Friday, July 5, 2019

राहुलचे इतिहासाचे गुरूजी

‘स्वतंत्र बाण्याच्या अध्यक्षाबाबत काँग्रेसचा इतिहास अभिमान बाळगावा असा नाही. तो तपासून पाहण्यासाठी निजलिंगप्पा वगरेंपर्यंत मागे जाण्याची गरज नाही. राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्रींच्या काळात काय घडले ते पाहिले तरी पुरे. सोनियांच्या इच्छेविरोधात पंतप्रधानपदी नरसिंह राव असताना पक्षाध्यक्षपद सांभाळणारे सीताराम केसरी यांना किती तारेवरची कसरत करावी लागली, हे सर्वश्रुत आहे.’ (लोकसत्ता संपादकीय शुक्रवार ५ जुलै २०१९)

राहुल गांधी आज त्रागा कशाला करीत आहेत, असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरना पडला आहे. म्हणून त्यांनी ‘भूतपुर्व’ कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अग्रलेखातून इतिहास आठवण्याचा सल्ला दिला आहे. पण पर्यायाने त्यांनी राहुल गांधींसह त्यांच्या इतिहास गुरूजींचाच इतिहास किती दुबळा आहे, त्याचीच साक्ष दिली आहे. राहुलना कॉग्रेस अध्यक्षांचा इतिहास चाळून बघण्याचा सल्ला देताना कुबेरांनी नरसिंहरावांच्या कारकिर्दीत सीताराम केसरी कॉग्रेस अध्यक्ष असल्याचा नवा इतिहास शोधून काढला आहे. तो राहुलना समजावताना इतिहासात खुप मागे म्हणजे निजलिंगप्पा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नसल्याचाही इशारा दिला आहे. पण अलिकडला इतिहास सांगताना राव आणि केसरी यापैकी खरेच कोण कॉग्रेस अध्यक्ष होता, त्याचा इतिहास गुरूजींनाही तपासण्याची गरज वाटलेली नाही. नरसिंहराव सोनियांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान असले तरी ते मुळातच कॉग्रेस अध्यक्ष होते. म्हणून त्यावेळी पंतप्रधान होऊ शकले हे कुबेर गुरुजींच्या गावीही नाही. कदाचित राव पंतप्रधान असताना कुबेरांचा जन्म झालेला नसावा, किंवा कुणा इकॉनॉमिस्ट, स्टेट्समन वगैरे नियतकालिकांनी त्या कालखंडावर काही लिखाण प्रसिद्ध केलेले नसावे. अन्यथा कुबेरांच्या इतिहासात इतकी ढोबळ चुक झाली नसती. किंबहूना नरसिंहराव अध्यक्ष कशामुळे झाले, किंवा भंगारातून बाहेर पडून पंतप्रधान कशामुळे झाले, त्याचाही थांग कुबेरगुरूजींना नसावा. कारण कुबेर हे राहुल युगातले असून, त्यां युगातली कॉग्रेस बिना अध्यक्षाचीही चालणारी आहे्. तशीच पुर्वीही असावी असे कुबेरांचे गृहीत असावे. अन्यथा त्यांनी राहुलना मातोश्रीचा इतिहास सांगताना पिताश्रींच्या कारकिर्दीतले संदर्भ कशाला चुकले असते? आज ज्या स्थितीत कॉग्रेस आहे, तशीच काहीशी स्थिती उदभवली म्हणून नरसिंहराव कॉग्रेस अध्यक्ष झालेले होते.

