Friday, December 26, 2014

सेक्युलर शब्दाला लोक का कंटाळलेत?



गेल्या संपुर्ण वर्षभरात एकामागून एक पराभव पचवताना कॉग्रेस पक्षाचे पुरते खच्चीकरण झाले असून श्रेष्ठीही गोंधळून गेले आहेत. त्यामुळेच लोकसभेनंतरच्या चार विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्ष नुसता पराभूतच झाला नाही, तर लढू सुद्धा शकलेला नाही. आपले काय चुकले किंवा कुठे चुकले, याचा शोध घेण्य़ाची इच्छाही त्या पक्षाच्या नेत्यांना गेल्या सहा महिन्यात झाली नव्हती. त्या दिशेने आता निदान पहिले पाऊल पडलेले दिसते आहे. कॉग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी अशी झाली आहे का, याची चाचपणी करायचे नेतृत्वाने ठरवले असल्याची बातमी त्याचाच पुरावा आहे. आजपर्यंतच नव्हेतर कालपरवाच्या विधानसभा निवडणूकांपर्यंत, ज्या पक्षाचे नेते व प्रवक्ते भाजपावर हिंदूत्वाचा आरोप करून मतांचा जोगवा मागत होते, त्यांना प्रथमच हिंदू मतांची किंमत कळू लागल्याचे ते लक्षण आहे. किंबहूना लोकसभेतील पक्षाचे अपयश त्यांना पंतप्रधान मोदींची चलाखी वाटली होती. म्हणूनच कालपर्यंत मोदी मार्केटींग उत्तम करतात, अशीच प्रतिक्रिया प्रत्येक निकालानंतर आलेली होती. पण गेल्या वर्षभरात प्रत्येक लढतीमध्ये कॉग्रेसचा दारूण पराभव झाला, तो नुसत्या मार्केटींग वा प्रचाराने शक्य झाला नव्हता. त्याला कॉग्रेसची सेक्युलर प्रतिमा कारणीभूत झालेली आहे. म्हणूनच एकट्या कॉग्रेसचा पराभव झालेला नाही, तर त्याच्याच सुरात सुर मिसळून सेक्युलर भजने गाणार्‍यांचा पराभव झालेला आहे. कारण त्या सेक्युलर शब्दाला लोक कंटाळले आहेत. त्यातल्या दांभिकतेवर लोक वैतागले आहेत. ज्या अर्थाने वा ज्या संदर्भाने गेल्या काही वर्षात सेक्युलर हा शब्द वापरला गेला, त्याला लोक कंटाळले आहेत. त्या शब्दाचा तिटकारा लोकांना आलेला आहे. कारण तो शब्द आता हिंदूद्वेषाला पर्यायी शब्द बनला आहे. याचा साक्षात्कार कॉग्रेस पक्षाला आधी झाला असता, तर त्याच्यावर इतकी नामुष्कीची वेळच आली नसती.

