Friday, August 30, 2019

पाकिस्तान कोणावर चिडलाय?



येत्या शनिवारी ३७० कलम रद्द केल्याला महिना पुर्ण होणार आहे आणि त्यानंतर पाकिस्तान कितीही डरकाळ्या फ़ोडत राहिला, तरी त्याचा काडीमात्र परिणाम होऊ शकलेला नाही. अर्थात पाकने या कृतीसाठी भारताला गुन्हेगार ठरवण्यासाठी प्रचंड आटापिटा केलेला आहे. जागतिक व्यासपीठावर काश्मिरचा मुद्दा आणून भारताला कोंडीत पकडण्याचे नेहमीचे सर्व खेळ अपेशी ठरल्यावर आता पाकिस्तानातच आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण भारत सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा कुठल्याही गदारोळाची दखलही घ्यायला राजी नसल्याने पाकिस्तानचा संताप दिवसेदिवस अनावर होत चालला आहे. राष्ट्रसंघात जाण्याविषयी सुरू झालेल्या धमक्या आता अणुयुद्धापर्यंत जाऊन पोहोचल्या, तरी भारत पाकिस्तानकडे वळूनही बघत नाही, ही सर्वाधिक क्लेशाची बाब झाली आहे. कारण् भारत जितका अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करतो, तितकी पाकला आपल्या नामर्दीची जाणिव अधिक बोचरी होत असते. मात्र पाकचा खराखुरा राग नरेंद्र मोदी वा भाजपा वगैरे लोकांवर अजिबात नाही. इमरान वा पाकसेनेचे अधिकारी संतापलेले आहेत, ते इथे भरतात बसलेल्या त्यांच्या दलालांवर. कारण मागल्या तीन दशकात पाकिस्तानने आपल्या सुरक्षेची यंत्रणा भक्कम करण्यापेक्षा, ते काम दोन भिन्न गटांवर कंत्राटी पद्धतीने सोपवलेले आहे. त्यातला एक गट पाकिस्तानभर पसरलेल्या जिहादीचा गट असून, दुसरा गट हा भारतातच स्थायिक असलेले राजकीय नेते, अभ्यासक, पत्रकार, पुरोगामी बुद्धीमंत असा आहे. यापैकी भारतात वसलेला पाकचा हस्तक अतिशय मोलाचा घटक होता आणि आजही आहे. कारण त्याने चालविलेला इथला घातपात आणि पाकस्थित जिहादींनी इथे मांडलेला उच्छाद; हीच तर पाकची मागल्या तीन दशकातली खरी रणनिती बनून गेली होती. ३७० रद्द होण्यातून हे दोन्ही गट निकामी ठरले आहेत आणि त्यापैकी इथल्या गद्दारांनी पाकला वेळीच सावध केले नाही, म्हणून सगळा जळफ़ळाट चालला आहे.

भारतासाठी गेल्या तीन दशकात पाकिस्तान हा लष्करी डोकेदुखी कधीच नव्हता. भारताशी शस्त्राने लढणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तानने नवी रणनिती तयार केली. त्यात भारताच्या लोकशाही व मानवाधिकारालाच आपले हत्यार बनवण्याचा घाट घातला होता. त्यानुसार एका बाजूला काश्मिरातील फ़ुटीरवादी तरूणांना चिथावण्या देऊन जिहादी घातपाती बनवणे व अघोषित युद्ध चालवणे, हा एक भाग होता. दुसरा भाग भारताच्या विविध मानवी हक्क वा नागरी अधिकाराचा आडोसा घेऊन काश्मिरमध्ये व दिल्लीत भारतीय कायदा प्रशासनाला पोखरून काढणारी गद्दारांची फ़ळी उभी करणे. अशी दुहेरी रणनिती होती. एकदा त्यासाठीची यंत्रणा सज्ज झाल्यावर पाकसेनेला काहीच काम उरले नाही. त्यांच्या गुप्तचर खात्याने भारतातील तशा आमिषाला बळी पडून देशाशी गद्दारी करणार्‍यांचा शोध घ्यायचा. त्यांची जोपासना करणे व जिहादी व्हायला राजी असणार्‍यांना प्रशिक्षण देणे; इतकेच काम उरलेले होते. त्या दोन्ही आघाडीवर पाक यशस्वी झाल्यावर पाकसेना निश्चींत झाली आणि भारताला अशा दुहेरी हल्ल्यांना तोंड देणे अवघड होऊन बसले. कारण दोन्हीकडून आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी दु:स्थिती झालेली होती. हे दुष्टचक्र मोडण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता. नुसत्या लष्करी कारवाईने किंवा शस्त्राने त्याचा बंदोबस्त होऊ शकणारा नव्हता. कारण एक गद्दार निकामी झाला तर दुसरा बाजारात खरेदी करणे शक्य होते आणि एक जिहादी मारला गेला तर दुसरा कायम सज्ज ठेवणे शक्य होते. सहाजिकच अशी रसद तोडण्याला महत्व होते, तितकेच अशा दोन्ही आघाड्या निकामी करून टाकण्यालाही प्राधान्य होते. ते करणारा कोणी खमक्या देशाचे नेतृत्व करायला भारतात ठामपणे उभा रहायला हवा होता. तसा नेता जनतेला सापडायला व त्याच्या हाती देशाची सत्तासुत्रे सोपवायला २०१४ साल उजाडले. त्यानंतरच खराखुरा काश्मिर प्रश्न सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

पाकिस्तानचे दुर्दैव इतकेच होते, की त्याला किंवा त्याच्या इथक्या गद्दार दलालांना नरेंद्र मोदी ओळखायला वेळ झाला आणि तोपर्यंत मोदींनी अनेक खेळी खेळून झालेल्या होत्या. एका खेळीचा परिणाम दिसल्यावर डागडूजी सुरू करण्यापर्यंत मोदी सरकार पुढली खेळी करत होते आणि त्याचे परिणाम दिसण्यापर्यंत तिसरी खेळी सुरू व्हायची. पाकिस्तान त्यात गोंधळून गेला होता. कारण पाकिस्तानचे इथे पोसलेले गद्दार हस्तकही गोंधळून गेलेले होते. आजवरचे पंतप्रधान किंवा राजकीय नेते आणि मोदी यातला मुलभूत फ़रक त्यांना कधीच ओळखता आला नाही्, ही घोडचुक ठरलेली आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सहवाग यांच्यात मोठा फ़रक असतो. द्रविड शांत डोक्याने खेळतो. उलट विरेंद्र सहवागला घाबरवण्याचा प्रयत्न केल्यास थेट अंगावर चाल करून जातो. मोदी त्याच्याही पलिकडले व्यक्तीमत्व आहे. ते शांत डोक्याने घटनाक्रमाला सामोरे जातात. उतावळेपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यापेक्षा प्रतिस्पर्धी वा शत्रूला गाफ़ील ठेवून त्याच्याच सापळ्यात अडकवणे; ही मोदींची रणनिती राहिलेली आहे. ती राजकारणात असली तरी तशीच ती कारभारातही दिसून येते. पाकिस्तानला नमवायचे असेल, तर त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यापेक्षा त्याने पोसलेल्या जिहादी किंवा देशांतर्गत बुधीवादी वर्गाचा कणा मोडला पाहिजे, याची खूणगाठ मोदींनी खुप आधीच बांधलेली होती. त्याची पुर्ण सज्जता करण्यातच पहिली पाच वर्षे निघून गेली आणि त्या काळात त्यांनी पाकप्रेमींच्या उतावळेपणाची साक्षात परिक्षाच घेऊन झाली. एकीकडे काश्मिरात घुडगुस घालणार्‍या जिहादींचा कणा मोडणारी लष्करी कारवाई हाती घेतली आणि दुसरीकडे त्यानिमीत्ताने पाकप्रेमी गद्दार आपापल्या बिळातून बाहेर येऊन उघडे पडतील, असेही खेळ केले. त्यांची विश्वासार्हता संपवून घेतली आणि दुसर्‍या पाच वर्षासाठी निवडून येताच निर्णायक चाल खेळलेली आहे.

