Sunday, January 5, 2014

हिटलर काय सांगतो?

 
   ‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो. एकदा का अशाप्रकारचे लाभ मिळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मूळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षीस, या भावनेने कार्यकर्ते जोवरच चळवळीसाठी खपतात, तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा ह्या हेतूने प्रेरीत झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मूळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे, असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ ( एडॉल्फ़ हिटलर, ‘माईन काम्फ़’ पुस्तकातून)

   नेमक्या चार आठवड्यापुर्वी चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यात अकस्मात दिल्लीच्या विधानसभेत नवखा असलेल्या आम आदमी पक्षाने अनपेक्षित मोठेच यश संपादन केले. त्याचे कौतुक सोहळे अजून संपलेले नाहीत. अजून म्हणजे त्या पक्षाला संपुर्ण बहूमत मिळालेले नसले आणि पराभूत कॉग्रेसच्या अनैच्छीक पाठींब्याने त्या पक्षाने दिल्लीत राज्य सरकार स्थापन झाल्यावरही; त्या पक्षाचे देशाच्या कानाकोपर्‍यात कौतुक चालू आहे. अर्थात त्याचे कौतुक नुसती निवडणूक जिंकली म्हणून चाललेले नाही, तर त्या पक्षाने माध्यामांना आपल्या नव्या राजकीय चाली व डावपेचांनी चकीत केले आहे. त्यामुळेच मग अन्य तीन राज्यात मोठे यश संपादन करून भाजपाचे यश झाकोळले गेले आहे. नित्यनेमाने आम आदमी पक्ष व त्याचे नवनिर्वाचित आमदार व मंत्री, मुख्यमंत्र्यांचे कौतुक चालूच आहे. पण हळूहळू दिल्लीबाहेर त्या पक्षाचे नेत्रदिपक यश माध्यमांना भारावून सोडते आहे. कारण एक शहरवजा आलेल्या दिल्ली या विधानसभेच्या यशाने आता देशभरचे अनेक महान मान्यवर लोक भारावून आम आदमी पक्षात दाखल होऊ लागले आहेत. अकस्मात माध्यमांप्रमाणेच देशातल्या या एकाहून एक महान मान्यवरांना केजरीवाल, त्यांचा पक्ष व त्यांनी स्विकारलेली धोरणे, वर्तन यात देशाचे गढूळलेले राजकारण क्रांतीकारक बदल घडवून आणणार असल्याचे साक्षात्कार होऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी आजवर पाळलेली राजकारणाविषयीची अलिप्तता सोडून राजकीय आखाड्यात उड्या घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तर माध्यमे व राजकीय अभ्यासकांना भलताच चेव आलेला आहे. आता लौकरच होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रस्थापित राजकीय पक्षांना केजरीवाल व त्यांच्या पक्षाने मोठेच राजकीय आव्हान उभे केल्याचा गवगवा सुरू झाला आहे. मात्र त्याची योग्य व नेमकी कारणमिमांसा करायची इच्छा कोणालाच झालेली दिसत नाही. पण म्हणून परिस्थिती बदलणार आही की परिणाम व्हायचे, तेही बदलण्याची शक्यता नाही. इतिहास आपल्याला खुप काही शिकवत असतो. अर्थात शिकायचे असेल, त्याला इतिहास शिकवतो. जो शिकत नाही त्याला इतिहासजमा व्हायला लागते. इतिहास घडवायला निघालेल्यांना हे कोणी सांगायचे?

   इतिहासाने ज्याला खुप बदनाम करून ठेवले आहे, त्या जर्मनीचा हुकूमशहा हिटलरची म्हणूनच आठवण येते. त्याने जर्मनीत नाझी सत्ता प्रस्थापित करण्यापुर्वी तुरूंगात असताना राजकारणावर आणि संघटनात्मक चळवळीविषयी व्यक्त केलेले मत, म्हणूनच इथे मोलाचे ठरावे. एखादी चमत्कारीक वाटणारी चळवळ कशा दिशेने वाटचाल करीत जाते वा भरकटते; त्याबद्दल त्याचे उपरोक्त विचार नेमके नाहीत काय? ८ डिसेंबर २०१३पर्यंत किती लोक व मा्न्यवर याच आम आदमी पक्षाकडून कुठल्या अपेक्षा करीत होते? आज तिकडे धावत सुटलेल्या एकाहून एक महान व्यक्तींना अपार बुद्धी आहे, असेही अगत्याने पत्रकार म्हणतात, मग त्यांना केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षातली ही अमोघ शक्ती निकाल लागण्यापर्यंत का दिसलेली नव्हती? दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर चळवळीचे बोलतो. कार्यकर्त्याची व्याख्याही करतो. निरपेक्ष वृत्तीने झोकून देणारे कार्यकर्ते आणि लाभ उठवण्यासाठी चळवळीकडे येणारा लोकांचा ओघ; अशी हिटलरचे दोन प्रकारच्या कार्यकर्त्यांची व्याख्याच दिलेली आहे. फ़ायदे उठवायला येणारे आणि लाभ मिळू लागताच त्याला चटावणारे कार्यकर्ते, त्यांच्या बदलणार्‍या भूमिका याविषयी हिटलरने व्यक्त केलेल्या मतांचे पुरावे आपल्याला दिल्लीच्या घडामोडीत कुठे सापडतात काय? निवडून आल्यापासून साधेपणासाठीच ढोल पिटणारे ‘आप’चे मंत्री व मुख्यमंत्री विश्वासमत संमत झाल्यानंतर लाभाला लाथ मारायचे विसरले आणि त्यांनीच झिडकारलेल्या सवलती व लाभाच्या मागे धावू लागले ना? कारणे कोणतीही असोत. खुलासे व स्पष्टीकरण फ़सवे असते. विधानसभेच्या पहिल्या दिवशी रिक्षा वा मेट्रो ट्रेनमधून येणारे आपचे आमदार व मंत्री विश्वासमत मिळवल्यावर सरकारी गाड्यातून हिंडू फ़िरू लागलेच ना? त्यांच्या पक्ष संघटनेत मान्यवर लोकांचा ओघ सुरू झाला ना? योगायोग असा, की हिटलर चळवळ व संघटना याविषयी बोलतो आणि आम आदमी पक्षच मुळात चळवळीतून उदयास आलेला आहे. सत्ता हाती घेतल्यावरही त्याची भाषा चळवळीची व आंदोलकाचीच चालू आहे. त्यामुळेच मग हिटलरची आठवण येते. आम आदमी पक्षाचे पुढे काय होईल ते लौकरच कळेल. कारण लोकसभेच्या निवडणूका दूर नाहीत आणि त्या पक्षाने त्यात उडी घ्यायचे आधीच जाहिर केलेले आहे.

1 comment:

  1. श्री नारायणराणे का सोडून गेले असा प्रश्न काही जुन्याजाणत्या आणि माझ्यासारख्या सेनेत नसलेल्या पण बाळासाहेबांच्याबद्दल आस्था असलेल्याना विचारला, तेव्हा वदलो की सगळ्यां ना मराठी अस्मितेपेक्षा पैशाची भुरळ पडली, त्यानी त्यावर विचारले की 'मीदेखील त्यात आहे का' तर उद्गार- मला आठवत नाही त्यावर ते खद खदून हसले [कारण मलादेखील नीरलॉनच्या मनोहर भगत /सागर ह्यांच्याकडे घेवून गेले होते ]!!.ह्याचा संदर्भात सच्च्या कार्यकर्त्यांची एक कोऑपरेटिव्ह व्यावहारिक सौन्स्था काढावी असे सुचवले होते पण त्याला एका नेहमीच काड्या घालणाऱ्या संधीसाधूने विरोध केला,पणस्वतःची तुंबडी भरपूर भरून घेतली. जेव्हा सच्चे कार्यकर्ते अशांचे चाळे सहन केले जातात हे बघतात तेव्हा सच्चेदेखील ''लालू'' बनतात, gr8warier@yahoo.com

    ReplyDelete