Thursday, May 28, 2015

केवढी ही ‘बेइमानी’ मोदीजी?



गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारापासून तेव्हाचे उमेदवार आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रश्न सातत्याने विचारत राहिले आहेत. त्यांच्या सत्तेला एक वर्षपुर्ण झाल्यावर आजही तोच प्रश्न विचारत आहेत. पिछले साठ सालोमे कॉग्रेसने देशको क्या दिया? प्रथम प्रचाराच्या काळात आपल्या श्रोत्यांना मोदींनी असा प्रश्न विचारला तेव्हा तो ऐकायला बराही वाटायचा. पण आता सत्ता तुमच्या हाती जनतेने सोपवली आहे. तेव्हा मागल्या वर्षभरात तुम्ही देशाला काय दिले तेच सांगायला हवे. आधीच्या साठ वर्षाचा इतिहास उगाळत बसण्याची काय गरज आहे? पण मोदी अजून लोकसभा प्रचारातून बाहेर पडायच्या मुडमध्ये दिसत नाहीत. म्हणूनच वर्षपुर्तीच्या निमीत्ताने पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारायचा सपाटा लावला आहे. खरे तर त्याचे उत्तर कॉग्रेसजनांनी द्यायला हवे. कारण देशाला जर काही दिले असेल, तर ती कॉग्रेसची उपलब्धी मानली जाईल. पण तो निरूत्तर करणारा प्रश्न असल्यासारखे कॉग्रेसवाले गप्प होतात. नाहीतर मागल्या साठ वर्षात देशाची जी काही प्रगती झाली आहे, त्याची यादी वाचू लागतात. हा प्रश्न राजकीय असल्याने त्याचे उत्तरही राजकीय असायला हवे. पण मठ्ठ कॉग्रेसवाल्यांना आपली बाजूही मांडता येईनाशी झाली आहे. अन्यथा देशाला वा विरोधकांना आपणच दिलेली अप्रतिम भेट सांगायला काय हरकत आहे? साठ वर्षात या देशाला ज्या अनेक प्रगतीचे टप्पे ओलांडता आले, तसेच अनेक मागासलेल्या देशांनीही मुसंडी मारलेली आहे. ती नेत्रदिपक नसली तरी अपरिहार्य अशी प्रगती होती. म्हणूनच त्याचे सर्व श्रेय कॉग्रेसला घेता येणार नाही. पण त्याच त्या साठ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीमध्ये कॉग्रेस पक्षाने देशाला व विरोधकांना अपुर्व अशी एक भेट दिली, त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी. जे काम अनेक जुन्याजाणत्या पक्ष व नेत्यांना कधी करता आले नाही, ते काम कॉग्रेसने केले नाही काय? नरेंद्र मोदी ही कॉग्रेसची उपलब्धी नाही का?

१९४७ पासून भारताचा स्वातंत्र्य कालखंड बघितला, तर अनेक पक्ष उदयास आले व नेस्तनाबुतही झाले. त्या पक्षात अनेक दांडगे नेते पुढारी विचारवंत होते. पण त्यापैकी कोणाला कॉग्रेसला संपवण्य़ाचे उद्दीष्ट गाठता आले नाही. प्रत्येकाने कॉग्रेसला नामोहरम करायच्या गर्जना केल्या. पण कुठल्याही पक्षाला कॉग्रेसमुक्त भारत करण्याचा पल्ला गाठता आला नव्हता. समाजवादी, डावे, साम्यवादी, जनसंघ असे अनेक पक्ष आले व वाढले-खंगले. पण एकहाती कॉग्रेसला पराभूत करणारा नेता कुठल्याच पक्षाला निर्माण करता आला नाही. सतत मनमोहन सिंग यांना दुबळा पंतप्रधान म्हणून हिणवणारे लालकृष्ण अडवाणीही तितकी मजल मारण्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या पक्षाला तसा कोणी नेता निर्माण करता आला नाही. जनता दल परिवार वा पुर्वाश्रमीचे समाजवादी, डाव्यातले विविध पक्ष तशी मजल मारू शकणारा नेता उभा करू शकले नाहीत. जणू प्रत्येकजण आपापल्या परीने देशात कॉग्रेसची सत्ता अबाधित कशी राहिल, यासाठीच प्रयत्नशील होता. म्हणूनच सोनियांच्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे नाचणारा पंतप्रधान देशावर राज्य करू शकला, तरी अन्य कुठला पक्ष वा नेता त्यात बदल घडवू शकला नाही. मात्र सोनियांच्या कारकिर्दीत स्वत: कॉग्रेस पक्षाने ती जबाबदारी उचलली आणि देशातून कॉग्रेसला नामोहरम करणारा नेता उभा करायचा चंग बांधला. त्यातूनच नरेंद्र मोदी नावाचा नेता भाजपाला मिळू शकला. अखेरच्या क्षणापर्यंत मोदींना भाजपातूनच किती विरोध चालू होता, त्याची आठवण केली; तर त्याची खात्री पटेल. कॉग्रेसनेते तर भाजपाला आव्हानच देत नव्हते का? मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा म्हणून? आणि भाजपाचे श्रेष्ठी मात्र मोदींची उमेदवारी घोषित करायला बिचकत होते. एका राज्याच्या साध्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणले कोणी?

