Saturday, March 24, 2018

राहुलजी, आधी जय(श्री)राम म्हणा

jayram ramesh के लिए इमेज परिणाम

कुठल्याही दुखण्यावर उपाय योजायचे असतील, तर आधी त्या आजाराचे नेमके निदान झाले पाहिजे. निदान चुकले वा चुकीचेच केलेले असेल, तर उपा  य व उपचार फ़सत जातात आणि दुखणे बरे होण्यापेक्षा आजार बळावत जातो. जे सामान्य माणसाच्या जीवनातील सत्य आहे, तेच राजकीय जीवनातील एक कटू सत्य आहे. तुम्ही आजार नाकारून वा त्याचे चुकीचे निदान करून सुदृढ निरोगी वाढीची अपेक्षाच करू शकत नसता. आजच्या कॉग्रेसची वा अन्य भाजपा विरोधकांची काहीशी तशीच स्थिती झालेली आहे. त्यांना आपण सुदृढ आहोत वा आपण केलेले निदान चुकल्याचा विचारही करावा असे वाटलेले नाही. परिणामी चुकीच्या निदानावर चुकीचे उपचार चालू आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की जो चांगला डॉक्टर आहे आणि ज्याने अचुक निदान पाच वर्षापुर्वी केलेले होते, त्याला कॉग्रेस पक्षाने व पुरोगाम्यांनी उचलून बाजुला फ़ेकून दिलेले आहे. पण म्हणून परिणाम बदलत नसतात. त्याचे भाकित केलेले दुष्परिणाम तमाम मोदी विरोधकांना भोगावे लागत आहेत. त्या डॉक्टरचे कुठलेही नुकसान झालेले नाही. त्याचे नाव आहे जयराम रमेश! तेव्हा म्हणजे २०१३ सालात हे गृहस्थ युपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी मोदी नावाचे चक्रीवादळ येऊ घातल्याचे पहिले संकेत दिलेले होते. तर त्याने दाखवलेला धोका समजून घेण्यापेक्षा राहुल सोनियांच्या चमच्यांनी त्याची मुस्कटदाबी केली होती आणि पक्षातून चालते होण्याचाही सल्ला दिलेला होता. कॉग्रेस पक्ष कुठे चुकतो आहे, त्याकडे बोट दाखवले तर रमेश यांना मोदीभक्त ठरवून पक्षाचे नेते प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी भाजपात जाऊन मोदीचालिसा गाण्याचा सल्ला दिलेला होता. पण शेवटी रमेश यांचे भाकित खरे ठरले आहे आणि तेव्हापेक्षा आजची कॉग्रेस आणखी आजारी व दुबळी होऊन गेली आहे. त्यावरचा जालिम उपाय म्हणूनच जय‘श्री’राम इतकाच आहे.

२०१३ सालात याच दरम्यान देशात सोळाव्या लोकसभेचे वेध राजकीय पक्षांना लागलेले होते आणि तेव्हाच मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याची चाहुल लागलेली होती. भाजपाच्या गोवा अधिवेशनात मोदींना पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आणि राजकीय वावटळ उठलेली होती. माध्यमात भाजपाची यथेच्छ टवाळी सुरू झाली होती आणि प्रचारप्रमुख कशाला, मोदींनाच पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याचे टवाळखोर आग्रह अनेक वाहिन्यांचे एन्कर धरू लागले होते. प्रत्येकाला तेव्हा असे छातीठोकपणे वाटत होते, की भाजपाने मोदींना नेता ठरवले, म्हणजे त्या पक्षाचा पुरता बोर्‍या वाजणरच. त्याचा इतका मानसिक दबाव होता, की भाजपाचाही कोणी प्रवक्ता ठामपणे मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार होतील, असे सांगायला धजावत नव्हता. पण तशी चिन्हे दिसू लागली होती आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून त्यासाठी दबाव वाढू लागलेला होता. मग पत्रकारांच्याच सोबतीने अन्य पुरोगामी पक्ष व कॉग्रेसवालेही मोदींची हेटाळणी करण्यात रममाण झालेले होते. गुजरातची दंगल व मोदींची मुस्लिम विरोधातील डागाळलेली प्रतिमा, भाजपाला पु्र्णपणे गर्तेत घेऊन जाईल, असे जवळपास तमाम राजकीय विश्लेषकांचे पक्के मत होते. पुरोगामी राजकीय नेत्यातही त्याविषयी एकमत होते. पण त्याला अपवाद एकच पुरोगामी माणूस होता आणि त्याचे नाव जयराम रमेश होते. एकदा त्यांनी जाहिरपणे प्रचलीत पुरोगामी भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले होते. ‘नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे’, असे ते धाडसी विधान होते. कारण तेव्हा भाजपा नेत्यांनाही मोदी चमत्कार घडवतील, अशी खात्री वाटत नव्हती आणि जयराम रमेश मात्र त्याचाच संकेत आपल्या वक्तव्यातून देत होते. मग जगभरचे पुरोगामी रमेश यांच्यावर तुटून पडले तर नवल नव्हते. पण मागल्या चारपाच वर्षात रमेश यांचे भाकित तंतोतंत खरे ठरले आहे.

मुद्दा असा की तेव्हाच, म्हणजे पाच वर्षापुर्वी कॉग्रेसने व अन्य पुरोगाम्यांनी रमेश यांच्या त्या विधानाचा गंभीरपणे विचार केला असता आणि मोदी नावाचे ऐतिहासिक आव्हान समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर आज चित्र किती वेगळे दिसले असते? पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सहजपणे मोदी असा मोठा विजय लोकसभा निवडणूकीत मिळवू शकले नसते. कॉग्रेसची इतकी भयंकर धुळधाण उडाली नसती आणि पुरोगामी पक्षांची अशी वाताहत नक्कीच झाली नसती. आजाराचे नेमके निदान केलेले होते आणि ते मान्य करून योग्य उपाययोजना तेव्हाच आखल्या गेल्या असत्या, तर मोदींना २०१४ची निवडणू्क इतकी सोपी गेली नसती. कदाचित एनडीएला बहूमत मिळाले असते. पण भाजपाला स्वबळावर बहूमताचा पल्ला नक्कीच गाठता आला नसता. कोणीतरी एखाद्या शहाण्याने रमेश यांना विश्वासात घेऊन मोदींचे आव्हान इतके मोठे व निर्णायक कशाला वाटते आहे, किंवा त्यावर उपाय कोणता, असा प्रश्न विचारण्याची तसदी घेतली असती, तरी किती वेगळा घटनाक्रम दिसला असता ना? पण सत्य कटू असते तितकेच नावडतेही असते. म्हणूनच कोणीही ते निदान ऐकूनही घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यातून प्रत्येक पुरोगाम्याने व कॉग्रेस पक्षाने मोदींच्या त्या अभूतपुर्व विजयाला हातभार लावण्याचे पुण्यकर्म करून घेतले. त्यापेक्षा या डॉक्टरलाच चुकीचा ठरवण्याची जोरदार शर्यत सुरू झाली. कॉग्रेसची किंवा पुरोगामी पक्षांची गोष्ट सोडून द्या. माध्यमात वा विविध विद्यापीठात मोदीविरोधी बुद्धीमंतांची कमतरता नाही. त्यापैकी कोणीतरी जयराम रमेश यांच्याशी संपर्क साधू शकला असता आणि त्यांच्याकडून येऊ घातलेल्या मोदी वादळाची कारणमिमांसा समजून घेऊ शकला असता. पण आपल्याच मस्तीत जगणार्‍यांना कोण समजावू शकतो? रमेश यांचे तेच एकमेव विधान नव्हते. त्यांचे आणखी एक निदान जसेच्या तसेच खरे ठरलेले आहे.

पुढल्या काळात म्हणजे २०१३ च्या उत्तरार्धात अखेर भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्या वर्षाच्या अखेरीस चार विधानसभांच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यात दोन राज्यातली कॉग्रेस सत्ता पुरती नामशेष झाली आणि दिल्लीतून तर कॉग्रेस पुरती उखडली गेली. त्यानंतर कॉग्रेसने उचललेले धाडसी पाऊल म्हणजे राहुल गांधी यांना उपाध्यक्ष हे नवे पद बनवून तिथे स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर राहुल उघडपणे पक्षाची संघटना व निवडणूक विषयक निर्णय घेऊ लागले. त्याही संदर्भात जयराम रमेश यांनी स्पष्ट नाही तरी सुचक शब्दात भाकित केलेले होते. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे घेतल्यानंतर जी संघटना बांधणी सुरू केली, त्याविषयी रमेश काय म्हणाले होते? राहुल अतिशय मेहनत घेऊन कॉग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करीत आहेत. पण राहुलची बांधणी ही २०१९ सालच्या निवडणूकांसाठी चालू असून, आम्ही कॉग्रेसजन २०१४ ला होऊ घातलेल्या लोकसभा मतदानासाठी चिंतेत सापडलेले आहोत. यातला सुचक भाग असा होता, की आपल्या पक्षाचे निर्णय घेणार्‍या राहुलना काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येउन उभी असल्याचे अजिबात भान नाही. ते पाच वर्षानंतर निवडणूका असल्यासारखे बेफ़िकीर निर्णय घेत आहेत, असे रमेश यांना सांगायचे होते. पण तितके स्पष्ट बोलणे कॉग्रेसी अविष्कार स्वातंत्र्याला मंजूर नसल्याने, रमेश यांनी लेकी बोले सुने लागे अशा स्टाईलने आपली वेदना कथन केलेली होती. कोणीतरी राहुलना निवडणूका २०१४ मध्ये असल्याची आठवण करून द्यावी, इतकाच त्यांच्या विधानाचा अर्थ असावा. पण त्याचीही कोणी दखल घेतली नाही आणि राहुलना कॉग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ करण्याची मोकळीक देण्यात आली. त्यातले तथ्य असे की आता मात्र २०१९च्या लोकसभेसाठी राहुल कामाला लागलेले दिसतात. पण ते आज नव्हेतर मागली पाच वर्षे तशी तयारी करीत आहेत.

