Saturday, March 14, 2020

महाराष्ट्रातचा मध्यप्रदेश होईल?

Image result for pawar uddhav

महाराष्ट्रात महायुती मोडून उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेस आघाडीच्या सोबत जायचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांना ती आघाडी व सरकार किती काळ टिकणार याची शंका होती. कारण भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष त्यात एकत्र आले होते. पण त्या सरकारने अलिकडेच शंभरी पुर्ण केली असून, त्यानंतर मध्यप्रदेशात धुमाकुळ सुरू झाला. त्यामुळेच मग महाराष्ट्रातही तसेच काही होणार किंवा कसे, अशा आशंका घेतल्या गेल्यास नवल नाही. पण मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या आकडेवारीत मोठी तफ़ावत असल्याने तशी काही उलथापालथ इथे महाराष्ट्रात घडण्याची शक्यता कमीच आहे. राजकारणाचा अभ्यास करणार्‍यांना त्याची जाणिव आहे. पण मध्यप्रदेशातही असे काही घडण्याची गरज नव्हती, की कारण नव्हते. तिथे तर यापेक्षाही सुरक्षित सरकार सत्तेत होते. ते तीन पायाचे सरकार नाही व नव्हते. पण तरीही त्याला ग्रहण लागले. त्यावर आता ऑपरेशन कमल असा शिक्का मारणे सोपे असले, तरी त्यात तथ्य अजिबात नाही. ती स्थिती भाजपाने निर्माण केलेली नाही. तर निर्माण झालेल्या परिस्थितीचा भाजपाने लाभ उठवला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सारखे काही इथे महाराष्ट्रात घडवणे भाजपाच्या हाती बिलकुल नाही. कारण भाजपा तिथे किंवा इथे तशी परिस्थिती निर्माण करण्याच्या अवस्थेतच नव्हता व नाही. म्हणूनच इथे तसे काही होण्याची शक्यता नसल्याचे शिवसेना प्रवक्ते किंवा शरद पवारांनी म्हटल्यास वावगे अजिबात नाही. पण तशी परिस्थिती भाजपाला निर्माण करायची सोय नसली, तरी तसे काही घडू लागल्यास राजकीय लाभ उठवणे भाजपाच्या हातात नक्कीच आहे. सहाजिकच तशी परिस्थिती निर्माण करणार्‍यांवर महाराष्ट्रात मध्यप्रदेश घडण्याची बाब अवलंबून आहे. शिवसेना वा उद्धव ठाकरे तशी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणेही जवळपास अशक्य आहे. मग उरले दोन पक्ष. एक राष्ट्रवादी व दुसरा कॉग्रेस पक्ष. इथे तशी स्थिती तेच निर्माण करू शकतात ना? ते कितपत शक्य आहे?

कमलनाथ किती मुरब्बी आहेत आणि अनुभवी आहेत, हे पवारांनी पत्रकारांना समजावण्याची गरज नाही. त्यापेक्षा इतके मुरब्बी असून त्यांनी भाजपाला पोषक परिस्थिती का निर्माण केली, त्याचे स्पष्टीकरण पवारांनी दिले असते तर अधिक सुटसुटीत झाले असते. की अतिशय मुरब्बी असल्याने व जगाला आपला धुर्तपणा सादर करण्याच्या उतावळेपणातून कमलनाथ यांनी अशी पेचप्रसंगाची परिस्थिती निर्माण केली; असे पवारांना म्हणायचे आहे? पवार मध्यप्रदेशच्या लटकलेल्या मुख्यमंत्र्यांना कशासाठी व कसले प्रमाणपत्र देत आहेत? १०७ विरुद्ध १२१ इतके भक्कम संख्याबळ असताना कमलनाथ ज्या गोत्यात सापडलेले आहेत, त्याला मुरब्बी म्हणायचे असेल; तर पवार यांच्या राजकीय अनुभवाची वर्षे नव्याने मोजावी लागतील. कारण जे काही संकट आलेले आहे, ते भाजपाने आणले नसून कमलनाथ यांनी आमंत्रण देऊन बोलावलेले आहे. तेच कर्नाटकातही झालेले होते. भाजपाला बहूमत मिळाले नाही आणि दोन पक्षांना एकत्र घेऊन बहूमताचा आकडा दाखवित कुमारस्वामी सरकार स्थापन केलेले होते. त्या मुख्यमंत्र्याना कुठल्याही जाहिरसभा समारंभात नित्यनेमाने अश्रू ढाळून आपण कसे नामधारी बाहुले मुख्यमंत्री आहोत, असे सांगायची वेळ सिद्धरामय्यांनी आणलेली होती. त्यातून पुढला घटनाक्रम उलगडत गेलेला होता. मग पवारांच्या आकलनानुसार तिथे पाडापाडी फ़ोडाफ़ोडी करून भाजपाला पुन्हा सत्तेत आणून बसवणारे सिद्धरामय्या महान मुरब्बी राजकारणी मानावे लागतील. पण पवारांनी तसे कधी म्हटलेले नाही. मग कमलनाथांचे गुणगान कशासाठी? त्यात तथ्य असेल, तर मग महाराष्ट्राचा मध्यप्रदेश व्हायला हरकत नाही. कारण कमलनाथ यांचे गुणगान करताना पवारांकडूनच महाराष्ट्रात भाजपाला लाभदायक परिस्थिती निर्माण करण्याची हमी देता येईल. तसा विचार पवारांच्या मनात घोळतो आहे काय? कारण काही प्रसंग व हट्ट त्याकडे अंगुलीनिर्देश करतात.

आपल्या पत्रकारांमध्ये पवारांना मुरब्बी धुर्त राजकारणी संबोधण्याची फ़ॅशन आहे. अशा पवारांना कमलनाथ यांनी करून ठेवलेला सावळागोंधळ मुरब्बी राजकारण वाटत असेल, तर एव्हापासूनच उद्धव ठाकरे यांनी सावध होणे अगत्याचे ठरेल. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे भाजपाला पोषक परिस्थिती निर्माण करणे पवारांना मुरब्बी राजकारण वाटते. दुसरा त्याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे, या निमीत्ताने पवारांनी महाराष्ट्रातले सरकार पुर्ण पाच वर्षे टिकवण्याची हमी दिलेली आहे. पवारांची हमी म्हणजे नजिकच्या काळात सरकार गडगडण्याचीच खात्री असते. त्यांनी विरोधी पक्षात बसायचा निकालापासून लकडा लावलेला होता आणि ते सरकारमध्ये जाऊन बसले. निवडणूकीच्या राजकारणातून बाजुला होण्याचा निर्धार केल्यापासून दुसर्‍यांदा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर पवार पत्रकारांशी बोलत होते. म्हणजेच जे होणे नाही वा होण्याची शक्यता नाही, त्याचेच भाकित पवार वर्तवित असतात. सहाजिकच त्यांनी उद्धव सरकार पाच वर्षे टिकण्याची हमी दिलेली असेल, तर त्यांच्याही मनात काही वेगळे उलटे शिजत असल्याचा तो संकेत असू शकतो. असे काही बोलण्यापुर्वी पवारांनी निदान सचिन पायलट यासारख्या अननुभवी नेत्याचे शब्द तरी ऐकण्यापर्यंत संयम बाळगायला हवा होता. राजस्थानचे उपमुख्यमंत्री व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे तिथेही नाराजी पदोपदी व्यक्त करणारे म्हणून पायलट ओळखले जातात. त्यांनी जे काही घडले त्यासाठी कमलनाथ यांचे गुणगान केलेले नाही. किंबहूना आपल्या पक्षाच्या चुकांवर पांघरूणही घातलेले नाही. घडले ते दुर्दैवी आणि पक्षाच्या अंतर्गत सामंजस्याने सोडवणे शक्य असलेली समस्या, असे मतप्रदर्शन केलेले आहे. मात्र तोच कमलनाथी मुर्खपणा पवारांना मुरब्बी राजकारण वाटते आहे. म्हणून मग यावेळी पवारांच्या मनात काय विचार वा योजना घिरट्या घालत आहेत, त्याच्या शंका येऊ लागतात.

वास्तविक महाराष्ट्रापेक्षाही मध्यप्रदेशात स्थिती उत्तम होती. एकाच पक्षाचे सरकार होते आणि त्याला अपक्षांसह अन्य दोन किरकोळ पक्षांचा ठाम पाठींबा होता. कॉग्रेसचे २२ आमदार् फ़ुटलेले असतानाही हे पक्षाबाहेरचे सात आमदार कमलनाथ यांच्या सोबत अजून टिकलेले आहेत. मग पक्षातलेच कशाला फ़ुटले असा प्रश्न येतो. तर त्यांना फ़ुटायला कमलनाथ यांनी कडेलोटावर नेवून ठेवले होते. त्यांचा नेता असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कोंडीत पकडून पदोपदी डिवचण्यातून मध्यप्रदेशात फ़ाटाफ़ुटीची अपरिहार्यता निर्माण करण्यात आली. तो आकडा पुरेसा उपयुक्त होण्यापर्यंत भाजपाने कळ काढली आणि त्याचा माध्यमातून गवगवा चालू असतानाही कमलनाथ ‘मुरब्बी’ असल्याची शेखी मिरवत होते. त्यापेक्षा त्यांनी पक्षातलेच एक नेता शिंदे यांची नाराजी दुर करून समन्वय साधला असता, तर भाजपाला हात चोळत बसावे लागले असते. जे कोणी राजिनामे देऊन कर्नाटकला पळाले त्यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यांना तर मंत्रीपदेही मिळालेली होती. भाजपा त्यापेक्षा मोठे काही आमिष दाखवू शकेल असे नाही. आमदार फ़ुटणे समजू शकते. पण मंत्र्यांनी पदावर लाथ मारून आमदारकीचे राजिनामे देण्याला छोटी गोष्ट मानता येत नाही. काहीतरी गंभीर पराकोटीचे मतभेदच राजकारण्यांना अशा टोकाला घेऊन जात असतात. असलेल्या पदानेही आपल्याला भवितव्य नाही असे वाटल्याशिवाय कोणी असे वागत नाही. मुरब्बी कमलनाथांना इतकेही कळत नसेल, तर त्याला भाजपा जबाबदार असू शकत नाही. साध्या मराठी भाषेत आपण म्हणतो, तुटेपर्यंत ताणायचे नसते. त्यापेक्षा मध्यप्रदेशचा घटनाक्रम वेगळा नाही. शिंदे व त्यांच्या अनुयायांना थेट बंडाला प्रवृत्त होण्याखेरीज कुठलाच मार्ग कमलनाथ व दिग्विजयसिंग यांनी ठेवला नसेल; तर त्यासाठी जबाबदार तेच असतात. कारण तिथले सरकार एकाच पक्षाचे असले तरी काठावरच्या बहूमताने तिथली सत्ता साध्य झालेली होती.

कमलनाथ असोत किंवा इथले उद्धव ठाकरे असोत, त्यांची इतकी कोंडी करायची नसते, की त्यांना ‘दुसर्‍या टोकाला’ जाण्याची वेळ यावी. गेल्या अठरा महिन्यात शिंदे यांना पक्षाची सत्ता असतानाही मध्यप्रदेशात संपवून टाकण्याचेच डावपेच खेळले जात होते. त्यातून मार्ग निघावा म्हणून शिंदे खुप प्रयत्नशील होते. पण राज्यात दोन्ही ‘मुरब्बी’ नेते व दिल्लीत श्रेष्ठी शिंदे यांची दखलही घ्यायला राजी नव्हते. मग त्यांनी करायचे काय? गुपचुप बळीचा बकरा व्हायचे? जे शिंदे यांचे मागल्या अठरा महिन्यात झाले, त्यापेक्षा मागल्या तीन महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला किती वेगळे अनुभव येत आहेत? तिथे शिंदे यांना लोकसभेत पाडण्याला हातभार लावला गेला. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षही बनवण्यात टाळाटाळ झाली. आता निदान राज्यसभेत वर्णी लागावी, अशी अपेक्षाही पुर्ण होत नव्हती. त्यातून आलेल्या नाराजीला भाजपाने खतपाणी घातले आणि राज्यसभाच कशाला केंद्रात मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले. बाकी काम आओपाप होऊन गेले. ते प्रदेशाध्यक्षपद किंवा राज्यसभा उमेदवारी वेळीच देण्यात आली असती, तर विषय कॉग्रेस पक्षांतर्गत संपला असता. समाधानकारक मार्ग निघाला असता. निदान भाजपाला त्यात हस्तक्षेप करायची संधीच मिळाली नसती. इथेही हळुहळू त्याच दिशेने वाटचाल सुरू नाही काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तडजोड म्हणून शिवसेनेला कमी मंत्रीपदे घेऊन त्यातच अपक्षांनाही सामावून घेतलेले आहे. त्यातही पुन्हा महत्वाची खाती राष्ट्रवादी घेऊन गेला आहे आणि पवार तर उठताबसता सरकारची धोरणे परस्पर जाहिर करत असतात. कधीही कुठेही शासकीय अधिकार्‍यांना बोलावून आदेशही देत असतात. कितीही नामधारी मुख्यमंत्री असला तरी ठाकरे यांना ते जाचक वाटत नसेल काय? त्याचा परिपाक काय होऊ शकतो? राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांची जाहिर वक्तव्ये किंवा राजकारण, शिवसेनेची अधिकाधिक कोंडी करण्याचेच नसते का? त्यातून उद्धव ठाकरेंना ज्योतिरादित्य बनवण्याचेच खेळ चाललेले नाहीत काय?

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात सहभागी झाल्यावर केलेले वक्तव्य काय म्हणते? निवडणूकीत शेतकरी कर्जमाफ़ीचे दिलेले आश्वासन पुर्ण झाले नाही. राहुल गांधींनी दहा दिवसात कर्जमाफ़ी सांगितली होती आणि अठरा महिने होऊन गेल्यावरही त्यात प्रगती झाली नाही. महाराष्ट्रात महायुती मोडून दोन्ही कॉग्रेस सोबतचे सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफ़ी, सातबारा कोरा आणि अवकाळी पावसात बुडालेल्या शेतीला भरपाई, अशी आश्वासने दिलेली होती. पण ती राहिली बाजूला आणि पवारांनी मध्येच भीमा कोरेगावचा तपास व एल्गार परिषदेला प्राथम्य देण्यासाठी दबाव आणलेला आहे. ती चौकशी केंद्राकडे सोपवताना ठाकरे पवार यांच्यात बेबनाव होईपर्यंत पाळी आणली गेली. त्याला समन्वय म्हणतात काय? शिवसेनेने आपल्या वचननाम्यात वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केलेली होती. पण सरकार स्थापन करताना ज्यांना मित्रपक्ष म्हणून सोबत घेतले, त्यांनी नित्यनेमाने सावरकरांची बदनामी करण्याच्या मोहिमा उघडल्या आहेत. ते शिवसेनेचा मतदार व भूमिकेला छेद देण्यासाठी नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? सेनेला मुख्यमंत्री हवा असेल तर तिने आपला मतदार व अजेंडा गुंडाळून अपमानित व्हायला सज्ज असले पाहिजे; अशीच कॉग्रेसची अपेक्षा दिसत नाही काय? ह्या गोष्टी दिसायला बारीकसारीक दिसतील. पण त्यातून सेनेचा मतदार पाया खिळखिळा व्हायला मदत होत असते. ते काम भाजपा करीत नसून मित्रपक्ष राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाकडून चालले आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ व दिग्विजयसिंग जोडीने शिंदे यांची कोंडी करीत होते आणि इथे दोन्ही कॉग्रेस पक्ष जोडीने शिवसेनेला पेचात आणणार्‍या भूमिका जाहिरपणे घेत असतात. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील हे साम्य पवारांना मुरब्बी राजकीय भूमिका वाटते काय? कारण त्याचा परिणामही मध्यप्रदेशसारखा होऊ शकतो. मध्यप्रदेशातला धुमाकुळ दिसू लागताच पवारांनी इथली भीमा कोरेगावची मागणी गुंडाळून कशाला ठेवली आहे?

इथेच गोष्ट संपत नाही. माजी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारचे एक ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण, यांनी शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी आधी मुस्लिमांचा कौल घेण्यात आल्याचेही कथन केलेले आहे. थोडक्यात ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पाकधार्जिण्या मुस्लिमांची मते आपल्याला नकोत असे ठणकावून बजावलेले होते, तीच शिवसेना आज मुस्लिमांच्या मेहरबानीने सत्तेत बसली असल्याचे चित्र कशाला निर्माण केले जात आहे? हिंदूत्व मानणार्‍या मतदारांमध्ये शिवसेनेला संपवण्याची ही खेळी नाही काय? अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्याची गरज नाही. मुद्दा आहे मध्यप्रदेशची राजकीय स्थिती इथे महाराष्ट्रात निर्माण होण्याचा. ती नसेल तर भाजपा इथे काहीही बाल बाका करू शकणार नाही. तीन पक्षांच्या सरकारपाशी भक्कम आकड्यांचे बहूमत आहे आणि तिथे खिंडार पाडण्याची कुवत भाजपाकडे नाही, हे नि:संशय. पण मित्रपक्षांनीच एकमेकांची कोंडी करायचे कमलनाथी डावपेच खेळले, तर भाजपाला शिरकाव करून काट्याचा नायटा करण्याची पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती मध्यप्रदेशात कॉग्रेस पक्षांतर्गत नेत्यांनीच निर्माण केली आणि त्याला शरद पवार मुरब्बी राजकारण म्हणतात. इथे तर तेच मोठे मुरब्बी नेता आहेत. मग शंका येते, की भीमा कोरेगाव तपासाची मागणी वा अन्य परस्परविरोधी वक्तव्यातून तशी भाजपाला पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम कोणी हाती घेतले आहे काय? नसेल तर किमान समान कार्यक्रमाच्या पलिकडे जाऊन वक्तव्ये कशाला होत असतात? मागण्या कशाला रेटल्या जात असतात? जितके राजकारण अभेद्य असते, तितके राज्य भक्कम असते. पण त्या तटबंदीमध्ये घरभेदी निर्माण होणार नाही, यावर सत्ता टिकून रहात असते. कमलनाथ यांनी घरभेदी निर्माण होण्याला हातभार लावला आणि महाराष्ट्रात आघाडीचे जनक शरद पवारच त्याला मुरब्बी राजकारण म्हणतात. मग मनातल्या मनात शंकेची पाल चुकचुकते.

Friday, March 13, 2020

दि‘शाहीनबागे’तला चकवा

Image result for shaheenbaug

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीनबाग येथे पेटलेले आंदोलन सरकारने इतके कशाला तापू दिले, हे अनेक विश्लेषकांना न सुटलेले कोडे होते व आहे. ज्या गृहमंत्री अमित शहांनी मोठ्या कुशलतेने संसदेत ३७० कलम हटवण्याचा प्रस्ताव आणला आणि दोन दिवसात तो उरकून घेताना काश्मिरात एक साधी दगडफ़ेक होऊ दिली नव्हती, त्यांच्याकडून हा गाफ़ीलपणा झालेला होता काय? की दिल्ली विधानसभेच्या निकालावर डोळा ठेवून जाणिवपुर्वक शाहीनबागमध्ये मोकाट रान देण्यात आलेले होते? त्यानंतर इशान्य दिल्लीत उसळलेली दंगल सरकार गाफ़ील असल्याची साक्ष देत असली, तरी वास्तवात सत्ताधारी पक्ष त्यात काही प्रमाणात आपले राजकारण खेळत होता. हे नाकारता येणार नाही. दंगल अपेक्षित नव्हती. पण शाहीनबाग मात्र कात्रजचा घाट नक्कीच होता. कारण तिथे सरकारने मुस्लिम बुरखेधारी महिलांच्या जमावासमोर हात टेकलेले पाहून भाजपा विरोधकांना जोर चढला होता. त्यामुळेच देशाच्या अन्य महानगरात व राज्यात नवनव्या शाहीनबागा पेटवण्याची भाषा चालली होती. त्यात लहानसहान पक्ष व संघटनांनी भरकटत जाणे समजू शकते. पण देशात पन्नास वर्षाहून अधिक काळ हुकूमत गाजवणार्‍या कॉग्रेस पक्षाने भरकटणे नवलाचे होते. बाकी सर्व गोष्टी सोडून कॉग्रेस़चे तमाम नेते सरळ शाहीनबागेत जाऊन त्या अडवणूकीचे समर्थन करीत होते आणि आपली सगळी शक्ती तिथेच लावून बसले होते. बाकी देशात अन्य काही समस्याच नसाव्यात, इतके कॉग्रेसने आपले बळ व लक्ष शाहीनबागेत केंद्रीत केलेले होते. अन्यथा त्या शतायुषी पक्षाला इतक्या गाफ़िलपणे मध्यप्रदेश सारखे मोठे राज्य गमावण्यापर्यंतची वेळ कशाला आली असती? अन्यथा मध्यप्रदेशचे सिंहासन डळमळू लागताच कॉग्रेसला शाहीनबागेचा विसर कशाला पडला असता? हे अनेक संदर्भ जोडले, तर अमित शहांनी जाणिवपुर्वक शाहीनबागेत कॉग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावावे यासाठीच योजलेला तो कात्रजचा घाट असावा काय? निदान तशी शंका येते.

एका बाजूला मध्यप्रदेशात कॉग्रेसला सत्ता मिळाली, तरी त्याच्यापाशी निर्विवाद बहूमत नव्हते आणि तरीही पक्षातच बेदिली माजलेली होती. त्यात सत्तेवर विळखा घालून बसलेल्या दिग्विजय सिंग व मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी एकामागून एक मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांचे स्वागत करण्याचा सपाटा लावला होता. त्यांचा बदलणारा कल साफ़ दिसत होता. पण त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न राज्यातल्या नेतृत्वाने केला नाही आणि दिल्लीचे श्रेष्ठी शाहीनबागेत बिर्यानी खाण्यात रममाण झालेले होते. सहाजिकच त्याचा लाभ उठवण्याची सर्व रणनिती योजून अमित शहा कामाला लागलेले होते. त्यांनी पटकथा लिहील्याप्रमाणे एक एक प्रसंग कथानकात घडवण्याला आरंभ केला, तेव्हा कॉग्रेसला जाग येऊ लागली. पण त्यातही दिग्विजय सिंग यांच्याकडेच सुत्रे रहावित इतका खेळ सोपा दाखवण्यात आला. आरंभी मुठभर म्हणजे सहाआठ आमदार फ़ुटल्याच्या बातम्या आल्या आणि त्यापैकी अनेकांना सिंग व त्यांच्या मुलाने हरयाणातून परत माघारी आणल्याचा डंका पिटला गेला. नेहमीप्रमाणे ‘ऑपरेशन कमल’ असाही शिक्का मारून झाला. परतलेल्या आमदारांनी भाजपावर यथेच्छ आरोप केले आणि दिग्विजय यांनीही भाजपाचा डाव उधळल्याची छाती फ़ुगवून घेतली. हे योगायोगाने घडलेले होते, की दिल्लीकर कॉग्रेसश्रेष्ठींना अधिक गाफ़ील करण्याची खेळी होती? कारण त्या पळापळी मागे दिग्विजय असल्याच्याच आवया पिकल्या होत्या. पण ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव कुठेही नव्हते. मग अकस्मात गेल्या आठवड्याच्या आरंभी चांगले अठरा आमदार बंगलोरला गेल्याचे व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याच्या बातम्या झळकू लागल्या. त्यात नुसते आमदार नव्हते आणि चांगले अर्धा डझन मंत्री असल्याचे उघड झाले. तेही बहुतेक शिंदे यांचे एकनिष्ठ असल्याची पहिलीवहिली बातमी आली.

अगदी नेमके सांगायचे तर हे अठरा आमदार मंत्री बंगलोरला दडी मारून बसल्याचे उघड होईपर्यंत त्यात कुठेही शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आलेला नव्हता. पण एकदा तो आल्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या. होळीचा मुहूर्त शोधून त्याच दिवशी अमित शहा शिंदे यांच्यासह नरेंद्र मोदींना भेटायला गेले आणि दुसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या कॉग्रेस सदस्यत्वाचा राजिनामा हंगामी पक्षाध्यक्षा सोनियांकडे पाठवून दिला. मग तिसर्‍या दिवशी शिंदे यांचा रितसर भाजपात प्रवेश झाला. भाजपाच्या मुख्यालयात शिंदे दाखल झाले व त्यांनी भाजपात दाखल होत असल्याचे पत्रकार परिषदेतच घोषित करून टाकले. तोपर्यंत कॉग्रेसला जाग येऊ लागली होती आणि शाहीनबाग विसरून सोनियांनी तातडीने शिंदे यांची पक्षातून हाकालपट्टी केली. मुद्दा इतकाच, की आपला एक उमदा नेता पक्ष सोडून अन्य पक्षात गेल्यावर त्वरेने कार्यरत झालेल्या सोनियांना आधीचा आठवडाभर मध्यप्रदेश सरकार धोक्यात असल्याचा सुगावा कशाला लागला नव्हता? त्यांचे लोकसभेतील खासदार दिल्लीच्या दंगलीवर संसदेत चर्चा व्हावी म्हणून धुमाकुळ घालत होते. पण त्यापैकी एकालाही मध्यप्रदेशात काही गंभीर गोष्टी घडत असताना त्यात लक्ष घालण्याची गरजही वाटलेली नव्हती. ते काम दिग्विजय संभाळतील आणि कमलनाथ हाताळतील, म्हणून दिल्लीचे श्रेष्ठी शांत झोपा काढत होते. अर्ध्यांना शाहीनबाग शांत होण्याची चिंता सतावत होती, तर अर्ध्यांना दिल्लीची दंगल शमण्याचे दु:ख अनावर झालेले होते. त्यात कुणाला मध्यप्रदेशाची सत्ता गमावण्याची फ़िकीर होती? म्हणून सगळा मामला सापळ्यासारखा वाटतो. अमित शहांनी जाणिवपुर्वक मागल्या दोन महिन्यात म्हणजे नागरिकत्व कायदा संमत केल्यापासूनच मध्यप्रदेशात उलथापालथ करण्याचे काम हाती घेतलेले असावे. त्यांच्या हालचालीकडे कॉग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून शाहीनबागेला मोकळीक दिली असावी काय? देशाच्या अन्य भागात तसेच आंदोलन पेटवण्याच्या धमक्यांकडे शहांनी गृहमंत्री असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले असेल काय?

वास्तव काहीही असू शकते. पण व्यवहारात घटनाक्रम तपासला, तर शाहीनबागेत कॉग्रेसला गुरफ़टून टाकायलाच काही वेंधळेपणा केलेला असू शकतो. वैफ़ल्यग्रस्त कॉग्रेसला निवडणुकातला पराभव आणि ३७० नंतरची मरगळ यातून बाहेर पडायचा उतावळेपणा सतावत होता. त्यातच बाकी प्रयत्न थकले असताना शाहीनबागेतला भडका लाभदायक वाटला. तिथे शशी थरूर यांच्यापासून चिदंबरम यांच्यापर्यंत नेत्यांची फ़ौज कॉग्रेसने तैनात केली. त्या भागातल्या बुरखेधारी मुस्लिम महिला वृद्धांना थरूर वा चिदंबरम यांच्या उच्चभ्रू भाषणातल्या चार ओळीही समजू शकत नाहीत. पण तरीही त्यांनी तिथे जाऊन किल्ला लढवला होता. त्यातून कॉग्रेस या काळात निर्णायक लढाई म्हणून कशी शाहीनबागेत गुरफ़टत गेली, ते लक्षात येऊ शकेल. दिल्ली विधानसभेत मुस्लिमांची भरघोस मते मिळावीत, अशीही आशा होतीच. पण व्यवहारात तो सापळा होता आणि त्यात कॉग्रेसचे दिग्गज अडल्याने मध्यप्रदेशात चाललेल्या आक्रमक हालचाली दुर्लक्षित रहाणार होत्या. तसे झाले म्हणून तर इतक्या सहजगत्या शिंदे व अन्य कॉग्रेस आमदार मंत्र्यांना फ़ोडणे भाजपाला शक्य झाले. ते कधी भोपाळहून गायब झाले आणि बंगलोरला पोहोचले, त्याचाही थांगपत्ता श्रेष्ठींना लागला नाही. त्यामागे शिंदे यांची प्रेरणा होती, त्याचा सुगावाही पत्रकारांना लागू शकला नाही. कारण अशा सर्वांनाच शाहीनबागेत अमित शहांनी जणू भेळ खायला बसवलेले होते. उरलेल्यांना ट्रम्प यांच्या वरातीमध्ये नाचायला पाठवलेले होते. व्यवहारात मध्यप्रदेशातील कॉग्रेस सरकारला सुरूंग लावण्याची पुर्ण सज्जता उरकून घेण्यात आलेली होती. त्यामुळेच दंगल होऊन कॉग्रेसने संसदेत धुमाकुळ घातला; तेव्हा त्यांना  येऊ घातलेल्या मध्यप्रदेशी वादळाची चाहूलही लागली नव्हती. शाहीनबागेचा कात्रज घाट झाला होता आणि हाती किती आमदार उरलेत, त्यांची नावेही मुख्यमंत्री कमलनाथ यांना सांगता येत नव्हती. तसे बघायला गेल्यास ३७० कलमाचा प्रस्ताव संमत झाल्यापासूनच ह्या हालचाली सुरू झाल्या असाव्यात.अखेरचा टप्पा येण्यासाठी दि‘शाहीनबागे’चा आडोसा अमित शहांना घ्यावा लागला असावा.

Wednesday, March 11, 2020

प्रियंकाचं करावं काय?

Image result for priyanka wadra

तुमच्या हातात कुठले चांगले पत्ते आहेत त्यामुळे तुम्ही डाव जिंकू शकत असता हे खरेच आहे. पण हातातले पत्ते योग्य वेळी खेळण्याची चलाख बुद्धी व प्रसंगावधानही तुमच्यापाशी असावे लागते. अन्यथा तुमचे महत्वपुर्ण पत्तेच तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मागल्या पाचसहा वर्षामध्ये म्हणजे राहुल गांधींना कॉग्रेस पक्षात महत्वाच्या पदावर आणल्यापासून त्यांच्या अपयशाने खचलेल्या बहुतांश कॉग्रेसजनांना व नेत्यांना राहुलची भगिनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविषयी मोठ्या आशा होत्या. कारण त्या इंदिराजींसारख्या दिसतात आणि किमान राहुलप्रमाणे बेताल बोलून कामाचा चुथडा करीत नसल्याने त्याच कॉग्रेसची बुडती नौका पार लावू शकतील. हा आशावाद चुकीचा मानता येणारा नव्हता. पण प्रियंकासह एकूण कॉग्रेसजनांचे दुर्दैव असे, की प्रियंका कितीही हुशार असल्या तरी त्याही राहुलच्याच हातातील एक महत्वाचा पत्ता होता. म्हणूनच जितक्या प्रसंगी त्यांच्या राजकारणातील प्रवेश वा कृतीशील होण्याचा विषय आला, तेव्हा त्यांचे वर्णन ट्र्म्पकार्ड म्हणून झालेले होते. ट्रम्पकार्ड म्हणजे खेळातला हुकूमाचा पत्ता असतो. मात्र जेव्हा जेव्हा तशी वेळ किंवा प्रसंग आला, तेव्हा राहुलनी चुकीच्या वेळीच प्रियंकाचा पत्ता वापरला आणि आता जवळपास निकामी करून टाकला आहे. त्यामुळे आपली राजकारणातली पत शिल्लक ठेवण्यासाठी खुद्द प्रियंका यांनाच कसरती कराव्या लागत आहेत. आपल्या मराठी भाषेत उक्ती आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची; तशीच प्रियंकाची अवस्था झालेली आहे. कारण मागल्या अडीच वर्षात क्रमाक्रमाने राहुलनी आपल्या या भगिनीची मूठ उघडून ती मातीमोल करून टाकलेली आहे. सहाजिकच आता थेट क्रियाशील राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी प्रियंका उतावळ्या झाल्या आहेत. तर त्यांचे काय करावे, हा सवाल मातोश्री सोनिया व भाऊ राहुल यांना सतावू लागला आहे. कारण प्रियंकाला राज्यसभेत यायचे आहे आणि ते गांधी कुटुंबियांनाच मान्य नसावे, अशी एकूण स्थिती आहे.

महिनाभरापुर्वी राज्यसभा निवडणुकीची चर्चा चालू झाली आणि अचानक त्यात प्रियंकाचे नाव पुढे आले. राहुलच्या खुळेपणाला कंटाळलेले पक्षातले अनेकजण तात्काळ खुश झाले. कारण प्रियंका पक्षाला जीवदान देऊ शकेल अशी त्यांची अपेक्षा आहे. किंबहूना त्यासाठीच गेल्या लोकसभेपुर्वी प्रियंकांना मैदानात आणले गेले होते. राहुल तेव्हा कॉग्रेस अध्यक्ष होते आणि त्यांनी प्रियंकाला पुर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवली होती. प्रथमच प्रियंकावर पक्षातली एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका यांना उत्तरप्रदेश संयुक्तपणे सोपवण्यात आला. त्याचा खुप गाजावाजा झालेला होता. आता भाजपाची उत्तरप्रदेशातून सद्दी संपली, असा निष्कर्ष अनेक विश्लेषकांनी तेव्हा काढला होता. कारण तात्काळ प्रियंका लखनौला रवाना झाल्या व त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. पण कार्यकर्ते व पदाधिकारी असायला मुळात पक्षाची संघटना असावी लागते. तिथेच प्रियंकांना वासत्वाची जाणिव झाली आणि त्यांनी संघटना उभारण्यापेक्षाही खळबळजनक वक्तव्ये करण्याचे काम हाती घेतले. त्यातूनच मग राहुल गांधींच्याही पुढले एक पाऊल टाकले होते. कोणीतरी विचारले त्या लोकसभा लढवणार काय? तर त्यांनीही मोठ्या आत्मविश्वासाने वाराणशीत लढू काय; हा प्रतिसवाल केला होता. त्याचा खुप गाजावाजा झाला आणि सगळे प्रियंका मोदी विरोधात लढणार म्हणून डंका पिटू लागले. काहींनी मोदींसाठी वाराणशी अवघड जागा झाल्याचेही निष्कर्ष काढून टाकले. मग प्रियंकाने धुर्तपणे आपली भूमिका बदलली. वाराणशीत उभे रहाणार काय, ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा त्या प्रश्न टाळू लागल्या आणि राहुलना विचारा असे उत्तर देऊ लागल्या. राहूलही पत्रकारांशी आट्यापाट्या खेळत बसले आणि इतक्यात त्यातले रहस्य कशाला संपवू, म्हणत गंमत करीत राहिले. मात्र प्रत्यक्ष निवडणूक जवळ आली, तेव्हा राहुलनाच अमेठीची शाश्वती उरलेली नव्हती आणि ती जबाबदारी प्रियंकावर सोपवून त्यांनी वायनाडला पळ काढला.

थोडक्यात राहुलचे हे ट्रम्पकार्ड खेळण्यापुर्वीच मातीमोल होऊन गेले होते. त्यामुळे पराभवाची आशंका आलेल्या राहुलनी भगिनीला २०२२ मध्ये उत्तरप्रदेशात कॉग्रेसची सत्ता आणण्याचे काम सोपवल्याचे सांगून पळ काढला होता. अखेर अमेठीतही राहुल पराभूत झाल्यावर प्रियंका नामक भ्रमाचा भोपळा फ़ुटला आणि तो विषय मागे पडला. फ़ार कशाला लोकसभेचे निकाल लागले आणि राहुल यांनीच राजकारणातून पळ काढला. त्यांनी निवडणूकांच्या निकालाचे आत्मपरिक्षण करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्यात अध्यक्षपदाचाच राजिनामा देऊन टाकला. तेवढ्यावर न थांबता कॉग्रेसच्या अध्यक्षपदी आता कोणी गांधी कुटुंबीय नको असेही सांगून टाकले. तेव्हापासून पक्षाला अध्यक्ष लाभलेला नाही. महिनाभर अध्यक्षाशिवाय कॉग्रेस कशीबशी चालली आणि अखेरीस निवृत्त सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष घोषित करून पक्षाचा गाडा चालवावा लागतो आहे. त्यालाही आता नऊ महिन्यांच्या कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान पक्षाचे निर्णय कधी राहुल तर कधी सोनिया घेत असतात. तर नवा अध्यक्ष निवडण्य़ाचा विषय अडगळीत पडलेला आहे. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. पक्षाध्यक्ष म्हणून राहुलनी घेतलेला अखेरचा निर्णय फ़ेटाळून लावण्याचा महत्वाचा निर्णय प्रियंकाचाच होता. यापुढे कॉग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबातला नसावा, हा राहुलचा निर्णय कार्यकारिणीत फ़ेटाळून लावण्याची कोणाही श्रेष्ठीची हिंमत झालेली नव्हती, त्याला नकार देणार्‍या प्रियंकाच होत्या आणि सोनियांनी त्याला अनुमोदन दिल्यावर कार्यकारिणीने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. याचा अर्थ इतकाच, की राहुलचा निर्णय फ़िरवून प्रियंकांनी आपल्याला भविष्यात त्याच पदावर बसण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे. पण त्यासाठी त्यांना पुर्णवेळ कृतीशील राजकारणात येण्याची गरज आहे आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे संसदेत येऊन आपली चमक दाखवणे. त्यासाठीच बहुधा प्रियंकानी राज्यसभेसाठी प्रयत्न चालविले असावेत.

