Monday, May 12, 2014

अखेरच्या मतचाचण्यांचा दिवस

शनिवारी अखेरच्या फ़ेरीचा प्रचार संपला आणि सोळाव्या लोकसभेसाठी चाललेल्या झुंजीच्या रणभेरी अखेर थंडावल्या. उद्या सोमवारी त्या अखेरच्या ४१ मतदारसंघात मतदान होईल आणि सूर्यास्ताबरोबर मतदानही थांबेल. पण त्यानंतरच खरी मजा सुरू होणार आहे. सोळाव्या लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक जाहिर होण्यापासून सुरू झालेल्या मतचाचण्यांची अखेरची फ़ेरीही उद्या सोमवारीच खेळली जाणार आहे. चार विधानसभांसाठी गेल्या वर्षाच्या अखेरीस जे मतदान झाले होते; त्याच्याही आधीपासून हा मतचाचण्यांचा खेळ सुरू झालेला होता. त्यात त्याच चार राज्यातील मतदार कसा कौल देणार, याची भाकिते केली जात होती, त्याला जोडूनच पुढल्या लोकसभेचे चित्र कसे असेल, त्याचेही अंदाज व्यक्त केले जाते होते. त्यासाठी मग कुठल्याही पक्षाने जाहिर न केलेल्या उमेदवारांना पंतप्रधान पदाचे स्पर्धक बनवून, माध्यमे व वाहिन्या चाचण्यांचा खेळ करत होत्या. त्यापैकी फ़क्त गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एकटेच स्पर्धक म्हणुन मैदानात आले. पण त्याच्या आधीच वाहिन्यांनी शेकडो चाचण्यातून मोदींसह राहुल व इतर काहीजणांना जनमानसात असलेल्या स्थानाचा शोध सुरू केला होता. त्यात पक्ष व नेता यांच्यातही लोकप्रियतेची तुलना चालू होती. या प्रत्येक चाचणीत पक्षांमध्ये भाजपा व नेत्यांमध्ये मोदी आघाडीवर दिसत होते. मात्र पंतप्रधान पदाची निवडणूक थेट मताने होत नसल्याने कुठल्याही पक्षाला वा आघाडीला मिळणार्‍या जागांचे गणित मांडून मग अशा चाचण्यांचा खेळ दिर्घकाळ चालू राहिला. त्यात मोदी इतर नेत्यांपेक्षा खुप आघाडी घेत असले तरी पंतप्रधान व्हायला त्यांच्या पाठीशी उभे रहातील, इतके सदस्य निवडून येण्याचे समिकरण चाचण्यातून जुळत नव्हते. अगदी मतदानाचे वेळापत्रक जाहिर झाल्यावर घेतेल्या गेलेल्या चाचण्यातही अखेरपर्यंत केवळ एकाच चाचणीत मोदी मित्रपक्षांसह बहूमताच्या रेषेपर्यंत येऊन पोहोचत असल्याचे संकेत मिळाले. अन्यथा वर्षभर चाललेल्या या खेळात कुठेही भाजपा वा त्याची एनडीए आघाडी बहूमताच्या पल्ल्यापर्यंत आलेली दिसली नाही. मतदान सुरू झाल्यावर अशा चाचण्यांचा खेळ अवैध ठरवलेला असल्याने त्यावर पडदा पडला. पण चाचण्यांचा एक आणखी प्रकार असतो तो मतदानोत्तर चाचणीचा. त्यावर तर संपुर्ण मतदान संपेपर्यंत निर्बंध असतो. म्हणुनच अशा चाचण्या घेतल्या गेलेल्या असल्या, तरी त्यांचे निष्कर्ष आताही सज्ज असतील. पण जाहिर होऊ शकलेले नाहीत.