पण हिंदीत म्हणतात ना, देरसे आये दुरुस्त आये. अजून वेळ गेलेली नाही. आपल्या चुका शोधणे व दुरुस्त करणेही सावरण्याचा एक मार्ग असतो. कॉग्रेसची हिंदूविरोधी ही प्रतिमा, त्या पक्षाला महागात पडलीच. पण त्याहीपेक्षा सेक्युलर या नावाखाली कोणतीही पापे झाकण्याचा जो उद्योग मागल्या दहा वर्षात झाला, त्यावर उमटलेली ही संतप्त प्रतिक्रिया आहे. डझनावारी घोटाळे होऊन अब्जावधी रुपयांची लुट झाली. पण जेव्हा त्याच्या विरोधात उभे रहायची वेळ आली, तेव्हा बहुतेक सेक्युलर पक्षांनी घोटाळ्यांचे समर्थन करत कॉग्रेसच्या पाठीशी उभे रहाण्याची पळवाट शोधली. त्यातून एकच संदेश हे सगळे सेक्युलर लोक सामान्य जनतेपर्यंत पोहोचवित होते. सेक्युलर म्हणून भ्रष्टाचार सहन करा किंवा हिंदूत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार निपटून काढा. पर्यायाने सेक्युलॅरिझम म्हणजे भ्रष्टाचार व पापांवरचे पांघरूण; अशी एक प्रतिमाच जनमानसात प्रस्थापित केली गेली. मोदींनी त्याचा फ़क्त लाभ उठवला. जो कोणी कॉग्रेसी भ्रष्टाचार व अनागोंदीच्या विरोधात उभा राहिला, त्याच्यावर हिंदूत्व वा संघाचा शिक्का मारण्याच्या सोप्या उपायाने, हे दुर्दैव सेक्युलर पक्षांवर ओढवले आहे. बाबा रामदेव किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलने व चळवळी संघाच्या नव्हत्या. भले त्यामागे संघाची सहानुभूती असेल, पण त्यात थेट संघ वा भाजपा सहभागी नव्हता. ह्या दोघांनी जनतेच्या भावनेला हात घातला होता. कारण लोकांना बोचणार्‍या विषयांना घेऊन ती दोन आंदोलने उभी राहिली होती. त्यांच्याविषयी अफ़वा पसरवण्यात सेक्युलर पुढे होते. त्यातून कोणता संदेश लोकांना मिळाला? भ्रष्टाचार म्हणजे सेक्युलॅरिझम. कारण कॉग्रेस कुठलेही सेक्युलर काम करत नव्हती, की सेक्युलर धोरण राबात नव्हती. भाजपाही हिंदूत्व पुढे रेटत नव्हती. अशा विषयात अलिप्त रहावे इतकीही अक्कल सेक्युलर शहाण्यांनी वापरली नाही. त्याचा विपरीत परिणाम आज दिसतो आहे.

सेक्युलर शब्दाची व्याख्या कोणती असा प्रश्न कुणाही सामान्य माणसाला विचारला, तरी तो सांगेल हिंदूंच्या भावना दुखावणे म्हणजे सेक्युलर. त्याची अशी समजूत एकट्या कॉग्रेसने करून दिलेली नाही. रामगोपाल वर्मा किंवा तत्सम कोणी अकारण सामान्य हिंदूंच्या श्रद्धा वा भावनांशी खेळ केल्यास, तमाम सेक्युलर सर्व ताकद पणाला लावून त्याच्या पाठीशी उभे रहातात, तेव्हा त्यातून कोणता संदेश देत असतात? दुसरीकडे तस्लिमा नसरीन सारख्या कुणा लेखिकेने इस्लामविषयी असेच काही वक्तव्य केल्यावर ती एकटी पडते. तिच्या पाठीशी किती सेक्युलर उभे रहातात? उलट तिच्या समर्थनाला हिंदूत्ववादी उभे राहिलेले दिसतात. तेव्हा सेक्युलर म्हणजे हिंदूविरोध असा संकेत धाडला जात असतो आणि दुसरीकडे लालू, मुलायम, कॉग्रेसचा भ्रष्ट कारभार म्हणजे सेक्युलर, अशी सांगड अनवधानाने घातली जात असते. त्याचा एकत्रित परिणाम आपण जनमानसातील प्रतिमेमध्ये बघू शकतो. एका बाजूला भ्रष्टाचार आणि दुसरीकडे सेक्युलर ‘एकजुट’, यातून लोकमानस आकार घेत असते. कुठल्याही टिव्हीवरल्या चर्चेत अगत्याने कुणा मौलवी फ़ादरला आमंत्रण असते. तिथे असे धर्ममार्तंड मोठ्या आवेशपुर्ण भाषेत आपल्या धर्मपरंपरा व रितीरिवाज यांचे गुणगान करीत असतात. तरी त्यांच्या मुलाखती घेणारा त्याबद्दल खोचक प्रश्न विचारणार नाही. पण त्यात कोणी हिंदू महंत असला, तर त्याची खिल्ली उडवली जात असते. मजेची गोष्ट म्हणजे हे मौलवी-फ़ादर तिथे सेक्युलर ‘एकजुटी’ची भाषा बोलत असतात. त्यातून लोकांना काय उमगते? हिंदूंच्या विरोधातली एकजुट म्हणजे सेक्युलर. अशा अनेक अनुभव व प्रचारांचा एकत्रित परिणाम मागल्या काही वर्षात लोकमानसावर झाला. त्यातून सेक्युलर म्हणजे हिंदूंच्या विरोधातली राजकीय एकजुट, ही धारणा तयार झाली. ती संघ भाजपाने करण्यापेक्षा दांभिक सेक्युलरांनी निर्माण केलेली दिसेल.

