुप झाला होता. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाठींबा मागायला प्रतिभाताई पाटील मातोश्रीवर गेल्या, तेव्हा बाळासाहेबांनी अफ़जलची थकलेली फ़ाशी उरकून घेण्याचा आग्रह धरला होता. पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रतिभाताई शब्द पुरा करू शकल्या नाहीत. मात्र प्रणबदांच्या तत्परतेने अफ़जलचा विषय निकालात निघाला होता. त्याच्या कुटुंबियांपेक्षा मानवाधिकाराचे आप्तेष्टच आक्रोश व मातम करत सुटले होते.

याकुबची कहाणी खरे तर शोकांतिका आहे. कारण तो अतिशय सुशिक्षित व सभ्य माणुस होता. धर्मभावनेच्या आहारी जाऊन स्मगलर भावाच्या नादी लागल्याने याकुब यात फ़सलेला होता. त्याला घातपातानंतर सुखरूप कराची पाकिस्तानातही नेण्यात आलेले होते. पण मुंबई व इथल्या वातावरणाशी जडलेले नाते त्याला तिथल्या पिंजर्‍यात राहू देईना आणि त्याला मुंबईचे डोहाळे लागले होते. त्याच्या परिणामी त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळला गेला आहे आणि त्यातले खरे सुत्रधार, त्याचाच भाऊ टायगर मेमन आणि दाऊद मात्र कराचीत मौज करीत आहेत. एकविस वर्षापुर्वी याकुबचा त्याच लोकांनी खरा घात केला. अधूनमधून दाऊद शरण येण्याच्या ज्या गप्पा चालतात, त्या खेळीतला याकुब एक मोहरा होता. दाऊदच्या अटी मान्य होतात किंवा नाही, त्याची चाचपणी करण्यासाठी ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला भारताच्या हवाली करण्यात आलेले होते. पण अशा गोष्टी अधिकृत नसतात. म्हणूनच ज्यांच्याशी दाऊदने बोलणी केली होती, त्यांनी अभय मिळण्याची कुठलीच हमी दिलेली नव्हती. पण शक्यता व्यक्त केली होती. ती शक्यता कितपत खरी आहे त्याचीन चाचपणी करण्यासाठी बळीचा बकरा दाऊदला हवा होता. मुंबईची ओढ लागलेल्या याकुब मेमनने ती ऑफ़र स्विकारली आणि तो नेपाळला येऊन भारतीय गुप्तचरांच्या हवाली झाला. मग त्याची पुरेशी चौकशी व छाननी केल्यानंतर दिल्ली रेल्वेस्थानकावर त्याच्या अटकेचे नाट्य रंगवण्यात आलेले होते. त्यावर विसंबून दुबई मार्गे काही मेमन कुटुंबिय भारतात दाखल झाले. मात्र कोर्टाने त्यापैकी कोणालाही कसलीच सवलत द्यायचे नाकारले आणि पुढला दाऊदला अभय देवून भारतात आणायचा प्लान फ़िसकटला. याकुबने त्यासाठी आपल्याच विरोधात वापरली जाऊ शकणारी माहिती दिली होती आणि आपल्याच हाताने गळ्यात फ़ास बांधून घेतला होता.

