Sunday, October 20, 2019

कुस्ती आणि क्रिकेट



गेल्या आठदहा दिवसात विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला चांगला रंग भरला असे म्हणता येईल. कारण राजकीय नेते व पक्षांनी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याला आपल्याकडे प्रचार मानले जाते. खरे मुद्दे बाजूला पाडण्याचे डावपेच चाललेत, असा आरोप सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी करणे स्वाभाविक आहे. कारण सामान्य मतदार जनतेला पटणारा खुलासा उपस्थित विषयावर उपलब्ध नसेल; तर त्या विषयालाच टांग मारणे भाग असते. ३७० कलमाचा विषय जेव्हा ऐरणीवर आला, तेव्हा त्याचा महाराष्ट्राशी संबंध काय? असे विचारून प्रादेशिक पक्षाचे नेते म्हणून पवारांनी त्यापासून अलिप्त रहाण्याचा शहाणपणा दाखवायला हवा होता. तेव्हा तर त्या विधेयकाला विरोध करण्याचा महाराष्ट्राशी संबंध असेल; तर आता विधानसभेच्या प्रचारात ३७० चा संबंध शोधण्यात अर्थ नसतो. तसाच एक मुद्दा आहे तेल अंगाला लावलेल्या पहिलवानाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला; तेव्हा पवारांनी आपल्या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष असण्याचा आधार घेऊन अतिशय खोचक विधान केले व हातवारेही केले होते. फ़डणवीस म्हणाले, आमचे म्हणजे भाजपाचे पहिलवान (उमेदवार) अंगाला तेल लावून आखाड्यात उतरलेले आहेत. पण समोर लढायलाच कोणी नाही. त्याला उत्तर देताना आपल्या एका भाषणात पवार (तृतियपंथी हावभाव हातवारे करीत) म्हणाले, कुस्ती ‘अशांशी’ होत नसते. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याचा हवाला त्यासाठी पवारांनी दिला. पण तेच पवार मुंबई क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग तिथे त्यांची बुद्धी का चालत नाही? कुस्तीच्या खेळाचे नियम अगत्याने कथन करणार्‍या पवारांना क्रिकेट कसे व कोणाची खेळतात, हे ठाऊकच नाही काय? असते तर त्यांनी मोदी-शहा इतक्या सभा कशाला घेत आहेत, असा उलटा प्रश्न नक्कीच विचारला नसता. क्रिकेट कसे खेळतात? कुस्ती व क्रिकेटमधले साधर्म्य काय आहे?

कुस्तीचे तंत्र सांगताना पवार म्हणतात, ‘अशांशी’ लढत नाही. मग क्रिकेटमध्ये तरी ‘अशां’चा पुरूषार्थ कितीसा आहे? सध्या दक्षिण आफ़्रिका व भारत यांच्यात कसोटी मालिका चालू आहे आणि त्यातल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्णायक आघाडी घेतलेली आहे. पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत आणि त्यातल्या दुसर्‍या सामन्यात तर आफ़्रिकेचा एक डाव दिडशेहून अधिक धावांनी दणदणित पराभव केला आहे. पण नशिब दक्षिण आफ़्रिकन संघाच्या कर्णधाराचे नाव शरद पवार नाही. अन्यथा तोही म्हणाला असता, क्रिकेट विश्वात खरोखरच भारतीय संघ इतका अजिंक्य असेल, तर रोहित शर्मा व विराट कोहली कशाला फ़लंदाजीला आणावे लागत आहे? कुस्ती असो वा क्रिकेट, कुठल्याही सामन्यात संघ मैदानात उतरवला जातो, त्यात आपल्याकडले उत्तम खेळाडू वा मल्ल आणले जात असतात. मग तो संघ कितीही बलवान असो आणि समोरचा संघ कितीही दुबळा असो. दुबळा संघ वा त्यांचा कर्णधार समोरच्या संघात जिंकू शकणार्‍या उत्तम खेळाडूंना कशाला समाविष्ट केले; असा ‘उलटा’ सवाल करीत नसतो. जे कोणी समोर येतील, त्यांची दाणादाण उडवून सामना जिंकायला मैदानात येत असतो. तुमच्या उत्तम खेळाडू वा मल्लांना आखाड्याबाहेर ठेवण्याचा आग्रह धरत नाही, किंवा तक्रार करीत नाहीत. पवारांनी तीनचार दशके विविध खेळ संघटनांची अध्यक्षपदे मिरवताना त्यातली ही मूलभूत बाजू समजूनच घेतलेली नाही काय? की फ़क्त त्यातल्या आर्थिक उलाढाली व खेळाडूंच्या लिलावाचाच अर्थ समजून घेतला आहे? पवारांच्या पक्षापाशी राज्याबाहेरून व्यासपीठ गाजवू शकणारा कोणी वक्ता आणायची कुवत नसेल; तर भाजपाचा तो गुन्हा असू शकत नाही. मोदी शहा हे भाजपाचे विराट कोहली वा रोहित शर्मा आहेत. त्यांना भाजपाने कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसवून निवडणूका लढवाव्यात, अशीच पवारांची अपेक्षा आहे काय? असेल तर त्यांना कुस्ती वा क्रिकेट किती कळते, असा प्रश्न विचारला गेला पाहिजे.

पण असे प्रश्न विचारण्यासाठी खरेखुरे पत्रकार समोर असायला हवेत. त्याचाच दुष्काळ असेल, तर पवारांच्या हातवारे व हावभावांनाच ‘भाव’ मिळून जाणार ना? अर्थात सामान्य जनता तितकी बुद्धीजिवी पत्रकार नसल्याने तिला कुस्ती व क्रिकेट आवश्यक तितके समजत असते. म्हणूनच मतदान करताना योग्य कौल देणेही शक्य होत असते. गेल्या आठवडाभरात पवारांच्या व अन्य विविध राजकीय नेत्यांच्या सविस्तर मुलाखती मराठी वाहिन्यांवर वारंवार दाखवल्या जात आहेत. त्यात पवार एक गोष्ट मुलाखत घेणार्‍यालाच अगत्यानेच सुचवतात. माध्यमांवर किंवा प्रचार साधनांवर भाजपाचा दबाव आहे. खरे मुद्दे बासनात गुंडाळून मतदाराची दिशाभूल करण्याचा डाव खेळला जात आहे. माध्यमेही दबावाखाली आहेत. असे असेल तर त्याच कालखंडात बहुतांश मराठी माध्यमांनी व वाहिन्यांनी प्रफ़ुल्ल पटेल व इक्बाल मिरची विषयात गुळणी कशाला घेतलेली आहे? दोनतीन इंग्रजी वाहिन्या सलग चारपाच दिवस पटेल व १९९३ च्या मुंबई स्फ़ोटातील एक प्रमुख आरोपी इक्बाल मिरची; याच्या आर्थिक संबंधाची लक्तरे काढत आहेत. पण कुठल्याही मराठी वाहिनीने त्यावर उहापोह करायचे टाळलेले आहे. वास्तविक पटेल हे पवारांचे कुटुंबाइतकेच निकटवर्तिय आहेत. म्हणूनच यावेळी ती लक्तरे मराठी माध्यमात ठळकपणे मांडली गेल्यास मतदानावर त्याचाच मोठा परिणाम होऊ शकतो. पटेल हे राष्ट्रवादीचे मोठे नेते व माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे वादग्रस्त व्यवहार राष्ट्रवादीच्या प्रचाराला मोठी इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे त्याविषयीचे मौन माध्यमांनी धारण करणे म्हणजेच खर्‍या विषयावरून जनतेला गाफ़ील ठेवणेच नाही काय? मग त्या विषयावर काही गाजावाजा नको म्हणून कोणी दबाव आणलेला असू शकतो? मोदी सरकार वा फ़डणवीस सरकार त्यासाठी दडपण आणेल काय? नसेल तर मराठी माध्यमे कोणाच्या दबावाखाली असतात? असा ‘उलटा’ प्रश्न एकाही मुलाखतकाराला कशाला सुचत नाही? कशाला विचारला गेला नाही?

पवारांचे कुस्तीविषयक ज्ञान व हातवारे अगत्याने दाखवून त्यावर प्रदिर्घ चिंतन करणार्‍या मराठी माध्यमांना’ इक्बाल मिरची इतकी घुसमटून का टाकत असावी? की त्या मिरचीचा जबरदस्त ठसका लागल्यानेच घटाघटा पाणी प्यावे, तसे सातार्‍याच्या सभेत पडणार्‍या मुसळधार पाववाचे पाणी मराठी माध्यमे पिण्यात गुंग झालेली होती? इंग्रजी माध्यमे एकामागून एक ‘मिरची’च्या फ़ोडण्या देऊन धमाल उडवून देत असताना, मराठी माध्यमे मात्र पवारांच्या पावसात भिजून दिल्या गेलेल्या भाषणात ओथंबून गेली होती. कुठे आणून ठेवलीय मराठी पत्रकारिता साहेबांनी? राष्ट्रवादीच्याच एका जाहिरातीतल्या टॅगलाईनवर विश्वास ठेवायचा, तर महाराष्ट्र सोडणार नाही, अशा माध्यमांना. चार दिवसाचा तर मामला आहे. २४ आक्टोबर रोजी दुध आणि पावसाचे पाणी वेगळे झालेले दिसेलच. कारण सामान्य मतदार आता तितका दुधखुळा राहिलेला नाही. एका बाबतीत मात्र पवारांचे कौतुक करावे लागेल. आपण सातार्‍यातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात चुक केली, हे त्यांनी कबुल केले आहे. निदान एकदा तरी आपल्या चुकीची कबुली दिली, हे अभिनंदनीय आहे. पवारांसाठीच नाही, तर मराठी पत्रकारितेसाठीही कौतुकास्पद आहे. कारण पवारांच्या घोडचुकातही मुरब्बीपणा शोधण्यातच बुद्धीजिवी पत्रकारीता मागल्या दोनतीन दशकात डुंबत राहिली होती. त्यांनाही पवारांची चुक सांगण्याची भिती वाटली नाही, हे कौतुकास्पदच नाही काय? पण चुक उदयनराजे यांनीही मांडलेली आहे. आजवर आत्मपरिक्षण व आत्मविंतन केले असते, तर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन आत्मक्लेश करावे लागले नसते’ असे राजे म्हणाले होते. आत्मचिंतन पवारांनी कधी केले नाही आणि मराठी माध्यमे पत्रकारांनी त्यांना करू दिले नाही. मग दोघांवर सतत आत्मक्लेश सहन करण्याची वेळ येत राहिली, तर दुसर्‍या कोणाला दोष देता येईल? देवेंद्राला कुस्ती शिकवण्यापेक्षा साहेबांनी क्रिकेट समजून घेतले असते, तर पावसात खेळ थांबवायचा असतो, इतके औचित्य तरी राखता आले असते ना?

19 comments:

  1. जाणत्या राजाचा अजाणतेपणा.
    पन्नास वर्षात कमावलं ते एका महिन्याच्या प्रचारात घालवलं.

    ReplyDelete
  2. भाऊ, आयुष्य खोटी नाटकं करण्यात गेली. शरद पवार हे माध्यमानी मोठा केलेला नेता आहे, जनसामान्यांचा नाही हे आता कुठे बऱ्याच लोकांना उमगत आहे. त्यांच्या फसवणूक करण्याच्या स्वभावाला पत्रकारांनी मुत्सद्देगिरी हे नांव दिले. सर्व करुन नामानिराळे रहाण्याच्या कलेला तेल लावलेला मल्ल असा किताब दिला. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याच्या सवयीला, पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि ते जे बोलत नाहीत ते नक्की करतात हे गोंडस वर्णन केले गेले. या सर्वातून मग त्यांना जाणता राजा ही उपाधी दिली ती जनतेने नाही पण त्यांच्याच पैकी कोणीतरी. शेतीतील सर्व काही त्यांना कळतं असं त्यांचे अनुयायी नेहमी सांगतात पण केंद्रीय क्रुषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य मार्ग या शेतकऱ्यांने कधीच सुचवला नाही, फक्त सरसकट कर्जमाफी हा एकच मार्ग, ज्यात मोठ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या मोठ्या थकीत कर्जांंमुळे सहकरी बँका वाचवूध घेतल्या, आत्महत्येला प्रव्रुत्त होणारा छोटा गरीब शेतकरी आत्महत्या करतच राहिला. शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांंना लुटणारे सरकारी खाजगी दलाल बाजूला सारून ग्राहकांशी सरळ संबध जोडून देणारी यंत्रणा उभारता आली नाही किंवा इच्छा नव्हती. इच्छा नव्हती हेच खरे कारण सरकारी अडत्या संस्थावर यांचेच अनुयायी आणि खाजगी दलाल पण यांचेच. एवढी ताकद असताना स्वबळावर कधीच जनतेने सत्ता दिली नाही नव्हेतर यांनी कधी प्रयत्न सुद्धा केला याचे कारण हेच आहे की पत्रकारांनी काहीही सांगितले तरी महाराष्ट्रातील जनतेने त्याना कधीच पूर्णपणे स्विकारले नाही.