गांधी कुटुंबाची इच्छा शिरसावंद्य मानणे, हे प्रत्येक कॉग्रेसजनाचे परम कर्तव्य असल्याने तात्काळ अनेक मुख्यमंत्री व नेत्यांनी प्रियंकांना आपल्या राज्यातून राज्यसभेत जाण्याचा आग्रह धरला तर नवल नाही. पण अखेरचा निर्णय कुटुंबानेच करायचा असतो आणि तो सोनियांच्या हाती होता. पण त्यांनाच प्रियंका मुख्य भूमिकेत नको असल्यास मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ही खरी समस्या आहे. राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगड अशा राज्यांचे मुख्यमंत्री प्रियंकांना निवडून आणायला सज्ज आहेत. पण पक्षश्रेष्ठी म्हणजे सोनियांचा हिरवा कंदिल मिळायला हवा ना? सगळे घोडे तिथेच अडलेले आहे. जी आई आपल्या खुळेपणा करणार्‍या पुत्राला इतकी मोकाट संधी देते, तीच आपल्या लाडक्या कन्येला एक किरकोळ संधी कशाला नाकारत असेल? राहुलना दोन लोकसभेत कॉग्रेसचे नाक कापण्यापर्यंत मोकळीक सोनियांनी दिली होती. मग प्रियंकाला राज्यसभेत येऊन आपली राजकीय चतुराई सिद्ध करण्याची संधी का नाकारली जात असावी? की मुलासारखीच मुलगीही अब्रु धुळीस मिळवेल, अशा चिंतेने आईला ग्रासले आहे? तशी बिलकुल शक्यता नाही. राहुल यांच्यापेक्षा आपल्या वर्तनात व बोलण्यात प्रियंका खुप सावध असतात आणि सहसा त्या कुठल्या वादग्रस्त विधानामुळे कचाट्यात तरी सापडलेल्या नाहीत. पण तीच तर खरी समस्या आहे. राज्यसभा वा संसदेत आल्यावर त्यांच्या खर्‍या राजकीय कौशल्याचे प्रदर्शन जाहिरपणे होऊ लागेल आणि आपोआप भावाशी त्यांच्या गुणवत्तेची तुलनाही व्हायला पर्याय उरत नाही. प्रियंकाने किरकोळ चतुराई दाखवली वा तिची गुणवता लोकांच्या नजरेत भरू लागली; तर कॉग्रेसमधील अस्वस्थ आत्मे तात्काळ राहुलविरोधी बंडापर्यंत मजल मारू शकतील. त्यांना आवरणेही सोनियांच्या हाती उरणार नाही. ही खरी समस्या आहे. त्यापेक्षा दोन भावंडांच्या गुणवत्तेविषयीची मुठ झाकलेली असण्यातच कुटुंबाची एकता व इभ्रत शाबूत रहाते ना?

दिल्लीच्या अनेक बातमीदारांनी गेल्या आठवड्यात कॉग्रेसमधील या समस्येचा उहापोह केलेला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तर प्रियंकानेच आपल्या राज्यसभा लढण्याच्या बातम्या सोडलेल्या होत्या आणि त्यामार्गाने आपल्या आईवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयास केला होता. पक्षातूनच मागणी आल्यावर सोनियाही शरण येऊन आपल्याला उमेदवारी देतील, असा कयास असावा. पण त्याऐवजी वेगळाच घटनाक्रम घडला. प्रियंकासाठी राज्यसभा देऊ केलेल्या वा तशी मागणी उचलून धरणार्‍या नेत्यांना हंगामी पक्षाध्यक्षांनीच दटावले आणि विषय मागे पडला आहे. त्याचे कारण सोपे आहे. प्रियंकांना राज्यसभेत निवडून आणण्यात अडचण नसली तरी भावाशी तिची तुलना आईला अजिबात नको आहे. तसे झाल्यास पुन्हा राहुलना अध्यक्षपदी बसवणे अशक्य होऊन जाईल. कारण त्याच्यापेक्षा संसदेतील प्रियंका पक्ष कार्यकर्ते नेत्यांना अधिक प्रभावित करून जाईल. सोनियांना नेमकी तीच गोष्ट नको आहे. त्यामुळे ट्रम्पकार्ड राहुल व सोनियांच्या हातात असले, तरी त्यांनी ते चुकीच्या प्रसंगी वापरून झालेले आहे. तशी संधी पुन्हा आलेली असली तरी त्यांना ते वापरण्याचीच भिती वाटते आहे. प्रियंकापाशी मोदींच्या लोकप्रियतेला पराभूत करण्याची कुवत नसली, तरी टक्कर देण्याची क्षमता नक्कीच आहे. तेवढ्यानेही नव्याने कॉग्रेसला उभारी देण्याची प्रक्रीया सुरू होऊ शकते. ते लाभदायक असले तरी मातेच्या पुत्रप्रेमाने भेदभाव निर्माण केलेला आहे. शिवाय प्रियंका आजीसारखी दिसण्याने फ़ारसा लाभ होऊ शकणार नसला तरी आपल्या बुद्धीने काही ठाम निर्णय घेण्याइतकी समज त्यांनी यापुर्वी दाखवली आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे संयम वा प्रसंगावधान ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण कौटुंबिक जिव्हाळा त्यांच्या वाटचालीच्या आड आलेला आहे. मात्र दरम्यान आई आणि भावाला मात्र प्रियंकाचे करावे काय हा प्रश्न भेडसावतो आहे.

Tuesday, March 10, 2020

भोपाळी शिमग्याची सोंगे

Image result for jyiraditya schindia
मध्यप्रदेश कॉग्रेसमध्ये उभी राहिलेली समस्या पक्षाने आमंत्रण देऊन बोलावलेली आहे. कारण त्याची कुणकुण खुप आधीपासून लागलेली होती. पंधरा वर्षानंतर तिथली सत्ता कॉग्रेसला मिळाली, तेव्हाच त्याची बीजे रुजवली गेली होती. आपण इतका दिर्घकाळ सत्तेबाहेर कशाला बसलो, त्याचा साधा विचारही त्या पक्षाच्या नेत्यांना कधी करता आला नाही, म्हणून ते इतका काळ सत्तेबाहेर बसले होते. अन्यथा शेजारच्या राजस्थानात किंवा उत्तरेकडे हिमाचल प्रदेशात आलटून पालटून कॉग्रेस भाजपा यांच्यात सत्तांतर होत राहिले. पण मध्यप्रदेश व त्याचाच पुर्वी एक भाग असलेले छत्तीसगड राज्य, पंधरा वर्षे भाजपाच्या हातात राहिले, त्याचे मुख्य कारण कॉग्रेस पक्षात चालू असलेली किंवा न संपलेली सुंदोपसुंदी इतकेच होते. तरीही २०१८ च्या अखेरीस भाजपाला त्याच आजाराची बाधा झाली म्हणून त्यांच्या हातून बहूमत निसटले आणि सत्ताही किरकोळ संख्येने गेली. ती कॉग्रेसला आपले बस्तान पक्के करण्याची सुवर्णसंधी होती. पण आत्मघाती बेबनाव हा कॉग्रेसनेत्यांमध्ये उपजत असतो वा असावा लागतो. म्हणूनच लॉटरीसारखी सत्ता हाती येताच त्यांच्यातली भांडणे उफ़ाळून आली आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना खड्यासारखे बाजूला ठेवण्याचे डाव खेळले गेले. तिथून ह्या संकटाचे ढग कमलनाथ सरकारला झाकोळू लागले होते. त्यात हस्तक्षेप करण्यासाठी पक्षश्रेष्ठी नावाची माणसे असतात. पण श्रेष्ठींना मंत्रीपद वा मुख्यमंत्री नेमण्यातून आपल्या तिजोरीत काय येणार, इतक्यापुरता रस असल्यावर यापेक्षा वेगळे काय व्हायचे? ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यात गळचेपी होत असेल तर त्यांचे पुनर्वसन कुठेतरी व्हायला हवे होते आणि त्यांची तितकीच अपेक्षा होती. ती पुर्ण होण्याची शक्यता नसल्याची खात्री पटल्यावर पुढला घटनाक्रम अपरिहार्य होता. त्याचे खापर भाजपाच्या माथी फ़ोडल्याने कॉग्रेसचे कल्याण शक्य नव्हते, की कमलनाथ सरकार बचावण्याची बिलकुल शक्यता नव्हती. पण हे राहुल व प्रियंका अशा वारशाने नेता झालेल्यांच्या डोक्यात कसे शिरावे?

नोव्हेंबर महिन्यात शिंदे यांनी आपल्या भूमिकेत आमुलाग्र बदल होत असल्याचे इशारे वेळोवेळी दिलेले आहेत. आधी त्यांनी ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून पक्षश्रेष्ठींना इशारा दिला होता. पण तो समजून घेण्यापेक्षा वा नाराजांना चुचकारण्यापेक्षा डिवचण्यालाच श्रेष्ठी समजले जात असेल, तर ह्या घटनाक्रमातून सुटका नव्हती. महिन्याभरापुर्वी शिंदे यांनी कमलनाथ सरकारला इशारे दिलेले होते. कर्जमाफ़ी वा निवडणूकीतली आश्वासने पुर्ण केली जात नाही. त्यामुळे पक्षाच्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. हा इशारा सोनिया गांधींना कळत नाही, की राहुल प्रियंकांच्या डोक्यात शिरणारा नाही? हातातले एक मोठे राज्य व तिथले सरकार जाण्याचा तो इशारा होता. पण तिथे डगडुजी करण्यापेक्षा शाहीनबाग किंवा तत्सम गोष्टींवर पोरखेळ करण्यात कॉग्रेसश्रेष्ठी रमलेले होते. त्यांना तिथेच खेळवून ठेवताना अमित शहा यांच्यासारखा पाताळयंत्री भाजपानेता मध्यप्रदेशात कॉग्रेसची कबर खोदत होता. कारण ते सरकार उलथून टाकणे सर्वात सोपे काम होते. जवळपास कर्नाटक व मध्यप्रदेशचे आकडे सारखेच होते. त्यातच शिंदे यांच्या पाठीराख्यांची संख्याही त्यासाठी भरपूर होती. शिंदे नाराज म्हणजे कॉग्रेसमधूल ३०-३५ आमदार नाराज असा अर्थ होता. त्यापैकी डझनभर आमदारांनी आपले राजिनामे दिले तरी मध्यप्रदेशात कर्नाटक व्हायला वेळ लागणार नव्हता. त्याची सुरूवातही कर्नाटकसारखी झाली. आधी चारसहा आमदार गायब झाले आणि त्यांना परत बोलावून भाजपावर डाव उलटवण्याचे नाटक सुरू झाले. पण परत आलेल्यांनी कॉग्रेसला मजबूत करण्यापेक्षा आणखी अनेक आमदारांसह पलायन केले. तोपर्यंत सोनिया वा कमलनाथ यांना जागही आली नाही. मग शिमग्याचा मुहूर्त शोधून होळी पेटवण्यात आली. सोनियांना त्याचे गांभिर्य समजण्यापर्यंत खेळ हाताबाहेर गेला होता. शाहीनबागेत बागडायला जाण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या असल्या बेबनावाकडे पुरेसे लक्ष दिले असते तर?

