Monday, March 30, 2020

माणूस हीच खरी समस्या

मानवी हव्यासाची समस्या (उत्तरार्ध)

Coronavirus: Symptoms, death rate, where it came from, and other ...

रौद्ररूप धारण करणारा निसर्ग, वातावरण, अन्य सजीवांची जीवनशैली आणि मानवी जीवनातल्या आवश्यकता यांचा ताळमेळ घालता यावा, यासाठी मानवी बुद्धी वापरली जावी ही अपेक्षा मानवाने पुर्ण केली. त्याने अन्न, वस्त्र व निवारा अशा मूलभूत गरजांची पुर्तता करून घेत क्रमाक्रमाने निसर्गाच्या प्रतिकुलतेवरही मात केली. अन्य सजीव प्राण्यांना आपल्यापेक्षा दुबळे करून टाकले आणि निसर्गाची रहस्येही उलगडून आपल्या जीवनावश्यक गरजेच्या पलिकडे जाऊन ऐषारामाच्या जीवनाची कास धरली. बाकीचे प्राणी रोजच्या अन्नासाठी जीवनाचा संघर्ष करतात. माणसाने रोजच्या जीवनासाठी पळापळ कष्ट करण्याची कटकट संपवून टाकली. त्याने अन्न साठवण्याची सुविधा निर्माण केली आणि सहाजिकच ते अन्न ही मानवी जीवनातील पहिली मालमत्ता बनुन गेली. मालमत्ता झाली, मग तिच्या मालकीच्या कल्पना अस्तित्वात येत गेल्या. शिकारी वा कळपाने जगणार्‍या अन्य पशूंच्या जीवनातही अशा मालकी हक्काच्या कल्पना वेगळ्या प्रकारे कार्यरत असतातच. शिकारी प्राण्यांसाठी आपले हक्काचे कार्यक्षेत्र असते आणि चरणार्‍या कळपांसाठीही कुरणाचे अधिकार परस्पर संमतीने वाटुन घेतलेले असतातच. त्यावरून त्यांच्यात प्राणघातक संघर्षही पेटतात. पण कायमस्वरूपी मालकी हक्काच्या कल्पनेचा विकास व कल्पनाविलास मानवी मेंदूतून विकसित झालेला आहे. आरंभी तो अन्य सजीवांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित होता. एकदा ते प्रस्थापित झाल्यावर विविध मानवी कळपांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी त्याचाच वापर केलेला आहे. अन्य प्राणी व निसर्गाची भिती संपल्यावर माणूस आपल्यातलेच शत्रू शोधू लागला आणि तिथून मग समाज, जातीपाती, देश-राष्ट्र, वंश कळप टोळ्या, असले आकार जन्म घेत गेले. माणसातच आपले आणि परके असे भेदभाव तयार होत गेले. रंगरूप, भाषा बोली वा समजूती व चालीरिती हे शत्रूत्वासाठीचे मुद्दे बनत गेले. पण त्यातली प्रेरणा वा चालना एकच होती. आपले वर्चस्व किंवा मालकी हक्क. 

आरंभी माणूसही स्कॅव्हेंजर होता म्हणे. त्याचा अर्थ अन्य कोणी केलेली शिकार पळवून आपले पोट भरणारा प्राणी असा होतो. पुढे निसर्गाची रहस्ये उलगडताना माणसाने आपणच हत्यारे निर्माण करून शिकारीचे तंत्र अवगत केले. पण त्याच्यातली ती दुसर्‍याचे पळवायची मानसिकता गेली नाही, संपली नाही. आरंभी अन्य श्वापदांच्या तोंडी असलेली शिकार पळवून गुजराण करणारा माणूस, मग स्वजातीय माणूस प्राण्याच्या तोंडातला घास पळवण्याचा विचार जोपासत गेला. त्याला पुढल्या काळात शोषण, अन्याय, लुटमार असे नानाविध शब्द वापरले गेले. पण वास्तविकता स्कॅव्हेंजर इतकीच आहे. फ़रक खुप मोठा होता. असा तोंडचा घास पळवणारी आरंभीची जीवनशैली गरजेचा भाग होता. नंतरच्या काळात तो अधिकार व मालकी प्रस्थापित करण्याचा मंत्र होत गेला. कारण अन्न नाशिवंत माल असेपर्यंत पळवापळवी तात्कालीन गरज होती. अन्न टिकावू वस्तु झाल्यानंतर साठेबाजी व मालकी, हे हत्यार किंवा अडवणूकीचे साधन होऊन गेले. धान्याची कोठारे, दुभती जनावरे, कोंबडी बकरी असे खाद्यमासाचे जीवंत साठे अशा रुपाने मालकीला आकार येत गेला. टिकावू धान्याच्या रुपाने जीवनावश्यक वस्तूंचा साठा शक्य होता आणि त्यातून गरजवंताला लाचार करून वेठीस धरण्य़ाचे हत्यार आकाराला आले. पुढे त्यातूनच उत्पादन देणारी जमिन वा निवारा सुद्धा मालमत्ता बनू लागल्या. पण मोजक्या लोकांना इतक्या मालमत्तेची राखण व देखभाल करणे शक्य नव्हते. मालकीचा आकार वाढत होता आणि त्याची राखण करण्याची किंमत वाढतच चालली होती. त्यातून मालकी हक्क व अधिकाराला लहान आकारात रुपांतरीत करण्याची गरज भासू लागल्यावर मानवी बुद्धीने मूल्यवान धातू, सोने, दागिने वा चलनाच्या रुपाने मालकी हक्काना सुक्ष्म स्वरूप दिले. त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. थोडक्यात ते शोषण वा लुटमारीचे एक तंत्र झाले आहे.

पण अर्थशास्त्र हा माझा आजचा विषय नाही. माझा विषय मानवी समस्यांपुरता मर्यादित आहे आणि मानवी समस्या म्हणून जेव्हा आपण चर्चा करतो, वाद प्रतिवाद होतात, त्यात सगळ्या समस्या मानवाने निर्माण केल्या असे लक्षात येऊ लागते. उदाहरणार्थ माणसाच्या मुलभूत समस्या किंवा गरजा अन्न वस्त्र निवारा असे समजले जात होते. पण आजकाल त्यांचा विचारही कुठे होताना दिसत नाही. काश्मिरमध्ये मुलभूत गरजा म्हणून फ़ोन इंटरनेट अशा गोष्टी अगत्याने सांगितल्या जातात. दुर्गम खेड्यापर्यंत फ़ोन पोहोचले नाहीत वा तशी सुविधा नाही, अशाही तक्रारी उर्वरीत भारतातील लोकांकडून ऐकायला मिळतात. ह्यांना आपण सुविधा समजत होतो. आता त्या गरजा झालेल्या आहेत. जर माणसाला जगण्यासाठी अशा सुविधा आवश्यक आहेत, तर अन्य प्राण्यांना त्यांची गरज का भासत नाही? तर ती खरीखुरी गरजच नसते. अवघ्या ३०-४० वर्षापुर्वी दुर्गम खेड्यात माणसे जगत होती आणि त्यांना फ़ोनची सुविधा उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांचे काही अडलेले नसेल तर आजच कशाला ती गरज बनलेली आहे? सरकार दहा रुपयात शिवथाळी देण्याची योजना आणते आणि त्याच शहरामध्ये दहाबारा रुपयात वडापाव मिळत असतो. मग प्रश्न असा येतो, की वडापाव विकणारा मुद्दाम महागाई करून लोकांच्या तोंडातला घास काढून घेत असतो काय? सरकारी यंत्रणेला दहा रुपयात थाळी देणे परवडत असेल, तर वडापाव विकणार्‍याला कशाला परवडत नाही? हॉटेल चालवणार्‍या कुणाला पन्नास ते शंभर रुपयात खानावळीची थाळी का विकावी लागते? हे प्रश्न निसर्गाने निर्माण केलेले नाहीत. ते माणसाने आपल्याच विविध उपायातून निर्माण केलेले आहेत. कधीकाळी माणुस कमावत होता, त्यातली ८० टक्के रक्कम कुटुंबाच्या पोटपाण्यावर खर्च व्हायची. आज २०-२५ टक्के कमाई त्यावर खर्च होत नाही. मात्र त्याच माणसाला दहा रुपयातली थाळी हवी असते. तर ही समस्या त्यानेच निर्माण केलेली नाही काय? 

