Wednesday, February 12, 2020

‘आप’ला दिल्ली आंदण

Image result for AAP won

साधारण महिन्यापुर्वीच मी लेख लिहून एक मुद्दा उपस्थित केला होता आणि दिल्ली विधानसभेच्या ताज्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्या लेखाचे शीर्षक होते, ‘भाजपाच्या "लेखी" एकमेव पर्याय’. त्यात दिल्लीचे मतदान कसे होऊ शकते व त्यात भाजपाच्या मोठी अडचण कुठली असेल, त्याचा सविस्तर उहापोह केलेला होता. यातला लेखी हा शब्द मीनाक्षी लेखी या नवीदिल्लीतील भाजपा खासदारासाठी वापरला होता. दिल्लीची लढत ही मोदी विरुद्ध केजरीवाल अशी होऊ शकत नाही आणि तसे करायला गेल्यास केजरीवाल यांचे पारडे जड असेल, हा त्यातला इशारा होता. कारण गेल्या पाच वर्षात त्याची वारंवार प्रचिती आलेली आहे. पाच वर्षे व भाजपाच कशाला, अगदी इंदिराजी असतानाही कॉग्रेस पक्षाला त्याच अनुभवातून जावे लागलेले आहे. कारण लोक विधानसभा वा लोकसभा अथवा महापालिका वगैरे निवडणूकीचा वेगवेगळा विचार करतात. भिन्न कसोटी लावून मतदान करतात, हे आकडेच सांगत असतात. २०१४ च्या मोदींच्या दिग्विजयानंतर भाजपाला त्याची पहिली प्रचितीही दिल्लीतच आलेली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्येही झालेली होती. पण त्यापासून भाजपा अजून तरी धाडा घेऊ शकलेला नाही. म्हणून तर ताज्या विधानसभा मतदानातून सामान्य जनतेने पुन्हा तोच धडा शिकवला आहे. पण कोणी शिकणार आहे काय? यात बाकीचा तपशील बाजूला ठेवून भाजपाने एकाच गोष्टीचा बारकाईने अभ्यास चिंतन वगैरे करावे. सात महिन्यापुर्वी लोकसभेत त्यांना ५६ टक्के मते देणार्‍यांपैकी सोळा सतरा टक्के मतदार इतक्यात का दुरावला आहे? त्याला जबाबदार कोण आहे? त्याचा विचार पाच वर्षे जुन्या अनुभवातून होऊ शकलेला नसेल, तर हे निकाल म्हणजे भाजपाश्रेष्ठींनी केजरीवाल यांना दिलेली प्रेमाची भेट म्हणणे भाग आहे. त्याचा अन्य काहीही अर्थ असू शकत नाही.