१९९१ सालात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका चालल्या असताना व अर्धे मतदान संपून गेलेले असताना, श्रीपेरांबुदूर या तामिळनाडूच्या गावात राजीव गांधी प्रचाराला गेले होते. तिथे त्यांचे घातपाती निधन झालेले होते. अगदी जवळून बॉम्बस्फ़ोट घडवून त्यांना मारले गेले आणि तेव्हा राजीवच कॉग्रेसचे अध्यक्ष होते. अकस्मात त्यांची अशी हत्या झाल्यावर पक्षाचे नेतृत्व कोणी करावे, असा प्रश्न उदभवला आणि पक्षाध्यक्षपद मोकळे ठेवायचे नाही, म्हणून अडगळीत पडलेले नरसिंहराव सर्वात वयोवृद्ध नेता म्हणून हंगामी अध्यक्ष नेमले गेले. पंधरा दिवस लांबल्या गेलेल्या निवडणूका पुर्ण झाल्या, तेव्हा कॉग्रेस सर्वात मोठा तरी अल्पमताचा पक्ष होता आणि त्यालाच सरकार बनवण्याचे आमंत्रण मिळाले. दुसर्‍या क्रमांकाचा भाजपा अन्य कुणाच्या मदतीने सरकार स्थापण्याची शक्यता नसल्याने राव यांचे अल्पमताचे सरकार स्थापन झाले व पुर्ण मुदत चाललेही. अशा सर्व काळात नरसिंहरावच पंतप्रधान व कॉग्रेस अध्यक्ष होते. त्याच्या आधी व नंतरही सीताराम केसरी कॉग्रेसचे खजिनदार होते. दिर्घकाळ खजिनदार राहिलेला नेता अशीच त्यांची ख्याती होती. राव यांच्या सरकारचा १९९६ सालात दारूण पराभव झाला, तेव्हाही रावच कॉग्रेसचे अध्यक्ष होते. सोनियांना आवडणारे असो किंवा नसो, रावच त्या पदावर कायम होते. किंबहूना राव यांच्यामुळेच तेरा दिवसांसाठी वाजपेयी प्रथमच पंतप्रधान होऊ शकले. कारण भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला तरी त्याला पाठींबा द्यातला कुठलाही पुरोगामी विरोधी पक्ष उभा राहिला नाही. डाव्यांसह विविध पुरोगामी पक्षांनी नरसिंहरावांनावर भाजपाला सत्तेत बसवल्याचा आरोप केला होता. वेळीच राव यांनी कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा विरोधी पुरोगामी आघाडीला दिला असता, तर वाजपेयींना पंतप्रधानपद मिळाले नसते, असा खुप गदारोळ झाला. तेव्हाही केसरी नव्हेतर रावच पक्षाध्यक्ष होते.

पुढे तेरा दिवसात वाजपेयी सरकार कोसळले आणि पुरोगामी व डाव्यांच्या संगनमताने तिसर्‍या आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या आघाडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री देवेगौडांना नेता म्हणून निवडले आणि त्या सरकारला कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा देणारे कॉग्रेसचे अध्यक्ष नरसिंहरावच होते. पण त्यानंतर जो जैन आयोगाचा अहवाल आला आणि फ़ुटला. त्यात राव यांच्यावर बालंट आलेले होते आणि त्यांना पक्षाध्यक्ष सोडण्यासाठी दबाव आणला गेला. त्यावेळी नवे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनाच नेमले जाईल, अशी अपेक्षा होती. पण पवार स्वयंभू वृत्तीचे नेता असल्याने आपल्या आवाक्यात रहाणार नाहीत, म्हणून राव यांनी आपल्याशी एकनिष्ठ राहू शकेल अशा एका दुबळ्या नेत्याला अध्यक्षपदी बसवले. त्याचे नाव सीताराम केसरी होते. केसरी यांनीही आपल्या निष्ठा लपवल्या नव्हत्या. आपण राव यांचे निष्ठावान दास हनुमान असल्याची कबुली त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतानाच दिलेली होती. मात्र ती फ़क्त बोलाची कढी होती. कारण लौकरच केसरींनी राव यांना कार्यकारिणीतूनही बाहेर काढले होते. त्यापुर्वी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनीही असाच दोन भिन्न बिगर कॉग्रेसी सरकारांना बाहेरून पाठींबा दिला, पण सत्तेत टिकू दिलेले नव्हते. पक्षाचे अध्यक्षपद हाती आल्यानंतर लेचेपेचे केसरीही सिंहासारखे आवेशात वागू व बोलू लागले होते. एका दुपारी त्यांना लहर आली आणि त्यांनी राष्ट्रपती भवन गाठले. देवेगौडा सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला. त्यामुळे पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यांनी तो निर्णय कार्यकारिणीलाही अंधारात ठेवून घेतलेला होता. ज्येष्ठ नेता असूनही शरद पवारांना ही बातमी पुण्यात रेडीओवरून समजलेली होती. केसरी इतके स्वयंभू अध्यक्ष होते आणि नंतर पक्षाच्या महासमिती अधिवेशनातही त्यांच्याच अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. यातल्या इतिहासापेक्षाही आशय कुबेरगुरूजींना कधी उमजला आहे काय?

इंदिराजी, राजीव, सोनिया किंवा राहुल यांची कथा सोडून द्या. ते चौघेतरी थेट गांधी होते आणि एका राजघराण्याचे वारसदार होते. त्यांच्या समोर ताठ मानेने उभे रहाण्याची हिंमत कॉग्रेसजन गमावून बसले असतील, तरी समजू शकते. पण नरसिंहराव गांधी कुटूंबातले नव्हते आणि तरीही ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनाही चार शब्द् ऐकवण्याची हिंमत कुणा कॉग्रेसवाल्यापाशी उरलेली नव्हती. राव तरी काहीसे बुद्धीमान कर्तबगार होते. मोठी पदे भूषवलेले होते. पण सीताराम केसरींचे कर्तृत्व काय? एक गलितगात्र पण महत्वाकांक्षी म्हातारा, यापेक्षा त्यांचे अधिक नेमके वर्णन करता येणार नाही. अशा पक्षाध्यक्षासमोर ताठ कण्याने उभे रहायची वा त्याला आव्हान देण्याची हिंमत शरद पवार यांच्यासारख्या धुर्त व मुरब्बी कॉग्रेसजनालाही हिंमत करता आलेली नव्हती. त्यापेक्षा राहुल वा सोनिया खुपच अधिकारी व्यक्ती होत्या आणि आहेत. त्यांच्यासमोर कॉग्रेसचा कोणीही ज्येष्ठ नेता आपल्या पायावर उभे राहून बोलतो किंवा गुडघे टेकल्याशिवाय बातचित करतो, हीच मोठी धाडसाची गोष्ट नाही काय? १९७० च्या जमान्यात इंदिराजींनी कॉग्रेसवाला म्हणजे आपले पाय किंवा बुद्धी नसलेला ठोब्या; अशी पक्षाची अवस्था करून टाकलेली आहे. त्या ठोब्यांमध्ये काही आशय शोधणे किंवा त्यांच्या इतिहासाचे धडे कोणाला शिकवायला जाणे; हा अतिशहाणपणा झाला ना? किंबहूना पक्षातले काही मुठभर जयराम रमेश वा तत्सम लोक उरलेत, त्यांचे चार शब्द ऐकण्यापेक्षा राहुलनी मागल्या चारपाच वर्षात विविध क्षेत्रातले कुबेर गोळा केले; तिथेच त्यांच्या र्‍हासाची सुरूवात झालेली होती. तसे नसते तर कुबेरांनी राहुलनाच त्यांच्या पक्षाचा इतिहास शिकवण्याचा आगावूपणा केला नसता. राहुल यांची अशीच कुबेरी श्रीमंती त्यांना इतिहासजमा करायला पुरेशी आहे. कुमार केतकर, सुधींद्र कुलकर्णी व कुबेर त्यालाच आपल्या परीने हातभार लावीत आहेत, त्यांना शुभेच्छा!

14 comments:

  1. उबेर ईटस आणी कुबेर शिट्स

    ReplyDelete
  2. असले गुरुजी असल्यामुळेच काँग्रेसची हि अवस्था झालीय. आझादीच्या घोषणा देणाऱ्याच्या मागे जाणे,देशद्रोहाचा कायदा संपविणे,नक्सालीना पाठिंबा देणे हीच कामे राहुलना गुरुजी शिकवत असतात .

