Sunday, September 8, 2013

विरोधकांचा खटाटोप

   कुठलीही संस्था वा संघटना जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात काम करते, तेव्हा तिच्या कामकाज व कारभाराची जाहिर चर्चा होणारच. पण त्या संस्था संघटनेने काय करावे व कधी करावे; यात बाहेरच्यांचा कितीसा हस्तक्षेप असावा, याला मर्यादा असतात. म्हणजे असे, की त्या संस्था संघटनेचे काम किंवा धोरणांचा बाहेरच्या जगावर वा समाजावर कोणता परिणाम होऊ शकतो; त्याबद्दलची चर्चा व्हायलाच हवी. पण त्याऐवजी कोणी त्या संस्था संघटनेच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करू लागला, तर त्याला मर्यादाभंगच म्हणायला हवे. उदाहरणार्थ भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार आतापासून जाहिर करावा किंवा नाही; आणि कॉग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवार बावावे किंवा नाही, याची माध्यमातून दिर्घकाळ होत असलेली चर्चा आता मर्यादा ओलांडून पुढे गेलेली आहे. त्याला हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा उखाळ्यापाखाळ्य़ा म्हणावे, असे स्वरूप आलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे, त्याविषयी आम्ही बोलायचे कारण नाही, असे म्हणत अन्य पक्षाचे लोकही त्यात सहभागी होत असतात. मग उमेदवारी हा विषय बाजूला पडतो आणि विविध पक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्यातच गर्क होतात. माध्यमातील दिवाळखोरांनाही आता त्याची इतकी चटक लागली आहे, की एक दिवसआड असे विषय चिवडणे चालू असते. जणू देशातील विविध संघटना वा पक्ष, हे माध्यमांना मुद्दे व बातम्या पुरवण्यासाठीच स्थापन झालेत, अशीच एकूण पत्रकाराची समजूत झालेली दिसते. नाहीतर त्यांनी पंतप्रधानकीचा उमेदवार हा इतका कळीचा विषय कशाला बनवला असता? प्रत्येक पक्षाला आपले फ़ायदेतोटे कळत असतात. त्यांची धोरणे व निर्णय असे वाहिन्यांच्या कॅमेरासमोर होऊ लागले, तर देशाची अवस्था काय होईल?

   नरेंद्र मोदी यांची देशातील लोकप्रियता आजतरी अफ़ाट आहे आणि भाजपामध्येच कशाला; अन्य कुठल्याही पक्षात त्यांच्याइतका लोकप्रिय नेता आजघडीला नाही. हेच या वाहिन्या सातत्याने मतचाचण्य़ा घेऊन सांगतात. मग भाजपाने त्यांना पंतप्रधान म्हणून पुढे करण्याविषयी चर्चा कशाला? आपल्याला सर्वात अधिक जागा जिंकून देऊ शकणार्‍या नेत्याला कुठलाही पक्ष लोकांसमोर पेश करणारच. पण त्याबाबतीत निर्णय घेण्याची घाई माध्यमांना कशाला असायला हवी? शिवाय जो नेता इतका लोकप्रिय आहे, त्याला पक्षाच्या मान्यतेचीही गरज नसते. जेव्हा पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता त्या नेत्यामुळे प्रभावित होतो आणि वरीष्ठ नेते त्यात टांग अडवतात, तेव्हा असा नेता बाजूला होऊन नवा पक्ष काढतो व जिंकूनही दाखवतो. असा अलिकडल्या भारतीय राजकारणाचा ताजा इतिहास आहे. मग लोकप्रिय मोदींचे नाव पक्षाने जाहिर करावे किंवा न करावे, याने कुठला मोठा फ़रक पडणार आहे? असा नेता जनतेच्या भावनांना ओळखून आपले निर्णय घेत असतो. त्यात इंदिरा गांधींपासून लालू, मुलायम व ममता यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो. मात्र त्यांच्या वागण्याचे वा निर्णय घेण्याचे नेमके भाकित वा विश्लेषण कुणा पत्रकाराला वा अभ्यासकाला कधीच करता आलेले नव्हते, हे विसरता कामा नये. म्हणूनच नरेंद्र मोदीविषयी माध्यमांनी उतावळेपणा दाखवणे दिवसेदिवस हास्यास्पद होत चालले आहे. कारण मोदींची पंतप्रधान पदाची उमेदवारी आता भाजपाच्या श्रेष्ठींच्या हातातली बाजी राहिलेली नाही. त्यावर शिकामोर्तब होण्यालाही अर्थ उरलेला नाही. ते उघड सत्य आहे आणि सामान्य माणसालाही उमगलेले आहे. त्याविषयी जाहिर घोषणा निव्वळ उपचार आहे. उत्सुकता माध्यमे वगळता अन्य कोणालाच नाही.

   मग माध्यमांना शिळ्या कढीला उत आणायचा, म्हणून त्यात किती व्यत्यय व अडचणी आहेत, त्याचे निरर्थक किस्से उगाच रंगवले जात असतात. कुठल्या भाजपा नेता मुख्यमंत्र्याच्या विधानाचा विपर्यास केला जात असतो. वास्तवात निवडणुकांची घोषणाच झालेली नसताना उमेदवार जाहिर करायची अपेक्षाच हास्यास्पद आहे. मग त्यावर रंगवल्या जाणार्‍या चर्चा किती पोरकट असतील, ते वेगळे सांगण्याची गरज आहे काय? मागल्या दोन तीन वर्षापासून मोदी यांनी अत्यंत विचारपुर्वक व योजनाबद्ध रितीने पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरण्याची तयारी केलेली आहे. त्यासाठी नुसती प्रचारयंत्रणाच उभी केली नाही; तर त्यांच्या विविध क्षेत्रातील विरोधकांचाही नेमका वापर करण्याची रणनिती आखून तिचा धुर्तपणे वापर केलेला आहे. माध्यमातील ज्या बुद्धीमान मुखंडांना आपण भाजपा वा मोदींना गोत्यात आणतोय असे वाटत असते; ते प्रत्यक्षात आपल्याच मुर्खपणाने मोदींच्या रणनितीमधले मोहरे म्हणून राबत असतात. किंबहूना भाजपाच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींना अजिबात नको असलेले मोदी त्यांच्या माथी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मारण्याचे कार्य, मोदी विरोधकांनीच पार पाडलेले आहे. आणि आपल्या विरोधकांकडून याचप्रकारे आपला डंका वाजवून घेण्यात व्यत्यय वा कंजुषी होऊ नये; याची मोदी चतुराईने काळजी घेत असतात. आठवडाभर माध्यमात मोदींचे नाव गाजले नाही वा चर्चा झालीच नाही; तर असा कुठला तरी मुद्दा माध्यमांना असा पुरवला जातो, की माध्यमे पुन्हा मोदींचा डंका पिटू लागतात. माध्यमेच नव्हेतर त्यांच्या माध्यमातून मोदी विरोधी पक्षांकडूनही आपल्या नावाचा जप करून घेत असतात. थोडक्यात मोदींची उमेदवारी हा त्यांना दिल्लीच्या सत्तेवर आणण्याचा अनवधानानाने चाललेला खटाटोप झाला आहे.

No comments:

Post a Comment