Monday, May 26, 2014

सच्चे दिन तर आले

Photo: ‘बरखा’ बाहर आयी

मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की पाक पंतप्रधान नवाज शरीफ़ हेटाळणीच्या शब्दात मनमोहन सिंग यांचा अवमान करत असताना तिथे बसून भारतीय पत्रकार मिठाई खात होते. मात्र मोदींनी कुणाचे नाव घेतले नव्हते. मग त्यांच्या भाषणानंतर सर्वच चॅनेलवर भाषणातील मुद्द्यावर चर्चा चालू झाली. फ़क्त एनडीटीव्हीवर मात्र बरखा दत्त पाकच्या शरीफ़ यांची शराफ़त सांगून आपल्या पापावर पांघरूण घालायची कसरत करीत होती. तात्काळ पाकिस्तानी चॅनेल जीऒ टीव्हीचा संपादक हमीद मीर याने तिला दुजोरा देणारा ट्विट केला. बाकी कोणी भारतीय पत्रकारांना खुलासा करावा असे वाटले नव्हते, तर बरखाला घाई कसली झाली होती? चोराच्या मनात चांदणे म्हणायचे की शरीफ़ची मिठाई खायी त्याला खवखवे म्हणायचे?

   सोमवारी सकाळी लौकर नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केले. तिथून पुढे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तिथून मोदी माघारी आपल्या मुक्कामी, म्हणजे गुजरात भवनात पोहोचले. तिथे त्यांच्या भेटीला विविध नेत्यांची रीघ लागली. तेव्हा भेटायला व चहापानाला बोलावलेत, त्यांचीच मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशा ब्रेकिंग न्युज सुरू झाल्या. मागला आठवडाभर सगळेच पत्रकार व वाहिन्या मोदींचे मंत्रीमंडळ बनवण्यात व त्याचे खातेवाटप करण्यात रममाण झालेल्या आहेत. पण प्रत्यक्ष शपथविधीला अवघे सहासात तास उरले होते, तरी कुणाला एकाही भावी मंत्र्याचे नाव सांगता येत नव्हते. रविवारी वाहिन्यांच्या चर्चेमध्ये शेकडो नावांचा उहापोह झाला आणि शेवटी ही सर्वच नावे निश्चित नाहीत, अशी पुस्ती जोडावी लागत होती. प्रामुख्याने इंग्रजी वाहिन्यांचे संपादक व पत्रकारांचे ओशाळलेले चेहरे खुप मोठी बातमी सांगत होते. त्या ओशाळलेपणातली खरी सनसनाटी बातमी अशी होती, की आजपर्यत जशा कुजबुज व धुसफ़ुशीतून राजकीय बातम्या पसरवल्या जायच्या; तो जमाना संपला आहे. अन्यथा एखाद्या नेत्याला आपण मंत्री होणार ह्याचा पत्ता नसायचा, पण असे नावाजलेले पत्रकार मात्र छातीठोकपणे त्याचे नाव आधी जाहिर करू शकायचे. रविवारी रात्रीच्या कार्यक्रमात एनडीटिव्हीची संपादक बरखा दत्त हिच्या अगतिकतेची कबुली त्याचा सर्वात मोठा पुरावा मानता येईल. २१ तास शिल्लक उरलेत शपथविधीला आणि ‘कुठलीही खरी बातमी नाही, कुठलीही फ़ुटलेली माहिती नाही आणि कुठलीही वशीलेबाजी नाही’ ही बरखाची कबुली महत्वाची बातमी होती. कारण पुन्हा राजकीय गोपनीयतेचा जमाना आल्याची ती खुण आहे. म्हणूनच म्हणायचे सच्चे दिन तर आले.

   इथे आम्ही बरखा दत्त हिचे नाव व कथन मुद्दाम मांडले आहे. कारण बरखा ही निव्वळ पत्रकार नाही. किंबहूना ती पत्रकार कमी आणि दिल्लीतल्या राजकीय दलालीतली भागिदार अधिक आहे. आज दिल्लीत नाव कमावलेल्या बहुतांश संपादक पत्रकारांची गुणवत्ता त्यांच्या बुद्धीमत्तेशी वा व्यासंगाशी निगडीत नसून, विविध व्यापार उद्योगांचे हितसंबंध सरकारी कारभारात जपण्याची त्यांची पात्रता खर्‍या पत्रकारितेवर कुरघोडी करून बसली आहे. या लोकांनी पत्रकारितेला दलालीच्या बाजारात आणून बसवले आहे. त्यामुळेच या मंत्रीमंडळाच्या रचनेत कुठलीही लुडबुड करण्याची मुभा मिळालेली नाही, असे तमाम नावाजलेले संपादक पत्रकार कासावीस होऊन गेलेले आहेत. कारण अशा पत्रकारांनी मागल्या निदान एका दशकात मंत्रीपदे व खाती यांच्या सौदेबाजीचा व्यापार करून ठेवला होता. नीरा राडीया प्रकरण आपल्याला स्मरते का? तिच्या संभाषणांच्या ज्या मुद्रीत टेप उघडकीस आल्या, त्यात प्रभू चावला, वीर संघवी आणि बरखा दत्त यांनी कुठल्या नेत्याचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा त्यासाठी केलेल्या लॉबिंगचा बोभाटा झालेला होता. म्हणजेच संपादक पत्रकार म्हणून ही मंडळी वाचक जनतेला शहाणे करण्याचे काम करीत नसतात. तर विविध उद्योगपती व व्यापार्‍यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवत असतात किंवा त्यासाठी वातावरण निर्मिती करीत असतात. अशा लोकांनी मागल्या बारा वर्षात नरेंद्र मोदींना लक्ष्य केलेले होते आणि म्हणूनच आता मोदीच पंतप्रधान व्हायच्या प्रसंगी त्यांना गुजरात भवनच्या वार्‍यालाही उभे केले जात नाही. वर्षभर तडफ़डून प्रयत्न केल्यावरही मोदींनी त्यांना साधी मुलाखत द्यायचे नाकारले. उलट सामान्य वाटणार्‍या संपादक पत्रकारांना मात्र वेळ काढून मुलाखती दिल्या. परिणामी होणार्‍या सत्ताबदलामुळे आता अशा ‘नावाजलेल्या’ व्यापारी पत्रकार, संपादक व विश्लेषकांचा राजधानीतील भाव घसरला आहे. तीच वेदना मग त्यांच्या शब्दातून बातम्यातून जाणवू लागली आहे.

