Wednesday, November 27, 2013

बलात्कार सेक्युलर असतो?



  लौकरच त्या घटनेला वर्ष पुर्ण होईल. राजधानी दिल्लीत एका रात्री धावत्या बसमध्ये सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर देशभर एकच काहूर माजले होते. हमरस्त्यावरून फ़िरणार्‍या बसमध्ये अशी घटना घडते, याचाच सार्वत्रिक संताप व्यक्त झाला होता. रस्त्यावर उतरून हजारोच्या संख्येने नागरिक निषेध व्यक्त करत होते. शेवटी लौकरच त्यातल्या बहुतेक आरोपींना पोलिसांनी शोधून काढले होते. पण पुढे निदर्शने व राजकारणाचा जोश सुरू झाला आणि अत्यंत महत्वा्चे अनेक मुद्दे बाजूला पडले होते. त्यातला एक मुद्दा होता या बलात्कारी आरोपींना तिहार तुरूंगात आलेला अनुभव. पोलिसांनी त्यांना शोधून धरपकड केल्यावर तिहार तुरूंगात ठेवलेले होते. पण त्यांच्या गुन्ह्याच्या बातम्या तुरूंगातही पोहोचल्या होत्या. तेव्हा तिथल्या कैद्यांनी या बलात्कार्‍यांना बेदम मारहाण केली होती. सहाजिकच त्यांना वेगळे काढून स्वतंत्र कोठडीत ठेवले गेले. त्यापैकी प्रमुख आरोपीने पुढे गळफ़ास लावून तुरूंगातच आत्महत्या केलेली होती. उलट तेजपालकडे बघा. तो त्या मुलीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवतो आहे. या दोन घटनांचा त्या वादळात फ़ारसा उहापोह झाला नव्हता. पण आपल्या समाजातील ढोंगबाजीचे मुखवटे टरटरा फ़ाडणार्‍या अशाच या दोन घटना होत्या. आपल्यासारखेच गुन्हेगार असणार्‍या इतर कैद्यांनी त्या बलात्कार्‍यांना कशाला अशी मारहाण करावी? त्या प्रमुख आरोपीने स्वत:ला गळफ़ास लावून आत्महत्या कशाला करावी? बाकीच्या कायदेशीर किंवा राजकीय गोष्टींपेक्षा हेच त्यातले महत्वाचे मुद्दे होते. आपण ज्यांना कायदा धाब्यावर बसवणारे गुन्हेगार गुंड म्हणतो किंवा हिणवतो; त्यांचीही काही नितीमूल्ये असतात. त्यांचे हे गुन्हेगारही सोवळेपणाने पालन करीत असतात. उलट ज्यांना आपण सुसंस्कृत सभ्य म्हणतो, हे लोक सभ्यतेचे निव्वळ सोंग आणत असतात, त्याचाच हा पुरावा असतो.

