Wednesday, May 8, 2019

शकुनीमामाच्या भाचीची विस्मृती

Image result for priyanka haryana

हरयाणा राज्यातच कुरूक्षेत्र आहे आणि तिथे एक सभेत बोलताना कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना अकस्मात महाभारत आठवले आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली आहे. खरेतर त्यांनी थेट दुर्योधनाशी मोदींची तुलना केलेली नाही. तर त्या व्यक्तीमत्वातल्या अहंकाराची तुलना मोदींच्या वागण्याशी केलेली आहे. हे करताना त्यांना दुर्योधनाचा मामा कसा आठवला नाही? अर्थात आठवणेही शक्य नाही. कारण लिहून दिलेल्या पटकथेनुसार डायलॉग फ़ेकणार्‍यांना त्यातले नेमके संदर्भ ठाऊक नसतात. त्यामुळे दुर्योधन कोण किंवा त्याचा मामा कोण, हे प्रियंकाला माहिती असण्याचे कारण नाही. अर्थात त्यांना महाभारताचा गंध नसला तरी ज्या हरयाणाच्या भूमीवर त्यांनी हे अकलेचे तारे तोडले, तिथल्या सामान्य जनतेचे जीवनच महाभरताच्या कथानकावर पोसले गेलेले आहे. त्यांना सगळे संदर्भ नेमके ठाऊक असतात. सहाजिकच दुर्योधन अहंकारी कशाला होता आणि त्याच्या अहंकाराला खतपाणी घालून मामा शकुनी याने कुरूवंशाचे दिवाळे कसे वाजवले, त्याची कहाणी भारतातल्या कुठल्याही सामान्य माणसाला नेमकी ठाऊक अस्ते. बिचार्‍या इंपोर्टेड गांधी कुटुंबियांना त्याचे तपशील कोणीतरी लिहून द्यावे लागतात. अन्यथा आपल्या भावाचा अहंकार फ़ुलवून आधुनिक महाभारताची नवी कहाणी लिहीणारे शकुनीमामा या भाचीलाही आठवले असते आणि ओळखता आले असते. मग तिच्या भावाला बुधवारी सुप्रिम कोर्टात बिनशर्त माफ़ीनामा लिहून देण्याची वेळ आली नसती. त्या बंधूराजांना अहंकार फ़ुलवून खुळ्यासारखी विधाने करण्याची गरज भासली नसती. अवघे महाभारत दुर्योधनाच्या अहंकारामुळे घडत गेले, त्याची कहाणी पाच गावांपुरती मर्यादित होती आणि ती समजली असती, तर प्रियंकापासून सोनियांपर्यंत कोणी गुजरातच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्य़ापर्यंत मजल मारली नसती.

नरेंद्र मोदी हा पांडवांसारखा जुगारामध्ये पराभूत झालेल्या पक्षाचा एक सामान्य मुख्यमंत्री होता. त्याला डिवचून योद्धा बनवण्याची किमया पुरोगामी शकुनीमामांनी केली आणि डोळे बांधून बसलेल्या सोनिया गांधींसारख्या गांधारीने त्याला खतपाणी घातले. २००४ सालात पुन्हा सत्ता कॉग्रेसच्या हातात आल्यावर भाजपा मरगळलेला होता. त्याच्यापाशी कोणी समोर येऊन लढाई करू शकेल, असा नेताही उरलेला नव्हता. महाभारतात पांडवाचे राज्य युद्ध करून दुर्योधनाने जिकलेले नव्हते. तर युद्धीष्ठीर धर्माला भरीस पाडून त्याला जुगार खेळायला भाग पाडले. जुगारातला पण म्हणून पांडवांचे राज्य पादाक्रांत केलेले होते. लढून जिंकण्याची दुर्योधन वा कौरवात हिंमतच नव्हती. लबाडीने चलाखीने त्यांनी पांडवांची दिशाभूल केली होती. त्याचा सुत्रधार शकुनीमामा होता. त्यात तो यशस्वी झाला. पटावर जिंकणे सोपे असले तरी युद्धात जिंकणे वा जुगारात मिळवलेले युद्धातून टिकवणे कौरवांना शक्य नव्हते. म्हणूनच युद्धाचा प्रसंग टाळणे, हाच उत्तम व शहाणपणाचा मार्ग होता. पण अहंकारी दुर्योधन ते समजू शकला नाही आणि पुढले महाभारत घडले होते. तेही थोपवण्याचा प्रयास श्रीकृष्णाने केला. त्याने पांडवांना फ़क्त पाच गावे देऊन युद्ध टाळण्याचा अखेरचा सल्ला दुर्योधनाला दिलेला होता. पण अहंकाराने त्याला तो शहाणपणा करू दिला नाही. नेमकी तशीच काहीशी स्थिती २००४ नंतर सोनिया व राहुल यांची झाली. त्यांनी देशाची सत्ता उपभोगताना गुजरातच्या मुख्यमंत्र्याला डिवचण्याचे काही कारण नव्हते. पण अहंकार फ़ुललेल्या राहुल सोनियांनी व त्यांचे सल्लागार होऊन बुद्धीमंत शकुनीमामांनी विनाशाला आमंत्रण देत तसे होऊ दिले नाही. म्हणूण आजचे महाभारत आपल्याला बघावे लागते आहे. मोदी यांचा अहंकार यातला दुर्योधन नाही, तर पराभूत होऊनही आपल्यातला दुर्योधन आवरता न येणारा राहुल गांधी, हा दुर्योधन आहे.

अशावेळी कृष्णशिष्टाईत पाच गावे मागण्याची कल्पना लक्षात येते. जुगारात गमावलेले सगळे राज्य पांडवांनी परत मागितलेले नव्हते. तर पुन्हा संघर्ष रक्तपात नको म्हणून कृष्णाने शिष्टाई केलेली होती. युद्ध टाळणे आणि सगळे भांडण पटावर ठेवण्यातच कौरवांचे कल्याण होते. पण अहंकार इतका प्रभावी होता, की तेवढेही औदार्य दुर्योधनाला दाखवता आले नाही. तो शकुनीमामांच्या आहारी गेला होता आणि त्यातून युद्धाची स्थिती निर्माण झाली. त्या दुर्योधनाला चिथावणारा किंवा सल्ले देणारा एकमेव शकुनीमामा होता. राहुलना सल्ले देणार्‍या शकुनीमामांची तर लाईन लागलेली आहे. एकामागून एक चुका करण्याच्या स्पर्धेतून हा आधुनिक दुर्योधन मागे यायलाच तयार नाही. मजा म्हणजे माता गांधारी बाजूला पडली आणि भगिनीनेच आता गांधारी होऊन भावाच्या मुर्खपणावर पांघरूण घालण्याचा उद्योग चालविला आहे. तसे नसते तर प्रियंकाला दुर्योधन आठवला नसता, की महाभारताचा संदर्भ देण्याची वेळ आली नसती. २००४ सालात भाजपाशी थेट लढून सोनियांनी सत्ता मिळवली नव्हती, तर भाजपाचा द्वेष ही विविध पुरोगामी पक्षांची अगतिकता ओळखून दहा वर्षे सत्ता उपभोगली होती. ती भोगताना गुजरातसारख्या एका मध्यम राज्यातील नरेंद्र मोदी ह्या मुख्यमंत्र्याकडे काणाडोळा करता आला असता. पण सोनियांचा अहंकार आणि विविध कोर्टातले वकील, विद्यापीठातले प्राध्यापक व माध्यमातले राजकीय निरीक्षक, शकुनीमामा बनून त्यांना राजकीय जुगारात ओढत गेले. त्यातून त्यांनी आपल्याला पराभूत करू शकणारा मोदी नावाचा अक्राळविक्राळ पांडव निर्माण केला. त्या मोदीला संपवण्याचा अहंकार इतका बाधला, की त्याला गुजरातमध्ये संपवणे दुर राहिले आणि तोच कॉग्रेस संपवण्याचा अश्वमेधाचा घोडा घेऊन गुजरातमधून दिल्लीपर्यंत येऊन पोहोचला. योगायोग असा, की तीच दिल्ली महाभारत काळातली पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ मानली जाते.

प्रियंकाला महाभारत ठाऊक नाही किंवा तिला असले संदर्भ शोधून देणार्‍यांनाही बहुधा महाभारताच्या कथेतला आशय माहिती नसावा. त्यातला आशय इतकाच आहे, की पटावर जिंकणारे कधी रणांगणात जिंकत नसतात. पटावरची लढाई मैदानात घेऊन न जाण्यात शहाणपणा असतो. कोर्ट कायदे आणि तांत्रिक मुद्दे हा जुगार असतो. पण खरीखुरी हाणामारीची लढाई म्हणजे निवडणूक असते. तिथे दुर्योधन वा दु:शासन जिंकत नसतात, किंवा त्यांना लढण्यात शकुनीमामा उपयोगी नसतात. तिथे भीम अर्जुन जिंकतात. कर्णाचेही रथचक्र रुतून बसत असते. शिखंडीला पुढे करून भीष्माचार्यांचाही वध होऊ शकतो. नरोवा कुंजरोवा म्हणायचीही मुभा असते. पण हे सगळे सांगायला वा समजवायला इटालीची आजी उपयोगाची नसते ना? मग बिचारी प्रियंका काय करील? तिलाही इथल्या अर्धवट शकुनीमामांकडून महाभारताचे संदर्भ मागावे लागतात. असे शकुनीमामा निवड्णूक आयोगात तक्रारी करू शकतात. वाहिन्यांच्या चर्चेत युक्तीवाद करू शकतात, कोर्टात याचिका करू शकतात. पण मैदानात हत्यार हाती घेऊन लढायची कुवत त्यांच्यात नसते. ते तुमचा अहंकार फ़ुलवू शकतात आणि त्या खुळ्या अहंकाराच्या आहारी जाणारा मुर्ख असतो, तोच दुर्योधन होऊन आपला कपाळमोक्ष करून घेत असतो. हे प्रियंकाला बंधूराजांचे लागोपाठचे प्रयोग बघूनही लक्षात येत नसेल, तर तिला महाभारत समजावून तरी उपयोग काय? युद्ध होण्यापुर्वी श्रीकृष्णाच्या पायाशी बसतो, त्याला अर्जुन म्हणतात आणि अहंकारापोटी आधी येऊनही उशाशी बसतो, त्याला दुर्योधन म्हणतात. आजही मोदी नम्र होऊन स्वत:ला कामदार म्हणवतात आणि राहुल प्रियंकांचा उल्लेख नामदार असा करतात, त्यातच महाभारत सामावलेले आहे. सगळी सेना कौरवांना देऊन फ़क्त कृष्ण पांडवांच्या बाजूने उभा रहातो, ह्यातच महाभारताचे सार सामावलेले आहे. पण ते शकुनीमामाच्या भाचीला कसे उमजावे?

14 comments:

  1. Very good article Sir, but I don't think that Gandhi family will understand this. To understand your article one must know the Mahabhart first. ��������

    ReplyDelete
  2. 👍👍👍👍👍👍👍👍
    भाऊ
    अप्रतिम विश्लेषण.

    ReplyDelete
  3. भाऊ,
    एक संदर्भ चुकला. शिखंडीला पुढे करून द्रोणाचार्य नाही, भीष्मांना धारशायी केलं होतं.

    ReplyDelete
  4. थोडीशी दुरुस्ती - शिखंडीला पुढे करुन द्रोणाचार्यांचा वध असे आपण म्हणालात, तिथे भिष्माचार्य असे हवे. बाकी लेख अप्रतिम ! रमेश तळगांवकर, रत्नागिरी

    ReplyDelete
  5. भाऊ अतिशय मार्मिक आणि सुंदर विश्लेषण, 2019 च्या लढाईचा निकाल महाभारतासारखा तर लागणार नाही ना? म्हणजे मोदींचा विजय होताना समोरचा शकुनी मामा असलेला पुरोगामी secular वगैरे असलेला विरोधी पक्ष संपून तर जाणार नाही ना? भाऊ तुमचा आजचा ब्लॉग वाचून तसेच वाटते आहे.

    ReplyDelete
  6. आता तर खरं, निवडणूक आहे की धुळवड आहे हेच कळत नाही. केव्हा एकदा २३ मे येते असे झाले आहे. नुसता वैताग आहे. ह्यात जीवाला शांतता देणारे आपले लिखाण आहे भाऊ. अतिशय अभ्यासपुर्ण. सध्याच्या वैतागात खरोखर एक आधार. रोज आतुरतेने वाट पाहतो आम्ही. धन्यवाद.

    ReplyDelete
  7. भाऊ खरच तुम्हाला सरस्वती देवी चा आशिर्वाद आहे. तुमचे लिखाण मार्मिक साधी भाषा अभ्यासपूर्ण उत्कृष्ट लेख. व भामटयांना सणसणीत चपराक देणारी. तुम्हाला प्रणाम भाऊ

    ReplyDelete
  8. जनतेच्या उरापाशी नव्हे तर उरावर बसून 10 वर्ष खान्ग्रेसने भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार केला.

    ReplyDelete
  9. भाऊ ज्या दिवशी देशातून कांग्रेस आणि तिची सडकी, कुजकी, स्वार्थी विचारसरणी संपेल तो देशाचा सुवर्णकाळ असणार आहे. लोकांना कळत नाही अस नाही, पण सक्षम पर्याय देखील गरजेचा असतो. और अब मोदी है तो मुमकिन है. कांग्रेस चा हा शेवट असावा हीच भगवंत चरणी प्रार्थना. देश हितासाठी कांग्रेस संपण फार गरजेच आहे. सत्ता म्हणजे फक्त राजकारण नसत शेवटी.

    ReplyDelete
  10. Bhau Mahabharatat Shakuni mamache uddishta kauravanchaa vinash hech hote mhanun to aapale rajya sodun Hastinapurat yeun rahilaa hotaa. Aadhunik Shakunimamaa tech karatayat

    ReplyDelete
  11. मोदींना शिव्या द्यायची विरोधकां मध्ये अहमहिका लागली आहे व अर्थातच काँग्रेस आघाडीवर आहे.पराभव समोर स्पष्टपणे दिसायला लागल्यावर पायरी सोडून पंतप्रधान पदाचा मान न ठेवता अत्यंय हीन पणे अपमान करणे सुरु आहे.ममता तर मोदींना पंतप्रधान मानायला तयार नाही मोदींचा फोन घ्यायला पण तयार नाही. एवढा माज कुठुन येतो? भाउ बहिण जोडगोळी बद्दल बोलायलाच नको. प्रियांका मोदींना उद्देशुन महाभारतातले दाखले देताना स्क्रिप्ट लिहून दिल्याचे जाणवत होते.मोदींनी जेव्हा राजिव गांधीचा भ्रष्टाचारी नं.१ म्हणून उल्लेख केला तेव्हा काँग्रेस व गांधी परीवाराच्या नाकाला मिरच्या झोंबल्या एकच गदारोळ केला.काही बुद्धिमान विचारवंत व काँग्रेसच्या तुकड्यावर जगणाऱ्या पत्रकारांनी मोदींनी मृत पंतप्रधानाचा अपमान करुन पायरी सोडली म्हणून गळे काढायला सुरुवात केली.मोदींनी संयम सोडल्यावर तोंड उघडले ते आता गांधी परीवाराला जडःजाणार आहे.राजिव गांधीनी पंतप्रधान असताना सहकुटुम्ब सहली साठी परदेशी पाहुणे सोबत घेउन INS विराट युद्ध नौकेचा व सैन्य दलाचा वापर केला हे निवडणुकिच्या उरलेल्या २ फेर्यांमध्ये काँग्रेसला जड जाणार आहे.शांत असलेल्या मोदी नावाच्या वाघाला डिवचण्याची चुक गांधी भावंडांनी केली ते अंगाशी येणार आहे.

    ReplyDelete