Wednesday, October 30, 2019

एक वेगळे समिकरण

Image result for uddhav thackeray pawar

सत्तेच्या किल्ल्या किंवा हुकूमाचा पत्ता तुमच्या हाती आहे म्हणून सगळा डाव तुमच्याच हाती नसतो. तर ज्या किल्ल्या किंवा हुकूमाचा पत्ता हाती आलेला आहे, तो धुर्तपणे वा खुबीने वापरण्याची चतुराई वा धाडसही अंगी असावे लागते. विधानसभेचे जे निकाल समोर आलेत, त्यातली आमदारसंख्या बघता हुकूमाचा पत्ता शिवसेनेच्या हाती आलाय. हे कोणी नाकारू शकत नाही. पण नुसता पत्ता हाती आहे म्हणून मिरवून चालत नाही. तो योग्यवेळी व योग्य संधी निर्माण करून शिवसेनेला वापरता आला पाहिजे. त्यासाठी वेगळी समिकरणे मांडण्याची व त्यातून आपल्याला हवे ते साधण्याची कुवतही असायला हवी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाशी ती कुवत आहे काय? २०१४ च्या विधानसभा निकालात राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचा धुव्वा उडालेला होता. पवारांपाशी तर अवघे ४१ आमदार निवडून आलेले होते. पण त्या उध्वस्त अवस्थेत जो किरकोळ पत्ता हाती लागला होता, तो त्यांनी अशा खुबीने खेळला, की त्याचे दुष्परिणाम आजही सेना भाजपाला भोवत आहेत. आज तसा पत्ता उद्धव यांच्या हाती आहे. ते ज्या बाजूला झुकतील, तिथे बहूमत म्हणजे सत्ता आहे. दोन्ही कॉग्रेस मिळून ९८ आमदार आहेत आणि भाजपाकडे १०५ आमदार आहेत. म्हणजे जिकडे सेना झुकेल, त्याचे सरकार होऊ शकते. पवारांनी १२२ आमदारांच्या भाजपाला बाहेरून पाठींबा घोषित करून शिवसेनेच्या पाठींब्याची गरज नसल्याचे चित्र निर्माण केले आणि दोन्ही मित्र पक्षातच लावून दिलेली होती. अर्थात भाजपाला हिणवताना अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार काय? असा सवाल पवार त्यावेळी सलग चार महिने मतदाराला करीत होते. पण प्रत्यक्ष निकाल लागले, तेव्हा त्यांनी त्याच चड्डीवाल्यांना सत्ता देऊ केलेली होती. त्याला धाडस किंवा चतुराई म्हणतात. कारण हिंदूत्ववादी भाजपाला पाठींबा देण्यातून आपल्या पुरोगामी प्रतिमेला मोठा धक्का बसेल, ही शक्यता पवारांनाही कळत होती. पण तशी वेळ येणार नाही. पण नुसती हुलकावणी दिल्याने भाजपा शेफ़ारून जाईल आणि शिवसेनेशी त्यांचे कायमचे बिनसून जाईल, याची पवारांना खात्री होती. त्यांनी ४१ आमदारांचा दुबळा पत्ता फ़ेकून दोन्ही प्रतिपक्षांना एकाचवेळी गारद करून टाकले. शिवसेना असे काही आज करू शकते काय?

