Sunday, February 16, 2020

डफ़लीवाले॓‌‌ऽऽऽऽऽ डफ़ली बजा

Image result for aap swearing in

दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर विविध भाजपाविरोधी पक्षाच्या नेत्यांनी व प्रवक्त्यांनी ‘आप’मतलबी प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. जणू त्यांचेच पक्ष दिल्लीत अफ़ाट बहूमताने जिंकलेत आणि भाजपाचा दारूण पराभव झाला, असे ऊर बडवून सांगाताना हे प्रवक्ते उत्साहाने भारावले होते. अर्थात त्यामुळे भाजपावाले डिवचले जात होते, हे सत्य आहे. पण जितक्या छात्या फ़ुगवून असे पक्ष प्रवक्ते मिरवित होते, त्यांच्या पक्षाची दिल्लीतील अवस्था काय होती? उदाहरणार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी दिल्लीत देशद्रोह्यांचा पराभव झाला, किंवा मतदाराने त्यांना नाकारले; अशा भाषेत भाजपाला खिजवले होते. पण त्यांचेच तर्कट मान्य करायचे तर राष्ट्रवादी पक्षाला दिल्लीकर मतदाराने कोणती ‘उपाधी’ दिली असेल? कारण भाजपाचे उमेदवार आठच निवडून आले. पण त्या पक्षाला निदान ३८ टक्के तरी मते मिळाली. मलिक यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला दिल्लीकरांनी अर्धा टक्काही मते दिली नाहीत. म्हणजेच त्यांना तर देशद्रोही सोडा, साधा पक्ष म्हणूनही दिल्लीकरांनी झिडकारलेले आहे ना? पण आपचा विजय म्हणजे आपला असल्याच्या थाटात असे लोक बोलत होते. किंबहूना आजकाल अशा विरोधकांची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे, की त्यांना भाजपाच्या पराजयात आपला सत्यानाशही जाणवेनासा झाला आहे. तसे नसते तर अशा प्रतिक्रीया उमटल्या नसत्या. मात्र मलिक वा तत्सम लोक जितके निर्बुद्ध आहेत, तितके दिल्ली जिंकणारे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल मुर्ख नाहीत. म्हणूनच त्यांच्या विजयाची डफ़ली वाजवून आपला आनंदोत्सव साजरा करणार्‍यांना त्यांनी अवघ्या दोन दिवसात खरी जागा दाखवून दिली आहे. दिल्लीच्या नव्या सरकारच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याचे साधे आमंत्रणही केजरीवालांनी अन्य नेत्यांना वा भाजपाविरोधी पक्षांना नाकारले आहे. अगदी अन्य राज्यांच्या तत्सम मुख्यमंत्र्यांनाही.

तीनचार दशकापुर्वी अमिताभच्या जमान्यात ॠषि कपुर देखील खुप लोकप्रिय अभिनेता होता आणि त्याच्या कुठल्या तरी चित्रपटात गाजलेले गाणे आठवले, ‘डफ़लीवाले, डफ़ली बजा’. बाकी तुझी लायकी काहीच नाही, हाच संदेश त्यातून केजरीवाल यांनी दिलेला आहे. तसे बघायला गेल्यास मधल्या दोनतीन वर्षात अशा प्रत्येक भाजपा विरोधी राजकीय विजयी सोहळ्यात केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अगत्याने शपथविधीला आमंत्रित होते आणि तितक्याच उत्साहात त्यांनी हात उंचावून अन्य बिगर भाजपा नेत्यांसह तिथल्या मतदाराला अभिवादन केलेले होते. पण आता त्याच सर्वांना परतीचे आमंत्रण देण्याची वेळ आल्यावर मात्र केजरीवालांनी अशा निकामी पक्ष व नेत्यांना ठेंगा दाखवला आहे. विजयी सोहळ्यात गुणगौरव फ़क्त आपलाच झाला पाहिजे आणि त्यात अन्य कोणी भागिदार केजरीवालांना नको आहे, असाही त्यातून अर्थ काढला जाऊ शकतो. किंबहूना असे सोहळे वा शपथविधी त्यातील विजेत्यापेक्षाही उपस्थितांच्या नावाने गाजतो. कोण आले वा कोण आले नाहीत, त्याचाच गाजावाजा फ़ार होतो आणि सत्कारमुर्ती मागे पडते. हे ओळखण्याची कुवत केजरीवाल यांच्यात असल्याचे लक्षण यातून दिसते. त्यापेक्षा अशा सर्वांना आमंत्रण नाकारून त्यांनी मोठे राजकारण खेळले आहे. ज्यांना त्यांनी सतत लक्ष्य केले, ते भाजपाचे सर्वोच्च नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अगत्याने आमंत्रण दिलेले आहे. मोदी तिथे हजर रहाणार नाहीत, याचीही केजरीवालांना खात्री आहे. पण त्यानिमीत्ताने बातम्या रंगवल्या जातील आणि प्रसिद्धीचा लाभ मिळणार हे त्यांना नेमके समजले आहे. त्याखेरीज आणखी एक बाब मोठी आहे. आपण विजय मिळवायचा आणि त्यात सर्व पक्षांचे भाजपाविरोधी योगदान असल्याचे श्रेय फ़ुकटात वाटायचे; असला मुर्खपणा केजरीवालांना नको आहे. त्यामागची भूमिकाही समजून घेतली पाहिजे.

थोडक्यात अशी भूमिका घेऊन केजरीवाल यांनी भाजपा विरोधकांचा हिरमोड केला आहे. पण त्यामुळे भाजपाच्या समर्थकांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. केजरीवाल कितीही उटपटांग व्यक्तीमत्व असले, तरी जाणत्या नेत्यापेक्षा अधिक हुशार व कुशाग्र बुद्धीचे आहेत. त्यांना आपल्या विजयात अन्य कोणी भागिदार नको आहे, इतकेच नाही तर आपण भाजपाचे विरोधक म्हणून जिंकलेलो नाही, असाही एक संदेश द्यायचा आहे. आपला पक्ष भाजपाला पर्याय व आपण स्वत: मोदींना पर्याय आहोत; असा संकेत त्यातून द्यायचा आहे. आपण केवळ मोदींच्या विरोधात वाटेल ती बकवास केल्याने जिंकलेलो नाही, तर आपल्या कामाच्या बळावर आणि पर्यायी विकास आराखडा होता म्हणून जिंकलो. मतदाराने आपल्याला दिलेला कौल हिंदूत्वविरोधी नाही की मुस्लिमधार्जिणा नाही. आपण देशातील भाजपाला पर्यायी भूमिका व कार्यक्रमाचे नेते आहोत, असेही केजरीवाल सांगत आहेत. इतर पक्षांप्रमाणे आपण फ़क्त भाजपाला शिव्या घालणे वा विरोधासाठी विरोध करण्याचे राजकारण खेळत नाही, तर मोदींप्रमाणेच जनहिताच्या कामाला प्राधान्य देतो व त्यांच्यापेक्षाही कल्याणकारी कार्यक्रम धोरणे आपल्यापाशी आहेत. मतदाराने त्यालाच प्रतिसाद दिला आहे. सहाजिकच आम आदमी पक्षाला मिळालेले यश मोदीविरोधाचे नसून विकासकाम व कल्याणकारी धोरणाला जनतेने दिलेला कौल आहे. त्याला मोदी विरोधाचे डंके पिटून गालबोट लागायला नको. म्हणून केजरीवाल यांनी अतिशय धुर्तपणे अन्य विरोधी पक्ष व नेत्यांना शपथविधीपासून कटाक्षाने दुर ठेवले आहे. पण त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन आपण व्यक्तीविरोधी राजकारणाचे पुरस्कर्ते नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या कारणास्तव बाकीच्या पक्षांची दमछाक झालेली आहे, तिथे केजरीवालांनी भाजपाला पर्याय होण्याचा नेमका मार्ग शोधला आहे. ज्या मार्गाने ओडिशाचे नविन पटनाईक पाच निवडणूका जिंकलेले आहेत.

गेल्या लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण करताना मी याचा उल्लेख केला होता. देशात अन्यत्र मोदीलाट जोरात चालली असताना, ओडिशात मात्र नविन पटनाईक यांनी मोठे यश मिळवले होते. एकदा नव्हेतर पाचव्यांदा त्यांनी विधानसभेत बहूमत मिळवले. त्यांच्या लोकसभेतील काही जागा भाजपा मोदीलाटेमुळे जिंकू शकला तरी विधानसभेसाठी त्याच मतदाराने पटनाईकांचा पाचव्यांदा कौल दिला. कारण भाजपाने नजरेत भरणारा कोणी राज्यातला नेता पुढे केला नव्हता आणि त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीतही घडली. लोकसभेतील दारूण पराभवानंतर केजरीवाल यांनी आपला पवित्रा बदलला. केंद्र सरकारशी पंगा घेण्यापेक्षा त्यांनी दिल्लीकर व तिथल्या गरजांना प्राधान्य देऊन व्यक्तीविरोधी वा भाजपा विरोध असले राजकारण सोडून दिले. आपण केलेली कामे व राहिलेली कामे, यांचाच गोषवारा त्यांनी दिल्लीच्या मतदारासमोर सातत्याने मांडला. कौल त्याला मिळालेला आहे आणि त्याचा मोदी वा भाजपाच्या अन्य धोरणांशी संबंध नाही. त्याच यशाला ओळखून केजरीवाल यांनी शपथविधीला गालबोट लागू नये, म्हणूनच अशा तमाम मोदीद्वेषी पक्षांना खड्यासारखे बाजूला ठेवलेले आहे. याचा अर्थ त्यांना एनडीएमध्ये जायचे आहे असाही नाही. तर सध्या राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही पक्षाला भाजपाला पर्यायी धोरण दाखवता आलेले नाही. फ़क्त मोदी विरोधातली भाषणे टिप्पण्या किंवा मोदी सरकार घेईल, त्या निर्णयाचा विरोध, असे राजकारण संकोचले आहे. ती कोंडी फ़ोडून भाजपा व मोदींच्या राजकीय भूमिकांना व धोरणांना पर्यायी धोरण घेऊन राष्ट्रीय राजकारणात उडी घेण्याची केजरीवालांची ही तयारी असू शकते. त्याचे पहिले पाऊल म्हणजे मोदीविरोधी गठबंधन वा झुंडीपासून बाजूला होऊन आपली नवी ओळख पेश करणे आहे. बाकी आपापले मतलब शोधून ‘आप’च्या यशाचे ढोल वा डफ़ली वाजवणार्‍यांना त्यांनी रोखलेले नाही. उलट वाजवा रे वाजवा असे अप्रत्यक्ष प्रोत्साहनच दिलेले आहे. मात्र मनातल्या मनात तेच केजरीवाल म्हणत असतील,

डफ़लीवालेऽऽऽ डफ़ली बजा
ना मै नाचूऽऽऽ  ना तू नचा

7 comments:

  1. Now he will try to contest the elections in all states. Formula is Muslim votes+ soft hindutva+free bees.

    ReplyDelete
  2. वा! कमाल आहे भाऊ तुमची. इतके अन्वयार्थ ह्या एका घटनेतून निघू शकतात हे स्वप्नात देखील वाटले नव्हते. हे तुम्हालाच सुचू शकते.
    विचारांना चालना दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. विश्लेषण अचूक आहे. फक्त मोदींना तगड आव्हान देणारा मोदींच्या विचारसरणीचा नेता निर्माण होण गरजेच आहे.

    ReplyDelete
  4. भाऊ एकदम सही विश्लेषण...
    भाऊ केजरीवाल उटपटंग आहे हे एकदम चपखल बसते...
    केजरीवाल हे मतांचे एका बजुने धर्म व दुसर्या वाजुने शिक्षण पाणी विज या फ्रिबीज (फुकट सेवा ) देत वेगळ्या प्रकारे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झालेत.. एकाबाजुने विज पाणी वर झोपडपट्टी व इतर गरीब वर्ग व दुसर्या बाजुने नव आणि मध्य वयीन माता पिता यांनी शिक्षणाच्या धोरणाला पाठिंबा दिला आहे.. तसेच मोहल्ला क्लिनीक मुळे जेष्ठ नागरिक पण सुखावला आहे.
    तसेच यात दिल्ली सरकार हे भरपूर पैसे असलेले आहे यामुळे थोडक्या व मर्यादित क्षेत्रात मोठी लोकसंख्या यामुळे हे सहज शक्य झाले.. व आतापर्यंत खेड्यातील शेतकरी वर्गाला कर्ज माफी देऊन मते खेचत 2009 ची लोकसभा युपीएच्या इतर सर्व बाबतीत फेल असताना झिंकली होती..
    आता या प्रकारात भाजपचा शहरी मतदार सहज फसु शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे..
    यातील फ्रि विज पाणी व काही शिक्षण बाबींची घोषणा शेवटच्या तिन महिन्यात केल्या (2019 च्या लोकसभा झटक्या नंतर) हे किती माध्यमातून अधोरेखित केले गेले? किती माध्यमातून हा एक ध्रवीकरणाचा सापळा आहे हे दाखवले... व मतदार जनतेला या सापळ्यात केजरीवाल अटकवत आहेत हे प्रेझेंटेशन केले गेले?
    असे न दाखवता केजरीवाल हे सर्व मत खेचण्या साठी करत आहेत हि परखड बाजु दाखवून सावध करण्या ऐवजी अन्य मुद्द्यावर भर दिला. केजरीवालच्या दिल्ली सरकार ने गेल्या निवडणूकीतील कीती अश्वासने पुरी केली.. व पहिल्या दोन आडिच वर्षे किती नौटंकी केली.. किती आप आमदार व मंत्री भ्रष्टाचार व व्याभिचार वरुन निलंबित केले.. जर आम आदमीचा नेता होता तर राज्य सभेची उमेदवारी श्रिमंत प्रस्थांना का दिली? कन्हैया व जेएनयु च्या टुकडे टुकडे आंदोलनला याच केजरीवालनी पाठिंबा दिला होता राष्ट्रहातवादी(भाजपच्या मोदी सरकारची भारतीय संरक्षण विषयक महत्वाची धोरणे (अत्याधुनिक साधन समुग्री खरेदी भारताच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक रस्ते पुल बांधकामे फेंन्सींग ) भारतीय सैन्याला पाक व अतिरेकी बाबत कारवाई करण्याचा फ्रि हात (घर व छप्पर दरवाजे मजबूत असतील तर विज पाणी हे उपयोगी आहे जान है तो जहान है) 370 व भारताच्या सारभौमत्वाचे रक्षण राम जन्म भुमी कोर्टाचा निर्णय काहीही असो लाॅ & ऑरडर सांभाळूण्याची क्षमता भाजप सरकार मध्ये आहे हे कोर्टाला माहिती होते व तो निर्णय झाला... जिएसटी लागु केला जो जिस भाषा समझता है उस भाषा में जवाब पाकी आणि फुटीर ग्रृपला दिला) अतिरेकी हल्ले थांबले... अती उच्चा पातळी वरिल करोडो चा भ्रष्टाचार थांबले.. युरिया निमकोटींग करुन व ईतर शासकीय सबसीडी डायरेक्ट लाभदारीच्या खात्यावर जमा करुन शासकीय व डिलर -व्यापारी भ्रष्टाचार थांबले व टॅक्स पेअरचे देशाचे लाखो कोटी वाचवले..
    असे मुद्दे विसरले गेले.. व काळाच्या व मिडियावालेंच्या ओघात झाकले गेले.... तर मोदींची (जरी महत्वाचे व अनेक बँकीग, दहशतवादी व ईकाॅनाॅमीक फ्रंटवर यशस्वी नोटबंदी फेल दाखवून.. बेरोजगारी व इकाॅनाॅमी फेल दाखवण्यासाठी उजळणी केली गेली..)
    सध्याच भाजपचे नेते व प्रवक्त्ये मागील रविशंकर प्रसाद मिनाक्षी लेखी स्मृती इराणी प्रताप रुडी फडणीस यांच्या तुलनेत खुपच अप्रगल्भता आहे... व अजुन हिंदूवाद, राम मंदिर तिन तलाक यातुन बाहेर यायची आहे..
    आणि यात ही प्रवक्त्या मंडळी जेव्हडी फेल होतील तेव्हडे ते भाजपला घातक होईल.... यातुन एक चुकीचा संदेश लोकांना पोहचवणं हे यशस्वी होते आहे..
    हेच केजरीवाल भ्रष्टाचार आंदोलनातुन उदयास आले व भ्रष्टाचाराचा एकही कलंक नसताना मोदी विरोधी लोकसभेला ऊभे राहिले तसेच दिल्ली तील इमामांना 18000 हजार दर महिना देऊन ध्रुवीकरण केले असे अनेक मुद्दे ठोकरत व दुर्लक्षीत राहिले.. हे आता किती खोल वर पसरते.. व पसरवले जाते व जनता यातुन कशी प्रतिसाद देते यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे...
    आपण याचे अनेक वेळा वाभाडे काढले आहेत..

    ReplyDelete
  5. केजरिवालला माहिती आहे कर्नाटकात ज द काॅ सरकार स्थापनेवेळि गवशांचि यात्रा जमलि पुढे लोकसभेच्या वेळि कोई ईधर कोई उधर!

    ReplyDelete
  6. Here, one has to remember that Kejriwal has done many developmental works with very less costs. BJP, if it wants to counter the strategy, it has to not only do the developmental works but also with less costs.

    ReplyDelete
  7. भाऊराव,

    दिल्लीकरांनी काम करणाऱ्यास मतं दिली असं एकंदरीत दिसतंय.

    मग याहून चांगलं काम करणाऱ्या फडणविसांना नेमकी काय अडचण आली की ते ऐन वेळेस मुख्यमंत्री बनू शकले नाहीत? फडणवीस व केजरीवाल यांची तुलना करायची झाली तर निकष काय असावेत? दिल्ली चिमुकली आहे तर महाराष्ट्र अवाढव्य आहे.

    यावर तुमचं विवेचन वाचायला आवडेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete