Tuesday, September 1, 2015

ते माणसे मारतात, हे विचार मारतात!

खालील चित्रात इंद्राणीच्या पार्टीत रमलेला विवेकवादी प्रणय रॉय आणि विनोद दुआ दिसतोय ना?



एकाने गाय मारली तर दुसर्‍याने वासरू मारायचे काय? त्यातून न्याय होत नाही. कारण तसे कृत्य अविवेकी असते असे जाणते पुर्वापार सांगत आले. थोडक्यात वासरू मारणे अविवेकी किंवा विवेकाला सोडचिठ्ठी असाच अर्थ होतो ना? पण स्वत:ला विवेकी वा विवेकवादी म्हणवून घेणारे नेमक्या त्याच मार्गाने जाताना दिसतील. नरेंद्र दाभोळकर यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर विवेकवादी म्हणून मिरवणार्‍यांची भाषा काय होती? माणुस मारता येतो, त्याचा विचर मारेकरी मारू शकत नाही. खरेच आहे. मारेकरी फ़क्त देहाला मारतो. कारण ते माणसाचे भौतिक रुप असते. माणसाचा विचार अमुर्त असतो. त्याला मारता वा संपवता येत नाही. पण जो काही विचार असतो, त्याचे विकृतीकरण केले; मग तो आपोआप मारला वा संपवला जात असतो. आणि दुर्दैव असे असते, की देहरूपी माणसाला मारणारा विचार मारू शकत नसला तरी त्याच माणसाचे विचारांचे अमुर्त रुप त्याचाच उदो उदो करणारे मारून संपवत असतात. कारण हेच लोक त्या विवेकी विचारांचे विकृतीकरण करून त्यांना तिलांजली देण्याचे समारंभ साजरे करत असतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची दाभोळकरांच्या पाठोपाठ दिड वर्षांनी हत्या झाली. मारेकर्‍याला त्यांचे विचार कुठे मारता आले? ते विचार आजही उपलब्ध आहेत. व्याख्याने व लिखाणाच्या स्वरूपात उपलब्ध असलेले पानसरे यांचे विचार व त्यातला विवेक त्यांच्याच अनुयायांमध्ये कितीसा दिसतो? पानसरे यांनी विचारांना व विवेकाला असलेला धोका दाखवला, नेमके शत्रू दाखवले. पण त्यांच्याच गळ्यात गळे घालून पानसरे अनुयायी वागत असतील, तर मग त्यांच्याच विचारांचा मारेकरी कोण असतो? हातात पिस्तुल घेतलेला की पानसरेंच्या विचारांना तिलांजली देत विवेकाला मुठमाती देणारा? पानसरे आपल्या ‘परिवर्तनाच्या दिशा’ या पुस्तकात काय लिहीतात?

   ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’

हा कॉम्रेड पानसरे यांनी सांगितलेला मूलभूत विचार आहे. त्याचा लवलेश तरी त्यांच्या हत्येनंतर उमटलेल्या प्रतिक्रीयेत वा तमाशात दिसला आहे काय? हिरीरीने ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवणार्‍यांचे डोके तरी त्यांच्या आपल्याच धडावर आहे काय? असते तर त्यांनी पानसरे हयात असताना वा त्यांच्या नंतरही असे कोण भामटे आपल्यात व चळवळीत घुसून परिवर्तनाचा विचका करीत आहेत, त्याचा शोध अगत्याने घेतला असता. शोधक नजरेने जगाकडे बघितले असते आणि परिवर्तन वा शोषितांच्या चळवळीला कमकुवत करण्याचा कुठला डाव खेळला जातोय व त्यातले खेळाडू कोण आहेत, त्याचा अभ्यास केला असता. त्यांना उघडे पाडण्याचा प्रयास केला असता. पण आजतरी असे दिसते, की शोषकांनी ज्यांना विचारवंत म्हणून नेमून दिलेले आहे, त्यांनी छू म्हणायची खोटी, की पुरोगामी म्हणून नाचणारे विचारांचा व विवेकाचा मुडदा पाडायला सज्ज असतात, धावत सुटतात. विवेक व विचारांना सोडचिठ्ठी देवून अंधभक्ताप्रमाणे दाखवलेल्या लक्ष्यावर तुटून पडतात. त्याचा परिणाम असा, की ज्यांचा गौरव करायचा त्यांचीच शिकवण पायदळी तुडवली जाते.