हिंदू एकजुट वा हिंदूत्वाने लोक इतकेच प्रभावित झाले असते आणि धर्मांध होऊ शकले असते, तर या देशा्चे कधीच हिंदूराष्ट्र होऊन गेले असते. जामा मशीदीचे वादग्रस्त शाही इमाम त्याची ग्वाही देताना म्हणतात, कुणा सेक्युलर नेता वा पक्षामुळे हा देश सेक्युलर राहिलेला नाही. हिंदू बहुसंख्य आहेत म्हणूनच भारत सेक्युलर राहू शकला आहे. याचा दुसरा अर्थ असा, की बहुसंख्य हिंदू नसते आणि अन्य धर्मिय असते; तर हा देश सेक्युलर राहू शकला नसता. हेच भारताचे वास्तव आहे. याचाच मतितार्थ असा, की जोवर भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत कोणीच त्याला धर्माधिष्ठीत राष्ट्र बनवू शकणार नाही. किंबहूना धर्मनिरपेक्ष भारत राखायचा असेल, तर तिथे कायम हिंदूच बहुसंख्येने असतील याची काळजी घ्यायला हवी. तिथे गफ़लत झाली, मग भारताला धर्माधिष्ठीत राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. सारांश इतकाच, की भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठेवायचे असेल, तर तिथे कायम हिंदू बहुसंख्य असायला हवेत. तरच तिथे हिंदुत्वाचा वरचष्मा होऊ शकत नाही. आणि अन्य धर्मियांची बहुसंख्या नसल्याने तिथे अन्य धर्माचेही राष्ट्र निर्मण होऊ शकणार नाही. पण सेक्युलर म्हणून जर कोणी पद्धतशीरपणे हिंदुंची लोकसंख्या कमी करू बघत असेल, तर मात्र या देशाला सेक्युलर वा धर्मनिरपेक्ष राखण्या्तच धोका निर्माण होतो. तो थोपवायचा असेल, तर हिंदूंच्या धर्मनिरपेक्ष वृत्ती व लोकसंख्येचा वरचष्मा कायम राखणे भाग आहे. गेल्या काही वर्षात त्यालाच धोका निर्माण झाला, म्हणूनच हिंदू एकवटला आहे. बुद्धीवाद्यापांसून राजकारण्यंपर्यंत सगळे सेक्युलर विचारांच्या नावाखाली देशातला हिंदू संपवायला निघाले आहेत आणि पर्यायाने इथली धर्मनिरपेक्षताच धोक्यात आली आहे. अशी एक धारणा वाढीस लागली. त्याचा परिणाम आजच्या निवडणूक निकालातून दिसत आहे. जितका त्याच्या विरोधात हिंदूत्वाचे आक्रमण असा आरोप होईल, तितकी ती धारणा प्रभावी होऊन लोक मतांसह राजकीय अपरिहार्यता म्हणून सेक्युलॅरिझमच्या विरोधात एकजुट होत जातील.

1 comment:

  1. भाऊराव,

    भारतातला सेक्युलॅरिझम हिंदूंमुळे जिवंत आहे असं जमा मशिदीचे इमाम बुखारी म्हणून गेलेत त्या बातमीचा दुवा इथे आहे :
    http://www.rediff.com/news/2006/oct/28bukhari.htm

    धन्यवाद!

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete