Thursday, July 5, 2018

शिझोफ़्रेनिया, अर्थात भ्रमिष्टावस्था

Image result for lokpal

आमच्या मनात प्रथमपासून एक संशय होता. तो अण्णांच्या आंदोलनाच्या एकेका दिवसानंतर अधिक बळकट होत गेला. भारताची राज्यघटना ही कार्यकारी विभाग, कायदे मंडळ आणि न्यायसंस्था या तीन वेगवेगळया स्वायत्त खांबांवर उभी आहे. यामागे एक कल्पना आहे. जर एका घटकामध्ये घसरण झाली, तर दुसरा विभाग परिस्थितीला लगाम घालून देशाला सावरू शकतो. राज्यघटनेतील या व्यवस्थेमुळे स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, तरी देशात हुकूमशाहीचा उदय झाला नाही. १९७५ साली पं. इंदिरा गांधींनी घटनात्मक चौकटीत राहून देशावर आणीबाणी लादली. लोकशाहीचा एक खांब - कार्यकारी विभाग - उर्वरित दोन खांबांना तुच्छ लेखू लागला. त्यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती. तरीही आंतरिक शक्तीच्या आधारे 1977 च्या निवडणुकीत देशाने इंदिरा गांधींना पराभूत केले. कोन्ग्रेस पक्षाची सत्तेवरून हकालपट्टी केली. लोकशाहीची पुनर्स्थापना केली. भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले. त्या संकटात लोकशाही प्रणाली एका अग्निदिव्यातून बाहेर पडली. हा ऐतिहासिक अनुभव गाठीशी असूनही प्रस्थापित राज्यघटना बदलून टीम अण्णाची अध्यक्षीय प्रणाली लागू करायची पूर्वतयारी चालू आहे की काय, अशी आम्हाला शंका येऊ लागली.

जनलोकपाल बिल आणि त्यासाठी जनआंदोलन नामक बाजारू प्रदर्शन ही अध्यक्षीय लोकशाहीची रंगीत तालीम आहे असा संशय आम्हाला येऊ लागला. त्याला कारण होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तेथील सिनेटपेक्षा (संसदेपेक्षा) अधिक अधिकार आहेत. तेथील संसदेने बहुमताने एखादा ठराव संमत केला तरी त्या ठरावाच्या विरोधात अध्यक्षाला निर्णय घेता येतो. अमेरिकेच्या अध्यक्षावर निवडून आलेल्या सिनेटर्समधूनच काहींना मंत्रिमंडळात सदस्य म्हणून घेण्याचे बंधन नसते. त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीला तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो. याचा अर्थ सार्वजनिक जीवनाचा स्पर्श नसलेली मंडळी अमेरिकेच्या जनतेवर राज्य करू शकतात. भारतीय लोकशाहीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी मामुली आहेत असा तुच्छतादर्शक भाव काही विचारवंत मंडळींमध्ये आढळतो. ते स्वतःला सर्वज्ञानी, एक्सपर्ट समजतात. वास्तवात ते पढतमूर्ख असण्याची शक्यता असते. प्रशांत भूषण, शांती भूषण, संतोष हेगडे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल या टाईपची माणसे स्वतःला खासदारांपेक्षा, केंद्रिय मंत्र्यांपेक्षा, पंतप्रधानांपेक्षा किंवा निवडून आलेल्या कुणाही व्यक्तीपेक्षा अधिक विद्वान समजतात. तसेच देशावर राज्य करायला केवळ तेच मुठभर लोक लायक आहेत असा गैरसमज ते जनतेत पसरवितात. एवढेच नव्हे; तर ते स्वतःला सार्वजनिक चारित्र्याचे व नैतिकतेचे शिरोमणी समजतात. ही मंडळी इतरांवर ‘नैतिक पोलीस’ म्हणून दंडूकेशाही करू इच्छितात. त्यांच्या व्यक्तिमत्वात सत्ताकांक्षा किती आणि नैतिकतेचा अंश किती असतो याबद्दल आमच्या मनात शंका होती. ती शंका रास्त आहे हे या मंडळींनी आपल्या आचाराने व विचाराने वारंवार सिध्द केले. अण्णा व त्यांची टीम ही मंडळी विद्वान किती, चारित्र्यवान किती आणि ते नैतिकतेचे कितपत पालन करणारी आहे? ते स्वतःला सर्वांपेक्षा ते उच्च स्तरावरील पवित्र लोक मानतात? ते खरोखर तसे आहेत की नाहीत हे शंकास्पद आहे. अण्णा व त्यांचा संच यांचा नेहमीच ‘आपण उच्च नैतिक स्तरावर जगणारे स्पेशल लोक आहोत’ असे शिफारसपत्र स्वतःला घेण्याचा पवित्रा असतो. यालाच ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात. जन्माने ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्ये देखील ‘ ब्राह्मण्य’ ठासून भरलेले असू शकते, हे अजून भारतीय नागरिकांना उमगलेले नाही. हा ब्राह्मण्याचा दोष अण्णांमध्ये जन्मामुळे नव्हे; तर त्यांच्या पायामधून डोक्यात शिरलेला आहे. जेव्हा लोक आपल्या पाया पडतात, तेव्हा आपण देव आहोत असा भ्रम पाया पडून घेणार्‍याच्या बुध्दीत शिरतो. तसे होणे स्वाभाविक आहे. दुसर्‍याने आपल्या पायावर माथा टेकवावा ही इच्छा हा सत्ताकांक्षेचाच अविभाज्य भाग आहे. हा मानसिक रोग आहे. तो वाढत जातो. मग देशाच्या संसदेने आपल्या पायावर डोके टेकवावे, आपण संसदेचे बाप आहोत, देशाने राज्यघटना आपल्या पायावर अर्पण करावी असेही वाटू लागते. भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो. सामान्य माणसांना चॅनेल्समधून ज्या प्रतिमा त्यांच्यावर आदळतात तेच वास्तव वाटू लागते. अण्णा - टीमची दर्पोक्ती ऐकली की आमच्या मनात प्रश्न उभा राहिला. टीम-अण्णाच्या मनात अण्णा हजारे यांच्या विषयी तुच्छतेची भावना असावी. गर्विष्ठ अन आत्मकेंद्री विचारवंत हे लोकशाहीला मोठा धोका असतात. अण्णा हजारे यांचा वापर करण्यात फक्त त्यांची सोय होते. त्यांच्या मोठेपणासाठी देशाला वेठीस धरणे अनैतिक आहे असे त्यांना वाटत नाही. अण्णा हजारे स्वतःला जेष्ठ व श्रेष्ठ मानू लागले. स्वतःचे भलतेच मूल्यमापन करू लागले. त्यामुळेच ते या विद्वान मंडळींच्या गळाला लागले. अहंकारामुळे विवेकबुध्दी नष्ट होते. जणू अण्णा भारताचे राष्ट्राध्यक्ष बनणार आणि ते टीम अण्णातील प्रत्येक सदस्याला केंद्रिय मंत्रिमंडळात घेणार असा भ्रम निर्माण झाला. त्याचबरोबर आपण भारताला महासत्ता बनविणार व जगात देशाला भ्रष्टाचारमुक्त, नैतिकतेच्या सुर्याने तळपणारे एक बलाढय राष्ट्र बनविणार अशी अण्णांच्या मनात चुकीची धारणा झाली.