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सोमवारी हे नाट्य रंगू लागल्यावर ज्योतिरादित्य शिंदे यांना रात्री सोनियांनीच आमंत्रण पाठवले. त्याकडे शिंदे यांनी पाठ फ़िरवली, तिथेच कमलनाथ सरकारचे दिवस भरलेले होते. मंगळवारी शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि तोपर्यंत त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्या १९ आमदारांनी बंगलूरू येथे आश्रय घेतला होता. पण त्याकडे बघायला श्रेष्ठींना सवड कुठे होती? सर्व कॉग्रेस पक्ष व त्याचे एकाहून एक महान लोक, येस बॅन्केच्या दिवाळखोरीचे खापर भाजपाच्या डोक्यावर फ़ोडण्यात गर्क होते. त्यात इडीने लक्ष घातल्यावर प्रियंका गांधीच त्यात फ़सल्याचे दिसू लागले. मग कॉग्रेस नेत्यांचे पहिले कर्तव्य गांधी कुटुंबाला वाचवणे आणि त्यासाठी पक्षालाही मुठमाती देणे असे असते ना? म्हणून इथे पक्षाचे आमदार गायब व बंगलूरूला पळून जात असताना, कॉग्रेसचे चाणक्य प्रियंका गांधींना निर्दोष ठरवण्यात रममाण झालेले होते. आधी ह्या फ़ाटाफ़ुटीच्या कारस्थानाची तयारी चालू असताना सगळेच शाहीनबागेत पर्यटन करायला गेले होते आणि नंतर समस्या समोर आल्यावर प्रियंकाचा बचाव महत्वाचा झाला होता. परिणामी मध्यप्रदेशाच्या पक्ष व सरकारच्या आघाडीवर फ़क्त दिग्विजयसिंग व कमलनाथ एकटेच पडलेले होते. म्हणून तर इतक्या टोकाला गोष्टी गेल्या असतानाही सोनिया पुर्णपणे गाफ़ील होत्या. त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. रांगत गुडघे टेकत शिंदे १० जनपथला येतील, असा आत्मविश्वास नसता तर सोनियांनी हे आमंत्रण कशाला दिले असते? त्यातून त्यांचा गाफ़ीलपणा लक्षात येऊ शकतो. रात्री साडे नऊची वेळ दिलेली असताना आणि दारात तमाम माध्यमांचे पत्रकार प्रतिक्षा करीत बसले असूनही, शिंदे तिकडे फ़िरकलेच नाही. तिथेच चित्र स्पष्ट झाले होते. पण ते सत्य मानायचे कोणी? ना कॉग्रेसला सत्य बघायची हिंमत उरली आहे ना त्यांच्या बुद्धीवादी समर्थकांना सत्य समजण्याची बुद्धी उरली आहे. म्हणून अमित शहांना होळीचा मुहूर्त साधता आला.

 हे १८ आमदार बंगलूरूला रवाना झाल्याच्या बातम्या आल्या, तेव्हाच अकस्मात मध्यप्रदेश भाजपाच्या आमदारांचे नवे नेते म्हणून शिवराजसिंग चौहान यांची निवड होणार असल्याच्याही बातम्या झळकू लागल्या. त्याचा एकत्रित अर्थ कुठल्याही सामान्य पत्रकारालाही काढता आला असता. पण डावपेचात भाजपाची सरशी होताना बघण्याचे धैर्य पत्रकारही गमावून बसले असतील, तर त्यांचीही दिशाभूल होण्याला पर्याय उरत नाही. कमलनाथ आपल्याशी निष्ठ असलेल्या तमाम मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांचे राजिनामे घेतात आणि भाजपा माजी मुख्यमंत्र्याची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नव्याने निवड करायच्या हालचाली करतो, हे सत्तांतराचे समिकरण असते. शेंबड्या पोरालाही कळू शकते. पण बघायचे वा समजून घ्यायचेच नसेल तर काय? ह्या सर्व हालचाली होत असताना त्यात कर्नाटक सत्तांतराचे प्रतिबिंब पडलेले आहे. पण एक मोठा फ़रक लक्षात घेतला पाहिजे. त्या घटनाक्रमामध्ये विधानसभेच्या सभापतींनी खुप कसरती केल्या होत्या आणि त्यामुळे सत्तांतराला विलंब झाला होता. त्यापासून अमित शहा वा भाजपा धडा शिकलेला दिसतो. इथे जशीच्या तशी कर्नाटकाची पुनरावृत्ती होताना दिसत नाही. आमदारांनी आपले राजिनामे व्यक्तीगत रितीने सभापतींना दिले पाहिजेत, असे सांगून कर्नाटकात पोरखेळ झाला होता. तशी वेळ येऊ नये म्हणून मध्यप्रदेशात वेगळी खेळी झाली आहे. बंगलुरूला गेलेल्या वा बंडखोरी करणार्‍या कॉग्रेस आमदारांनी आपले राजिनामे सभापतींकडे देण्यापेक्षा वेगळा मार्ग चोखाळला आहे. आपले राजिनामे त्यांनी थेट राज्यपालांकडे देण्याचा पवित्रा घेतलेला आहे. म्हणजेच त्यांचे राजिनामे राज्यपालांनी सभापतीकडे पाठवावे, असा खेळ होऊ घातला आहे. त्यात कॉग्रेस नेते किंवा त्याच पक्षाशी बांधिल असलेल्या सभापतींना वेळकाढूपणा करता येऊ नये, म्हणून काढलेली ही पळवाट असू शकते. कदाचित त्यासाठी कुणा घटनातज्ञ वकीलाचाही सल्ला घेतलेला असू शकतो. सांगायचा मुद्दा इतकाच, की अनुभवातून भाजपा शिकतो आहे आणि अनुभवातून शिकायची कॉग्रेस पक्षाची अजिबात तयारी नाही.

चौदा महिन्यापुर्वी कॉग्रेसला भाजपाच्या मुर्खपणामुळे सत्ता मिळाली, तर त्यांनी केलेले महत्वाचे कार्य कोणते होते? स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची विटंबना करणारी पुस्तिका काढली. छिंदवाडा येथील शिवरायांचा पुतळा शासकीय बळ वापरून उखडून काढला. सत्तेची इतकी मस्ती कोणाला सत्तेत टिकू देणारी असते? शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफ़ी असे विषय घेऊन निवडणूका लढल्या होत्या. त्याचा विसर कॉग्रेसला पडला, म्हणून अशा मार्गाने पक्ष भरकटत गेला. मतदाराला खुश करण्यापेक्षा भाजपाला किंवा त्याच्या हिंदूत्वाला डिवचण्याचा एकलकमी कार्यक्रम चालू राहिला. त्यातून ही दुर्दशा झालेली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी तिथल्या मतदाराच्या घरावर सोन्याची कौले घातलेली नाहीत. तिथली जनता सुखवस्तू जीवन जगते, असे कोणी म्हणू शकणार नाही. पण आपल्या कारकिर्दीत कुठलेही चमकदार काम करण्यापेक्षा त्यांनी सामान्य जनतेला अधिकाधिक सुसह्य जगता यावे, इतकीच काळजी घेतली आहे. त्याकडे पाठ फ़िरवून त्यांनी पुरोगामी प्रतिगामी किंवा हिंदू मुस्लिम अशा कुठल्याही नाटकात भाग घ्यायचे साफ़ नाकारले आहे. राज्य आणि केंद्र सरकारचा वाद उकरून काढून पोरखेळ केलेला नाही. कुठल्याही राजकीय गटात वा गोटात जायचे टाळले, तरी मतदाराने त्यांचा पाचव्यांदा बहूमताने सत्ता बहाल केली आहे. मोदींची लोकप्रियता वा भाजपाची संघटनात्मक शक्ती पटनाईकांना पराभूत करू शकली नाही. मग कमलनाथ वा कुमारस्वामी यांनी त्यांचाच धडा गिरवायला काय अडचण होती? तितके सुसह्य जीवन देण्याचे प्रयासही कमलनाथ यांना सत्तेत कायम ठेवू शकले असते. त्यात ज्योतिरादित्य शिंदे किंवा भाजपा बाधा घालू शकला नसता. पण सत्तेची मस्तीच अशी और असते, की तिथे आरुढ झाल्यावर अकारण खोड्या करण्याचे मोह आवरत नाहीत आणि कपाळमोक्ष ओढवून आणला जातो. मध्यप्रदेश हे त्याचे ताजे उदाहरण आहे. होळीच्या दिवशी घरात बसून ही भोपाळी शिमग्याची सोंगे लोक म्हणूनच बघत आहेत.

Sunday, March 8, 2020

मीडियानंतर सोशल मीडीया?

modi tweet on meaning social media के लिए इमेज नतीजे

सहा वर्षापुर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपाने आपल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार मोहिमेचा चेहरा बनवला, तेव्हा बहुतांश माध्यमे व नामवंत पत्रकार मोदी विरोधक होते. किंबहूना मोदींना संपवण्यासाठी सतत टपलेले होते. २००२ पासून म्हणजे ते मुख्यमंत्री होऊन गुजरातमध्ये दंगल उसळली, तेव्हापासूनच मोदीं विरोध म्हणजेच पत्रकारिता, अशी एक सार्वत्रिक समजूत करून देण्यात आलेली होती. त्याच्याशी संघर्ष करताना मोदी पंतप्रधान पदापर्यंत येऊन पोहोचले. हा इतिहास आहे. म्हणूनच २०१३ च्या मध्यास भाजपाने मोदींना पुढे केल्यावर एक प्रश्न डिवचून मुद्दाम भाजपाच्या नेत्यांना प्रवक्त्यांना विचारला जात होता. ‘मोदी वाजपेयी होतील का?’ या प्रश्नामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. वाजपेयी म्हणजे माध्यमे, बुद्धीजिवी वा शहाण्यांच्या वर्गाला दबून रहाणारा भाजपाचा एक उदारमतवादी चेहरा होय. मोदी तितके लवचिक होतील का? वाजपेयी यांच्यासारखे माध्यमांच्या दबावाखाली येतील का? नेमक्या शब्दात सांगायचे तर मोदी दिल्लीकर पुरोगामी पत्रकारितेला शरण जातील काय? असा त्याच प्रश्नाचा रोख होता. त्याचे कारण असे, की आधीची सहासात वर्षे मोदींनी माध्यमांकडे साफ़ पाठ फ़िरवली होती व कितीही सतावले तरी माध्यमांना मुलाखती देणे वा पत्रकार परिषद घेणे बंद केलेले होते. मोदी माध्यमांना घाबरून असतात, अशीही टवाळी होत राहिली. पण त्यांनी कधीही असल्या चिमट्यांना वा टोमण्यांनाही उत्तरे दिली नाहीत. उलट क्रमाक्रमाने आपल्या कामातून जनतेत स्थान मिळवले आणि त्यांच्या माध्यमातील विरोधकांसह राजकारणी नेत्यांनाही नामोहरम करून टाकले होते. त्यामुळेच जसजशी २०१४ ची लोकसभा निवडणूक जवळ येत गेली, तसे बहुतांश पत्रकारच वैफ़ल्यग्रस्त झाले आणि जवळपास सर्व माध्यमांची महत्ताच मोदींनी जमिनदोस्त करून टाकली. त्यासाठी मोदींनी एका नव्या साधनाचा हत्यारासारखा वापर केला होता, त्याला आजकाल जग सोशल मीडिया म्हणून ओळखते. मग आता त्याच सोशल मिडियाला मोदी रामराम ठोकणार, ही बातमी होण्याला पर्यायच नव्हता. गेला आठवडा त्याच बातमीने गाजला. हे काय नवे नाटक आहे?

मागल्या सहा वर्षात मोदींनी एक गोष्ट नक्की साध्य केली. त्यांच्या कपड्यापासून हालचाली वा उच्चारलेले शब्दही बातमी होऊ लागले होते. कारण त्यांनी भारताला नव्या युगात आणले. आजवर बहुतांश राजकीय पक्ष वा पुढारी माध्यमांना वचकून असायचे. पत्रकार कुठल्याही नेता नामवंताची समाजातील प्रतिमा जमिनदोस्त करू शकतात, ही ठाम समजूत होती. पण २००७ पासून २०१४ पर्यंतच्या सात वर्षात मोदींनी असहकार्य करून माध्यमांची तीच प्रतिमा पुरती संपवून टाकली. त्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीने नव्याने अवतरलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता. फ़ेसबुक, ट्वीटर अशा स्मार्टफ़ोनवर चालणार्‍या व जगभर पोहोचू शकणार्‍या माध्यमातून मोदींनी लोकांशी संपर्क आरंभला. पर्यायाने बातम्या वा माध्यमांशिवाय त्यांना जनतेपर्यंत पोहोचणे शक्य होऊन गेले. मोदींची प्रतिमा व काम यामुळे करोडो लोकांना त्या माणसामध्ये स्वारस्य वाटू लागले. त्याचे मुळ कारण मुख्यप्रवाहातील माध्यमे होती. बदनामीची मोहिम चालवल्याप्रमाणे बहुतांश माध्यमांनी व पत्रकारांनी मोदींची इतकी जबरदस्त निंदानालस्ती केलेली होती, की त्यातून त्यांचे नाव आणि चेहरा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला होता. पण कितीही नालायक माणूस असला तरी त्यात काहीतरी वेगळेपण वा समजून घेण्यासारखे असू शकते. ती बाजू माध्यमांनी कटाक्षाने लपवली होती. पण लोकांना ती जाणून घ्यायची उत्सुकता असणार हे ओळखून मोदींनी सोशल माध्यमातून जनतेपर्यंत थेट पोहोचण्याचा सोपा मार्ग अवलंबिला. परिणामी त्यांची बाजू सामान्य लोकांपर्यंत जाऊ लागली आणि माध्यमांचा खोटेपणा उघडा पडत गेला. त्यामुळे माध्यमे खोटी पडत जाऊन त्यांची विश्वासार्हताच संपून गेली. दुसरीकडे मोदी या माणसाची विश्वासार्हता अफ़ाट वाढली आणि त्याच्या प्रत्येक प्रकाशित वा प्रक्षेपित शब्दावर लोकांच्या उड्या पडू लागल्या. मात्र ते शब्द माध्यमांना मिळत नव्हते. तर मोदींच्या सोशल मीडिया खात्यातून वा त्यांनीच उपलब्ध करून दिलेल्या चित्रणातून खरकाट्यासारखे उचलावे लागत होते.