गेल्या लोकसभेपुर्वी राहुल गांधी यांनी मतदाराला पुन्हा कॉग्रेसला सत्ता देण्याचे आवाहन करताना प्रतिवर्षी गरीब कुटुंबाला ७२ हजार रुपये असेच कुठल्याही अटीशिवाय द्यायचे आमिष दाखवले होते. लोकांनी फ़क्त मतातून पुन्हा कॉग्रेसला सत्तेत आणायचे होते. बदल्यात त्यांना कुठल्याही कामाशिवाय, कष्टाशिवाय दरमहा सहा हजार रुपये मिळणार होते. पण हे सहा हजार रुपये सरकार कुठून आणणार, त्याचे उत्तर मात्र राहुलना देण्याची गरज भासली नाही. सरकार नावाची संस्था कुठलेही कष्ट करत नाही वा उत्पन्न काढत नाही. त्याची कमाई जनतेने भरलेल्या करातून होत असते. म्हणजे कोणीतरी कर भरणारा आहे, म्हणून सरकारी तिजोरीत करोडो रुपये जमा होतात. त्यातून ठराविक लोकांना अटीशर्ती लावून गरीब घोषित करायचे आणि त्यांना तितकी रक्कम देऊन टाकायची. पण मग ज्यांच्याकडून अशी रक्कम गोळा केली जाते, त्यांनी ती कशाला भरायची? ते अधिक कमाई करतात, तो गुन्हा असतो काय? जे तितकी कमाई करू शकत नाहीत, म्हणून त्यांनी भिकार्‍यासारखे अपेक्षितांच्या रांगेत उभे रहायचे काय? ही स्थिती माणसावर माणसानेच आणलेली आहे. सगळ्या सामान्य लोकांमध्ये समान शरीरयष्टी असेल तर त्यांच्यात रोजचे कष्ट उपसण्याची तितकीच क्षमता असते. त्यातून त्यांनाही आपल्या गरजा भागवणे शक्य आहे. मग एकाने दानशूर व दुसर्‍याने भिकारी कशाला रहावे? अशी स्थिती मानव जमात सोडुन अन्य कुठल्या प्राणिमात्रामध्ये कशाला दिसत नाही? त्याचे उत्तर आपण कधीच शोधणार नाही काय? हे गरीब वा श्रीमंत असले भेद अन्य प्राणिमात्रांमध्ये नसतात. कारण ते निसर्गाने घालून दिलेल्या नियमानुसार हजारो वर्षे जगत आले आहेत आणि त्यांनी कधीच निसर्गाला झुगारून त्याच्यावर मात करण्याची उचापत केलेली नाही. माणसाने मात्र निसर्गालाही आपला गुलाम करण्याच्या प्रयत्नात स्वत:लाही परिस्थितीचे गुलाम करून टाकलेले आहे. मग त्यातले सत्य स्विकारण्यापेक्षा आपणच जन्माला घातलेल्या समस्यांचे उपाय शोधणारी शास्त्रे शोधणे सुरू आहे.