आता महाराष्ट्र सरकारने ज्या फ़ाशीची तारीख नक्की केली आहे, त्याची सुरूवात १९ जुलै १९९४ रोजी नेपाळमच्ये काठमांडू येथील विमानतळावर झालेली होती. तिथे पाकिस्तानातून आलेल्या विमानातून याकुब मेमन उतरला आणि भारतीय गुप्तचरांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याच सांगण्यावरून बाकीचे कुटुंबिय दुबई मार्गे भारतात आलेले होते आणि सर्वांनाच मग आरोपी करण्यात आलेले होते. त्यातल्या काहीजणांना कोर्टाने पुरावे तपासून मुक्तही केले. पण याकुब मात्र फ़सला. आपण निव्वळ भावाच्या बोलण्याला फ़सून त्यात सामील झालो असा त्याचा दावा होता. म्हणूनच आपल्याला शिक्षा झाली तरी फ़ाशी होणार नाही, अशी त्याला खात्री होती. मात्र टाडा कोर्टाने त्याचा दावा फ़ेटाळून लावला आणि त्याला दोषी ठरवून फ़ाशी दिले. इतकी वर्षे झाल्यानंतरही गुप्तचर विभाग व याकुब यांच्यात नेमके काय करारमदार झाले होते, त्याविषयी कमालीची गुप्तता दोन्ही बाजूंनी पाळलेली आहे. सरकारी पक्षाने टाडा कोर्टात त्याविषयी मौन पाळणे समजू शकते. कारण कोर्टातल्या मामल्याविषयी सरकार वा पोलिस कुठल्याही आरोपीशी सौदेबाजी करू शकत नाहीत. म्हणूनच याकुबला गुप्तचर विभागाने काही हमी दिलेली असली, तरी त्यला नुसता शब्द म्हणता येईल. आपण फ़सलो असे त्याला वाटले असते, तर त्याने उर्वरीत कुटुंबाला मायदेशी यायला सांगितले नसते, की त्यांच्या आणण्याची व्यवस्था भारतीय गुप्तचर विभागाकडून करून घेतली नसती. विषय कुठलाही असो, सख्खा भाऊ टायगर व दाऊदने यात याकुबचा बळी दिलेला आहे. कारण सौदा दाऊदचा होता आणि त्यात ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला धाडण्यात आलेले असणार. आजपर्यंत त्याच्या अटकेविषयी दिलेल्या माहितीतील तफ़ावत भरून काढण्याचे कष्ट याकुब व गुप्तचर विभाग अशा कुठल्याही बाजूने घेतलेले नाहीत हे नक्की.

आता सवाल इतकाच आहे की पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात असलेल्या फ़ेरविचाराच्या याचिकेचे काय होणार? २१ जुलै रोजी त्याची सुनावणी व्हायची आहे. त्यात पुढली तारीख मिळाली तरी याकुबला आणखी एक जीवदान मिळून जाईल. पण आहे तशीच याचिका फ़ेटाळली गेली, तर राज्य सरकारने जाहिर केलेल्या तारखेला पृथ्वीतलावर याकुबचा तो शेवटचा दिवस असेल. कारण मग फ़ाशी जाण्याला पर्याय शिल्लक उरत नाही. त्याच्या फ़ाशी जाण्याने ज्यांचे आयुष्य उध्वस्त झाले किंवा जे हकनाक मारले गेले, त्यांची कुठलीच भरपाई होऊ शकणार नाही. पण यानिमीत्ताने याकुब वा टायगर कशाला निर्माण होतात आणि त्यांच्यात असा सैतान कशामुळे संचारतो, त्याचा नव्याने विचार होईल, अशी अपेक्षाही बाळगता येत नाही. झालेल्या दंगलीने वा त्यातल्या हिंसाचाराची आग अशा लोकांच्या मनात भडकते, हा फ़सवा युक्तीवाद आहे. दंगलीने मने दुभंगतात आणि ती एकत्र सांधली जायला दिर्घकाळ लागतो. पण अशा अनुभवातून जाणार्‍यांच्या दुखावलेल्या मनाच्या होमकुंडात जे सतत अन्याय होत असल्याचे तेल ओतत रहातात, तेच मग सूडाची आग भडकवत असतात. त्यातून टायगर वा याकुबसारखे सैतान निर्माण होतात. जखमेवर मीठ चोळण्यातून वेदना कडव्या प्रतिकाराला व प्रतिहल्ल्याला चिथावणी देत असते. भारतातील मुस्लिमांना सातत्याने इथल्या खोट्या राजकीय सहनुभूतीदारांनी अशा सूडाच्या आगीत ढकललेले आहे. त्यातून मग अन्यथा सामान्य समंजस वाटणार्‍या धर्मश्रद्ध मुस्लिमात हिंसेचा अग्नी प्रज्वलीत होतो आणि त्यातून दंगली भडकतात. जिहादी दहशतवादाला खतपाणी घातले जात असते. म्हणून मग अफ़जल गुरू कायद्याने पुराव्यानिशी गुन्हेगार ठरला असला तरी त्याचे उदात्तीकरण अलिगड विद्यापिठातले मुस्लिम विद्यार्थी करू धजले. त्यातूनच मग याकुब जन्माला येतात.