Tuesday, September 3, 2013

बिचार्‍या यासीनला उगाच पकडले?

   समाजवादी पक्षाचे सरचिटणीस व मुस्लिम नेते कमाल फ़ारुकी यांनी अलिकडेच केलेल्या एका विधानाचे खरे तर हिंदूत्ववाद्यांनी भांडवल करायला हवे होते. कारण हिंदू मतांसाठी हे लोक सतत धार्मिक भावनांचे भांडवल करतात, असा आरोप आहे. पण भाजपा किंवा तत्सम मंडळींनी फ़ारुकी यांना फ़ारसे महत्व दिले नाही. दुसरीकडे ज्यांना सतत देशातल्या वाढत्या धर्मांधतेची चिंता सतावत असते, त्यांनी तरी फ़ारुकी यांना काही खडे सवाल विचारायला हवे होते. कारण यासीन भटकळ याच्या अटकेनंतर फ़ारुकी यांनी व्यक्त केलेले मत, अत्यंत धर्मांध स्वरूपाचे होते. गेली सहा वर्षे देशभर कुठल्याही स्फ़ोटात ज्याचे नाव वारंवार पुढे येत असते, असा यासीन हा माणुस आहे आणि मोठी मेहनत केल्यावरच तो आपल्या हाती लागला, असा भारतीय गुप्तचर खात्याचा दावा आहे. असे असताना फ़ारुकी यांनी त्याला दहशतवादी म्हणून पकडले, की केवळ मुस्लिम असल्यानेच पकडले, असा सवाल केला आहे. जणू त्यांना यासीन भटकळ म्हणजे कोण ते ठाऊकच नसावे. पुण्यापासून अनेक स्फ़ोटात त्याचेच नाव पुढे आलेले होते. मग फ़ारुकी यांनी असे विधान कशाला करावे? तर त्याचेही एक तर्कशास्त्र आहे. त्यांच्याआधी मनमोहन सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री रेहमान खान यांनीही दहशतवादी म्हणून अकारण मुस्लिम तरूणांची धरपकड होत असल्याचा दावा केला होता. तेवढेच नाही तर अशा अटकेची जितकी प्रकरणे देशभर आहेत, त्याची छाननी करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था असावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केलेली होती. त्यांचेच शेपूट धरून फ़ारुकी आपला सवाल विचारत आहेत. असे काही बोलत राहिले, मग गुप्तचर संस्था व पोलिसांवर मुस्लिम गुहेगारांना पकडण्याबाबत धाक निर्माण करण्याचा हेतू त्यामागे असतो.

   मुस्लिम आरोपी असला म्हणजे त्याचा गुन्हा नसतोच, तर पोलिस अकारणच मुस्लिमांची धरपकड करतात; असा कांगावा गेले कित्येक वर्षे अखंड चालू आहे. आता त्याला जोर चढला आहे. दिग्विजय सिंग यांनी दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलिस अधिकारी मारला गेल्यावरही अकारण तिथे मुस्लिमांवर अन्याय झाल्याचा दावा केला होता. गेल्या पाचसहा वर्षापासून सतत इंडीयन मुजाहिदीन या भारतीय जिहादी संघटनेचे नाव घातपातानंतर समोर येत राहिले आहे. मात्र रेहमान खान यांच्यापासून अनेक मुस्लिम नेते अशी कोणतीच संघटना नसल्याचा दावा करीत राहिले आहेत. पण भटकळच त्या संघटनेचा संस्थापक असल्याचे बोलले जात होते आणि आता त्यालाच मोठ्या शिताफ़ीने अटक झाल्यावरही पुन्हा शंका घेतल्या जात आहेत. फ़ारूकींचे विधान त्याच मालिकेतील एक आक्षेप आहे. ‘केवळ मुस्लिम म्हणून त्याला पकडले काय’ अशा विधानातून फ़ारुकी काय सुचवत आहेत? भारतामध्ये मुस्लिमांची अकारण धरपकड होते असे त्यांना सुचवायचे व सांगायचे आहे. असे म्हणायला तशी किती प्रकरणे घडली आहेत? मालेगावच्या एका घटनेत काही मुस्लिम तरूणांवर आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून त्यांची सुटका झाली. पण गुन्हे सिद्ध झाल्याची शेकडो प्रकरणे आहेत, ज्यात पुराव्यानिशी मुस्लिमांना जिहादी घातपाताच्या प्रकरणाते साक्षीपुराव्यानिशी शिक्षा झालेली आहे. पण फ़ारूकी वा तत्सम मुस्लिम नेत्यांसह सेक्युलर शहाणे असे बोलतात, की अपवाद हाच नियम असून अन्य शिक्षापात्र ठरलेले मुस्लिम आरोपीही निरपराधच असावेत. आणि म्हणूनच ज्यांना संशयित म्हणून पकडले जाते, त्यांना गुन्हा केला म्हणून नव्हेतर मुस्लिम म्हणून पकडले जाते, असा हा अपप्रचार आहे.

   मुस्लिमांना अन्यायग्रस्त मानसिकतेमध्ये ढकलून भयभीत करायचे, मग त्यांची गठ्ठा मते मिळवणे सोपे जाते. त्यासाठीच चाललेले हे गलिच्छ राजकारण आहे. खरे तर सेक्युलर विचारांची झुल पांघरून वागणार्‍यांनी त्याबद्दल अशा लोकांना जाब विचारला पाहिजे. आसाराम बापूवरील आरोपांचे पुरावे मागितले, म्हणून उमा भारतींना जाब विचारणार्‍या कितीजणांनी कमाल फ़ारूकींना त्यांच्या उपरोक्त विधानाबद्दल जाब विचारला आहे? की सेक्युलर वा मुस्लिम इसम वेडगळ वा उफ़राटे काहीही बोलला, तरी माफ़ असते असे म्हणायचे आहे? नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये ‘गाडीखाली कुत्र्याचे पिलू आले तर’ असे वाक्य उच्चारले; म्हणून किती हलकल्लोळ माजवण्यात आला होता. मग यासीन भटकळ याला मुस्लिम म्हणून पकडले काय, अशा विधानावर सेक्युलरांचे सार्वत्रिक मौन कशाला? तर अशा पद्धतीने मुस्लिमांच्या धर्मभावना जागवून सेक्युलर पक्षांना मताची बेगमी करता येईल, अशी एक समजूत आहे. पण आता अशा धार्मिक राजकारणाची तीव्र प्रतिक्रियाही उमटू लागली आहे आणि त्याचेच प्रतिबिंब गुजरातमध्ये सलग बारा वर्षे पडलेले आहे. ज्याला दंगलीचा आरोपी म्हणून बदनाम केले, तोच आता त्याच बळावर देशातील हिंदूंचा लढावू नेता व विकासाचा प्रणेता म्हणून पुढे आलेला आहे. त्याचे श्रेय म्हणूनच सेक्युलर अपप्रचाराला द्यावे लागते. आज कुठलेही क्षुल्लक कारण शोधून मोदींना हिंदु धर्मांध ठरवण्याची शर्यत माध्यमातून चालते. पण जेव्हा तीच माध्यमे फ़ारुकी यांच्याकडे काणाडोळा करतात; तेव्हा बहुसंख्य हिंदूंना मोदीसारखा कडवा हिंदू नेता हवासा वाटू लागतो. अशा बडबडीतून फ़ारूकी समाजवादी पक्षाला मुस्लिमांची मते कितपत मिळवून देऊ शकतील ठाऊक नाही; पण ते मोदींचे पारडे जड नक्कीच करीत आहेत.

No comments:

Post a Comment