आता नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन चार वर्ष उलटत आलेली आहेत आणि मोदीमुक्त भारताची भाषा सुरू झालेली आहे. पण ती भाषा अजिबात नवी नाही. तब्बल सोळा वर्षापुर्वी मोदीमुक्त गुजरातची घोषणा सुरू झाली होती आणि पुढल्या बारा वर्षात ती देशव्यापी होत गेली. त्यातूनच मोदी देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आणि पर्यायाने आता मोदीमुक्त गुजरातच्या ऐवजी मोदीमुक्त भारत, अशी त्या घोषणेत सुधारणा झालेली आहे. पण ज्या मोदीपासून गुजरात वा भारत मुक्त करायचा तो मोदी काय चीज आहे, ते कोणाला समजून घेण्याची गरज वाटलेली नाही. तशी गरज वाटली असती, तर तेव्हाच या लोकांनी जयराम रमेश यांना गाठून मोदी आव्हान म्हणजे काय, ते समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असता. त्यानंतर मोदींचे इतके अफ़ाट यश समोर आल्यानंतर तरी या राजकीय अभ्यासक नेत्याकडे विचारणा केली असती. पण मोदीमुक्तीच्या वल्गना नित्यनेमाने करणार्‍या कोणाही राजकीय नेता वा अभ्यासक विचारवंताला रमेश यांच्याशी गुफ़्तगु करण्याची इच्छाही झालेली नाही. तर खर्‍या आव्हानाला सामोरे जाण्याचा विषयच कुठे येतो? जेव्हा मोदी गुजरातपुरते मर्यादित होते, तेव्हा त्या माणसातले आव्हान रमेश यांनी ओळखले असेल, तर आजही ते आव्हान कसे पेलावे, याचे उत्तर त्याच माणसाकडे मिळू शकते. देशातील पत्रकार वा राजकारण्यांनाही ज्याचा सुगावा लागला नाही, तेव्हा मोदींची कुवत ओळखणारा माणूस फ़ालतु नसतो. प्रामुख्याने तो कॉग्रेस नेता असून मोदींचे आव्हान ओळखतो व बोलून दाखवतो, याला महत्व होते. पण लक्षात कोण घेतो? आजही कोणाला रमेश यांची आठवण झालेली नाही. कॉग्रेस अधिवेशनात तेच जुने टाकावू भंगार नेते पुढे होते आणि ज्यांनी पक्षाला मागल्या दहापंधरा वर्षात रसातळाला नेवून ठेवले आहे. रमेश त्या मंचावर किंवा राहुलच्या जवळपासही नव्हते.

अर्थात चार वर्षापुर्वी उपाध्यक्ष झाल्यावर राहुलनी जयपूरला जसे तावातावाने भाषण ठोकले होते, तसेच आताही अधिवेशनातले भाषण आवेशपुर्ण होते. पण त्यात आशय किती होता आणि विषय किती होता? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण आजही राहुलना वा अन्य कॉग्रेसी नेत्यांना मोदी या विषयाचा थांग लागलेला नाही आणि त्याच मोदींपासून देशाला मुक्ती द्यायची आहे. पण त्याच मोदींना सर्वात आधी आव्हान म्हणून ओळखणार्‍या रमेश यांना विश्वासात घ्यायचे नाही. मग मोदीमुक्ती व्हायची कशी? नुसते फ़ुसके आरोप केले वा गदारोळ उठवला म्हणजे मोदी पराभूत होतील, हा सोळा वर्षात खोटा पडलेला सिद्धांत आहे. आधी मोदींच्या जमेच्या बाजू समजून घ्याव्या लागतील व आपल्या दुबळ्या बाजू स्विकाराव्या लागतील. शत्रूला दुबळा समजून त्याला पराभूत करता येत नाही. त्याची बलस्थाने ओळखून हल्ल्याची रणनिती आखावी लागते. ती बलस्थाने ओळखू शकणारे सल्लागार वा रणनितीकार सोबत घ्यावे लागतात. थोडक्यात राहुलना ‘जय‘श्री’राम’ असा जयघोष करीत रमेश यांच्या आश्रयाला जाणे आवश्यक आहे. चिदंबरम, सुरजेवाला किंवा कपील सिब्बल यांच्यासारख्या तोंडपुज्यांना काही काळ हाकलून द्यावे लागेल. रमेश यांच्यासारख्या नावडत्या गोष्टी ठणकावून सांगणार्‍यांना जवळ घ्यावे लागेल. ज्याला पाच वर्षापुर्वी मोदी हे मोठे आव्हान असल्याची जाणिव झाली होती आणि राहुल निवडणुकाकडे पाठ फ़िरवून पक्षबांधणी करीत असल्याचे साफ़ बघता आले होते, त्यालाच हाताशी धरून मोदी नावाच्या आव्हानाला सामोरे जाता येईल. कारण रमेश यांच्यापाशी स्वतंत्र बुद्धी आहे आणि मनातले बोलण्याची हिंमत आहे. त्याला प्रोत्साहन द्यावे लागेल. कारण तेव्हा जे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान होते, ते आता देशातील सर्वात मोठे व सर्व पक्षांसाठी मोठे आव्हान झालेले आहे. मात्र त्यातले आव्हान ओळखणार्‍यांचा दुष्काळ पडलेला आहे.

खिशात खुळखुळणारे पैसे वाढले, मग आपला खर्च वाढत असतो आणि तो भागवायचा तर सतत अधिकधिक पैसे मिळवावे लागतात. कॉग्रेसला सात दशकात सत्तेसाठी झगडावे लागत नव्हते. म्हणून चिदंबरम, अन्थोनी वा कपील सिब्बल इत्यादी बांडगुळे पोसणे शक्य झाले. त्यात मते मिळवू शकेल वा जनतेला पक्षाकडे आणु शकेल अशा नेत्यांना संधी नाकारली गेली आणि आता अशी बांडगुळेच पक्षाला पोखरून खाऊ लागली आहेत. त्यांना हाकलून नव्या दमाच्या व मेहनतीला सज्ज असलेल्या नेत्यांना जवळ करावे लागेल. स्थिती ओळखून आव्हाने पेलणारे नेतृत्व उभे करावे लागेल आणि तिथे जयराम रमेश यांच्यासारख्या कुशाग्र बुद्धीच्या नेत्यांना पर्यायच नाही. पण अधिवेशनात त्यांना कुठे व कितीसे स्थान होते? त्यांच्याइतके स्पष्ट व नेमके बोलू शकणारे कोण मंचापर्यंत पोहोचू शकले? ते झाले नाहीतर नुसत्याच मोदी विरोधातल्या वल्गना वा गर्जना कामाच्या नाहीत. ममता व चंद्रशेखर राव यांनी फ़ेडरल फ़्रंट बनवण्याचा घाट घातला आहे. म्हणजेच तेही राहुलच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या मनस्थितीत नाहीत. मग मोदीमुक्ती व्हायची कशी? कारण आजही स्थिती पाच वर्षापुर्वीचीच आहे. मोदीमुक्तीच्या गर्जना करणार्‍या कोणालाही नेमका मोदी कोण व कसा त्याचाच थांग लागलेला नाही. मग त्यापासून मुक्ती मिळायची कशी? मात्र दरम्यानच्या पाच वर्षात तोच मोदी आणखी अक्राळविक्राळ रुप धारण करून सामोरा येत आहे. मोदीमुक्तीचा घटोत्कच त्याने उलटा विरोधकांवरच कोसळून पाडला, तर २०१९ सालात काय होईल? तितकी नामुष्की नको असेल, तर राहुल गांधीनी अगोदर जय‘श्री’राम म्हणत रमेश यांचा धावा केला पाहिजे. रमेश वा त्यांच्यासारखे अनेक लहानमोठे वस्तुनिष्ठ नेते कॉग्रेसपाशीही नक्की आहेत. फ़क्त त्यांना ओळखून मदतीला घेणे व मोदीविरोधातली भेदक रणनिती तयार करणे अगत्याचे आहे.

Friday, March 23, 2018

मोदीमुक्त आणि मोदीयुक्त

gujarat riots के लिए इमेज परिणाम

पाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताची घोषणा करून टाकली. तसे त्यात नवे काहीच नाही. कारण मागल्या तीन वर्षापासून देशातील अनेक विरोधी पक्षांनी त्यासाठी अतोनात प्रयत्न चालविले आहेत. फ़ार कशाला २००२ सालापासूनच देशातले पुरोगामी पक्ष मोदीमुक्त गुजरात करण्याच्या मोहिमेत अहोरात्र गुंतलेले होते. पण त्यातून त्यांनी आधी भाजपाला मोदीयुक्त करून टाकले आणि पुढल्या काही वर्षात भारतीय राजकारणच मोदीयुक्त करून टाकले. राज यांनी त्याला नेमका एक शब्द बहाल केला. कारण मोदीमुक्त अशी शब्दयोजना त्यापुर्वी कोणी केलेली नव्हती. राष्ट्रीय राजकारणात मोदी आले, तेव्हा त्यांनी कॉग्रेअमुक्त भारत अशी शब्दावली योजली आणि त्यालाच वळण देत राज यांनी मोदीमुक्त शब्दाची रचना केलेली आहे. त्यासाठी त्यांनी देशातील बिगरभाजपा पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले आहे. या भाषणात प्रथमच राज यांनी मतांच्या धृवीकरणाचाही उल्लेख केला. हिंदू मतांचे धृवीकरण करण्यासाठी मोदी व भाजपावाल्यांची देशात दंगली माजवण्याचीही योजना असल्याचा आरोप राजनी केला. त्यातही तसे नवे काहीच नाही. गेल्या तीनचार दशकात भाजपा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभारी घेऊ लागला, तेव्हापासूनच पुरोगामी मानल्या जाणार्‍या पक्षांनी त्याच्यावर मतांच्या धृवीकरणासाठी दंगली माजवण्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे त्या अर्थाने आता राज ठाकरे यांच्या मनसेकडे देशातील एक पुरोगामी पक्ष म्हणून बघायला हरकत नसावी. मात्र अन्य प्रस्थापित पुरोगामी पक्ष ते मान्य करून राजना आपल्यात सामावून घेतात किंवा नाही, ते बघावे लागणार आहे. पण दरम्यान त्यांनी जी धृवीकरणाची भाषा वापरलेली आहे, तिचा उहापोह होण्याची गरज आहे. भारतीय वा मराठी राजकारणात हे काही परवलीचे शब्द तयार झाले आहेत. पण ते वाचणार्‍याला वा ऐकणार्‍याला अजिबात उमजत नाहीत. धृवीकरण त्यापैकीच एक शब्द आहे.

धृवीकरण हा वैज्ञानिक शब्द आहे. पृथ्वीला उत्तर व दक्षिण असे दोन धृव आहेत. या दोन धृवांमध्ये चुंबकीय शक्ती विभागल्या जात असतात. त्याच संदर्भाने हा शब्द राजकारणात योजला जातो. जेव्हा वस्तुमात्र दोन बाजूंनी ओढले जाते आणि त्यांचे विभाजन दोन टोकांमध्ये होते, तेव्हा धृवीकरण होते. हिंदू वा मुस्लिम किंवा कॉग्रेस आणि इतर विरोधी पक्ष, अशी मतांची विभागणी व्हायची त्यातून हा शब्द प्रचलीत झालेला आहे. दंगली माजल्या मग समाजाची धर्मानुसार वा भाषेनुसार विभागणी होत असते. याचा अर्थ राजकीय विचार वाजूला पडून वा विवेकाला सोडून, केवळ आपल्या अस्मितेच्या आहारी मातदार जातो, असे त्यातले गृहीत आहे. मोदी हे धृवीकरण करतात याचा अर्थ असा, की ते दोन गटात राजकारणाची विभागणी करतात, असा आक्षेप आहे. पण त्यात किती तथ्य आहे? निवडणूका जिंकण्यासाठी खरेच दंगल व हिंसाचाराने धृवीकरण घडवून आणता येते काय? अयोध्येत मशिद पाडली गेल्याने देशात अनेक जागी दंगली उसळल्या होत्या. खुद्द उत्तरप्रदेशात भाजपा तेव्हा सत्तेत होता आणि बाबरी पाडली गेल्यामुळे राज्य सरकार बरखास्त करण्यात आले. विधानसभाही बरखास्त करण्यात आली. नंतर झालेल्या मतदानात भाजपाच्या जागा घटल्या आणि मतदानही घटले. मग ज्यातून मते घटली, अशी दंगल त्या पक्षाने कशाला पेटवली असेल? दंगली माजल्याने भाजपाचा लाभ झाला असा कुठलाही दाखला देता येत नाही. कुठल्याही राज्यात कुठल्याही पक्षाला दंगलीचा लाभ मिळाला, असे सिद्ध करता येणार नाही. पण काही राजकीय विचारवंत अभ्यासकांनी तसा सिद्धांत मांडलेला आहे आणि आंधळेपणाने त्याची पुनरुक्ती राजकीय नेते व पत्रकार करीत असतात. २००२ च्या दंगलीचा लाभ मोदींना गुजरातमध्ये मिळाला, याचा कोणी इन्कार करू शकत नाही. पण त्यानंतरच्या विजयासाठी कुठल्या दंगली झाल्या होत्या?

२००७ किंवा २०१२ सालात मोदींनी दोनदा गुजरात विधानसभेत चांगले बहूमत मिळवले. पण दरम्यानच्या दहा वर्षात गुजरातमध्ये कुठलीही दंगल माजली नाही, त्यापुर्वी गुजरातमध्ये दर एकदोन वर्षांनी दंगली माजत होत्या आणि सातत्याने कॉग्रेसलाच सत्ता व बहूमत मिळत होते. मग तेव्हाच्या दंगली कॉग्रेस घडवून आणत होती आणि निवडणूकात मतांचे धृवीकरण करत होती काय? मोदींनी आपल्या कारकिर्दीत दंगलीला कायमचा पुर्णविराम दिला आणि तरीही तिनदा विधानसभा गुजरात राज्यात जिंकून दाखवली. मग धृवीकरण म्हणजे काय? दंगलीचा त्याच्याशी संबंध काय? धृवीकरण कुठल्या तरी पक्षाला लाभदायक ठरते यात शंका नाही. पण ते कोण घडवून आणतो, तेही तपासण्याची गरज आहे. धृवीकरण म्हणजे मतदारासमोर दोनच पर्याय शिल्लक ठेवणे होय. जेव्हा अशा दोनच पर्यायातून निवड करण्याची वेळ येते, तेव्हा तिसर्‍या चौथ्या वा अन्य पर्यायांना निकालात काढले जात असते. गुजरातमध्ये हीच स्थिती इतर पक्षांनी आणली आणि मोदींचा विजय सोपा करून ठेवला. तिथले संपुर्ण राजकारण राज्यापुरते नव्हेतर देशभरातही मोदीमय करून टाकण्याचे पाप विरोधकांचे आहे. २००२ च्या दंगलीचे निमीत्त करून मोदी विरोधातली अशी आघाडी उघडण्यात आली, की देशाच्या कानाकोपर्‍यात मोदी हे नाव विरोधकांनीच पोहोचवले होते. लालूंनी २००५ सालात गुजरात दंगलीची छायाचित्रे मतदारापर्यंत नेऊन बिहारी जनतेला मोदींचा परिचय करून दिला. त्याला धृवीकरण म्हणतात. मुस्लिमांच्या मतांसाठी लालूंनी हा उद्योग केला. पण त्यातून बिहारी हिंदू मतदारांना एका कडव्या हिंदूत्ववादी नेत्याचा पर्याय दाखवला गेला. त्याला धृवीकरण म्हणतात. तेच मग २०१२ नंतर देशभर झाले आणि मोदीमुक्तीच्या डावपेचातून देशभर मतांचे धृवीकरण होत गेले. त्याच्या परिणामी मोदींच्या बाजूनेही धृवीकरण आपोआप होत जाते ना?

मोदीमुक्त भारत या घोषणेचा अर्थ म्हणूनच मूळातून समजून घेतला पाहिजे. मोदीमुक्त म्हणजे राजकारणात मोदी नको असलेल्या मतदारांसाठी पर्याय देणे होय. पण तसे करताना जे बाकीचे लहानमोठे पक्ष आहेत, त्यांच्यात एकजीवता नाही. त्यांचे आपसात रागलोभ आहेत आणि त्यांच्या अनुयायी व मतदारांचेही रागलोभ असतातच. सहाजिकच असे विभिन्न प्रवृत्तीचे लोक नेत्यांच्या निर्णयामुळे एकत्र येतात, तसे त्यांचे अनुयायी वा मतदार एकत्र येत नाहीत. त्यांच्यातला बेबनाव राजकीय तडजोडीने संपत नाही. म्हणूनच मग अशा आघाडी पक्षातले नाराज असतात, त्यांना अकारण मोदींच्या बाजूने ढकलून दिले जात असते. आघाडीतल्या कुठल्याही पक्षाविरुद्ध मत असलेल्या मतदाराला मग ती आघाडीच नको, म्हणून मोदींच्या आश्रयाला जावे लागते. म्हणजेच मोदीमुक्त आघाडी मोदींना आयते धृवीकरण करून देत असते. हा विचार कोणी केला आहे काय? ज्यांना मोदी नको त्यांच्यासाठी आघाडी तयार होईल. पण आघाडीतल्या कुठल्याही पक्षाविषयीची नाराजी, मग आघाडीतल्या इतर पक्षांना भोगावी लागत असते. त्याच्यासाठी मोदींना कुठलेही खास प्रयत्न करावे लागत नाहीत, की धृवीकरण करावे लागत नाही. मोदींपेक्षाही ज्यांना मायावती वा मुलायम नको असतात किंवा ममता वा डावे नको असतात, त्यांना मोदी हा तिसरा पर्याय म्हणून सक्तीने स्विकारणे भाग पडते. त्यासाठी मोदींनी कुठलेही प्रयत्न केलेले नसतात. मग धृवीकरण कोण करतो व त्याचे लाभ कोणाला मिळतात? नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून भागत नाही. त्यांचा अर्थ व परिणामांकडेही बघावे लागत असते. राज ठाकरेंना सोबत घेतले तर उत्तर भारत, गुजरात वा अन्य प्रांतातील इतर पक्षांना आपली मतपेढी दिवाळ्यात घालवावी लागेल ना? मग धृवीकरण कोणाचे झाले? कोणासाठी झाले? मोदीमुक्त भारताची कल्पना म्हणूनच खुद्द मोदींनाच गुदगुल्या करीत असेल.

जसा बाप तसा पुत्र

संबंधित इमेज

(त्या वादग्रस्त चित्रमालिकेतील हे एक छायाचित्र)

गेले दोनतीन दिवस सोशल मीडिया व अन्य इंटरनेट माध्यमातून माहितीची चोरी करून मतदानाला प्रभावित करणार्‍या भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. त्यात जी नावे घेतली जात आहेत, त्यातले एक नाव चक्रावून टाकणारे आहे. कुठल्याही माध्यमवीर वा जाणत्या पत्रकाराला त्या नावाने चकीत कसे केले नाही, याचेच नवल वाटते. ते नाव आहे के. सी. त्यागी. ज्या केंब्रीज अनालेटिका कंपनीच्या नवाने शंख चालू आहे, तिच्या भारतीय उपकंपनीचा कर्ताकरविता अमरीश त्यागी, हा त्याच केसींचा सुपुत्र असल्याचे ऐकल्यावर खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. किंबहूना वेगळ्या क्षेत्रात जाऊन केसींच्या सुपुत्राने आपल्या पित्याचा वारसा कायम राखला, याची जाणिव झाली. गुजरात निवडणूकीच्या आधी या चिरंजीवांनी वा त्यांच्या परदेशी कंपनीने सोशल माध्यमातील सामान्य मतदाराची माहिती चोरून मतदान प्रभावित केल्याचा आरोप आहे. त्याचा गवगवा झाल्यापासून अमरीश बेपत्ता असून, तो पित्याच्याच दिल्लीतील सरकारी निवासस्थानी दडी मारून बसल्याचे सांगितले जात आहे. त्यात तथ्य असेल तर केसींना आपल्या पुत्राचा अभिमानच वाटेल. कारण आज अमरीशने जे काही पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केले आहेत, तितक्या सुविधा नसतानाच्या काळात चाळीस वर्षापुर्वी, पित्यानेही काही पराक्रम करीत भारतीय राजकारणाला कलाटणी दिलेली होती. तेव्हा आजच्यासारखे डिजिटल कॅमेरे व कॅमेराची सुविधा असलेले स्मार्टफ़ोन नव्हते. साधा फ़ोटोही काढताना कसरती कराव्या लागत होत्या. त्या काळात केसींनी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सुपुत्राचे प्रणयराधनाचे फ़ोटो टिपले होते आणि त्यामुळे जनता पक्षीय राजकारणाला विचित्र कलाटणी मिळून गेलेली होती. बाबू जगजीवन राम यांच्या राजकीय जीवनाचा अस्त त्यातूनच झालेला होता. मग तुलनेने अमरीश पित्याचीच गादी चालावित नाही काय?

१९७७ सालात देशात मोठी राजकीय क्रांती मतपेटीने घडवलेली होती. तेव्हा आणिबाणी उठली आणि चार पक्षांनी एकत्र येऊन मतविभागणी टाळण्यासाठी जनता पक्षाची स्थापना केलेली होती. त्यात आणिबाणीचा प्रस्ताव संसदेत मांडणारे बाबू जगजीवनरामही सहभागी झालेले होते. त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत होती. मात्र त्याच जनता पक्षाचे तितकेच खंबीर दावेदार चौधरी चरणसिंग यांचा बाबुजींना कडवा विरोध होता, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि दुसर्‍या क्रमांकाची लढाई चरण सिंग व बाबुजी यांच्यात जुंपलेली होती. त्यात अनेक समाजवादी नेतेही बाबुजींच्या समर्थनाला उभे ठाकलेले होते. प्रसंगी मोरारजींना बाजूला व्हावे लागले, तर बाबुंजींचा नंबर लागण्याची शक्यता असल्याने त्यांना राजकीय जीवनातूनच उठवण्याचा कट रचला गेला होता. तो चरणसिंग यांनी नव्हेतर त्यांचे हनुमंत संकटमोचक मानले जाणारे राजनारायण यांनी शिजवला असल्याचे तेव्हा कुजबुजले जात होते. त्या बुजूर्ग लोहियावादी नेत्याचे निकटवर्ति कमांडो अशी ज्यांची ओळख होती, त्यापैकी एक के. सी. त्यागी होते. ओमपाल सिंग व एपी सिंग असे आणखी दोघे त्यात होते. नेताजी राजनारायण यांच्या इशार्‍यावर या तिघा कमांडोंनी एक जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक बाबू जगजीवन राम यांच्यावर केलेला होता. त्यात बाबुजींचे लाडके पुत्र व माजी लोकसभापती मीराकुमार यांचे बंधू सुरेश कुमार असे काही फ़सले, की पित्याच्या राजकीय कारकिर्दीचा पुरता बोर्‍याच वाजला. सुरेश कुमार यांची एका महिलेशी शरीर संबंध करतानाची आक्षेपार्ह छायाचित्रे, या तिघा कमांडोंनी मिळवली होती आणि ती इंदिरा गांधींची सून चालवित असलेल्या ‘सूर्या इंडिया’ नावाच्या मासिकात प्रसिद्ध झालेली होती. त्याचा इतका गाजावाजा झाला, की बाबुजींना तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. त्या गौप्यस्फ़ोटाचा मानकरी म्हणून केसी त्यागी प्रथम जगासमोर आलेले होते.

अर्थात हे पाप आपण केले, असे त्यांनी कधी स्वत: कबुल केले नाही की सांगितले नाही. तशी वदंता होती आणि कुठलाही पुरावा समोर नव्हता. त्या काळात आजच्या सारखे अत्याधुनिक कॅमेरे नव्हते. पण जिथे ही छायाचित्रे टिपली गेली, ती जागा चौधरी चरणसिंग यांचा मतदारसंघ वा बालेकिल्ला होता. बागपत या शहरातील एका अत्यंत सुंदर महिलेशी सुरेश यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कथानक त्यातून जगासमोर आणले गेले होते. तसे काही खरोखर संबंध होते की चित्रणापुरता लावलेला तो एक सापळा होता आणि त्यात सुरेश कुमार फ़सले; त्याचा खुलासा कधीच होऊ शकला नाही. पोलोराईड तंत्राचा कॅमेरा त्यासाठी वापरला गेला होता. जिथल्या तिथे टिपलेल्या दृष्य़ाची प्रत देणारा हा कॅमेरा, नेमकी व स्वच्छ छायाचित्रे देऊ शकत नव्हता. पण चेहरे ओळखता येण्य़ाइतकी स्पष्टता त्यात असायची. असे करून जगजीवन राम यांना संपवण्याच्या त्या कारस्थानाचे मुळ सुत्रधार प्रख्यात लेखक संपादक खुशवंत सिंग होते, अशीही वदंता होती. कारण तेव्हा ते कॉग्रेसप्रणि्त गांधी खानदानाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड दैनिकाचे संपादक होते. शिवाय मनेका गांधींनी चालविलेल्या सूर्या इंडीया मासिकाचे संपादकीय सल्लागारही होते. त्याच मासिकात सुरेश कुमार यांची ही वादग्रस्त छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मग इतर माध्यमातून त्याचा गदारोळ झालेला होता. कोणीतरी या छायाचित्रांचे पाकिट सूर्या इंडियाच्या पत्रपेटीत आणून टाकल्याचा खुलासा त्या मासिकाने केला. परंतु लौकरच त्यामागचे सुत्रधार शोधण्याची मोहिम सुरू झाली व त्यातले छायाचित्रकार म्हणून जी तीन नावे समोर आली, त्यात केसी त्यागी हे एक नाव होते. तेव्हा ते कोवळ्या वयातील तरूण होते आणि असे काही धाडसी व आक्रमक करण्याची खुमखुमी त्यांच्यात होती. पण जे काही घडले त्यानंतर बाबु जगजीवनराम राजकारणातून जवळपास अस्तंगत झाले.

पुढल्या काळात केसी त्यागी यांची ही पार्श्वभूमी बहुधा सगळे माध्यमवीर विसरून गेले असावेत. किंवा नव्या पिढीतल्या आविष्कार स्वातंत्र्यविर वा स्टींगवीरांनाही आपला जनक मूळपुरूष माहिती नसावा. आजकाल बहुतेक वाहिन्यांवर केसी त्यागी जदयु या नितीशकुमारच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून प्रतिक्रीया देत असतात, किंवा चर्चांमधून सहभागी होत असतात. पण त्यांचा हा इतिहास कोणी सांगत नाही की त्यांना विचारला जात नाही. चाळीस वर्षापुर्वीचा हा इतिहास अडगळीत धुळ खात पडलेला असावा. आता त्याच केसींचा पुत्र अमरीश याने जो घोटाळा केला म्हटले जात आहे, त्यात पुन्हा कॉग्रेस कनेक्शन आहे आणि पित्याच्याही स्टींग कॅमेराशी कॉग्रेस कनेक्शन होते. हा योगायोग असेल किंवा त्यागी खानदानात तो वंश परंपरागत गुण आलेला असावा. दोन दिवस हे प्रकरण गाजत असताना पत्रकार जदयु नेत्याचा पुत्रचा त्यात गुंतालाय म्हणत होते. जेव्हा त्यागींचा उल्लेख आला, तेव्हा हा जुना इतिहास जसाच्या तसा आठवला. अमरीश याने वेगळ्या प्रकारे उद्योग केला असेल, पण राजकीय वादळ उठवणारे काम केलेले आहे. त्याविषयी पिताजी त्यागी यांचे म्हणणे काय आहे, त्याचा खुलासा अजून समोर आलेला नाही. सांगायचा मुद्दा इतकाच, की भारतीय राजकारणात अशी कारस्थाने व उचापती नव्या नाहीत. त्याचा उपयोग सढळ हस्ते प्रत्येक काळात होत राहिला आहे. साधने व सुविधा कमीअधिक झालेल्या असतील. अलिकडे असले उद्योग कुठल्याही वाहिन्या व पत्रकार छुप्या व आधुनिक कॅमेराने करीतच असतात. त्यात माहितीची चोरी हा इतका वादग्रस्त विषय होण्याचे कारण नाही. सलग बारा वर्षे मोदींच्या विरोधात खोटेनाटे आरोप जनमानसाच्या माथी मारण्याचा उद्योग सर्वच वाहिन्या व माध्यमांनीही राजरोस केला आहे. पण खोटेपण उघड झाल्यावरही कधी माफ़ी मागितलेली नाही. मग बिचारे त्यागी वा त्यांच्या पुत्राला सुळावर चढवण्याचे काय कारण?


Thursday, March 22, 2018

ममता दिदीची रामनवमी

Image result for mamtas ramnavami

त्रिपुरातील व अन्य विजयामुळे भाजपाचा विरोधकांनी धसका घेतला आहेच. पण बंगालमध्ये आज फ़ारशी ताकद नसलेल्या त्याच पक्षाला, प्रचंड बहूमत पाठीशी असूनही तृणमूलच्या ममता बानर्जी अधिक घाबरल्या आहेत. त्रिपुरातून डाव्यांची आघाडी उखडून टाकण्यात अपयश आलेल्या ममतांना तिथे भाजपाने जे यश मिळवले, त्याने पुरते रडकुंडीला आणले आहे. कारण आता ममता आपल्याच सापळ्यात फ़सलेल्या आहेत. म्हणून आजवर हिंदूंना हुलकावण्या देण्याचे धोरण सोडून, त्यांनीही हिंदूंच्या लांगुलचालनाचा पवित्रा घेतला आहे. गेल्या नवरात्रोत्सवात ज्या ममतांनी दुर्गा विसर्जनाला ठराविक वेळेचे बंधन घालून मोहरमच्या मिरवणूकींसाठी पक्षपात केला होता, त्यांनाच आता थेट रामनवमी जिल्हावार साजरी करण्याची उबळ उगाच आलेली नाही. भाजपाकडे अधिक संख्येने हिंदू मतदार आकर्षित होत असल्याच्या भितीने दिदीला कमालीचे पछाडले आहे. मात्र आता हिंदूंचे हक्क मानले, तरी मुस्लिम मतदार आपल्या हातातून निसटण्याची भिती त्यांना आहे आणि त्याच मुस्लिमांचे आणखी लांगुलचालन करत राहिले, तर हिंदू मतदारही हातून जाण्याची भिती भयभीत करते आहे. वास्तविक याची काहीही गरज नव्हती. २०१० सालात डाव्यांना पाणी पाजले, तेव्हा ममतांना मुस्लिम लांगुलचालनाची गरज पडलेली नव्हती. सहाजिकच त्यांनी भाजपाला दुखावण्यासाठी मुस्लिम मौलवींच्या दाढीला हात लावण्याचे काही कारण नव्हते. पण त्यांचे मुस्लिमप्रेम कमी आणि भाजपा द्वेष त्यांना शांत बसू देत नव्हता. आपणच मुस्लिमांचे कैवारी व भाजपाचे एकमेव विरोधक असल्याची पुरोगामी प्रतिमा उभी करण्याच्या नादात ममता मुस्लिम धर्मांधतेच्या कधी आहारी गेल्या, ते त्यांच्याही लक्षात आले नाही.  त्यानंतर जो मुर्खपणा केला त्याची किंमत आता मोजण्याची वेळ आली आहे. त्यातून हे रामनवमीचे सोंग त्यांना घ्यावे लागलेले आहे.

त्रिपुरात डाव्यांना कंटाळलेला मतदार आणि हिंदू यांचे नेतृत्व भाजपाने हाती घेतले आणि चमत्कार घडला. तेच २०१३ सालात तिथे ममतांनी केले असते, तर त्यांनाही त्रिपुरातून डाव्यांना हाकलून लावणे शक्य झाले असते. पण ममतांना तिथल्या दुखावलेल्या हिंदूंपेक्षा बंगालमधल्या मुस्लिम मतांची व त्यांच्या धर्मांध नेत्याची अधिक फ़िकीर होती. म्हणूनच त्यांनी त्रिपुरातील हिंदूंकडे डोळेझाक केली. त्याचा फ़ायदा बंगालच्या धर्मांध मुस्लिम नेत्यांनी इतका करून घेतला, की ममतांना त्या राज्यातील मुलायम सिंग बनवून टाकले. बाबरी पाडली गेल्यापासून मुलायमनी आपल्याला मुस्लिमांचा नेता म्हणून पेश करण्याचा प्रयत्न केला आणि हळुहळू समाजवादी पक्षच मुस्लिम लीग बनुन गेला. त्यात एकामागून एक मुस्लिम धर्मांध नेते व मौलवींचा भरणा होत गेला, पर्यायाने त्यांच्यापासून सामान्य हिंदू दुरावत गेला. त्याचा ओढा आपोआप मोदींकडे वाढत गेला. पुढल्या काळात तर गुजरात दंगलीची छायाचित्रे व बातम्यांचा अनेक राज्यातील पुरोगामी पक्षांनी मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी वापर  करून घेतला. पण त्यातूनच उलटलेली प्रतिक्रीया म्हणून दुखावलेला गांजलेला हिंदू मनात मोदीभक्त होत गेला, त्याचाच लाभ मोदींना २०१४ सालात लोकसभेच्या मतदानात मिळाला. खरे तर ममतांसारख्या नेत्यांनी व पक्षांनी त्यापासून धडा घेण्याची गरज होती. पण उलट ममताच लालू वा मुलायम होण्याच्या दिशेने धावत सुटल्या. आता त्याच पापाची भुते त्यांना सतावू लागली आहेत. दुसर्‍यांदा बंगालची विधानसभा मोठ्या फ़रकाने जिंकल्यावर ममतांना राष्ट्रीय नेता होण्याचे वेध लागले आणि त्यांनी नोटाबंदीपासून प्रत्येक बाबतीत केजरीवाल होण्याचाही प्रयास आरंभला. त्यासाठी मग बंगालमध्ये (नसलेल्या) भाजपाला उखडून टाकण्याचे खुळ त्यांनी मनावर घेतले आणि त्याच्या परिणामी भाजपा समजून हिंदू समाजालाच छळायला आरंभ केला.

एक गोष्ट स्पष्ट आहे. देशात हिंदू समाजाच्या बाजूने उभा रहाणारा भाजपा सोडून अन्य कुठला राष्ट्रीय पक्ष नाही. उलट मुस्लिमांचे वा अन्य धार्मिक अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन प्रत्येक पक्ष करत असतो. पण म्हणून सगळे हिंदू उठून भाजपाला मते देत नाहीत. बहुतांश पुरोगामी पक्षांना हिंदूंच्याच मतावर गुजराण करावी लागते. मग त्यांनी भाजपा विरोधासाठी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काय कारण आहे? तर त्याचे कारण मुस्लिमांना खुश करण्यासाठी! त्याचा अर्थ असा, की हिंदूंच्या भावना दुखावल्या तरच मुस्लिमांची मते आपल्याला मिळतील, असा काहीसा गैरसमज या पुरोगामी पक्षांनी करून घेतला आहे. त्यांना भाजपा व हिंदू यात फ़रक करण्याचे भान राहिलेले नाही. त्याच्या परिणामी त्यांच्याकडून हिंदू मानसिकता सतत दुखावली जाते आणि त्याच्या परिणामी त्या नाराज हिंदूला भाजपा खेरीज अन्य कुठला पर्याय शिल्लक उरत नाही. त्रिपुरा असो किंवा अन्य कुठल्या राज्यात असो, भाजपाची शक्ती त्यातूनच वाढलेली आहे. भाजपाने मग आपली रणनिती म्हणून सर्वत्र हिंदूंचे धार्निक सण, हा आपला अजेंडा बनवलेला आहे आणि त्यात भाजपाचा पुढाकार दिसला मग पुरोगामी पक्ष व नेते त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहातात. केरळात वा बंगालमध्ये तेच झाले आणि त्यातून भाजपाचा पाया घातला गेला आहे. ममतांनी तर कहर केला, बंगालमध्ये दुर्गापूजा हा हिंदूंचा दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणून पाळला जातो. तर त्याच दुर्गेच्या मुर्तीचे विसर्जन करण्याला मुदतीचे बंधन घालून ममतांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. अखेरीस त्यांना कोर्टानेच कानपिचक्या दिल्या. पण त्यातून झाले काय? मुस्लिमांसाठी ममता हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवतात, अशी समजूत तयार झाली. भाजपाने तसा राजकीय आरोप केलेलाच होता. तर ममतांनी आपल्या दिवाळखोर कृतीतून त्याला दुजोरा दिला. त्यामुळे आता रामनवमी करण्याची नामुष्की आलेली आहे.

गेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या. देवदर्शनाचा तमाशा केला आणि त्यामुळेच कॉग्रेसची मते वाढल्याचा समज अनेकांनी करून घेतला आहे. गुजरातमध्ये भाजपाची मते कमी झाली नसून वाढलेली आहेत आणि ठराविक जागी नाराज गठ्ठे विरोधात गेल्याचा लाभ कॉग्रेसला मिळू शकला आहे. केवळ राहुलच्या मंदिरात जाण्यामुळे कॉग्रेसला लाभ मिळालेला नाही. हिंदू मतदार तितका मुर्ख नाही. अन्यथा या देशात पुरोगामी पक्षांना कधीच गाशा गुंडाळावा लागला असता. पण त्यांच्या अतिरेकी भाजपा विरोध व त्यासाठी हिंदूंना दुखावण्यातून त्यांनी आपल्यावरच हिंदू लांगुलचालनाची नामुष्की ओढवून आणलेली आहे. त्याची काडीमात्र गरज नाही. भाजपा व हिंदू समाज यात फ़रक केला, तर त्यांच्याकडून कुठला धार्मिक पक्षपात होणार नाही. बाकी काही अधिक करण्याची गरज नाही. ममतांनाही तसे काही करण्याची गरज नव्हती, की मुस्लिम मौलवी व धर्मांध नेत्यांना डोईजड करण्य़ाचे कारण नव्हते. तितका समजूतदारपणा दाखवला असता, तर आज रामनवमीचे नाटक करावे लागले नसते. आताही त्यांनी नवमी करावी किंवा राहुलनी देवस्थानांच्या वार्‍या कराव्यात. त्यामुळे या पक्षांची मते वाढणार नाहीत की भाजपाला त्याचा तोटाही होण्याची शक्यता नाही. पुरोगामी म्ह्णजे हिंदूंचे शत्रू; ही प्रतिमा त्यांनी स्वत:च आपल्या वागण्याबोलण्यातून उभी केली आहे. ती केवळ त्याच मार्गाने पुसून टाकण्याची गरज आहे. कारण हिंदू समाज कधीच धर्माच्या नावाने मते देत नाही व देणारही नाही. पण धर्माच्या नावाने आपल्यावर अन्याय होतो असे दिसले, मग हिंदू मतदार चवताळल्यासारखा मतदानातून उत्तर देतो. ममतांच्या हे लक्षात आले असते तर त्यांनी आधी चुक केली नसती. आणि आता नवमीचा सोहळा साजरा केल्याने त्याची भरपाईसुद्धा होण्याची शक्यता नाही. कारण दिदीच्या अतिरेकाने भाजपाला बंगालमध्ये पाय रोवून उभे केले आहे ना?

Wednesday, March 21, 2018

अगतिक मुंबईकर

Image result for mumbai rail roko dadar

सोमवारी भल्या सकाळी रेल्वेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने मुंबईला ओलिस धरायला लोहमार्गावर एकत्र आले. देशाच्या कानाकोपर्‍यातून हे हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईत जमा झालेले होते आणि त्यांनी दादर-माटुंगा अशा लोहमार्गावर ठाण मांडून मध्यरेल्वेची संपुर्ण वाहतुक कोलमडून टाकली. भल्या सकाळी दूर कल्याण कर्जत कसारा येथून आपल्या कामधंद्यासाठी दक्षिण मुंबईच्या दिशेने येणार्‍या लाखो मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडाली. मुद्दा त्यांची अशी तारांबळ उडण्याचा नाही, किंवा एकूणच मुंबईला आपल्या समस्येसाठी ओलिस ठेवणार्‍या प्रशिक्षणार्थींचाही नाही. देशात अशा प्रकारची आंदोलने अधूनमधून कुठल्याही प्रांतात व राज्यात होतच असतात. मुंबईत होण्याचे वेगळेपण इथल्या नागरी व भौगोलिक रचनेमध्ये सामावलेले आहे. प्रशिक्षणार्थी देशभरातील होते, तर त्यांनी मुंबईला ओलिस कशाला ठेवावे? बिहार वा बंगाल तामिळनाडूपासून आलेले हे हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकराला का ओलिस ठेवतात? तर इथे काही करणे शक्य आहे आणि इथे केल्यास त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ शकेल, अशी त्यामागची मानसिकता आहे. त्यांच्या बाबतीत अन्याय झाला व त्यांनी दाद मागण्यात काही चुक नाही. पण त्यात मुंबईकर भरडला जातो, त्याच्या अधिकार, हक्क व न्यायाचे काय? ज्या मुलांच्या परिक्षा होत्या, त्यांनी काय गुन्हा केला होता? असे काही घडले, मग त्याचे सरकारच्या वा प्रशासनाच्या माथी खापर फ़ोडणे ही सुद्धा आता फ़ॅशन झाली आहे. जणु कोणालाही खर्‍या प्रश्नाला हात घालायची इच्छा नाही, की ते सत्य बोलण्याची भिती वाटत असावी. म्हणूनच ते सत्य बोलायचे नाही, हा जणू अलिखीत नियम झाला आहे. समस्या मुंबईची नसून मुंबईच एक देशव्यापी समस्या झालेली आहे. किंबहूना मुंबई हीच राष्ट्रीय समस्या बनवण्यात आलेली आहे. सहाजिकच समस्येतच जीवन शोधणार्‍यांनी समस्येविषयी तक्रार करण्यात अर्थ नसतो.

कुठल्याही व्यक्तीची हत्या करताना दुबळी नाजूक जागा शोधून हल्ला केला जातो. गळा कापून वा छातीत भोसकून गोळ्या घालून खुन पाडला जातो. कारण माणसाचे जीवन त्याच वळणावर अतिशय नाजूक असते. गळा कापला, मग श्वासनलिका तुटते आणि रक्तस्त्राव होऊन माणूस झटपट मारला जाउ शकतो. छातीत गोळ्या झाडल्या वा भोसकले, मग हृदय फ़ुफ़्फ़ूसाला छेद जाऊनही माणूस तात्काळ मरतो. म्हणून तर चिलखत अशाच जागी वापरले जात असते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिच्या नाड्या आवळल्या, म्हणजे देशालाही कासाविस करून टाकता येते. म्हणून कसाब वा दाऊद मुंबईला आपले लक्ष्य बनवत असतात. परंतु ते तर देशाचे शत्रू आहेत. बाकी जे कोणी देशाचे राष्ट्रवादी नागरिक वा नेते आहेत, त्यांना मुंबईविषयी किती आस्था आहे? ही देशाची आर्थिक राजधानी घुसमटली किंवा तिचा गळा कापला गेला तर काय व्हायचे, असे कुणा देशप्रेमी भारतीयाला वाटते काय? कारण मुंबई हेच भारताचे धडकणारे हृदय आहे आणि तोच भारतीय आर्थिक व्यवस्थेचा गळा सुद्धा आहे. परवा मुठभर प्रशिक्षणार्थींनी तोच गळा थोडा काळ आवळला. कसाबने त्याच मुंबईचे नाक दाबले होते. त्यांना हे शक्य झाले, कारण त्या मुंबईला आपणच सर्वांनी नाजुक करून टाकलेले आहे. या मुलांच्या मनात कुठलीही दहशत माजवण्याची इच्छा नव्हती, हे कोणीही सांगू शकेल. पण त्यांच्या कृतीमुळे मुंबईचे प्राण तात्काळ कंठी आले होते. कुणालाही सुगावा लागू न देता या मुलांनी किती नेमकी जागा निवडली व अवघ्या मुंबईला ओलिस ठेवले ना? त्यांनी माटुंगा दादर यामधला दिडदोन किलोमिटर्स लांबीचा लोहमार्ग आपल्या आंदोलनासाठी निवडलेला असला, तरी तो मार्ग इतका नाजूक वा वर्मावर बोट ठेवण्याइतका प्राणघातक त्या मुलांनी बनवलेला नाही. ज्यांच्यापाशी मुंबईचे नियंत्रण व अधिकार आहेत, तेच त्यातले दोषी आहेत.

मागल्या अर्धशतकात मुंबईची लोकसंख्या सतत वाढती ठेवण्यातून अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. १९६० च्या दशकात मुंबईवरचा भार उठवण्यासाठी खाडीच्या पलिकडे नवी मुंबई वसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला गेला. त्याला आज नवी मुंबई म्हणून ओळखले जाते. पण ती नवी मुंबई आहे की नवे ठाणे वा नविन बोरिवली आहे, असा प्रश्न पडतो. त्याला मुळातच जुळी मुंबई वा जुळे शहर अशी कल्पना घेऊन विकसित करायचे ठरले होते. पण त्यालाही मुंबईवरच विसंबून राखताना मुंबईचे विकेंद्रीकरण करायचे कोणालाही स्मरण राहिले नाही. आजही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या कारस्थानाचा आरोप होतच असतो. पण विकेंद्रीत मुंबई झाली असती, तर मुंबई तोडण्याची भितीच कशाला भेडसावू शकली असती? पनवेल, विरार-पालघर वा कर्जत कसार्‍यापासून लाखो लोक दक्षिण मुंबईतच सकाळी यावे, अशी काय गरज आहे? अनेक बड्या कंपन्या वा त्यांची व्यावसायिक कार्यालये यामुळे दक्षिण मुंबईत लाखो लोकांना यायला भाग पडते. प्रशासनाची वा महत्वाची कार्यालये मुंबई बेटाच्या बाहेर हलवली गेली असती, तर तशी नौबत आली असती का? मध्यरेल्वे वा अन्य उपनगरीय रेल्वे व तसे महामार्ग हे मुंबईत लोंढा आणतात आणि मग संध्याकाळी तोच लोंढा माघारी फ़िरत असतो. मोक्याच्या क्षणी त्याच्या नाजुक वळणावर कोंडी केली, तर हजारो माणसांना कुठलीही गोळी झाडल्याशिवाय यमसदनी पाठवणे शक्य आहे. कारण या लाखो लोकांना घराबाहेर काढून तासभरासाठी नाजुक वळणावर आणून ठेवण्याचीच योजना मागल्या अर्धशतकात अविरत राबवली गेली आहे. त्यातून मुंबईत अशी पंधरावीस तरी नाजुक वळणे व जागा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या कुणा जिहादी अतिरेक्याने वा त्या प्रशिक्षणार्थींनी उभ्या केल्या नाहीत. त्याला नियोजनकार व व्यवस्थापन कारभारी जबाबदार आहेत.

ओलिस ठेवण्यास योग्य अशी मुंबईची रचना व विस्तार ज्यांनी केला, तेच त्यातले जबाबदार लोक आहेत. पुर्वी बालवाचनासाठी ज्या मनोरंजक गोष्टी असायच्या, त्यात मोठ्या भयंकर राक्षसाचा जीव म्हणून कुठल्या तरी पिंजर्‍यात बंदिस्त असलेल्या पोपट वा पक्षामध्ये ठेवलेला असायचा. त्या पोपटाच गळा आवळला, तरी राक्षसाचे प्राण घुटमळू लागायचे आणि त्याला सहज मारता यायचे. तशी मुंबई आता एका पिंजर्‍यातल्या पक्षात ठेवलेला देशाचा जीव बनला आहे. किंबहूना बनवला गेला आहे. देशाचा सर्वाधिक पैसा वा उलाढाल मुंबईतून होते आणि म्हणून कोणीही अवघ्या देशाला ओलिस ठेवण्यासाठी मुंबई नावाच्या पिंजर्‍यात वास्तव्य करणार्‍या मुंबईकर नामे पक्षाचा गळा आवळू लागतो. तसे केले मग दिल्लीत व देशभर सत्ता गाजवणार्‍या महाकाय सत्तेचा जाग येते. तिचा जीव घुसमटू लागतो, हे समिकरण झाले आहे. पण तशी मुंबईची नाजुक अवस्था कोणी केली, तेच खरे गुन्हेगार आहेत. देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई शहराला देशातील सर्वात अगतिक महानगर करून टाकले आहे. ते पाप ज्यांचे आहे, तेच मग मुंबईकरांच्या अशा घुसमटीचे खरे गुन्हेगार असतात. सात लहान बेटांच्या समुहाला जोडून बनवलेल्या एका मोठ्या बेटावर किती लोक वास्तव्य करू शकतात आणि तिथली नागरी व्यवस्था किती भार सोसू शकते; याचे भान सुटलेल्यांच्या हाती व्यवस्था गेल्यावर यापेक्षा अधिक दुरावस्था काय होईल? सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापून सगळीच अंडी फ़ाटाफ़ट मिळवू बघणार्‍यांची गोष्ट यातून खरी वाटू लागते. मग त्या कोंबडीला आपण सोन्याचे अंडे देतो, त्याविषयी अभिमान वाटण्यापेक्ष तो अभिशाप वाटू लागतो. आज मुंबईची तशी दुर्दशा झालेली आहे. कोणीही केव्हाही यावे, उठावे अणि मुंबईचा गळा आवळून कोणालाही धमक्या द्याव्यात, इतकी मुंबई अनाथ वा अगतिक होऊन गेलेली आहे. कारण राखणदारच गारदी झाले आहेत.

झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित

झुंडीतली माणसं   (लेखांक अकरावा)

Image result for riots in india 2018

झुंडी नेहमी भावनांच्या दोन टोकात वावरतात. झुंडींना मधली स्थिती कधीही माहित नसते. झुंडींची तुलना रानटी किंवा अडाणी माणसाशी करता येईल. रानटी माणूस फ़क्त ढोबळ गोष्टी तेवढ्या पहातो. झुंडींनासुद्धा ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात्त, सुक्ष्म विचार त्यांना करता येत नाही. झुंडी टोकाची भूमिका घेतात. तसेच त्या अंधश्रद्धाळूही असतात. कसल्याही गोष्टीवर त्यांचा चटकन विश्वास बसतो. झुंडीच्या या स्वभावामुळे शंका घेणे, ही गोष्ट त्यांच्या रक्तातच नसते. झुंडींना एखाद्या गोष्टीचा संशय येतो न येतो, इतक्यात त्या घटनेचे रुपांतर शाश्वत सत्यात झाले म्हणून समजा. नापसंतीचे रुपांतर दुसर्‍या क्षणी द्वेषात झाले नाही तर झुंडींना चैन पडणार नाही. झुंडी रागाच्या आहारी जातात. झुंडींच्या जागी जबाबदारीची भावना अभावानेच असते. त्यामुळे झुंडींच्या, विशेषत: बहुजिनसी झुंडींच्या मनोविकाराची तीव्रता फ़ार झपाट्याने वाढत जाते. झुंडीत सामील होताच माणसे स्वत:च्या उणिवा लगेच विसरून जातात. उलट आपण कोणीतरी फ़ार शक्तीमान दैवी पुरूष आहोत असे त्यांना वाटू लागते. झुंडीत गेलेल्या मुर्ख, अज्ञ, मत्सरी माणसांना स्वत:च्या क्षुद्रतेचा, लाचार स्वभावाचा व भेकडपणाचा तात्काळ विसर पडतो आणि स्वत:ला ती उदार, प्रतापी व शूर समजू लागतात.
झुंडी अतिरेक करतात, पण हा अतिरेक साधारणपणे वाईट बाबतीत असतो, चांगल्या बाबतीत नाही. झुंडीत शिरताच माणसे आदिम माणसाची सांस्कृतिक पातळी गाठतात असे आपण म्हटले, त्याचा हा परिणाम असतो. एकटा माणूस शिक्षेला घाबरून सरळ मार्गाने जातो. झुंडींना शिक्षेची तमा नसते. म्हणून त्या वाटेल तशा वागू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की झुंडी नेहमीच वाईट कृत्ये करतात. झुंडींच्या उत्साहाला कौशल्याने वळण दिले तर त्याच झुंडी पराक्रमाची आत्मत्यागाची आणि औदार्याची कृत्ये करू शकतात. उदात्त गुणांचा प्रत्ययसुद्धा एकेकट्या व्यक्तीपेक्षा झुंडीच अधिक प्रमाणात देतात. ( झुंडीचे मानसशास्त्र, पृष्ठ ३७-३८)

गेल्या आठवड्यात त्रिपुराचे निकाल लागल्यानंतर देशाच्या विविध भागात पुतळे फ़ोडण्याची व विटंबित करण्याची नवी लाट आलेली आहे. त्यामागे झुंडीची मानसिकता दडलेली आहे. त्याची सुरूवात त्रिपुरातील भाजपाच्या विजयाने झाली, म्हणून मग त्याचे खापर त्या पक्षावर किंवा संघावर फ़ोडले जाणे स्वाभाविक आहे. पण भाजपाच्या वा तत्सम विचारधारेच्या लोकसंख्येत वा झुंडीतच अशा आक्रस्ताळ्या प्रतिक्रीया येतात, असे मानायचे काही कारण नाही. तसे नसते तर प्रगत मानल्या जाणार्‍या युरोप खंडातल्या अनेक देशात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक मोठे दिव्यभव्य पुतळे वा स्मारके जमिनदोस्त करण्याची झुंबड उडाली नसती. तो मानवी स्वभावाचा एक अपरिहार्य घटक आहे. त्यात प्रगत सुशिक्षित वा बुद्धीमान असला भेदभाव करून चालत नाही. उलट अनेकदा बुद्धीमान लोकांच्या झुंडीने अडाण्यांपेक्षा भीषण कारवाया केल्या आहेत. त्याच्याशी त्यांच्या तल्लख बुद्धीमत्ता वा सुशिक्षित असण्याशी काडीमात्र संबंध नाही. त्यावेळी वा ठराविक कालखंडात अशी माणसे झुंडीत सहभागी होत असल्याने त्या घटना घडत असतात. त्याची सुक्ष्म कारणे उपरोक्त परिच्छेदामध्ये आलेली आहेत. माणूस हा टोळीनेच जगत असतो आणि प्राण्याच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. उलट आधुनिक शिक्षण, मिळवलेले ज्ञान वा आत्मसात केलेली बुद्धी; ह्या वरवरच्या गोष्टी असतात. त्या वरच्या कवचाला छेद दिला वा गेला, मग क्षणार्धात मुळची कळपवृत्ती उफ़ाळून बाहेर येत असते आणि आपला प्रभाव दाखवित असते. कारण सुशिक्षितपणा वा ज्ञानार्जन, ह्या लादलेल्या गोष्टी असतात आणि कळपवृत्ती ही उपजत असते. शिक्षण वा बुद्धी तुम्हाला संयम शिकवते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट झाला, मग उपजतवृत्ती ज्वालामुखीसारखी उफ़ाळून येते. प्रामुख्याने पोषक वातावरण जाणवले, की त्या रानटी वृत्तीला चालना मिळत असते. त्रिपुरात त्याचीच प्रचिती आलेली आहे.

