Saturday, November 30, 2013

‘टहलका’मागचे राजकारण



   ज्या मुलीने ही तक्रार केलेली आहे, तिने आपले शब्द वा भूमिका एकदाही बदललेली नाही. पण त्यात फ़सलेल्या तेजपालपासून त्याच्या समर्थकांची भूमिका मात्र सातत्याने बदलत आहेत. योगायोगाने यामुळे संशयाच्या घेर्‍यात सापडलेले तमाम लोक समाजात उजळमाथ्याने फ़िरणारे मान्यवर आहेत. मग त्यात खुद्द तेजपाल असो किंवा त्याच्या ‘टहलका’ नियतकालिकाची व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी असो, त्याचा चेहरा क्षणोक्षणी फ़ाटत चालला आहे. तो कधीतरी फ़ाटणार असतोच. कारण समाजात उजळमाथ्याने वावरणार्‍यांपैकी जे मोठ्या आवेशात आपल्या सभ्यता व सुसंस्कृतपणाचा ढोल वाजवत असतात; त्यांचा आपल्याला दिसणारा चेहरा अजिबात खरा नसतो. तो त्यांनी प्रतिष्ठेचा चढवलेला मुखवटा असतो. त्यांचे वास्तविक जगणे व लोकांसमोर दाखवलेला चेहरा; यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. म्हणूनच त्यांना सतत आपला मुखवटा जपावा लागत असतो. तो जपायचा म्हणजे आपला मुखवटा हाच खरा चेहरा आहे, त्याचा सतत उदघोष करावा लागत असतो. तेजपाल हा असेच मुखवटे फ़ाडण्याचा आव आणताना, स्वत:च एक मुखवटा बनून गेला होता आणि त्यासाठीच त्याने आपले नियकतकालीक वापरलेले होते. त्यातून मुखवटे फ़ाडण्याचा धाक घालून अनेकांची लूटमार केलेली होती. एकीकडे ‘टहलका’ नावाचे वृत्तपत्र तोट्यात चालत होते आणि दुसरीकडे त्याची मालकी सांगणार्‍यांची वैयक्तीक संपत्ती मालमत्ता मात्र फ़ुगत चालली होती. त्यामागचे रहस्य उलगडण्याचे भय अनेकांना सतावते आहे. कारण तेजपाल हा अशा अनेक प्रतिष्ठीतांसाठीही मुखवटा बनलेला होता. त्याच्या उद्योगात पैसे गुंतवणारे आता आपापले चेहरे जपायच्या मागे लागले आहेत. म्हणून इतके मोठे वकील त्याला वाचवायला उभे करण्यात आलेले आहेत.

   आज तेजपाल याला गोव्यात भाजपाचे सरकार आहे म्हणून आपल्यावर अन्याय होईल अशी भिती वाटते, तर त्याला तिथेच तीन आठवड्यापुर्वी थिन्कफ़ेस्ट नावाचा समारंभ योजताना भिती कशाला वाटलेली नव्हती? आपण कुठेही जाऊन कसलाही धुडगुस घालू शकतो आणि कायदा आपल्याला हातही लावू शकणार नाही; अशी मस्ती चढल्याचे हे लक्षण आहे. पण गोवा पोलिसांनी ती मस्ती जुमानली नाही, तेव्हा तिथे भाजपाचे सरकार असल्याची शुद्ध तेजपाल याला आलेली आहे. तिथे अन्याय व्हायचा विषयच कुठे येतो? गोवा किंवा अन्य राज्यात वेगवेगळे फ़ौजदारी कायदे आहेत काय? भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यातले पोलिस न्यायपुर्ण तपास करतील, अशी तेजपालला खात्री कशाला वाटते? की कॉग्रेसची सत्ता असेल तिथे आपल्या पापावर पांघरूण घातले जाईल, याची खात्री त्याला आहे? सत्ताधार्‍यांच्या इच्छेनुसार पोलिस कायदे लावतात, अशी ही तेजपालची भिती कॉग्रेसच्या राज्यात काय होते, त्याची ग्वाही देणारी नाही काय? हाच नियम असेल तर सीबीआयचा वापर कसा होतो, त्याची साक्ष मिळते ना? तेजपाल प्रकरण चव्हाट्यावर येण्यापुर्वी आठवडाभर तरी अमित शहा प्रकरण कॉग्रेस गाजवत होती. त्यातले मुद्रीत संभाषण तेजपालच्याच सहकार्‍याने चव्हाट्यावर आणलेले असावे, हा योगायोग होता काय? ते संभाषण सीबीआयच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या आरोपी पोलिस अधिकार्‍याने केलेले असावे, हा योगायोग होता काय? बाकी आरोपींना जामीन मिळू न देणारी सीबीआय याच एका अधिकार्‍याला जामीन मिळू देते आणि त्यानेच मुद्रीत केलेल्या संभाषणावर कॉगेसवाले गदारोळ करतात; तेही नेमके तेजपालचा सहकारीच चव्हाट्यावर आणतो? किती योगायोग असावेत ना?

   सिंघल नावाचा अधिकारी ताब्यात घेतल्यावर सीबीआय त्याची इशरत चकमकीसाठी चौकशी करीत होती. त्याच्याकडून माहिती घेताना, त्याने अमित शहा व स्वत:मध्ये झालेल्या संभाषणाचे मुद्रण सीबीआयला दिले. त्यामुळे त्याला एकट्यालाच जामीन मिळू शकला. वास्तविक ते संभाषण व इशरत प्रकरणाचा काडीमात्र संबंध नाही. पण तेच संभाषण तेजपालचा जुना सहकारी अनिरुद्ध बहल याला मिळाले व त्याने ते कोब्रापोस्ट या वेबसाईटवर टाकलेले आहे. त्याचाच आधार घेऊन मग कॉग्रेसने मोदी व शहा विरोधात आघाडी उघडली. थोडक्यात मोदींना गोत्यात घालण्यासाठी उपयुक्त माहिती देण्याच्या बदल्यात सिंघल याला जामीनाची सवलत सीबीआयने दिली. त्या सीबीआयवर कॉग्रेअची हुकूमत चालते. याचा अर्थ इतकाच, की आपल्या राजकीय शत्रूला गोत्यात घालायला पोलिस यंत्रणा धुर्तपणे वापरता येते. मग जे डावपेच कॉग्रेस सीबीआयमार्फ़त खेळते; तेच भाजपाही आपल्या सत्तेखाली येणार्‍या पोलिसांच्या मार्फ़त वापरू शकते. गोव्यात भाजपाची सत्ता आहे आणि त्यांच्या तावडीत तेजपाल अडकला, तर बलात्कार प्रकरणाचा तपास करताना त्याच्याकडू्न दडपणाखाली दिल्लीच्या बड्या कॉग्रेसवाल्यांच्या विरोधात पुरावे वा माहिती मिळवता येऊ शकते. भाजपा तसे करील, हे तेजपालचे भय नसून त्याच्यापाशी ज्या कॉग्रेस नेत्यांच्या विरोधात पुरावे असू शकतात, त्यांची ती भिती आहे. सिंघल या गुजरातच्या पोलिस अधिकार्‍याचा जसा ताब्यात घेतल्यावर वापर झाला, तसाच तेजपालचा वापर भाजपाचे राजकीय नेते करतील; ही भिती हेच या प्रकरणातले राजकारण आहे. तेजपालची एकूण शोध पत्रकारिता पाहिल्यास त्याच्यापाशी दिल्लीच्या अनेक नेत्यांच्या विरोधातील पुराव्यांचे गोदामच असू शकते ना?

2 comments:

  1. भाऊ आपण एकदम बरोबर कॉंग्रेस ची भीती या लेखातून दाखवून दिली आहे. नक्कीच तेजपाल जवळ कॉंग्रेस च्या नेत्याविरोधातील पुरावे असावेत.

    ReplyDelete
  2. Ab aaya uth (Camel) pahad ke niche

    ReplyDelete