आजची बहुतांश माध्यमे व त्यांनी घोषित केलेले महान विचारवंत समाजातले तथाकथित पुरोगामी आहेत आणि ते कोणाच्या भांडवल पुंजीवर विचारवंत घोषित करण्यात आले आहेत? बहुतांश मोठी माध्यमे आज समाजाचे शोषण करणार्‍या विविध भांडवलशहा व काळा पैसावाल्यांची बटीक आहेत. सामान्यांचे शोषण वा दिशाभूल करून जमवलेल्या भांडवलावर त्यांनी माध्यमांचा ताबा मिळवला आहे. त्यांच्या त्या पापाचे उदात्तीकरण करायला त्यांनी जे विचारवंत संपादक जाडजुड पगार देवून दावणीला बांधलेले आहेत, त्यातला प्रत्येकजण पुरोगामी व सेक्युलर तत्वज्ञानाची अखंड पोपटपंची करताना दिसेल. असे नामवंत विचारवंत विवेकाच्या विचारांचा बाजार मांडल्याचे देखावे उभे करतात आणि बाकीचे हुरळलेले पुरोगामी आपल्या धडावरचे डोके खाली उतरवून शोषकाच्या विचारवंतांकडे आपली बुद्धी गहाण टाकत असतात. कालपरवा एका वाहिनीच्या मालकाने लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराची खरेदी करण्याची घोषणा केली. सरकार ते काम करणार नसेल तर ही वाहिनी व त्याचा मालक ते पुरोगामी काम करणार असल्याचा गवगवा झाला. त्याच्याच वृत्तपत्राने मोठी मथळ्याची बातमी देवून आपली पाठ थोपटून घेतली. मग त्याच माध्यम समुहात कार्यरत असलेल्या शेकड्यांनी पत्रकार कर्मचार्‍यांचा पगार व मोबदला थकवल्याची बातमी आली आणि पळापळ झाली. ज्यांना कित्येक महिने राबवून घेतले पण साधे वेतन कबुल केल्याप्रमाणे दिले नाही, त्याने असे नाटक करायला बाबासाहेबांचे नाव बिनदिक्कत वापरले. किती पुरोगामी लोक त्याला जाब विचारायला पुढे सरसावले? कर्मचार्‍यांसह सामान्य जनतेची पिळवणूक करणार्‍यांचा पैसा स्मारकासाठी वापरण्याला विवेकवाद म्हणतात काय? त्या वाहिनी वा वृत्तपत्राच्या संपादकांनी त्याच मालकाचे उदात्तीकरण करण्यात धन्यता मानली. डोके कुठे आहे? कुणाच्या धडावर आहे?

शीना हत्याकांडात चव्हाट्यावर येऊ घातलेल्या काळ्याकुट्ट गुन्ह्याच्या अंतरंगात मागल्या दोन दशकात बोकाळलेल्या माध्यम पसार्‍याची पापे दडलेली आहेत. विवेकाला तिलांजली देत काळापैसा वाममार्गाने गुंतवून मोकाट झालेल्या वाहिन्या व माध्यम समुहांनी पोसलेले विचारवंत, संपादक व पत्रकार आपल्याला नित्यनेमाने नितीमत्तेचे ‘बोल्ड एन्ड ब्युटीफ़ुल’ डोस पाजत असतात. वैचारिक क्रांतीसाठी विवेकाचा गळा घोटण्याची ही परिवर्तनवादी चळवळ आता अशा टप्प्यावर आलेली आहे की तिथे पुण्यकर्म साधण्यासाठी पापकर्माच्या कुबड्यांवर उभे रहावे लागते. अशा पापात बुडालेल्यांकडून आपण काय ऐकतो? ‘खुनी विचार मारू शकत नाही.’

हेच लोक पानसरेंचा विचार मारेकरी संपवू शकत नाही अशी ग्वाही देत असतात. कारण मारेकरी विचार मारू शकत नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते. किंबहुना तेच विचार मारण्याचे कंत्राट घेऊन यांनी बौद्धिक मारेकरी होण्याचा व्यवसाय हाती घेतलेला असतो. त्यांच्या शोषक मालकालाही ठाऊक असते, की सुपारीबाज नेमबाज गोळी झाडणारा विचार संपवू शकत नाही, की मारू शकत नाही. ते काम करण्यासाठी सराईत भाषेत (पानसरे, दाभोळकर वा कलबुगी यांचे) विचार नामशेष करणार्‍या खास बुद्धीजिवी दांभिकांना हाताशी धरणे भाग आहे. त्यासाठीच मागल्या दोन दशकात अब्जावधी रुपयांचा काळापैसा माध्यमात ओतला गेला आहे. सामान्य माणसाच्या अतीव शोषणातून लुबाडण्यात आलेल्या त्याच पैशावर आज अनेक पुरोगामी संस्था, संघटनांचा संसार उभा आहे. अनेक पुरोगामी विचारवंत आपले पांडित्य माध्यमातून फ़ैलावत पानसरेंचा मूळ विचार मारण्याचे काम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पाडत असतात. पुरोगामी वा विवेकी विचारांची हत्या करण्यासाठी ज्यांच्या धडावर अजून त्यांचेच डोके आहे, त्यांचे शिरकाण करण्याचे व्रत घेतल्यासारखे हे विचारवंत काम करतात. त्यात ते इतके यशस्वी झालेत, की कोणा आंबेडकरवाद्याला उपरोक्त वाहिनी वा वृत्तपत्राच्या संपादकांना लंडनच्या बाबासाहेबांच्या घराविषयी केलेल्या घोषणेचा जाबही विचारायचे धाडस झालेले नाही. कारण त्यातली दिशाभूल कळण्यासाठी आपले डोके आपल्याच धडावर असायला हवे आणि त्यालाच तर या वैचारिक मारेकर्‍यांनी सुरूंग लावला आहे. कारण आपल्याच धडावर आपलेच डोके असेल तर आपण विवेकी विचार करू शकतो आणि विवेकाने निर्णय घेऊन काम करू शकतो. तरच परिवर्तनाची चळवळ पुढे जाऊ शकेल आणि पर्यायाने परिवर्तन घडून येईल. पण तसे झाले तर समाजातील शोषणकर्त्यांनी जायचे कुठे? त्यांनी पोसलेल्या विचारवंतांना चंगळ कशी परवडणार?

No comments:

Post a Comment