अडवाणी, सुषमा स्वराज, अरूण जेटली असे अनेक भाजपाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत राजकारण खेळत होते आणि त्यांच्या संसदीय मंडळातही मोदींचा समावेश नव्हता. अन्य पक्षातही कोणी देशव्यापी चेहरा नव्हता. पण दहा बारा वर्षे सोनिया गांधी व त्यांच्या पाठीराख्यानी घेतलेल्या अथक परिश्रमांनी गुजरातच्या दंगलीतून नरेंद्र मोदी नावाच्या एका सामान्य नेत्याला राष्ट्रीय क्षितीजावर आणले गेले. त्यामागे भले भाजपाला हिंदूत्ववादी व दंगलखोर ठरवण्याचा हेतू असेल. पण त्याकरिता सलग बारा वर्षे घेतली गेलेली मेहनत भाजपाची अजिबात नव्हती. ते काम कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींपासून सामान्य तळागाळातील कॉग्रेसवाला इमानेइतबारे पार पाडत होता ना? त्यांचे विविध क्षेत्रातील पाठीराखे व समर्थक मोदींवरून किती काहुर माजवत होते. लोकसभा उमेदवार होण्यासाठी दंगलखोर मुख्यमंत्री यापेक्षा मोदींच्या खात्यात अन्य कुठली ‘गुणवत्ता’ होती? आणि ती गुणवत्ता वा प्रमाणपत्र त्यांना भाजपा वा अन्य कुणा समर्थकाने दिलेले नव्हते. तर सतत गाजावाजा करून कॉग्रेसनेच मोदी नावाचा एक राष्ट्रीय नेता जन्माला घातला. जो योगायोगाने भाजपाचा होता. जो अन्य कुठल्याही बिगर कॉग्रेस पक्षाच्या नेत्यापेक्षा कॉग्रेसला नामोहरम करायची जिद्द बाळगून सर्वस्व पणाला लावणारा पर्याय होता. त्याला राजकीय आव्हान म्हणून उभे करण्याची किमया भाजपाची नव्हती. तर सोनिया गांधींचे अथक प्रयास त्यात होते. म्हणजेच पर्यायाने मोदी ह्यांना राष्ट्रीय नेता म्हणून उभे करण्याची किमया कॉग्रेसची आहे ना? मग मोदींच्या यशाचे श्रेय कोणीही घ्यावे. पण त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून उभे करण्याचे श्रेय निर्विवादपणे सोनियाप्रणित कॉग्रेसचे आहे. असे असताना मोदी पुन्हा सातत्याने कॉग्रेसने देशाला काय दिले असा सवाल करतात, ही ‘बेईमानी’ नाही काय? कोणी कॉग्रेसवाला हे सत्य कशाला सांगत नाही?

सगळा युक्तीवाद कोणालाही चमत्कारिक वाटेल. पण बारकाईने तपासून बघा. सहा दशकात देशात शेकडो दंगली झाल्या. लाखो लोक दंगलीचे बळी झाले. पण त्यासाठी कुठल्याही मुख्यमंत्र्याला मोदींप्रमाणे लक्ष्य बनवण्यात आले नाही, की त्याचा गाजावाजा दिर्घकाळ देशभर चालू राहिला नाही. मोदी हा त्यातला एकमेव अपवाद आहे. मात्र त्याचे श्रेय पुर्णतया कॉग्रेसचे आहे. आपल्या अशा प्रयत्नातून आपण विरोधातला एक देशव्यापी नेता जन्माला घालतो आहोत, याचे भान सोनिया वा कॉग्रेसला उरले नव्हते. जितका काळ मोदी विरोधातला हा उद्योग चालू राहिला, तितकी मोदींची ‘किर्ती’ देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. एका राज्याचा मुख्यमंत्री देशभर चर्चेचा विषय झाला आणि भाजपाकडे नसलेला नवा राष्ट्रीय नेता त्या पक्षाला मिळाला. आजवर कुठल्याही बिगरकॉग्रेस पक्षाकडे देशव्यापी आव्हान ठरू शकेल, असा नेता नव्हता. म्हणून कॉग्रेसची सत्ता अबाधित होती आणि नाकर्ते नेतेही सत्तेत मजा मारू शकत होते. त्या सर्वावर मात करू शकणारा पर्याय नव्हता. तो पर्याय शेवटी खुद्द सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या कॉग्रेसनेच मोदींच्या रुपाने निर्माण केला. गुजरातमध्ये जाऊन मोदींना इतके डिवचले गेले, की आपल्या विरोधकांना शिंगावर घ्यायला त्या माणसाला गुजरात बाहेर पडण्याची सक्तीच सोनियांनी केली. मोदींनी जरा आपल्याच इतिहासात डोकावून बघावे. पंधरा वर्षापुर्वी पक्षाचा सामान्य पदाधिकारी म्हणून काम करणार्‍या या माणसाने कधी पंतप्रधानकीचे स्वप्न तरी बघितले होते काय? पण त्याला त्यासाठी डिवचून आणि सज्ज करून कॉग्रेसचा नि:पात करायच्या भूमिकेत आणून सोनियानीच उभे केले नाही काय? स्वातंत्र्य मिळाले आता कॉग्रेस बरखास्त करा असे महात्माजी म्हणाले होते, पण ते काम करणारा कोणी जन्मालाच येत नव्हता. साठ वर्षात कॉग्रेसने सोनियांच्या नेतृत्वाखाली तीच भेट मोदींच्या रुपाने देशाला दिली. आणि तरी मोदी विचारतात कॉग्रेसने देशाला काय दिले? ज्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून उचलून तुम्हाला देशात कॉग्रेसला पराभूत करणारा सिकंदर बनवले. ज्यांनी राहुलच्या हाती शतायुषी पक्षाची सुत्रे सोपवून कॉग्रेसला पराभूत करण्यातले तुमचे काम सोपे करून दिले. त्यांनाच विचारता साठ वर्षात देशाला काय दिले? किती ही ‘बेइमानी’ मोदीजी?

यह तो बडी नाइन्साफ़ी है मित्रों.

No comments:

Post a Comment