सत्तेचे राजकारण खेळताना हातचे राखून खेळण्याला पर्याय नसतो. पण सगळेच हातचे राखून सत्तेच्या स्पर्धेत उतरता येत नाही. तिथे काहीप्रसंगी जुगार खेळण्याची हिंमत करावीच लागले. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात तरी तशी भाषा अनेकदा केली. ‘सामना’तून वल्गना खुप केल्या. पण प्रत्यक्ष ‘सामना’ करायची वेळ आल्यावर सेनेने प्रत्येकवेळी माघार घेतली. म्हणून भाजपाला सेनेची कधीच पर्वा करण्याची गरज भासलेली नाही. आजही इतक्या टोकाला परिस्थिती गेली असतानाही भाजपा बिनदिक्कत आपल्या नेत्याची निवड करून मोकळा झालेला आहे. सत्तास्थापनेसाठी सेनेकडे कुठला निरोप पाठवण्याचीही भाजपाला गरज वाटलेली नाही. सेनेची स्थिती गरजते वो बरसते नही, अशी असल्यानेच भाजपाला इतकी हिंमत आलेली आहे. शिवाय आपल्या हाती कुठला पत्ता आहे आणि तो कुठे चतुराईने वापरावा; ह्याची बुद्धी ‘सामना’तून येऊ शकत नसते. वल्गना करून काही साधत नसते. तिथे धाडसाची व मुरब्बी खेळीची गरज असते. भाजपाला धडा तर शिकवायचा आहे, पण दोन्ही कॉग्रेस सेनेला सत्ता स्थापनेसाठी मदत करू शकत नाहीत. ही व्यवहारी वास्तविकता आहे. पण शिवसेना तर दोन्ही कॉग्रेसला कधी अस्पृष्य मानुन राहिलेली नाही ना? अनेकदा युतीत असतानाही शिवसेनेने भाजपाला झुगारून कॉग्रेसला साथ दिलेली आहे. कॉग्रेसने सेनेची मदत घेतलेली आहे. प्रतिभाताई पाटिल वा प्रणब मुखर्जी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन गेले होतेच ना? मग त्यांना पाठींबा देताना साहेब कुठे डगमगले होते? कॉग्रेसलाही शिवसेनेचा पाठींबा घेताना कुठली अस्पृष्यता पाळण्याची गरज वाटलेली नव्हती. तोच फ़ॉर्म्युला आजही लागू होऊ शकतो ना? दोन्ही कॉग्रेस पर्यायी सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींबा देऊ शकणार नाहीत, हे जगजाहिर आहे. अगदी बाहेरून पाठींबा देणे त्यांना अशक्य आहे. राजकीय सक्ती आहे. पण त्यांना शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी पाठींबा देऊ केला, तर ते नाकारण्याची बिलकुल गरज नाही. ९८ आणि ५६ मिळून संख्या १५४ होते आणि दोन्ही कॉग्रेसचे सरकार स्थापन होऊन भाजपाला निमूट विरोधी पक्षात बसवता येते ना?

अर्थात हा नुसत्या अंकगणिताचा विषय नाही. भलत्यालाच सत्तेचा घास देऊन शिवसेनेला काय मिळणार आहे? भाजपाला धडा शिकवला जाऊ शकेल. पण सेनेचा लाभ कुठला? नुसता धडा शिकवण्यासाठी सेनेने इतके टोकाचे पाऊल उचलावे काय? हे आता प्रत्येक पक्षाला आपापले भवितव्य व ध्येय निश्चीत करूनच ठरवावे लागत असते. अंतिम निर्णय हा प्राधान्यानुसार होत असतो. सर्वात आधी काय साध्य करायचे आहे? ते साध्य करताना आपले मोठे नुकसान होणार नाही ना? नुकसान किमान आणि उद्दीष्ट मोठे असेल्, असा जुगार खेळावा लागत असतो. त्यामुळे भाजपाला धडा शिकवायचा असेल आणि त्यालाच प्राधान्य असेल तर? दोन्ही कॉग्रेसनी सरकार स्थापन करावे आणि आपण बाहेरून त्याला पाठींबा देतो, अशी भूमिका शिवसेनेला घेता येईल. परिणामी ‘सत्तेची मस्ती चढलेल्या’ मित्र भाजपाला धडा शिकवता येईल. पण सेनेच्या पदरात त्यामुळे काय पडणार? आज सेना मुख्यमंत्रीपद मागते आहे, अर्धी सत्ता हवी म्हणून अडून बसलेली आहे. बाहेरच्या पाठींब्याने त्यापैकी काहीच मिळणार नाही. मग हा कसला जुगार? हे कसले समिकरण? असेही चटकन मनात येणारच. तर या समिकरणातून दोन्ही कॉग्रेसचे सरकार सेनेच्या पाठींब्यावर स्थापन झाले, तरी त्याचे भवितव्य शिवसेना पक्षप्रमुखांच्या मर्जीवरच अवलंबून असेल. जितका काळ उद्धव ठाकरेंची मर्जी असेल, तितकेच अशा आघाडी सरकारचे आयुष्य असेल. ज्याक्षणी सेना पाठींबा काढून घेईल, त्याक्षणी असे दोन्ही कॉग्रेसचे सरकार कोसळलेले असेल. शिवाय जोपर्यंत असे सरकार सत्तेत असेल, त्याचा रिमोट कंट्रोल आपोआप मातोश्रीवर असेल. त्यातून मुख्यमंत्र्याला सुटकाही नसेल. त्यातून एका बाजूला भाजपाला धडा शिकवला जातोच, पण दुसरीकडे कसलीही जबाबदारी न घेताही सरकारवर उद्धव ठाकरे आपली मर्जी लादू शकतात. त्याचवेळी भाजपाला विरोधात बसायला भाग पाडून शिवसेना त्या मित्र पक्षाला खिजवूही शकते. गाजराची पुंगी, जोवर वाजली तोवर वाजवायची आणि नको असेल तर मोडून खाण्याची सुविधाही कायम उरते. कारण सत्तेला बाहेरून पाठींबा दिला वा सहभागी होऊन दिला, तरी कुठल्याही क्षणी त्यातून बाहेर पडण्याची मोकळीक सेनेला कायम रहाते.

