Tuesday, February 6, 2018

नव्या मतदारसंघाची मांडणी?

Image result for raj bhujbal

निवडणूका जवळ आल्या, मग ‘मतदारसंघाची’ फ़ेरमांडणी सुरू होत असते. हा ‘मतदारसंघ’ कुठल्या एका उमेदवाराचा किंवा पक्षाचा नसतो, तर सत्ते़ची गणिते जुळवणारा मतदारसंघ असतो. म्हणजे जो समाज विविध समाजघटकात किंवा राजकीय गटात विभागलेला असतो, त्याचे तुकडे जोडून कुठली गोधडी शिवता येईल, त्याची चाचपणी सुरू होत असते. त्यात अर्थातच पराभूत वा नामोहरम झालेल्यांची गर्दी असते. मागल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीने अनेक जुनी राजकीय समिकरणे उध्वस्त करून टाकलेली आहेत. मागल्या दोन दशकातल्या अनेक राजकीय गणितांचा बोर्‍या वाजवलेला आहे. सहाजिकच त्या मांडणीला विचारधारा वा वैचारिक भूमिका असे नाव देऊन आपापले तंबू थाटुन बसलेल्यांना उघड्यावर पडण्याची वेळ आणली. महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी वा बहुजन नेत्यांचे किंवा त्यांच्या समिकरणाचे तेच झाले आहे. त्याला आता साडेतीन चार वर्षे होत आली असून नव्या निवडणूक मोसमाचे वेध सर्वांनाच लागलेले आहेत. त्यातून नव्या सोयरिकी जमवण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भुजबळ समर्थकांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली, त्याकडे बघणे भाग आहे. अशा भेटीगाठी सुरू झाल्या, म्हणजेच त्या त्या नेत्यांना व गटांना निवडणूकीचे वेध लागले म्हणून समजायला हरकत नाही. मागले २१ महिने तुरूंगात जामिनाच्या अभावी खितपत पडलेले छगन भुजबळ यांचा अपराध इतका भयंकर नाही, की त्यांना सुनावणीशिवाय गजाआड इतके दिवस डांबून ठेवले पाहिजे. पण तसे झालेले आहेत आणि कोणाला त्यांची फ़िकीरही उरलेली नाही. सहाजिकच त्यांच्या ज्येष्ठ पक्षनेत्यांकडे पाठ फ़िरवून अशा समर्थकांनी आपापले प्रयास भुजबळ सुटकेसाठी आरंभलेले आहेत. त्याचा एक अर्थ भुजबळ व त्यांच्या समर्थकांचा आता साहेबांवर विश्वास उरलेला नसावा. भुजबळ `प्रचंड निराशावादी' झाल्याची ही खुण असावी.

राज ठाकरेंची अशा भुजबळ समर्थक शिष्टमंडळाने घेतलेली भेट, म्हणूनच तितक्याच कारणास्तव असेल असे मानायचे कारण नाही. भुजबळ तुरूंगात खितपत पडल्याने निराश आहेत, तसेच खुद्द राज ठाकरे मागल्या विविध निवडणूकीतल्या पराभवांनी मागे पडलेले आहेत. अर्थात अशा पराभवांनी निराश झाल्याची कुठलीही खुण त्यांनी आजवर दाखवलेली नाही. पण आरंभापासून त्यांच्या सोबत राहिलेल्या अनेक निष्ठावंतांनी साथ सोडल्याने आणि मतदारांनीही काहीशी पाठ फ़िरवल्याने, राज प्रचलीत राजकारणात मागे पडलेले आहेत. त्यातून त्यांना नव्याने सावरून उभे रहायचे आहे आणि भुजबळ यांना तर बंदीवासातून बाहेर पडायचे आहे. पण त्यांचा यथेच्छ राजकीय वापर करून घेतलेले शरद पवार त्यासाठी कुठलीही हालचाल करीत नाहीत. याची खात्री पटल्यावरच भुजबळांनी आपल्या समर्थकांना अन्य प्रयत्न करण्यासाठी बाहेर काढलेले असावे. पावणे दोन वर्षापुर्वी प्रथम भुजबळ यांना अटक झाली, तेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी फ़ोडलेल्या डरकाळ्या हवेत विरून गेल्या असून भुजबळांना त्यांचाच राष्ट्रवादी पक्ष पुरता विसरून गेला आहे. पण भुजबळ असोत किंवा नारायण राणे असोत, हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आपला लढावू बाणा गमावून बसलेले नाहीत. त्यांना थोडी संधी मिळाली तरी पुन्हा उफ़ाळून राजकारणात झेपावण्याची क्षमता त्यांच्यात उरलेली असते. त्याच भावनेतून भुजबळांनी आपले समर्थक मनसेच्या प्रमुखांकडे पाठवलेले नसतील, अशी हमी कोणी देऊ शकत नाही. शिवाय व्यंगचित्रकार म्हणून पंचलाईनमध्ये भाष्य करणार्‍या राज यांचे त्याविषयीचे विधानही तसे ‘भूमिका’ स्पष्ट करणारेच आहे. भुजबळ छोडो आंदोलन हा शब्दप्रयोग योजला हे लक्षात घेतले पाहिजे. दुसर्‍या बाजूला त्याचा अर्थ भुजबळ (मनसे) जोडो  असाही काढला जाऊ शकेल. तशी शक्यताही राजकारणात वेगळा संदर्भ निर्माण करू शकेल.

नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक तरूणांना बाळासाहेबांनी उचलून थेट लढाईच्या रणांगणात सोडलेले होते. पाठीशी नुसते बाळासाहेब आहेत, इतक्या बळावरच या तरूणांनी मैदान गाजवलेले होते. आपल्या पाठीशी पक्षप्रमुख ठामपणे उभा असला, तर कुठलेही मैदान मारायला धडक देऊन पुढाकार घेणार्‍यात अशा नेत्यांची गणना होत असते. खुद्द राज ठाकरेही त्याला अपवाद नाहीत. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर कुठलाही नाव घेण्यासारखा नेता हाताशी नसताना राज यांनी आलेल्या प्रत्येक  निवडणूकीत जाणत्यांचे डोळे दिपवणारी झेप घेतली होती. राज्यातील एक स्वयंभू नेता म्हणून मजल मारलेली होती. मध्यंतरीच्या मोदीलाटेने त्यांचाही धुव्वा उडालेला असला म्हणून त्यांची किमया संपली, असे कोणी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेचे हे त्रिकुट मुसंडी मारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि राज यांच्या सोबत भुजबळ वा राणे यांनी हातमिळवणी करायची ठरवली, तर महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेना यांच्या पलिकडे तिसरा मजबूत पर्याय उभा राहू शकतो. मरगळलेली कॉग्रेस आणि दिशा हरवून बसलेला राष्ट्रवादी पक्ष, यांच्या निष्क्रीयतेने राजकारणात विरोधी पक्षाच्या जागेसाठी मोठी पोकळी निर्माण करून ठेवलेली आहे. ती भरून काढणारा कोणी राजकीय पक्ष समोर येण्याच्या प्रतिक्षेत लोकही आहेत. राजनी मनावर घेतले तर भुजबळ छोडो हा मोठा राजकीय मुद्दा होऊ शकतो आणि त्यातून वेगळ्याच राजकीय समिकरणाला महाराष्ट्रात आरंभ होऊ शकतो. कारण आजही भुजबळ हाच महाराष्ट्रातला ओबीसी चेहरा आहे आणि त्याच भुजबळांचा तुरूंगवास हा राज्यव्यापी कळीचा मुद्दा करणे सोपे काम आहे. त्यात मनसे व भुजबळ समर्थक उतरले, तर राष्ट्रवादीसह सर्व़च पक्षांना आपला ओबीसी मतदारसंघ आवाक्यात राखणे अशक्य होईल. पण हा जरतरचा विषय आहे आणि तो या दोन्ही गटांच्या मनात आहे किंवा नाही, याची आज कोणी हमी देऊ शकत नाही.

दुसरीकडे नारायण राणे यांची भाजपाच्या बोटचेप्या डावपेचांनी कोंडी करून टाकलेली आहे. तोही दुखावलेला जखमी वाघ या विषयात उडी घेऊन पुढे आला, तर मराठी राजकारणाला वेगळे वळण लागण्यास हरकत नाही. या तिन्ही राजकीय नेत्यांना आजतरी गमावण्यासारखे काही नाही. विधानसभा असो वा लोकसभा, पालिका असोत की विविध स्थानिय संस्था असोत. त्यात या तिन्ही नेत्यांना गमावण्यासारखे काहीच नाही. पण वेगवेगळे त्यांचे विखुरलेले राजकीय बळ व इच्छाशक्ती एकत्र आली, तर मोठा राजकीय धमाका व्हायला वेळ लागणार नाही. अर्थात त्यांचे रसायन जुळायला व एकजीव व्हायला, काही अवधी द्यावा लागेल. कारण नुसती आघाडी करून चालणार नाही, तर त्यांनी एक पक्ष व एक भूमिका म्हणून एकत्र यायला हवे. लोकसभेला अजून १५ महिने आहेत आणि विधानसभेला २० महिने बाकी आहेत. हा अशी जुळणी यशस्वी व्हायला पुरेसा अवधी आहे. म्हणूनच अचानक भुजबळ समर्थक कृष्णकुंजावर पोहोचण्याला राजकीय अर्थ असू शकतो. समर्थक भुजबळांना विचारल्याशिवाय असे काही पाऊल उचलण्याची बिलकुल शक्यता नाही आणि भुजबळ छोडो हे राजचे शब्द सुचक आहेत. त्यातच राणे यांची घालमेल भर ठरायला वेळ लागणार नाही. आज विरोधी राजकारणात जी मोठी पोकळी तयार झाली आहे, ती भरून काढण्याची धडपड शरद पवार करीत आहेत. पण वय व प्रकृती त्यांच्या विरोधात आहे आणि अनेक गटात विखुरलेली विरोधी शक्ती एकत्र करण्याची क्षमता त्यांच्यापाशी उरलेली नाही. भुजबळांनाही त्याची जाणिव झालेली असल्याखेरीज त्यांनी असा पवित्रा घेतलेला नसावा. राज, भुजबळ व राणे यांनी एकत्र येण्याची कल्पना जरी मांडली गेली, तरी मराठी राजकारणात भूकंप झाल्याशिवाय रहाणार नाही. मात्र त्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी वेळ फ़ार कमी शिल्लक उरला आहे, हेही विसरता कामा नये.

4 comments:

  1. माशीप
    माजी शिवसैनिक पक्ष

    ReplyDelete
  2. नारायण राणे यांच्या विरोधात ' इ.डी ' कडे केसेस तयार आहेत असे बोलले जाते. त्याच्यापासून सुटका हवी असल्याने राणे ' बी.जे.पी ' च्या दरवाजात ताटकळत उभे आहेत. त्यामुळे हे त्रिकुट लवकर एकत्र येईल असे वाटत नाही.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    उत्तम विवेचन. माझ्या मते उद्धव ठाकऱ्यांनी राजना विश्वासात घ्यावे. तो खरा धमाका ठरेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. aase ghadave aase khup lokaana vathu shakel .pan haa bhramachaahi tharu shakel. ulat pakshi nakarletya kadun tech paryaay tharane aati kathin aahe.

    ReplyDelete