अगदी नेमक्या शब्दात सांगायचे, तर ज्या माध्यमांनी २००२ पासून मोदी बदनामीच्या मोहिमा राबवल्या होत्या, त्याच पत्रकारांना आता मोदींचे चार शब्द आपल्या वाहिनी वा वर्तमानपत्रात खास म्हणून पेश करण्यासाठी मोदींचे पाय धरण्याची वेळ आलेली होती. अशा वेळी मोदींनी अतिशय धुर्तपणे एक एक माध्यमाचा कणा मोडून टाकला. सर्व वाहिन्या बाजूला टाकून एएनआय नामक वृत्तसंस्थेला त्यांनी प्रदिर्घ मुलाखत दिली. म्हणजेच सर्व वाहिन्यांना ती मुलाखत उपलब्ध होती, पण कोणालाही खोचक प्रश्न विचारण्याची मुभा मिळाली नव्हती. त्यानंतर एकामागून एक वाहिन्या मोदींच्या मुलाखतीसाठी गयावया करू लागल्या. तेव्हा त्यांनी जाणिवपुर्वक नावाजलेल्या मिरवणार्‍या संपादक व वाहिन्यांना बाजूला ठेवून नगण्य वाटणार्‍या वाहिन्यांना प्राधान्याने मुलाखती दिल्या. तेवढेच नाही तर प्रत्येक वाहिनीच्या नामवंत संपादक पत्रकाराला नकार देऊन तिथल्या तुलनेने नगण्य वाटणार्‍या पत्रकाराला मुलाखत दिली. पण प्रत्येक मुलाखतीवर प्रेक्षक तुटून पडत असल्याने वाहिन्यांचीही लाचारी झाली होती. मोदींनी त्यांना कठपुतळीप्रमाणे खेळवले. आधीच्या बारा वर्षात ज्यांनी छळले होते, त्यांना एकाही शब्दाने न दुखावता फ़क्त दुर्लक्षित करून मोदींनी नामोहरम करून टाकले. कारण या माध्यमांची मोदींना गरजही राहिलेली नव्हती. माध्यमे नेत्यांना वा घटनाक्रमाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी असतात. पण नेत्याला त्यासाठी दुसरी सुविधा उपलब्ध असेल, तर पत्रकारांच्या माध्यमाची सद्दी संपून जाते. हे सत्य मोदींनी सोशल मीडिया प्रभावी होण्यापुर्वीच ओळखले होते आणि तेच हत्यार अतिशय प्रभावीपणे मुख्य प्रवाहातील माध्यमाच्या व शत्रूवत वागलेल्या पत्रकार संपादकांच्या विरोधात वापरले. थोडक्यात मोदींनी एकप्रकारे सोशल माध्यमांचा वापर करून पत्रकार माध्यमांना नेस्तनाबुत केले आणि दुसरीकडे सार्वजनिक जीवनात सोशल मीडियाला महत्वाचे स्थान निदान भारतात तरी प्राप्त करून दिले. आज पाच वर्षांनी परिस्थिती तशीच राहिलेली नाही. जग खुप बदलले आहे आणि तंत्रज्ञानही खुप पुढे गेले आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक व त्यानंतर अधिकाधिक विस्तारत गेलेल्या सोशल मीडियाचा मोदी व त्यांच्यामुळेच भाजपाने मुक्तहस्ते वापर केला. परिणामी अन्य राजकीय पक्ष व नेत्यांनाही त्या माध्यमात उडी घ्यावी लागली. मात्र अवघे जग तिकडे ओढले जात असताना मोदी तेवढ्यावर थांबलेले नव्हते. त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर तंत्रज्ञानात येणार्‍या नवनव्या सुविधांचा आधार सतत घेतला होता. म्हणूनच नमो एप किंवा अन्य मार्गाने त्यांनी सोशल मीडिया ह्या साधनावरही विसंबून रहाण्याचा आळस केला नाही. आज मन की बात किंवा नमो एप अशा माध्यमातून मोदी थेट जनतेच्या संपर्कात असतात. त्यांना सोशल मीडियावरही अवलंबून रहाण्याची गरज उरलेली नाही. पण नंतर त्यात घुसलेल्या अनेकांनी मोदींचे शस्त्र त्यांच्यावरच उलटवणे स्वाभाविक होते. इतरही पक्ष व विविध मोदीविरोधी प्रचारक सोशल माध्यमात आले. त्याच्याही पुढे जाऊन अशा सेवा पुरवणार्‍या कंपन्यातही मोदी विरोधक घुसले आणि तिथून मोदींची कोंडी करण्याचे डावपेच सुरू झाले. शाहीनबाग किंवा नागरिकत्व कायद्यापासून काश्मिर ३७० कलमापर्यंत अनेक बाबतीत मोदी सरकार विरोधात अफ़वांचे पीक काढून मोदींना कोंडीत पकडण्याला ऊत आला. यातल्या बहुतांश कंपन्या परदेशी व अमेरिकन आहेत. त्यांच्या भारतीय शाखांमध्ये मोदी विरोधकांनी मोक्याचे स्थान प्राप्त केले आणि जाणिवपुर्वक मोदी वा भाजपाला सतावण्याचे खेळ तिथेही सुरू झाले. जे सोळा सतरा वर्षापुर्वी भारतातील व जगभरच्या मुख्यप्रवाहातील माध्यमातून चालले होते, त्याचीच पुनरावृत्ती नव्याने सोशल मीडियातून सुरू झाली. पण आपत्ती येईपर्यंत थांबायचे नसते, हा धडा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून शिकले होते. त्याची तयारी त्यांनी आधीपासून सुरू केली होती. हा बदल खरे तर अलिकडला अजिबात नाही. २०१९ लोकसभा निवडणूकीला सामोरे जाण्यापुर्वीच मोदींनी प्रस्थापित सोशल मीडियातून हळूहळू बाजूला व्हायची सुरूवात केली होती. मन की बात, नमो एप अशा विविध साधनांची तजवीज त्यांनी आधीच केली होती.

जेव्हा एखादा शत्रू वा प्रतिस्पर्धी आपल्या विरोधात एखादे हत्यार वापरतो, तेव्हा त्यात गुरफ़टून पडण्यापेक्षा त्याला चकीत करणारे नवे हत्यार उपसावे लागत असते. जे त्याला चकीत व थक्क करून सोडेल, अशी खेळी नेहमीच प्रभावी ठरत असते. २०१४ च्या काळात मुख्य प्रवाहातील माध्यमांना तो धडा मिळाला होता. पण शिकायला खुप वेळ लागला. आता नरेंद्र मोदींच्या विरोधात सोशल माध्यम कंपन्या व त्यांचे मालक मक्तेदार उतरलेले असतील, तर मोदी काय करतील? याचाही म्हणूनच विचार करावा लागतो. मोदींनी तेव्हा वाहिनी काढून वा वर्तमानपत्र सुरू करून माध्यमांना शह दिला नव्हता. सोशल मीडिया हे नवेच हत्यार उपसले होते. त्याचा आवाका मोदीविरोधकांना यायला खुप वेळ गेला. तोपर्यंत मोदींचा कार्यभाग उरकून गेला होता. मग आता मोदी तेच हत्यार खाली ठेवायला निघाले आहेत काय? गेल्या रविवारी त्यांनी अकस्मात तसा धक्का दिलेला आहे. ट्वीटर खात्यावर त्यांनी सोशल माध्यमातून बाजूला होण्याचे विचार आपल्या मनात घोळत असल्याचे जाहिर केले आणि त्याचीच खळबळ्जनक बातमी होऊन गेली. त्यावर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आणि सोशल माध्यमातही लक्षावधी प्रतिक्रीया उमटल्या. काही आर्जव करणार्‍या तर काही डिवचणार्‍या हेटाळणीयुक्त होत्या. मोदींनी याचीही अपेक्षा केलेली असणार. किंबहूना अशा प्रतिक्रीयातून आपला मनसुबा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा हेतू त्यात असावा. पण एका प्रश्नाचे उत्तर कोणालाच सांगता आलेले नाही. सोशल मीडिया सोडून मोदी करणार काय? तिथेच तर त्यांची महत्ता व शिरजोरी चालते. तिथे विरोधक वरचढ झाले म्हणून मोदींनी शरणागती पत्करली काय? प्रश्न व शंका अनेक आहेत. पण नेमके उत्तर कुणापाशी नाही, असाच एकूण मामला झाला आहे. पण राजकीय उद्देश विसरून मोदी काहीही करत नाहीत. मतलब असल्याशिवाय मोदी असे पाऊल नक्कीच उचलणार नाहीत, याची प्रत्येकाला खात्री आहे. म्हणून या घोषणेविषयी कुतुहल आहे. यात काही डाव किंवा खेळी आहे काय?

ज्या माध्यमांनी व पत्रकारांनी मोदींना २०१४ पर्यंत छळले व मोहिमा राबवल्या त्यांना पुढल्या काळात मोदींनी पुर्ण नामोहरम करून टाकले. आपली लोकप्रियता ही माध्यमांचा गल्ला भरणारी असल्याचे लक्षात आल्यावर मोदींनी अतिशय धुर्तपणे त्याच माध्यमांना मुलाखती देताना असे खेळवले, की त्यांचा गल्ला आपल्या भोवती केंद्रीत करणे भाग पाडले. त्यांच्या मुलाखतींना भरपूर प्रेक्षक व पर्यायाने जाहिराती मिळत होत्या. ते लक्षात आल्यावर त्या माध्यम कंपन्यांनी त्यावरच गदा आणणारा अजेंडा राबवणार्‍या संपादक पत्रकारांना नारळ देण्याची वेळ आणली. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त अशी तोपर्यंत नावाजलेली मंडळी आज अस्तंगत होऊन गेली आहेत. एनडीटिव्ही सारख्या वाहिन्या देशोधडीला लागल्या आहेत. इतका व्यवहारी नेता आपल्या हातातील सोशल माध्यमाचे हत्यार सुखासुखी सोडू शकत नाही. त्यामागे योजना असण्याची शक्यता असते. काही तरी डाव शिजत असायला हवा. तो काय असेल? एक म्हणजे सोशल मीडिया ही आज जगाची गरज बनलेली आहे. पण ज्या कंपन्या अशी सेवा देतात पुरवतात, ती ग्राहकाची लाचारी नाही. फ़ेसबुक किंवा ट्वीटरपुर्वी ऑर्कुट नावाची सेवा होती. आजकाल तिचा मागमूस उरलेला नाही. मग फ़ेसबुक वा ट्वीटर यांनी आपण अजरामर असल्याचे समजण्याचे काहीही कारण नाही. त्यांना पर्याय मिळाला आणि तीच तशीच सेवा किंवा अधिक खास सेवा पुरवणारा कोणी उपलब्ध झाला तर या कंपन्यांचे दिवाळे वाजायला वेळ लागणार नाही. कारण त्यांचा हेतू राजकीय अजेंडा नसून गल्ला जमवण्याचा आहे. त्यालाच अजेंडातून हरताळ फ़ासला जात असेल तर गाशा गुंडाळावा लागेल, किंवा आपला आडमुठेपणा सोडावा लागेल. मोदी हे कसे करू शकतात? तसे काही त्यांना करायचे आहे काय? असेल तर त्यासाठीचे पर्याय काय असू शकतात? कुठेतरी अशी शक्यता नसेलच काय?

आज भारतात साठ सत्तर कोटी स्मार्टफ़ोन झाले असून जगातल्या कुठल्याही देशापेक्षा अशा सोशल मीडियाचे अधिक ग्राहक एकट्या भारतात आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही भारतातले अशा सेवांच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. या कंपन्यांचा आडमुठेपणा नाकारून चीनने आपल्या देशात वेगळी माध्यमे उभी केलेली आहेत, रशियानेही पर्याय दिला आहे. त्यामुळे उर्वरीत जगभरातील मोठा ग्राहक भारतात आहे आणि भारताने असा पर्याय उभा केल्यास फ़ेसबुक ट्वीटर अशा कंपन्यांचे ऑर्कुट व्हायला वेळ लागणार नाही. कधीतरी याही कंपन्या स्टार्ट-अप होत्या, आज मोठ्या कॉर्पोरेशन होऊन बसल्या आहेत. त्यांचे तंत्रज्ञान फ़ार मोठे गुंतागुंतीचे नाही. भारतातला कोणीही मोठा उद्योगपती तितकी गुंतवणूक करून असा पर्याय उभा करू शकतो. कारण ती गुंतवणूक वाया जाऊ शकत नाही. त्याने फ़क्त उपलब्ध असलेल्या ग्राहकाला देशातली सेवा पुरवायची आहे. त्याला देशव्यापी व्हायला वेळ लागणार नाही आणि लहानसहान देशातही पसरलेल्या भारतीयांकडून त्याला प्रतिसाद मिळू शकतो. तसेच काही शिजलेले आहे काय? आपल्या त्या ट्वीटच्या अखेरीस मोदी म्हणतात, ‘विचार करतोय. लौकरच सांगेन’ ह्या शेवटच्या चार शब्दांना महत्व आहे. कारण त्यांनी नुसते सोशल मीडियातून बाजूला होणार म्हटलेले नाही. ती सेवा पुरवणार्‍या कंपन्यांची नावे घेतलेली आहेत. म्हणजे अमेरिकन कंपन्यांच्या सोशल माध्यम सेवेतून बाजूला होणार, इतकाच त्याचा मर्यादित अर्थ होऊ शकतो. त्याला भारतीय पर्याय आल्यास आपण तिथे असू; असे त्यामधून सुचित केलेले आहे. ज्याचे अनुयायी चारपाच कोटी असतात, ते त्याच्या समवेत नव्या सेवा कंपनीला मिळणार असतील, तर ती कंपनी पहिल्या दिवसापासूनच यशस्वी होऊन जाते. अशी काही सेवा सज्ज होते आहे किंवा झाली आहे काय? कारण मोदी इतक्या सहजासहजी माघार घेणारा माणूस नाही, की लढाई सोडणारा माणूस नाही.

Saturday, March 7, 2020

आपुलकीचे नाक हवे

Image may contain: 3 people, including Veena Shivram Joshi and Kirti Joshi, people smiling, people standing and indoor

३ मार्चला तीन तरूण मुलांच्या व्यावसायिक धाडसाची कथा मी लिहीली होती. त्यात विणा जोशीचा समावेश होता. खरेतर तिनेच नव्याने एक फ़ुड जॉइन्ट सुरू केला, हे निमीत्त धरून लिहीलेला तो लेख आहे. त्यात मी या तिघांना उचापतखोर म्हटले आहे. हा शब्द तसा नसती उठाठेव करणार्‍यांसाठी वापरला जातो किंवा नकारात्मक आहे. सहाजिकच तो कोणालाही आवडणारा नाही. पण व्यवहारात तो खरेच नकारात्मक असतो का? मला तरी तसे वाटत नाही. शब्द कुठलाही असो, त्याला संदर्भ सोडून बघितले; मग त्याचे अर्थ कसेही बदलत असतात. सहाजिकच ‘उचापतखोर’ असे विषेषण आपल्यामागे लागल्याने कोणीही विचलीत होणे योग्यच आहे. पण विणाची त्यावरची प्रतिक्रीया विचार करायला भाग पाडणारी ठरली. त्या लेखावर व्यक्त होताना विणा म्हणते, ‘वाटलं नव्हतं कोणी आपल्याला उचापतखोर म्हंटल्याचा कधी इतका आनंद होईल. भाऊ आमच्यावर असाच जीव असुद्यात’. ही नुसती प्रतिक्रीया नाही. त्यातला आनंद लपून रहात नाही. मला त्याचा आनंद इतक्यासाठी झाला, की एका नकारात्मक शब्दाचा वापरही सकारात्मक होऊ शकतो. याची ती अनुभूती आहे. मला ही उद्योजक धडपडी मुले उचापतखोर का वाटतात, त्याचे स्पष्टीकरण देणेही तितकेच अगत्याचे आहे. उचापत ही चुकीची असतेच असे नाही. कधीकधी आपल्याला ठाऊक नसलेल्या अनाकलनीय कृतीला आपण उचापत म्हणतो. पण व्यवहारी बाबतीत ते चाकोरी नाकारून केलेले धाडस असते. माणसे व प्रामुख्याने मध्यवर्गिय समाजात चाकोरीला धरून चालण्याला प्राधान्य असते आणि कोणी त्या चाकोरीला सोडून वेगळी वाट शोधू लागला, तर घरापासूनच त्याच्यावर हल्ले वा प्रतिरोध सुरू होत असतो. अशावेळी परिस्थितीशी झुंज देण्यासाठी जमवलेली बहुतांश उर्जा, घरातच खर्ची पडत असते. आपल्यांनाच समजावताना नाकी दम येत असतो. चाकोरी सोडण्यात पाप वा गुन्हा नाही, हे घरातच पटवणे ही एक लढाई असते. कारण आपल्यांनाच आपण उचापतखोर वाटत असतो.

ही मुले नव्या पिढीतली म्हणण्यापेक्षाही मधल्या पिढीतली आहेत. जिथे त्यांच्या पालकांनी थोडीफ़ार सुखी जीवन वा स्थीर जीवनाची चव चाखलेली आहे. शाळकरी वा कॉलेजच्या जीवनात इतकी मजल मारायची, की समाजामध्ये आपल्याला काही चांगली नोकरी व उत्पन्नाचे साधन मिळावे. ते कायमस्वरूपी साधन म्हणजे हक्काचा नियमित मिळणारा पगार. तो आला मग आपोआप जीवन सुस्थीर झाले. कोणीतरी आपल्याला रोजगार वा नोकरी द्यावी व आपल्या बुद्धी गुणवत्तेचा लाभदायक वापर करावा. त्याने त्याचे लाभ उठवावेत आणि आपल्या भाडेपट्ट्याने दिलेल्या बुद्धीची मासिक वार्षिक किंमत दिली तरी समाधानी रहावे. ह्याला सुस्थीर सुखवस्तु जीवन मानले गेलेले आहे. सहाजिकच पगाराची हमी मिळणे शक्य असताना आणि आपल्या बुद्धी कर्तृत्वाला कोणीतरी हक्काचा भाडेकरी मिळत असताना; आपल्याच हिंमतीवर काही पराक्रम करीत स्वयंभू होण्याच्या कल्पना माझ्या पिढीतल्या पालक वर्गाला संतापजनक वाटल्या तर नवल नाही. कंपनी सरकार तनखा देऊन आपले राज्य चालवणार आणि आपण मस्तपैकी ऐषाराम करायला मोकळे असतो, ही त्या सुखी जीवनाची कल्पना आहे. अशा वेळी १८५७ चे बंड किंवा स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे उचापतच नाही काय? आजचा मध्यमवर्ग तसा झालेला आहे आणि त्यातून आपोआप आरक्षण वा सुशिक्षित बेरोजगारीच्या तक्रारी जन्माला आलेल्या आहेत. त्या तक्रारी करणे वा आरक्षण मागणे, ही शैली झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरू, अंबर वा विणासारख्यांनी वेगळी वाट शोधण्य़ाचे केलेले धाडस, त्यांच्या घरातच किती कौतुकाचे ठरले आहे? मला ठाऊक नाही. पण त्यांच्या घरात गोतावळ्यात अनेकांनी नाके मुरडली असणार. कदाचित कडाडून विरोधही केलेला असेल. पाठबळ सहसा मिळत नाही. म्हणजेच दुहेरी झुंज देण्यातून या मुलांना उभे रहावे लागणार ना? त्यांचे पालक माझ्या वयाचे व पिढीतले आहेत. त्यांची मनस्थिती ह्या मुलांनी झुगारली वा झुगारण्याची हिंमत केली, म्हणून मला ते उचापतखोर वाटले.

कदाचित मी मागल्या पिढीतला आणि सुस्थीर जीवनाच्या त्याच तनखा विचारसरणीचा असेन. म्हणून मलाही त्यांचे प्रयोग तितकेसे आरंभी पटलेले नाहीत. गुरू वा अंबर यांच्यासारख्यांना दिलासा वा हिंमत देण्याचे कितीही शब्द मी सातत्याने वापरलेले असतील, तरी आर्थिक समतोलासाठी कितीदा बोचरे प्रश्न विचारलेत; तेच सांगू शकतील. ती माझी सावध विचारणा प्रोत्साहनापेक्षाही पायात बेडी घातल्यासारखी होती, हे सत्य लपवण्यात अर्थ नाही. ही मुले काही धाडस करायला निघतात, तेव्हा पालक त्यांना जुन्या जमान्यातले वाटतात. सहाजिकच पालकांना झुगारून जाण्यातली मजा काही और असते आणि ती वयाची अपरिहार्यताही असते. अशावेळी दिसायला पालक, असायला मित्र, अशा स्थितीत मी त्यांना प्रोत्साहन देण्याकडे झुकलो. कारण मलाही असे धाडस करण्याची इच्छा कधीकाळी झालेली होती. पण तिथपर्यंत मजल मारणे शक्य झाले नव्हते. विशीतिशीत जगाला किंवा जगाच्या चाकोरीला लाथ मारून करीन ती पुर्व म्हणायची उबळ उपजत प्रत्येकात असते. पण परिस्थिती व गोतावळ्यातल्या दडपणाशी झुंज देणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. पण ज्यांचा आपल्या भूमिका व ध्येयावर विश्वास असतो, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. खरे तर रोखण्यापेक्षाही त्यांना वेळोवेळी ध्येयापासून दुर जाऊ देण्यापासून सावध करणे पुरेसे असते. कारण पाठीशी असलेले वा हितचिंतकही मनातून ह्या धाडसाला उचापतच समजत असतात. आज त्यांची पाठ थोपटणे सोपे आहे. पण चुकले असते, तर त्यांना काय काय ऐकावे लागले असते? मुद्दा इतकाच, की पांघरूण बघून हातपाय पसरण्याचा संयम अशा मुलांकडे आहे आणि अवास्तव स्वप्ने बघण्याइतकी ही मुले बहकलेली नाहीत. या जगात आपले काही स्थान व वेगळेपण उभारण्याची त्यांची इच्छाशक्ती पक्की वाटते. पण आमच्या पिढीसाठी ती उचापत होती व आहे. खरे तर तो हेवाही असू शकेल. आपल्या वयात आपणही असे काही धाडस करायचे राहून गेलो, त्याचे वैषम्य असेल.

माझ्या तरूणपणी आम्ही सुशिक्षीत बेकारांच्या विषयावर चर्चा करायचो. आंदोलने व्हायची. पण सरकार कोणाला रोजगार निर्माण करून देऊ शकले? त्यापेक्षा अधिक रोजगार चाकोरी सोडणार्‍यांनी निर्माण केले. चाकोरीत जगणे ज्यांना सुरक्षित वाटते, त्यांच्यासाठी नवनव्या चाकोर्‍या निर्माण करणारे म्हणून समाजात निपजावे लागतात. गुरू पाच वर्षापुर्वी नोकरी करून कशीबशी गुजराण करीत होता. आज त्याने दहाबारा मुलांसाठी रोजगार उभा केला आहे. अंबर किंवा विणा त्याच दिशेने चालले आहेत. त्यांनाही रोजगार घटल्याच्या मोर्चात सहभागी होऊन आपले नाकर्तेपण लपवता आलेच असते की. इन्फ़ोसिसच्या नारायण मुर्तीं किंवा अन्य तत्सम तरूणांनी त्यांच्या बंडखोर वयात केलेल्या उचापतींनीच आज लाखो भारतीय सुशिक्षीतांना लाभदायक रोजगार मिळून गेला आहे. असे किती उचापतखोर पडद्यामागे राहून लाखो रोजगार निर्माण करतात. आपल्या सोबत इतरांच्या जीवनात बदल घडवतात. सरकारला जाब विचारणे वा अन्यायग्रस्ताचा बुरखा पांघरणे सोपे आहे. उचापत हे धाडस असते. ज्यामध्ये जग नसेल तरी आपल्या भोवतालाचा चेहरामोहरा बदलण्याची इर्षा वा इच्छा मोलाची असते. इतरांनी काय करावे, ते शहाणपण शिकवायला माझ्यासारखे उपटसुंभ शेकड्यांनी असतात. पण आपणच पुढाकार घेऊन आपल्यासह आणखी एकदोघांच्या जीवनात सुखसमाधानाचा उदभव करू शकणारे अपवादात्मक असतात. पण तेच समाज वा देशाला बदलू शकत असतात. त्यांची कोणी नोंद घेत नाही वा डंका पिटत नाही. पण त्यांना तरी कुठे पर्वा असते. ते आपण धाडस केले यावरच खुश असतात. परिसराला दरवळून सोडणारी फ़ुले कधी आपल्या सुगंधाची किंमत मागतात काय? त्यांना फ़ुलण्यातला आनंद हवा असतो आणि सुगंधाचा दरवळ आपोआप होऊन जात असतो. ती देखील उचापत असते. फ़क्त पैसे मिळवण्याचे अनेक उद्योग असतात. स्वत:ला आनंदित करण्यासाठी केलेली उचापत समाजाला उर्जितावस्थेकडे घेऊन जाते. सुगंधाचे कर्तृत्व समजायला नाक लागते. उचापतीची महत्ता समजण्यासाठीही आपुलकीचे वडीलधारे नाक असायला हवे.

