Wednesday, September 4, 2013

एक बंजारा गाये

 

   मध्यंतरी आठवडाभर गुजरात व नरेंद्र मोदी माध्यमातून बेपत्ता होते. मुंबईचा सामुहिक बलात्कार, दाभोळकर व आसाराम यांनीच ब्रेकिंग न्युजा भरून टाकल्या होत्या. इतक्यात पुन्हा गाडी वळणावर आलेली आहे. म्हणजे मोदी गोत्यात आलेले आहेत. कारण गेल्या दहा वर्षात मोदी गोत्यात, ही एकच सर्वात सनसनाटी बातमी असते. आठदहा दिवस मोदीचे नामोनिशाण नाही म्हणजे काय; असे बिचार्‍या तुरूंगात खितपत पडलेल्या वंजारा नामक पोलिस अधिकार्‍याला वाटले असावे. म्हणून की काय, त्याने आपल्या पोलिस सेवेचा राजिनामा देत माध्यमांच्या हाती नवे कोलित दिले आहे. त्याने राजिनामापत्र लिहून नुसताच राजिनामा दिलेला नाही; तर आपल्या त्या पत्रात मोदी व त्यांचा अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा याच्यावरही दुगाण्य़ा झाडल्या आहेत. त्यामुळे आता माध्यमांना आवडती बातमी मिळालेली आहे. गुजरातमध्ये कुणा दारूड्या नवर्‍याने पत्नीला मारहाण केली वा अन्य कुठे शाळेत शिक्षकाने छोट्या मुलाला चोपले; तरी गुजरातचा मुख्यमंत्री थेट त्याला जबाबदार असतो. म्हणूनच अशा कुठल्याही घटनेचा सुगावा लागला, तरी मोदी गोत्यात आल्याचा साक्षात्कार माध्यमांच्या जाणत्यांना लागत असतो. अर्थात दोनतीन आठवडे फ़ार तर असा शोध गाजतो आणि मग अडगळीत जाऊन पडतो. कारण अशा कुठल्याही घटनेने तब्बल बारा वर्षात मोदी गोत्यात आलेले नाहीत. उलट प्रत्येक अशा गदारोळातून मोदी अधिकच बलवान होत गेले आहेत आणि त्यातूनच शेवटी त्यांना राष्ट्रीय नेता होण्याची संधी मिळालेली आहे. किंबहूना आज मोदींच्या यशाचे खरे श्रेय म्हणूनच त्यांच्या कुठल्याही समर्थक वा पक्षापेक्षाही त्यांच्या निंदक व विरोधकांनाच जाते. वंजाराने त्यांचीच गरज भागवली आहे.

   आता सुद्धा वंजारा यांच्या पत्रात त्यांनी अमित शहांवर दोषारोप केलेत आणि मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली, हे शंभर टक्के खरे आहे. पण कायद्याच्या कोर्टात कोणाची नाराजी वा निव्वळ आक्षेप एवढ्यावर कुठले निर्णय होत नसतात. तिथे कायद्याच्या कसोटीवर गुन्हा वा दोष सिद्ध व्हावा लागतो. तेवढेच नाही तर दखलपात्र गुन्हा नोंदवून घ्यायचा, तरी काही प्रथमदर्शनी पुरावा असावा लागतो. वंजारा यांच्या पत्रात तसे काय आहे? पण त्याची आरोपबाजांना कुठे गरज असते? इशरत जहान किंवा सोहराबुद्दीन यांच्या चकमकीला खरे ठरवण्यासाठी याच आरोपबाजांना कोर्टात सिद्ध होणारे कायदेशीर पुरावे हवे असतात. पण तसेच गंभीर आरोप मोदींच्या विरोधात करताना वा त्यांना दोषी ठरवण्यासाठी, कुठल्याही पुराव्याची गरज नसते. नुसती शंका वा संशय देखील मोदींवरील आरोप सिद्ध होण्यासाठी पुरेसा असतो. वंजारा यांच्या पत्राने नेमकी तीच सुविधा या आरोपबाजांना उपलब्ध करून दिली आहे. पत्रातला तपशील तपासला, तर आपला गुन्हा वा घडलेला प्रकार गुन्हा असल्याचे वंजारा यांनी मान्य केलेले नाही. उलट आपण मोठे राष्ट्रकार्य केल्याचा त्यांचा दावा आहे आणि इतके केल्यावरही आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री आपल्या देशप्रेमाची कदर करीत नाही वा आपल्याला कायद्याच्या कचाट्यातून सोडवत नाही; अशी वंजारा यांची तक्रार आहे. थोडक्यात त्यांच्या पत्राचा सूर बघितला तर मोदी विरोधकांनाच त्याने खोटे पाडले आहे. मोदींनी अशा चकमकी घडवून आणल्या आणि त्यातल्या गुन्हेगार पोलिसांना पाठीशी घालण्याचे पाप केले आहे; असा तमाम आरोपबाजांचा प्रमुख आक्षेप राहिला आहे, सोहराबुद्धीन वा इशरत यांच्या मारेकर्‍यांना मोदींनी पाठीशी घातलेले नाही, हेच वंजारा सांगत आहेत ना?