   अशा भ्रष्ट पत्रकारांचे पाप बाजूला ठेवा. त्यांनी जनतेची वाचकांची दिशाभूल व फ़सवणूक केलीच. पण ज्या राज्यकर्ते व पक्षांकडून विविध लाभ उठवले, त्यांना रसातळाला नेण्याचे पापही त्यांनीच केलेले आहे. कॉग्रेस वा अन्य राजकीय पक्ष मोदींच्य झंजावातासमोर पालापाचोळा होऊन उडून जाणार असल्याचे ज्यांना ओळखता आले नाही, त्यांना राजकीय विश्लेषक जाणकार तरी कशाला म्हणायचे? त्यांनी दिशाभूल करणारे विश्लेषण करून नुसती जनतेची फ़सवणूक केली नाही. तर त्यांच्याच बुद्धीला सलाम करणार्‍या कॉग्रेससहीत सेक्युलर पक्षांनाही देशोधडीला लावले आहे. त्यांच्यापासून मोदी जितके दूर रहातील, तितकाच यशस्वी कारभार करू शकतील. त्याचीच सुरूवात झाली आहे, म्हणून तर सच्चे दिन आले म्हणायचे. मोदींची भेट घेणारा एकही नेता बाहेर येऊन आतले गुपित फ़ोडत नाही. मंत्र्याची शपथ म्हणजे गोपनीयता असते आणि तिचे पालन शपथ घेण्य़ाच्या आधीपासून होऊ लागले असेल, तर ती चांगल्या कारभाराची चाहुलच म्हणायला हवी. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत तर त्यांचे सरकार वा मंत्रीमंडळ कोणता निर्णय घेणार, हे पंतप्रधानाच्या आधी बरखा दत्त वा राजदीप सरदेसाई यांना ठाऊक असायचे. इतकी राज्यकारभाराची दुर्दशा होऊन गेली होती. मोदी सरकार येण्यापुर्वीच त्यापासून भारत सरकारची मुक्तता झाल्याची ही खुण, म्हणूनच मोलाची म्हणावी लागेल. सत्ता हाती घेण्यापुर्वीच मोदींनी उत्तम कारभाराची साक्ष दिली आहे. म्हणूनच अच्छे दिन येतील तेव्हा येतील. पण सच्चे दिन आले म्हणायला हरकत नसावी. खंडप्राय देशाचा कारभार व धोरणे अशी पत्रकारांच्या बातम्यातून ठरायची नसतात. त्याचे विपरित परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. गोपनीयता ही धोरणाचे गैरफ़ायदे उठवणार्‍यांसाठी आवश्यक असते. तिची सुरूवात अधिकारपदाची शपथ घेण्यापुर्वीच झाली तर उत्तमच नाही का?

2 comments:

  1. भाऊ तुमचा अभ्यास खुपच दांडगा आहे. त्याला तोड नाही. प्रत्येक लेखात काहीना काही नवीन कळते. खुपच छान. करण थापर, वीर संघवी, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, विनोद दुआ, तसेच आपल्या मराठीतील कुमार केतकर, प्रताप असबे, सुरेश भटेवरा ही मंड ळी खरेतर खुप हुशार अणि अभ्यासू आहेत अणि म्हणूनच त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. पण हे लोक कांग्रेसच्या दरबारात गहाण का पडले आहेत. ते कळत नाही. त्यांची कधी कधी किंव येते. भाऊ यांच्यावरही जागता पहारा ठेऊन उलट तपासणी घेत चला. तेव्हाच आमच्या सारख्या वाचकांचे खरे प्रबोधन होइल. धन्यवाद.
    आपला नम्र,
    रामदास पवार, अंबरनाथ

    ReplyDelete
  2. फारच छान विश्लेषण केले आहे धन्यवाद.
    कारण निवदनुक च्या वेळी आम्ही प्रेक्षक एवढे confused होतो की खरे काय खोटे काय हेच समजत नव्हते. आणि बऱ्याच वेळा हीच मंडली देश दुभागयाचे काम करत होते असे नेहमी मनात शंका यायची. सगल काही commercialisation केल आहे.

    ReplyDelete