एप्रिल मे महिन्यात केजरीवाल यांची लोकसभेला एकट्याने भाजपाशी लढायला हिंमत होत नव्हती. केजरीवाल यांनी हातापाया पडून कॉग्रेस पक्षाशी आघाडीचे प्रयत्न अखेरपर्यंत चालविले होते. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही व एकट्याच्या बळावर लोकसभा लढवावी लागली होती. पण तेच केजरीवाल यावेळी विधानसभेला आपल्या बळावर पुन्हा मोठे बहूमत जिंकण्याच्या डरकाळ्या फ़ोडत होते. तेव्हाचा भयगंड आणि आताचा आत्मविश्वास कुठून आलेला असतो? ते समजून घ्यायचे असेल तर त्याच लोकसभेपुर्वी चार महिने आधी तेलंगणा विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूक घेण्याची घाई तिथले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी कशाला केली, ते सुद्धा समजून घ्यावे लागेल. तशी त्यांची मुदत लोकसभेसोबतच संपणार होती. पण तोपर्यंत थांबले नाहीत. त्यांनी आधीच विधानसभा बरखास्त करून राजस्थान मध्यप्रदेश सोबत आपल्या विधानसभा निवडणूका उरकून घेतल्या. त्यात त्यांना प्रचंड यश मिळाले होते. पण चार महिन्यांनी लोकसभेत त्यांना तेच यश टिकवता आले नाही. भाजपाला त्या विधानसभेत अवघी एक जागा मिळू शकली होती. पण लोकसभेत मात्र ४ खासदार निवडून आणता आले. हा काय चमत्कार होता? नेमका तोच प्रकार आताही दिल्ली विधानसभेत घडला आहे. मोदींशी स्पर्धा असल्यास आपल्याला त्यात टिकता येणार नाही. लोकसभा विधानसभा एकत्रित मतदान झाल्यास त्यात मोदींच्या प्रतिमेचा दुबळी संघटना असूनही भाजपाला फ़ायदा मिळू शकतो. म्हणून चंद्रशेखर राव यांनी दोन्ही निवडणूका वेगळ्या होतील अशी खेळी केली होती. इथे मोदींचा मोठेपणा समजून घेतानाच त्यांच्या प्रतिमेवर विसंबून पक्षाचा कारभार करतानाची दुबळी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. ती राव यांनी घेतली, पण भाजपाला अजून उमजलेली नाही. लोकसभेत मोदींना पर्याय नसतो, तसाच विधानसभेत राव, केजरीवाल, ममतांचे पारडे जड असते.

२०१७-१८ च्या कालखंडात भाजपाने अनेक लोकसभा पोटनिवडणुका गमावल्याने २०१९मध्ये मोदींचा पराभव सर्व विश्लेषक पक्का मानत होते. तिथेही हीच चुक केली जात होती. पोटनिवडणूकीत मतदार फ़क्त स्थानिक खासदार निवडत असतो. पण सार्वत्रिक निवडणूकीत त्याला पंतप्रधान व सरकार निवड़ायचे असते. सहाजिकच त्याचा प्राधान्यक्रम बदलत असतो. तीच विधानसभेची कहाणी असते. जेव्हा मतदाराला मुख्यमंत्री निवडायचा आहे, तेव्हा त्या स्पर्धेत नरेंद्र मोदींना उतरवणे चुक असते. तेलंगणात वा दिल्लीतही मोदी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असू शकत नाहीत. तसे केल्यास केजरीवाल स्थानिक प्रभावी नेता असल्याने त्यांचे पारडे जड होते. तशा स्पर्धेत भाजपाने कोणी स्थानिक नेता प्रभावी करून उभा केला पाहिजे. जसे महाराष्ट्रात देवेंद्र फ़डणवीस वा हरयाणात मनोहरलाल खट्टर होते. दिल्लीत तितके समर्थ नेतृत्व भाजपाला देता आले नाही. तिथेच आम आदमी पक्षा़चे पारडे जड झाले होते. उलटही बघता येईल. आपण लोकसभेत मोदींशी झुंज देण्यात दुबळे आहोत, याची केजरीवाल यांना पुर्ण कल्पना होती. म्हणूनच ते कॉग्रेसशी जागावाटप मागत गयावया करीत होते. निकालही तसेच लागले. कॉग्रेसने सर्व जागा गमावल्या तरी आपपेक्षा अधिक व दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली. आप तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेलेला पक्ष होता. कारण त्याची मतदाराला लोकसभेत गरज वा उपयोग वाटत नसतो. पण तोच आम आदमी पक्ष व केजरीवाल, दिल्लीतले प्रभावी नेतृत्व आहे म्हणून हवे असते. हे केजरीवाल ओळखून लवचिक होऊ शकत असतील, तर भाजपाच्या रणनितीकारांना विधानसभा लढवताना कोणी झुंजार चेहरा निवडणूकीत पुढे करण्यात कसली अडचण होती? मीनाक्षी लेखी ह्यांचे व्यक्तीमत्व आक्रमक व रोखठोक आहे आणि केजरीवाल यांच्याशी प्रचाराच्या खुल्या मैदानात त्या मोठी टक्कर देऊ शकल्या असत्या. भले तरीही केजरीवाल बहूमताने पुन्हा मुख्यमंत्री झाले असते. पण लेखींच्या पुढाकाराने त्यांचे संख्याबळ नक्कीच कमी झाले असते.