    ReplyDelete
  3. https://pkartoons.blogspot.com/2019/10/blog-post.html?m=1

    ReplyDelete
  4. ED प्रकरण असो वा हे पावसात भिजणे, पवार साहेबांनी चांगलीच सहानुभूती मिळवली आहे असे वाटते. तसेच अनेकजण उमेदवाराला मत देताना त्याचे काम, योजना यांच्यापेक्षा जातीचा विचार करतात. त्यामुळे भाजपला निवडणूक अवघड आहे असे वाटत आहे. मागच्या निवडणुकीत पण असेच वातावरण होते. या वेळेस पण या नकारात्मक वातावरणाला मात करून भाजपा जिंकेल का?
    खात्यात थेट पैसे जमा होतात याचा अनेकांना फायदा झाला आहे असे लोकांच्या बोलण्यातून दिसते. पण माध्यमे वेगळेच चित्र उभे करताना दिसत आहेत. म्हणजे ओपिनियन पोल मध्ये भाजपा पुढे असे आकडे दाखवायचे आणि इतर वेळेस मात्र विरोधकांची कशी सरशी होणार हे दाखवायचे. अनेक पत्रकारांची पवार साहेब बद्दल असलेली आपुलकी दिसून येत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राह्मण मुख्यमंत्री नको हा पण एक मोठा प्रसार केला गेला.

      Delete
    2. ब्राह्मण मुख्यमंत्री नको हा पण एक मोठा प्रसार केला गेला.

      Delete
  5. भाऊ , संपूर्ण लेख पवारांच्यावर लिहिण्या इतके मोठे ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात राहिलेले नाहीत. तरी त्यांनी तोडलेले तारे , चोवीस तारखे पूर्वीच, त्यांनाच, दाखविण्याचे काम मात्र तुम्ही अतिशय उत्तम केलेले आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
  7. कुस्ती हा सांघिक खेळ नाही, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, दोन्हीची तुलना योग्य नाही
    सांघिक खेळात तुम्ही कोणताही खेळाडू ठरवु शकता पण कुस्तीत समोरचा खेळाडु पाहुनच पैलवान कुस्ती धरतो

    ReplyDelete
  8. भाऊ एबीपी माझा बद्दल एकदा लिहाच. मराठी भाषेतील एनडीटीव्ही आहे माझा म्हणजे

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर...

      Delete
  9. भाऊ, काही दिवसांपूर्वी पवारांना "पक्ष सोडून जाणाऱ्या नातेवाइकांबद्दल" कुण्या पत्रकाराने प्रश्न विचारला तर शरद पवार पत्रकार परिषद सोडून जायला निघाले, आणि उपस्थित इतर पत्रकारांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच बाहेर काढले. त्यावर तुम्ही सुद्धा हे पवारांना "चिडवणारे / डिवचणारे" प्रश्न विचारणे चुकीचे असल्याचा "ब्लॉग पोस्ट" लिहिला होतात. मग आता उद्या नक्की कुठला प्रश्न योग्य आणि कुठला "डिवचणारा" हे कोण आणि कसे ठरवणार? का ते फक्त पवार ठरवणार आणि इतर "पत्रकार" हो हो म्हणत राहणार?

    ReplyDelete
  10. कुस्तीवर लेख.. आणि गामा पैलवान यांची प्रतिक्रिया नाही?!

    ReplyDelete
  11. भाऊ जनसामान्यांचे मत ओळखणे गरजेचे आहे. ईडी मुळे पवारांना फायदा झाला. 370 मुळे सरकारकडे मुद्दे नाहीत असे दिसले आणि तिकीट वाटपातील घोळ यामुळे हातात आलेली निवडणूक घालवली..आयाराम गयाराम तर कहरच... बरोबर का

    ReplyDelete