    ReplyDelete
  3. भाऊ

    कुबेरांचा इतिहास कच्चा आहे नव्हे नव्हे कुबेरच कच्चे आहेत . जाऊद्या तुम्ही त्यांच्यावर काही लिहुच नका.तुमचा वेळ वाया जाणार उगाचच.

    ReplyDelete
  4. घेतील मागे अग्रलेख....
    नका काळजी करु...
    सवय आहे त्यांना...😂😂

    ReplyDelete
  5. Bhau ketkar,kuber va kulkarni yaani patrakaritechi aaplakade shikavani lavavi.tumchyakde marmabhedak drushti aahe.sunder lekh.

    ReplyDelete
  6. Waa, khup chaan, best, very good, you are doing very good job sir. This fellow is just a pet of that family. Don't know why they are considered as intellectuals. 😃

    ReplyDelete
  7. आतासुद्धा जयराम रमेश यांसारख्या सुबुद्ध व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष बनवण्याऐवजीतत्यय व गांधी परिवाराला एकनिष्ठ राहण्याची खात्री असलेल्या गुलामाचा शोध चालू आहे.

    ReplyDelete
  8. Bhau kumar ketkar, kuber he gandhi pariwarache chatugar aahet, aani lutians gang che member aahet, yani dolyawar patti bandhli asun yana modi dweshane pichadle ahhe he asech karudya bjp la phayda ch hoil mazya yana khup khup shubhechchha

    ReplyDelete
  9. हे लोक केवढे शहाणे समजतात स्वतःला.....त्यांच्या फेकूगीरीचा मस्त पोलखोल

    ReplyDelete
  10. *कुबेराचे दारिद्र्य आणि बौद्धिक लोक'सट्टा'*

    महाराष्ट्र देशाचे स्वघोषित बुद्धिमान, पुरोगामी विचारमंचाचे अधिपती सर गिरीश कुबेर ह्यांनी केलेले इतिहासाचे पुनर्लेखन. नरसिंह राव हे 1991 ते 1996 पर्यंत पंतप्रधान तसेच काँग्रेस अध्यक्ष होते असा गैरसमज गेली अनेक वर्षे या देशाच्या मनात होता. पण स्वर्गीय प्रज्ञा लाभलेल्या या 'गिरी'शाने या तमातून सगळ्या भारतवर्षाला जागविले. सीताराम केसरी या महामानवाला काँग्रेसचे अध्यक्षपद आधीच मिळाले होते हे सत्य अनेक वर्षांपासून दडून होते, ते दुसऱ्या महामानवाने उजेडात आणले. त्याने समस्त भारतखंडास मंत्रमुग्ध करून सोडले आहे. युवराजाला सल्ला देता देता या कुबेराने सगळी बौद्धीक श्रीमंती उधळून टाकली. आपल्यासारख्या पामरांना असा ज्ञानरस पाजला की सगळे इतिहासतज्ञ आणि राजकीय पंडीत गार पडले. अखिल महाराष्ट्र आज धन्य जाहला, की 'लोक' सट्टा खूप जोरात खेळला गेला आणि या कुबेराच्या वैचारिक संपत्तीने महाराष्ट्र दरिद्री झाला. हरे राम

    भाऊ तोरसेकरांसारखे काही लोक याबद्दल त्रागा करून लिहीत आहे (http://jagatapahara.blogspot.com/2019/07/blog-post_5.html?m=1). सर्वशक्तिमान कुबेराची चूक लक्षात आणून द्यायचा वेडेपणा ही लोक करीत आहेत. महाविचारी युवराजांना सल्ला देण्याचा धाडसी प्रकार करणाऱ्या कुबेराला खरं तर शतश नमनच करायला हवे.

    मंदार नाशिककर

    ReplyDelete

  11. A good blog always comes-up with new and exciting information and while reading I have feel that this blog is really have all those quality that qualify a blog to be a one.
    I wanted to leave a little comment to support you and wish you a good continuation. Wishing you the best of luck for all your blogging efforts
    sattaking
    sattaking

    ReplyDelete