Friday, March 27, 2020

मुश्किल है के हदसे हट जाये

Hit by lockdown, stranded on roads: Migrant labourers walk for ...

कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नाकर्ते लोक फ़ारच फ़ुशारले आहेत आणि त्यांच्या प्रतिभेला नवनवे अंकुर फ़ुटत आहेत. जगाचा इतिहास सांगतो की कर्तबगार माणसांना नेहमीच सत्वपरिक्षा द्यावी लागत असते आणि त्यांची परिक्षा घेणारे नेहमीच नाकर्ते असतात. सहाजिकच केंद्र सरकार व विविध राज्यसरकारे आपल्या परीने प्रयत्नांचा आटापिटा करीत असताना आणि सामान्य लोकही आपल्या परिसरातील गरजवंतांची जमेल तितकी सोय लावण्यासाठी राबत असताना; भाकड प्रतिभावंत मात्र त्यातल्या त्रुटी व उणिवा शोधण्यासाठी आपली सन्मान्य बुद्धी खर्ची घालत आहेत. कारण त्यांना खराखुरा भारतच ठाऊक नाही, तर त्या भारताची संकटावर मात करण्याची क्षमता ठाऊक असण्याची शक्यता कशी असेल? त्यांनी मिलोची भाकर कधी खाल्लेली नाही की पीएल ४८० नावाचा तांबडा गहू खाऊन गुजराण केलेली नाही. हरीत क्रांतीनंतर अन्नधान्याची सुबत्ता झाल्यावर जन्माला आलेल्यांना रोगप्रतिकारक शक्ती वा विपरीत स्थितीतून येणारी जगण्याची अपुर्व क्षमता कशी समजावी? पण माझी पिढी वा नंतर १९६० च्या आधी जन्माला आलेली भारतीयांची पिढी त्या अनुभवातून गेलो आहोत. कॉलरा, देवीपासून एन्फ़्लुएन्झा अशा असाध्य महामारीवरही मात करून आलेलो आहोत. आम्हाला कुठला कोरोना किंवा स्वाईनफ़्लू भयभीत करू शकत नाही. करणार तरी कसा? उपासमार किंवा अर्धपोटी गुजराण करीत आम्ही दिवस काढले आणि तेव्हा कुठलीही रोगराई आम्हाला घाबरवू शकलेली नाही. मोठ्यांना खायला अन्न, कोवळ्या पोरांच्या तोंडी दुध मिळताना मारामार असायची आणि डॉक्टर ही तुटवड्याची वस्तू होती. त्यातून आम्ही भारताला इथपर्यंत आणला आहे. ज्यांची समज आयडिया ऑफ़ इंडियातून उपजली, त्यांना हा अस्सल भारत कुठून समजावा? कोरोनाच्या नुसत्या आवईनेच त्यांची पॅन्ट ओली झाल्यास नवल कुठले?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या दोन पिढ्या कमालीच्या हलाखीत गेलेल्या आहेत. दुष्काळातून किती लोक गाववस्त्या सोडून शहरात पोहोचले आणि रस्त्यावर संसार मांडून त्यांनी पुढला भारत उभा करण्यासाठी योगदान दिले. तेव्हा त्यांनी अनुदानाने आम्हाला जगवा म्हणून वाडगा हाती घेतला नव्हता. किंवा त्यांच्या न्यायासाठी कोणी सुखवस्तु बुद्धीमंत झोळी घेऊन भिका मागत फ़िरत नव्हते. अन्नाचे इतके दुर्भिक्ष्य होते, की अमेरिकेत गुरांसाठी पिकवले जाणारे गहू भारतीयांना सवलतीच्या दराने अमेरिकेने पुरवले आणि तेच गुरांसाठीचे तांबडे गहू पीएल ४८० नावाने रेशनवर वितरीत व्हायचे. तितक्यातही देश सुखी होता आणि कुठल्याही संकटावर मात करायला उभा रहात होता. तशाच स्थितीत या भारतीय समाजाने चिनी आक्रमण पचवले आणि पाकिस्तानशी दोन लढाया जिंकून दाखवल्या होत्या. खायला अन्न अपुरे असताना पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकवेळचे अन्न सोडा म्हणून आवाहन केले, तरी लोकांनी भूक मारली. हे परके संकट असे निवारून नेलेला, हा भारतीय समाज किंवा त्याची कुवत नेहरूंनी आयडिया ऑफ़ इंडियात लिहून ठेवलेली नाही. मग त्यावर बुद्धी पोसलेल्या विचारवंतांना त्याचा थांगपत्ता कशाला असेल? आणि त्याच कालखंडात तो इन्फ़्लुएन्झा अंगावर चाल करून आला होता. प्रत्येक घरात कोणीतरी आजारी होता आणि आजच्या इतकी अद्ययावत खाजगी किंवा सार्वजनिक इस्पितळेही उभारलेली नव्हती. पण एकमेकांना हात देऊन सहाय्य करून प्रसंगावर मात करणारी सामान्य माणसे होती. साधनसामग्री नव्हती वा तुटपूंजी होती. पण इच्छाशक्ती जबरदस्त होती. वैफ़ल्यग्रस्त प्रतिभा समाजात प्रतिष्ठीत नव्हती किंवा अनुराग कश्यप वा तत्सम नाकर्त्यांना प्रतिभावंत म्हणून समाजात मान्यता नव्हती. नकारात्मकतेला प्रतिभा म्हटले जात नव्हते, तर सकारात्मकता उपाशी वंचितांनाही योद्धा म्हणून उभे करीत होती. निराश करीत नव्हती.

‘नयादौर’ नावाच्या सिनेमातले गाणे आठवते. ‘मैदानमे अगर हम डट जाये, तो मुश्किल है के हदसे हट जाये’ अशा शब्दांना प्रतिभा समजले जात होते. म्हणून अत्यंत गरीबांचा देश असून त्याने इतकी दिर्घकालीन झुंज देऊन इथपर्यंत मजल मारलेली आहे. कारण आमची पिढी ‘आयडिया ऑफ़ इंडिया’ वाचून शहाणी झाली नाही. मेहबुब खानच्या ‘मदर इंडिया’ने आम्हाला घडवले. त्यातली नर्गिस एका गाण्यात म्हणजे ‘दुनियामे आये है तो जीनाही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीनाही पडेगा’. बस्स इतकीशी शिदोरी घेऊन आम्ही साठी-सत्तरी गाठली. म्हणून आम्ही बर्डफ़्लू किंवा स्वाईनफ़्लूला दाद दिली नाही आणि कोरोनाने जगभर थैमान घातलेले असतानाही मैदानात पाय रोवून उभे आहोत. पुढारलेल्या अत्याधुनिक सेवांच्या सुविधा असलेल्या देशात किडामुंगीसारखी माणसे मरत आहेत आणि आम्ही तुटपूंज्या साहित्य सोयींवर विसंबून बाधीतांचा व मृतांचा आकडा रोखून धरलेला आहे. तो कुणा वैफ़ल्यग्रस्त बुद्धीमंताच्या प्रतिभेवर विसंबून नाही. प्रत्येक भारतीयाच्या उपजत हिंमत व झुंजार मानसिक शक्तीच्या बळावर. मागल्या कित्येक वर्षात पाश्चात्य खरकाट्यावर पोसलेले शहाणपण शिकवणार्‍यांना स्वर्ग वाटणार्‍या देशात हाहा:कार कशाला उडाला आहे? त्याचा खुलासा देता आलेला नाही. पण अजून कोरोनाला पाय रोवू दिलेला नाही, त्या भारतीय व्यवस्था व शासनावर शंका घेतल्या जात आहेत. कारण हे लोक कुठलीही लढाई देऊ शकत नाहीत. पराभूत मानसिकतेच्या अशा प्रतिभावंत बुद्धीमंतांचा भरणा असल्याने आज सगळे पाश्चात्य देश डबघाईला आलेले आहेत. जिथे असल्या थिन्कटॅन्क वा बुद्धीमंतांचे अड्डे नाहीत, तेच देश त्यातून बचावले यालाही योगायोग मानता येणार नाही. जिथे असल्या शंकासुरांना वा तथाकथित बुद्धीमंतांना बोलायलाही प्रतिबंध आहे, त्या चिनमध्ये म्हणूनच कोरोना लौकर नियंत्रित होऊ शकला. उलट इटाली, फ़्रान्स, अमेरिका गर्तेत गेले आहेत. पण भारत ठामपणे कोरोनाशी दोन हात करतो आहे.