माफ़ कर आई



तुला जाऊन रविवारी रात्री सात वर्षे पुर्ण होतील. तो जागतिक महिलादिन होता. त्याही वर्षी मी आपल्या कामात गर्क असताना कधीतरी तू या जगाचा निरोप घेतलास. जग महिलादिन साजरा करत होते आणि उपचार म्हणून इथे सोशल माध्यमात बहुतांश लोक त्या दिवसाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यात गढलेले होते. मला मात्र त्यात रस नव्हता. पण मी कुणालाच कधी शुभेच्छा वगैरे देत नाही. कारण तू मला शुभेच्छा जगायला शिकवलेस. आज इतक्या वर्षांनी तसे जगताना वागताना एक शंका मनात आलीय. आपण शुभेच्छा जगलो म्हणून जग खरेच बदलते का? कधीतरी हे मानवी जग माणूसकीच्या दिखावू मुखवट्यातून बाहेर पडेल, अशी शक्यता आहे काय? अन्य प्राणिमात्रापेक्षा आपण वेगळे असल्याचे सिद्ध करण्याचे हे मानवी नाटक कधी संपणार आहे काय? आजही प्रत्येकजण एकमेकांना तशाच महिलादिनाच्या शुभेच्छा देतोय, पण कोणाला तरी निर्भयाने भोगलेल्या मरणयातना जाणवल्या तरी आहेत काय? तिची आई जीवंतपणे ज्या नरकयातना अनुभवते आहे, त्याची साधी मानवी संवेदना तरी कोणाला जाणवली आहे काय? तुझ्या जाण्यापुर्वी साधारण तीन महिन्यांची गोष्ट असेल. म्हणून तुझ्या हयातीतली घटना आहे. अजून तिला न्याय मिळालेला नाही आणि तिचे मारेकरी बलात्कारी उजळमाथ्याने त्याच कायद्याला व न्यायालाही वाकुल्या दाखवित आहेत. पण कोणाला फ़िकीर आहे? आम्ही सगळे एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यात रमलेलो आहोत. अशा शुभेच्छा गुन्हे थांबवित नाहीत वा कोणा महिलेला प्रतिष्ठीतही करीत नाहीत. मग आमच्या अपयशावर किंवा नंपुसकत्वावर चादर घालण्यासाठी असले सोहळे अगत्याने साजरे करावे लागतात. खोटे अश्रू ढाळण्यात आता मानव समाज कमालीचा वाकबगार झालेला आहे आणि जितका अधिक कुशल होत चालला आहे, तितके सोहळे व महिलांची विटंबना हातात हात घालून वाढतच चालली आहे. म्हणून तुझ्या शुभेच्छा जगण्याचा आग्रह शंकास्पद वाटू लागलाय.

ती निर्भया जाऊनही आता सात वर्षाचा कालखंड उलटून गेलाय. अर्थात तीच अशा विटंबनेची पहिली बळी नव्हती. तिच्या आधी शेकड्यांनी हजारांनी मुली महिला अमानुष मानवी वासनेच्या शिकार झालेल्या आहेत. ज्यांची नावेही कोणी घेत नाही. त्यांची नोंद फ़क्त आकड्यात होत असते. महिलांवरचे अन्याय अत्याचार ठरणारे गुन्हे अमूक वर्षी इतके होते आणि आता त्यात घट वा वाढ झाल्याची उत्तरे देऊन आपली पाठ थोपटून घेतली जाते. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे आता महिला कुठल्या जातीची वा धर्माची आहे, त्यानुसार शोकसोहळे साजरे होतात. नोंदी होतात, आवाज उठवला जात असतो. कालपरवा कोणीतरी टिव्ही मालिकांमध्ये एका जातीच्याच महिलांचा भरणा कशाला, असला प्रश्न उपस्थित केला. ह्याला आम्ही कलाकारी म्हणतो. जिथे अविष्कार, अभिनय, सृजनशीलताही जातीधर्मामध्ये विभागली गेली आहे. कोणी एक महिला एस्टी डेपोमध्ये हजारो लोकांच्या साक्षीने पेट्रोल ओतून पेटवली जाते. पण आम्ही मात्र आज शुभेच्छांचा रतीब घालणार आहोत. त्या महिलेने कितीही प्रगती करो, विक्रम पराक्रम करो, आमच्या लेखी ती फ़क्त मादी आहे. नराच्या पाशवी लालसेची सुविधा, यापेक्षा तिला अजून पुढला पल्ला गाठता आलेला नाही. कलाक्षेत्रातली असो किंवा पोलिस सैनिकी गणवेशातील असो, तिला उपभोग्य वस्तु म्हणून बघणे आमच्या रक्तामध्ये घट्ट बसलेले आहे. पण तिला मानवी समाजात मादी इतकीही प्रतिष्ठा वा सन्मान आम्ही देऊ शकलेलो नाही. उलट पशूतल्या मादीला मिळणारे स्वातंत्र्य वा अधिकारही सभ्य मानवी समाजाने नाकारले आहेत. ते पाप लपवायला आम्ही ‘पाशवी’ बलात्कार अशी लबाडी करतो. बलात्कार कधी पाशवी झाला? ही संकल्पनाच पशूंमध्ये नाही. ती फ़क्त मानवी कल्पना व व्यवस्था झालेली आहे. निर्भया त्याची बळी होती आणि अशी प्रत्येक पिडीता त्याचीच शिकार झालेली आहे. मग ते सत्य लपवायला आम्ही आमच्या पापकर्माची तुलना पाशवी ठरवून आपले हात झटकून नामानिराळे होतो. अन्यथा निर्भयाचे गुन्हेगार इतके उजळमाथ्याने कशाला फ़ाशीच्या दोराशी खेळत बसले असते?

आई तुला माहित आहे? आम्हाला कसलीही लाज वाटते. पण आपण मानवी समाजातील नर असूनही इथे आपल्या वंशातल्या मादीला साधा पाशवी सन्मान वा हक्क अजून मिळालेला नाही, याची कोणाला शरम वाटत नाही. बेटी बचाव वगैरे योजनांची राजकीय टिंगल करण्यात आम्ही धन्यता मानतो. पशूतली मादी सुद्धा जितकी प्रतिष्ठीत व स्वतंत्र आहे, तितकेही स्वातंत्र्य अधिकार मानव म्हणून आमच्यातल्या माद्यांना आम्ही नाकारलेत. पण त्याची कुठे फ़िकीर शरम दिसते? प्रत्येक सजीवाला निसर्गानेच बहाल केलेले स्वातंत्र्य व अधिकारही मानवी समाजात मादी म्हणून जन्म घेणार्‍यांना नाकारले गेले आहे. सभ्य मानल्या गेलेल्या मानव समाजातला नर सतत शिकार शोधावी, तसा मादीवर पाळत ठेवून वागतो, जगतो. त्याची लाज आजच्या दिवशीही कोणाला वाटलेली नाही. म्हणून आई, शुभेच्छा जगण्याचा तुझा सिद्धांत शंकास्पद वाटू लागलाय. कारण सभ्यता ही जशी मानवी संकल्पना आहे, तसाच महिलेला उपभोग्य वस्तू समजणेही मानवी संकल्पना आहे. आपल्या पौरूषाच्या देखाव्यासाठी हा खेळ चालतो. ते पशूही नागडेउघडे जगतात. पण त्यांच्यात कधी मादीच्या अधिकाराला बाधा येत नाही. तिच्या देहाला उपभोग्य समजण्याचा उन्माद जागा होत नाही. कारण ती मानवी बुद्धीची उपज आहे. त्या बुद्धीतूनच महिलांच्या मानसिक स्थितीला एक दिशा व स्वभाव बहाल करण्यात आला. तिला सहनशील, सोशिक, करुणामय बनवण्यात आले. तिच्या रौद्ररुपाला जितके म्हणून निष्प्रभ करता येईल, असे तिच्यात बदल करण्यात आले. तिला अबला ठरवून मनानेच खच्ची करण्यात आले. आजची पुढारलेली महिला ही समजते, त्यापेक्षा ती अधिक गुलाम असहाय होऊन गेलेली आहे. त्याला आरक्षण वगैरेतून अधिक खतपाणी घातले जात राहिले.

आई, गेल्या काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांचा विषय गाजतो आहे. त्यात अमूक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्याचे आकडे रंगवले जातात. पण या आकड्यात किती महिला आहेत? त्याही शेतकरी नाहीत का? ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची मुलेबाळे हिंमतीने वाढवणारा कुटुंबप्रमुख नंतरच्या काळात वैधव्य नशिबी आलेल्या महिलाच होत्या ना? त्या महिलांना अबला संबोधणे हाच अवमान किंवा विटंबना नाही काय? अशा किती प्रश्नांनी आज डोके चालेनासे झाले आहे. कारण बालपणापासून विपरीत परिस्थितीत आम्हा भावंडांचे पालनपोषण तू केलेस आणि कधीही हिंमत सोडून हताश झालेली नव्हतीस. म्हणून महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन तयार झाला. तो दृष्टीकोन समाजात रुजला, तर कुठल्याही कठोर कायद्याची गरज नाही. कुठल्या संरक्षणाची महिलेला गरज उरणार नाही. महिलेकडे फ़क्त एक माणूस म्हणून बघितले वा वागवले; तरी खुप मोठा फ़रक पडू शकतो. आपल्या मुलांना सहकार्‍यांना त्यासाठी आम्ही प्रवृत्त करू शकलो, तरी प्रत्येक दिवस महिलादिनच असेल. प्रत्येक  मानवाच्या जीवनातला प्रत्येक दिवसच महिलेच्या कर्तबगारीचा असतो आणि पुरूष त्याचा फ़क्त लाभार्थी असतो. हे डोळसपण बघता आले, तरी आपण पशू इतके सभ्य होऊ शकू. कारण पशूंमध्ये मादीला कोणी गुलामासारखे वागवित नाही. तिच्या इच्छेविरुद्ध कुठला नर बळजबरी करू शकत नाही. तिचा जननी म्हणून सन्मान राखला जातो. माणसाने पशूपेक्षा वेगळे होण्यासाठी जी बुद्धी पणाला लावली, त्यातून आलेली विकृती म्हणून अशा पुरूषार्थाकडे आम्ही नैसर्गिक दृष्टीने बघू शकलो, तरी महिलादिनाचे सोहळे करावे लागणार नाहीत. महिलामुक्ती वगैरे नाटके करण्याची वेळ येणार नाही. महिला हा आकर्षक शिल्पासारखा असला तरी सजीव देह असून, त्यातही एक संवेदनशील मन असल्याचे आम्हाला समजू शकेल. मग या शुभेच्छांची गरज उरणार नाही.

आई, तू आयुष्यभर ज्या शुभेच्छा जगायला शिकवत राहिलीस, त्या शुभेच्छा आम्ही जगण्यातून अंमलात आणायला लागलेले असू. कधीतरी तुझी इच्छा पुर्ण होईल आणि मानव समाज शुभेच्छामुक्त होऊन शुभेच्छायुक्त होईल्. इतकीच अपेक्षा तुझ्या सातव्या स्मृतीदिनी व्यक्त करतो. आई, माझी इतकी निराशा व वैफ़क्यग्रस्तता बघायला आज तू हयात नाहीस, हेच बरे ना?

- भाऊ तोरसेकर