जागतिक मंचावर आपण तोकडे पडलो, म्हणून पाक संतापलेला नाही. किंवा जिहादी मारले गेल्याने पाक विचलीतही झालेला नाही. दोन्ही आघाडीवरची रणनिती फ़सत चालल्याने पाक खवळलेला आहे. पहिली बाजू म्हणजे लागोपाठ जिहादींचा खात्मा करून पाक प्रशिक्षीत मुजाहिदींनांना संपवण्याची ही रणनिती इथल्या गद्दारांना आधीच समजू शकली नाही. किंवा पाकला त्याची आधीच खबरबात देता आली नाही. हा इथल्या पाकप्रेमी बुद्धीमंतांच्या फ़ळीचा पहिला पराभव होता. त्याचे परिणाम म्हणून सर्जिकल स्ट्राईक व बालाकोटचा हवाईहल्ला, ह्या दोन गोष्टीत पाकचे नाक कापले गेले. त्याला त्यांनी इथे पोसलेल्यांचे नाकर्तेपण जबाबदार होते. कारण सरकारच्या गोटातल्या गोपनीय गोष्टी काढून पाकला सावध करण्यासाठीच तर त्यांना पोसले जाते ना? इतके झाल्यावर ३७० हे पाकिस्तानच्या उचापतींना लाभलेले कवचकुंडलच होते. तेही झटपट निकालात काढण्याचा आराखडा पाकिस्तानला कळूही शकला नाही. कारण तो पाकच्या इथेच वसलेल्या हस्तकांनाही मोदी सरकारने समजू दिला नाही. थोडक्यात इतकीही माहिती देणार नसतील, तर असले गद्दार पाकने पोसावे कशाला? ३७० रद्द झाल्यावरही हे पाकप्रेमी भारतात कुठे गदारोळ माजवू शकलेले नाहीत आणि काश्मिरात सोडलेले व पोसलेले जिहादी कुठे साधी दगडफ़ेकही करून दाखवू शकलेले नाहीत. थोडक्यात तीस वर्षे अशा दोन गटांमध्ये पाकने केलेली सगळी गुंतवणूक मातीमोल होऊन गेलेली आहे. पाकला तेच मोठे अपयश सतावते आहे. नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी नेत्यांपासून माध्यम क्षेत्रातले एकाहून एक विचारवंत संपादक आठवडाभर आधी ३७० रद्द होण्याची सा़धी बातमी देऊ शकणार नसतील, तर त्यांच्यासाठी सेमिनार, मेजवान्या किंवा चर्चासत्रांचे पंचतारांकित समारंभ योजण्यावर पाकने पैसे कशाला खर्चावेत? इमरानपासुन जनरल बाजवा यांच्यापर्यंत सगळे पाकिस्तानी नेते, आपली पुरोगामी गुंतवणूक बुडीत गेल्यामुळे मातम करीत आहेत. मणिशंकर अय्यर उगाच नाही, मल्ल्यासारखे बेपत्ता झालेत.

17 comments:

  1. जे बात.... मोदी न समजणारे हळूहळू कपाळमोक्ष करून घेत आहेत.

    ReplyDelete
  2. सुपर भाऊ. पाक मीडिया जो पाक सेना चालविते ते पाहिल्यास पाकचा इतका जळफळाट का होतोय ते कळते. सर्वजण मोदींना नवे ठेवण्याबरोबरच इतकी शांतता का आहे यावर चिडतायत ,शांतता दोन्हीकडे आहे काश्मीर मध्ये आणि त्यांच्या पाठीराख्यामध्येही.

    ReplyDelete
  3. भाऊ, अतिशय सटीक आणि मार्मिक विवेचन

    ReplyDelete
  4. छान विश्लेषण.370 रद्द केल्यानंतर लढाई समोरासमोर झाली आहे. काश्मिरी खोऱ्यातील जनतेला शांततेची सवय होईल.

    ReplyDelete
  5. एकदम मस्त ! निव्वळ विषाचा दातच नव्हे सगळे दात काढून त्याच्याच घशात घातलेत मोदीजींनी. सटीक विश्लेषण ! इतर भारतीय मीडियाचे मात्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करुन मोदींनी निकामी केले असावेत असं दिसतंय.

    ReplyDelete
  6. एकदम "सटीक" विश्लेषण भाऊ !!

    ReplyDelete
  7. वाह ! जबरदस्त पृथ:करण भाऊ.

    ReplyDelete
  8. श्री भाऊ तुम्ही धन्य आहात, आता जरा निखिल वागळे चा समाचार घ्या

    ReplyDelete
  9. भाऊ, याच कारणासाठी या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या विचारवंताची झालेली गोची बघण्यात मजा येत आहे. पुरस्कार वापसी गँग तर कोणीतरी तोंडात बोळा ठोसून कोंबावा आणि श्वास पण अडकावा व मदतीला बोलवण्यासाठी घशातून आवाज पण निघू नये या अवस्थेत आहेत आणि म्हणूनच की काय मंदी मंदी ओरडून जनतेला भडकवण्याचे काम सुरू आहे. भाऊ मला तर वाहनउद्योगातील स्लोडाऊन सोडल्यास कोठेही मंदी दिसत नाही, आपल्या तिक्ष्ण द्रुष्टीला जर दिसत असेल तर त्यावर आपले मत वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  10. पाक त्याच्या कर्माने संपेलच, परन्तु इथले गद्दार संपले पाहिजेत

    ReplyDelete
  11. ग्रेट, आता पाकिस्तान पुढे काय करेल

    ReplyDelete
  12. Sir, can u carry out investigative report on ministry of corruption sorry co-operation.A vist to deputy registrar's office , bmc ward and lokshahi din at various level reveal the subversion of law.is law just a tool to silence the people who question or beleive in principles of equality liberty , justice and fraternity

    ReplyDelete
  13. भाऊ म्हणजे प्रश्नच नाही. अगदी बरोबर भाऊ. पण या गद्दारांना काही धडा शिकवता येत नाही का?

    ReplyDelete