   या कैद्यांनी त्या बलात्कार्‍यांना असे बेदम कशाला मारावे? तर त्यांच्या गुन्हेगारी जगात खुन मंजूर आहे, पण बलात्कार मंजूर नसतो. त्या कैद्यांनाही असे बलात्कारी म्हणजे आपल्यात घुसलेली वा आणून ठेवलेली श्वापदे वाटली, जनावरे वाटली आणि त्या कैद्यांना तशीच पाशवी वागणूक दिली गेली. सभ्य समाजात त्या वागणूकीला भले आपण असभ्य वा पाशवी कृती म्हणू. पण गुन्हेगारी जगालाही बलात्कार पाशवी वाटतो आणि असह्य वाटतो, याचीच ती साक्ष होती. त्यांच्या तुलनेत राजधानी दिल्लीतील बुद्धीमंत सुसंस्कृत माणसांकडे आपण बघू शकतो. ‘टहलका’चा संपादक तरूण तेजपाल याने एका समारंभात आपल्या सहकारी महिलेशी जे अश्लिल वर्तन केले व बलात्काराचा प्रयास केला; त्यानंतर दिल्लीतल्या सभ्य समाजाची प्रतिक्रिया काय आहे? कुठल्याही गल्ली वा भागात अशी घटना घडल्यावर पांडित्य सांगणारे हेच बुद्धीमंत; आज तेजपालला पाठीशी घालताना दिसत आहेत. त्यापैकी कोणाला त्या तेजपालला शोधून जोड्याने मारावा असे वाटलेले नाही. उलट मखलाशी करण्यासाठी बुद्धी पणाला लावली जात आहे. मग आपण कोणाला सभ्य मानणार आहोत? जे बलात्कारही आपल्या मैत्रीसाठी पाठीशी घालतात, त्यांना आजकाल सभ्य म्हणून मिरवायची सोय झाली आहे. त्याचीच साक्ष गेल्या आठवडाभरात दिल्लीच्या अनेक सेक्युलर बुद्धीमंतांनी दिली आहे. गुजरातच्या कुणा मुलीवर पोलिसांनी पाळत ठेवली म्हणून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करायला खास पत्रकार परिषद घेणार्‍या कॉग्रेसच्या महिला नेत्यांना टहलका प्रकरणात साधी प्रतिक्रियाही द्यावीशी वाटलेली नाही. आणि दुसरीकडे जामीनासाठी केलेल्या अर्जात तरूण तेजपालने त्यांच्या सेक्युलर विचारांची व्याख्याच केली आहे.

   आपण नेहमी भाजपाच्या जातीयवादी चेहर्‍यावरचे मुखवटे फ़ाडायचे ‘सेक्युलर’ काम केले. म्हणून त्याच पक्षाने आपल्या विरोधात कारस्थान करून बलात्काराच्या आरोपात आपल्याला गोवले आहे, असे हा तेजपाल कोर्टाला सादर केलेल्या अर्जात म्हणतो. त्याचा अर्थ काय होतो? ज्या गुन्ह्याची तेजपालने स्वत:च पिडीतेला पत्र लिहून कबुली दिली आहे, ते सेक्युलर कार्य होते काय? बलात्कार सेक्युलर असतो काय? बलात्कारात जातीयवादी व सेक्युलर असा भेदभाव असतो काय? नसेल तर जे स्वत:ला सेक्युलर म्हणतात, त्यांनी तेजपालच्या विरोधात आवाज कशाला उठवलेला नाही? कुठेही किरकोळ दुर्घटना घडली वा अन्य काही गुन्हा घडला; मग आपण भारतीय वा हिंदू असल्याची शरम वाटते, असला शहाजोगपणा करणार्‍यांची वाचा आज कशाला बंद आहे? तेजपाल याने बलात्काराच्या प्रयत्नालाही सेक्युलर कार्य ठरवल्य़ानंतर या तमाम सेक्युलरांना तो युक्तीवाद अभिनामास्पद वाटलेला आहे काय? नसेल तर त्यांनी मौन कशाला धारण केले आहे? त्यांना आपल्यातला एक सेक्युलर असा पाशवी गुन्हेगार निघाल्याची अजून लाज कशाला वाटलेली नाही? त्यांना तेजपालच्या अशा युक्तीवादाने आपली अब्रु गेल्यासारखे कशाला वाटलेले नाही? त्यांनी समोर येऊन तेजपालचा निषेध कशाला केलेला नाही? कसे करतील? त्यांनाही हेच ‘मोठ्या प्रतिष्ठेचे कार्य’ वाटत असेल, तर मौन पाळायलाच हवे ना? नेहमीच असे घडत असेल, तर त्याची लाज कशाला वाटायची? यांच्यापेक्षा त्या तिहार तुरूंगातले ते खतरनाक गुन्हेगार कैदी अधिक सभ्य व विश्वासू नाहीत काय? त्यांना पाप-पुण्याची निदान चाड तरी आहे. इथे तेजपाल व त्याचे सेक्युलर सहकारी बलात्कारालाही आपले पवित्र कार्य समजतात. त्यांना शरम कशाला वाटावी?

1 comment:

  1. निस्तेज मिडिया, ऊद्धट तेजपाल.

    ReplyDelete