Sunday, November 24, 2013

न मावळलेला काळा दिवस



  २६/११ ही आता कॅलेन्डरवरली एक सोहळ्याची तारीख होऊन राहिली आहे. पाच वर्षे झाली आणि त्या दिवशी जे घडले त्या जखमांवर फ़ुंकर घालण्याचा सोहळा साजरा करण्याची एक तारीख, यापेक्षा त्या आकड्यांला फ़ारसा अर्थ उरलेला नाही. अर्थात असे शेकडो लोक आहेत, ज्यांच्या जखमा अजून ओल्या आहेत, त्यांच्यासाठी तीच एक तारीख संपुर्ण उर्वरित आयुष्य होऊन गेलेले आहे. कारण त्या शेकडो लोकांचे आयुष्यच त्यातून अस्ताव्यस्त, उध्वस्त होऊन गेलेले आहे. बाकीच्या जगासाठी पाच वर्षे उलटली तरी हे शेकडो लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी तो काळवंडलेला दिवस अजून मावळलेलाच नाही. कारण त्यात कुणाच्या घरातला कर्ताधर्ता, कमावता वा कुटुंबाचा आधारस्तंभ जमिनदोस्त होऊन गेलेला आहे. कुणाचे बालपण हरवले आहे, कुणाच्या भविष्याच्याच स्वप्नांचा चुराडा झालेला आहे, तर कुणाला भविष्यच उरलेले नसून केवळ भूतकाळच त्यांच्या भोवती पिंगा घालतो आहे. पण बाकीचे जग २६/११ विसरून पुढे आलेले आहे. आज त्याच मुंबईला सचिन निवृत्त झाल्याने कुणाचे क्रिकेट बघायचे, अशी चिंता पडलेली आहे. कुणाला कांदा, टोमॅटोच्या किंमतीने सतावले आहे, तर कुणाला इतर आणखी कुठल्या समस्या भेडसावत आहेत. पण कोणी कसाब पुन्हा आपल्या साथीदारांना घेऊन येईल आणि आपल्या स्वप्नांचा वा आयुष्याचा चक्काचूर करून टाकील, याची फ़िकीर आपल्याला उरलेली नाही. या स्वप्नांच्या व कल्पनांच्या गर्दीत आपण थोडेफ़ार उदार होतो आणि कुणा हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे, साळसकर, अशोक कामटे यांना वहाण्याचा श्रद्धांजलीचा उपचार उरकून घेतो. तो उपचार उरकण्याच्या दिवसाला आता २६/११ म्हणतात. बाकी त्या दिवसाला किंवा तारखेला विशेष महत्व उरलेले नाही.

   पण खरे सांगायचे, तर त्या तारखेला ज्यांचे नुकसान व्हायचे वा विध्वंस व्हायचा तो होऊन गेलेला आहे. कदाचित तशा स्थितीत हे लोक पुन्हा सापडण्याची वा त्यांच्यावर पुन्हा ती वेळ येणार सुद्धा नाही. पण जे आपण बाकीचे त्यातून सहीसलामत निसटलो, म्हणून विसरून गेलो त्या घटनाक्रमाला, त्या प्रत्येकासाठी तशा अनुभवाचा धोका मात्र कायम टांगल्या तलवारीसारख्या आपल्या डोक्यावर घिरट्या घालतो आहे. झाले ते मुंबईत, आपण पुणेकर कसे सुरक्षित असे वाटायचे, त्यांना जर्मन बेकरी वा जंगली महाराज रोडवरच्या स्फ़ोटांनी त्या फ़सव्या सुरक्षिततेची प्रचिती घडवली. दहशतवाद किंवा जिहादी मानसिकता जगाला कशी कवेत घेते आहे, त्याचे सर्वात विदारक चित्र २६/११ रोजी मुंबईकरांनी जवळून अनुभवले. पण उर्वरित जगाने त्याचे चित्रण व थेट प्रक्षेपणही बघितले ना? मग त्याची दाहकता विसरून आपल्याला सुरक्षिततेच्या भ्रामक जगात जगता येईल काय? साळसकर करकरे यांना शहीद व्हायला लागले ते कोणासाठी हे विसरून चालेल काय? त्यांचा बळी ज्या कारणांनी घेतला, त्यापासून मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत अशा विस्मृतीतून आपण भविष्यातल्या कसावांना प्रोत्साहन देत असतो; हे विसरता कामा नये. दुर्दैवाने आपण नेमके तेच करीत आहोत, कारण कसाबला फ़ाशी दिले गेले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, अशा भ्रमाला कवटाळून आपण जगत आहोत. पण कसाब सारखे नरभक्षक घडवणारी व त्यांना आपल्यावर सोडणारी प्रवृत्ती आजही सुखरूप आहे, नवे कसाब घडवले जातच आहेत, त्यांच्या मनात विष कालवून त्यांना निरपराधांच्या हिंसेसाठी सज्ज केले जात आहे. पण त्याविषयी बेफ़िकीर असलेल्या शासनव्यवस्थेला आपण तरी किती जाब विचारला आहे? मग आपली सुस्ती नव्या कसाबांना प्रोत्साहनच नाही काय?

   कुठल्या दंगलीनंतर मुस्लिम तरूण अस्वस्थ होऊन पाकिस्तानचे हस्तक होतात किंवा त्यांच्यात पाकिस्तानचे हस्तक घुसून त्यांना हिंसाचाराला चिथावण्या देतात; असली मखलाशी केंद्रीय मंत्री असताना शरद पवार करतात. राजकीय हेतू साधण्यासाठी सत्ताधारी कॉग्रेसचा उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी त्याबद्दल उघड बोलतात. तेव्हा ते धोका सांगत असतात, की नव्या यासिन भटकळ वा टुंडाला पाकिस्तानी हस्तक वा जिहादी होण्याला प्रेरणा देत असतात? कधीतरी गंभीर होऊन आपण अशा राजकीय वक्तव्याचा निदान आपल्या जीवनावर होणारा परिणाम म्हणून विचार करणार आहोत किंवा नाही? कारण असल्याच राजकीय भामटेगिरीने जगभरच्या मुस्लिम तरूणांना हिंसाचारी जिहादचे घातपाती बनायला चिथावण्य़ा दिलेल्या आहेत. राहुल वा पवार मुस्लिमांच्या मतासाठी अशी भाषा बोलत असतात, पण त्याचा परिणाम पुढे कसाबच्या हिंसाचारामध्ये होत असतो, ज्याचे परिणाम २६/११ सारख्या घटनांमधून सामान्य भारतीय नागरिकांना भोगावा लागत असतो. आज दुर्गम भागातल्या मुस्लिम तरूणांचा घातपातातील सहभाग पाटण्यातील स्फ़ोटाच्या तपासातून समोर आलेला आहे. त्यांना आपल्या पापात ओढायचे प्रयास पाकिस्तानने नक्कीच केले असतील. पण सूडाची भाषा व प्रेरणा त्यांच्या डोक्यात पवार-राहुल यांच्या वक्तव्यातून घातली जात नसते काय? या चिथावणीखोरांना कायदा रोखू शकत नाही. पण मतदानातून आपण सामान्य माणसेच अशा नेत्यांना बाजूला करून २६/११ च्या शक्यता निर्माण करणार्‍या राजकारणाला पायबंद घालू शकत असतो. ते आपण करणार नसू; तर मग २६/११ एक तारीख होऊन जाते, एक उपचार बनून जातो, आपणच बेफ़िकीर बधीर होतो, तेव्हा आपल्याइतका आपला अन्य कोणी भयंकर शत्रू असू शकत नसतो.

No comments:

Post a Comment