उपरोक्त उतारा वाहिन्यांवरील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व अधूनमधून राजकीय विश्लेषक म्हणून पेश केल्या जाणार्‍या डॉ. कुमार सप्तर्ही यांच्या तब्बल सहा वर्षे जुन्या राजकीय विश्लेषणातील एक भाग आहे. तेव्हा त्यांना जनलोकपाल या अण्णा आंदोलनाने कसे भयभीत केले होते, त्याचा हा लिखीत पुरावा आहे. आधी त्यांच्या मनात संशय होता आणि हळुहळू त्या संशयाचे रुपांतर खात्रीमध्ये होत गेले. देशातील राज्यघटना अ लोकनियुक्त सरकार कसे जमिनदोस्त होणार आणि त्याच्या जागी अमेरिकन पद्धतीची अध्यक्षीय लोकशाही येणार, इथपर्यंत त्यावेळी डॉक्टरांनी निदान केलेले होते. नशीब त्यांनी उपाय व उपचार सुरू करून शस्त्रक्रीया केलेली नव्हती. अन्यथा मोठेच आक्रित घडले असते. कारण सप्तर्षी पुण्यातून वैद्यकशास्त्रातले डॉक्टर झालेले आहेत आणि तसे डॉक्टर वैद्यकक्षेत्र सोडून अन्य बाबतीतच नावारूपाला येतात असा इतिहास आहे. राजकारण, अभिनय वा समाजकारण साहित्य अशा क्षेत्रातील पुणेकर तात्कालीन डॉक्टरांची मजल फ़ार मोठी असते. सहाजिकच त्यांची शस्त्रक्रीया आक्रीत घडवण्याचा धोका संभवतो. तर अशा कुमार सप्तर्षींना सहा वर्षापुर्वी देशातील घटना व घटनात्मक राज्यव्यवस्था धोक्यात आल्याची खात्री पडलेली होती. पण आज सहा वर्षे उलटून गेली व अण्णा हजारे थंडावले असले, तरी राज्यघटना शाबुत आहे आणि त्यानुसार सत्तेत आलेले सरकारही चार वर्षे निर्धोकपणे चालून पाचवर्षाची मुदत पुर्ण करण्याच्या स्थितीत आहे. इतक्यात अशा डॉक्टर मंडळींना नवा संशय येऊ लागला आहे. त्यांना आजकाल देशात आणिबाणी असल्याचे भास आभास होऊ लागलेले आहेत आणि मग त्यातून पुढे आणखी काय होईल, त्याची निदाने असले बिन दवाखान्याचे डॉक्टर्स सांगू लागलेले आहेत. त्याला सामान्य वैद्यकशास्त्रामध्ये शिझोफ़्रेनिया किंवा भ्रमिष्टावस्था असेही म्ह्णतात.

बाकी कुठल्याही आजारावर किंवा शारिरीक रोगावर उपचार औषधे असतात. पण जे काही ठराविक मानसिक आजार वा रोग असतात, त्याला बाहेरून काही औषधे देऊन उपयोग नसतो. त्यात मनोरुग्णाला आपणच रोगमुक्त होण्याची अतीव इच्छा असावी लागते. तिथेच तर सप्तर्षी वा तत्सम पुरोगामी डॉक्टरांची अडचण असते. त्यांना आपण रुग्ण नसून रोगनिदान करणारे डॉक्टर असल्याच्या समजूतीने पछाडलेले असते. त्यामुळेच मग एकाच आजाराविषयी परस्परविरोधी टोकाची निदाने असले डॉक्टर्स करू शकत असतात. जनलोकपाल आंदोलन वा तात्कालीन सरकारविरोधी उक्ती कृतीविषयी जे काही निदान सप्तर्षी यांनी उपरोक्त लिखाणातून १५ ऑगस्ट २०१२ च्या ‘सत्याग्रही विचारधारा’ संपादकीयातून केलेले आहे, त्यापेक्षा त्यांची आजची विश्लेषणे कितीशी जुळणारी असतात? तेव्हा अण्णा हजारे किंवा त्यांच्या समर्थकांकडून जी भाषा वा दुषणे सरकारला दिली जात होती, त्यापेक्षा आजची सप्तर्षी यांची दुषणे किती वेगळी असतात? आपण नित्यनेमाने डॉक्टरना विविध वाहिन्यांवर विचारवंत म्हणून पेश केलेले ऐकत असतो? त्यापैकी किती विश्लेषण वा मतप्रदर्शनात, हे गृहस्थ निवडून आलेले सरकार वा लोकप्रतिनिधींविषयी सन्मानाने बोलत असतात? की तुच्छतेने बोलत असतात? सर्वकाही अक्कल व ज्ञान आपल्याच माथ्यामध्ये साठेबाजी करून दडपून ठेवलेले आहे आणि विद्यमान सरकार वा निवडून आलेले लोकप्रतिनिधी कसे बेअक्कल आहेत, याचाच उहापोह ते करतात ना? मग त्यातून राज्यघटना वा तिच्या चाकोरीत चालणार्‍या कारभारावर स्तुतीसुमने उधळली जात असतात काय? तेव्हाही अण्णा हजारे वा त्यांचे सहकारी तात्कालीन सरकारवर दोषारोप करीत होते आणि आज कुमार सप्तर्षी तेच करत असतात ना? मग याला बुद्धीमत्ता म्हणावे की मानसिक आजार संबोधावे?

