Thursday, February 8, 2018

पुरोगामी मनुवाद

No automatic alt text available.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका संपून आता दहा महिन्यांचा काळ उलटला आहे. त्या निवडणूकीत भाजपाने अपुर्व यश संपादन केल्यावर एक नवी राजकीय मोहिमच सुरू झालेली होती. त्यात निवडणूक आयोग व मतदान यंत्रावरच शंका घेण्याची स्पर्धा चालू झालेली होती. सर्वात आधी गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री व्हायला सज्ज असलेल्या मायावतींनी त्याचा उल्लेख केला. मुस्लिमबहुल भागातही भाजपा कसा जिंकू शकतो, याचे कोडे बहनजींना उलगडले नव्हते. तर त्यांनी तिथली मते भाजपाला मिळण्याची तांत्रिक सुविधा यंत्रात करून मतांची चोरी झाल्यासा खुला आरोप केला होता. विनाविलंब तो आरोप आम आदमी पक्षाचे निराश नेते अरविंद केजरीवाल यांनी उचलून धरला. त्यांना पंजाब आपल्या खिशात असल्याचा भ्रम झाला होता. पण तिथे सत्ताभ्रष्ट होऊनही अकाली दलाने समज दाखवली आणि प्रथमच लढूनही विरोधी पक्ष झालेल्या आम आदमी पक्षाने मतदान यंत्रात गडबड असल्याचा आक्षेप घेतला होता. पुढे जाऊन त्यांचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी प्रात्यक्षिकच सादर केले. त्याच्याही पुढे जाऊन निवडणूक आयोगाने यंत्र हाती दिल्यास त्यात गफ़लत करून दाखवण्याचे आव्हानही या पक्षाने दिलेले होते. अर्थात आयोगाने त्याचा जाहिर इन्कार केला. पण ठरल्या दिवशी ज्यांना हवे त्यांच्यासाठी असे यंत्र लोकांच्या साक्षीने देऊ असेही सांगितले होते. पराभव पचवण्याची शक्ती नसलेल्या बहुतेक पक्षांनी आपले आरोप चालू ठेवले. मात्र आयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचे आव्हान कोणी पेलू शकला नाही. आयोगाने ठरल्या दिवशी तशा प्रात्यक्षिकाची सुविधा दिलेली होती. पण एकही पक्षाचा प्रतिनिधी तिकडे फ़िरकला नाही. मात्र त्यानंतरही असे आरोप प्रच्छन्नपणे चालूच राहिले. आज राजस्थान व बंगालच्या पोटनिवडणुकीत त्याच यंत्रांनी भाजपाचे उमेदवार पराभूत करून दाखवलेले आहेत.

पराभव पचवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नसते त्यांना यशही पचवता येत नाही. म्हणून तर आम आदमी पक्ष असो किंवा इतर पक्ष असोत, त्यांनी मतदान यंत्रासह थेट निवडणूक आयोगावरही आरोप केले होते. अर्थात केजरीवाल हा मुळातच ताळतंत्र नसलेला माणुस आहे. २०१५ सालात दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणूक चालली असतानाही त्याने असाच बेछूट आरोप केलेला होता. पण प्रत्यक्ष मतमोजणी झाली तेव्हाचे निकाल धक्कादायक होते. कॉग्रेस सफ़ाचाट झाली आणि काही महिने आधी सर्व लोकसभा जागा जिंकणार्‍या भाजपालाही कशाबशा तीन जागा जिंकता आल्या. उरलेल्या ६७ जागा एकट्या आम आदमी पक्षाला मिळाल्या. तेव्हा मात्र केजरीवालने यंत्राविषयी चकार शब्द उच्चारला नाही. पण ती बाष्कळ बडबड कोणी मनावर घेतली नव्हती. मात्र १२०१७ च्या आरंभी उत्तरप्रदेश निकालानंतर मायावतींनी तो़च उच्चार केला आणि बाकीच्या पक्षांनी तो आरोप उचलून धरला. कारणही स्पष्ट होते. लोकसभेत भाजपाने मिळवलेले यश अनेकांना चमत्कार वाटला होता. मग तीन वर्षानंतर त्याचीच विधानसभेत पुनरावृत्ती झाल्याने सर्वांना त्याचे नवल वाटले होते. पण असेच चमत्कार यापुर्वीही झालेले असताना अशी भाषा निराशाग्रस्त भावनेची साक्ष होती. २००७ सालात कोणाला मायावती स्वबळावर बहूमत मिळवतील असे वाटले नव्हते आणि त्यांना ते यश मिळाल्यावर त्याला सोशल इंजिनीयरींगचे लेबल लावण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती समाजवादी पक्षाने २०१२ सालात केली, तेव्हा कोणाला मतदान यंत्राविषयी शंका आलेली नव्हती. मग भाजपाच्या २०१७ च्या यशाविषयी शंका घेण्य़ाचे काय कारण होते? कारण सत्तेत असूनही गोव्यात भाजपाने मते व जागा गमावल्या होत्या आणि तेच पंजाबमध्ये घडलेले होते. पण निराशाग्रस्तांना अपयश पचवता येत नसते. ते कोणी तरी बळीचा बकरा म्हणून शोधू लागतात.

उत्तरप्रदेश निकालानंतर त्या आरोपाची वारंवार पुनरावृत्ती होत राहिली. गुजरात विधानसभेच्या वेळी यंत्रावर शंका घेतल्या गेल्या. पण भाजपाच्या जागा घटल्यावर मात्र कोणी यंत्राविषयी बोलायला तयार नव्हता. आधीच्या चर्चा ऐकल्या तर भाजपाला नेहमी इतक्या जागा मिळाल्या तरी तो यंत्राचाच चमत्कार असेल असली भाषा वापरली जात होती. म्हणजे तर्कशास्त्र एकाच निकषावर चालत होते. भाजपाचा पराभव झाला तरच मतदान यंत्र व निवडणूक योग्य झाली, असा तो तर्क आहे. एकूण लोकशाही वा तिच्या व्याख्या अशा केल्या जात आहेत, की त्यात भाजपाला भाग घेता येईल. पण भाजपा जिंकू शकत नाही, त्याचे नाव लोकशाही असते. जिथे भाजपा जिंकेल तिथे लोकशाहीचा मुडदा पाडला जात असतो, हा आजकालचा पुरोगामी सिद्धांत झाला आहे. आताही राजस्थानमध्ये भाजपाने लोकसभेच्या दोन व विधानसभेची एक जागा गमावली आहे, तर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे सुखावले आहेत. त्यांनी भाजपाची विचारधारा संपुर्णपणे झिडकारली गेल्याचा दावा केला आहे. पण तो तर्क व्यक्त करताना त्यांना आपणही बंगालमध्ये दोन मतदारसंघात कुठल्या कुठे फ़ेकले गेलो, त्याकडे बघायची हिंमत झालेली नाही. मागल्या खेपेस म्हणजे २०१६ च्या आरंभी दोन वर्षापुर्वी नोवापारा ह्या कॉग्रेसने जिंकलेल्या जागी आता पोटनिवडणूक झाली, त्यात कॉग्रेसच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे. उलट तिथे भाजपाने मुसंडी मारून डाव्या आघाडीपेक्षा अधिक मते मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मग त्याला कॉग्रेसला मतदाराने पुर्ण झिडकारले असा घ्यायचा काय? आणि तसे असेल तर राजस्थानात त्या पक्षाने मिळवलेल्या विजयाचे काय करायचे? राहुलना राजस्थानातील आपल्या पक्षाचे यश पचवता आलेले नाही, इतकाच अशा प्रतिक्रीयेचा अर्थ होऊ शकतो.

नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून देशातील एकूण पुरोगामी लोकांचे डोके किती फ़िरलेले आहे, त्याची साक्ष यातून मिळते. त्यांना आपला पराभव किंवा विजयही पचवणे अशक्य होऊन बसलेले आहे. त्यामुळेच अशा बाष्कळ प्रतिक्रीया दिल्या जात असतात. पण म्हणूनच हे निमीत्त धरून मतदान यंत्रावर संशय घेणार्‍यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. उत्तरप्रदेश वा दिल्लीच्या पालिका मतमोजणीवर शंका घेत ज्यांनी यंत्राला दोष दिला होता, त्यांचा तर्क आता काय आहे? तेव्हा यंत्रांनी व आयोगाने गडबड केली असेल, तर आता त्यांनी भाजपाशी वैर पत्करले आहे काय? आता कॉग्रेसला यश मिळत असेल, तर त्या पक्षाने निवडणूक आयोगाला खरेदी केले आहे काय? नसेल तर लाखाच्या फ़रकाने राजस्थानात कॉग्रेस उमेदवार कसा जिंकू शकतो? उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी यंत्रात गडबड केलेल्या भाजपाने आताच त्यात गफ़लत करायचे का सोडलेले आहे? अशा प्रश्नांची उत्तरे या लोकांकडे मागितली पाहिजेत. पण ती मिळणार नाहीत. कारण त्यामागे एक साधा तर्क आहे आणि तोच पुरोगामी लोकशाहीचा निकष आहे. ज्यात पुरोगामी म्हणून लेबल लागलेल्यांनाच जिंकता येते आणि ज्यांच्यापाशी तशी पुरोगामी मान्यता नसेल, त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. पण स्पर्धा जिंकता येणार नाही. कर्ण वा पुराणातल्या असल्या कथा आठवतात? ज्यात पक्षपात वा वर्चस्ववादाचे प्रभाव दिसतात? त्याचा मनुवाद म्हणून निषेध करणारे़च आज पुरोगामी म्हणून त्याचे अनुकरण करताना दिसतील. आयडिया ऑफ़ इंडिया वा पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये भाजपा वा हिंदूत्वाला स्थान असू शकत नाही. हिंदुत्व अस्पृष्य आहे. त्याचा स्पर्शही निषिद्ध आहे. त्याचा स्पर्श होईल तेही आपली प्रतिष्ठा गमावून बसते. मग ते मतदान यंत्र असो किंवा निवडणूक आयोग असो. थोडक्यात आता पुरोगामी मनुवाद उदयास आलेला आहे.

4 comments:

  1. Bhau ha purogami manuwad asahishnu pan ahe.mi twitter war Wagle la etaranprane ugichach na chidwata nehami tarkane uttar dyache the na sahan houn mala block keley

    ReplyDelete
    Replies
    1. शर्वरीताई,

      त्याचं काय आहे की निखील वागळे हा इसम स्वत:पासून दूर पळंत सुटला आहे.

      भाऊरावांनी त्याला बजावलं होतं की, 'निखिल तू तोंडात विष्ठा असतांना श्रीखंड चघळतोय, सांगू नकोस, लोकांच्या ते जेव्हा लक्षात येईल, जेव्हा तुझे ढोंग उघडे पडेल, तुझे चाहते त्यानंतर औषधाला देखील उरणार नाहीत ....' (संदर्भ : http://www.vikrantjoshi.com/2017/07/blog-post_28.html )

      आज हेच शब्द इतके खरे ठरलेत की चाहते तर दूर पांगलेच, शिवाय वागळ्यांवर स्वत:पासून लांबवर पळायची भीषण वेळ आली आहे. अशा भगोड्याने तुम्हांस ब्लॉक केलं ते तुमचं भाग्यच आहे जणू !

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  2. अतिशय परखड मत. धन्यवाद भाऊ.

    ReplyDelete
  3. भाऊ, मालदीव आणि भारत आणि चीन ला तिथे असलेला रस याबद्दल सविस्तर लिहावं ही विनंती.

    ReplyDelete