Monday, March 16, 2020

नटराजन आणि ज्योतिरादित्य

Image result for jayanti natarajan

मध्यप्रदेशचे कॉग्रेसनेते आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने त्या राज्यातील कॉग्रेसचे कमलनाथ सरकार घुसमटले आहे. कदाचित येत्या काही दिवसात तिथे सत्तांतर होऊ शकेल. आणखी एक राज्य कॉग्रेसच्या हातातून निसटलेले असेल. पण कोणाला त्याची पर्वा आहे काय? बाकीच्यांचे सोडून द्या, ज्यांना भारत किंवा कॉग्रेस पक्ष ही आपली वडिलार्जित मालमत्ता वाटते, त्या गांधी कुटुंबाला तरी पक्षाचा होत असलेला र्‍हास कधी चिंतेत टाकू शकलेला आहे काय? निदान त्यांचे वागणे व बोलणे यातून त्याचा मागमूस दिसत नाही. असता, तर त्यांनी पाच वर्षापुर्वीच अशा नाराज आवाजांची दखल घेऊन ढासळत चाललेल्या कॉग्रेसची डागडुजी सुरू केली असती. कारण जयंती नटराजन यांच्यापासून त्याची सुरूवात झाली आणि आज त्यांचे नावही कोणा कॉग्रेस नेत्याला आठवणार नाही. जानेवारी २०१५ मध्ये जयंती नटराजन यांनी पक्षातून राजिनामा दिला होता आणि राहुल गांधी यांच्या कार्यशैलीविषयी काही गंभीर आरोप केले होते. खरेतर त्यांना आरोपही मानता येणार नाही. नटराजन यांनी काही आक्षेप घेतलेले होते. पण कोणाला पर्वा होती? गांधी कुटुंबियांसाठी अशी नेतेमंडळी वा कार्यकर्ते पेचप्रसंग आल्यावर बळी जाण्यासाठीच पक्षात आहेत किंवा असावीत. त्यांनी नेहरू गांधी वारसांच्या मेहरबानीने सत्तेचे सुख भोगायचे असते आणि उपयोग संपल्यावर निमूटपणे बळीचा बकरा व्हायचे असते. त्याविषयी तक्रार केल्यावर तात्काळ त्यांना गद्दार ठरवून निंदानालस्तीचा भडीमार सुरू होत असतो. जयंती नटराजन ह्यांनी सुरूवात केली आणि आता विषय ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्यापैकी कितीजणांना नटराजन मॅडम आठवतात? त्यांची तक्रार तरी काय होती? त्यांनी कॉग्रेस पक्ष कशाला सोडला होता?

२०१४ च्या निवडणूका होऊन देशात मोदींचे सरकार येण्यापुर्वीची गोष्ट आहे. राहुल गांधींना खेळणे वाटणारे मनमोहन सरकार सत्तेत होते आणि त्यामध्ये जयंती नटराजन ह्या तामिळीनेत्या राज्यमंत्री होत्या. त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय होते आणि त्यांनी राहुल गांधींच्या इच्छेखातर अनेक राज्यातील विकास व उद्योग प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालयाचा तांबडा कंदिल दाखवून ठप्प केलेले होते. ओडिशातील वेदांत नावाच्या प्रकल्पाचा प्रदेश आदिवासी वस्तीचा होता आणि तिथे राहुल गांधींनी भाषण करताना प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी मंत्री म्हणून जयंती नटराजन यांनी केलेली होती. पण अशा प्रकारामुळे उद्योग जगत नाराज झाले होते आणि लोकसभा निवडणुका दारात उभ्या राहिल्या असताना त्याचा चटका राहुलना जाणवला. मोदींनी भाषणांचा धुमधडाका लावला होता आणि विविध मंचावर त्यांच्या विकास कामांचे गुणगान सुरू झालेले होते. सहाजिकच अशा पक्षबाह्य कुठल्या नामवंत मंचावर राहुलना झळकायचे होते. त्यासाठी उद्योगपतींची संघटना असलेल्या संस्थेला कॉग्रेसकडून साकडे घालण्यात आले. तर पर्यावरण मंत्रालयाच्या अडवणूकीवर बोट ठेवून त्याला नकार मिळाला. तेव्हा राहुलनी नटराजन यांची हाकालपट्टी करून तिथे जयराम रमेश यांना नेमणूक दिली आणि ठप्प झालेल्या प्रकल्पांचे खापर नटराजन यांच्या माथी ठोकून उद्योगपतींची वाहव्वा मिळवली. त्या हाकालपट्टीच्या निमीत्ताने खुलासा मागण्यासाठी २०१४ च्या पुर्वार्धात नटराजन यांनी राहुलना सविस्तर पत्र पाठवले होते. कारण राहुलच्याच इच्छेखातर प्रकल्प रोखण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मग त्याचे खापर आपल्या माथी कशाला फ़ोडता, असा साधा सवाल होता. पण त्याचा खुलासा त्यांना पुढल्या दीड वर्षात मिळाला नाही. दरम्यान राहुलनी कॉग्रेसचा धुव्वा उडवून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलेले होते.

सत्ता गेली, पण गांधी कुटुंबाचा रुबाब संपला नाही की मस्ती उतरली नाही. त्यामुळेच लोकसभा निकालानंतर नटराजन यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही त्यांना राहुलची भेट मिळाली नाही, की खुलासा मिळाला नाही. म्हणून अखेरीस २०१५ च्या आरंभी त्यांनी आपल्या वतीने जगासमोर सत्य मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यात सत्य मांडण्यापुर्वी अर्थातच ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच कॉग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा पाठवून दिलेला होता. त्यांनी आपले दुखणे पत्रकारांना कथन केले, त्यात आपण राहुलच्या आग्रहास्तव पर्यावरण खात्याकडून विविध प्रकल्पांना स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले. पण विषय तितकाच नव्हता. एके दिवशी पंतप्रधानांनी म्हणजे मनमोहन सिंग यांनी त्यांना बोलावून राजिनामा मागितला. कशासाठी त्याचा खुलासा केला नव्हता. पण मॅडम म्हणजे सोनिया गांधी नटराजन यांच्यावर नवी जबाबदारी सोपवणार असल्याने सरकारी जबाबदारीतून त्यांना मुक्त करीत असल्याचे सिंग यांनी सांगितले होते. लोकसभा निवडणुका जवळ असल्याने आपल्यावर काही पक्ष संघटनेची जबाबदारी येणार अशा प्रतिक्षेत नटराजन होत्या. पण त्यापैकी काहीच घडले नाही आणि नटराजन नावाची कोणी महिला पक्षात असल्याचेही गांधी कुटुंबाला लक्षात राहिले नाही. त्यामुळेच नटराजन यांना जाहिर खुलासा करावा असे वाटले. त्यांच्या राजिनाम्याविषयी नंतर राहुलना विचारण्यात आले असताना त्यांनी नटराजन ह्या कोणी ज्येष्ठ नेता नसल्याचे सांगून टाकले. ही नटराजन यांची पक्षातली म्हणजे पर्यायाने गांधी कुटुंबासाठीची किंमत होती. बहुतांश कॉग्रेस नेत्यांची तितकीच किंमत असते. मेहरबानी चालू असेल तोवर त्यांनी रुबाब मारावा आणि मिरवावे. काम संपले मग त्यांची रवानगी कचर्‍याच्या ढिगामध्ये होत असते. हा अनुभव नटराजन यांचाच एकट्याचा नव्हता. मागल्या पाचसहा वर्षात अशा अनेकांना त्याच मार्गाने कचर्‍यात जमा व्हावे लागले, किंवा त्यांनी कचर्‍यात फ़ेकले जाण्यापुर्वी स्वतंत्रपणे आपला रस्ता शोधला. ज्योतिरादित्य त्याच रांगेतला नवा मोहरा आहे.

मंगळवारी शिंदे यांनी पक्षाचा राजिनामा दिल्यावर त्यांचा १८५७ पर्यंतचा जुना इतिहास राहुलनिष्ठ कॉग्रेसजनांनी कसा खणून चव्हाट्यावर आणला, ते आपण बघतोच आहोत. पण नटराजन यांची इतकीही दखल घेतली गेलेली नव्हती. कारण उघड होते. नटराजन यांच्यामुळे कुठल्या राज्यातली सत्ता डळमळीत होणार नव्हती, किंवा राहुल प्रियंका यांना कुठे उत्तर देण्याची पाळी येणार नव्हती. दोन दिवस डोके आपटून घेतील आणि पत्रकार मंडळीही चारपाच दिवसात त्यांच्याकडे पाठ फ़िरवून नव्या ब्रेकिंग न्युजच्या मागे धावू लागतील, याची गांधी कुटुंबाला खात्री होती. झालेही तसेच. ज्योतिरादित्य शिंदे यांची कहाणी वेगळी आहे. त्यांच्यासह अनेक तरूण वा पन्नाशीच्या आतले तरूण कॉग्रेस नेते असे आहेत, ज्यांना ह्याच हेतूने महत्वाच्या जागी बसवण्यात आले. जसे मनमोहन सिंग किंवा चिदंबरम यांना नेमणूका मिळाल्या. त्यांनी कठपुतळी बाहुलीप्रमाणे तालावर नाचावे, इतकीच अपेक्षा होती. त्यांच्यापाशी कुठलेही कर्तृत्व नाही ही समजूत त्यांची खरी गुणवत्ता होती. पण सचिन पायलट, शिंदे, आसामचे हेमंतो विश्वशर्मा असे अनेक तरूण कॉग्रेस नेते, आपली सर्वशक्ती व बुद्धी पणाला लावून कामाला लागले होते. त्यांनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी गंभीर मानली व आपल्या कर्तृत्वावर पक्षाला पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प हाती घेतला. त्यांची गुणवत्ता व क्षमता पत्रकार माध्यमांच्याही नजरेत भरू लागली आणि तिथेच राहुलसह सोनिया, प्रियंका यांना हे लोक अडचण वाटू लागले. त्यामुळेच त्यांना खड्यासारखे बाजूला करणे वा दुर्लक्षित ठेवून पक्षाच्या बाहेर पडायला भाग पाडणे, ही रणनिती बनून गेली. पक्ष बुडाला तरी चालेल. पण आपल्या कुटुंबापेक्षा अन्य कोणाकडे गुणवत्ता वा पात्रता असता कामा नये, हे गांधी घराण्याने कवचकुंडल बनवून ठेवलेले आहे. त्यालाच ज्योतिरादित्य शिंदे सारखे तरूण धोका निर्माण करू लागले; मग त्यांची कोंडी करण्याला पर्याय तरी कसा उरेल?

गुलाम म्हणून वागणारे व आपली बुद्धी वापरण्याची हिंमतही नसलेले चिदंबरम, मनमोहन, गुलाम नबी आझाद वा दिग्विजयसिंग म्हणून ज्येष्ठ वा अगत्याचे असतात. दिग्गीराजा २०१२ च्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निकालापुर्वी काय म्हणाले आठवते? कॉग्रेसने बहूमताचे यश मिळवले तर श्रेय राहुल गांधींचे असेल आणि अपयश आलेच तर ते आम्हा कार्यकर्त्याचे असेल. ह्याला वैचारिकनिष्ठा म्हणतात. आपण आदेशानुसार काम करावे आणि आपले डोके वापरायचे नाही, ही आता कॉग्रेस कार्यकर्ता नेत्याची व्याख्या झालेली आहे. आपण कर्तृत्वशून्य आहोत आणि जगातले काहीही नेहरूंच्या वारसामुळेच घडते, या सिद्धांतावर विश्वास असण्याला गुणवत्ता मानले जाते. नटराजन वा इतर बहुतेक नेत्यांना तेच समजून घेता आले नाही, किंवा ज्योतिरादित्य शिंदेंना ते समजायला १८ वर्षे लागली. जसजसा त्याचा साक्षात्कार होत आहे, तसतसे कॉग्रेसचे नेते बाहेर पडत आहेत आणि ज्यांना तितकी हिंमत नाही, त्यांना पळवून लावण्याची योजना आझाद, पटेल वा अन्य श्रेष्ठींनी कायम सज्ज ठेवलेली असते. शिंदे त्याचेच बळी झालेले आहेत. मोदींच्या नसलेल्या चुका वा गुन्ह्याचा जाब विचारण्याची कुवत तुमच्यात असली पाहिजे. पण येस बॅन्केचा संस्थापक दिवाळखोर राणा कपूर दोन कोटी रुपये मोजून प्रियंकाकडून कुठले तैलचित्र कशाला खरेदी करतो, असा प्रश्नही पडणार नाही, अशी ‘तल्लख’ बुद्धी तुमच्यापाशी असायला हवी. तर तुम्हाला भवितव्य नसलेल्या कॉग्रेस पक्षात भवितव्य आहे. त्यापेक्षा आपल्या सारासार बुद्धीने चालण्याची इच्छा वा कुवत असलेल्यांना पक्षात स्थान नाही. कारण तुम्ही राहुल, प्रियंका वा त्यांच्या पुढल्या पिढीतल्या रेहान वगैरेंसाठी आव्हान होण्याचा धोका असतो ना? त्यापेक्षा पक्षाला रामराम ठोकून इतरत्र व्यवस्था बघावी किंवा मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे बुद्धी गहाण टाकून राहुलच्या नेतृत्वात काम करण्यात पुण्य शोधावे. ज्योतिरादित्य शिंदे यांना कर्तबगारीने काही मिळवायचे आहे आणि नटराजन यांना आपण कुठे चुकलो, त्याचे उत्तर हवे होते. त्यांना कॉग्रेस पक्षात काय स्थान असू शकते?

3 comments:

  1. भाऊ वास्तविक पक्ष हा घडवायचा असतो वाढवायचा असतो एक एक कार्यकर्ता जपायचा असतो . पक्षात कार्यकर्त्यांना नेत्या बद्दल आदर वाटायला हवा . जसा तो अटलजी , अडवाणी , यांच्या बद्द्ल वाटायचा . या लोकांनी शून्यातून पक्ष उभा केला . बाळासाहेब ठाकरे , प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे यांनी जसा पक्ष वाढवला . अगदी 2 च खासदार आले पण परत उभे राहिले . अटलजी प्रमोद जी , बाळासाहेब हे कार्य कर्त्या मध्ये एकरूप होऊन जातं प्रसंगी त्यांच्या घरी जस असेल तस जेवलेत हे लोक तेव्हा कुठे आज हे रूप दिसतंय .



    यांचं तस नाही अगदी तयार ready made पक्ष हातात मिळाला .त्यात सत्ता होती त्यामुळे कार्यकर्ते सांभाळणे हा प्रकार माहीतच नाही . आणि हीच खरी अडचण आहे .

    ReplyDelete
  2. कांग्रेस मधील भ्रष्टाचारी, लांगूलचालन करणाऱ्या 'संस्कृती'चे योग्य विश्लेषण. धन्यवाद

    ReplyDelete
  3. नमस्ते भाऊ,
    सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश यांनी राज्यसभेची उमेदवारी घेतली, त्याबद्दल आपले मत काय ??

    ReplyDelete