आम्ही म्हणू तोच कायदा व विधेयक मसूदा संसदेने संमत केला पाहिजे आणि संसदेने आपल्या पायावर माथा टेकला पाहिजे; असे अण्णा हजारे यांनी तेव्हाही म्हटले नव्हते. पण सप्तर्षी यांचे कान इतके तिखट, की न बोललेलेही त्यांना ऐकू यायचे आणि आजही त्यांना अनेक गोष्टी घडल्या नसल्या तरी स्वच्छ दिसू शकतात. अर्थात एकटे कुमार सप्तर्षीच तितकी सिद्धी प्राप्त झालेले सिद्धपुरूष नाहीत. पुरोगामीत्व किंवा तत्सम काही ठराविक शब्दांचा जप केला, मग ही सिद्धी झटपट प्राप्त होत असते. त्यामुळे अशा बुद्धीमंतांचा सुकाळ आजकाल झालेला आहे. त्यांनाच माध्यमातून संधी मिळत असल्याने त्याचा बोभाटा होत असतो आणि नसलेल्या गोष्टीही दृगोचर होत असतात. सहाजिकच अनेकांना अघोषित आणिबाणी दिसू शकते आणि अनुभवासही येऊ शकत असते. मानसिक आजार असेच असतात. त्यांची बाधा झाली, मग काहीही घडल्याशिवाय दिसू शकते आणि त्याची प्रचितीही येऊ शकते. म्हणून सप्तर्षींना तेव्हा भारतात येऊ घातलेली अमेरिकन अध्यक्षीय पद्धती साक्षात दर्शन देऊ शकलेली होती आणि आज त्यांच्यासारख्यांना नसलेली आणिबाणी भयभीत करू शकते. इतरांचे सोडून द्या आणिबाणीत खुद्द सप्तर्षींनी येरेवड्यात काही महिने खर्ची घातले आहेत. त्याचे कारणही ते उपरोक्त परिच्छेदात सांगतात. ‘त्यांनी (इंदिराजींनी) भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती.’ असे सांगणार्‍यांना आज आपण थेट टिव्ही वाहिनीवर सरकार विरुद्ध बोलतोय, याचेही भान नसेल; तर त्याला मानसिक रुग्णावस्था म्हणावे लागते. पण ती बाधा एकट्या सप्तर्षींची नाही तर त्यांच्यासारख्या बौद्धीक अहंगंडाने पछाडलेल्या हजारो शहाण्यांची झालेली आहे. एकदा अशी रोगबाधा झाली, मग वास्तवाशी नाळ तुटत असते आणि मनात असेल ते दिसू लागत असते. अन्यथा सहा वर्षापुर्वी अण्णांविषयी घेतलेल्या आक्षेपाचे अनुकरण आज खुदद सप्तर्षींनी कशाला केले असते? 

सप्तर्षी यांच्या तेव्हाच्या संपादकीय लेखातील हा उतारा जसाच्या तसा एवढ्यासाठी दिला, की त्यांनाच त्याचे स्मरण उरलेले नसावे. अर्थात मानसिक आजाराचा आरंभ स्मृतीभ्रंशानेच होत असतो. सहाजिकच डॉक्टरांना त्यांचेच शब्द आठवणे शक्य नाही, तर ओळखणे कसे शक्य आहे? त्यामुळे हे शब्द वा उतारा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अजिबात नाहीत. तर त्या निमीत्ताने त्यांना वाहिन्यांवर बोलावणार्‍या व बोलते करणार्‍या संपादकांच्या स्मृती जागवण्यासाठी इथे सादर केले आहेत. अशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात. भिंतीवरच्या त्या पालीला नसलेले सुपाएवढे कान दाखवू शकतात आणि सोडही सिद्ध करू शकतात. सहाजिकच सध्या तत्सम लोकांना जी आणिबाणी भेडसावते आहे, तिचा त्यांच्याशी बोलताना इन्कार करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा अशा अघोषित आणिबाणीमुळे ते कसे तुरूंगात खितपत पडलेले आहेत आणि आपण त्यांना तुरूंगातच भेटायला आलोय, म्हणून संवाद साधावा. त्यांच्याही पुढे जाऊन देशातली राज्यघटना कशी खंडीत झाली आहे आणि मोदी देशाचे अध्यक्ष बनून त्यांनी अध्यक्षीय राज्यव्यवस्था प्रस्थापित केल्याचा दिलासाही देऊन टाकवा. तेवढेच आपले सहा वर्षापुर्वीचे भाकित व विश्लेषण किती खरे ठरले याचा डॉक्टरांना आनंद होईल. रुग्णांना भेटायला जाणार्‍याने त्याला कष्ट होतील असे काही करायचे नसते ना? म्हणून शक्य झाल्यास अशा लोकांशी बोलताना दबल्या आवाजात घाबर्‍यागुबर्‍या संवाद करावा आणि आपणही आणिबाणीच्या दहशतीखाली असल्याचा छानपैकी देखावा करावा. तेवढाच भयभीत जीवाला आधार मिळतो ना?

12 comments:

  1. मस्त भाउ हल्ली डोक उठवलय या रुग्नानी जिथे तिथे एकच जप सिझोफ्रेनिची सर्व लक्षणे पुरेगामी लोकांत दिसुन येतायत

    ReplyDelete
  2. यांचा आजारपण उच्च दर्जाचा आहे गुजरात निवडनुकीत सहाव्यांदा हारुन विजय वाटणे कर्नाटकातील सरकार जनादेश समजणे आणि लेटेस्ट न्यालयाने फटकारुनसुद्धा विजय वाटणे

    ReplyDelete
  3. भाऊ... पुरोगामी पतिव्रतेचे छान धिंडवडे काढलेत..

    ReplyDelete
  4. भाउ आणखी एका पुणेकर डाॅक्टरांनी राहुलला 26 jan ला चौथ्या रांगेत बसवण्याची तुलना डायरेक्ट शिवरायांना बादशहाने चौथ्या रांगेत बसवल्याशी केलीय

    ReplyDelete
  5. शालजोडीतून चक्क लाथा घातल्यात भाऊ तुम्ही, ग्रेट.....

    ReplyDelete
  6. काय हो भाऊ...ज्या माणसाने फोन केल्यावर आपल्या नावासोबत माजी आमदार असं आवर्जून‌ सांगावं लागतं...एवढ्या अशा‌ दुर्लक्षित श्वापदावर तुम्ही एवढा मोठा लेखं खर्ची घालावा..याचं आश्चर्य वाटतं

    ReplyDelete
  7. भाऊ या कुमारांना घराणेशाही ने ठिक ठिकाणी पेरुन ठेवले आहे. गेल्या तिन दशकात कुमार केतकर या सुमार माणसाला आपल्या घराणेशाहीचे उदात्तीकरण करण्यासाठी असेच पेरुन ठेवले होते व वर्तमान पत्रे पवित्र आहेत असा भ्रम भारतीय लोकांच्यात असल्यामुळे असेच तो निर्लज माणूस घराण्याला समर्थन देत गेली तिन दशके जनतेची दिशाभूल करत होता व करत राहणार आहे. या माणसाने याचा मोबदला म्म्हणुन राज्यसभा सदस्य मिळाले. अनेक भ्रष्टाचारी व सुमार नेतृत्वाची पाठराखण करणारे अग्रलेख लेख निखिल वागळे व इतर मराठी हिंदी टोळी बरोबर चर्चा मध्ये भाग घेऊन महाराष्ट्र व भारतीय मतदारांना एकाच घराणेशाही ला नेतृत्व करण्यास मदत करत राहिला. असेच सेटिंग कुसप्तरुशींचे व अनेक पत्रकार एडीटर चे झालेले आहे व योग्य वेळी त्यांना कोणत्या नी कोणत्या स्वरुपात मोबदला मिळाला आहे व मिळत राहणार आहे. आपले बरेच शिक्षित नागरिक ऐशोआरामात जरी जगत नसले तरी देशात काय चालले आहे व याचा आपल्या देशावर काय परिणाम होईल याचा कधीही विचार करत नाहीत. आजुबाजुला गरिबी मनोरुग्ण दारुडे गुन्हेगार गर्दुले असंस्कृत संस्कारी भ्रष्टाचारी जनता प्रत्येक 100 200 मिटर वर असताना सुद्धा याचा देशावर काय परिणाम होत आहे व होईल याचा विचार न करता आपल्याच सिरियल, क्रिकेट, गाणी नाटके सिनेमा सारेगम भजने मोबाईल पत्ते नादात मश्गुल राहिली आहे.
    अशिक्षीत गांजलेले आहेत तर शिक्षित मश्गुल मग अण्णा सारखे नाटककार फायदा घेऊन अशीच दिशाभूल करत राहणार.
    पुरोगामी, पत्रकार, साहित्यिक, आवार्ड विनर या काँग्रेस च्या देशात पेरलेल्या डिप अॅसेट आहेत.
    अशीच योजना वर्षांनुवर्षे राहिलेले विरोधी पक्ष सरकार मध्ये आल्यावर करत नाहीत त्यामुळे एकच घराणे लोकशाही च्या नावाखाली सुमार नेतृत्वाची राजेशाही करत आहे. यामुळे सुजलाम सुफलाम खंडप्राय देश व जनता गरिबी दारिद्र्य भ्रष्टाचार इनईक्विलिब्रियम डिस्ट्रिब्युशन ऑफ ईनकम यात पिचत पडलाय.
    यामुळे कितही महामानव भारतात राज्य कलण्यास आला पंतप्रधान झाला तरी या देशात नेहमीच आराजक परिस्थिती राहिली आहे.

    आणिबाणीच्या विषयावरुन मोदींना पप्पु व नेहरु सोनिया यांच्या आराजक व देशविघातक राज्य कारभारा कडुन मोदींच्या टिकेचा रोख बदलण्यास भाग पाडलं आहे. यामुळे मोदी किती खालच्या लेव्हलचे विचार करतायत हे जसजश्या निवडणूक जवळ येतील तेव्हा तमाम एडीटर मोदी विरोधात तुटुन पडतील. अशिच मोडस आॅपरंडी काँग्रेसची व विदेशी/परराष्ट्रांची राहिली आहे.
    यामुळे देश परत एकदा आराजका कडे ओढला जाणार हे हळूहळू स्पष्ट होतंय.....1

    ReplyDelete
  8. भाऊ एकदम सहि अण्णा आंदोलन हे लोकांना 2004 पासुन एनडीए राजवटीत झालेले भ्रष्टाचार यावर पांघरुण घालण्या साठी च होते. मि 2010 च्या सुरवातीस आण्णाना अनेक मेल व न्युजपेपर साईटवर काॅमेंट टाकून काँग्रेस च्या भ्रष्टाचारावर का उपोषणाला बसत नाहीत विचारत होतो. आणि खरोखरच आण्णा उपोषणाला बसले व मिडियावाले याचा प्रचार करायला. यामुळे एकदा का लोकपाल आला की भ्रष्टाचार बंद होऊन परत आता काँग्रेस राज्य करण्यास काही हरकत नाही असा समज पसरवण्यात यशस्वी झाली पण केजरैवाव यांचा फायदा घेतील हे काँग्रेसच्या लक्षात आले नाही. यातच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातुन काँग्रेस व विदेशी ताकतीने पुरस्कृत मॅगेसेसे आवार्ड गळ्यात घातलेले केजरिवाल भ्रष्टाचारी काँग्रेस च्या विरोधी निवडणूक लढवायच्या ऐवजी मोदी विरोधात ऊतले व सामान्य नागरिक यातील चाल ओळखून या टोळीला नेस्तनाबूत केले हा मोठा धक्का होता.

    ReplyDelete
  9. अशीच वैचारिक लेख लिहून तुम्ही एका बाजुने या पुरोगामींची साले काढावीत. तर दुसरी बाजु मोदी शहा भाषण-सभा व बुथ पन्ना मॅनेजमेंट करुन समर्थ रितीने सांभाळतील.
    पण आपण म्हणतात त्याप्रमाणे सामान्य जनता दुधखुळी नाही. परंतु माध्यमातून व सोशल मिडियातुन सतत तेच तेच दाखवून अशिक्षीत व पैशाच्या दारु मटणाच्या प्रलोभनाने सहज उलटणार्रा/फिरणारे मतदारांना मोदी विरोधात फिरवून किंचित टक्के वारी फिरवून बाजी मारून नेण्याचा व दशकानु दशके सत्तेवर राहाणारे राजघराणे मोदी शहांना विचलित करण्यात यशस्वी होत आहेत.
    जर इंदिरा गांधीची आणिबाणी आणि आजच्या परिस्थितीत जमिन आस्मानाचा फरक आहे तर मोदी शहा ना इंदिरेच्या सोनिया युक्त काँग्रेसच्या आणिबाणीच्या परिस्थिती वर आज घणाघाती टिका का करावी लागत आहे? याचा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. मोदी शहांचा 2014 ला भरभरून मतदान करणार्या मतदारा वर विश्वास/ भरोसा नाही काय? कारण मोदी हुकुमशाही करत आहेत यावर जरा पण विश्वास अशा जनतेला नाही. मोदी सरकारने प्रचंड मेहनत घेतली आहे हे जाणून आहेत. व *भाजपला भारतीय मतदारांनी महागाई, कुशासन, घराणेशाही, भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, निर्णय नपुसकता, मुस्लिम व इतर धर्माचे लंगुचालन अशा अनेक समस्यांना कंटाळुन मोदीना निवडुन दिले होते.*
    व याची आठवण कायम करुन आपला मतदार शाबुत ठेवून परत 2019 ला सत्तेवर निवडुन येणे शक्य आहे.
    तसेच काँग्रेसची धास्ती घेतली आहे काय आणि अशी धास्ती घेण्यासारखी परिस्थिती निश्र्चीत नाही.
    मग हा प्रश्न ऐरणीवर आणुन मोदी शहा काय साधत आहेत.
    मोदी सरकार वरिल सर्व समस्या ज्यामुळे निवडुन दिले त्या वर मात करत कणखर पणे वाटचाल करत आहे. सामान्य माणुस हे पण जाणुन आहे की केवळ पाच वर्षांत देव/ ईश्वर ही हे करु शकत नाही.
    हे दशकानु दशके भाजप/जनता पक्ष/दल इतर विरोधी पक्षाला मतदान करणार्यां वर्गाला हे निश्र्चीतच माहिती आहे.
    पण आणिबाणीच्या आठवणी काढुन मोदी शहाना हे लोक विचलित करण्यात यशस्वी होत आहेत. काही असलं तरी इंदिरा गांधी यांनी 1971 व 1984 ला कणखर भुमिका घेत देशविघातक शक्तींचा बंदोबस्त केला होता व यामुळे एका पिढीतील सामान्य आजुन ही इंदिरा गांधी च्या बाबतीत साॅफ्ट काॅर्नर ठेवून आहे. त्यामुळे नेहरु प्रमाणे इंदिरा गांधी ना टारगेट करुन मोदी भाजपच्या रणनीती वर मन कलुशित होऊन काही टक्के मतदार नोटा किंवा कर्नाटकातील बॅगलुरु प्रमाणे परत कोषात जाऊन जरी दिसायला 2-4 सिटची असली तरी प्रभावाने मोठी हानी पोहचु शकतो.
    त्रयस्थ पणे या गोष्टी चा विचार भाजपला व थिंक टँकला करावा लगेल पण तो ते करत नाहीत हे स्वच्छ पणे दिसत आहे.
    की 2004 ( प्रमोद महाजन) प्रमाणे 2019 भाजपचे थिंक टँक कोण आहेत की या सर्व योजना तयार करत आहेत. ( कारण लोकसभे बरोबर सर्व राज्य सरकार च्या निवडणूक घेण्याची भुमिका कोण मांडतय)
    मोदी आता पुर्णपणे थिंकिंग रणनीती करण्या कडे कदाचित पंतप्रधान कार्याची अती जबाबदारी घेऊन मेहनत करत आहेत असे वाटते. मोदी सारख्या लोकाभिमुक नेत्या ने पण थोडा ब्रेक घेऊन या अंतीम टप्प्यात रोज रणनीती बनवणे आवश्यक आहे.

    आता काँग्रेस चा बाऊ करण्याची वेळ नाही कारण नेतृत्व हिन पक्ष राहिलेल्या थोड्या काळात प्रचंड मुसंडी मारु शकत नाही.
    व अशा भुतकाळातील काँग्रेस च्या भुतांना टारगेट करुन मोदी काय साधत आहेत?
    आता भिती असेल तर गठबंधना ची असु शकते पण वरिल गोष्टी कडे मोदी ना ढकलुन मुरब्बी काँग्रेस परत आपण पायानी मारलेल्या गाठी ईतर पक्ष हातानी पण सोडवु शकत नाही हे सिद्ध करतोय....3
    एकेएस

    ReplyDelete
  10. मायावती व मुलायम व जयललिताच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स सिबिआय कडे होत्या असे तथाकथित माध्यमातून सहज बोलल जायच या फाइल्स चा धाक दाखवून यांचा पाठिंबा काँग्रेस ने घेतला होता. या फाइल्स काँग्रेस ने सिबिआय कडुन घेऊन सत्तेतुन उतारा केला काय? नाहीतर मोदी सरकारने या तथाकथित फाइल्स चा धाक या भ्रष्टाचारी गठबंधन पक्षांना काही नाही दाखवला?
    एकाधिकारशाही व शतप्रतीशत ही गेले चार वर्ष चाललेली भाजप निती आता गोत्यात आणते आहे काय? कारण जटिल व अतोनात समस्याग्रस्त या खंडप्राय व अशिक्षीत असमंजस अगणित असंस्कृत व व्यसनग्रस्त जाती धर्म भाषा प्रांत स्वार्थी ( जयचंदी आवलाद) समाजात एक पक्ष एकाधिकारशाही चालू शकत नाही हे विसरले काय. अमित शहा हे मान्य करत नसतील व आता त्यांच्या अशा धोरणाने कोणी जवळ करत नसेल तर मग राजनाथसींग सुषमा गडकरी यांना उतरवुन गठबंधनाची अशी मोट बांधायचा प्रयत्न का केला जात नाही. व असे गठबंधनात हे भ्रष्टाचारी पक्ष का येत नाहीत हे मोदी जेव्हा निर्णायक लढाई चालु होईल काही योजना आखुन कोडींत पकडुन पुरावा ठेवून तेव्हा भांडाफोड करेल काय? व जनतेला विश्वासात घेईल काय? अशी धोरणे थोडी आधी चालु करायला लागतात. पण शतप्रतीशत च्या मग्रुरीत ह्याचा विचार केला गेला होता काय.
    भारतीय जनता पटकन सहज उलटी फिरते हे बिहार निवडणूकीने दाखवून दिले होते पण ईतर राज्य जिंकल्यामुळे याचा विसर पडला काय?
    भाजप विरोधी गठबंधनाने नुसताच जाहिरनामा तयार केल्यावर देश एकदम ठिकठाक होइल असे आहे काय? हे सर्व सामान्य जनता जाणते. आणि याचाच फायदा मोदी सरकारने घ्यायला पाहिजे. ( आठवा भ्रष्टाचार डीप अॅसेट विथड्रावल)
    मागील गठबंधन सरकार मुळे देशाचे काय काय नुकसान झाले हे देशातील सामान्य जनतेला आठवण करुन देणे आवश्यक आहे. हेच गठबंधन परत येऊन देशाला परत आराजक कडे नेईल हे अधोरेखित आहे व याचा विसर शाॅर्ट मेमरी असलेल्या भारतीयांना पडु शकतो.
    तसेच काँग्रेस व गठबंधनाने NDA नेतृत्व केलेल्या भ्रष्टाचारी आतंकवादी हल्ल्यांच्या महागाईच्या सुमार नेतृत्वाच्या दरीत परत भारता सारख्या खंडप्राय देशाला ढकलून चालेल काय हा प्रश्न जनतेच्या ऐरणीवर आणणे आवश्यक आहे.
    कदाचित पेट्रोल डिझेल ईनकम टॅक्स दर कमी न करण्याच्या धोरणाचा विसर दशकां नु दशके मतदान करणार्यांना पडावा म्हणुन असे चालले आहे काय.
    की बेरोजगारी काळा पैसा भ्रष्टाचारी पुढारी यांना शासन करण्यात कमी पडले म्हणुन यावर प्रभावी उपाय न्याय वेवस्थे कडुन करु न शकल्या मुळे हे भुत मोदी शहाच्या थिंक टँकच्या मानगुटिवर बसले आहे काय?
    राजस्थान मध्यप्रदेश मधील अँटी इन्कम्बंन्सी पण मोदी शहांना घाबरवते आहे काय?
    पण राज्य सरकार ला मतदान करताना व लोकसभेला मतदान करताना जनतेला निश्चित वेग वेगळा विचार करावा लागतो.
    हे विसले काय?
    मोदी सरकारला पर्याय गठबंधन होऊ शकत नाही हे परत परत जनतेला समजून सांगणे आवश्यक आहे हे विसरले काय?
    नाहीतर परत देश आराजका कडे फेकला जाईल.
    एकेएस

    ReplyDelete