यातली गंमत अशी, की मानवाला भेडसावणारी खरी समस्या स्विकारण्याची वा डोळे उघडून बघण्याची हिंमतच माणुस गमावून बसला आहे. ती समस्या बाकी कोणतीही नसून खुद्द माणुसच ती समस्या आहे. आजच्या जगाला भेडसावणारी खरी समस्या माणूसच आहे. त्याने मिळालेल्या बुद्धीचा तारतम्याने वापर केला नाही आणि गरजांच्या पलिकडे जाऊन निसर्गालाच आपला गुलाम करण्याचा आगावूपणा केला, त्यातून आजचे मानवी जीवन समस्या होऊन बसली आहे. मग ती प्रदुषणाची असेल, पर्यावरणाची असेल किंवा रोगराई, भौगोलिक, राजकीय, आर्थिक असेल. या सर्व समस्या व प्रश्न मानवनिर्मित असल्याचे लक्षात येईल. बिचार्‍या अन्य प्राणिमात्रांपाशी त्याचे आकलन नाही की मिमांसा करण्याइतकी बुद्धीही नाही. म्हणून त्यांना त्यातली समस्या समजू शकत नाही की त्यावर काही उपाय शोधण्याची कल्पनाही सुचत नाही. कारण त्यांनी निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा कायम संभाळल्या आहेत आणि मानवाने त्या सर्व मर्यादा व सीमा झुगारून दिल्या. त्याचे परिणाम समजण्या ओळखण्याची हिंमत माणूस गमावून बसला आहे. मग ते सत्य लपवण्यासाठी ज्या विविध उपायांचे उदात्तीकरण चालू असते, ती प्रत्यक्षातली बनवाबनवी आहे. आपणच आपली फ़सवणूक करून घेत असतो. म्हणून मग आरे कॉलनीतल्या अडीच हजार झाडांना मुंबईचे फ़ुफ़्फ़ूस म्हणून तमाशा रंगवला जातो आणि बाकीची मुंबई वा सभोवतालचे डोंगर आजवरच्या विकास नावाच्या धुमाकुळाने उध्वस्त केल्याचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालतो. इवल्या मुंबई बेटावर कोट्यवधी लोकसंख्येला आणून दाटीवाटी जमा करणार्‍यांनी मुंबईच्या खाड्या, झाडे, डोंगर उध्वस्त केलेत, इतके सत्य असते. त्या वस्तीने कचरा निर्माण करायचा, गटारे तुंबवायची आणि पावसाने अतिवृष्टी केल्याचा प्रत्यारोप करून पळ काढण्याला मानवी बुद्धीची समस्या म्हणतात. ती लोकसंख्या रोखणे निसर्गाच्या हाती नसले तरी ती बुडवणे त्याच्या हातात नक्की असते, हे सत्य आहे आणि कुठल्याही शास्त्र वा वैज्ञानिक दाखल्यांनी ते खोटे पाडता येणार नाही. मुंबईच कशाला जगातल्या कुठल्याही समस्या घेतल्या तरी त्याचा जनक माणूसच दिसेल. कारण माणुस हीच आता एक समस्या होऊन बसली आहे आणि हव्यास हा त्याचा जन्मदाता आहे. (संपुर्ण)

15 comments:

  1. १००% सत्य भाऊ !

    ReplyDelete
  2. भाऊ पृथ्वीवर माणूस उपराच आहे .मुळात पृथ्वीला झालेला विषाणूजन्य आजार म्हणजे मानव जात . त्यातला करोना मनुष्यप्राणी आहे .आणि ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीला आलेला ताप आहे या विषाणूमुळे . ती आज ना उद्या तिची शक्ती वापरून हा विषाणू नष्ट करणार .

    ReplyDelete
  3. सर्व काही हवे, सार्यांंचे हवे, सर्वदा हवे...

    ReplyDelete
  4. भाऊ फार अळणी वाटत आहे आज काल
    कोरना मुळे
    राजकीय घडामोडी पण शांत आहेत
    एखादा मस्त झणझणीत लेख लिहा राव

    ReplyDelete
  5. भाऊ, लेख अगदी नेहमीप्रमाणेच अप्रतिम..!
    पण थोडस असहमत. अन्यथा बऱ्याच अंशी तुमच्या विचाराशी सहमत.
    "कित्येक लक्ष योनी फिरल्यावर माणसाचा जन्म मिळतो" हे क्षणभर गृहीत धरलं तर माणूस ही समस्या नाही. तसे असते तर माणसाने माणसालाच देवत्व दिले नसते. नियतीने, निसर्गाने, देवाने अथवा एखाद्या अद्भुत शक्तीने माणूस हे रसायनच असं निर्माण केलंय की त्याला नवरसाबरोबरच अतिरिक्त अशी बुद्धी दिलीय. तिचा नि:स्वार्थी, समाजोपयोगी वापर झाला तर "राम" होतो नाहीतर "रावण". एखादा जोगिंदर शर्मा प्रमाणे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर "वर्दी" चढवून देशसेवेचे व्रत घेतो तर एखादा वैश्विक संकटातही राजकीय उणीदुणी काढण्यात धन्यता मानतो. जुन्या काळात आणि सध्याच्या काळातला महत्वाचा फरक म्हणजे सध्या भौतिक सुधारणा जरी अतिरिक्त प्रमाणात झाल्या असल्या तरी चांगले आदर्श उभे करण्यात किंवा "चांगले कशाला म्हणायचे" ह्याचे संस्कार नव्या पिढीवर करण्यात समाज माध्यमे अथवा आपण सर्वचजण साफ अपयशी ठरलो आहोत. पैसा आणि पाठोपाठ येणारे भौतिक सुख हे जर आदर्श असतील तर हे आदर्श नसून समस्या आहेत, माणूस ही समस्या नाही.
    प्रत्येक समस्येसोबत त्याचे समाधानही असते, फक्त शोधून अमलबजावणी करण्याचा अवकाश असतो.

    ReplyDelete
  6. भाऊ
    दोन्ही लेख सुन्दर जमलेत.या समस्येचे ऊत्तर आपल्या भारतीय पद्धतीत आहे.मानवी मनाचा अध्यात्मामध्ये जेवढा सखोल विचार आपल्या सनातन धर्मात आहे तेवढा कुठेच अन्यत्र आढळत नाही.जसा भारत आर्थिकद्रुष्ट्या बळकट जाईल तसे सर्व जग आपल्या पद्धतीचा अभ्यास करू लागेल.काळाप्रमाणे मुळ गाभा जसा आहे तसा ठेवून बदल करावे लागतील पण या समस्यान्चे भारतच देऊ शकेल असं मला वाटते.पुन्हा एकदा वैचारीक लेख लिहल्याबद्दल आपले अभिनंदन.

    ReplyDelete
  7. माणुस हीच समस्या उत्तरार्ध, हा पूर्वार्धाचे सुंदर समापन
    करतो. या विषयासाठी मुंबई शहर हे सर्वोत्कृष्ट ऊदाहरण होय. माणसांची असलेली अनैसर्गिक जास्त संख्या आणि माणसाचा हव्यास दोन्ही मुंबईच्या आजच्या परीस्थितीला कारणीभूत आहेत. मुंबईची उपलब्ध मर्यादित जागा आणि माणसांचा तिथे सतत येणारा लोंढा, यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने 1970-71 मधे मुंबई बेटाबाहेर 'नवी मुंबई' स्थापन करायचा घाट घाटला.प्रकल्पाची सुरवात झाली आणि जनतेने त्याला चांगला प्रतिसाद देखील दिला. परंतू 1977 मधे केवळ मानवी हव्यासाने बांद्रा-कुर्ला संकुल निर्माण करायचे ठरवले. परिणामी बांधकाम- विकास व्यवसायिक आणि राज्यकर्ते यांच्या लघुदृष्टी मुळे मीठी नदीच्या खोर्यात कॉंक्रीट जंगल तयार झाले आणि नदीचे पात्र सीमित झाले. 2005 साली त्याचा फटका मुंबईला महापुराच्या रुपाने मिळाला. तरी देखील एक समान्य मुंबईकर,चाळीस वर्षांपूर्वीची त्याची "आमची मुंबई" आज ती तशी राहिली नाही, हा विचार सद्धा करत नाहीय याचे वाईट वाटते.

    ReplyDelete
  8. आदरणीय भाऊ..
    आपण लिहिलेला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लेख.. मानवी समस्या वाचला. खुप आवडला. आपण दिलेली उदाहरणे माणूस म्हणून विचार कराव्यास लावतात. युव्हाल हरारी यानी होमो सेपिअन्स पुस्तक लिहिले आहे आणि ते वाचत आहे. मराठी अनुवाद आहे. त्यात देखील लेखकाने बोधात्मक क्रांती या विषयी लिहिले आहे आणि मानवाने या कल्पित विश्वाची निर्मिती करताना समस्या मानवाने कशा निर्माण केलेत याचा ऊहापोह केला आहे.

    भाऊसाहेब आपण एक साप्ताहिक चालू करावे असे मला मनापासून वाटते.

    धन्यवाद
    विनोद शेट्टी सांगली.

    मला एक पुस्तक वाचावयाचे आहे.. The concept of Quranic War written by Brg General मलिक. कोणत्या दुकानात मिळेल. प्रयत्न करतो पण मिळत नाही. कळावे.. Please delete this portion while posting on your blog.My Cell No
    9730954129

    ReplyDelete
  9. माणुस हीच आता एक समस्या होऊन बसली आहे आणि हव्यास हा त्याचा जन्मदाता आहे......अगदी शंभर टक्के पटलं.

    ReplyDelete
  10. माणुस हीच आता एक समस्या होऊन बसली आहे आणि हव्यास हा त्याचा जन्मदाता आहे. शंभर टक्के पटलं

    ReplyDelete
  11. Great Bhau ,all major problems are human created 100% true

    ReplyDelete
  12. Population theory:
    Population grows in geometric progression whereas food supply increases in arithmetic progression. Therefore, if preventive checks are not applied, positive checks will come in force.

    ReplyDelete
  13. Our own self-realization is the greatest service we can render to the world - Ramana Maharshi

    ReplyDelete