लेनिनच्या पुतळ्याच्या उध्वस्तीकरणाकडे जाण्यापुर्वी त्रिपुरात भाजपाला इतके मोठे यश कशाला मिळाले, त्याचे विश्लेषण अगत्याचे ठरावे. तिथे विविध कळपात, गटात विभागल्या गेलेल्या मोठ्या लोकसंख्येला डावी आघाडी वा कम्युनिस्ट नावाच्या एका अल्पसंख्य कळपाने ओलिस ठेवलेले होते. छोट्या कळपांना एकेकटे गाठून त्यांना भयभीत करण्यावर त्रिपुरात दिर्घकाळ डाव्या आघाडीची सत्ता चालू राहिली होती. तिची दहशत किती भयंकर होती, त्याची साक्ष मतदान होऊन निकाल येईपर्यंत लोकांनी पाळलेल्या संयमात मिळू शकते. डाव्यांचा तिथे पराभव होऊ शकतो, यावर देशातल्या कुठल्या पत्रकाराचा वा जाणत्याचाही विश्वास नव्हता. मग पुन्हा तेच सत्तेत आले तर आपल्या विरोधाचे शिरकाण होण्याच्या भयाने कोण मतदार उघड बोलू शकणार होता? म्हणून निवडणूक काळात तिथे भयाण स्मशानशांतता होती. पण आजवरच्या दहशतीचे निर्दालन करण्यासाठी तिथल्या बहुसंख्य मतदाराने कंबर कसलेली होती. त्याचेच प्रतिबिंब निकालात पडलेले आहे. मात्र तो दिसतो तसा भाजपाचा राजकीय विजय नसून, डाव्यांच्या दहशतीचा केविलवाणा पाडाव आहे. ते काम आधी तॄणमूल वा कॉग्रेसने नेटाने हाती घेतले असते आणि डाव्यांच्या दहशतीला उलथून पाडण्याच्या आकांक्षांना खतपाणी घातले असते; तर तिथे भाजपाऐवजी अन्य कुणाचा विजय होताना दिसला असता. पुतळा पाडण्यापासून अनेक गावातल्या डाव्यांच्या कार्यालयावर हल्ले करणार्‍या जमावाला भाजपाच्या विजयाशी कर्तव्य नव्हते. त्यांना डाव्यांना संपवायचे होते आणि असे लहानमोठे सगळीकडले कळप भाजपाने प्रयत्नपुर्वक आपल्या पाठीशी आणून उभे केले. त्यांना मतातून सत्तापालट व पर्यायाने दहशत संपवण्याची आशा दाखवली व चमत्कार घडला. पण त्याचा लेनिनच्या पुतळ्याशी काय संबंध होता? पुतळा पाडण्याची काय गरज होती? नाहीतरी डाव्यांची सत्ता संपलेलीच होती ना?

सवाल डाव्यांची सत्ता संपण्यापुरता नव्हता. तो विषय भाजपापुरता मर्यादित होता. त्याचा सामान्य लोकांशी काडीमात्र संबंध नव्हता. सामान्य लोकांना डाव्या आघाडीला उध्वस्त होताना व जमिनदोस्त होताना बघायचे होते. सत्ता नावाच्या काल्पनिक समजूतीने ते समाधान मिळणे शक्य नव्हते. त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कुठल्या तरी प्रतिकातून होत असतो. सामान्य लोक चिकित्सक बुद्धीचे नसतात वा त्यांची बुद्धी चिकित्सक विचार करू शकत नाही. त्यामुळेच त्यांना प्रतिकातून प्रेरणा मिळत असते. शत्रू वा मित्रही प्रतिकात दडलेले असतात. कम्युनिस्ट सत्ता वा त्यांची दडपशाही जुलूम, याचे प्रतिक लाल झेंडा वा लेनिन स्टालीनचे पुतळे असतात. जागोजागी असे पुतळे वा झेंडे लावून आपली शक्ती वा दहशत माजवणारेही, त्याच हेतूने प्रतिके वापरत असतात. त्यामुळे या पुतळ्यांना वा प्रतिकांना निर्जीव म्हणून भागत नाही. रशियात सोवियत सत्ता उलथून पडल्यावर म्हणूनच लेनिन स्टालीनचे पुतळे उध्वस्त करण्यात आले. हे सर्व त्रिपुराचे निकाल लागल्यानंतरही झाले. कारण आता डाव्यांच्या हाती सत्ता उरली नाही आणि ते आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत, हे झुंडीतल्या लोकांना उमजलेले होते. आसपास पक्षाचे कार्यकर्ते, गुंड वा पुरस्कर्ते दिर्घकाळ दहशत माजवत होते. त्यांच्या विरोधात दबलेला प्रत्येकजण साचलेला राग काढायला टपलेला होता आणि त्याचीच प्रतिक्रीया पुतळ्याला उध्वस्त करण्यातून उमटली. हे सर्व भाजपाच्या नेतृत्वाला मान्य नसले तरी त्यांना त्या झुंडींना रोखता आले नसते. कारण झुंडींना प्रतिके समजतात आणि बुद्धीवादी युक्तीवाद समाधान करू शकत नसतात. घटनात्मक पाडाव झुंडींच्या समजुतीपलिकडला विषय असतो. त्यामुळेच त्यावरून जे युक्तीवादी रणकंदन माजलेले आहे, त्याचा काडीमात्र उपयोग नाही. त्यापेक्षा समाजातली झुंडीची मानसिकता समजून घेण्याला प्राधान्य असायला हवे.

अर्थात त्यासाठी दुर जाण्याची अजिबात गरज नाही. एकदा त्रिपुरातील त्या घटनेची माहिती समोर आली, त्यानंतर विरोधात कोणत्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत? त्या प्रतिक्रीया बुद्धीवादाची साक्ष देणार्‍या आहेत काय? कोलकाता येथील एका विद्यापीठाच्या आवारात भाजपाला पूजजीय वाटणार्‍या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याही पुतळ्याची डाव्या विद्यार्थ्यांनी विटंबना केली. मोडतोड केली. त्रिपुरातील जमाव तरी सामान्य होता, विद्यापीठातील उच्चशिक्षण घेणार्‍या, पुरोगामी म्हणवणार्‍या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले. तर त्याला काय म्हणायचे? तेही सुशिक्षित असून झुंडीचाच भाग नाहीत काय? हिंदूत्ववादी वा संघाच्या समर्थकांची झुंड असेल, तर डाव्या विचारसरणीच्या हुशार बुद्धीमान विद्यार्थ्यांनी कोणते संयमाचे संहिष्णूतेचे प्रात्यक्षिक दाखवले? दोन्ही बाजू तितक्याच दांभिक असतात. ते आपापले कळप बनवून विचाराचे मुखवटे पांघरत असतात. त्या बुरख्याच्या मागे तितकाच हिंस्र रानटी माणूस दडलेला असतो. जोपर्यंत समोरचा माणुस वा कळप आपल्या दडपशाहीला शरण जात असतो, तोपर्यंतच आपणही संयम सहिष्णूतेचे नाटक रंगवित असतो. समोरचा संयम सोडून अंगावर येतो, तेव्हा आपलाही मुखवटा टराटरा फ़ाटून जातो. वरकरणी लावलेला बुद्धीवादाचा चेहरा गळून पडतो आणि आपल्या मनातली झुंडशाही झेप घेऊन बाहेर येते. कारण त्या सामान्य अज्ञ वा निर्बुद्ध झुंडीपेक्षा आपल्यात वेगळी कुठलीही वैचारिक पातळी नसते. प्रश्न शिरजोर कोण आहे आणि कोणाचा टिकाव लागणार आहे, इतकाच असतो. त्या घनघोर लढाईत आपल्याला रक्तबंबाळ व्हावे लागणार असेल वा जीवाचे भय असेल, तर संयमाचे वा संहिष्णूतेचे नाटक सुरू होते. ज्या क्षणी समोरची बाजू दुबळी पडते, त्याक्षणी आपला संयम संपतो आणि आपणही हिंस्त्ररुप धारण करून रानटी वागू लागतो. मात्र ते सत्य स्विकारण्याची आपली तयारी नसते.

एका झुंडीने लेनिनचा पुतळा पाडल्यावर जो गहजब चालू झाला, ते तमाम लोक आपण विचारवंत वा बुद्धीजिवी असल्याच्या थाटात बोलत होते. समोरच्या म्हणजे संघ वा भाजपाच्या विचारातच हिंसा असल्याचा दावा करत होते. पण खरेच त्यांची डावी पुरोगामी विचारधारा तितकी संयमी वा सहिष्णू असती, तर कोलकात्यात मुखर्जींच्या पुतळ्याची मोडतोड झाली नसती, की डाव्या विद्यार्थी संघटनेकडून झाली नसती. आणखी एक बाब म्हणजे पुतळा ही केवळ निर्जीव वस्तु वा प्रतिमा असल्याने तिच्या मोडतोडीने विचार मारला जात नाही, हा बुद्धीवाद कोण विसरला? खरा चिकित्सक त्या मोडतोड करणार्‍यांची कींव करून मोकळा झाला असता. त्यापेक्षा अधिक काही प्रतिक्रीया आली नसती. पण तमाम शहाणे डावेही रडकुंडीला आले. कारण त्यांची बुद्धीही अशा प्रतिकापर्यंत येऊन कुंठीत झालेली आहे. लेनिनच्या पुतळ्याची विटंबना झाली वा मोडतोड झाली, म्हणजे आपले विचारही धोक्यात आले असे त्यांना जाणवले. मनापासून वाटले. याचा अर्थच त्यांचे विचार मारले जाऊ शकतात वा संपुष्टात येऊ शकतात. निदान अशा डाव्यांचा त्यावर पुर्ण विश्वास आहे. पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येनंतर असेच पांडित्य सांगितले गेले होते. माणूस मारता येतो, विचार मारत येत नाहीत. पण प्रत्यक्ष वर्तनात त्याची प्रचिती येत नाही. कारण अशा लोकांनाही मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या विचारापेक्षाही त्याच्या हत्येची चिंताच भेडसावत असते. अन्यथा बाकीची चळवळ बाजूला ठेवून खुनी पकडा, म्हणून वेळ खर्ची घातला गेला नसता. गांधींपासून पानसरेंपर्यंत खुनी कोण याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?

सामान्य बुद्धीचा जमाव आणि सुशिक्षित बुद्धीजिवी घोळका, यात तसूभरही फ़रक नसल्याची यातून साक्ष मिळते. तसे नसते तर त्रिपुरातील एका पुतळ्याची विटंबना देशाच्या अन्य भागातही तशाच घटनांची लाट घेऊन आली नसती. प्रतिकांना पुसून टाकण्याची, नष्ट करण्याची अतीव इच्छा, ही रानटीपणाचे लक्षण आहे. पण त्यामध्ये सामान्य झुंडीइतकेच बुद्धीजिवीही पुढाकार घेतना दिसतात, तेव्हा माणूस अजूनही रानटी अवस्थेत जगत असल्याची खात्री पटते. एका उथळ दिवट्या संपादक पत्रकाराने तर म्हणे संघाचे मुख्यालय उध्वस्त करण्याची हमी दिलेली आहे. आमचे सरकार येऊ देत, मग नागपुरात तुमचे कार्यालय कसे शिल्लक उरते बघूया. असली भाषा बोलणार्‍याचा कोणा पुरोगामी विचारवंत वा पत्रकाराने, नेत्याने निषेध केल्याचे बघण्यात नाही. म्हणजेच इकडचे असोत वा तिकडचे असोत, विचारवंतही झुंडीतले जमावातले दंगलखोर असल्याचे पुरावे मिळत असतात. प्रत्येकाने पांघरलेला संयम सहिष्णूतेचा मुखवटा हिंसेची संधी सापडण्यापर्यंतच शाबुत असतो. जेव्हा तशी संधी मिळते त्याक्षणी तो मुखवटा गळून पडत असतो. प्रत्येकजण आपापल्या झुंडीत शिरून अमानुष हिंसा करायला उतावळा झालेला असतो. त्याच्या मनात दडी मारून बसलेला रानटी पशू क्षणात झेपावण्यासाठी सज्ज असतो. त्याची कळपवृत्ती सुप्तावस्थेत असते, योग्य सूचनांची, प्रेरणांची प्रतिक्षा करत असते. त्रिपुरात आजवर डाव्या सत्तेमुळे त्या कळपाला शिरजोर वागता आले. त्यांचा वरचष्मा संपल्याचे संकेत मतमोजणीतून येताच आजवर दबलेल्या विरुद्ध बाजूच्या कळपांना प्रेरणा मिळाली. आता डावे नामोहरम म्हणजे दुबळे झाल्याचा तो संकेत डाव्यांच्या प्रतिकावर हल्ला करण्याची प्रेरणा झाला. पण दुसरीकडे भाजपा दुबळा असलेल्या जागी त्याच्या विरोधातली प्रतिक्रीया उमटली. ती तशाच झुंडशाहीची साक्ष असते ना? सुशिक्षित असोत वा अशिक्षित असोत, झुंडी या अविचारी असतात, हेच त्यातले सार आहे.