मित्रांनो, लंगड्या माणसाला कुबड्या कितीही चांगल्या असल्या तरी चालवू शकत नाहीत. त्याला पाय टेकावाच लागतो. कुबड्या त्या अल्पावधीसाठी त्याच्या शरीराचे वजन पेलून पाय पुढे टाकायला मदत करत असतात. ज्यांच्या बुद्धीलाच लंगडेपण आलेले असते, त्यांना सुदृढ पायसुद्धा चालवू शकत नाहीत. बुद्धीने चालणार्‍यांचे पाय आपोआप अधू होऊन जातात. त्यांना आपले असलेले पाय सुद्धा शोधावे लागतात, किंवा अन्य कोणी दाखवावेच लागतात. १९६०-७० च्या दशकांमध्ये भारतीयांना पावडरचे दूध वापरावे लागत होते. रेशनवर परदेशी आयातीचा गहू किंवा कमी दर्जाचे धान्य मिळू शकत होते. ते कसदारही नसायचे. पण त्यामुळे कोणी खचला नव्हता. आजच्या सुविधा त्याच्या तुलनेत चैनमौज आहे. पण तरीही रडगाणे चालूच आहे. श्रीमंती किंवा हिंमत मनात असावी लागते. अन्यथा नुसता भरदार देह किंवा भरलेली तिजोरी कामाची नसते. भारतीयांपाशी पैसा नसेल किंवा साधनांचा तुटवडा असेल, पण इच्छा भरपूर आहे आणि तेच तर भारतीयांचे सर्वात मोठे भांडवल आहे. आम्ही रेशनवरच्या तांबड्या गव्हावरही खुश होतो, आज दोनतीन रुपये किलोने चांगला गहू तांदूळ संकटकाळात सरकारने दिलेला असतानाही रडणारे म्हणूनच केविलवाणे दुर्दैवी आहेत. अधिकाधिक सुविधा माणसाला अधिकाधिक दुबळा बनवतात आणि आज रडणारे त्यापेक्षा वेगळे नाहीत. मग ते इथले विचारवंत प्रतिभावंत असोत की पाश्चात्य देशातले सुखवस्तू रोगबाधित असोत. सुविधांच्या कुबड्या त्यांना चालवू शकत नाहीत. पण मनातली हिंमत इच्छा पर्वतारोहणही करू शकत असते. भारताची कोरोनाशी झुंज म्हणून सामान्य जनतेला भेडसावू शकलेली नाही. पण बंदिस्त बिळात बसलेल्या शहाण्यांना भयगंडाने पछाडले आहे. इच्छा म्हणजे माणूस असतो आणि इच्छेच्या आहारी जाऊनच तो पराक्रम विक्रम करू शकतो. ज्यांच्या इच्छाशक्तीलाच व्हायरस लागला आहे, त्यांचे काय?

व्हायरस म्हणजे तरी काय असते? तो कुठला रोग नसतो की रोगबाधाही नसते. व्हायरस कोणाला ठार मारत नाही. तो बाधा झालेल्या माणसाची प्रतिकारक शक्ती खच्ची करतो. त्याची झुंजार प्रवृत्ती संपवून टाकतो. कुठल्याही बाह्य आक्रमणाशी प्रतिकार करता आला नाही, तर शेवट अपरिहार्य असतो. मग ती शक्ती व्यक्तीची असो किंवा देशाची असो. लढायची प्रतिकाराची इच्छा मेलेला माणूस वा देश लढू शकत नसतात. अमेरिका, किंवा अन्य प्रगत देशांना कोरोनाने रडवले. कारण त्यांच्यातली ती प्ररिकारक शक्ती खच्ची झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती वा नागरीक यांच्यातली प्रतिकाराची इच्छा जेव्हा सामुहिक होऊन लढायला उभी रहाते; तेव्हा कितीही मोठ्या शत्रूला हरवणे शक्य असते. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी मानसिकता पुढारलेल्या देशात रुजवली गेली व पोसली गेली. त्यातून तिथल्या समाजाची सामुहिक प्रतिकारशक्तीच उध्वस्त होऊन गेली आहे. त्यामुळे त्या दुर्बळ समाजांना भरपूर साधने व अवजारे असूनही कोरोनाशी झुंज देणे शक्य झालेले नाही. भारताने तीच प्रतिकारक शक्ती जपली व जोपासलेली आहे. हजारो लाखो रोजंदारी करणारे मजूर शहरात टेकायला जागा नाही, म्हणून मैलोगणती चालत आपल्या गावी जायला निघालेले आहेत. त्यांच्या तोंडी सरकारला शिव्या कितीशा आहेत? पण आपल्या घरात सुखरूप जागी बसलेल्या बुद्धीमंत टिकाकारांचे पाय सुजलेले आहेत. मात्र उरलेले सामान्य नागरीक आपल्या आसपासच्या परिसरात गरजवंतांना मिळेल ती मदत द्यायला बाहेर पडलेले आहेत. ती आयडीया इंडिया आहे. ती मदर इंडिया आहे. गुरांचा गहू आणि मिलो खाऊन आलेली ती क्षमता आहे. चमचमीत खाऊन गरीबीवर उदात्त ढेकर देण्यातून ती प्रेरणा मिळू शकत नाही की तिचा अविष्कार होऊ शकत नाही. यापेक्षाही भयंकर परिस्थितीतून आमचा देश उभा राहिला टिकला आहे, झुंजला आहे आणि इथवर आला आहे. त्याच्यापुढे कोरोनाची काय मातब्बरी?

कारण माहिती आहे मित्रांनो? आमच्या पिढीने अमेरिका वा पाश्चात्य पुढारलेल्या देशांनी भिक म्हणून दिलेले टाकावू निकस अन्न वा दुध वगैरे घेऊन जगण्याशी सामना केला. पण आमची बुद्धी पाश्चात्य शहाणपणाचे खरकटे वा टाकलेले विचार घेऊन पोसलेली नाही.

48 comments:

  1. "जगाचा इतिहास सांगतो की कर्तबगार माणसांना नेहमीच सत्वपरिक्षा द्यावी लागत असते आणि त्यांची परिक्षा घेणारे नेहमीच नाकर्ते असतात"...
    ह्यात सगळं आलं...जबरदस्त भाऊ..

    ReplyDelete
  2. अजुन एक आठवण आहे...चुकत असल्यास दुरुस्त करा.
    अमेरिकने अन्न धान्य देताना, रुपयांचं अवमुल्यन करण्याची पूर्वअट देखील घातली होती...

    ReplyDelete
  3. भाऊ काका डोळ्यात अश्रू आणि छातीत हिंमत आली हे वाचून! सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    -कृष्णा देशमुख

    ReplyDelete
  4. Ek number sir
    Ancient Bharat was very poor
    Because of
    800 years Islamist colonialism
    200 years old European Christian colonialism

    ReplyDelete
  5. व्वाह भाऊ,
    खरं तर एकंदरीत "एका समाजाची" वागण्याची पध्दती बघता हा वायरस पसरवण्यासाठी कटिबध्द झालेत असंच दिसतय, तसंही कुठले ही सरकार यां शांतीदुतानां जाब विचारू धजणार नाही, म्हणून थोडं नैराश्य आलं होतं,
    आपल्या या लेखानं नवी उमेद मिळाली
    धन्यवाद

    ReplyDelete
  6. शेवट लाजवाब भाऊ !

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर लेख भाऊ!

    ReplyDelete
  8. Ek nava ashecha kiran ani khup sari prerana dilit bhau tumhi tumachya sarkhe kankhar pathicha kana asla ki amhi kuthlyahi sankatala mat deu
    .yahi sankatala asach udhakun lau
    Bhau khup khup dhanyavad bhau tumache .
    Jai jawan jai kiasan

    ReplyDelete
  9. भाऊ, नेहमीप्रमाणेच जबरदस्त विचार मांडलेत..!
    आणि शेवटची वाक्ये फारच सुरेख..!!

    "आमच्या पिढीने अमेरिका वा पाश्चात्य पुढारलेल्या देशांनी भिक म्हणून दिलेले टाकावू निकस अन्न वा दुध वगैरे घेऊन जगण्याशी सामना केला. पण आमची बुद्धी पाश्चात्य शहाणपणाचे खरकटे वा टाकलेले विचार घेऊन पोसलेली नाही."

    ReplyDelete
  10. मानलं भाऊ तुम्हाला.आताच्या घडीला असे तुमच्यासारखे समाजाला प्रॆरणा देणारे पत्रकार हवे आहेत.जे लोकाना लढायला शिकवतील आहे त्या स्थितीतून पुढे जायला मदत करतील.धन्यवाद भाऊ या अप्रतिम लेखाबद्दल.

    ReplyDelete
  11. भाऊसाहेब, अगदी मनातलं बोललात!!! तुमच्या पिढीतील चिकाटीला सलाम !!!

    ReplyDelete
  12. भाऊ अप्रतिम हा लढा आपल्या जिंकायचाच आहे

    ReplyDelete
  13. हे वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं.

    ReplyDelete
  14. भाऊ, अगदी सत्य लिहिले आहात. मी सध्या "मंदीर, पुतळ्यांपेक्षा हॉस्पिटल बांधली असती तर अशी वेळ आली नसती". जसे काही हजारो हॉस्पिटल उगाचच बांधून ठेवायची. जे काम सध्या तीन चार गावे मिळून असलेली पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये होतयं त्यासाठी गल्लोगल्ली दवाखाने बांधून काय होणार आहे. इटलीमध्ये अद्ययावत अनेक हॉस्पिटलस् आहेत पण उपयोग काय? एकादी महामारीची साथ येते तेथे कितीही हॉस्पिटलस् असली तरीही उपयोग नाही हे सिद्ध झालेय. सरकारी दवाखान्यांच्या संखेत वाढ व्हायला हवेय व त्यांची गुणवत्तापण उच्चप्रतीची व्हायला हवी हे खरंच आहे. पण हे गेली सत्तर वर्षे कोणाला सुचले नाही हे ही खरंच. मुंबई किंवा मोठ्या शहरांतून असलेली मोठी हॉस्पिटल ही इंग्रजाच्या काळातील आहेत. खरं म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात एक अद्ययावत सरकारी हॉस्पिटल असणे गरजेचे आहे हे नक्कीच.
    पण म्हणून, चौपदरी रस्ते, सरदारांच्या पुतळ्यासारखे पर्यटन स्थळे, मंदीरे बांधू नयेत हे पटत नाही.
    भाऊ, आपण लिहिल्याप्रमाणे भारतीय लोक गरीबीमुळे म्हणा किंवा देवभोळेपणामुळे म्हणा मनाने कणखर आहेत हे खरं आहे, विशेषतः आताची साठी सत्तरीच्या पुढची पिढी व त्यांच्या आधीची पिढी. कमीत कमी साधनांमध्ये जगल्यामुळे टंचाई कधी भासली नाही. चैनीची साधने कधीच मिळाली नाही त्यामुळे आता उपलब्ध असून त्याची मातबरी वाटत नाही. त्यामुळे या पिढीला दुसऱ्याच्या उष्ट्यावर जगण्याची सवय नाही हेच खरं आहे.

    ReplyDelete
  15. शाब्दिक फटकारे.

    ReplyDelete
  16. भाऊ,
    मानवाधिकार, उदारमतवाद इत्यादींचा अतिरेक व कोरोना महामारी चा फैलाव यांचा काही संबंध आहे का?

    ReplyDelete
  17. शत शत नमन‌ भाऊ, खरंच प्रेरणादायी विचार. याला म्हणतात जिवनाचे तत्त्वज्ञान. भाऊ तुमची लेखणी अशीच तळपत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

    ReplyDelete
  18. श्री भाऊ असे लेख माणसाला जगण्याची नवी उमेद देतात मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  19. असे लेख वाचले की लढण्याची... झगडण्याची प्रेरणा मिळते... भारतीय लढाऊ बाण्याची जाणीव होते....
    Thanks a lot... For this blog..
    Pradip Karale

    ReplyDelete
  20. तस्माद्युध्यस्व भारत.भाऊ अप्रतिम!

    ReplyDelete
    Replies
    1. याचा अर्थ काय?

      Delete
    2. श्री लोकमान्य टिळकांनी"श्रीमद्भगवद्गीता-रहस्य"या ग्रंथात तस्माद्युध्यस्व भारत याचा अर्थ पुढील प्रमाणे दिला आहे-"हे अर्जुना!म्हणून तू युद्ध कर.

      Delete
  21. "नाकर्त्यांना प्रतिभावंत म्हणून समाजात मान्यता नव्हती. नकारात्मकतेला प्रतिभा म्हटले जात नव्हते, तर सकारात्मकता उपाशी वंचितांनाही योद्धा म्हणून उभे करीत होती. निराश करीत नव्हती."
    ती मान्यता आता आहे असे सुचवायचे आहे का ?वर्तमानपत्रात लिहिले किंवा टीव्हीवरील चर्चासत्रात भाग घ्यायचे निमंत्रण मिळाले म्हणजे समाजमान्यता मिळाली असे म्हणायचे का ? आणि जर नाकर्त्याना मान्यता मिळत असेल तर समाज ती देतो ,त्यात समाजाचाही दोष आहे हे विसरू नका . मान्यता ही हिसकावून घेण्यासारखी गोष्ट नक्की नाही . उपाशी वंचित जगतात ते जगण्याची इच्छा किंवा नाईलाज असल्याने . सकारात्मक्ता किंवा योद्ध्याच्या भूमिकेमुळे असे म्हणणे हे उदात्तीकरण/ गौरवीकरण करणे होय .

    ReplyDelete
  22. कोंदणात ठेवावा असा जबरदस्त लेख.मिलोच्या काळातील एकेक आठवणी जाग्या झाल्या.मागं वळून पाहिल्यानंतर भारतीयांच्या जीवनावरील निष्ठेचा प्रत्यय येतो.त्या तशा निकृष्ट मिलोला व तांबड्या गव्हाला चविष्ट बनविणाऱ्या विनातक्रार गृहिणींच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणलेत.आणि आज आपण किती तक्रारखोर झालो आहोत हे पण जाणवले. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेवटचे वाक्य तर जीवनाच्या सन्मानाचा तुरा आहे.

    ReplyDelete
  23. भाऊ, अप्रतिम विचार मांडलेत. आधी corona शी लढू आणि त्याला हरवूच आणि नंतर या अशा उपट सुमभाना सरळ करू.
    भारत विजयी भव:

    ReplyDelete
  24. Bhau mi tumache lekhan nehami Vachat asto sarv lekh khup mahiti detat pan tumacha ha lekh vachun aaj himmat sudha milali bhau.. jay Hind

    ReplyDelete
  25. भाऊ, अप्रतीम! भाकड प्रतिभावंतांच्या कानाखाली सणसणीत हाणलीत. "लंगड्या माणसाला कुबड्या कितीही चांगल्या असल्या तरी चालवू शकत नाहीत " हे अगदी खरय. वाचून 60-70 च्या दशकातला अवघड काळ डोळ्यासमोर उभा राहिला आणि ऊर भरून आला. तुमच्या लिहिण्यात जादू आहे कारण तुम्ही पोट-तिडकीने लिहिता! असेच परखड आणि विचार प्रवर्तक लिहित रहा... मंनःपूर्वक धन्यवाद॰

    ReplyDelete
  26. एकदम परखड . 🙏🙏🙏 इथे एक आठवण सांगावीशी वाटते. अर्थात कुटुंबात मामील पिढीपासून पुढे आलेली. माझ्या पणजोबांविषयी. १९१८ साल फ्लूची भीषण साथ. माणसे किडामूंगीसारखी मरत होती. कोकणात दूर वाड्यावस्त्यांवर लोकांना कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. पणजोबानी , दिनकरभटजी, कंबर कसली. घरच्या बैलगाडीत हंड्यामधये उकळून गार केलेले गोडे पाणी व भाताची पेज भरून दूर वाड्यांवस्त्चा रसता पकडला. बरोबर स्वताचा तरूण मुलगा गोविंद मदतीला. असे कित्येक दिवस मदतकार्य केले. पण नियतीला ते पाहवले नाही. गोविंदाला रोगाची लागण झाली व त्यात तो , आजोबा. दगावले. ह्या धक्क्यातून दिनकरभटजी सावरू शकले नाहीत.

    ReplyDelete
  27. Your last para is perfect. Sum of everything.

    ReplyDelete
  28. भाऊ ....नेहमीप्रमाणे लेख मस्तच.. !! तुम्ही वापरलेले ' शब्द प्रयोग ' तर अप्रतिमच. पाश्चात्य खरकाट्यावर पोसलेले शहाणपण , पराभूत मानसिकतेचे स्वघोषित बुद्दीमन्त............. भाकड स्वघोषित प्रतिभावंतांची फौजच ' ल्युटिअनसच्या ' नावाखाली खांग्रेसने इतक्या वर्षात जोपासली. कालच ' प्रिंट ' या टोळीने चालवलेल्या वृत्तपत्रात असा लेख लिहिला होता की लोकांमध्ये ' अंतर ' ठेवून वावरण्यात लोकांना प्रवृत्त करण्यात मोदी कमी पडले आहेत. असे काही वाचले की आता यापुढे ह्या स्वघोषित भाकड प्रतिभावंतांना... हे सर्व ' बातों के भूत नाही तर ' लातों ' के भूत ' असून ह्या सर्वाना ओल्या फोकाने भर चौकात बडविण्याची इच्छा होते. नेहरूंची ' आयडिया ऑफ इंडिया ' आणि त्यावर पोसलेल्या विचारवंतांना आता सार्वजनिक भर चौकात बडविण्याची वेळ आली आहे असे वाटल्यावाचून राहवत नाही. जेंव्हा केंव्हा हा ' विषाणू ' चा कहर ओसरेल तेंव्हा असा कहर रोखण्यासाठी ' लोकशाही ' योग्य की हुकूमशाही ( कम्युनिझम ) यावर वाद होणे अटळ वाटते. चीन हुकूमशाहीमुळे विषाणूची साथ वेगाने नियंत्रणात आणू शकला अशी टिमकी मारू शकेल. कारण अशा विषाणूंचा सामना करण्यासाठी ' थिंकटैन्क ' च्या नावाखाली बुद्धी पाजळणाऱ्यांचा उपयोग नाही. अमेरिकेत ' मियामी ' च्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी अजूनही कायम असून मोकाट फिरणारे पर्यटक ' हम मौतसे नाही डरते ' हा डायलॉग मारताना दिसतात. लोकशाहीच्या नावाखाली धांगड धिंगा ..!! उद्या ह्यातील एकेकाचा श्वास फुलायला लागला की ह्यांना हा विषाणूची लागण म्हणजे काय ह्याचा अंदाज येईल.