सवाल सत्तेबाहेर बसून सत्ता नियंत्रित करण्याचा आहे. त्यामुळे मंत्री व्हायला उतावळे झालेल्या आपल्या सहकारी आमदार नेत्यांना उद्धवना आवर घालावा लागेल. ते कितपत शक्य आहे? सत्तेची सुत्रे सेनेच्या किंवा मातोश्रीच्या हाती नक्की येतील. पण कोणाही शिवसैनिकाला प्रत्यक्ष सत्तेच्या कुठल्याही गादीवर बसता येणार नाही. गणितच असे आहे, की भाजपा त्याला शह देऊ शकत नाही. शिवाय दोन्ही कॉग्रेस कितीही आगावूपणा करीत असल्या, तरी त्यांना सेनेच्या मर्जीवर पाऊल टाकावे लागेल. अर्थात त्यांनी अशी ऑफ़र सेनेकडून आल्यावर स्विकारली पाहिजे. सेनेने तशी ऑफ़र दिली पाहिजे. सेना पक्षप्रमुखांना आपले सहकारी व आमदारांना त्यासाठी संयम राखण्यास भाग पाडता आले पाहिजे. हे शक्य झाले तर सत्तेसाठी उतावळा असलेल्या भाजपाची मिजास कमी करता येईल आणि कदाचित मुख्यमंत्रीपद सेनेला देण्यापर्यंतही नमवता येईल. जेव्हा तितके गुडघे टेकायला भाजपा राजी होईल, तेव्हा दोन्ही कॉग्रेसचे बाहेरून पाठींबा दिलेले सरकार कोसळून आपल्या मुख्यमंत्र्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मोकळीक उद्धवरावांपाशी कायम रहाते. एक पत्र राज्यपालांना पाठवले की विषय संपला. हिंदीत म्हणतात ना? चीत भी मेरा पट भी मेरा! अर्थात हा हिंमतीचा व संयमाचा खेळ आहे. त्यासाठी तितके धाडस करता आले पाहिजे. एका बाजूला मिजासखोर मित्राला धडा शिकवता येऊ शकतो आणि दुसर्‍या बाजूला जुन्या जाणत्या कॉग्रेस आघाडीलाही आपल्या बोटावर खेळवता येऊ शकते. शिवाय गमावण्यासारखे त्यात काहीच नाही. मुद्दा आहे तो पवारांसारख्या नेमक्या वेळी आपले पत्ते खेळण्याचा! सगळी बाजी आपल्या हाती आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा. शिवसेना वा उद्धव ठाकरे यांच्यापाशी ती इच्छाशक्ती आहे काय? त्यांना शिवसेना राजकारणातून चालवायची आहे, की ‘सामना’तून नुसत्याच वल्गना करायच्या आहेत? समोर भाजपासारखा मुरब्बी मित्रपक्ष आहे आणि आणि दुसरीकडे पाताळयंत्री पवार व कॉग्रेस आघाडी आहे. त्या दोघांना खेळवता येऊ शकेल, असा पत्ता हाती आलेला आहे. गरज आहे, ती हिमतीची, धाडसाची. फ़ुशारक्या मारून काहीही साध्य होत नसते.

हीच ती वेळ आहे हुकूमाचा पत्ता टाकण्याची. 

36 comments:

  1. Strange advice comming from such a renowned critique! Shivsena has,a lot of skeletons in the closet. You have totally ignored the impact of going against those in power when shivsena is knownto be corrupt.

    ReplyDelete

  2. "भाजपाला धडा शिकवायचा असेल आणि त्यालाच प्राधान्य असेल तर? दोन्ही कॉग्रेसनी सरकार स्थापन करावे आणि आपण बाहेरून त्याला पाठींबा देतो, अशी भूमिका शिवसेनेला घेता येईल. परिणामी ‘सत्तेची मस्ती चढलेल्या’ मित्र भाजपाला धडा शिकवता येईल." भाऊ, आपण हे नवीन वेगळे समिकरण मांडले आहेत हे खरे पण त्यातील महत्वाचा धोका आपणहि दुर्लक्षिलेला दिसतोय. "एक पत्र राज्यपालांना पाठवले की विषय संपला. " इतके हे सोपे नसेल. ऐन ’अविश्वास’ ठरावाचे मतदानाचे वेळी भाजप आमदारांनी ह्या सरकारला पाठींबा दर्शवला वा नुसते मतदानात भाग नाही घेतला तरी हे सरकार वाचू शकते व शिवसेना पक्षप्रमुखांच्या मर्जीविनाच तोंडावर आपटण्याची पाळी शिवसेनेवर येवू शकते , ज्या भाजप चा तोंडचा घास पळवला गेलेला असेल तर भाजपासारखा मुरब्बी मित्रपक्ष हे करून शिवसेनेला त्यांची जागा दाखवायची अशी सुवर्णसंधी गमवणार नाही !

    माझा तर सल्ला, अर्थातच अनाहूत, असेल की शिवसेनेने आपली औकात ओळखून वागावे. आपली संख्या निम्म्यानेच आहे तेव्हा सध्या उपमुख्यमंत्रीपद स्विकारून चार दोन आणखीन मंत्रीपदे घेवून संधीची वाट पहावी हेच योग्य ठरेल. मधल्या काळात संयुकत सरकारावर कुठलेही तोंडसुख घेत बसण्यापेक्षा शिवसेना वाढवण्याचा राजरोस मार्ग अंगीकारून पाच वर्षे नवख्या उपमुख्यमंत्र्याला जवळून शिकून घेण्याची संधी घेवू द्यावी. आदित्यजींना अजून पुढे पुष्कळ वर्षे आहेत, नाहीतर उगीचंच हाती धुपाटणे घेण्याची पाळी न येवो!

    ReplyDelete
  3. जे काही चालले आहे ते पाहता यांना शिवसेना राजकारणातून घालवायची आहे असे वाटते

    ReplyDelete
  4. 1भाऊ, शिवसेनेची निवडणूकपूर्व युती आहे.२) राष्ट्रवादी, कांग्रेस यांच्याशी शिवसेनेची युती नाही ३)मग इतर पर्याय कार्यकर्ते, जनता व आमदारांना कसे पटतील

    ReplyDelete
  5. भाऊ शिवसेनेचे अस्तित्व ज्यावर अवलंबून आहे ती मुंबई महानगर पालिका सेनेच्या ताब्यात भाजपच्या कृपेने आहे, जवळपास सारख्या जागा असताना देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सामंजस्य दाखवून मुंबई महापालिका सेनेला दिली, उद्या उद्धव ठाकरे यांनी आपण म्हणता तसा काँग्रेस राष्ट्रवादी यांना बाहेरून पाठिंबा दिलाच तर ती सेनेची आत्महत्या ठरेल कारण एकदा का हे दोन्ही पक्ष सत्तेत बसले की ते सेनेला अजगरासारखे गिळुन टाकतील, त्यामुळे सेना अशी हिंमत करण्याची शक्यता कमी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आगदी योग्य तर्क आहे.महापालिका निवडणुकीत सेनेला ८४ वा भाजपला ८२ जागा मिळाल्या .सेनेला महापौर पद मिळाले,गेली २०-२५ वर्षे मंबई महानघर पालिका सेनेकडे आहे पण यांना खड्डे मुक्त रस्ते, फेरीवाले ,स्वच्छता ईत्यादी महत्वाच्या विषयात फारसे यश मिळालेले नाही. सेनेचे युवराज अपरिपक्व आहेत ,नगरसेवक सुद्धा न होता त्यांना थेट मुख्य मंत्रिपद हवे आहे .महाराष्ट्रा सारखे महत्वाचे राज्य व देशाची आर्थिक राजधानी मंबई असलेल्या राज्याची धुरा अशा अन अनुभवी युवराजाच्या हातात देण्या करता लोकांनी मतदान केलेले नाही.मतदारांचा कौल शीर सावंद्य मानुन भाजप बरोबर सत्ते मध्ये सेनेने सहभागी व्हावे यात शहाणपण आहे.

      Delete
  6. मुद्दा हा आहे की भाजपा धडा का शिकवावा जो पक्ष लोकाभीमुख कामे करतो.ज्या पक्षाने पाच वर्षांत एकही भ्रष्टाचार केला नाही. केवळ वैयक्तिक अहंकार सुखावन्या साठी आडमुठेपणामुळे जनतेला वेठीस धरने योग्य आहे का .जनतेने सर्वात मोठा पक्ष भाजपा ला केले आहे. शिवसेनेला पुढल्या खेपेस सोबत न ठेवता ही भाजप बहुमत मिळवेन .लोकमत शिवसेनेच्या बाजुने नाही हेलक्क्षात येत नाहीये का

    ReplyDelete
  7. अशा प्रकारे समीकरण जमेल असे वाटत नाही, कारण राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे मुरलेले राजकारणी आहेत, ते सत्तेसाठी गुलामगिरी पत्करतील हे केवळ अशक्य. भाजपाला सत्तेबाहेर राहिल्याने फारसा फरक पडणार नाही परंतु या मुद्द्यावर सेनेत फूट पडेल कां हा प्रश्न उरतोच.

    ReplyDelete
  8. भाऊ, तुम्ही तर शरद पवारांच्या २०१४ सालच्यादेखील पुढे गेलात!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  9. भाऊ सेनेने जर हुकुमाचा पत्ता टाकला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला तर राज्यातील हिंदुत्ववादी मतदाराला भाजपचा एकमेव पर्याय उरेल, जरा 1985 ते 90 चा काळ आठवला म्हणजे लक्षात येईल, भाजप गांधीवादी समाजाच्या सापळ्यात अडकून बसला होता, औरंगाबाद, मालेगाव, भिवंडी अशा ठिकाणी सातत्याने दंगे होत होते, अशा वेळेस विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि भाजप दुय्यम भूमिकेत फेकला गेला एका फटक्यात शिवसेना राज्यात सगळीकडे पसरली, प्रमोद महाजन यांनी दुय्यम भूमिका स्वीकारून सेनेशी युती केली 2009 पर्यंत भाजप दुय्यम भूमिकेत होता, म्हणजेच जर भाजपच्या द्वेषापायी सेना काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेली तर बाळासाहेबांनी घातलेला पायाच उखडून टाकला जाईल, अयोध्येत जाऊन रामाची आरती करणाऱ्या सेनेला काँगेसला पाठिंबा देणे परवडेल का? सावरकरांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या काँगेसबरोबर जाणे सेनेला परवडणार आहे का? हा हुकुमाचा पत्ता नसेल तर ही विनाशकाले विपरीत बुद्धी होईल

    ReplyDelete
  10. एक डाव जिंकून चालणार नाही..कारण हा काही शेवटचा डाव नाही... एकदा ऑफर गेली की ती स्वीकारायची की नाही ते पवार धूर्तपणे ठरवतील. ही मैत्री.. जुगार.. म्हणजे अंगावरचे कपडे डावावर लावणे आहे. उद्धवने राऊतच्या वल्गनांकडे लक्ष न देता आधी भ्रष्टाचार मुक्त, दंगली मुक्त राज्य कारभार करण्यात रिमोट कंट्रोल ठेवण्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. तसे केल्यास पुढील निवडणूक खऱ्याअर्थाने तुमची असेल!

    ReplyDelete
  11. भाऊ, तेवढी अक्कल असती तर सगळे पत्ते निकाल लागल्यावर उघडे केले नसते. सामनाचे संपादकाला भाजपाच्या अंगावर सोडले की भाजपा गुढग्यावर येईल असेच यांना वाटते. राजकारण सोडा पण राज्यपातळीवर यांच्या साठमारीमुळे दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पक्ष संपण्याची शक्यता आहे. मग परत भ्रष्टवादी सरकार आहेच.

    ReplyDelete
  12. अतिशय समर्पक आणि सुंदर रित्या सगळा सारीपाट मांड लात.
    पण असे केल्याने हिंदू मतदार आणि पारंपारिक शिवसेना मतदार नाराज होणार नाही का?
    पण शिवसेनेने आता माघार घेवू नये कारण CM पद न घेता तह केल्यास उद्धव खोटे बोलले असा होईल (अमित शाह यांनी २।५ वर्षे CM पद वातून घ्यावे असे म्हटले)
    आणि भाजप ची डोक्यात गेलेली हवा कमी करने गरजेचं आहे । सेनेला लाचार म्हणताना स्वत CM किती लाचार आहेत है मुख्यमंत्रीपद न सोदून BJP आणि फडणवीस दाखवत आहेत, जर् BJP खरच मोठा भाऊ असेल तर बालासाहेबांसारख दिलदार पण दाखवून द्याव २.५ वर्षे CM खुर्ची सेनेला सोडून

    ReplyDelete
    Replies
    1. बाळासाहेबांनी दिलं होतं का मुख्यमंत्री पद भाजपला? तेव्हा तर भाजप सेनेच्या जागांमध्ये फारसा फरक सुद्धा नव्हता.

      Delete
  13. सेना आमदार असे करु देतील?
    शिवाय दोन्ही काँग्रेस वर, वचक ठेवायला जमेल?
    आणि आदित्य ला मंत्री करायचं आहे त्याच काय?

    ReplyDelete
  14. मुख्यमंत्रीपद मिळविण्याची ही शिवसेनेसाठी अखेरची संधी आहे. आता ही संधी गमाविली तर भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री कधीही होणार नाही.

    सर्वात प्रथम म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व नेत्यांना तोंड बंद ठेवण्यास सांगावे. कोणीही जाहिररित्या कोणतीही मागणी करू नये असा आदेश द्यावा.

    स्वत: उद्धव ठाकरेंनी सुद्धा कोणतेही विधान करू नये.

    शांत बसून भाजप पाठिंबा मागण्याची वाट पहावी.

    जर भाजपकडून वाटाघाटींचा प्रस्ताव आला तर, अमित शहांबरोबरील बैठकीत नेमके काय ठरले होते ते अमित शहांनी जाहीर केल्यानंतरच बोलणी होतील असे भाजपला सांगून त्यावर ठाम रहावे.

    दरम्यानच्या काळात राज्यपालांची भेट घेऊन आपण सध्या कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे सर्व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांना द्यावे.

    तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी पाठिंब्यासाठी गुपचुप बोलणी सुरू करावी.

    भाजप बरोबरील वाटाघाटीत, मुख्यमंत्रीपद व निम्मी महत्त्वाची खाती, ही ठाम मागणी करावी व त्यावर अजिबात तडजोड करू नये.

    ज्याप्रमाणे मायावती अत्यंत ठाम राहून आपल्याला हवे ते मिळविते, तसेच ठाम रहावे.

    कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची व निम्म्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी अजिबात सोडू नये. भाजप आपल्याशिवाय सरकार स्थापन करू शकणार नाही, यावर ठाम विश्वास ठेवावा.

    ________________________

    आता संधी गमाविली तर भविष्यात कधीही संधी मिळणार नाही, हे लक्षात ठेवूनच पावले उचलावी.

    ReplyDelete
  15. मग भाजपलाच बाहेरून पाठिंबा देवून remote control चालवले तर्?

    ReplyDelete
  16. Will Shivsena bite the bait. It is too early and premature to think on those lines. Even if that party decides to do like this,do they have the necessary resilience, courage of conviction to face internecine of various forces arising out of any innumerable variable factors etc; to face it. I have my severe as well as serious doubts.

    ReplyDelete
  17. महाभारतातल्या संजयाची दिव्यदृष्टी.... नुसते संजय नाव लावले म्हणून येत नाही. तो संजय आंधळ्या मालकाला खरी परिस्थिती सांगून सत्य बोलत होता. आणि हा संजय ....

    ReplyDelete
  18. शिवसेना फुटू शकते. 30 आमदारांची गरज आहे. एकनाथ शिंदे दिघेंचे एकनिष्ठ आहेत. बाकी इतिहास आपण जाणताच. जय महाराष्ट्र!

    ReplyDelete
  19. भाऊ, आपण म्हणता त्याप्रमाणे दोन्ही काँग्रेसबरोबर शिवसेनेला सत्ता स्थापन करणे शक्य आहे, पण तश्या सरकारमध्ये कोणाही एका पक्षाने पाठिंबा सोडला तर ते सरकार पडेल. त्यामुळे एकट्या उद्धव ठाकरेंना सरकार कितपत ताब्यात ठेवता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यात उद्धव ठाकरे काही शरद पवारांइतके मुरलेले राजकारणी वाटत नाहीत, त्यामुळे शरद पवार नेहेमीप्रमाणे कोलांट्या मारत राहतील आणि त्यात उद्धव भरडले जाण्याचीच शक्यता जसे वाटते. आणि एकदा अश्या पध्दतीने शिवसेना बाजूला झाली तर निदान पुढच्या लोकसभा-राज्यसभेच्या युती होणार नाही. शिवसेनेला त्याचा तोटाच जस्ट होईल असे वाटते.

    ReplyDelete
  20. Disagree. Suggestions given in this blog kills whatever good left in Maharashtra. I can elaborate if necessary.

    ReplyDelete
  21. पण भाऊ प्रश्न असा आहे कि,तो पत्ता नक्की सेनेतल्या
    कोणात्या व्यक्तीकडे आहे ?...संदर्भ (एक ऐकिव बातमी) साधारण 1.5/2 वर्षापुर्वी सेना आमदारांच्या एका गटाची गुप्त बैठक झाली होती.

    ReplyDelete
  22. भाऊ एका पेक्षा एक सरस लेख... आणि विश्लेषण.. भाऊ आपण अनेक लेखात शहांच्या शत प्रतीशत भाजप चा समाचार घेतला आहे.. या परिस्थिती ची पायाभरणी 2014 च्या महाराष्ट्राच्या निवडणूकी पसुन झाली व युतीच्या कार्यकर्तांची दुभंगलेली मने कधीच जोडली गेली नाहीत.. निवडणूक दरम्यान सोशल मिडियावरील पोस्ट याची ग्वाही देत होत्या
    यात सेना वाले भाजप ची खिल्ली ऊडवतात तर भाजप वाले सेनेची.. हे एवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं पण भाजपाला केंद्रीय नेतृत्व मोदी शहा स्वरुपात मिळाल्यावर व प्रमोद महाजन व मुंढे गेल्या वर केंद्रात सक्षम नेतृत्व मिळाले नाही. गडकरींची स्वप्न पुर्ती मुळे झाली नाही. शहा सारखा बहुजन मुरब्बी नेतृत्व पुढे महाराष्ट्राचे नेतृत्व कमीच पडले..
    यात सेना भाजप चा गेल्या चार वर्षे चाललेला कलगीतुरा जनतेने बघीतला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी कडे सक्षम व अभ्रष्टाचारी नेतृत्व नसल्यामुळे व केंद्रीय नेतृत्व कमकुवत असल्या मुळे दुसरा सक्षम पर्याय नव्हता.
    देवेंद्र फडणवीस खुप सक्षम पणे व संयम राखत पुर्ण बहुमत नसताना पण सेनच्या पाठिंब्या वर राज्य नुसते चालवले नाही तर जल शिवार, मराठा आरक्षण, बिन भ्रष्टाचारी कारभार केला. यामुळे जनतेने परत महाराष्ट्रात सेना भाजपला कौल दिला..
    यात पाच वर्षाच्या शेवट आलेला पुर भजपला नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी कोल्हापूर सांगलीत कोंडी करणारा ठरला.. तसेच रस्त्याची झालेली वाताहात.. व (अशा परिस्थितीत ताबडतोब आपात कालीन रस्ता दुरुस्ती हातात घेऊन गव्हर्नस with difference करुन दाखवले नाही )
    तसेच प्लास्टिकच्या बंदीने सामान्य नागरिकांच्या गैरसोयी मुळे हातभार लावला.. व प्रत्येक दुकानदार ( जो मोदी समर्थक होता) व भाजीवाला हाॅटेल वाला शिव्याची लाखोली वाहताना दिसला..
    शेतकरी आंदोलने पेटवत.. महाराष्ट्राच्या मुरब्बी नेतृत्वाने शेतकरी वर्गाची नाराजी पेटवत ठेवली..
    तसेच निरनायकी मराठा आंदोलनाने मराठा मते एक गठ्ठा होऊन भाजपच्या पारड्यात पडली नाहीत.. व याचा फायदा पडद्या आडुन हे घडवून आणणार्याला झाला..
    अमोल कोल्हे चा संभाजी शरद पवारांनी जणु प्लान करुन मालीका लावल्या प्रमाणे राष्ट्रवादी च्या गटात आणुन मराठा मते आणखीच खिळखिळी केली..
    यासाठी लोकसभेच्या तुलनेत घटलेला मतदानाचा रेट हे पण एक कारण आहे..
    यावेळी भाजपचा राज्य पातळीवरील आयटी सेल पण प्रभावी पणे देवेंद्र फडणीस सरकारच्या कामाची यादी देऊ शकला नाही..
    यामुळे जास्तीत जास्त मिडियावाले नेहमी प्रमाणे काँग्रेसचे व राष्ट्रवादी चा उदोउदो करत राहिला.. व यात साधाभोळा ग्रामीण मतदार राष्ट्रवादी व कांग्रेसच्या बाजुने झुकला .. यात अशा मतदाराला 1999 ते 2014 चाललेली लोड शेडींग, खताची कमतरता, शेतीसाठी पाण्याची कमतरता महागाई, टोल हटवणे ग्रामीण भागातील रस्ते शौचालय घर अशा मुद्द्यांचा विसर पडला..
    हे मुद्दे सोडून 370 वर दिलेला भर महागात पडला..
    ना या मुद्द्यावरील मेसेज काॅपी पेस्ट करुन व्हाटस अप वर फिरवले गेले..
    शहरी मतदारांनी अशा भुलभुलैया व भिजल्या ला न भुलता परत मते भाजप सेना युतीला दिली म्हणुन एवढा पल्ला युतीला गाठता आला..(पण मुंबई ठाणे पुणे व ईतर शहरात भाजप सेना सरकार व केंद्रीय मोदी सरकाने वाटाणाच्या अक्षता च लावल्या पाणी, रस्ते रेल्वेलाईन व रेल्वे व लोकल सेवा यात काही अमुलाग्र तर सोडाच पण अत्यंत अवश्यक असा बदल पण झाला नाही. (उदाहरणार्थ सुस्थितीतल प्लाटफाॅर्म तोडुन फरशीचे प्लॅटफॉर्म बनवले यांत्रिक जिने हे काॅस्मॅटीक व कदाचित मलईदार काम केले पण रेल्वेलाईन वर येणारे पाणी त्वरीत निचरा होण्यासाठी काहीच केले नाही.. साधी रेल्वेलाईन बाजुची नाला सफाई पण केली नाही.. यामुळे या वेळी अनेकदा लोकल सेवा विस्कळीत झाली. ..) भारता सारख्या ऊष्ण कटीबद्ध देशात मुबला फॅन व व पुर्ण कव्हर्ड प्लॅटफॉर्म व बस थांबे पण पाच वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सरकार असताना झाले नाही
    मेट्रो व शहरी मतदारांनी तरी सुद्धा युतीला मतदान केले
    जागोजागी काँग्रेस राष्ट्रवादी राजवटीत पेरलेले ट्राफीक पोलिस पण सामान्य नागरिकांना लुटत राहिले.. हे जनतेने सहन करुन सुद्धा परत युतीच्या बाजुने कौल दीला..
    परंतु सेनेच्या प्रतीकुल परिस्थितीतील अतीरेकी मागण्या नी खोडा घातला आहे. यात मोठे नुकसान सेना भाजपचेच होणार आहे.... मतदार काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात आहेत हे निवडुन दिल्यावर दोन्ही पक्ष सोईस्कर रित्या विसरले आहेत..
    यात सेनेच्या प्रतीमेवर.. जास्तीत जास्त परिणाम होऊन परत मनसे झाला तर नवल वाटायला नको...एकेएस