   मतदानोत्तर चाचणी नेहमीपेक्षा वेगळा प्रकार आहे. इथे मतदान करून आलेल्या मतदाराला विचारून निष्कर्ष काढलेला असतो. म्हणूनच असे निष्कर्ष खुप नेमके निघत असतात. कारण मत देऊन झालेले असते आणि मतदाराच्या मनात कुठली चलबिचल नसते. त्याची सुरूवात आपल्या देशात १९८८ सालात प्रथम झाली. प्रणय रॉय यांनीच त्याचा पहिला प्रयोग अलाहाबादच्या पोटनिवडणूकीत केला होता. बोफ़ोर्स प्रकरणी नाव गोवले गेल्याने विचलीत झालेल्या अमिताभ बच्चन यांनी तेव्हा अलाहाबादच्या खासदार पदाचा तडकाफ़डकी राजिनामा दिलेला होता. त्याच जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा बोफ़ोर्स उकरून काढल्याने कॉग्रेसमधून हाकालपट्टी झालेले विश्वनाथ प्रताप सिंग यांनी अपक्ष उमेदवार म्हणून तिथे लढत दिलेली होती. त्यांच्या विरोधात लालबहादूर शाश्त्रींचे चिरंजीव सुनील शास्त्री यांनी कॉग्रेसची उमेदवारी केलेली होती. त्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण जिंकू शकतो, याविषयी जनमानसात मोठीच उत्कंठा होती. तेव्हा मतदान उरकताच संध्याकाळी प्रणय रॉय यांनी आपले निष्कर्ष जाहिर केले होते. मत देऊन बाहेर पडलेल्या मतदाराची चाचणी म्हणजे एक्झीट पोल, हा प्रकार तिथून आपल्या देशात सुरू झाला. मला आठवते की रॉय यांनी तेव्हा एक लाखाच्या फ़रकाने व्ही पी सिंग बाजी मारतील, असे भाकित केले होते. दुसर्‍या दिवशी मतमोजणी झाल्यानंतर सिंग यांना ९९ हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळाला होता. म्हणजेच रॉय यांनी एक्झीट पोलचा यशस्वी प्रयोग सिद्ध केला होता. त्यानंतर वाहिन्यांचा पसारा वाढत गेला व लोकांच्या उत्कंठेला खतपाणी घालणारा कार्यक्रम म्हणून निवडणूक काळात सगळ्याच प्रकारच्या मतचाचण्यांचे पेव फ़ुटले. उद्या सोमवारी मतदानाची अखेरची फ़ेरी संपली, मग म्हणुनच सोळाव्या लोकसभेच्या एकूण मतदानाचे मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहिर होतील. मतदानाची वेळ संपल्यावर एक तासाने असे निष्कर्ष जाहिर करायला प्रतिबंध नसल्याने बहूधा संध्याकाळी सात वाजल्यानंतर सर्वच वाहिन्या आपापले अंदाज घोषित करतील. जवळपास सर्वच वाहिन्यानी आतापासूनच त्याची जाहिरात सुरू केली आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच त्यांचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. पण बहूधा आधीच संपलेल्या ५०२ जागांचे निष्कर्ष एव्हाना तयार असतील. सात वाजता तेच आधी सांगायला आरंभ होईल आणि रात्र होईपर्यंत शेवटच्या फ़ेरीत मतदान झालेल्या उत्तरप्रदेश, बिहार व बंगाल यांचे आकडे काढले जातील.

   मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे सहसा फ़सलेले नाहीत. म्हणजे असे की एकदोन टक्के इकडेतिकडे होऊ शकते. पण ह्या चाचण्यांचे आकडे उलटफ़ेर होण्याइतके फ़सत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणजे समजा मोदीप्रणित एनडीए आघाडीला त्यात अडीचशे जागा दाखवलेल्या असतील, तर त्या दोनशेच्या खाली येऊ शकत नाहीत वा एकदम तीनशेचा पल्ला ओलांडून पुढे मुसंडी मारू शकत नाहीत. त्याच्याच दुसर्‍या बाजूला युपीएला त्यात शंभरच्या आसपास जागांचा निष्कर्ष काढलेला असेल, तर तो फ़सून युपीए थेट दोनशे अडीचशेचा पल्ला पार करू शकणार नाही. याचा अर्थ असा, की सोमवारी जे एक्झीट पोलचे निष्कर्ष जाहिर होतील, त्यात निवडणूकीत मतदाराने दिलेला कौल नाही, तरी कल स्पष्ट होऊन जाईल. म्हणजेच आजवर दोन महिने जी भाषा भाजपावाले बोलत आहेत, ती मोदी लाट खरोखरच आहे किंवा नाही, त्याचा खरा अंदाज सोमवारच्या चाचण्यातून दिसू शकणार आहे. त्यामध्ये जर भाजपाचा प्रभाव नसलेल्या बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू वा केरळ अशा राज्यात भाजपाला मते वाढलेली दिसत असतील आणि त्या पक्षाला किरकोळ का होईना जागा मिळताना दिसत असेल, तर त्याला मोदी लाट म्हणावेच लागेल. पण मग तसे असेल तर जिथे भाजपाचा जोर आहे तिथे मोदी म्हणतात तशी त्सुनामीही आलेली दिसेल. म्हणजेच भाजपाच्या प्रभावी राज्यातच त्याला प्रचंड मोठे यश मिळालेले चाचणीतूनच स्पष्ट होईल. मात्र म्हणून लाट आहे असे अजिबात सिद्ध होणार नाही. त्यासाठी १६ मेपर्यंत प्रत्यक्ष मतमोजणी व्हायची प्रतिक्षा करावीच लागेल. पण मतदानोत्तर चाचणीचे आकडे कुठल्या पक्षाला नाकारून चालणार नाही. अपेक्षाभंग होणार्‍या पक्षांकडून ते नाकारले जाणार यात शंका नाही. पण त्यालाच तर आशावाद म्हणतात. मात्र जाहिरपणे चाचणीचे निष्कर्ष नाकरणारे पक्षही मनोमन ते आकडे ओळखून आपले भविष्यातले डावपेच योजायला सुरूवात करणार आहेत. म्हणूनच उद्याचा दिवस शेवटच्या मतदानाचा, तसाच शेवटच्या चाचण्यांचा असणार आहे. बघू त्याच्या पोटात काय दडले आहे?

No comments:

Post a Comment