    ReplyDelete
  29. भाऊ
    अत्यंत सडेतोड. होय ज्यांनी १९६च काल अनुभवलाय तेच हे सांगू शकतात.
    आपले विचार,"अधिकाधिक सुविधा माणसाला अधिकाधिक दुबळा बनवतात आणि आज रडणारे त्यापेक्षा वेगळे नाहीत. मग ते इथले विचारवंत प्रतिभावंत असोत की पाश्चात्य देशातले सुखवस्तू रोगबाधित असोत. सुविधांच्या कुबड्या त्यांना चालवू शकत नाहीत. पण मनातली हिंमत इच्छा पर्वतारोहणही करू शकत असते. भारताची कोरोनाशी झुंज म्हणून सामान्य जनतेला भेडसावू शकलेली नाही. पण बंदिस्त बिळात बसलेल्या शहाण्यांना भयगंडाने पछाडले आहे. इच्छा म्हणजे माणूस असतो आणि इच्छेच्या आहारी जाऊनच तो पराक्रम विक्रम करू शकतो. ज्यांच्या इच्छाशक्तीलाच व्हायरस लागला आहे, त्यांचे काय?""

    फारच सुंदर

    ReplyDelete
  30. लोकसत्तावाले असे लेख छापत आहेत
    https://www.loksatta.com/maharashtra-news/walter-charles-rand-who-brought-social-distancing-in-1896-because-of-plague-dhk-81-2118492/

    ReplyDelete
  31. एक हृदय हो भारत जननी !

    धन्यवाद, भाऊ.

    ReplyDelete
  32. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी मानसिकता आत्ताच निर्माण झाली की ती 2014 पुर्वीपासुन होती?

    ReplyDelete
  33. भारत आणि भारतीय म्हणजे काय हे फक्त भाऊंच्या लेखनातून समजते.

    ReplyDelete
  34. खूप सुंदर लेख आहे .मनाला उभारी देऊन गेला.धन्यवाद

    ReplyDelete
  35. पप्पू इटली मध्येच का थांबला नाही

    ReplyDelete
  36. Bhau, nice post. The content of your post has been used by Shekhar Gupta in his article that was published one day later (on 28th March 2020)

    ReplyDelete
  37. नि:संशय अप्रतिम!!
    सद्यस्थितीचे परखड विवेचन करताना, वाचकांच्या मनात प्रयत्नांचे स्फुल्लींग पेटविण्याचे अनमोल कार्य करत रहाणेच सच्च्या पत्रकारांकडून अपेक्षित आहे. लो. टिळक, शि.म.परांजपे, अत्रे, पु.भा. भावे यांच्या परंपरेतील हा बहुधा शेवटचा मराठी पत्रकार...नमोस्तुते..जयोस्तुते !!

    ReplyDelete
  38. नि:संशय अप्रतिम!!
    सद्यस्थितीचे परखड विवेचन करताना, वाचकांच्या मनात प्रयत्नांचे स्फुल्लींग पेटविण्याचे अनमोल कार्य करत रहाणेच सच्च्या पत्रकारांकडून अपेक्षित आहे. लो. टिळक, शि.म.परांजपे, अत्रे, पु.भा. भावे यांच्या परंपरेतील हा बहुधा शेवटचा मराठी पत्रकार...नमोस्तुते..जयोस्तुते !!

    ReplyDelete