आताही बिहारच्या निवडणूकीची गडबड सुरू झालेली आहे. तिथे भाजपा आजही स्वबळावर लढण्याइतकी प्रभावी नाही. शिवाय त्यांच्याकडे राज्यातला आक्रमक नेता चेहराही नाही. म्हणून आतापासूनच नितीशकुमार यांना आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून अमित शहांनीच घोषित केलेले आहे. गेल्या खेपेस दिल्लीमध्ये किरण बेदींचा चेहरा पुढे केला होता, पण तो लेखी वा स्मृती इराणी यांच्यासारखा झुंजार नव्हता. या दोघी दिल्लीकर भाजपाच्या नेत्या आहेत आणि अंगावर आलेल्यांना शिंगावर घेणार्‍या महिला आहेत. तितका कुठला पुरूष नेता दिल्ली भाजपात निदान आजतरी दिसत नाही. मग त्यांचा विचारही कशाला झाला नाही? बंगालमध्ये रुपा गांगुली तसाच भाजपाचा आक्रमक चेहरा आहे. ममतांशी टक्कर देताना तशाच आक्रमक किंवा आक्रस्ताळी वाटणार्‍या व्यक्तीमत्वाची गरज आहे. मुकूल रॉय, बाबुल सुप्रियो, राहुल सिन्हा असले निष्प्रभ व्यक्तीमत्व त्या ताकदीचे नाही. त्यामुळेच बंगालमध्ये लोकसभेत मिळालेले यश मोदींसाठीचे आहे आणि विधानसभेला त्याची पुनरावृत्ती सोपी नाही. त्यासाठी स्थानिक प्रभावी चेहरा आवश्यक आहे. असा चेहरा व नेता पुढे असेल, तर मोदींची लोकप्रियता त्याला बोनसची मते मिळवून देऊ शकते. भक्कम पर्याय समोर दिसत नसेल, तर लोक असलेला तोडकामोडका पर्यायही जपून हाताशी ठेवतात. मोदींना गेल्या लोकसभेत विरोधक भक्कम पर्याय उभा करू शकलो नाही म्हणून पराभव झाला; असे पवारांनी सांगितले, त्याचा हाच अर्थ आहे. केजरीवालांचे यश त्यापेक्षा वेगळे नाही. ते भाजपाने आपल्या चुकीच्या रणनितीने बहाल केलेले आंदण आहे. लोकसभेत सत्तरपैकी एकाही जागी आघाडी नसलेल्या आम आदमी पक्षाला आता ६२ जागी आमदार निवडून आणता आले, त्यातली जादू केजरीवाल हीच आहे. तेसुद्धा भाजपाने त्यांच्याशी टक्कर घेऊ शकणारा झुंजार चेहरा पेश न केल्याचे ते यश आहे.

14 comments:

  1. Sir, what a perfect analysis, you are simply great. Salutes to you. Actually you are a political guru.

    ReplyDelete
  2. हे सध्याच्या भाजपा नेतृत्वाला कळत नसेल असे मला वाटत नाही. पण आपल्यापेक्षा कुणी वरचढ होऊ नये असे वाटत असावे. जर कुणी दुय्यम नेता यशस्वी झाला तर भविष्यात ते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतात आणि तेच त्यांना नकोय भले राज्य हातातून निसटले तरी चालेल.. आक्रमक स्मृती इराणी सध्या स्वतःहुन गप्प गप्प आहेत की त्यांना गप्प केले गेले आहे ?