    ReplyDelete
  23. Such a step is practically suicidal.SS will b finished if such a step is taken

    ReplyDelete
  24. भाऊ, तुमचा हा लेख काही पटला नाही. उगीच उसनं अवसान आणून काहीतरी डावपेच टाकण्यापेक्षा आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यापेक्षा शिवसेनेने आपली मर्यादा ओळखून ठामपणा कायम ठेवून भाजपाशी वाटाघाटी कराव्यात हे चांगले.

    ReplyDelete
  25. निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी तिढ्याचं मुख्य कारण आहे. आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते

    ReplyDelete
  26. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  27. भाऊ, तुम्ही म्हणताय तशी साहेबांनी पिन मारलेली दिसतेय शिवसेनेला.
    https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-shiv-sena-cm-bjp-deadlock-sanjay-raut-statement-1614637-2019-11-01

    ReplyDelete
  28. असे झाले तर शिवसेनेत फूट पाडून भाजप सरकार बनवेल.

    ReplyDelete
  29. हे सेना-भाजप आहेत म्हणून इतका वेळ घालवतायत. जर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून सरकार बनवणे शक्य झाले असते तर एव्हाना सरकार स्थापून त्यांनी पहिला घोटाळा सुद्धा केला असता...

    ReplyDelete
  30. It is unfortunate that Maharashta is having ROGUE Party like Shiv Sena. BJP should end alliance with sena once for all and sit in oppositionand wait for their opportune time.

    ReplyDelete
  31. अशा प्रकारच्या समीकरणाचा विचार करण्याची राजकीय मुत्सद्देगिरी, परिपक्वता, दूरगामी धोरण शिवसेनेकडे कधीच नव्हते आणि आजही नाही.. मुंबई महानगरपालिकेत जीव अडकलेला आहे, असलं काही करण्याचं राजकीय धाडस शिवसेना करेल असे अजिबात वाटत नाही..

    ReplyDelete