(यातले उतारे विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र पुस्तकातले आहेत)
 http://www.inmarathi.com/

Tuesday, March 20, 2018

२०१९ ची समिकरणे

Image result for modi cartoon kureel

लोकसभेच्या मतदानाला अजून एक वर्षाचा कालावधी असतानाच मोदी सरकार व भाजपाचे दिवस भरत आल्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. त्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. कारण कल्पनाविलासाला कुठलाही कायदा प्रतिबंध लावत नसल्याने कुठल्याही बाबतीत या सृजनशीलतेचे महाल उभे राहू शकतात. विविध राज्यातील पोटनिवडणूकांच्या निकालांचा आधार घेऊन कोणी त्यावर आपल्या महालांचे मजले चढवू बघत असेल, तर भाजपाने त्यांना रोखण्याचेही कारण नाही. कारण अशा पायावर कधी इमारत उभी रहात नसते आणि तसल्या टेकूंवर काही सांगाडा उभा केला, तरी तो नुसती वावटळ आल्याने उध्वस्त होऊन जात असतो. पण विरोधकांची अशी दुर्दशा असणे हे भाजपासाठी यशाची हमी असू शकत नाही. मोदींना जनतेने दिलेली पाच वर्षे आता संपत आलेली असून, येत्या वर्षभरात त्यांना आपण दिलेली आश्वासने व केलेला कारभार, याचे प्रगतीपुस्तक मतदाराला सादर करावे लागणार आहे. त्यावरच २०१९ ची निवडणूक लढवली जाईल आणि हरली वा जिंकली जाणार आहे. त्यातली एक महत्वाची बाब अनेकजण विसरून गेले आहेत. ती म्हणजे तब्बल आठ सार्वत्रिक निवडणूकांनंतर प्रथमच २प१४ सालात कुठल्या तरी एका पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळालेले होते. उद्या होणार्‍या लोकसभेतही भाजपा बहूमत टिकवणार की अल्पमताचे इतर पक्षांच्या पाठींब्याने त्याला सरकार स्थापन करावे लागणार, असा प्रश्न आहे. कॉग्रेसची जी अवस्था झा्ली, तितकी दुर्दशा भाजपाची होईल असे भाकित आज तरी कोणी करू धजावलेला नाही. कॉग्रेसने तर स्वबळावर बहुमत वा सत्ता मिळवण्याची अपेक्षा कधीच सोडून दिली आहे. मात्र मोदी वा भाजपा बहूमत टिकवणार काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. हा विश्लेषणातला महत्वाचा मूलभूत फ़रक आहे.

मागल्या लोकसभेत भाजपानेही आघाडीच तयार केली होती आणि इतर पक्षांच्या मदतीनेच भाजपाला आपले बहूमत संपादन करणे शक्य झाले. पण त्यावेळी नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय नेता म्हणून उदयास येण्याची प्रक्रीया चालू होती. आता पाच वर्षानंतर विद्यमान पंतप्रधान म्हणून ते लोकमताला सामोरे जाणार आहेत. सहाजिकच दोन वेळच्या मोदींची तुलना होऊ शकत नाही. पण समजा मतदार खुपच नाराज असेल, तर त्याला पोषक असा पर्यायही समोर असावा लागतो किंवा द्यावा लागतो. विरोधी पक्षांकडे तसा पर्याय अजून तरी तयार होताना दिसलेला नाही आणि भाजपासह त्याच्या मित्र पक्षांना अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज भासलेली नाही. मग एका वर्षानंतर होऊ घातलेल्या लढतीचे चित्र कसे असेल? निव्वळ मतविभागणी टाळली म्हणून पोटनिवडणुकांच्या निकालावर परिणाम साधता येत असतो. परंतु राज्य विधानसभा वा लोकसभेच्या निवडणूकीत लोक पर्यायी सरकारचा विचार करीत असतात. तो विरोधकांपाशी असला तर सत्तापालटाचे वारे वाहू लागतात. मागल्या निवडणूकीत तसा झंजावात मोदी निर्माण करू शकले होते आणि संघाच्या मदतीने त्यांनी ते वादळ आपल्या शीडात भरून घेतलेले होते. तशी काही स्थिती आज तरी विरोधी गोटात दिसत नाही. विरोधकांच्या भूमिकांच्या नौका किनार्‍यापाशी हेलकावे घेत डुचमळत उभ्या आहेत. एका निवडणूक वा पोटनिवडणूक निकालाने सोसाट्याचा वारा आला, मग त्या नौका हिंदकळून इकडेतिकडे व्हायला लागतात. ज्यांना सोसाट्याचा वारा आपल्या शीडात भरून घेता येत नाही, त्यांनी वादळी वार्‍यावर आपापल्या नौका सागरपार करण्याच्या गमजा करण्यात अर्थ नसतो. म्हणूनच त्यापैकी कोणाच्याही मनात मोदींना मतदार नाकारण्याच्या कल्पना येत आहेत. पण त्यांच्या जागी पर्याय म्हणून आपण मतदाराला काय ऑफ़र करू शकतो, हा विचार मनाला शिवतही नाही.

आज जी स्थिती आहे, ती फ़ार उत्तम आहे वा तेवढ्यावर मोदी भाजपाला पुन्हा निर्विवाद बहूमत मिळवून देतील, असे कोणी म्हणू शकत नाही. पण २००९ सालात मनमोहन यांची पहिली कारकिर्द संपत असताना लोकसभा निवडणूका आल्या, तेव्हाची स्थिती यापेक्षा उत्तम व गुणवान होती, असे कोणी म्हणू शकतो काय? निवडणूक दारात असताना एक वर्ष आधी डाव्यांनी त्या सरकारचा पाठींबा काढून घेतला होता आणि मुलायम मायावती अशांच्या मर्जीवर पुढले वर्ष सिंग यांना कारभार हाकावा लागला होता. तरीही पुन्हा युपीएला सत्ता मिळाली व युपीएची साथ सोडणार्‍या लालू वा डाव्यांना दणका बसला होता. जणू मतदाराने पहिल्या पाच वर्षातील कारभारासाठी मनमोहन सिंग यांची पाठ थोपटली होती ना? तर तसे काहीही नव्हते. ते पहिले युपीए सरकार कितीही नाकर्ते असले तरी मतदारासमोर अन्य कुठला पर्याय नव्हता. त्याच सरकारला अडचणीच्या वेळी मदत करणार्‍या मुलायम मायावतींच्या जागा नंतरच्या लोकसभेत घटल्या होत्या. चतकोर संघटना नसतानाही उत्तरप्रदेशामध्ये कॉग्रेसला मुलायम मायावतींशी तुल्यबळ जागा मिळाल्या होत्या. त्याचे एकमेव कारण मतदाराला अन्य काही पर्याय नव्हता. आव्हान देऊ शकणारी मित्रपक्षांची आघाडी भाजपा उभी करू शकला नव्हता आणि बाकी पुरोगामी डाव्या पक्षांच्या धरसोडवृत्तीने त्यांची विश्वासार्हता संपलेली होती. त्यापेक्षा मनमोहन यांचे बुजगावणे सरकारही लोकांनी दुसर्‍यांदा सत्तेवर बसवले होते. कॉग्रेसच्या जागा घटण्यापेक्षा वाढल्या होत्या आणि आजच्या मोदींपेक्षाही उर्मटपणे व उद्धटपणे कॉग्रेसने अल्पमतात असतानाही धश्चोट कारभार केलेला होता. एक टर्म पुर्ण करून मोदी मतदाराला सामोरे जाणार, तेव्हा त्यांची तुलना २००९ सालच्या मनमोहन सोनियांशी करायची असते. त्यामध्ये मोदी सरकार खुपच सरस व उजवे आहे. त्याचीच ग्वाही पराभवाचे भाकित करणार्‍यांच्याही विधानातून मिळत असते.

मोदींची लोकप्रियता घटली वा पुन्हा लोकसभा जिंकणे भाजपासाठी सोपे राहिलेले नाही, अशी छातीठोक हमी आज देणारा कोणीही मोदी सरकार बहूमत राखू शकत नाही, इतकेच सांगतो आहे. त्याचा अर्थ २०१९ सालात मोदी व भाजपा २७२ चा आकडा पार करू शकणार नाहीत, अशी अनेकांना खात्री पटलेली आहे. पण ती संख्या २५० वा २०० इतकी झाली तरी लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष कोण असेल? त्याच्या जवळपास जाऊ शकेल, असा अन्य कुठला राष्ट्रीय पक्ष मैदानात शिल्लक आहे काय? ४४ ह्या किरकोळ संख्येपासून कॉग्रेस किती मोठी झेप घेऊ शकेल? आणि असे कुठलेही बहूमताचे गणित जमणार नसेल, तर लोकांना मध्यावधीला पुन्हा सामोरे जाण्याखेरीज पर्याय शिल्लक रहाणार नाही. लोकांना अशा दिडदोन वर्षांनी निवडणूका हव्या असतात काय? नको असतील तर कोणता पर्याय लोकांनी निवडावा? २०१९ साल जवळ येत चालले आहे, त्यात लोकांना दोन पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. एक आपापल्या राज्यात कोणत्या पक्षाचे वा नेत्याचे सरकार असावे? दुसरा निर्णय देशाचा कारभार एकहाती कोण नेता वा कुठला पक्ष चालवू शकेल? देशासाठी व राज्यासाठी अशी वेगवेगळी निवड करण्याची सुबुद्धता यापुर्वी मतदाराने अनेकदा दाखवलेली आहे. मात्र तितके तारतम्य पुस्तकी विश्लेषण करणार्‍यांपाशी नसते, म्हणून त्यांची भाकिते फ़सतात. मोदी सरकारवर टिका करणे वेगळा विषय आहे आणि आगामी लोकसभा निवडणूकीत मतदार कोणता कौल देतील, याचे भाकित करणे स्वतंत्र विषय आहे. या दोन गोष्टीची गल्लत, मग वेळोवेळी येणारे निकाल घडवून आणत असतात. एका पातेल्यातल्या भाताचे शीत तपासून शहाणे भलत्याच कुकरमधल्या भाताची परिक्षा घेत असतात. २०१९ खुप दूर आहे. कर्नाटक व राजस्थान आदि राज्यातल्या निवडणूका आधीच खुप काही घडवणार आहेत