    ReplyDelete
  3. Yes ur article is giving correct reasons for defeat of BJP.One more reason BJP fails to solve local issues of common man.I think any aggressive beta who can fight with Kejriwal need to b given right now so as to give him sufficient time to take on Kejari.As for Rupa Ganguli administrative capacity is required to handle big state of Bangal which is not known to us.As a precedance it may b recalled that in MP Una Bharti trounced Digvijay Singh and became Chiefs Minister but due to bad quality of administration was replaced by Shivraj Singh Chauhan.

    ReplyDelete
  4. भाऊ राजस्थान मध्ये भाजप चा पुढचा चेहरा कोण ?

    ReplyDelete
  5. भाजपसाठी मार्मिक विश्लेषण खर्च आपण लिहिता त्याप्रमाणे स्थानिक चेहेरा पुढे आणायला हवा होता बर्याच लोकांनी मतदान केले नाही( ३६%)पंतप्रधान व गृहमंत्री मैदानात आहेत ते व्हा बाजी नक्की जिंकणार आपल्या न जाण्याने फार फरक पडणार नाही असं वाटल असणार
    बिहार बंगाल साठी भाजप श्रेष्ठी धडा घेतील?

    ReplyDelete
  6. भाजपने आप ला दिल्ली आंदण दिली याबद्दल केजरीवाल भाजपचे आभार मानतील अशी आशा करूया .देशव्यापी पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवला त्याची जाण छोटा पक्ष ठेवतो का ते पाहूया !


    ReplyDelete
  7. सही!, हेच ऊमगत नाही ह्या लोकांना. राष्ट्रीय नेतृत्वाखाली प्रादेशिक प्रश्नांची ऊकल होऊ शकत नाही. आणी जनतापण ते मान्य करत नाही. राष्ट्रीय मुद्दे आणी प्रांतातील मुद्दे वेगळे असतात .

    ReplyDelete
  8. अगदी योग्य विवेचन नेहमीप्रमाणे.

    ReplyDelete
  9. जसे गांधींनी छोटे गांधी निर्माण केले, तसे मोदींनी छोटे मोदी निर्माण करणं गरजेचं दिसत आहे

    ReplyDelete
  10. सध्या व्हाट्सप वर एक संदेश फिरत आहे त्यात निवडून आलेले आप चे बहुतेक उमेदवार मुस्लीम असल्याचे निदर्शनाला आणले आहे.भाजपच्या हिंदुत्वाची ही प्रतिक्रिया असू शकते.मोफत गोष्टींच्या आमिषाला मतदार बळी पडला असाही प्रचार पिंजरा आणि उंदिर यांच्या चित्रासह केला जात आहे.

    ReplyDelete
  11. भाऊ संघटन मंत्री म्हणून काम केलेल्या नरेंद्र भाई मोदी यांना ही गोष्ट लक्षात आली नसेल असे नक्कीच नाही, परंतु काँग्रेस अस्तंगत होत असताना राष्ट्रीय पातळीवर भविष्यात मोदींना आव्हान देणारा केजरीवाल हा एक चेहरा नक्की असावा परंतु या माणसाला दिल्लीतच अडकवून ठेवले तर तो देशभरात फारशी हालचाल करू शकणार नाही कारण मागच्या निवडणुकीत 67 जागा मिळवणारे केजरीवाल 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या दिल्लीत अक्षरशः पाल्या पाचोळ्या सारखे उडून गेले होते, कोणत्याही प्रकारचे संवैधानिक अधिकार नसलेल्या दिल्लीत केजरीवाल यांना अडकवून ठेवणे ही एक राजकारणाची चाल असावी, पुराणात वामनाने बळी राजाला पाताळात ढकलून दिले होते व तिथले राज्य त्याला दिले होते म्हणजेच हा बळीराजा मुख्य प्रवाहात येऊ नये अशी तजवीज केली होती, केजरीवाल यांच्याबाबत मोदी आणि शहा यांची तीच तर रणनिती नसावी?

    ReplyDelete
  12. हे अमित शहांना का कळलं नसेल??????

    ReplyDelete