   गेल्या दहा वर्षातला मोदी सरकारवरचा प्रमुख आरोप आहे, तो गुजरातमध्ये न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचा. तीस्ता सेटलवाडपासून प्रत्येक मोदी विरोधकाचा मुद्दा एकच आहे, गुजरातमध्ये पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेत मोदी हस्तक्षेप करतात. त्यामुळेच तिथे कुणा पिडीताला न्याय मिळू शकत नाही. वंजारा यांनी त्या आरोपाची पार लक्तरेच करून टाकलेली नाहीत काय? कारण त्यांनी आपल्याला वाचवण्यासाठी मोदी वा त्यांच्या सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत कुठलाच हस्तक्षेप केला नाही वा अतिरेक व हिंसा करणार्‍या पोलिसांना वार्‍यावर सोडून दिले असाच आक्षेप घेतला आहे. याचा अर्थ गुजरातमध्ये पोलिसांनी दंगलीच्या वेळी वा अन्य कधी नियमबाह्य काही केले असेल, तर त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याच्या बाबतीत मोदी अलिप्त राहिले; असा वंजारा यांचा त्या पत्रातील दावा आहे. म्हणजेच प्रत्यक्षात मोदींवर नाराजी व्यक्त करताना वंजारा यांनी टिकाकार व विरोधकांनी मोदी यांच्यावर आजपर्यंत केलेल्या आरोपांचे पुरते खंडन केले आहे. किंबहूना मोदी व त्यांचे सरकार आपल्या लाडक्यांसाठी न्यायप्रक्रियेत कुठलीही बाधा आणत नाहीत; याचेच प्रमाणपत्र वंजारा यांनी त्या पत्रातून दिले आहे. मग मोदी विरोधक कशासाठी इतके उत्तेजीत व खुश झालेत तेच समजत नाही. कारण त्या पत्रातला कुठलाही तपशील मोदींना कायदेशीर गोत्यात आणणारा नाहीच. उलट मोदी विरोधकांना मात्र साफ़ खोटा पाडणारा आहे. पण मोदी गोत्यात अशा भ्रमात वावरणार्‍यांना कोणी ही वस्तुस्थिती समजावून सांगायची? ज्यांना नशेत वा भ्रमातच मशगुल रहायचे असते, त्यांना शुद्धीत आणणे अशक्य असते. तेव्हा इतकेच म्हणता येईल, एक बंजारा गाये, मोदीके गीत सुनाये; उल्लू बननेवालो को, खुशीखुशी गुमराह कराये.

1 comment:

  1. नाण्याच्या दोन बाजू चांगल्या समजवून दिल्यात धन्यवाद!!!!!! मला नाण्याच्या चार बाजू समजल्या आहेत. इथे नाण एक घटना आहे म्हणून पडद्याच्या पुढील, मागील ह्या दोन बाजू आहेत. तर त्या पडद्याचे क्षेत्रफळ किंवा आकार ही तीसरी बाजू आहे. पडदा कोणाचा व का वापरला ही चौथी बाजू. तुमचे काय मत ????????

    ReplyDelete